* विजय गायकवाड | Vijay Gaikawad: गोतावळा / diving

live

नमस्कार आपले स्वागत आहे. मी पुस्तके आणि मित्रांवर पैसे खर्च करतो,माझ्याकडे दगड आणि विटांवर खर्च करण्यासाठी पैसे नाहीत.-रस्किन बाँड. ही थोर माणसं व त्यांचे विचार मला पुस्तकात भेटलीत.ती भेटली आणि त्यांनी सांगितले कि,प्रत्येक दिवशी असं काही तरी करा की,ते तुम्हाला अधिक सुंदर उद्याच्या दिशेने खूप लांबवर घेऊन जाईल."- डोग फायरबाऊ.'तुम्हाला जर संधी मिळाली तर तुम्ही तुमची मुलं जाळून टाकाल,की तुमची पुस्तकं ?' असा विचित्र प्रश्न स्किनरनं त्याच्या पहिल्याच टेलिव्हिजनच्या कार्यक्रमात प्रेक्षकांना थेटपणे विचारला होता आणि इतकंच नाही,तर 'मी तर मुलांनाच जाळेन,कारण मानवी प्रगतीमध्ये माझ्या पुस्तकांमुळे माझ्या जीन्सपेक्षा जास्त योगदान मिळेल,'असंही त्या प्रश्नांचं स्वत:च सरळपणे उत्तरही दिलं होतं! सर्वियन कादंबरीकार मिलोराद पावीच यांचे एक वाक्य आहे ते म्हणतात - जोवर जगात पुस्तक वाचणाऱ्या वाचकांची संख्या बंदूकधारी सैनिका पेक्षा अधिक आहे तोवर काळजीच काहीच कारण नाही.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात.पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये.म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे मार्गदर्शक, सहकारी धावून येतात.प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,डॉ.दीपक शेटे,आ.भरत बुटाले,प्रा.सर्जेराव राऊत,सुभाष ढगे,अनिल फारणे,डॉ.सुधीर सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,जज्ज,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, पुस्तकातील घटना प्रसंग सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर' पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी पुस्तके, लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत.... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ.मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. - मॅट्रिक फेल विजय गायकवाड

१/१/२५

गोतावळा / diving

सकाळी उठल्याबरोबर फोन वाजला.समोरून कार्यालयातील सहकर्मचारी सत्यजित धीरगंभीर आवाजात सांगू लागला,

"अरे,आपले शेवाळे सर पहाटे गेले.झोपेतच त्यांना हृदयविकाराचा झटका आला. दवाखान्यात न्यायची उसंतसुद्धा मिळाली नाही."


"बाप रे.. काय सांगतोस काय ?"


"हो ना,माझा तर विश्वासच बसला नाही पहिल्यांदा.. पण लागोपाठ दोघांचा फोन आला,मग मी तुला फोन केला.आपल्याला जावं लागेल."


"बरं ठीक आहे.मी तुला घ्यायला येतो.दोघं एकत्रच जाऊ,"असं म्हणत फोन ठेवला.शेवाळे सर म्हणजे सत्यजितचे वरिष्ठ,अतिशय हुशार आणि उच्चशिक्षित. मूळचे सोलापूर जिल्ह्यातील कुडूवाडीशेजारच्या छोट्याशा खेड्यातले.गाव तसं दुष्काळी.

लहरी पाऊस पडेल तेव्हा पडेल.पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत होती.हंगामी शेती पावसाच्या भरोशावर. पिकंल तेवढा शाळू.एक मात्र चांगलं.शाळू पिकला की मोत्यासारखा.

घरखर्चाला रोजंदारीवर काम करून काय मिळतील ते चार पैसे.आई-वडील रोजंदारीसाठी लांबच्या गावी गेले की पोरांच्या शाळेची हेळसांड व्हायची.मग पोरं जरा हाताखाली आली की त्यांना आई-वडील सोबत घेऊन जायचे.शेवाळे सरांच्या आई- वडिलांची परिस्थिती काही फार चांगली नव्हती.मात्र पोरगा शाळेत हुशार आहे असं गुरुजींनी सांगितलं आणि त्यांनीच पुढच्या शिक्षणासाठी खर्चापाण्याची सोय केली म्हणून पुढचं शिक्षण घेतलं.शेवाळे सर सोलापुरात अभियांत्रिकी पदवी घेऊन पुण्यात नोकरीला आले. 


काही दिवस नोकरी केल्यानंतर साठलेल्या पैशांतून अमेरिकेत उच्च शिक्षणासाठी गेले.तिथंच आठ-दहा वर्षे नोकरी करून बक्कळ पैसा कमावला.परत येऊन पुण्यात घर घेतलं.सोबत काम करणाऱ्या मुलीशी लग्न करून पुण्यातच स्थायिक झाले.

दरम्यानच्या काळात गाव आणि गावातील माणसं यांचा संपर्क तुटला.केवळ आणि केवळ एकच उद्देश बक्कळ पैसा कमवणे आणि उच्च पदावर जाणे.कंपनीच्या वरिष्ठांची मर्जी सांभाळण्यासाठी ते हाताखालच्या कर्मचाऱ्यांसोबत अतिशय निष्ठूर आणि कामापुरतं संबंध ठेवायचे. कामासमोर कुणाच्या अन् कसल्याही सुख-दुःखाशी यांना काहीही देणं-घेणं नव्हतं.हातातलं काम वेळेवर पूर्ण झालं पाहिजे इतकंच.कामकाजादिवशी कुणाच्या लग्नाला जाणं नाही,कुणाचा वाढदिवस असो,बारसं, मुंज असो किंवा नातेवाईकांचं आजारपण असलं,तरी सुट्टीदिवशी भेटायला जा म्हणत कामाला दांडी मारून जाऊ देत नव्हते.माणूस मेला तरी घरच्यांना भेटायला संध्याकाळी जावा.म्हणे तुम्ही जाऊन काही आजारी माणूस बरा होणार नाही अन् मेलेला माणूस जिवंत होणार नाही.तुमच्या अनुपस्थितीत कोणताही कार्यक्रम थांबणार नाही;

पण कंपनीचं काम थांबवून चालणार नाही.आता हेच शेवाळे साहेब गेले.यांच्याशिवाय कंपनी बंद पडणार आहे की काय कोणास ठाऊक ?


घाईगडबडीत सत्यजित आणि मी शेवाळे सरांच्या अपार्टमेंटमध्ये पोहोचलो.पार्किंगमध्ये पाच-सहाजण जमले होते.त्यात ऑफिसमधलेच दोघेजण होते. गावावरून काही मंडळी येत आहेत,तोपर्यंत थांबायचं होतं.अजून दोन तास तरी लागतील.

सरांच्या अपार्टमेंटमधल्या इतर लोकांना झालेल्या घटनेची काहीच कल्पना नव्हती.प्रत्येकजण आपापल्या कामावर जाण्याच्या घाईत होता.मुलांना शाळेत पाठवायची लगबग सुरू होती.


पार्किंगमध्ये असं आम्हाला उभा राहिलेलं बघून एक-दोघांनी संशयानं विचारलं,

"काय झालंय,का थांबलाय..?"


शेवाळे सरांच्या निधनाची त्यांना कल्पनाच नव्हती आणि कोण शेवाळे,हे बऱ्याचजणांना माहीत नव्हतं. 


प्रत्येकाला आपल्या बिल्डिंगमधल्या शेजारच्या तीन-चार मजल्यांवरील काही घरांची माहिती होती;पण शेवाळे सर काही फार कोणात मिसळत नव्हते.त्यांच्या मजल्यावरील काही कर्ती मंडळी कामावर निघून गेली. घरातील इतर मंडळी शेवाळे वहिनींना भेटून परत आपापल्या घरात जाऊन दाराला कान लावून बसलेली. प्रेत न्यायला आले की बाहेर येऊ,विनाकारण इतका वेळ ताटकळत कशाला बसायचं? गावाकडच्या लोकांना यायला किती वेळ लागेल कोण जाणं?इतरांच्या घरी अगदी कुकरच्या शिट्या वाजत होत्या.फोडणीचा वास येत होता.कोणाचंही काहीही काम थांबलं नव्हतं.थोड्या वेळानं मी,सत्यजित आणि त्यांच्या मित्रांनी शेजारच्या हॉटेलात जाऊन चहा,नाष्टा केला.


काही वेळानं दोन जीप भरून गावाकडील २०-२५ जण आले.त्यात पाच- सहा महिला होत्या.त्यांनी गाडीतनं उतरताच भोकांड पसरून रडायला सुरुवात केली. त्यांच्या आवाजानं अपार्टमेंटमध्ये गोंधळ उडाला. तिथल्या लोकांनी लहान मुलांच्या कानावर हात ठेवले. मिरवणुकीतल्या डॉल्बीच्या आवाजानं त्यांच्या कानाला त्रास होत नाही;पण गावाकडच्या साध्याभोळ्या बायकांच्या हंबरडा फोडून रडण्यामुळं मुलं घाबरत होती. गावाकडून आलेल्या महिलांमध्ये एक चुलतबहीण,दोन चुलत्या,एक मावशी होती.पुरुष मंडळींनी जमलेल्या लोकांबरोबर चर्चा करून प्रेत गावी घेऊन जाता येईल का,याची चाचपणी केली.आधीच - मृत्यू होऊन पाच-सहा तास झाले होते.शरीर फुगायला लागलं होतं.गावी न्यायला अजून पाच-सहा तास लागतील.त्यापेक्षा इथंच विधी करावेत असं ठरलं. 


शिक्षण घेऊन नोकरीधंद्यासाठी ज्यांनी गावाकडं पाठ फिरवली आणि शहरात स्थायिक झाले,त्यांना मेल्यावरपण गावाची पांढरी नशिबात नव्हती.


खांदा द्यायला गावातली दोघं पुढं आली.सगळ्यांना तेराव्या दिवशी परत पुण्यात येणं शक्य नव्हतं.अजून दोनजण कोणतरी पाहिजे होतं.प्रत्येकजण एकमेकांच्या तोंडाकडं बघायला लागला.

प्रत्येकाला कामाला जायचं होतं.खांदा द्यायला कोणी पुढं येत नव्हतं.शेवाळे सर लग्नाआधी या उच्चभ्रू सोसायटीत रहायला येण्यापूर्वी धायरीत रहात होते.तिथल्या गणपती मंडळाचे काहीजण आलेले.त्यातील दोघांनी खांदा दिला.ना भावकी ना जातकुळी विचारली.ज्यानं पैसा आणि कामाशिवाय दुसरा विचार केला नाही,माणसं जोडली नाहीत,त्याला खांद्या द्यायला कोणी तयार नव्हतं.देव न करो, अत्यंविधी करणं आणि त्यासाठी मनुष्यबळ पुरवणं हा व्यवसाय होऊ नये.खांदा द्यायला पगारी माणसं बोलवायला लागू नयेत म्हणजे माणुसकी जिंकली.


सर्व विधी आटोपून घरी यायला दुपार ओलांडली.आज ऑफिसला जायची इच्छा नव्हती.शेवाळे सरांच्या माघारी आज पहिल्यांदा तिथं एकावेळी पाच- सहाजण गैरहजर होते.तेही त्यांच्यामुळं.आता कंपनीचे कसे होणार याचा विचार कोण करीत असेल ?


वाघीण,प्रतिक पाटील,स्वच्छंद प्रकाशन कोल्हापूर


दुसऱ्या दिवशी संध्याकाळी ऑफिसमधून घरी परत येताना सत्यजितच्या गाडीत रेडिओवर पकंज उदास यांचं 'चिठ्ठी न कोई संदेश..' हे गाणं ऐकता ऐकता सत्यजित त्याच्या बालपणात पोहोचला.'गावातल्या त्या गल्लीबोळातनं हुंदडणं,शेताच्या बांधावरून उड्या मारणं,नदीवर पोहायला जाणं,शेतात भाजलेल मक्याचं कणीस खाणं,ओढ्याच्या काठावरच्या देवीला कोंबडं कापणं,भरउन्हात शेतात नांगरणी करणं,झाडाखाली बसून चटणी,भाकरी,कांदा खाऊन ढेकर देणं,कुणाच्या तरी कार्यक्रमात रस्त्यावर पंक्तीत बसून पत्रावळीत शिरा-भात खाणं,सगळं सगळं काही विसरून गेलो. 


आपण फक्त पैसा कमवायला शिकलो.माणसं कधी कमवणार? पैसा कमवून सुखी व्हायच्या नादात सुख नेमकं कशात आहे, तेच कळालं नाही. त्या सुखाच्या शोधात आपण परत गावी गेलं पाहिजे. आई-वडिलांसोबत चार-आठ दिवस राहिलं पाहिजे. आपल्या मुलांना तर त्या जीवनशैलीची सुतराम कल्पना नाही.चॅट सेंटरला स्वीटकॉर्न खाणाऱ्या पोरांना बाभळीच्या शिऱ्यावर भाजलेल्या कणसांची चव कशी कळणार?'


सत्यजितनं त्याच्या धाकट्या भावाला फोन केला.तो मुंबईला मोठ्या हॉस्पिटलमध्ये डॉक्टर आहे.त्याची बायको नाशिकची.

आठवडाभर पेशंट तपासायचं आणि कधीतरी सुट्टी मिळाली तर लोणावळा किंवा माथेरानला फिरायचं,नाही तर बायकोच्या माहेरी.हे ठरलेलं.स्वतःचे आई-वडील गावाकडं आपली वाट बघत असतील असं कधीच वाटलं नाही.मुलं त्यांच्या संसारात रमलीत. उगाच त्यांना येण्या-जाण्याची दगदग नको म्हणून वाटंला डोळं लावून बसलेले भाबडे आई-वडील;त्यांना काय माहीत मुलं पिकनिकला जाताना किती आणि कसा प्रवास करतात.वर्षातनं एकदा गावी येणाऱ्या पोरांना नातेवाईक आणि मित्रांना भेटायला वेळ पुरत नाही.वडिलांनी लपवून ठेवलेलं आजारपण दिसलं की, दवाखान्याच्या फेऱ्या करण्यात पोरांची सुट्टी संपायची म्हणून होणारा त्रास लपवायचे.यावेळी मात्र दोघांनी एकत्र सहपरिवार आठ-दहा दिवस घरी जाऊन रहायचा बेत ठरविला.हे कळताच आई-वडिलांना भरून आलं.


इकडं इतक्या मोठ्या सुट्टीसाठी गावी जायची लगबग सुरू झाली.पोरांचं सुट्टीतीलं वर्ग,शिबिरं सगळं काही रद्द केलं.बऱ्याच वर्षांनी सत्यजितनं आईसाठी साडी आणि वडिलांसाठी धोतर अन् सदऱ्यासाठी कापड घेतलं.चुलता-चुलती,चुलतभाऊ,त्यांची मुलं प्रत्येकासाठी काही ना काही खरेदी केलं.सगळा तामझाम बघून बायकोला काही कळेनासं झालं.अचानक इतका खर्च करून हे सगळं नियोजन कशासाठी चाललंय हे तिच्या समजण्यापलीकडे होतं.


शिल्लक भाग पुढील लेखामध्ये…