* विजय गायकवाड | Vijay Gaikawad

live

नमस्कार आपले स्वागत आहे. 'सगळे जण तुम्हाला शोधत येतील.आनंदाने तुडुंब भरलेली माणसे सर्वांनाच आवडतात! पण ते तुम्हाला दुःखी,उदास अशा अवस्थेत पाहू शकत नाहीत! तेव्हा आनंदी-हसतमुख रहा आणि मित्रांचा सहवास वाढवा! जर तुम्ही दुःखी राहिलात तर मात्र सगळे जण तुम्हाला सोडून जातील. जीवनातील आनंद-प्रसन्नता भरभरून वाटा! पण एकटे दुःखी रहाल, तर त्या दुःखातच बुडून जाल !' सॉलिट्यूड, ईला व्हीलर विलकॉक्स जगण्याच्या तयारीसाठी नव्हे तर,जगण्यासाठी माणूस जन्माला आला आहे,असं 'बोरिक पास्तरनाक' यांनी म्हटलेलं आहे.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! वाचन हे आहाराहून जास्त महत्त्वाचे असते.जिम र्‍होम यांनी अँथोनी रॉबीन्स यांना शिकवले होते की 'एक वेळ रोजचे जेवण चुकव,पण वाचन अजिबात चुकवू नको.' याप्रमाणे मी अखंडपणे वाचत आहे. माणसांपासून माणसांपर्यंत जाण्याचा,प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाण्याचा जीवनाचा राजमार्ग पुस्तकातून जातो. कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात. पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये. म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,कवी सचिन शिंदे,संतोष शेळके,अनिल फारणे,सहित प्रकाशन,डॉ.रवींद्र श्रावस्ती,डॉ.सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,संजय बापट,मनोहर सुर्वे,विनायक पाटील,संतोष पाटील,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, मेनन पिस्टन रिंग मधील सहकारी मित्र शेखर सुर्यवंशी..। पुस्तकातील घटना प्रसंग हे मी लिखित स्वरूपात सध्या व्हाट्सअप वरती टाकत असतो.हे सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी,पुस्तके देणारी लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत. ... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ. मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. विजय कृष्णात गायकवाड

८/८/२३

सायलेंट स्प्रिंग - रॅचेल कार्सन (१९६२)

'सायलेंट स्प्रिंग' या रॅचेल कार्सन लिखित पुस्तकात निसर्गाच्या ढासळत चाललेल्या समतोलावर चर्चा करण्यात आली आहे.पृथ्वीवर असलेली माती,पाणी आणि जीवाणू यांच्यातले सहसंबंध आणि बिघाड यांबद्दल अत्यंत अभ्यासपूर्वक अशी मांडणी रॅचेल हिनं या पुस्तकात केली आहे.शेतीमध्ये वारेमाप वापरल्या जाणाऱ्या रसायनांवर बंदी घालण्याची मागणी रॅचेलन सरकारकडे केली होती.निसर्गतज्ज्ञ डेव्हिड टनबरो यांच्या मते,'चार्ल्स डार्विनच्या ओरिजिन ऑफ स्पिशीज' नंतर हेच एकमेव असं पुस्तक आहे,की ज्यामुळे विज्ञान जगतात खळबळ माजली. '


१९६० च्या दशकात प्रगत देशांमध्ये हरित क्रांतीची एक लाट उसळली.शेतीतलं उत्पादन वाढावं यासाठी अनेक संशोधनं,अभ्यास होऊन नवनव्या गोष्टी शोधल्या गेल्या.

याच वेळी हायब्रिड बी-बियाणांचा देखील शोध लागला. तसंच पिकांवर कीड पडू नये यासाठी वेगवेगळ्या कीटकनाशकांचाही शोध लागला.यातच भर म्हणून आधुनिक तंत्रज्ञान यांच्या वापरानं शेतीमध्ये भरघोस उत्पादन मिळवायला सुरुवात झाली.या यशाचा आनंद साजरा करत असतानाच १९६२ च्या सप्टेंबर महिन्यामध्ये 'सायलेंट स्प्रिंग' नावाचं एक पुस्तक प्रसिद्ध झालं,या पुस्तकानं कृषी क्षेत्रात मिळत,असलेल्या तथाकथित यश वाटणाऱ्या कल्पनेला एक मोठा धक्का दिला आणि लोकांना खडबडून जागं केलं.संपूर्ण जगभर खळबळ माजवणाऱ्या 'सायलेंट स्प्रिंग' या पुस्तकाची लेखिका होती रॅचेल कार्सन ! 'सायलेंट स्प्रिंग' या पुस्तकात असं सनसनाटी किंवा खळबळ माजवण्यासारखं होतं तरी काय? निसर्गाच्या ढासळत चाललेल्या समतोलावर या पुस्तकात चर्चा करण्यात आली होती.पृथ्वीवर असलेली माती,पाणी आणि जिवाणू यांच्यातले सहसंबंध आणि बिघाड याबद्दल अत्यंत अभ्यासपूर्वक अशी मांडणी रचेल हिन या पुस्तकात केली होती.शेतीमध्ये वारेमाप वापरल्या जाणाऱ्या रसायनांवर बंदी घालण्याची मागणी रॅचलन सरकारकडे केली होती. रसायनांच्या अतिरेकी वापरामुळे जैवविविधतेवर होणाऱ्या परिणामांची फार मोठ्या प्रमाणात माणसाला किंमत मोजावी लागेल,असा इशारा तिनं या पुस्तकातून दिला होता.खरं तर ही गोष्ट काहीच काळात खरी ठरली.! 'सायलेंट स्प्रिंग' हे पुस्तक प्रकाशित झालं आणि त्याच वेळी अनेक कीटकनाशकांच्या कंपन्यांनी या पुस्तकाला विरोध दर्शवण्यासाठी त्यावर बंदी आणावी,अशी मागणी केली.या कंपन्यांच्या मालकांनी निदर्शनंदेखील केली पण त्यांच्या सगळ्या विरोधाला न जुमानता लोकांनी हे पुस्तक विकत घेतलं आणि या पुस्तकाची विक्रमी विक्री झाली.या पुस्तकात वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून अनेक उदाहरणं दिल्यामुळे अनेक शास्त्रज्ञांनी या पुस्तकांवर आपलं परीक्षण लिहिलं आणि आपला पाठिंबा जाहीर केला. वैज्ञानिक क्षेत्रातून रॅचेलचं खूप कौतुकही करण्यात आलं. इतकंच नाही तर न्यायालयानंदेखील हे पुस्तक शास्त्रीयदृष्ट्या तपासून घेतलं.परिणामी अमेरिकन सरकारसोबतच अनेक देशांमधली सरकारं रॅचेलच्या बाजूनं उभी राहिली.डीडीटी आणि त्याचबरोबर इतर अनेक रसायनांवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली.लहानपणापासूनच रॅचेल हिला पर्यावरणाबद्दल कळकळ आणि चिंता वाटत असे. २७ में १९०७ या दिवशी पेनसिल्व्हानिया इथे स्प्रिंगडेलजवळ रॅचेल हिचा रॉबर्ट कार्सन आणि मारिया या दांपत्याच्या पोटी जन्म झाला.रॉबर्ट कार्सन हा विमा एजंट होता. त्याचं वडिलोपार्जित असं ६५ एकरांचं शेतदेखील होतं.रॅचेलचा बराच वेळ आपल्या शेतात जायचा.तासन् तास झाडांकडे बघणं, पानफुलं न्याहाळणं तिला खूपच आवडत असे. निसर्गात रमत असताना तिला वाचनाचंही वेड लागल.

रॅचेल आठ वर्षांची असल्यापासून गोष्टी लिहायला लागली.वयाच्या १० व्या वर्षी तिचं पहिलं गोष्टींचं पुस्तक प्रकाशितदेखील झालं. लहान असताना रॅचेलला निकोलस मॅगेझिन,हरमन मेलविले आणि जोसेफ कोब्रॅड ही पुस्तकं वाचायला खूप आवडत.या पुस्तकांमुळेच आपल्याला लिहायची प्रेरणा मिळाली,असं रॅचेल नेहमीच म्हणत असे.रॅचेलचं हायस्कूल पर्यंतचं शिक्षण स्प्रिंगडेलच्या शाळेतच झालं.पेनसिल्व्हानिया इथे तिनं आपलं पदवीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं.पदवीचं शिक्षण घेत असताना प्रत्येक वर्षी रॅचेल पहिली आली. सुरुवातीला इंग्रजीचा अभ्यास करत असतानाच तिनं जीवशास्त्राचाही अभ्यास सुरू केला. हॉपकिन्स विद्यापीठात असताना पुढे तिनं प्राणिशास्त्र आणि आनुवंशशास्त्र यांचा अभ्यास सुरू केला.असं सगळं सुरू असताना त्याच वेळी रॅचेलच्या घरातली आर्थिक परिस्थिती खूपच वाईट होत चालली होती. रॉबर्ट कार्सनचा व्यवसाय डबघाईला आला होता.तो ठप्पच झाला होता म्हटलं तरी चालेल.आईला वाढत्या वयामुळे काहीही करणं अशक्य झालं होतं आणि त्यातच शेतीतूनही उत्पन्न मिळेनासं झालं होतं. चहूबाजूंनी अशी कोंडी झाल्यामुळे रचलनं आपल्या शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी एका लॅबोरेटरीमध्ये अर्धवेळ नोकरी करायला सुरुवात केली.१९३२ साली रॅचेलन प्राणिशास्त्रातली मास्टर डिग्री मिळवली.खरं तर तिला त्यानंतर डॉक्टरेटही मिळवायची होती;पण घरच्या आर्थिक परिस्थितीमुळे ते शक्यच नव्हतं.त्यातच तिला घरचा भार उचलणंही भाग होतं.अशा परिस्थितीत विद्यापीठात प्रवेश घेणं रॉवेलसाठी कठीण होतं.याच गोष्टीमुळे आता तिला नोकरीदेखील पूर्ण वेळ करायची पाळी आली. १९३५ साली रॅचेलच्या वडिलांचा मृत्यू झाला.आणि परिस्थिती आणखीनच हलाखीची बनली. रॅचेलच्या गाईड मेरी स्फिंकर यांच्या ओळखीनं रॅचेलला यू.एस.ब्युरो ऑफ फिशरीजमध्ये तात्पुरत्या स्वरूपाचं काम मिळालं.रोमान्स अंडरवॉटर या आठवड्यातून एकदा प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमासाठी रॅचेलला कार्यक्रमासाठी स्क्रिप्ट लिहिण्याचं काम सोपवण्यात आलं होतं. प्रत्येकी सात मिनिटांच्या अशा ५२ स्क्रिप्ट्स रॅचेलनं लिहिल्या.तिच्या या स्क्रिप्ट्समुळे हा कार्यक्रम प्रचंडच लोकप्रिय झाला.

त्यामुळे तिला आता तिथेच पूर्ण वेळ कामासाठी नेमण्यात आलं.तसंच सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षांची तयारी करण्याचाही प्रस्ताव तिला दिला गेला.१९३६ साली रॅचेलन सिव्हिल सर्व्हिसेसची परीक्षा दिली.आणि ती चांगल्या गुणांनी उत्तीर्णही झाली.तसंच ब्यूरो ऑफ फिशरीजमध्ये पूर्ण वेळ ज्युनिअर ॲव्कँटिक बायॉलॉजिस्ट या पदावर काम करणारी ती दुसरी स्त्री होती.मत्स्यसंस्थांची संगतवार आकडेवारी ठेवणं, ब्रोशर बनवणं आणि समुद्री जीवनावर वर्तमानपत्रांमध्ये लिहिणं हेही त्याच वेळी रॅचलचं सुरू होतं.याच दरम्यान १९३७ साली आयुष्य स्थिरावत असताना आपल्या दोन लहान मुलींना मागे ठेवून रॅचेलची बहीण या जगातून कायमची निघून गेली.या दोन मुलींना सांभाळण्याची जबाबदारी आता रॅचेलवर येऊन पडली होती. याच वर्षी रॅचेलनं लिहिलेला 'द वर्ल्ड ऑफ वॉटर' हा निबंध 'टलांटिक मंथली' यात प्रकाशित झाला.त्या निबंधाला वाचकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला.या लेखात समुद्रतळाशी घडणाऱ्या घटना सविस्तरपणे चित्रांसह दिल्या होत्या.

रॅचेलच्या लिखाणाचा हा अतिशय महत्त्वाचा टप्पा होता.हाच निबंध पुढे वाढवून 'अंडर द सी विंड' नावाच्या पुस्तकात १९४१ साली समाविष्ट करण्यात आला.


रॅचेलची लेखणी स्त्रियांना विशेष प्रेमात पाडणारी होती.त्यामुळे तिने लिहिलेले निबंध,पुस्तकं आणि लेख यांना स्त्रियांकडून भरभरून प्रतिसाद मिळत राहिला.

१९४५ साली डीडीटी या विषयानं रॅचेलच्या डोक्यात 

घर केलं.डीडीटीला त्या वेळी इन्सेक्ट बॉम्ब असं म्हटल जात असे. हिरोशिमा नागासाकी या शहरांवर झालेल्या अणुबॉम्बच्या हल्ल्यानंतर जगाला पहिल्यांदाच पर्यावरणीय चाचण्या वगैरे करायला हव्यात या गोष्टी सुचायला लागल्या.पर्यावरणाची हानी होईल असं दुष्कृत्य माणसाकडून होऊ नये.यासाठी निरनिराळे निर्बंध जगावर लादण्यात आले.या दरम्यान रॅचलला डीडीटी विषयावर काही लिखाण प्रसिद्ध करायचं होतं,पण प्रकाशकांना या विषयांत काडीचाही रस वाटत नव्हता.त्याच वेळी ब्युरो ऑफ फिशरीजमधलं तिचं स्थान बळकट होत चाललं होतं. १९४८ साली तर तिला कुठल्याही विषय निवडीचं स्वातंत्र्य देण्यात आलं होतं. या आपण आपला पूर्ण वेळ लिखाणासाठी द्यायचा असं ठरवलं.ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसनं रॅचेलच्या समुद्री जीवनावरच्या लिखाणात रस दाखवला.त्यामुळेच १९५० साली 'द सी अराऊंड अस' हे रॅचेलचं पुस्तक प्रकाशित झालं.पुस्तक सतत ८६ आठवडे सर्वाधिक विक्रीचं पुस्तक ठरलं.शिवाय रॅचेलला नॅशनल बुक अवॉर्डनंही गौरवलं गेलं.तिनं या पुस्तकावर एक माहितीपट देखील बनवला.१९५३ साली या महितीपटाला बेस्ट डॉक्युमेंट्रीचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.असं सगळं एकीकडे सुरू असताना रॅचितच्या डोक्यातून मात्र डीडीटीचा विषय काही केल्या जात नव्हता.अखेर तिनं त्यावर जोरात काम सुरू केलं.

त्या वेळी पिकांवर डीटी किंवा इतर कीटकनाशकांची फवारणी सर्रास केली जात असे आणि या गोष्टीला रॅचेलचा विरोध होता.तिच्या म्हणण्यानुसार हा वापर सरसकट असता कामा नये.कीटकांचा प्रकार,माती आणि पाणी यावर डीडीटीचा होणारा परिणाम यावर सखोल अभ्यास व्हायला हवा आणि कीटकनाशकांच्या फवारणीसाठी ठरावीक नियमावली करायला हवी,असं तिला वाटत होतं.यासाठी रॅचेलनं आपले वैयक्तिक संबंध वापरून अनेक कॉन्फिडेन्शिअल गोष्टी सरकार अखत्यारीत असलेल्या जाणून घेतल्या. तिच्या या डीडीटीच्या वापराच्या विरोधाला बायोडायनॅमिक ग्रिकल्चर गार्डनरी या संस्थेनं पाठिंबा दिला.ही संस्था सेंद्रिय पद्धतीनं शेती करण्यावर जोर देत होती.आणि या पद्धतीचा प्रसारही करत होती.या संस्थेकडूनही रॅचेलला

अतिशय महत्त्वाची माहिती मिळाली.या माहितीला रॅचेल 'गोल्ड माइन ऑफ इन्फॉर्मेशन' म्हणजे सोन्याची खाण असंच म्हणते.तिच्या म्हणण्यानुसार 'सायलेंट स्प्रिंग' हे पुस्तक लिहिताना या माहितीचा खूपच उपयोग तिला झाला.त्यानंतर १९५७ ते १९५९ या तीन वर्षांच्या कालावधीमध्ये उत्पादित केलेल्या अमेरिकेतल्या क्रेनबेरीजमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात कीटकनाशकांची मात्रा आढळून आली.या संदर्भात रॅचेलनं सरकारला 'सायलेन्सिंग ऑफ बर्ड' नावानं एक पत्र लिहिलं. कीटकनाशकांच्या वापरावर तिचं संशोधन सुरूच होतं.तिनं यात काम करणाऱ्या अनेक लोकांना भेटून बरीच माहिती गोळा केली होती.'पोस्ट वॉर अमेरिकन कल्चर' म्हणून ती या गोष्टींचा उल्लेख करत असे.

पेस्टिसाइड्स हे बायोसाइड्स आहेत. आणि ते आपल्या पर्यावरणाला संपवणारे किंवा पर्यावरणासाठी अतिशय घातक आहेत,असं तिचं म्हणणं होतं.यावर तिनं बायोलॉजिकल पेस्ट कंट्रोल (रसायनांशिवाय कीटकांना प्रतिबंध) असा उपायही सुचवला होता.रॅचेलनं नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ इथल्या विल्यम हूपर यांच्याशी संपर्क साधला आणि कीटकनाशक ही कॅन्सर निर्माण करणारी आहेत या विषयावर सविस्तर चर्चा केली. तसंच तिनं याबाबत पुरावेही गोळा केले.तिनं आसपासच्या अनेक शेतकऱ्यांची भेट घेतली.अशा रीतीनं कीटक

नाशकांचा पिकांवर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास रॅचेलनं जवळजवळ सहा ते सात वर्ष अविरतपणे केला आणि याचं फलित म्हणजे १९६२ साली तिचा हा सगळा अभ्यास 'सायलेंट स्प्रिंग' या पुस्तकाच्या रूपानं जगासमोर आला.


'सायलेंट स्प्रिंग' या पुस्तकाचं शीर्षक कसं सुचलं हीदेखील एक विलक्षण गोष्ट आहे.


खरं तर रॅचेलच्या पक्ष्यांसंदर्भात प्रकाशित झालेल्या एका पुस्तकाला हे नाव यापूर्वीच तिनं सुचवलं होतं;पण त्या वेळी काही कारणांनी हे नाव दिलंच गेलं नाही आणि मग १९६२ साली रॅचेलच्या मेरी रॉडेल नावाच्या एका मैत्रिणीच्या आग्रहाखातर या पुस्तकाला ते पडून असलेलं नाव देण्यात आलं.या पुस्तकात प्राण्यांमध्ये अचानक दिसलेल्या लिव्हरच्या अनोळखी गाठींवरचं संशोधनही समाविष्ट करण्यात आलं होतं.संपूर्ण सजीव सृष्टीला उपकारक असलेलं हे संशोधन पुस्तकरूपानं अखेर सर्वसामान्य लोकांसमोर येऊ शकलं;पण काही समाजकंटकांनी आणि रासायनिक पदार्थांचे उद्योगधंदे असलेल्या लोकांनी या पुस्तकाला प्रचंड विरोध केला.या पुस्तकावर सडकून टीकाही केली.काही शास्त्रज्ञांनीही या टीकेमध्ये सहभाग घेतला.अशा सगळ्या टप्प्यांमधून जात डोळे उघडायला लावणारी,मनुष्यप्राण्याला खडबडून जागं व्हायला भाग पाडणारी, निसर्गाचा समतोल सांभाळायला हवा याची जाणीव करून देणारी आणि जगात सर्वप्रथम 'प्रदूषण' या मुद्द्याला हात घालणारी ही माहिती 'सायलेंट स्प्रिंग' या पुस्तकातून वाचकांपर्यंत पोहोचली.या पुस्तकाचं सर्वात मोठं यश म्हणजे डीडीटीसह अनेक कीटकनाश-

कांवर प्रतिबंध ! हा प्रतिबंध झाला नसता,तर ७० ते ८० वर्षांमध्ये कदाचित संपूर्ण जीवसृष्टी उद्ध्वस्त झाली असती.समुद्री जीवशास्त्राचा अभ्यास करणारी एक स्त्री जैवरसायन शास्त्रावर आधारित पुस्तक लिहिते ही गोष्ट खूपच कौतुकास्पद होतं,तेही वैज्ञानिक दाखल्यांसह! या पुस्तकाचं आणखी एक वैशिष्ट्य असं की,शास्त्रीय विषय असूनही या पुस्तकाची भाषा अत्यंत ओघवती आणि

रसाळ आहे.पुस्तक वाचताना वाचकाला खिळवून ठेवण्याची ताकद या पुस्तकात आहे. २००६ मध्ये जेव्हा सर्वेक्षण झालं तेव्हा जगातल्या पहिल्या २५ वैज्ञानिक पुस्तकांमध्ये 'सायलेंट स्प्रिंग' या पुस्तकाचं नामांकन झालं होतं.


अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष आणि पर्यावरणतज्ज्ञ अल गोर यांनी म्हटलं होतं की, ...'सायलेंट स्प्रिंग' या पुस्तकानं खरी पर्यावरणीय चळवळ सुरू केली.माझ्यावर या पुस्तकाचा इतका प्रचंड पगडा आहे की,या पुस्तकामुळेच मी पर्यावरणाविषयी जास्तच सतर्क झालो आहे."


'सायलेंट स्प्रिंग' या पुस्तकाचा समावेश २० व्या शतकातल्या पहिल्या १०० नॉन- फिक्शन पुस्तकांमध्ये केला गेला.निसर्गतज्ज्ञ डेव्हिड टनबरो यांनी,"चार्ल्स डार्विनच्या 'ओरिजिन ऑफ स्पीशीज' नंतर हेच एकमेव असं पुस्तक आहे की, ज्यामुळे विज्ञान जगतात खळबळ माजली.'


रॅचेल कार्सन हिचा स्वभाव खूपच शांत आणि सरळमार्गी होता.ज्या व्यक्ती रॅचेलच्या आयुष्यात आल्या,त्यांनी तिला शेवटपर्यंत साथ दिली. 


डोरोथी फ्रीमन ही रॅचेलची अतिशय जिवलग मैत्रीण होती.१९३३ साली एका उन्हाळ्यात दोघी जणी भेटल्या दोघींच्या आवडीनिवडी खूपच सारख्या होत्या.त्यांच्या बोलण्यात 'निसर्ग' हा सगळ्यात महत्त्वाचा विषय असायचा.खरं तर दोघींचा प्रत्यक्ष संपर्क खूप कमी झाला;पण पत्रांद्वारे त्या सतत एकमेकींच्या संपर्कात असायच्या.या दोघींनी एकमेकींना जवळजवळ ९०० पत्रं लिहिली. 


"आभाळात मुक्तपणे विहार करण्यासाठी रॅचेलला एका समर्पित आणि निष्ठावान मैत्रिणीची आवश्यकता होती.आणि ती आवश्यकता डोरोथीनं पूर्ण केली,' असं रॅचेलचीचरित्रकार लिंडा लिअर हिनं लिहिलं होतं. 


डोरोथी आणि पॅचेल यांनी एकमेकींना लिहिलेली पत्रं पुढे डोरोथीच्या नातीनं १९९५ साली पुस्तकरूपात प्रकाशित केली.या पुस्तकाचं नाव 'रॅचेल: द लेटर ऑफ रॅचेल कार्सन अँड डोरोथी!' ही पत्रं म्हणजे दोन मैत्रिणींच्या निस्सीम मैत्रीचं द्योतक तर आहेच,पण जगासमोर मैत्रीचा एक आदर्शदेखील आहे.!


'सायलेंट स्प्रिंग' या पुस्तकाचं काम सुरू असतानाच रॅचलला ब्रेस्ट कॅन्सर झाल्याचं निदान झालं.त्यासाठी उपचार म्हणून तिनं रेडिएशन थेरपीदेखील घेतली.

कीटकनाशकांच्या वापरामुळे जीवसृष्टीला अपाय पोहोचू नये म्हणून, मनुष्यजातीत कॅन्सरचं प्रमाण वाढू नये म्हणून, प्राण्यांचा औषधांना रेझिस्टन्स वाढू नये म्हणून जिवाचं रान करणाऱ्या रॅचेललाच कॅन्सरनं ग्रासावं याला काय म्हणावं?


१९६४ साली रॅचेलला श्वसनमार्गाचा व्हायरल संसर्ग झाला. त्यामुळे तिची प्रकृती आणखीनच बिघडत गेली. त्यातच रेडिएशन्सच्या माऱ्यामुळे झालेल्या ॲनिमियामुळे तिची प्रकृती खालावतच गेली. अखेर १४ एप्रिल १९६५ या दिवशी रॅचेलनं तिच्या राहत्या घरातच आपला प्राण सोडला. तिच्या घराचं नावदेखील 'सायलेंट स्प्रिंग' असं होतं! तिच्या शरीराचं दहन करण्यात आलं आणि तिची अर्धी रक्षा तिच्या आईच्या दफनभूमी मेरीलँड रॉकविले इथे पुरण्यात आली,तर अर्धी रक्षा तिची मैत्रीण डोरोथीकडे पाठवण्यात आली. रॅचेलची उर्वरित रक्षा डोरोथीनं साऊथपोर्ट आयलँड इथे विखरून टाकली.निसर्गामध्ये परतून येण्यासाठी पुन्हा जणू निसर्गप्रेमी रॅचेल या निसर्गातच एकरूप झाली होती.!


निसर्गातील रहस्य आणि सौंदर्य यात जे रममाण होतात ते कधीच एकटे नसतात.- रॅचेल कार्सन 


१७ जुलै २०२३ या लेखमालेतील पुढील लेख



६/८/२३

रुद्रप्रयागचा नरभक्षक बिबळ्या..

१९२५ सालची गोष्ट. नैनितालच्या चॅलेट थिएटरमध्ये चाललेल्या गिलबर्ट आणि सुलिव्हनच्या 'Yeomen of the Guard' या ऑपेराच्या मध्यंतरातच केव्हातरी मी या 'रुद्रप्रयागच्या नरभक्षक बिबळ्याबद्दल' निश्चित असं ऐकलं.तसं माझ्या कानावर आलं होतं की गढवालमध्ये एक नरभक्षक बिबळ्या हैदोस घालतोय,प्रेसमधले त्याबद्दलचे काही लेखही मी वाचले होते.पण मला कल्पना होती की गढवालमध्ये जवळजवळ चार हजार बंदुकांचे परवाने आहेत.आणि रुद्रप्रयागपासून फक्त सत्तर मैलांवर असलेल्या लँड्सडाऊनमध्ये शिकारी लोकही आहेत.साहजिकच मला वाटलं की ह्या बिबळ्याला 'बॅग' करण्यासाठी तिथे हौशानवशांच्या उड्या पडत असणार आणि अशा वेळी दुसऱ्या एखाद्या बाहेरच्या शिकाऱ्याचं स्वागत नक्कीच होणार नाही.


मध्यंतरात चॅलेट बारमध्ये मित्रांबरोबर मद्यपान घेत असताना मायकेल कीनला काही लोकांशी या विषयाबद्दल बोलताना आणि त्या बिबळ्याच्या शिकारीसाठी उद्युक्त करताना जेव्हा मी ऐकलं तेव्हा मला जरा आश्चर्यच वाटलं.हा मायकेल कीन तेव्हा युनायटेड प्रॉव्हिन्सचा मुख्य सचिव होता.(आता आसामचा गव्हर्नर आहे) बाकीच्यांनी त्याला दिलेल्या प्रतिसादावरून त्याच्या आवाहनाचं काही फार उत्साहाने स्वागत झालं नसावं हे कळत होतं.त्यातला एक म्हणत होता."शंभर बळी घेणाऱ्या नरभक्षकाच्या मागे जायचं ? Not on your life?" दुसऱ्या दिवशी मी मायकेल कीनला भेटलो आणि आवश्यक ती माहिती घेतली.हा नरभक्षक नक्की कोणत्या भागात सक्रिय आहे ते तो सांगू शकत नव्हता.पण मी रुद्रप्रयागला जाऊन इबॉटसनशी संपर्क साधावा असं त्याचं म्हणणं पडलं.तिथून घरी आलो तर टेबलवर इबॉटसनचंच पत्र पडलं होतं.हा इबॉटसन आता 'सर विल्यम इबॉटसन' युनायटेड प्रॉव्हिन्सच्या गव्हर्नरचा सल्लागार - त्या वेळेला गढवालचा डेप्युटी कमिशनर म्हणून रूजू झाला होता.आणि त्या भागातल्या लोकांची नरभक्षकाच्या तावडीतून सुटका करणे ही त्याची पहिली जबाबदारी होती.ह्याच संदर्भात त्याने हे पत्र लिहिलं होतं.लवकरच माझी सर्व बांधाबांध झाली.आणि रानीखेत,आडबद्री,करणप्रयाग असा पायी प्रवास करत दहाव्या दिवशी मी नाग्रासू इथल्या इन्स्पेक्शन बंगल्यावर पोचलो. नैनितालहून निघताना मला माहीत नव्हतं की ह्या बंगल्यात राहण्यासाठी परमिट घेऊन जाणं आवश्यक आहे.तिथल्या केअरटेकरला परमिटशिवाय कोणालाही प्रवेश न देण्याचे आदेश असल्याने माझं सामान वाहणारे सहा गढवाली,माझा नोकर आणि मी,पुढचे दोन मैल रुद्रप्रयागचा रस्ता तुडवत निघालो.शेवटी मुक्कामाला त्यातल्या त्यात बरी अशी कॅम्पसाईट सापडली.माझी माणसं पाणी व काटक्या गोळा करण्यात गुंतलेली असताना आणि माझा नोकर चुलीसाठी योग्य दगड तसेच जागा शोधत असताना मी कुऱ्हाड उचलली आणि कुंपण घालण्यासाठी काढेरी झुडपं तोडायला गेलो.आम्हाला दहा मैल मागेच सांगितलं गेलं होतं की आम्ही नरभक्षकाच्या इलाख्यात प्रवेश केला आहे.स्वयंपाकासाठी जाळ

तयार केल्यानंतर थोड्याच वेळात एक अगदी व्याकुळ आवाजातील हाक आम्हाला दूर डोंगरावरील गावाच्या दिशेने आली.तो विचारत होता की, 'आम्ही यावेळेला उघड्यावर काय करतोय ?' जर आम्ही आहे तिथे राह्यलो तर आमच्यातला एक किंवा जास्ती नरभक्षकाकडून मारला जाईल असं त्याचं म्हणणं होतं.त्या बिचाऱ्याने इतकी साधी मदत करतानाही काही प्रमाणात धोका पत्करला होता.त्याची ती सूचना ऐकल्यावर माधोसिंग म्हणाला. (हा माधोसिंग तुम्हाला माझ्या 'मॅनइटर्स ऑफ कुमाऊँ'मध्ये भेटला असेल) आपण इथेच थांबू या साहेब कारण आपल्या कंदिलात बऱ्यापैकी तेल आहे आणि तुमच्याकडे रायफल आहेच.' रात्रभर पुरेल इतकं रॉकेल आमच्याकडे निश्चित होतं कारण दुसऱ्या दिवशी उठल्यावरही कंदील जळत होता. माझी रायफलही माझ्या बेडवर होती पण आमचं काटेरी कुंपण तसं तकलादूच होतं आणि दहा दिवसांच्या चालीमुळे आम्ही खूप थकलो होतो. जर त्या रात्री आम्हाला बिबळ्याने तिथे भेट दिली असती तर त्याला अगदी सहज शिकार मिळाली असती.

दुसऱ्या दिवशी आम्ही रुद्रप्रयागला पोचलो आणि इबॉटसनने आदेश दिल्यानुसार त्याची माणसं मला भेटली.

रुद्रप्रयागमध्ये घालवलेल्या एकूण दहा आठवड्यांपैकी प्रत्येक दिवसाच्या माझ्या खटपटीचं वर्णन करण्याचा मी प्रयत्न करणार नाही कारण एकतर इतक्या वर्षांनंतर मला इतका बारीकसारीक तपशील आठवणारही नाही आणि जरी मी लिहिलं तरी तुम्हाला कंटाळवाणं होईल.पण मला आलेले काही रोमांचकारी अनुभव मात्र मी तुम्हाला सांगणार आहे.कधी मी एकटा असताना तर कधी इबॉटसन बरोबर असताना पण हे सर्व सांगण्याअगोदर ज्या मुलखात या बिबळ्याने सतत आठ वर्ष धुमाकूळ घातला होता आणि जिथे मी त्याच्या मागावर दहा आठवडे फिरलो त्या मुलखाची थोडी कल्पना मात्र मला दिलीच पाहिजे.रुद्रप्रयागच्या पूर्वेकडचा पहाड चढून वर गेलात तर तुम्हाला या बिबळ्याचा वावर असलेल्या पाचशे चौ.मैलांचा बराच टापू नजरेखाली घालता येईल.या संपूर्ण प्रदेशामधून वाहणाऱ्या अलकनंदा नदीमुळे हा विभाग थोड्याफार प्रमाणात समान विभागला गेला आहे. करणप्रयाग सोडल्यानंतर अलकनंदा दक्षिणेकडे वळून रुद्रप्रयागला मिळते.इथेच तिचा वायव्येकडून येणाऱ्या मंदाकिनीशी संगम होतो. ह्या दोन नद्यांमधला त्रिकोणी प्रदेश हा अलकनंदाच्या डाव्या तीरावरच्या प्रदेशाच्या मानाने कमी चढउताराचा आहे.त्यामुळे साहजिकच त्यात डाव्या तीरापेक्षा जास्त गावं वसली आहेत.तुमच्या उंचावरच्या जागेवरून तुम्हाला जी काही लागवडीखालची जमीन दिसते आहे ती पहाडाच्या अंगावर काढलेल्या आडव्या समांतर रेषांच्या स्वरुपात दिसेल.ही 'टेरेस फील्डस' किंवा 'सोपानशेती' किंवा डोंगरशेती आहे व ती डोंगरउतारावर पायऱ्यांसारखी दिसते.ही शेतं काही ठिकाणी एक ते दोन यार्ड तर काही ठिकाणी पन्नास ते साठ यार्ड रुंद आहेत.इथे शेतांना कुंपणं घातलेली नाहीत.त्यामुळे या डोंगरउतारावरून शेतांवर देखरेख करण्यास सोपं जावं म्हणून इथल्या घरांच्या इमारती शेतांच्या वरच्या भागात दिसतील.हे सर्व निसर्गचित्र तपकिरी आणि हिरव्या पट्ट्यांनी रंगवल्यासारखं वाटतं.तपकिरी पट्टे म्हणजे गवताळ भाग आहे तर हिरवे पट्टे जंगलाचे.नीट बघितलंत तर असं दिसेल की काही गावं गवताळ प्रदेशांनी वेढली आहेत तर काही जंगलांनी.सर्व प्रदेश अतिशय ओबडधोबड आणि रांगडा आहे.तसंच तो असंख्य छोट्या मोठ्या घळींनी आणि कड्यांनी आडवा उभा कातरला गेल्यासारखा वाटतो. एवढ्या मोठ्या प्रदेशात रस्ते असे फक्त दोनच दिसतील;

एक रूद्रप्रयागपासून सुरू होऊन केदारनाथला जाणारा व दुसरा केदारनाथ ते बद्रीनाथ प्रमुख यात्रामार्ग.ज्या काळाच्या संदर्भात मी ही गोष्ट सांगतोय त्या वेळेपर्यंत हे रस्तेसुद्धा अतिशय खडबडीत,अरूंद होते आणि कोणत्याही प्रकारचं 'चाक' त्यावरून गेलं नव्हतं.


हे सर्व पाह्यल्यानंतर साहजिकच आपल्याला असं वाटेल की जंगलांनी वेढलेल्या गावांमध्ये जास्त बळी गेले असणार.हा नरभक्षक 'वाघ' असता तर तुम्ही म्हणता तसंच झालं असतं पण हा बिबळ्या होता.संपूर्णपणे निशाचर असल्याने लपायला जंगल असणे किंवा नसणे याचा त्याच्यावर काहीच परिणाम होत नाही.त्यामुळे एखाद्याच गावात जास्त बळी का किंवा दुसऱ्या ठिकाणी कमी का याचं कारण म्हणजे पहिल्या बाबतीत निष्काळजीपणा व दुसऱ्या बाबतीत योग्य ती खबरदारी घेणे.


मी मागे सांगितलंच आहे की हा बिबळ्या बऱ्याच मोठ्या आकाराचा नर बिबळ्या होता आणि वयाने प्रौढ असला तरीही प्रचंड ताकदवान होता.आपलं भक्ष्य एखाद्या लांबच्या ठिकाणी वाहून नेण्याच्या एखाद्या बिबळ्याच्या क्षमतेवर, त्याने शिकार कोठे करायची हे अवलंबून असतं. अगदी वजनदार माणसाचा मृतदेहसुद्धा मैलोनमैल वाहून नेण्याच्या या नरभक्षकाच्या क्षमतेमुळे त्याच्यासाठी सर्व जागा सारख्याच होत्या.एका प्रसंगात तर त्याने भक्ष्य चार मैल ओढून नेलं होतं.यावेळी त्याने एक प्रौढ माणूस त्याच्या घरात ठार मारला होता आणि त्यानंतर २ मैलाची अत्यंत उभी चढण चढून पलीकडे २ मैलांचा उतार उतरून झुडपी जंगलात घेऊन गेला होता.खरंतर ही शिकार मध्यरात्रीच्या आसपास झाली होती आणि दुसऱ्या दिवशीपर्यंत पाठलागही झाला नव्हता.त्यामुळे वरकरणी तरी इतकं लांब जायचं कारण नव्हतं.

नरभक्षक बिबळ्याचा अपवाद वगळता बिबळ्याची शिकार करणं हे इतर जनावरांपेक्षा तसं सोपं आहे.कारण त्यांना गंधज्ञान फार कमी असतं.कोणत्याही इतर जनावरांपेक्षा बिबळ्याला मारण्यासाठी जास्त क्लृप्त्या लढवल्या जातात.ही शिकार फक्त पैशासाठी केली जातेय की 'ट्रॉफी'साठी यावर या पद्धती ठरतात. शिकारीच्या आनंदासाठी शिकार करायची असेल तर सर्वात रोमांचकारी अनुभव म्हणजे जंगलात त्याचा माग काढून ठावठिकाणा शोधणे,त्यानंतर दबा धरून जास्तीत जास्त जवळ जाणे आणि शूट करणे.सर्वात सोपी आणि क्रूर पद्धत म्हणजे त्याने मारलेल्या जनावराच्या शरीरात स्फोटक बॉम्ब पेरून ठेवणे.हल्ली बरेच खेडूत लोक असे बॉम्ब बनवायला शिकले आहेत.ह्या बॉम्बला बिबळ्याच्या दाताचा स्पर्श झाला की तो फुटतो व त्याच्या जबड्याच्या चिंधड्या उडतात.जर ताबडतोब मृत्यू आला तर नशीब,

पण बऱ्याच वेळा ते मुकं जनावर रखडत,वेदनामय जीवन जगतं कारण असल्या भेकड पद्धती वापरणारे लोकही भेकडच असतात आणि जखमी जनावराला शोधून त्याला वेदनामुक्त करण्याचं धैर्य त्यांच्यात नसतं.


बिबळ्यांचा माग काढणे,त्याचा ठावठिकाणा शोधणे आणि शिकार करणे हे जितकं रोमांचकारी आहे तितकंच सोपंही आहे कारण त्यांच्या पावलांच्या गाद्या मऊ असल्याने,ते शक्यतो पाऊलवाटांवरूनच फिरतात.त्याचा ठावठिकाणा शोधणं पण फार अवघड नाही कारण जंगलातला जवळजवळ प्रत्येक पक्षी व प्राणी आपल्याला त्यासाठी मदत करत असतो. दबा धरून त्याच्याजवळ जाण्यात फार अडचण येत नाही कारण त्याला तीक्ष्ण नजर आणि श्रवणशक्तीचं वरदान असलं तरी गंधज्ञान नसल्याने तो कमी पडतो.त्यामुळे वारा कुठून वाहतो आहे याचा विचार न करता शिकारी त्याला योग्य वाटेल त्या दिशेने त्याच्या जवळ जाऊ शकतो.


एकदा हे सर्व जमलं तर रायफलचा ट्रीगर दाबण्यापेक्षा कॅमेराचं बटन दाबल्याने जास्त निखळ आनंद मिळू शकतो.बिबळ्याचं तासन् तास निरीक्षण करण्यात मजा आहे.कारण आपल्या जंगलात त्याच्यासारखं रुबाबदार जनावर दुसरं कोणतंही नाही.आपल्या मर्जीनुसार कॅमेराचं बटन दाबून आपण कायमस्वरूपी स्मृतिचिन्ह ठेवू शकतो आणि त्याची मजा कधीच कमी होत नाही.शिकारीच्या बाबतीत तसं नाही.त्याची एक क्षणभरच झलक आणि नंतर रायफलचा ट्रीगर दाबणे.जर नेम अचूक असेल तर तुम्हाला जास्तीत जास्त एखादी ट्रॉफी किंवा विजयचिन्ह मिळू शकते की जिचा ताजेपणा लवकरच नष्ट होणार असतो.

२९ जुलै २०२३ या लेखातील पुढील भाग


४/८/२३

हसा व हसू द्या व्हॉल्टेअर …

त्याच्या इतर अद्भुत कथाही सर्वांना 'हसा' म्हणून सांगत आहेत.स्वतःची मनुष्याच्या दुःखे व स्वत:चा मूर्खपणा पाहून हसा,असे तो लोकांना सांगत आहे. 'निसर्गाचा विद्यार्थी' (The Pupil of Nature) या पुस्तकात अशिक्षित व जंगली निरोगी मनाची सुधारलेल्या माणसाच्या विकृत व गुंतागुंतीच्या मनाशी तुलना केली आहे.एक हुरॉन इंडियन फ्रान्समध्ये आला आहे.त्याच्या आत्म्याचा उद्धार व्हावा म्हणून मिशनरी त्याला ख्रिश्चन करू पाहतात.तो नव्या कराराचा अभ्यास करून म्हणतो,

'माझी सुंताही करा व मला बाप्तिस्माही द्या.बायबलातील सर्वांची सुंता केली आहे.ख्रिश्चन होण्याआधी प्रत्येकाने ज्यू झाले पाहिजे!' त्याला सर्व उलगडा करण्यात येतो व तो पुढचे पाऊल टाकण्यास तयार होतो. बाप्तिस्म्यासाठी तो मानेपर्यंत नदीच्या पाण्यात शिरतो.ख्रिश्चनांना अशा रीतीने बाप्तिस्मा द्यायचा नसतो,असे जेव्हा त्याला सांगण्यात येते,तेव्हा तो आपले खांदे उडवतो व पुन्हा कपडे घालून पापांची कबुली देण्यासाठी धर्मोपदेशकाकडे जातो.

पापांचा पाढा वाचून झाल्यावर तो त्या धर्मोपदेशकास खुर्चीवरून खाली ओढतो.तो इंडियन त्या धर्मोपदेशकाला आग्रहपूर्वक म्हणतो, "बायबलात असे सांगितले आहे की, एकमेकांनी एकमेकांजवळ आपापली पापे कबूल करावीत.' "पुन्हा गोंधळात पाडणारी विवरणे त्या इंडियनास सांगण्यात येताच तो तुच्छतापूर्वक म्हणतो, "बायबलात न सांगितलेल्या अनंत गोष्टी तुम्ही येथे करीत आहात आणि त्यात जे करा म्हणून सांगितले आहे,तेच नेमके तुम्ही करीत नाही. मला हे कबूल केलेच पाहिजे की,हे सारे पाहून मला आश्चर्य वाटते व रागही येतो."

गोष्ट पुढे चालू राहते.हुरॉनचा संस्कृतीशी संबंध आल्यामुळे कोणकोणत्या संकटांतून व आपत्तींतून त्याला जावे लागते,याची सारी हकिकत सांगण्यात आली आहे.नाना साहसाच्या गोष्टी हुरॉनला कराव्या लागतात.तो शेवटी अशा निर्णयाला येतो की,सैतानाची इच्छा होती म्हणून त्याने आपणास सुसंस्कृत ख्रिश्चन केले.तो म्हणतो,'या सुसंस्कृत ख्रिश्चनांनी मला ज्या रानटी पद्धतीने वागवले,

त्या पद्धतीने माझ्या अमेरिकन बंधूंनी मला कधीही वागवले नसते.इंडियन रानवट असतील,सुधारलेले नसतील;पण या गोऱ्यांच्या देशातील लोक तर सुधारलेले पशू आहेत.!' व्हॉल्टेअरच्या सर्व गोष्टींतून हे असेच प्रकार आहेत.या गोष्टींशी तुलना करण्यासारखे वाड्मयात दुसरे नाही.या गोष्टींना संविधानकच नाही.व्हॉल्टेअरच्या तत्त्वज्ञानाच्या धाग्याभोवती गुंफलेली,नाना असंबद्ध संविधानकांची ही एक मालिका आहे.त्याच्या गोष्टींतील नायक शेतकऱ्यांच्या मुलींशी,राण्यांशी,मोठमोठ्या इस्टेटीच्या वारसदारणींशी लग्न करतात.त्यांचे डोळे जातात,तरीही ते सुखी असतात.ते म्हणतात, 'डोळे गेले तरी आम्ही तत्त्वचिंतन करीत बसू,अंतर्मुख होऊ.त्यांचा प्रेमभंग होतो. त्यांना दुःख इतकेच की,या बाबतीत ते तत्त्वचिंतन करू शकत नाहीत.संकटात सापडलेल्यांना ते साह्य करतात.पण त्यांच्यावर संकट आले असता त्यांना लाथा मिळतात.पण त्यानी गुन्हे केले म्हणजे त्यांना संपत्ती मिळते, मानसन्मान लाभतात.थोडक्यात सांगायचे,तर मानवी जीवनाच्या या सर्व लुटूपुटीच्या नाटकातील ही पात्रे व्हॉल्टेअरबरोबर हिंडतात. व्हॉल्टेअर दोऱ्या ओढून त्यांना आपल्या अती चपळ बोटांनी नाचवील तशी ती नाचतात. व्हॉल्टेअरचा विनोद म्हणजे अखंड वाहणारी विहीर आहे.

त्या विनोदाच्या विहिरीला अंतच नाही.पण या विनोदाच्या विहिरीत पाणी नसून मद्य आहे.त्याला जीवनातील विनोदाचा कैफ चढतो.तो आपल्या तेजस्वी विचारांनी साऱ्या जगाला गुंगवून टाकतो,दिपवून सोडतो.

'पण व्हॉल्टेअरची सर्वोत्तम बुद्धी तशीच प्रतिभा पाहू इच्छिणारांना अन्यत्र जावे लागेल,या गोष्टींमधील त्याची जीवनाविषयीची दृष्टी आनंददायक असली,तरी खोल नाही.जरा पोरकटपणाच वाटतो.त्याची लोकप्रियता फार होती म्हणून तो दु:खी असू शकत नव्हता.त्याची चलती होती म्हणून तो फार प्रखर व तिखट होऊ शकत नव्हता.

जीवनाचा अर्थ नीट समजण्या इतपत यथार्थ व पुरेसे

जीवन तो अद्यापि जगला नव्हता.तो अठराव्या शतकातील विनोदी पात्र आहे.तो युरोपचा खेळाडू आहे.

त्याचे मन अद्यापि अपरिपक्व आहे.त्याने अद्यापि फारसे दुःख भोगलेले नसते.मोठ्या मनुष्याच्या उंचीला तो अजून गेला नव्हता.विचारांची व भावनांची उच्चता तशीच गंभीरता त्याला अद्यापि आली नव्हती.मानवजातीला मार्ग दाखवणाऱ्या थोर पुढाऱ्यांपैकी एक होण्यासाठी दुःखाच्या सद्गुरूजवळ त्याने अजून कष्ट सोसणे जरूर होते.


१७४९ साली मॅडम डु चॅटलेट मरण पावली. जीवनात प्रथमच दुःख पाहून तो हसण्याचे विसरला.त्याची प्रकृतीही ढासळू लागली व कडेलोट म्हणजे त्याला पुन्हा फ्रान्समधून हद्दपार करण्यात आले.१७५५ साली लिस्बन येथे भूकंप झाला.या अपघातात तीस हजार लोक गडप झाले.त्या दिवशी सर्व संतांचा स्मृतिदिन होता. पुष्कळ लोक प्रार्थना करीत असतानाच ठार झाले.चर्च प्रार्थना करणाऱ्यांनी भरून गेले होते आणि भूकंप झाला व सारे गडप झाले.व्हॉल्टेअर आता जगाकडे निराळ्या प्रकाशात पाहू लागला.त्याचे लेखन अधिक गंभीर होऊ लागले.

त्याचे भव्य मन शेवटी एकदाचे परिपक्व झाले.त्याने एक भावनोत्कट प्रखर कविता लिहिली.ईश्वराची करुणा हे त्याचे ज्ञान याबद्दल त्याने शंका घेतली.आपल्या लेकरांना दुःखात लोटणारा हा कसला परमेश्वर ? आरोळ्या

ठोकून प्रार्थना करणाऱ्या साऱ्या भक्तांना त्या निष्ठुराचे मौन हेच उत्तर! 


अखेर व्हॉल्टेअरच्या लक्षात आले की,सुटसुटीत अर्थसुंदर नर्मवचने किंवा निश्चित हास्य यापेक्षा जीवन काहीतरी अधिक आहे.


मी हसतहसत विनोदाने जगातील सुखाची गीते, सूर्यप्रकाशाची गीते गात होतो.पण आता काळ बदलला आहे.माझ्या वाढत्या वयानेही मला नवीन दृष्टी दिली आहे.मानवजातीची क्षणभंगुरता मीही अनुभवीत आहे.

सभोवती अंधार वाढत आहे.मीही प्रकाश शोधत आहे. अशा वेळी मी दुःखी कष्टी होऊ नये तर काय करावे ?


लिस्बन येथील भूकंपाच्या बाबतीत प्रस्थापित चर्चची बेफिकीर वृत्ती पाहून तर व्हॉल्टेअरला धक्काच बसला!या घोर आपत्तींतही त्या फादरांना ईश्वराचे हेतू दिसत होते.

त्यांनी पापे केली म्हणून प्रभूने त्यांना मारून टाकले,असे हे धर्मोपदेशक खुशाल प्रतिपादीत छिन्नविछिन्न झालेल्या लोकांच्या वेदनांवर या धर्मातील भोळसट कल्पना आणखी मीठ चोळीत आहेत,असे पाहून या चर्चची व्हॉल्टेअरला चीड आली.चर्चबद्दलचा तिरस्कार त्याच्या मनात मरेपर्यंत होता. स्विझर्लंडमध्ये फर्ने येथे त्याने इस्टेट विकत घेतली.फ्रान्सच्या सरहद्दीच्या जरा बाहेर ही इस्टेट होती.येथे बसून त्याने संघटित धर्माविरुद्ध जोरदार लढाई सुरू केली.तो सांगू लागला की,जगातील साऱ्या दुःखांचे मूळ म्हणजे चर्च. चर्चची धर्मांधता तशीच असहिष्णुता,ती इन्क्विझिशन्स,ते बहिष्कार,त्या शिक्षा,ती युद्धे साराफापटपसारा आहे.असे हे चर्च म्हणजे मानवजातीला शाप आहे.अत:पर चर्चची सत्ता चालू ठेवणे म्हणजे सुधारणेला कलंक लावणे होय."चर्चला लागलेला हा कलंक धुवून काढा." अशी घोषणा त्याने केली." या निंद्य गोष्टी चिरडून टाका." हे त्याचे ब्रीदवाक्य झाले.त्याने मित्रांना लिहिलेल्या प्रत्येक पत्राच्या शेवटी 'चर्च चिरडून टाका' हे वाक्य लिहिलेले असे.


पुस्तकाचा व पत्रकांचा त्याने नुसता पाऊस पाडला.अत्यंत भावनोत्कटतेने त्याने हे सारे लिखाण लिहिले आहे.त्याचे लिहिणे जळजळीत निखाऱ्यासारखे आहे.या लिखाणात उदात्त भावनेची कळकळ आहे.हे सारे लिखाण केवळ मनुष्यांच्या अंधश्रद्धेतून होते असे नव्हे;तर त्यांच्या धार्मिक अत्याचारांविरुद्धही होते.बहुजन समाजाने 'ईश्वर आहे' असे मानणे ठीक आहे. 'ईश्वर नसेल तर एकदा शोधून काढावा लागेल. एपिक्यूरसचे ईश्वराशिवाय चालत असे,पण व्हॉल्टेअरला ईश्वर अजिबात रद्द करणे बरे वाटेना.ईश्वर म्हणून कोणी मानला म्हणजे बहुजन समाज जरा बरा वागतो,असे त्यांचे मत होते.ईश्वर असणे जरूर आहे,असे त्याला वाटे. इतर कोणत्याही कारणांसाठी नसेना का;पण निदान आपणास त्याच्याशी भांडता यावे म्हणून तरी तो त्याला हवा असतो.ईश्वर म्हणजे जगाचे परमोच्च ज्ञान,अनंतपट कार्यक्षम असा विश्वकर्मा.पण धर्मोपदेशक या ईश्वराला इन्क्विझिटर करतात.लष्करी अधिकारी त्याला शिक्षाप्रिय सार्जंट बनवतात व अशा रीतीने श्रद्धेचे भीतीत व धर्माचे भोळसटपणात रूपांतर करतात.व्हॉल्टेअर म्हणतो,"या रूढी-राक्षसीला आपण नष्ट करू या.ही रूढी धर्मातूनच जन्मते, पण धर्मालाच छिन्नविछिन्न करते.रूढीविरुद्ध बंडाचा झेंडा हाती घेऊन उभे राहतील,ते सारे मानवजातीचे उपकारकर्ते होत.व्हॉल्टेअरने आपले उर्वरित जीवन धार्मिक रूढी व आंधळेपणा यांच्याशी दोन हात करण्यात दवडले.या रूढींतून निर्माण होणाऱ्या द्वेष, मत्सर,असहिष्णुता,

संकुचितपणा,अन्याय व युद्ध यांच्याविरुद्धही तो बंड करीत राहिला.युद्ध म्हणजे मोठ्यातला मोठा गुन्हा असे तो म्हणे.तो म्हणतो,"हा गुन्हा अधिकच लज्जास्पद व चीड आणणारा वाटतो.कारण सेनाधिपती होणारा प्रत्येक डाकू धर्माच्या नावाने जाहीरनामा काढून चोरी करावयास निघतो.व युद्धप्रिय देवांना आपल्या बाजूने लढावयास बोलावतो." जो आपल्या विशिष्ट धार्मिक समजुतीसाठी मारावयास उठतो,तो खरा धार्मिक नव्हे. शास्त्रज्ञांचे म्हणणे कोणी न मानले तर काय तो मारावयास उठतो ? भूमितीतील सिद्धांतांसाठी का कधी युद्ध झाले आहे? पण हे धर्मोपदेशक काही धार्मिक गोष्टींसाठी खुशाल खाटिकखाना सुरू करतात.त्यांच्या धार्मिक गोष्टी म्हणजे केवळ मृगजळ असते.तो मिथ्या काथ्याकुट असतो.त्यांचे धार्मिक सिद्धांत म्हणजे त्यांची स्वतःची काही विशिष्ट मते असतात.त्यासाठी मारामाऱ्या कशाला?व्हॉल्टेअर म्हणतो,

"हे असे लोक म्हणजे भयंकर प्रकारचे वेडे होत.काहीही किंमत पड़ो,यांच्या या विषारी चळवळी बंद पडल्याच पाहिजेत." जगातील धार्मिक असहिष्णुतेची पुंजी कमी व्हावी म्हणून व्हॉल्टेअरने भरपूर कामगिरी केली आहे.

धार्मिक बाबतीत कोणी ढवळाढवळ करू नये,हे तत्त्व त्याने कायमचे प्रस्थापित केले व चर्च आणि स्टेट यांची कायमची ताटातूट केली.त्याने धर्मोपदेशकांच्या हातातील तलवार काढून घेतली.व्हॉल्टेअरचे जीवनारंभकाळी 'हसा व हसू द्या' हे ब्रीदवाक्य होते.पण आता त्याने अधिक उच्च ब्रीदवाक्य घेतले,'तुम्ही विचार करा व इतरांनाही विचार करू द्या.' एका पत्रात तो लिहितो, 'तुम्ही जे काही म्हणता,

त्यातील एका अवाक्षराशीही मी सहमत नाही.पण तुम्हाला जे म्हणायचे आहे,ते म्हणण्याचा तुम्हाला हक्क आहे आणि या तुमच्या हक्काचे मी मरेतो समर्थन करीन.' व्हॉल्टेअरचे हे शब्द म्हणजेच त्याने मानवी सुधारणेत घातलेली मौल्यवान भर होय.अठराव्या शतकाची सुधारणेला मोठी देणगी असे,हे धीरोदात्त शब्द होत.


व्हॉल्टेअरच्या मनात अशी क्रांती चालू असता त्याचे बाह्य जीवन नेहमीप्रमाणे अशांतच होते. फ्रेडरीक दि ग्रेटचा साहित्यिक चिटणीस म्हणून त्याची नेमणूक झाली होती.

तो फ्रेडरिकशी भांडला व त्याला पुन्हा फ्रान्समध्ये पाठवण्यात आले.फ्रेंच क्रांतीचे वातावरण तयार करणारे डिडरो,ड'अलेबर्ट,कॉन्डॉसेंट वगैरे नास्तिक ज्ञानकोशकार मंडळींना व्हॉल्टेअरही मिळाला. डिडरोप्रभृती सारे लोक जुन्या विचारांना व जुन्या रूढींना धाब्यावर बसवणारे होते.ते जुन्या मूर्ती फोडून नवीन विचारमूर्ती देणारे होते.

व्हॉल्टेअरन 'स्वतंत्र विचारांचा ज्ञानकोश' तयार करण्याच्या कामी त्यांना मदत केली.ज्ञानकोशकार त्याला सनातनी म्हणत,आस्तिक म्हणत आणि सनातनी त्याला नास्तिक म्हणत आणि या दोघांच्या मध्ये तो उभा होता.त्याचे हात कामाने भरलेले होते. इतिहासाचे तत्त्वज्ञान,तत्त्वज्ञानाचा कोश वगैरे शेकडो पुस्तके लिहिण्यात तो मग्न होता.तरीही अन्याय व छळ दिसतील,तिथे तिथे लेखणी घेऊन लढायला तो सदैव सज्ज असेच.सेंट बूव्हे लिहितो,प्रत्येक जण व्हॉल्टेअरकडे येई.कोणी त्याचा सल्ला मागत,कोणी त्याला आपल्यावर होणारे अन्याय निवेदीत व त्याचे साह्य मागत.तो कोणासही नकार देत नसे,निराश करीत नसे.'


त्याला मनाने वा शरीराने बरेच दिवस विश्रांती घेणे अशक्य असे.वयाला ब्याऐंशी वर्षे होत आली,तरीही जीवनात प्रत्यक्ष धडपड करावी, स्वस्थ बसू नये असे त्याला वाटे.आपले मरण जवळ आले असे वाटून तो पॅरिसला अखेरची भेट घ्यायला म्हणून आला.पॅरिसमध्ये त्याचे स्वागत झाले,ते जणू ऐतिहासिकच होते!पण हा सारा प्रवास,हे भव्य स्वागत त्याच्या प्रकृतीस झेपले नाही.त्याच्या स्वागतार्थ रंगभूमीवर केल्या जाणाऱ्या एका नाटकाला डॉक्टर 'जाऊ नका' म्हणून सांगत असताही तो गेला.सार्वजनिकरीत्या त्याचे ते शेवटचेच दर्शन होते..


तो मृत्यूशय्येवर होता.एक धर्मोपदेशक त्याचा कबुलीजबाब घेण्यास आला.पण व्हॉल्टेअर म्हणाला,

"रोमन कॅथॉलिक चर्चवर माझी श्रद्धा नाही.मी ईश्वराची प्रार्थना व पूजा करीत मरतो.मित्रांवर प्रेम करीत;पण शत्रूचा द्वेष न करता,रूढींचा तिरस्कार करीत मी देवाकडे जातो."


पॅरिसमध्ये त्याला ख्रिश्चन धर्माप्रमाणे अंत्यसंस्कार मिळाला नाही.इंग्रजांवरील पत्रात तो एके ठिकाणी लिहितो,"आयझॅक न्यूटन हा सर्वांत मोठा होय.तो सर्वांत मोठा का?कारण आपण त्याच्याचबद्दल मनात पूज्यबुद्धी बाळगतो,जो सत्याच्या जोरावर आपली मने जिंकतो.

बळजबरीने दुसऱ्यांची मने जिंकू पाहणारांना आपण मान देत नाही.' न्यूटनबद्दल व्हॉल्टेअरने लिहिलेले शब्दच व्हॉल्टेअरच्या मृत्यूलेखासाठी उपयोगी पडण्यासारखे होते.


२.८.२०२३ 'हसणारा व्हॉल्टेअर' या लेखाचा शेवटचा भाग..

२/८/२३

हसणारा व्हॉल्टेअर..

आपल्याच हाताने मानेला फास लावून घेऊन आत्महत्या करण्यासाठी पाळी येऊ नये.म्हणून हसणारा व्हॉल्टेअर हा रिस्टोफेन्स व रॅबेल्स, ल्यूथर व सैतान या सर्वांचे अजब मिश्रण होता. त्याची प्रतिमा व त्याची बुद्धी या परस्पर

विरोधी गुणांनी बनल्या होत्या.तो मानवजातीचा तिरस्कार करी.पण मानवांवर त्याचे प्रेमही असे. तो धर्मोपदेशकांची टर उडवी,तरीपण त्याने आपले एक पुस्तक पोपला अर्पण केले आहे. राजा महाराजांची तो हुर्रेवडी उडवी,तरीपण त्याने फ्रेडरिक दि ग्रेटने दिलेले पेन्शन स्वीकारले. त्याला धर्मांधपणाची चीड असे;पण ज्यूंच्या बाबतीत तो अनुदार होता.संपतीजन्य ऐटीचा तो उपहास करी,तरी त्याने स्वतः मात्र पुष्कळ धनदौलत मिळवली व तीही सगळीच काही प्रामाणिकपणे मिळवली नाही.ईश्वरावर त्याचा विश्वास नव्हता,तरी तो जन्मभर ईश्वराचा शोध करीतच होता.

त्याला धर्माबद्दल आदर नसे,पण त्याने हास्याच्या आनंदाचा नवाच धर्म निर्मिला.


जगातल्या थट्टा व टिंगल करणाऱ्यांचा तो राजा होता.हे जीवन म्हणजे एक मोठे हास्यरसोत्पादक नाटक आहे,असे तो मानी.तो लोकांना म्हणे, "जीवन हा फार्स समजा आणि मिळवता येईल तितकी गंमत मिळवा." जीवन चांगल्या रीतीने जगता यावे,अनुभवता यावे,त्यातील गंमत मिळवता यावी म्हणून अज्ञान,अन्याय,रूढी व युद्धे ही सर्व नष्ट करून टाकली पाहिजेत.या दुष्ट वस्तू जीवनाची ट्रेजिडी करून टाकीत असतात. या दूर केल्या तरच जीवन हे एक कॉमेडी होईल.दुसऱ्या शब्दात हेच सांगायचे तर असे म्हणता येईल की,व्हॉल्टेअरने लोकांना विचार कसा करावा हे शिकवले.तो म्हणे,'राष्ट्र एकदा विचार करायला लागले म्हणजे मग त्याला थांबवणे अशक्य होईल.' तो स्पायनोझापेक्षा कमी चारित्र्यवान होता.तरी त्यानेच जगावर त्या ज्यू तत्त्वज्ञान्यांपेक्षा अधिक परिणाम-सुपरिणाम केला.तो व्यवहार्य गोष्टींवरच लिही व तेही लहान मुलांनासुद्धा समजावे,अशा भाषेत.त्याच्या संशयवादी तत्त्वज्ञानामुळे डायनॅमाइटवर ठिणगी पडली व असा प्रचंड भडका उडाला की,राजांचे दंभ व धर्मातील भोळसट रूढी यांचे भस्म झाले. जुन्या जगाचा पाया त्याने उडवून टाकला व नव्या जगाचा पाया घालण्यासाठी बाव करून दिला. 


त्याचे सारे जीवन म्हणजे विरोधाभास होता.तो जन्मताच त्याची आई मेली.२१ नोव्हेंबर १६९४ रोजी तोही मरणार असे वाटले,पण तो जगला. त्याची प्रकृती नेहमी मरतुकडी होती.तरीही तो त्र्याऐंशी वर्षांचा होईतो वाचला.जेसुइट स्कूल मध्ये शिकून तो ग्रॅज्युएट झाला.त्याने जेसुइटांचे सारे वर्चस्व झुगारून दिले.त्याचे शरीर हाडांचा नुसता सांगाडा होता.त्याचे नाक लांब होते,त्याचे डोळे बारीक पण तेजस्वी होते.तो पॅरिसमधला सर्वांत कुरूप तरुण होता.तरीही तो साऱ्या स्त्रियांचा लाडका होता.त्या त्याला जणू देव मानीत.तो कपटी व उपहास करणारा होता.त्याचे खरे नाव फ्रँकॉइस मेरी अरोट असे होते.पंधराव्या लुईच्या रीजंटचा अपमान केल्याबद्दल बॅस्टिलच्या तुरुंगात शिक्षा भोगीत असता त्याने नाव बदलून व्हॉल्टेअर हे नाव घेतले.अकरा महिन्यांचा तुरुंगवासात त्याने नाव्हेरचा राजा हेन्री याच्यावर महाकाव्य लिहिण्यात वेळ खर्चिला. तुरुंगातून सुटला तेव्हा तो तेवीस वर्षांचा होता.त्याचा बाप व्यवहारचतुर होता.त्याने त्याला तीन गोष्टींबाबत सावध राहण्यास सांगितले,वाड् मय स्त्रिया व जुगार.शाळेत असता तो जेसुइटांचे मनापासून ऐके..त्याचप्रमाणे त्याने बापाचा हा उपदेश लक्षपूर्वक ऐकला.पण जेसुइटांच्या शिकवणीप्रमाणेच बापाचीही शिकवण तो पुढे विसरला.

त्याने काही नाटके लिहिली व ती यशस्वी ठरली.त्याला पैसे बरे मिळाले.वॉलस्ट्रीटमधील एखाद्या ब्रोकरप्रमाणे त्याने आपले पैसे मोठ्या हुशारीने गुंतवले.फ्रेंच सरकारने काढलेली लॉटरीची सारी तिकिटे एकदा व्हॉल्टेअरने घाऊकरित्या खरेदी केली. मॅनेजरच्या हे लक्षातच न आल्यामुळे सारी बक्षिसे व्हॉल्टेअरला मिळाली.


तो तत्त्वज्ञानी तसाच व्यावहारज्ञही होता.सूक्ष्म विचार करणारा व धंद्यात हुशार असा पुरुष क्वचितच आढळतो.

व्हॉल्टेअरची बुद्धी मोठी विलक्षण होती.तत्त्वज्ञानातील अमूर्त व सूक्ष्म विचार तो प्रत्यक्ष व्यवहाराशी बेमालूम मिसळी. मूर्त- अमूर्त दोहोंतही त्याची बुद्धी सारखीच खेळे.व्यवहार्यता व सूक्ष्म अमूर्ततता दोन्ही त्याच्या ठायी होत्या.इतर नाना उलाढाली करूनही त्याला पॅरिसमधील प्रतिष्ठित व रुबाबदार मंडळींत मिसळण्यास भरपूर वेळ असे.पॅरिसमधील बेछूट,स्वच्छंदी व विलासी जीवनाचा तो मध्यबिंदू होता.त्याच्याभोवती पॅरिसमधील प्रतिष्ठित नबाब व पंडित जमत. तत्त्वज्ञान,व्यवहार व या बैठकी अशा त्रिविध चळवळींचा त्याच्या बुद्धीवर ताण पडे व त्यामुळे त्याचे दुबळे शरीर थके.एकदा त्याला देवी आल्या.

डॉक्टरांना तो मरणार असे वाटले.पण तो नेहमीप्रमाणे बरा झाला व अधिकच उत्साहाने जीवनाच्या आनंददायी गोंधळात सामील झाला.पुन्हा या सुखी व विनोदी संसारात बुडी घेता झाला.त्याची प्रकृती यथातथाच होती.दुबळ्या प्रकृतीच्या जोडीला तिखट जिभेची आणखी एक अडचण असल्यामुळे त्याला नेहमी त्रास होई. एकदा तो म्हणाला, "जे वाटते ते स्पष्टपणे बोलणे हा माझा धंदा आहे." तत्त्वज्ञानक्षेत्रातच त्याचे विचार होते,तोपर्यंत सारे ठीक होते.पण माणसांविषयी आपणास काय वाटते हे तो सांगू लागला व विशेषत: सरदार जमिनदारांविषयी लिहू लागला,तेव्हा भानगडी सुरू झाल्या,त्रास होऊ लागला.एकदा त्याने लिहिलेले एक तिखट व झणझणीत वाक्य कॅव्हेलियर डी रोहन याला झोंबले.त्याचा अहंकार दुखावला गेला.त्याने काही गुंडांना व्हॉल्टेअरला चांगले चोपून काढावयास सांगितले.दुसऱ्या दिवशी व्हॉल्टेअरने त्या सरदाराला द्वंद्वयुद्धाचे आव्हान दिले. व्हॉल्टेअरची तलवारही त्याच्या जिभेप्रमाणेच तिखट असेल असे त्या बड्या सरदाराला वाटले, म्हणून त्याने पोलिसांच्या मुख्याकडे संरक्षण मागितले.पोलीस अधिकारी त्याचा चुलतभाऊ होता.व्हॉल्टेअर याला पुन्हा बॅस्टिलच्या तुरुंगात अडकवण्यात आले.त्याची मुक्तता होताच त्याला फ्रान्समधून निर्वासित करण्यात आले.


तो इंग्लंडमध्ये गेला.या वेळी त्याचे वय बत्तीस वर्षांचे होते.तो तिथे तीन वर्षे राहिला.त्याचे मन देशकालातीत होते.इंग्लंडमध्ये त्याला घरच्या सारखेच वाटले.तो इंग्रजी भाषा चांगलीच शिकला.एका वर्षात त्याने शेक्सपिअर

खेरीज बाकी सारे साहित्य आत्मसात केले.पण शेक्सपिअर हे इंग्लंडचे सर्वोत्कृष्ट फळ होते.शेक्सपिअ-

रची मनोबुद्धी हा आनंदी तत्त्वज्ञानी समजू शकला नाही.

इंग्लंडातही मोठमोठ्या तत्त्वज्ञान्यांना उत्कृष्ट फ्रेंच मनोबुद्धी समजू शकत नसे.व्हॉल्टेअर शेक्सपिअरला 'जंगली' म्हणत असे आणि पुढे शंभर वर्षांनी कार्लाइलने व्हॉल्टेअरला जंगली म्हणून त्याचा सूड घेतला. पण भूतकाळातला महाबुद्धिमान शेक्सपिअर जरी व्हॉल्टेअरला जाणता आला नाही,तरी समकालीन इंग्रजांत त्याला बरेचसे अनुकूल मनोबुद्धीचे लोक भेटले.इंग्रजांचे विचारधैर्य पाहून त्याला आश्चर्य वाटे. इंग्रज लोक आपले विचार धैयनि मांडतात हे पाहून तो त्यांचे कौतुक करी,

व्केकरांशी त्याचा चांगला परिचय झाला. त्यांची शांतिमय मते त्याला लगेच पटली.तोही म्हणाला की,समुद्र ओलांडून आपल्याच बंधूंचे गळे कापायला जाणे हा केवळ मूर्खपणा होय. 'गाढवाच्या कातड्यात दोन काठ्या मारून आवाज होतो'आणि सारे मारामारीला धावतात.

स्विफ्टची व त्याची भेट झाली.त्या शतकातले सर्वांत मोठे असे दोन उपहासलेखक एकत्र बसले,बोलले,खरोखरच तो प्रसंग देवांनासुद्धा मोठ्या मेजवानीचा वाटला असता.

व्हॉल्टेअरची 'छोटामोठा' ही मनोरम कथा 'गलिव्हर्स ट्रॅव्हल्स' पासूनच स्फूर्ती मिळून लिहिली गेली असावी. स्विफ्टच्या उपहासातील तिखटपणाइतका तिखटपणा व्हॉल्टेअरमध्ये नसे,व्हॉल्टेअरची लेखणी गुदगुल्या करी.

स्विफ्टची लेखणी भोसकी.पण व्हॉल्टेअरची प्रतिभा अधिक समृद्ध व श्रीमंत होती.छोटामोठा - मायग्नोमेगस हा सिरियस बेटाचा रहिवासी होता.तो पाच लक्ष - फूट उंच होता. त्याला शनीवरचा एक अगदीच लहान,केवळ पंधराच हजार फूट उंच गृहस्थ भेटतो. उभयता अनंत अवकाशातून भ्रमंती करण्यासाठी बाहेर पडतात.

सॅटर्नियनचे ( शनीवरील गृहस्थाचे) लग्न नुकतेच झालेले असते.त्याची पत्नी त्याला जाऊ देत नाही.कारण त्यांनी केवळ दोनशेच वर्षे मधुचंद्र भोगलेला होता.इतक्या लवकर ताटातूट! पण सॅटर्नियन तिचे समाधान करतो व म्हणतो, "रडू नको.मी लवकरच परत येईन." दोघे मित्र धूमकेतूच्या शेपटीवर बसून विश्वसंचारास निघतात.ते ताऱ्यांमधून जात असतात.संचार करताकरता ते पृथ्वी नावाच्या एका लहानशा ढेपळावर उतरतात.भूमध्य समुद्र म्हणजे त्यांना गंमत वाटते.ते त्यातून गप्पा मारीत चालत जातात.त्यांना वाटेत एक गलबत भेटते.त्या गलबतावर ध्रुवाची सफर करून आलेले काही तत्त्वज्ञानी असतात.

सिरियनला ते गलबत इतके लहान वाटते की दुर्बिणी

शिवाय ते त्याला दिसत नाही.तो ते गलबत उचलून आपल्या बोटाच्या नखावर त्याचे नीट परीक्षण करण्यासाठी ठेवतो, पण त्या गलबतात सजीव अणु

परमाणू पाहून त्याला आश्चर्य वाटते.हे अणू त्याच्याशी बोलतात व त्याला म्हणतात,आम्ही लहान असलो तरी आमच्यात अमर आत्मा आहे.हे ऐकून त्या पाच लक्ष फूट उंच माणसास व त्याच्या मित्रास अधिकच आश्चर्य वाटते.ते सजीव अणू आणखी सांगतात."आम्ही ईश्वराची प्रतिकृती आहोत, विश्वाचे मध्यबिंदू आहोत." ते अधिकच आश्चर्यचकित होतात.ते दोघे या मानवी अणूंना विचारतात, "तुम्ही कसे जगता? वेळ कसा घालवता?" ते मानवी अणू सांगतात, "आमचा पृथ्वीवरचा बराचसा वेळ एकमेकांना मारण्यातच जातो." एक तत्त्वज्ञानी त्यांना सांगतो, "या क्षणी आमच्या जातीचे एक लाख जंतू डोक्यावर टोप्या घालून डोक्यावर पागोटी घालणाऱ्या दुसऱ्या एका लाखांस मारीत आहेत." तो मानवी अणू पाहुण्यांना पुन्हा सांगतो, "ही कामगिरी पॅलेस्टाइन नावाच्या एका वारुळासाठी चालली आहे." पुन्हा तो सांगतो, "जे लाखो लोक एकमेकांचे गळे कापीत आहेत,त्यांना त्या पॅलेस्टाइनच्या ढेपळावर सत्ता नाहीच मिळवायची.ते पॅलेस्टाइन सुलतानच्या ताब्यात असावे की युरोपीय राजाच्या ताब्यात असावे यासाठी ही मारामारी,ही खुनी कत्तल!आणि अशा कत्तली अनादी कालापासून पृथ्वीवर सारख्या चालू आहेत." पृथ्वी नावाचा हा ग्रह म्हणजे वेड्याचे घर आहे असे या पाहुण्यांना वाटते व त्या मानवी अणुपरमाणूंना सोडून ते आपल्या विचारवंत लोकी त्वरेने प्रयाण करतात.


व्हॉल्टेअरच्या इंग्लंडच्या भेटीतून 'मायक्रोमिडास' हे एकच पुस्तक जन्मले नाही,तर 'इंग्रजांसंबंधी पत्रे' हे त्याहूनही अधिक महत्त्वाचे पुस्तक निर्माण झाले.अर्थातच ते तितके मनोरंजक नव्हते,हे खरे.या पत्रांमध्ये त्याने फ्रेंचांच्या गुलामीची इंग्रजांच्या स्वतंत्र वृत्तीशी तुलना केली नाही.

इंग्लंडच्या नियंत्रित राजेशाहीचा गौरव केला आहे व तसेच सरकार फ्रेंचांनी फ्रान्समध्ये स्थापावे,असे प्रतिपादन केले आहे.त्याने जवळजवळ 'आपला राजा फेकून द्या' असेच लिहिले आहे. 'तत्त्वज्ञानाची कथा' या आपल्या पुस्तकात डॉ.ड्यूरांट लिहितो, 'व्हॉल्टेअरला माहीत असो वा नसो,त्याचा हेतू असो वा नसो, त्याची पत्रे म्हणजे फ्रेंच राज्यक्रांतीच्या कोंबड्याचे पहिले आरवणे होते.' व्हॉल्टेअरला हद्दपारीतून परत बोलवण्यात आले.ही पत्रे प्रसिद्ध व्हावीत अशी त्याची इच्छा मुळीच नव्हती.

खासगीरित्या प्रचार व्हावा म्हणूनच त्याने ती लिहिली होती.पण एका अप्रामाणिक प्रकाशकाच्या हाती ती पडली व त्याने व्हॉल्टेअरची परवानगी न घेताच ती छापून टाकली.एका सरकारी अधिकाऱ्याच्या हाती एक प्रत आली.त्याने लगेच ते पुस्तक राजद्रोही, अधार्मिक आणि अनीतिमय आहे असे जाहीर केले.( मानव जातीच्या कथा हेन्री थॉमस,साने गुरुजी,मधुश्री पब्लिकेशन ) ते पुस्तक जाहीररीत्या जाळण्यात आले व त्याला पकडण्यासाठी पुन्हा वॉरंट निघाले.


बॅस्टिलच्या तुरुगात पुन्हा जाऊन बसण्याची व्हॉल्टेअरची इच्छा नव्हती.बॅस्टिलच्या तुरुगाचे शिल्पकाम,त्याचा नकाशा,त्याचा आंतर भाग यांची आता त्याला पुरेपूर माहिती असल्यामुळे तो पोलिसांच्या हातून निसटून पळून गेला व आपल्या प्रियकरणीच्या बाहुपाशात जाऊन विसावला.या त्याच्या प्रेयसीचे नाव मार्किवसे डु चॅटेलेट.ती विवाहित होती.तिचा नवरा म्हातारा व सैन्याबरोबर दूर होता.त्याच्या गैरहजेरीचा व्हॉल्टेअरने पुरा पुरा फायदा घेतला.तो त्याची पत्नी व त्याचा किल्ला यांचा जणू धनीच बनला. मार्निवसे सुंदर तशीच चतुर होती.सिरे तिचा बंगला होता.ही जागा यात्रेचे,विलासाचे, आनंदाचे व मेजवानीचे स्थान बनली.येथे तत्त्वज्ञानाच्या चर्चा चालत,खानपानही चाले. प्राचीन ग्रीक लोकांचे वैभव जणू पुन्हा सजीव झाले.प्लेटोच्या काळापासून अशी भोजने झाली नव्हती,

की अशा चर्चाही झाल्या नव्हत्या.सिरे येथील हे स्थान युरोपभर विख्यात झाले. फ्रान्समधील नामांकित विद्वान व उत्तमोत्तम बुद्धिमान लोक व्हॉल्टेअरने येथे गोळा केले.

तो त्यांना सर्वोत्कृष्ट मध देई.त्यांच्यासाठी आपली नाटके करून दाखवी व आपल्या विनोदी टीकांनी त्यांना पोट धरधरून हसायला लावी. सिरे येथेच त्याने अत्युत्तम Cynical कथा लिहिल्या.कॅन्डिडे,The world as it Goes, Zading.The Pupil of Nature,The Princess of Balaglon वगैरे मनोरम कथा त्याने लिहिल्या.


या गोष्टीतील प्रमुख पात्रे म्हणजे रक्तमांसाची माणसे नाहीत.आपल्या मनातल्या कल्पनांनाच मानवी पोषाख देऊन त्याने उभे केले आहे.ही सारी पात्रे म्हणजे कल्पनांची प्रतीके आहेत.रूपके आहेत.किती रसभरित व भव्यदिव्य कल्पना! आणि त्यांना दिलेले पोशाखही किती कल्पनारम्य! या अद्भुत गोष्टींपैकी 'कॅन्डिडे' ही गोष्ट सर्वांत छान आहे.ही त्याने तीन दिवसांत लिहिली.ही लिहिताना त्याची लेखणी जणू अक्षरश: हसत होती.या पुस्तकात त्याने असे सिद्ध केले आहे की,या जगाहून अधिक वाईट जग असणे शक्य नाही.आपण राहतो ते जग शक्य तितके वाईट आहे.या गोष्टीसाठी त्याने घेतलेल्या विषयाहून अधिक खेदोत्पादक व उदास करणारा विषय सापडणे विरळा.पण व्हॉल्टेअरच्या जादूच्या स्पर्शाने निराशाही हसू लागते.निराशाही अत्यंत विनोदी वस्तू म्हणून गौरवावी,

पूजावी असे वाटते.कॅन्डिडे ही गोष्ट म्हणजे निराशेचे बायबल;पण वाङ्मयाच्या इतिहासातील हे अत्यंत आनंददायक पुस्तक आहे.


उर्वरित भाग पुढील लेखामध्ये..