* विजय गायकवाड | Vijay Gaikawad

live

नमस्कार आपले स्वागत आहे. 'सगळे जण तुम्हाला शोधत येतील.आनंदाने तुडुंब भरलेली माणसे सर्वांनाच आवडतात! पण ते तुम्हाला दुःखी,उदास अशा अवस्थेत पाहू शकत नाहीत! तेव्हा आनंदी-हसतमुख रहा आणि मित्रांचा सहवास वाढवा! जर तुम्ही दुःखी राहिलात तर मात्र सगळे जण तुम्हाला सोडून जातील. जीवनातील आनंद-प्रसन्नता भरभरून वाटा! पण एकटे दुःखी रहाल, तर त्या दुःखातच बुडून जाल !' सॉलिट्यूड, ईला व्हीलर विलकॉक्स जगण्याच्या तयारीसाठी नव्हे तर,जगण्यासाठी माणूस जन्माला आला आहे,असं 'बोरिक पास्तरनाक' यांनी म्हटलेलं आहे.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! वाचन हे आहाराहून जास्त महत्त्वाचे असते.जिम र्‍होम यांनी अँथोनी रॉबीन्स यांना शिकवले होते की 'एक वेळ रोजचे जेवण चुकव,पण वाचन अजिबात चुकवू नको.' याप्रमाणे मी अखंडपणे वाचत आहे. माणसांपासून माणसांपर्यंत जाण्याचा,प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाण्याचा जीवनाचा राजमार्ग पुस्तकातून जातो. कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात. पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये. म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,कवी सचिन शिंदे,संतोष शेळके,अनिल फारणे,सहित प्रकाशन,डॉ.रवींद्र श्रावस्ती,डॉ.सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,संजय बापट,मनोहर सुर्वे,विनायक पाटील,संतोष पाटील,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, मेनन पिस्टन रिंग मधील सहकारी मित्र शेखर सुर्यवंशी..। पुस्तकातील घटना प्रसंग हे मी लिखित स्वरूपात सध्या व्हाट्सअप वरती टाकत असतो.हे सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी,पुस्तके देणारी लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत. ... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ. मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. विजय कृष्णात गायकवाड

९/१०/२३

फुले दांपत्य आणि त्यांचा लढा.. Phule couple and their fight.. |

बंडखोर (आणि साहजिकच खडतर ) अशा सामाजिक सुधारणा करण्याच्या प्रवासावर जोतीराव फुले आपली जीवनसहचरी सावित्रीबाई फुले हिच्यासह निघाले तेव्हाच सनातनी पुण्यातल्या एका भाजीवाल्याचा 'मुलगा' आणि माळ्याचा 'नातू' म्हणून येणाऱ्या सामाजिक बेड्या त्यांनी तोडून टाकलेल्या होत्या.


या मुलाचं प्राथमिक शिक्षण मराठीत झालं होतं आणि वयाच्या तेराव्या वर्षीच त्याचं दहा वर्षांहून लहान मुलीशी लग्नही झालं होतं.त्यानंतर एका मुस्लीम शेजाऱ्याच्या आग्रहाखातर त्यानं ख्रिश्चन मिशनरी शाळेत पुढील शिक्षणास सुरुवात केली. खरंतर त्याच्यासाठी समाज

मान्य वर्तन असं होतं की,निमूटपणे रोजच्या डाळी-साळी आणि भाज्यांचा गोदामातला साठा किती आहे ते पाहायचं आणि कुटुंबाचा व्यवसाय चालवायचा. परंतु त्याऐवजी फुल्यांनी थॉमस पेने यांचं 'राइट्स ऑफ मॅन' आणि 'द एज ऑफ रिझन' ही पुस्तकं वाचली आणि त्यानंतर स्वतःचा मार्ग स्वतःच निर्माण केला.मग विवेकी लोकांच्या मनात तर्कामुळे जे प्रश्न निर्माण होतात, तेच गैरसोयीचे प्रश्न फुले समाजाला विचारू लागले.


आपण समजून घेतलेल्या संकल्पना आपल्या पत्नीला सांगणारे जोतिबा हे त्या काळातले 'असामान्य' पुरुषच म्हणावे लागतील. खरोखरच,त्यांनी आपल्या पत्नीला स्वतः शिकवलंच;पण ती घरापासून दूर अहमदनगर येथे शिक्षिकेच्या प्रशिक्षण अभ्यासक्रमाला गेली तेव्हाही तेच तिच्या पाठीशी उभे राहिले.१८४८ साली स्त्रीशिक्षणाकडे वळले,तेव्हा ते दोघेही विशीच्या आतबाहेर होते.

'मूर्खपणाच्या समजुती' म्हणून सनातनी लोकांनी केलेली आदळआपट त्यांनी कानाआड केली होती.ज्योतिबांनी नंतर एका सरकारी आयोगाला सांगितलं,"देशी म्हणता येईल अशी मुलींची शाळाच नव्हती, तेव्हा इथं.त्यामुळेच शाळा उभारण्याची प्रेरणा मला मिळाली, त्या शाळेत मी आणि माझी पत्नी कित्येक वर्ष  काम केलं." सुरुवातीला काही काळासाठी त्यांना सगळं काम थांबवावं लागलं असलं तरी लवकरच म्हणजे १८५१ साली त्यांनी एकच नव्हे;तर मुलींच्या तीन शाळा काढून ते पुन्हा कार्यरत झाले.त्यानंतर फुले यांनी परीक्षेसाठी चक्क २३७ मुलींना तयार केलं ही घटनाच एवढी सनसनाटी होती की,

अभ्यासक हरी नरके म्हणतात,"परीक्षेला जाणाऱ्या मुली पाहायला ३००० हून अधिक लोक जमले होते." 


१८५२ सालच्या उन्हाळ्यात एका वृत्तपत्र वार्ताहराने अहवाल दिला की,सरकारी शाळांत शिकणाऱ्या मुलग्यांपेक्षा जोतीरावांच्या शाळेत शिकणाऱ्या मुलींची संख्या दहा पट अधिक आहे.जर सरकारी शिक्षण मंडळाने आपल्या शाळांच्या निकृष्ट दर्जाविषयी काही केलं नाही तर लवकरच या मुली मुलांना शिक्षणात मागे टाकतील आणि त्यामुळे आपल्याला लाजेने माना खाली घालाव्या लागतील."


हे सगळंच क्रांतिकारकच होतं,परंतु जॉर्ज वॉशिंग्टन यांचेकडून प्रेरणा घेतलेल्या जोतीबांनी पुढे 'गुलामगिरी' हे महत्त्वाचं पुस्तक १८७३ साली लिहिलं आणि अमेरिकेतील गुलामगिरीची प्रथा नष्ट करणाऱ्या सज्जन अमेरिकनांना अर्पण केलं.त्यानंतर ते सावित्रीबाईंसह अस्पृश्यांसाठी शाळा काढण्याच्या कामी लागले.तेही अशा शहरात जिथं अगदी आत्ताआत्तापर्यंत ब्राह्मण पेशवे सरकारने फतवा काढला होता की अस्पृश्यांनी कमरेला झाडू बांधून फिरावं अन्यथा शहर विटाळेल.


अशा बंडखोरीचे परिणामही तसेच गंभीर होते. १८५३ सालच्या एका मुलाखतीत जोतिबांनी सांगितलं आहे की,त्यांच्या या अशा विवादास्पद कृत्यांमुळे त्यांच्या खुद्द वडिलांनीच त्यांना आणि त्यांच्या पत्नीला घराबाहेर काढलं होतं. सनातन्यांचा राग अगदी क्षुल्लक बाबींतूनही व्यक्त होत असे : उदाहरणार्थ,जोतिबांना एका सार्वजनिक सोहळ्यात शाल देऊन गौरवण्यात आलं तेव्हा बरेच लोक हटून बसले की माळ्याच्या पोराची असला मान स्वीकारण्याची योग्यता नाही.मग त्याची वैयक्तिक किंवा व्यावसायिक कामगिरी काहीही असो.एवढं होऊनही फुले दंपतीला लोकांकडून सातत्याने मान्यता मिळत होतीच.

'पुणे ऑब्झर्व्हर' आणि 'डेक्कन वीकली' या दोन वृत्तपत्रांनी नोंद केली,की त्यांचं काम " हिंदू संस्कृतीच्या इतिहासातील एका युगाची सुरुवातच आहे."


परंतु हे जोडपं लोकांकडून प्रशंसा मिळाली म्हणून तेवढ्यावरच थांबले नाहीत.बाँबे येथील सरकारकडून मानमरातब मिळाला तेव्हा जोतीबा केवळ पंचवीस वर्षांचे होते.त्यांनी जाहीर केलं की,एतद्देशीय स्त्रियांना शिक्षणाच्या देण्याच्या कार्यासाठी मी थोडंफार जे केलं आहे ते खूपच कमी आहे आणि प्रिय मायभूमीचा सुपुत्र या नात्याने माझे कर्तव्य मी केले तेही खूप अपुरेच आहे असं म्हणावं लागेल.शाश्वत बदल घडून येण्यासाठी खूपच अधिक ऊर्जा आणि धडाडी दाखवावी लागणार होती आणि सामाजिक रचना व भारतीय कुटुंबे यांच्यात सुधारणा घडवून आणायची,तर ती मुलींना अग्रक्रम देण्यानेच होऊ शकेल अशी फुले दंपतीची ठाम धारणा बनली होती.त्यामुळे मग ज्या ज्या सार्वजनिक उपक्रमात ते हजर राहत त्या व्यासपीठाचा वापर ते आपल्या बंडखोर विचारांचा प्रसार करण्यासाठी करू लागले.अर्थात आपले विचार मोठ्या प्रमाणावर प्रत्यक्षात आणण्यासाठी साधनांचं आणि पैशांचं पाठबळ त्यांच्यापाशी नव्हत.

उदाहरणार्थ,१८५३ साली त्यांनी ब्राह्मणी कर्मठपणा स्त्रीशिक्षणाच्या आड येतो म्हणून त्याच्यावर टीका करताना म्हटलं, "सनातनी ब्राह्मणांच्या मते स्त्रियांनी कायम आज्ञेतच राहिलं पाहिजे,त्यांना काहीही ज्ञान मिळता कामा नये, त्यांनी सुशिक्षित बनता कामा नये,

त्यांना धर्माविषयी काहीही माहिती असता कामा नये, त्यांनी पुरुषांसमवेत मिसळता कामा नये असं आहे.

त्यासाठी ते आपल्या जुन्या शास्त्रांचे दाखले देतात ज्यात स्त्रियांची खूपच नालस्ती केलेली असते आणि या मूर्खपणाच्या श्रद्धांना समर्थन देत ते विचारतात की,एवढ्या महान आणि विद्वान ऋषिमुनींनी लिहिलेली कुठलीही गोष्ट असत्य कशी असू शकेल ?'


पूर्णतया विरुद्ध बाजूने बोलणारे जोतिबा मुख्यत्वेकरून उच्च जातीय विरोधकांशी बौद्धिक पातळीवरही लढायला तयार होते.तसं करताना सडेतोडपणे स्वतःचा राग जराही न दडवता बोलायलाही ते मागेपुढे पाहत नव्हते.


जिला गावंढळ समजली जात होती,त्या गरिबांच्या बोलीभाषेवरील धूळ त्यांनी झटकली आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याच्या कहाण्या सांगितल्या.

शिवाजी महाराज कुणब्यांचे त्राते आणि दुर्बळांच्या हक्कांचे पुरस्कर्ते होते असं त्यांच चित्र त्यांनी त्यात रंगवलं होतं.त्यावर क्रुद्ध झालेल्या सनातन्यांनी दीर्घकालीन प्रचार केला की- नाही,शिवाजी महाराज हे पवित्र गाईचं आणि संस्कृतातल्या उच्च परंपरांचं संरक्षण करणारे होते.पण जोतिबांना त्याची पर्वा नव्हती,त्यांनी टीका चालूच ठेवली.

जेव्हा ब्राह्मणांनी दावा केला की आम्ही उच्च आहोत कारण आमचा जन्म ब्रह्मदेवाच्या मुखातून झाला आहे.

त्यावर जोतिबांनी विचारलं की तुमचा जन्म तिथून झाला होता,तर मग त्या जगन्निमार्त्याच्या पाळीचा स्रावही तिथूनच बाहेर पडला होता का? हा प्रश्न विचारल्यामुळे हादरलेल्या विरोधकांना त्यांनी मग डार्विनचा सिद्धान्त सांगितला होता.


जोतिबा पुरुष होते,शिवाय ब्रिटिशांशी जवळीक असलेले वजनदार असामीही होते त्यामुळे त्यांच्याऐवजी सावित्रीबाईंनाच सनातनी मंडळी लक्ष्य करू लागली.

शाळेत शिकवायला जाताना त्यांच्या अंगावर सनातनी शेणगोळे आणि दगड फेकायचे.परंतु जराही न विचलित होता त्या आपल्या पतीला आणि असंख्य लोकांना प्रेरणा देत राहिल्या.


एकदा पुण्याबाहेरील खेड्यात एक घटना घडली. तिथं एका अस्पृश्य मुलीला उच्च जातीय प्रियकरामुळे दिवस राहिले.तेव्हा त्या मुलाने घराण्याची बेअब्रू केली म्हणून आणि मुलीवर चवचालपणा आरोप ठेवून दोघांना दगडांनी ठेचून मारायचा विचार पुढे आला.तेवढ्यात सावित्रीबाई तिथं पोहोचल्या.त्यानंतर त्यांनी जोतिबांना लिहिलेल्या पत्रात आपण तो प्रसंग कसा टाळला ते लिहिलं." मी धावत धावत तिथं पोहोचले आणि या प्रेमिकांना अशा प्रकारे ठार मारण्याचे ब्रिटिश कायद्याखाली भयंकर परिणाम होतील अशी भीती घालून त्या जमावाला पळवून लावलं." साहजिकच,बरेच लोक कुरकुरू लागले की,जोतिबा पाश्चात्त्यांपुढे लोटांगण घालतात. वसाहतवादी कायद्यात मिळालेल्या नव्या स्वातंत्र्यावर त्यांचा फारच भरवसा आहे त्यामुळे ते देशाभिमान दाखवत नाहीत,त्यांची बायकोही त्यांच्या

सारखीच आहे.परंतु प्रत्यक्षात असं घडलं होतं की,फुले तेवढ्याच ताकदीने ब्रिटिशांनाही त्रस्त करून सोडत होते.


१८८८ साली ब्रिटिश अधिकाऱ्यांनी ड्युक ऑफ कनॉट,

प्रिन्स आर्थर यांच्या सन्मानार्थ आयोजित भोजन समारंभाचं आमंत्रण जोतिबांना दिलं. ते जोतिबांनी स्वीकारलं खरं पण तिथं शेतमजुराच्या पोशाखात जाऊन त्यांनी व्हिक्टोरियन मंडळींना थक्क करून सोडलं.एक फाटकी शाल हेच त्यांचं अंगावर ओढायचं एकमेव वस्त्र होतं.(इंग्लंडच्या राजाला भेटायला गांधीजी पंचा नेसून उघडेच गेले होते त्याआधीचा हा प्रसंग आहे.) मग त्यांनी त्या राणी व्हिक्टोरियापुत्राला प्रवचन द्यायला सुरुवात केली की,आजच्या सायंभोजनासाठी बोलावलेले अभ्यागत भारताचं प्रतिनिधित्व करतात असं कृपया समजू नका.ज्यांचा आवाजच दबला गेला आहे असे गरीब हेच या भूमीचे खरे प्रतिनिधी आहेत.


आणखी एके प्रसंगी स्थानिक नगरपालिकेने ठरवलं की,बाँबेच्या गव्हर्नरना हजार रुपयांची भलीमोठी भेट देऊन आपली निष्ठा दाखवायची. तेव्हा ३२ सदस्यांपैकी फक्त एकट्या जोतिबांनी त्या संकल्पनेला विरोध केला होता.ते म्हणाले होते की आणखी एका इंग्रजाचा मुळातच गर्वाने फुगलेला तोरा आणखी का वाढवायचा? त्यापेक्षा शिक्षणासारख्या अधिक उपयुक्त कामासाठी ते पैसे खर्च करता येतील.


भारतीय समाजातील दांभिकतेवर तीक्ष्ण कोरडे ओढत असतानाच भारतीय उच्च वर्गीयांना पाश्चात्त्य संस्थांमध्ये खास सुविधा देण्याच्या ब्रिटिशांच्या प्रवृत्तीमुळेही जोतिबा तेवढेच अस्वस्थ होत होते.ते विचारायचे, "आपल्या बांधवांना दारिद्र्यातून बाहेर काढण्यासाठी या अभिजनांनी असं काय योगदान दिलं आहे? ते सामान्य जनांशी कसे वागतात? त्यांच्याहून कमी सुदैवी किंवा कमी शाहण्या देशबांधवांसाठी शिकवण्यासाठी त्यांनी त्यांच्या घरात किंवा अन्यत्र शिकवण्याचे वर्ग सुरू केले होते का? त्यांनी तर त्यांचं ज्ञान स्वतःपुरतंच ठेवलं होत. जणू ती त्यांचीच मिरासदारी होती आणि अज्ञानी,

ओवळ्या लोकांशी संपर्क येऊन ती विटाळणारच होती.

त्यांनी सर्वसामान्यांच्या मनात ज्ञानाची ओढ निर्माण होईल याची आपल्याला आच आहे असं कुठल्याही प्रकारे दाखवलं होतं का? परोपकाराची फेड देशभक्तीने केली होती का? लोकांचे नैतिक आणि बौद्धिक कल्याण व्हायचं असेल तर उच्च वर्गाच्याच शिक्षणाचा दर्जा वाढवला पाहिजे असं कुठल्या आधारावर ठरवलं गेलं ? "


याचा अर्थ,अभिजनवर्गाला पटेल असंच धोरण इंग्रजांनी राबवलं होतं आणि अभिजनांनीही वाऱ्याचा रोख ओळखून पाश्चात्त्य शिक्षणाचा मार्ग धरून स्वतःचे हक्क सांभाळून ठेवले होते. परंतु स्वतःच्याच दुय्यम बांधवांनाही सक्षम केलं पाहिजे याबद्दल मात्र त्यांच्या मनात कसलीही तळमळ नव्हती.मागील काळात मोगल अथवा अन्य राजवटीत त्यांना मिळायचे,तसेच विशेषाधिकार शाबूत कसे राहतील याचीच काळजी त्यांना जास्त पडली होती.


सगळी शक्ती हिरावून घेणारा हृदयविकाराचा मोठा झटका आल्यानंतर काही वर्षांनी जोतिबांचं निधन झालं,तेव्हा बऱ्याच लोकांना वाटलं की,हे शुक्लकाष्ठ कायमचं गेलं.त्यांचं दहन झालं, प्रत्यक्षात त्यांना पुरण्याचा विधी हवा होता.तसं घडलं नाही तरी ज्येष्ठ मंडळींचा राग झेलून आणि रूढीपरंपरेचा भंग करून सावित्रीबाई आपल्या पतीच्या दहनाच्या वेळेस उपस्थित राहिल्या आणि त्यांनी त्यांच्या चितेला अग्नीही दिला.त्यानंतर सात वर्षांनी म्हणजे १८९७ सालची प्लेगची मोठी साथ येऊन गेली त्यानंतर सावित्रीबाईचं निधन झालं.मृत्यूपूर्वी त्यांना आर्थिक संकटं,तसंच अनेक वैयक्तिक आणि व्यावसायिक अडचणींना तोंड द्यावं लागलं;पण तरीही संपूर्ण पश्चिम भारत आणि त्याही पलीकडे सावित्रीबाईंची आठवण त्यांनी मागे ठेवलेल्या या जागृतीपर गीतातून अजूनही स्मरली जाते आहे.


" राज्यात बळीच्या आम्हास विद्या घडो,यशाचि अमुच्या दुंदुभी नगारे झडो,'इडा पीडा टळो', या कार्य भट ना पडो,असे गर्जुनी विद्या शिकण्या जागे होऊन झटा,

परंपरेच्या बेड्या तोडुनी शिकण्यासाठी उठा " 


गणिका,महात्मा आणि एक इटालियन ब्राह्मण,मनू एस.पिल्लई,अनु-सविता दामले,

मधुश्री पब्लिकेशन 


आणि खरंच,त्यात आश्चर्य वाटण्यासारखं काहीच नाही.कारण त्यानंतर पुण्याच्या फुले दांपत्यावर अक्षरश: शेकडो पुस्तकं लिहिली गेली आहेत. खरोखरच,या दांपत्याने दिलेल्या लढ्याचा भर केवळ राजकीयच नव्हता;तर पांरपरिक सामाजिक संरचनेत जे काही सडकं कुजकं होतं तेही उघड्यावर आणताना त्यांनी कसलीही क्षिती बाळगली नव्हती.खरोखरच त्यांनी भारतीय संस्कृतीच्या वर्मावरच बोट ठेवलं होतं-प्रश्न विचारण्याचं धाडस त्यांनी जे केलं,ते करण्याची त्यांच्या आधी किंवा नंतर कुणाचीही टाप नव्हती.

७/१०/२३

याला जीवन ऐसे नाव.. This is the name of life..



सॉक्रेटिसला काही तासांतच हेमलॉक विषाचा प्याला दिला जाणार होता.


शिष्यांबरोबर त्याची शेवटची भेट सुरू होती.क्रेटो

या शिष्याने त्याला विचारलं,गुरुवर्य, तुमच्यावर अंतिम संस्कार कसे करायचे? तुम्हाला पुरायचं की जाळायचं?


सॉक्रेटिस म्हणाला,अंतिम संस्कार? कसले अंतिम संस्कार? त्यात 'अंतिम' काय आहे? मला जे विष देतायत,

त्यांची अशी समजूत आहे की मी विष पिऊन मेलो की माझा अंत होईल? तुम्ही तर माझे शिष्य... तुमची अशी समजूत कशी झाली? लक्षात ठेवा,मला विष देणाऱ्यांची नावं कोणाच्या लक्षात राहणार नाहीत,पण,मी मात्र आणखी हजारो वर्षं मरणार नाही.


एका राजाच्या दरबारात एक सूफी फकीर आला.तो…

राजाला म्हणाला,तुझी काय आकांक्षा आहे?


राजा म्हणाला,सामान्य माणूस ज्याची आकांक्षा करतो,ते सगळं माझ्यापाशी आधीपासूनच आहे,भरपूर आहे.तुम्ही मला असं काहीतरी द्या,जे परम कसोटीच्या क्षणी उपयोगी पडेल.


फकिराने एका कागदावर काहीतरी लिहिलं आणि तो कागद एका अंगठीत बंद केला.ती अंगठी राजाकडे दिली आणि म्हणाला,जेव्हा कोणताही मार्ग उरणार नाही,सर्व बाजू बंद होतील,हाच परम कसोटीचा क्षण आहे,अशी खात्री होईल,त्या वेळीच ही अंगठी उघड.


आणि लवकरच राजाच्या दुर्दैवाने हा प्रसंग आला.


शेजारच्या राजाने बेसावध क्षणी आक्रमण केलं आणि त्याचं सैन्य राजधानीपर्यंत पोहोचलं.राजाला राजवाड्यातून पळ काढावा लागला.शत्रुसैन्याची एक तुकडी त्याच्या पाठलागावर होती.राजा घोडा दौडवत डोंगरदऱ्यांतून एका कड्याच्या टोकावर पोहोचला.येणारी एकच वाट. त्यावर कोणत्याही क्षणी येण्याच्या तयारीत शत्रू. दुसरीकडे एक दुर्गम कडा.


राजाने अंगठी उघडली.कागदावर लिहिलं होतं,

हेही निघून जाईल.


घोड्यांच्या टापा जवळ येतायत…थेट प्राणांवरचं संकट,

आता कसं निघून जाईल,कसं टळेल,असं कसं लिहिलंय या कागदावर,अशा विचारांत असतानाच राजाचा पाय निसटला आणि तो दरीत कोसळला.


राजाचा घोडा स्वाराविना पाहून शत्रुसैन्याला राजाचा अंत ओढवल्याचं लक्षात आलं आणि विकट हास्य करत ते निघून गेले…


… कड्याच्या टोकाला एका झुडपाच्या आधाराने लटकत असलेला राजा वर आला.त्याने लपत छपत जवळचं गाव गाठलं. राजा मरण पावला,असं समजून इतस्तत:पांगलेले त्याचे सैनिक पुन्हा एकत्र आले.त्यांनी नव्या ताकदीने शत्रूवर हल्ला चढवला आणि आक्रमण परतवून लावलं.

शत्रूला धडा शिकवला.


राजाची हत्तीवरून मिरवणूक निघाली.जल्लोष. विजयाची धुंदी,ढोलताशांचा कडकडाट,ऐश्वर्याचं,वैभवाचं प्रदर्शन,

चकचकाट,लखलखाट,जयजयकार आनंदाचे चीत्कार… 


राजाने पुन्हा अंगठी काढली.पुन्हा वाचलं,हेही निघून जाईल.


त्या क्षणी तो आतल्या आत स्थिरावला आणि हसला..आता तो राजा होताच,पण, संन्यस्त राजा.


'अनामिक' जसं माझ्यापर्यंत आलं होत तसं आपल्यापर्यंत स्वगत पोहोच केले आहे.


पुढील भागात.. फुले दांपत्य आणि त्यांचा लढा..

५/१०/२३

टायटॅनिक अपघात की आणखी ..? Titanic accident or something ..?

आता बोटीने आपला शेवटचा प्राणांतिक सूर मारला.

तडफडत ती समुद्रात काटकोनात उभी राहू लागली.अखेर तिच्यावरच्या रंगीबेरंगी प्रखर दिव्यांची एक शेवटची उघडझाप झाली. सगळीकडे डोळ्यात काजळ ओतणारा काळोख पसरला.आता सर्वत्र किंकाळ्या-आरोळ्यांनी थैमान मांडले.इतके जीवन मृत्यूचे भयाण तांडव सुरू असतानाही त्या भोवतालच्या निर्मम निसर्गावर साधा ओरखडाही उठत नव्हता.आता हळूहळू सारेच विकल,शांत होऊ लागले.


हेलकावे खात जिवंतपणाच्या साऱ्या खुणा पुसून टाकीत आता टायटॅनिक सागरतळाशी विसावली.ही बोट बुडणारी नाही,अशी उद्दाम घमेंडसुद्धा तिच्या बरोबरच तळाला गेली. तिच्यासोबत फेडरल बँकेला विरोध करणारे बेंजामिन गुग्गेनहेम,इसीडोर स्टोउस आणि जॉन जेकब अ‍ॅस्टर हे अमेरिकन आर्थिक जगतातले अनभिषिक्त सम्राटही संपले.त्यांच्या जाण्यासाठी तर १४०० लोकांना (ज्यात बेलफास्टचे शेकडो प्रोटेस्टंट्स होतेच) मृत्यू आला नाही ना? त्यांच्या जाण्याची तर ही तयारी नव्हती?


शतकापूर्वी घडलेला हा एकमेव भयानक अपघात,पण तो अपघात नसून घातपात असण्याची दाट शंका रेंगाळावी असे काही अनुत्तरित प्रश्न आहेत..


१.जे पी मॉर्गन एकाचवेळी आंतरराष्ट्रीय मर्कंटाइल मरीन व्यवसायप्रमुख,टायटॅनिक आणि फेडरल रिझर्वचा मालक असणे हा योगायोग वेगळे संकेत देतो..


२.या लायनरचा मालक जे पी मॉर्गनने पहिला प्रवास करायचा म्हणून स्वतःसाठी या बोटीवर मुद्दाम खाजगी प्रासाद आणि स्वतंत्र डेक बांधला होता.मात्र १० एप्रिलला त्याने अचानक त्याचे प्रवासाचे तिकीट रद्द केले आणि तो बायकोबरोबर फ्रान्समधल्या एका बेटावर विश्रांतीसाठी निघून गेला.हा काय केवळ योगायोग ?


३.जे. पी. मॉर्गनने प्रवास रद्द करण्यासाठी जरी आपल्या आजाराचे कारण दिले,तरी दोन दिवसांनी तो फ्रान्समध्ये ठणठणीत असलेला लोकांनी पहिला.


४.जे पी मॉर्गनप्रमाणेच 'व्हाईट स्टारलाईनर' या शिपिंग कंपनीचा सीइओ जोसेफ ब्रूस इस्मे आणि त्याची बायको ज्युलिया आणि मुले वेल्समध्ये सुट्टीचा आनंद घेताना दिसले.


५.जे. पी. मॉर्गनने साउथहॅम्प्टनहून बोट सुटण्याआधी

,तिच्यावरील महागडे ब्राँझचे सात पुतळे उतरवून घेतल्याची नोंद आहे.


६.जे. पी. मॉर्गनचा जवळचा मित्र मिल्टन हेर्सेने पण आपले तिकीट अचानक कॅन्सल केले.अमेरिकेतील हेर्से फूड साम्राज्याचा हाच मालक.


७.धातू हा बर्फापेक्षा कठीण असतो.बर्फ कठीण असता तर त्याच्याच बोटी बनवल्या असत्या. दुसरे बर्फ ही तरंगणारी वस्तू आहे,मग ती बोटीचा तळ एखाद्या कलिंगडासारखा कसा काय कापून काढेल?


८.आईसबर्ग असण्याची माहिती नसणारा कप्तान स्मिथ तर नव्हता.त्याला अटलांटिकची खडान् खडा माहिती होती.यानंतर आईसबर्ग असण्याचे अनेक इशारे त्याच्या ऑफिसर्सकडून त्याला मिळाले होते.मग त्याने त्याकडे दुर्लक्ष का केले ?


९.प्रचंड आईसबर्ग दिसत असतानाही,व्हाईट स्टार

लाईनरचा सीइओ जोसेफ ब्रूस इस्मेने कप्तानाला बोट फुलस्पीडला (२२ नॉट) आदेश देण्याचे कारण काय? इथे नोंद घेण्याजोगे म्हणजे,हा ब्रूस इस्मे मात्र या अपघातातून बचावला.


१०.बोटीवर पुरेशा लाईफ बोटी नव्हत्या.कारण?


११.बोटीने मुळात नसलेला मार्ग का घेतला? कोणाच्या सांगण्यावरून ?


१२.बोटीवरचा एकही क्रू मेंबर का वाचला नाही?


१३.कधीही न बुडणारे असे तंत्रज्ञान असणारी बोट तिच्या पहिल्याच प्रवासात बुडणे हे जरा चमत्कारिक आहे.'न बुडणारे' अशी जाहिरात करण्यामागे असणाऱ्या तांत्रिक कारणात या बोटीला सोळा वॉटरटाईट कंपार्टमेंटस होते,

पण त्यांची उंची मात्र पुरेशी ठेवली गेली नव्हती.याचे दिलेले कारण हास्यास्पद आहे कारण व्हाईट स्टार

लाईनला आपल्या पहिल्या वर्गाच्या जागा म्हणे कमी करायच्या नव्हत्या ?


१४.या बोटीवर सगळ्या विविध भागांना जोडणारे तीस लाख रिव्हेटस् होते,यातले काही रिव्हेटस् नंतर समुद्राच्या तळातून आणून त्यांचे निरीक्षण केले गेले,तेव्हा असे नोंदले गेले आहे की,ते अत्यंत दुय्यम दर्जाचे होते.बोटीने आईसबर्गला धडक दिली तेव्हा बाहेरच्या रिव्हेटसचे डोके तुटले (हे कधीही घडत नाही) आणि टायटॅनिकचे बाह्यभाग तातडीने एकमेकांपासून विलग होऊ लागले.

अत्यंत उच्च दर्जाचे रिव्हेटस् वापरले असते तर बोट बुडाली नसती.


१५.पत्रकार सिनान मोलोनी असा संशय व्यक्त करतो की,ज्या पद्धतीने टायटॅनिक आईसबर्गवर आदळल्यावर तिच्या वक्रभागाच्या कडेवरच फाटत गेली;त्या अर्थी आधी तिच्या त्या भागात तिच्यात कुठेतरी कोळशाने पेट घेतला असावा.आणि हे तिचा प्रवास सुरू होण्याआधी घडल्याची दाट शक्यता आहे.या घातपाती आगीने तिचा सांगाडा जोड असण्याच्या ठिकाणी मुद्दाम तकलादू करण्यात आला असावा.


१६.टायटॅनिकच्या दोन बहिणी होत्या.त्यांची नावे आरएमएस ऑलिम्पिक आणि एचएमएचएस ब्रिटानिका.

यापैकी ब्रिटानिका १९९६ ला एजियन समुद्रात बुडाली.

मनुष्यहानी तीस.दुसरी आर. एम. एस. ऑलिम्पिक,जी जुनी आणि एक अपघात झालेली शिप होती.ज्या अपघाताची कोणतीही भरपाई विमा कंपनीने व्हाईटस्टार लाईन शिपिंग कंपनीला दिली नव्हती.त्यामुळे तिला बुडवून टायटॅनिक बुडाली असे जाहीर करणे,हे एक विमावसुलीचे कारस्थान होते असेही सांगितले आहे.याचा पुरावा म्हणून,पुढे १९३५ साली आर. एम. एस. ऑलिम्पिक (जी मुळात टायटॅनिक असणार होती) सेवेतून निवृत्त केली गेली आणि तिला तोडण्याच्या वेळी जे वुडपॅड 'नेलींग व्हाईट स्वान' हॉटेलला विकले गेले,त्या पॅनेलच्या फ्रेमवर सर्वत्र '४०१' असा नंबर होता.आणि हाच बेलफास्टमध्ये बोट बांधणीच्या वेळी टायटॅनिकच्या भागांना दिला होता.ऑलिम्पिकच्या सर्व भागांना ४०० हा नंबर होता.याचा अर्थ ह्या बोटींची नावे बदलली गेली कारण अदलाबदली लक्षात येऊ नये ? याला दुजोरा देणारी अजून एक गोष्ट अशी की,जेव्हा ही टायटॅनिकची जाहिरात केली जात होती, तेव्हा वापरलेली अंतर्भागाची सजावटीची सर्व छायाचित्रे ही ऑलिम्पिकची होती.

जगभरच्या लोकांनी तर टायटॅनिकच्या मेडन प्रवासाला पैसे मोजले होते,ऑलिम्पिकच्या नव्हे! यामुळे काही लोकांची अशी दृढ समजूत आहे की,जी टायटॅनिक म्हणून बुडाली ती खरंतर ऑलिम्पिकच होती.अजून एक भाग असा की, याच ऑलिम्पिकचा २० सप्टेंबर १९११रोजी वीटच्या किनाऱ्यावर (isle of Wight) जो अपघात झाला होता.त्या अपघातादरम्यान ती एचएमएस हॉक नावाच्या बोटीवर आदळली होती.. तिचे एकंदर अपघात खर्चाचे बिल आणि इतर विम्याच्या न मिळणाऱ्या कव्हरेजने मोठ्या आर्थिक संकटाना सामोरे जावे लागणार होते. यावेळी टायटॅनिकच्या बांधणीला सुरुवात होणार होती.आता मॉर्गनने नुकतीच विकत घेतलेली व्हाईट स्टार लाईन शिपिंग कंपनी,समोर उभा येऊन ठाकलेला ऑलिम्पिकचा हा खर्च,शिवाय ऑलिम्पिक बंद असल्याने होणारे उत्पन्नाचे नुकसान आणि शिवाय अवाढव्य टायटॅनिकची बांधणी हे सर्व आर्थिकदृष्ट्या झेपणारे गणित नव्हते.यावर एक नामी उपाय म्हणून एक योजना आखली गेली.योजना कुटिल असणे सुसंगत होते कारण आता 'व्हाईट स्टार लाईन'चा मालक होता जे पी मॉर्गन! त्याच्या आर्थिक नफ्याच्या गणितांनी एक मोठ्ठा डाव टाकला.

आरएमएस ऑलिम्पिकलाच नवीन टायटॅनिक म्हणून समोर आणा,तिची डोळ्यांचे पारणे फेडणारी,अशक्य अशी लालसा निर्माण करणारी जागतिक जाहिरात करा.लोकांना तिच्या मेडन प्रवासाची भुरळ पाडा.तिचा शक्य तितका मजबूत विमा करा आणि मग ती बुडवून आपला सगळा तोटा भरून काढा.


अगदी सुरुवातीला ही गुप्त खलबते झालेली चौकडी म्हणजे जे पी मॉर्गन,जे ब्रूस इस्मे,लॉर्ड पिरी आणि थॉमस अँड्र्यूज.दोन्ही बोटींच्या नेमप्लेट आणि नंबरवर लक्ष नसणाऱ्यांना हे काहीच कळले नसतेएकदा प्लान ठरला आणि मग यानंतर तातडीने हालचाली सुरू झाल्या. ऑलिम्पिकचे रूपडे पालटू लागले.तिच्यावर असणाऱ्या अनंत प्रवाशांच्या पाऊलखुणा आणि सांडलेल्या विविध द्रव्याचे डाग असणाऱ्या जुन्या लाकडी फ़्लोरिंगवर तातडीने महागडी कार्पेट्स टाकण्यात आली.

टायटॅनिकच्या बी डेकवर तोपर्यंत बांधलेल्या केबिन्स तातडीने ऑलिम्पिकच्या प्रोमोनेडवर लावण्यात आल्या. ऑलिम्पिकचे रूपडे नवे कोरे वाटावे यासाठी सगळ्या गोष्टी नीट आखल्या गेल्या.


एक फरक नंतर उघडकीस आला.तो म्हणजे ऑलिम्पिकच्या सी डेकवर असणारे पोर्ट होल्स! जेव्हा टायटॅनिकची बांधणी सुरू असताना छायाचित्रे घेतली होती,तेव्हा तिथे समान असे चौदा पोर्ट होल्स दिसले होते,पण जेव्हा तिने साउथहॅम्पटन सोडले त्यावेळेच्या छायाचित्रात मात्र सोळा असमान असे पोर्ट होल्स तिच्यावर दिसतात.


हा सगळा तपशील रॉबिन गार्डीनरच्या "The Ship Never Sink' या पुस्तकात आहे.


अजून एक न झालेली रहस्यमय उकल - जे. पी. मॉर्गन आणि टायटॅनिक आपण जे. पी. मॉर्गन आणि जॉन जेकब अ‍ॅस्टर यांच्या संबंधांचे अजून एक परिमाण पाहू.त्याकाळी एक निकोला टेस्ला नावाचा एक कुशाग्र संशोधक होता.(अजूनही टेस्ला नावाची वीज पुरविणारी आणि इलेक्ट्रिक कार्स बनविणारीही कंपनी आहे) त्याच्याकडे मॉर्गन आणि अ‍ॅस्टर दोघांनीही आपले पैसे गुंतविले होते.मॉर्गनचा हेतू त्याच्या बुद्धिमत्तेवर पैसा मिळविणे हा होता.मात्र अ‍ॅस्टर आणि टेस्ला जानी दोस्त होते.टेस्ला करीत असलेल्या एका महत्त्वाच्या संशोधनात पैसा कमी पडला असे अ‍ॅस्टरला कळले आणि त्याने तातडीने त्याला त्याकाळी ३०,००० डॉलर्स दिले.कशासाठी? तर टेस्लाने असे तंत्रज्ञान विकसित केले,ज्यामुळे वीज उत्सर्जित होईल आणि लोक आपल्या घरापाशी रीसिविंग पोल उभारून ती फुकट घेऊ शकतील.त्याने लाँग आयलंडवर प्रायोगिक तत्त्वावर एक असा टॉवर उभारला आणि मॉर्गन आणि अ‍ॅस्टरला नव्या संशोधनाबद्दल सांगितले. मॉर्गनसारख्या अमेरिकेत वीजपुरवठ्याचे काम करणाऱ्या एका कॉर्पोरेट माफियाला हे कसे झेपणार? मग विजेतून मिळणाऱ्या अमाप नफ्याचे काय ?अ‍ॅस्टरने मात्र टेस्लाला, "गो अहेड,लागेल तितका पैसा देतो." असे सांगितले.


आता एकीकडे फेडरल रिझर्व्हला,बेंजामिन गुग्गेनहेम, इसीडोर स्ट्रोउस आणि जॉन जेकब अ‍ॅस्टर यांचा विरोध वाढत चालला होता, दुसरीकडे स्ट्रोउस टेस्लाचे हे प्रकरण आणि व्हाईट स्टार लाईनरचा मालक जे. पी. मॉर्गन असणे, हे तीन मुद्दे केवळ योगायोग आहेत की या मुद्यातून एक सूत्र सामोरे येते ? बघूया.


● हे तीन अमेरिकन आर्थिक मातब्बर आणि त्यांची लोकप्रियता ही फेडरल रिझर्व्हची निर्मिती आणि अनेक नफेखोर ऊर्जा प्रकल्पात मोठा अडसर होती.या तिघांनी अत्यंत तगडी अशी राजकीय ताकद त्या विरोधात उभी केली असती कारण यातला इसीडोर हा थेट अमेरिकन काँग्रेसचा सदस्य होता. ते एकदा गेले की मग या बँकेच्या स्थापनेला लोकविरोध नसणार आणि झालेही तसेच.२३ डिसेंबर १९१३ ला कुप्रसिद्ध फेडरल बँक अस्तित्वात आली. ● टेस्लाचा जिवलग मित्र गेला आणि मग त्याचे सारे संशोधन पैशाअभावी थांबले.


पण या तिघांना मॉर्गनने गोळ्या का घातल्या नाहीत.

एक अख्खी बोट बुडवायचे काय कारण? पण खून झाला असता तर नक्कीच त्याची सखोल चौकशी झाली असती.

टेस्ला,इतर अनेक अमेरिकन उद्योगपती आणि या तिघांवर प्रेम करणाऱ्या असंख्य अमेरिकन नागरिकांनी मोठ्ठा गोंधळ घातला असता आणि त्यामुळे,पुढे अनेक वर्षे याच विषयावर चर्चा सुरू राहिली असती. बुडालेल्या बोटी

सोबत हे सारेच शांत,नीरवपणे संपले.मॉर्गनला हे सारे बुडतील;लाईफ बोटीने वाचवले जाणार नाहीत असे कसे वाटले? कदाचित मॉर्गनला यांच्या नैतिकतेची खात्री असावी.या तिघांनाही लाईफ बोटीवर जायची विनंती करण्यात आली होती,पण बोटीवरील प्रत्येक स्त्री आणि लहान मूल गेल्याशिवाय यांनी जाण्याचे नाकारले.

अ‍ॅस्टरच्या वाचलेल्या बायकोने ह्याचे अत्यंत हळवे असे वर्णन केले आहे.


महायुद्धाशिवायचे हे या शतकातले सगळ्यात मोठे कारस्थान.या घटनेचे कारण रोमन कॅथॉलिक चर्चचे आदेश की आर्थिक सूत्रधारांचे डावपेच ? का दोन्हीही? या मागे कोणीही असो पण असल्याच कोणत्यातरी बुरख्या

आडून केलेले हे या शतकातले पहिले दहशतवादी कृत्य!


ज्याने अमेरिकन लोकांच्या आर्थिक स्वातंत्र्यावर गदा आणणाऱ्या फेडरल रिझर्व्ह सिस्टीमला प्राणपणाने विरोध केला,त्या अब्राहम लिंकनच्याच मृत्यूदिनी, (१४ एप्रिल) ज्यावेळी टायटॅनिक बोट अटलांटिक

मधील त्या अवाढव्य बर्फखंडावर आपटून फुटली आणि त्याच वेळी 'फेडरल रिझर्व्ह'ला निर्माण होऊ शकणारा तो विरोधही कायमचा संपला.


अमेरिकेच्या फेडरल बँकेचा तत्कालीन चेअरमन बर्नार्के ५ आणि ६ नोव्हेंबर २०१० रोजी,जॅकील बेटांवर जाऊन त्या फेडरल रिझर्व्हच्या स्थापनेची आठवण मनात जपून आला,त्याचवेळी टायटॅनिक सागरतळाशी विसावून शतक उलटायला आले होते,पण इतक्या कालखंडानंतरही तिची नष्ट होण्याची अज्ञात रहस्ये,तिची मती गुंगविणारी कहाणी यांचे गारूड मात्र अद्यापही कायम आहे.तिच्या अजस्त्र देहासोबतच तिचे सत्य मात्र कायमचे अटलांटिकच्या निर्मम समुद्रात १२,५०० फूट खोल तळाशी,काळाच्या कराल पाण्यात बुडून गेले आहे.


या लायनरचा मालक जे. पी. मॉर्गन ३१ मार्च १९९३ ला सेंट रेगीस,रोम या कॅथलिक परगाण्यात मरण पावला.

म्हणजे टायटॅनिक बुडाल्यानंतर जवळपास एक वर्षाने आणि फेडरल रिझर्व्ह स्थापन होण्याच्या आधी नऊ महिने.ज्याने या दोन्ही कारस्थानात महत्त्वाची भूमिका बजावली,त्याचा मृत्यू या दोन घटनांच्या आगेमागे व्हावा हा एक काव्यगत न्याय !


जाता जाता - १८८६ मध्ये ख्यातनाम ब्रिटिश लेखक विल्यम टी. स्टेडने एक कथा लिहिली, तिचे शीर्षक होते.


'How the Atlantic mail steamer went down?' यातील तपशील आणि टायटॅनिकची दुर्दैवी कहाणी यांचे अनेक धागे आश्चर्यकारकरित्या जुळतात.जणू त्या पुस्तकाला स्मरून ती बुडविली असे वाटत राहते,पण त्यावरही कडी करणारा,अजून एक थरारक भाग असा की,हाच विल्यम स्टेड टायटॅनिकवरचा एक दुर्दैवी प्रवासी होता.स्टेड या घटनेत मरण पावला,पण त्याच्या द्रष्टेपणाला मात्र टायटॅनिकने कायमचे अमर केले आहे.


दिनांक ०३.१०.२३ लेखातील शेवटचा भाग..

संपूर्ण..

३/१०/२३

टायटॅनिक अपघात की आणखी काही..? Titanic accident or something else..?


" पाण्यात बुडून जाण्याचा आवाज मीच तुम्हाला वर्णन करून सांगू शकते,इतर कोणीही नाही.तो अत्यंत भयप्रद असा आवाज आहे आणि त्यापाठोपाठ नेहमीच एक भयचकित करणारी शांतता असते."

Ms. Eva Hart, Titanic survivor


" ती एक अत्यंत काळीभोर रात्र होती. आकाशात चंद्र नव्हताच.निरीक्षणे करायला लागणारे एकमेव असे बायनोक्युलर्स आम्ही साउथहॅम्प्टनला ठेवून आलो होतो."


टायटॅनिक पहाऱ्यावरील Reginald Fleet चे अमेरिकन सिनेटच्या चौकशीतील विधान.


नोंद क्रमांक १,सन १९०९ - नुकतीच आणि अचानक 'व्हाईट स्टार लाईन' नावाची शिपिंग कंपनी,अमेरिकेचा रेलरोड सम्राट जे. पी. मॉर्गनने ताब्यात घेतली होती.ह्या व्यवहारामागची कारणे अज्ञात असली तरी मॉर्गन हा प्रथितयश,यशस्वी व्यावसायिक होता.ही जी व्हाईट स्टारलाईन शिपिंग कंपनी होती,ती प्रचंड तोट्यात होती. तिच्याकडे एक मोठे प्रवासी जहाज होते.त्याचे नाव RMS Olympic,जे सतत दुरुस्तीसाठी डॉकयार्डमध्ये पडून असे.हा एक पांढरा हत्ती होता आणि त्यामुळे मॉर्गनने ही कंपनी घेतली, तेव्हा तो त्याच्या उत्कृष्ट व्यावसायिक कौशल्याने ही कंपनी रुळावर आणेल असेच सगळ्यांना वाटले आणि झालेही तसेच.मॉर्गनने या व्यवहारानंतर अजिबात वेळ दवडला नाही.जणू काही ती खरेदी पुढे घडून येणाऱ्या एका प्रत्ययकारी मोठ्या हालचालीचा एक टप्पा होती. त्याने तातडीने आयर्लंडच्या बेलफास्टच्या देखण्या शिपयार्डमध्ये १९०९ साली व्हाईट स्टारलाईन्सचे एक मोठे प्रवासी जहाज बांधायला घेतले इथे हे सांगितले पाहिजे की, बेलफास्ट हे गाव प्रोटेस्टंट*

(प्रोटेस्टंट हा पंथ कॅथलिक ख्रिश्चनांच्या कर्मठपणाला कंटाळून त्यात सुधारणा करणाऱ्यांची चळवळ होती. कॅथलिक चर्चने त्याला अतिशय हिंसक पद्धतीने सतत विरोध केला.) लोकांचे.


नोंद क्रमांक २,सन १९९१० - जॉर्जियाचा निसर्गरम्य किनारा.त्या ऊबदार किनाऱ्यावरच्या अनेक छोट्या बेटांपैकी एक शांत आणि निर्जन बेट,जॅकील आयलंड.

नोव्हेंबरचा महिना हा खरे तर पानगळ झालेला ऋतू,शुष्क झाडांचा आणि विषण्ण वाऱ्याचा! पण या बेटावर मात्र त्याचा अजिबात मागमूस नव्हता.इथले वातावरण ऊबदार झालेले.इथे अमेरिकेच्या आर्थिक जगातली सात अत्यंत निवडक महत्त्वाची माणसे अमेरिकेत येऊ घातलेल्या मध्यवर्ती बँकेची काही गुप्त गंभीर खलबते करण्यसाठी जमली होती.सतत काळाच्या पुढे आणि नफ्याच्या मागे धावणारी ही मंडळी,तब्बल सात दिवस,ह्या नव्या आर्थिक सत्तेच्या चर्चेत आणि शक्यतांच्या समीकरणात खोलवर आणि गहनपणे बुडाली होती.शेवटी एक मसुदा घेऊन त्या हिशेबी,धोरणी माणसांचा ताफा न्यूयॉर्कला परतला.


नोंद क्रमांक ३,जानेवारी १९११ - नवीन वर्ष उंबरठ्यावर,अमेरिका गारठलेली.ख्रिसमसच्या थंडीची गंमत आता संपली होती आणि उरले होते ते केवळ अंग ठणकावून टाकणारे गार वारे. ह्या कडक थंडीत मात्र न्यूयॉर्कच्या एखाद्या धातूसारख्या थंडगार इमारतीत उंचीवर असणाऱ्या अर्थसत्तांच्या मजल्यांवर मात्र वातावरण पेटले होते.न्यूयॉर्कचा नव्हे तर संपूर्ण अमेरिकेचा आर्थिक लगाम आपल्या विवेकी हातात ठेवणाऱ्या त्या तीन धनाढ्य माणसांना अमेरिकेत होऊ घातलेली मध्यवर्ती बँक अजिबात मान्य नव्हती.ही बँक लोकांच्या स्वातंत्र्यावर कायमची गदा आणेल असे त्यांचे मत होते आणि ते त्यांच्या तापलेल्या स्वरातून व्यक्त होत होते. यातला एक होता बेंजामिन गुग्गेनहेम. हा अमेरिकन आणि जर्मन नागरिक. वंशाने ज्यू. गर्भश्रीमंत.


अमेरिकेतील खाण उद्योगसम्राट असणाऱ्या गुग्गेनहेम कुटुंबातला.याचे टोपण नावच मुळी सिल्वर प्रिन्स.दुसरा होता इसीडोर स्ट्रोउस.हा सुद्धा जर्मन- अमेरिकन नागरिक.वंश ज्यू. अमेरिकेन काँग्रेसमन.अत्यंत धनाढ्य माणूस. याचा पक्ष 'डेमोक्रेटिक'. 'मेसीज' या जगप्रसिद्ध डिपार्टमेंटल स्टोअरचा मालक. तिसरा होता जॉन जेकब अ‍ॅस्टर.हा सुद्धा जर्मन-अमेरिकन. अमेरिकेतल्या पहिले दशलक्षाधीश असणाऱ्या अ‍ॅस्टर कुटुंबातला.हा अमेरिकेतला पहिला व्यापार-सम्राट.याने अमेरिकेतला पहिला ट्रस्ट सुरू केला.ह्या तीनही माणसांनी त्या जॅकील बेटावर इतक्या गंभीरपणे आणि मेहनतीने तयार केलेल्या मध्यवर्ती बँकेच्या मसुद्याला धुडकावून लावले.हे तिघेही अमेरिकेतले कमालीचे धनाढ्य आणि जगातील काही मोजक्या गर्भश्रीमंत लोकांपैकी एक.ह्यांच्या श्रीमंतीचा आणि नैतीकतेचा दबदबा दूरवर पसरलेला.संपूर्ण नैतिकतेने व्यवसाय करीत अमेरिकन समाजाचे भले केलेली,आपल्या संपत्तीचा दबाव चांगल्या गोष्टींसाठी वापरणारी ही माणसे;त्यामुळे यांच्या नकाराला अमेरिकेच्या अर्थवर्तुळात एक उच्च दर्जा आणि मजबूत महत्त्व.यांचा नकार म्हणजे जणू अमेरिकन अर्थविश्वाला दिला जाणारा व्हेटोच..!


नोंद क्रमांक ४,सन १९११ - बेलफास्टमध्ये नवीन आलिशान बोट बांधून तयार होत आलेली. जे. पी. मॉर्गनच्या व्यवसायनिष्ठेचा हा एक पुरावा.त्यापूर्वी कोणीही बांधली नसेल आणि कोणीही स्वप्नात बघितली नसेल अशी ही आलिशान बोट.समुद्रावर तरंगणारा प्रचंड भव्य राजवाडाच जणू.'कधीही न बुडणारी जगातील एकमेव बोट' अशी तिची जाहिरात सगळ्या जगभरच्या वर्तमानपत्रात झळकत होती.तिचा पहिला मेडनप्रवासही घोषित झाला.त्याची जाहिरातबाजी सुरू झाली आणि तिने जगभरच्या श्रीमंत आणि प्रतिष्ठित माणसांच्या मनाचा ठाव घेतला.तिच्यातला पहिला प्रवासी होण्याची त्या लोकांची अधीर लगबग सुरू झालेली.त्या आलिशान बोटीच्या प्रवासाचा दिवस ठरला,१२ एप्रिल १९१२.या सगळ्या प्रवासाला अजून एक वैयक्तिक टच देताना जॉन पियर पौट मॉर्गनने जगभरच्या प्रतिष्ठित लोकांना खास वैयक्तिक आमंत्रणे द्यायला सुरुवात केली. प्रवास सुरू होणार होता,इंग्लंडमधील साउथहॅम्पटन डॉकपासून संपणार होता लुभावणाऱ्या लालसी न्यूयॉर्कच्या किनाऱ्यावर. एक देखणी प्रशस्त बोट,अत्यंत शाही प्रवासी मार्ग आणि जगभरच्या मातब्बर लोकांना स्वत: जॉन पिएरपोट मॉर्गनने दिलेली आमंत्रणे स्वतः मॉर्गनने मालक असून या प्रवासाचे तिकीट काढलेले.साहजिकच बेंजामिन गुग्गेनहेम, इसीडोर स्टोउस आणि जॉन जेकब अ‍ॅस्टर या मान्यवरांना त्याकाळातली इतक्या आलिशान आणि इतक्या प्रतिष्ठित प्रवासाची भुरळ न पडती तरच नवल.हे तिघेही त्या प्रवासाला तयार झालेले आणि त्या बातमीने या मेडन प्रवासाला जगभर एक वेगळीच उंची आणि झळाळी दिलेली !


बोटीचा कप्तान एडवर्ड स्मिथ.हा कप्तान उत्तर अटलांटिक समुद्राच्या लाटांवर जवळपास सव्वीस वर्षे सहज स्वार झालेला माणूस.त्या नुसत्या स्पर्शाने अंगभर शहारा आणणाऱ्या थंडगार शांत पाण्यातला तो माहितगार असामी. त्याची नजर अटलांटिकच्या लाटांवर वृद्ध झालेली.याचा अजून एक परिचय म्हणजे हा ज्येसूट.

ज्येसूटस् रोमन कॅथलिकातले अत्यंत कडवे म्हणून प्रसिद्ध.कडवे आणि मर्मभेदी.असे का तर,ज्येसूटचे तत्त्वज्ञान म्हणजे पवित्रतेचे तत्त्वज्ञान.अत्यंत उच्च चांगल्या गोष्टीसाठी प्रसंगी नरसंहार झाला तरी तो मान्य.कारण ज्याचा शेवट पवित्र त्याचे सगळेच मार्गही शुचितेचे.जे पी मॉर्गन हाही ज्येसूटच.त्याचा पगारी नोकर असणारा कप्तान स्मिथ सुद्धा ज्येसूट.या ज्येसूट लोकांचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे ते मालकाची आज्ञा शतश: पाळणारे.त्यांचा मालक म्हणजे त्यांचा परमेश्वरच.या पंथाची शिकवणच अशी.तर आपल्या कप्तान स्मिथचा ज्येसूट मालक - गुरु म्हणजे फ्रान्सिस ब्राऊनी.हा आयर्लंडचा अगदी सुप्रसिद्ध हार्डकोर,दादा ज्येसूट.

बोटीवर अनेक आयरिश इटालियन आणि फ्रेंच माणसे होती.मुख्य म्हणजे,जिथे बोट बांधली गेली त्या बेलफास्टच्या प्रोटेस्टंटना तर या प्रवासाच्या निमित्ताने अमेरिकेला स्थलांतरित होण्याची दुर्मीळ ऑफरही जाहीर झालेली.


दिनांक २ एप्रिल १९१२


साडेतीन हजार लोकांना सामावून घेण्याची क्षमता असणारे एक आलिशान आणि तरंगते गाव पाण्यात सोडण्यात आले.दिवसाला तब्बल ६१० टन कोळसा जाळून तोपर्यंत कधीही तयार झाली नाही,अशी प्रचंड वाफ तयार करणारी ही महाकाय बोट नजरेच्या एका टप्प्यात मावणार नाही आणि मावली तरी काय पाहिले हे पट्कन सांगता येणार नाही,इतकी अवाढव्य होती.हिची लांबी होती ८८२ फूट आणि वजन तब्बल ४६,००० टन. हिचे नाव होते आर. एम. एस. टायटॅनिक !


दिनांक १२ एप्रिल १९१२


टायटॅनिक निघाली.डेकवरच्या सुबक पॉलिश केलेल्या चकचकीत फळ्या काढण्यात आल्या आणि साधारण पंचवीस मैलापर्यंत ऐकू जाईल असा एक आकाशातल्या ढगांना धडकी भरविणारा,खणखणीत भोंगा या बोटीने दिला, तेव्हा जाणारे आणि मागे राहिलेले सगळेच आयुष्यातला एखादा अविश्वसनीय, अविस्मरणीय प्रसंग पाहत असल्यासारखे गहिवरून गेले.निरोपाचे हात व्याकुळ होऊन थरथरत होते तर डेकवर उत्तम वस्त्रे परिधान केलेल्या भाग्यवान प्रवाशांचे हात मात्र एकमेकात घट्ट गुंफलेले.भोंगा वाजताच टायटॅनिकवर घाईघाईने पोचला,तो आपला हार्डकोर ज्येसूट फ्रान्सिस ब्राऊन हा गृहस्थ लगबगीने बोटीवर चढला.त्याने त्या बोटीकडे डोळे भरून पहिले. तिच्यावरची देखणी आणि पारणे फेडणारी श्रीमंती नजरेत सामावली.तिचे फोटो काढले. बोटीवरच्या प्रवाशांचे आणि वेगवेगळ्या मजल्यांचे सुद्धा एका

पाठोपाठ बरेच फोटोग्राफ्स काढले.तो एडवर्ड स्मिथकडे गेला.कदाचित कप्तानाला त्याच्या ज्येसूट म्हणून घेतलेल्या शपथेची जाणीवसुद्धा करून दिली असणार. हे सगळे अतिशय चटपटीतपणे करीत हा माणूस, दुसऱ्या दिवशी सकाळी अकरा वाजता आयर्लंडच्या क्वीन्सलंड बंदरात सगळ्यांचा हृद्य निरोप घेऊन उतरला आणि काही क्षणात बोट करड्या लाटांवर झेपावली.बोटीवरच्या लोकांचे दिवसभराचे रुटीन उत्साहाने सुरू होते.


१४ एप्रिल १९९२ ( रात्र) १५ एप्रिल (पहाट)


टायटॅनिकवर रात्र झालेली.एक दमलेली, प्रवासाच्या तृप्तीचे उसासे टाकणारी,रेंगाळलेली रात्र.क्वचित कुठेतरी तिच्या एलिगंट कार्डक्लबमध्ये पत्ते खेळणारे आणि रंगीबेरंगी दबक्या प्रकाशासोबत प्रत्येक घोट सावकाश जिभेवर घोळवत दारू पिणारे काही जण रेंगाळत होते.

अनेकांना आता या शाही प्रवासाची सवय होत आलेली.

त्यामुळे सगळ्याच खोल्यातून विझणाऱ्या दिव्यांसोबत निजानीज झालेली.टायटॅनिक आता न्यूफौंडलंडच्या जवळपास ७०० किलोमीटर दक्षिणेला, अटलांटिकच्या लहरी लाटांवर डुलत होती. समुद्रावरची दमट हवा आता झरझर थंड होत चालली होती.खालचा करडा समुद्र एखाद्या तळ्यासारखा अत्यंत शांत,स्तब्ध.समुद्राचा निर्मम पडदा.डोळ्यात काजळ ओतावे असा काळभोर आणि त्यावर मात्र चांदणखडीची विशाल चादर असावी तसे ताऱ्यांनी खचाखच भरलेलं रत्नजडित आकाश.

अटलांटिकच्या लहरी लाटांवरचा तोच तो थंडगार होणारा हलका वारा. त्या निर्मम निसर्गाच्या जल आणि आकाश या दोन मूलतत्त्वात एखाद्या मंद ताऱ्याप्रमाणे, कालगती

सारखी सरकणारी टायटॅनिक !


बेल वाजली आणि बोटीवर पाळी बदलली.ऑफिसर बदलले.पहारा करणाऱ्या ऑफिसरकडे मात्र बायनॉक्युलर्स नव्हते. इन्फ्रारेड तंत्र,सोनार,ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम आणि रडार या सगळ्यांचाच शोध अजून लागायचा होता.सारे कसे शांत आणि मंद असताना अचानक वॉचटॉवरवरच्या ऑफिसरच्या नजरेला एक मोठा काळसर खंड पडला. "ओ माय गॉड!" तो जवळपास किंचाळला.थरथरत त्याने चेकपोस्ट असणारी फोनची वायर खेचली.अधीरपणे तो पलीकडून फोन उचलण्याची वाट पाहू लागला.साधारण तीन-चार दीर्घ रिंगनंतर फोनवर आलेल्या पलीकडच्या माणसाला त्याने त्या बर्फखंडावरील नजर न हलवत ह्याची माहिती दिली. "थँक्स!" ह्या अदबीच्या उद्गारासहित फोन कट झाला. त्याने अस्वस्थ होऊन पुन्हा फोन लावला.परत त्याने सांगितले, "मला खात्री आहे,पुढे प्रचंड आईसबर्ग आहे!" त्याच्या त्या तारस्वराने मग धावपळ सुरू झाली आणि त्याचवेळी अचानक बोटीचा वेग मात्र वाढू लागला.आता तिचा वेग होता २२ नॉट फुल! दुसरीकडे फुल रिव्हर्सच्या ऑर्डर्स दिल्या गेल्या.हे फारच अनाकलनीय होते. आता ती महाकाय बोट वेगात असतानाच वळवायला सुरुवात झाली.टॉवरवरच्या ऑफिसरची बोट वळणे आणि आईसबर्गचे वेगाने कमी होत जाणारे अंतर याची अस्वस्थ मोजदाद सुरू झालेली.

बोटीवर निद्राधीन असणाऱ्या माणसांना अर्थात याची काहीही जाणीव नाही.अनुभवी कप्तान स्मिथला आता हळूहळू अंदाज येऊ लागलेला.अमावस्येची रात्र. आकाशात चंद्राचा पत्ता नाही आणि समोर तब्बल ८० चौरस मैलाचे अवाढव्य आईसफिल्ड. या दृश्यासोबत ज्येसूट म्हणून घेतलेल्या शपथेची त्याला आता तीव्र आठवण होऊ लागली असावी.कदाचित कप्तान स्मिथ त्या क्षणांत,आपली सदसदविवेकबुद्धी आणि प्राणाहून प्रिय असणाऱ्या ज्येसूट गुरूचे आदेश यांच्यात घुसमटला असावा.कारण त्या शेवटच्या तासातल्या त्याच्या


 सूचना अत्यंत अनाकलनीय, विचित्र आणि त्याच्या प्रदीर्घ अनुभवाच्या ठिकऱ्या उडविणाऱ्या होत्या.त्याच्या लक्षात आले,बोटीवर पुरेशा लाईफ बोटी नाहीत. कारण? अगम्य...! आयुष्यात प्रथमच त्याने सगळ्यांनी बोट सोडण्याच्या आदेशाचा उच्चार केला.लोक डेकवर जमा होऊ लागले. त्यांना जाणवले काहीतरी भयाण घडते आहे. हळूहळू सगळ्यांच्या डोळ्यांत भीती उमटायला लागली.आकाश आणि पाणी या निसर्गाच्या दोन महाभूतात सापडलेल्या लोकांना आता आपल्या क्षुद्रतेची जाणीव होऊ लागली.सगळेच हवालदिल झालेले असताना एकदम टायटॅनिकचा बँड डेकवर आला आणि त्या मध्यरात्रीच्या गोंधळात,लोकांचे मनोधैर्य टिकविण्या -

साठी त्या बँडचे प्रामाणिक आणि आज्ञाधारक वादक प्राणपणाने आपापल्या वाद्यांवर आनंदाचे सूर वाजवू लागले.वर ताऱ्यांनी पेटलेले आकाश,खाली शांत काळ्या डोहासारखा समुद्र आणि अस्वस्थ विदीर्ण झालेले बोटीवरचे जीवन,या सगळ्यात प्राण फुंकणारे त्या वाद्यांचे सूर यांचा एक वेगळाच ऑर्केस्ट्रा आता अटलांटिकच्या लाटांवर सजू लागला होता.इतक्या सुसज्ज आणि आलिशान बोटीवर पुरेशा लाईफ बोट नव्हत्या हे कसे पटावे?आता सगळ्यांना भविष्य कळून चुकले होते. कप्तान स्मिथने स्वत: जाऊन स्ट्रेस कॉल पाठवला.

इशाऱ्यासाठी बाहेर फेकण्यात येणारे प्रकाशझोत (डिस्ट्रेस रॉकेटस्) सुरू झाले,पण ते रंगीबेरंगी होते. अशावेळी ते झोत फक्त लाल रंगाचेच असायला हवे असतात.लाल रंग म्हणजे धोक्याचे निशाण,पण ते रंगीबेरंगी असल्याने त्यातल्या त्यात जवळ असणारी बोट कॅलिफोर्नियाला (California) हे धोक्याचे इशारे आहेत,हे कळलेच नाही.बोटीवर मोठी पार्टी चालू असावी असा समज करून घेत ती पुन्हा दूरवर निघून गेली. ( घातसूत्र,दीपक करंजीकर, ग्रंथाली प्रकाशन )


टायटॅनिकवरील लोकांना वाचवू शकेल अशी अजून एक बोट कार्पाथिया (Carpathia) ५८ मैल म्हणजे चार तासांवर होती.तिने आपण येत असल्याचा संदेश पाठवला खरा,पण अथांग समुद्रावर केस पांढरे झालेल्या स्मिथला माहीत होते की,तोपर्यंत सारे संपलेले असेल.आता बोटीची विचित्र हालचाल सुरू झाली.त्या प्रचंड हेलकाव्यांनी अजस्त्र बॉयलर कोसळून पडले. आता लोकांची धावपळ टिपेला पोचली होती. कुठूनशी दैवानेच आर्त आणि दीर्घ हाक मारल्यासारखी एक अतिप्रचंड लाट उसळली आणि तिने एक वरचे उरले सुरले सगळे एका तडाख्यात पुसून टाकले.


अपूर्ण.. उर्वरीत लेखाचा दुसरा भाग ०५.१०.२३ या लेखामध्ये…

१/१०/२३

खवल्या मांजर एक गोष्ट.. Yellow cat is one thing..

एके दिवशी रात्री उशिरा वाकड पोलिस चौकीतून फोन आला,'एक विचित्र प्राणी आमच्या चौकीत शिरलाय ! आम्ही त्याला दार बंद करून कोंडलं आहे.' मी आमचा स्वयंसेवक मित्र डॉ.अमित कामतला फोन लावला.अमित हा त्या वेळी स्त्रीरोग व प्रसूतिशास्त्रात (गायनॅकालॉजी) पोस्ट ग्रॅज्युएशन करत होता.गेल्या दोन तीन वर्षांपासून स्वयंसेवक म्हणून तो रोजच पार्कवर येत होता. तो लगेचच गाडी घेऊन आला आणि पंधरा वीस मिनिटात आम्ही पोलीस चौकी गाठली.आत जाऊन बघतो,तर इन्स्पेक्टरच्या टेबलाखाली एक खवल्या मांजर शरीराची गुंडाळी करून बसलं होतं.गंमत म्हणजे सगळा पोलिस स्टाफ त्या प्राण्याला घाबरून चौकीच्या बाहेर थांबला होता.मी खुणावल्यावर अमित ते मुटकुळं उचलून मांडीवर घेऊन बसला. 'रेस्क्यू फॉर्म' भरण्यासाठी पोलिसांना दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर पार्कला यायला सांगून आम्ही त्या खवल्या मांजरासह पार्कवर आलो.


खवल्या मांजर हा एक अद्भुत सस्तन प्राणी आहे.

इंग्रजीमध्ये या प्राण्याला 'मँगोलिन' म्हणतात.मराठी भाषेतल्या नावात मांजर असलं तरी त्याचा मांजराशी काही संबंध नाही.हा प्राणी आकाराने मुंगसापेक्षा थोडासा मोठा असतो, दिसतोही थोडाफार तसाच.त्याच्या संपूर्ण अंगावर एकमेकांवर रचल्यासारखे कठीण खवले असतात.त्रिकोणी आणि चपटे.प्रत्येक खवला म्हणजे खरंतर केसांचा एक पुंजकाच. खवल्यांच्या मधल्या भागात आणि पोटाच्या बाजूला तुरळक राठ केसही असतात.त्याच्या जवळपास कोणी फिरकलं तर नाराज होऊन तो हलकासा फुत्कार टाकतो.कोणी स्पर्श केला तर मात्र लाजून मुटकुळं करून बसतो. त्याच्या तोंडात दात नसतात.त्याची जीभ एखाद्या चिकट वादीसारखी असते.

धोक्याची चाहूल लागून त्याने एकदा का शेपटी पोटाकडून डोक्याकडे वळवून शरीराचा फुटबॉल केला की कितीही ताकद लावली तरी तो उघडता येत नाही.त्यामुळे शत्रू दातांनी आणि नख्यांनी त्याला काहीही इजा करू शकत नाही.त्याला चावण्याचा आणि ओरखडण्याचा प्रयत्न करून कटाळून शत्रू निघून जातो.खवल्या मांजराची नखं खूप लांब आणि तीक्ष्ण असतात.त्यांचा वापर करून ते जमिनीमध्ये माती खोदन बिळं करतात.बिळं कसली,चार ते आठ फूट लांबीच्या छोट्याशा गुहाच असतात त्या! मुंग्या आणि वाळवी हे त्यांचं मुख्य खाद्य.त्यांच्या वारुळावर खवल्या मांजर धाड टाकतं.भराभरा वारूळ उकरत असताना बंद तोंडातल्या फटीतून त्याच्या जिभेची आत-बाहेर हालचाल होत असते. वारुळातल्या मुंग्या आणि वाळवी जिभेला चिकटून त्याच्या पोटात जातात.

त्याच्या पोटातली रसायनं हे खाद्य सहज पचवू शकतात.

खवले मांजर झाडावर चढण्यातही तरबेज असतं.आपल्या

तीक्ष्ण नख्या झाडाच्या खोडावर रोवून ते झाडावर चढतं.

ताकदवान शेपटी झाडाच्या फांदीला आवळून शरीराचा भार तोलून वर चढतं आणि तिथे राहणाऱ्या किडा-मुंग्यांवर डल्ला मारतं.दृष्टी क्षीण असली तरी त्याचं वासाचं ज्ञान अचूक असतं.त्याआधारे ते बरोबर त्याच्या खाद्या

पर्यंत पोहोचतं.दिवसभर स्वतः खणलेल्या घरात मुटकुळं करून झोपा काढतं आणि संध्याकाळी जेवायला घराबाहेर पडतं.


तर मी सांगत होतो आमच्याकडच्या पाहुण्या खवल्या मांजराबद्दल.या प्राण्याबद्दल सर्वांनाच उत्सुकता होती.

रात्री उशिरा हे खवले मांजर पार्कवर आलं आणि सकाळीच वृत्तपत्रांचे छायाचित्रकार त्याचे फोटो काढण्यासाठी येऊन ठेपले.अजून ते पुरतं रुळलंही नव्हतं.

आपण कुठे आलोय याचीही त्याला धड कल्पना नव्हती. त्यामुळे मी छायाचित्रकारांना विनंती करून त्यांना संध्याकाळी यायला सांगितलं.ते गेल्यावर माझे सहकारी नेवाळे यांच्या मदतीने त्या खवले मांजराला उन्हासाठी हिरवळीवर आणून ठेवलं. थोड्याच वेळात डॉ.अमितही त्याची विचारपूस करण्यासाठी येऊन पोहोचला.अमित हा जसा हाडाचा स्वयंसेवक,तसाच कष्टाळू आणि हुशार विद्यार्थीही.त्याने रात्रभर जागून खवल्या मांजराच्या खाद्यसवयींचा,त्याला आवश्यक असणाऱ्या पौष्टिक पदार्थांचा अभ्यास केला होता.दूध,मध,रताळी आणि कच्च्या अंड्यामधून त्याला आवश्यक असणारी प्रथिनं आणि इतर घटक मिळत असतात.त्यामुळे हे सर्व पदार्थ एकत्र भरडून आणि त्यानंतर विशिष्ट तापमानापर्यंत शिजवून,थंड करून अत्यंत चविष्ट असं 'पॉरिज' (आपल्याकडची लापशी) तयार केलं.ते चाखून पाहण्याचा मोह मला आवरला नाही.मस्तच चव होती त्याची.आमच्या

खवल्या मांजरासमोर ठेवल्यावर एका दीर्घ श्वासाने हुंगून त्यानेही ते चविष्ट पॉरिज जिभेने लपालपा खाऊन टाकल.

पोटभर नाष्टा झाल्यावर आमचा पाहुणा गाढ झोपून गेला.माझे गुरू जेराल्ड ड्युरेल यांनी 'जर्सी वाइल्डलाइफ प्रिझर्वेशन ट्रस्ट'मध्ये प्राणी-पक्षांना संतुलित पोषक आहार मिळण्यासाठी असेच अनेकविध प्रयोग केलेले मी अनुभवले होते.वन्य प्राण्यांना नैसर्गिक वास्तव्यामध्ये मिळणाऱ्या अन्नघटकांमध्ये उपलब्ध असणाऱ्या प्रथिनांचा अन् जीवनसत्त्वांचा अभ्यास करून हा भला माणूस त्यांच्यासाठी विशिष्ट प्रकारचे पदार्थ तयार करून घ्यायचा.

अगदी केक,पेस्ट्री,पॉरिज आणि पुडिंग्जसुद्धा! अशा नव्या पदार्थाची चव पहिल्यांदा जेराल्ड स्वतः बघत असत,मगच तो प्राणी-पक्ष्यांना दिला जात असते.अमितने त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत हा नवा प्रयोग यशस्वी केला होता आणि त्यात त्याला यशही आलं.


संध्याकाळच्या सुमारास आमचा पाहुणा झोपेतून उठला.मनसोक्त शीशूचा कार्यक्रम आटोपला आणि तो इकडे-तिकडे पळू लागला.संध्याकाळी त्याला घेऊन वारुळ शोधायला जायचं असं आम्ही ठरवलं होतं.

त्यासाठी नेवाळे त्याला उचलायला गेला,तर लगेच त्याने स्वतःचा फुटबॉल करून घेतला.तो फुटबॉल मांडीवर घेऊन नेवाळे माझ्या शेजारी गाडीत बसला.आम्ही थेट हिंजवडी गाठलं.त्या वेळी आयटी पार्कमधल्या कंपन्यांच्या बांधकामांना सुरुवात झाली होती,पण तरीही तिथे अजून समृद्ध असं माळरान शाबूत होतं.बाभळीची आणि हिवराची झाडंही शिल्लक होती.त्या झाडांच्या खोडालगत लाल,काळ्या आणि पांढऱ्या मुंग्यांची थोडीफार वारुळ होती.त्यांच्यापाशी आम्ही खवल्या मांजराला मोकळं सोडलं.जराही वेळ न दवडता त्याने एका वारुळावर हल्ला चढवला.पुढच्या पायाने तो भराभर वारूळ उकरायला लागला. चामड्याच्या वादीसारखी त्याची लवचिक जीभ आत बाहेर होऊ लागली.मुंडकं आत खुपसून त्याने हजारो मुंग्या चापल्या असाव्यात.त्याची भूक भागली असावी.

अर्ध्या तासानंतर तो गुमान माघारी आमच्याजवळ आला.आम्ही पार्कला परतलो आणि जेवून झोपलो.


दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा नाष्ट्याला लापशी. दुपारी झोप झाल्यावर कालच्यासारखाच 'नेचर वॉक' झाला. दरम्यान,त्याच्या रीहायड्रेशनसाठी आम्ही मध आणि पाण्याचं मिश्रण करून त्याच्या पिंजऱ्यामध्ये ठेवलं होतं.आवश्यकतेनुसार आपल्या लांबुळक्या जिभेने तो ते चाटून घेत होता.दरम्यान,या खवल्या मांजराला निसर्गात पुन्हा मुक्त करण्यासाठी मी वन विभागाकडे अर्ज

करून ठेवला होता.पाच दिवसांनी त्याला परवानगी मिळाली;पण तोपर्यंत या विचित्र प्राण्याला सांभाळण्याची,

त्याचा जवळून अभ्यास करण्याची संधी आम्हाला मिळाली हे आमचं नशीब..! (सोयरे वनचरे,अनिल खैरे,समकालीन प्रकाशन )


त्याला रात्रीच्या वेळी निसर्गात सोडावं असं ठरलं.

आमच्याबरोबर वन विभागाचे कर्मचारीही येणार होते.

जाण्यापूर्वी त्याला पुन्हा एकदा लापशीची ट्रीट दिली,मध-पाणी पाजलं.एका भक्कम लाकडी पेटीत ब्लँकेट अंथरून त्याचा फुटबॉल त्यात ठेवला.त्याला हिंजवडीच्या मागे माणच्या जंगलात सोडायचं ठरवलं होतं.तो याच परिसरात सापडला होता.या परिसरात खवले मांजरं आढळतात असं कानावरही आलं होतं आणि तोही तिथूनच केवळ अनवधानाने वाट चुकून आमच्याकडे आला होता.त्यामुळे त्या भागात त्याला त्याची आप्त

मंडळी भेटण्याची शक्यता बरीच होती.


माणला पोचल्यावर एक टेकडी चढून वर गेलो.एव्हाना रात्र झाली होती.वेळ न दवडता आम्ही हलकेच त्याला पेटीबाहेर काढून जमिनीवर ठेवलं आणि दूर जाऊन उभे राहिलो.खवल्या मांजराने स्वतःहून मुटकुळं सोडवलं.
परिसर हुंगून घेतला.

एकदाच आमच्या दिशेने पाहिलं आणि शांतपणे आमचा निरोप घेऊन ते माळरानावर मार्गस्थ झालं.