* विजय गायकवाड | Vijay Gaikawad

live

नमस्कार आपले स्वागत आहे. 'सगळे जण तुम्हाला शोधत येतील.आनंदाने तुडुंब भरलेली माणसे सर्वांनाच आवडतात! पण ते तुम्हाला दुःखी,उदास अशा अवस्थेत पाहू शकत नाहीत! तेव्हा आनंदी-हसतमुख रहा आणि मित्रांचा सहवास वाढवा! जर तुम्ही दुःखी राहिलात तर मात्र सगळे जण तुम्हाला सोडून जातील. जीवनातील आनंद-प्रसन्नता भरभरून वाटा! पण एकटे दुःखी रहाल, तर त्या दुःखातच बुडून जाल !' सॉलिट्यूड, ईला व्हीलर विलकॉक्स जगण्याच्या तयारीसाठी नव्हे तर,जगण्यासाठी माणूस जन्माला आला आहे,असं 'बोरिक पास्तरनाक' यांनी म्हटलेलं आहे.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! वाचन हे आहाराहून जास्त महत्त्वाचे असते.जिम र्‍होम यांनी अँथोनी रॉबीन्स यांना शिकवले होते की 'एक वेळ रोजचे जेवण चुकव,पण वाचन अजिबात चुकवू नको.' याप्रमाणे मी अखंडपणे वाचत आहे. माणसांपासून माणसांपर्यंत जाण्याचा,प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाण्याचा जीवनाचा राजमार्ग पुस्तकातून जातो. कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात. पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये. म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,कवी सचिन शिंदे,संतोष शेळके,अनिल फारणे,सहित प्रकाशन,डॉ.रवींद्र श्रावस्ती,डॉ.सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,संजय बापट,मनोहर सुर्वे,विनायक पाटील,संतोष पाटील,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, मेनन पिस्टन रिंग मधील सहकारी मित्र शेखर सुर्यवंशी..। पुस्तकातील घटना प्रसंग हे मी लिखित स्वरूपात सध्या व्हाट्सअप वरती टाकत असतो.हे सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी,पुस्तके देणारी लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत. ... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ. मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. विजय कृष्णात गायकवाड

८/१२/२३

कुणालाच हुकूम चालवणं आवडत नाही. No one likes to be dictated to.

एकदा मला 'अमेरिकन बायोग्राफी' ची डीन मिस इडा टाखेल बरोबर जेवण करण्याची संधी मिळाली.मी त्यांना सांगितलं की मी हे पुस्तक लिहितेय.त्यानंतर आम्ही या अंतिम महत्त्वपूर्ण विषयावर चर्चा करू लागलो की लोकांना कसं प्रभावित करावं.त्यांनी मला सांगितलं की जेव्हा ती ओवेन डी.यंगची जीवनगाथा लिहीत होती तेव्हा तिनं एका माणसाची मुलाखत घेतली जो तीन वर्षांपासून त्याच ऑफिसमध्ये बसत होता.ज्यात मिस्टर यंग बसत होते.या व्यक्तीचं म्हणणं होतं की या तीन वर्षांत त्याने ओवेन डी.यंगना कुणालाही आदेश देताना ऐकले नाही.ते नेहमी सल्ला देत,आदेश नाही.ओवेन डी.यंग कधीच असं म्हणत नसत,"असं करा वा तसं करा," वा " हे करू नका ते करू नका." त्याऐवजी ते म्हणत,"तुम्ही यावर विचार करू शकता." किंवा "हे काम करावं असं तुम्हाला वाटतं का ?" बरेचदा ते पत्र डिक्टेट केल्यावर आपल्या कर्मचाऱ्याला विचारत असत,"तुम्हाला हे कसं वाटतंय?"आपल्या हाताखालच्या कर्मचाऱ्याद्वारे लिहिलं गेलेलं पत्र वाचल्यावर ते म्हणत,"कदाचित हे वाक्य असं लिहिणं जास्त चांगलं राहील." ते लोकांना स्वतः आपली चूक सुधारण्याची संधी देत असत.त्यांनी कधी आपल्या हाताखालच्या लोकांना काम करण्याची आज्ञा दिली नाही.त्यांनी लोकांना काम करण्याची आज्ञा दिली नाही.ते लोकांना आपलं काम करू देत,


जेणेकरून ते आपल्या चुकांपासून स्वतःच शिकत.या त-हेच्या तंत्राने समोरच्याला आपली चूक सुधारणे सोपे जाते.त्यामुळे त्याच्या सन्मानाला ठेच पोहोचत नाही आणि त्याच्यात आपण महत्त्वपूर्ण आहोत ही भावना जागृत होते. त्यामुळे विद्रोहाची नव्हे तर सहयोगाची भावना प्रबळ होते.


कडक आदेश दिल्याने जी आक्रोशाची भावना निर्माण होते ती बराच दीर्घ काळपर्यंत कायम राहते,मग भलेही तो आदेश स्पष्टपणे चूक दुरूस्त करण्यासाठी दिला गेला असेल.


डॅन सँटारॅली व्यामिंग,पेनसिल्वानियाच्या एका व्होकेशनल स्कूलमध्ये शिक्षक होते.त्यांनी आमच्या वर्गात सांगितलं की त्यांच्या एका विद्यार्थ्याने एकदा शाळेच्या बाहेर चुकीच्या जागी कार पार्क केली,ज्यामुळे रहदारीत अडचण येत होती.दुसरा एक शिक्षक वर्गात आला आणि त्याला रागावत त्याने विचारलं,"कुणाची कार रस्त्यात उभी आहे ?" जेव्हा कारवाला मुलगा उभा राहिला,तेव्हा त्या शिक्षकानं ओरडून म्हटलं, "त्या कारला तिथून तत्काळ हटव,नाहीतर मी तिच्या चारी बाजूंना साखळी बांधून बाहेर फेकून देईन." चूक त्या विद्यार्थ्याचीच होती.त्याला तिथे कार उभी करायलाच नको होती.परंतु त्या दिवसापासून केवळ तो विद्यार्थीच नव्हे तर त्या वर्गातली सगळी मुलं त्या शिक्षकाचा द्वेष करू लागली.या घटनेनंतर त्यांनी आपल्याकडून पूर्णपणे त्या शिक्षकास बेजार करण्याचे आणि त्याला त्रास देण्याचे प्रयत्न केले.

या गोष्टीला दुसऱ्या पद्धतीने सांगता आले असते.तो शिक्षक मैत्रीपूर्ण स्वरात विचारू शकला असता,"रस्त्यात उभी केलेली कार कुणाची आहे?" आणि त्यानंतर ही सूचना देऊ शकला असता की जर ती कार तिथून हटवली तर इतर कार्सना येण्याजाण्यास सुविधा होईल.हे ऐकून तो विद्यार्थी आनंदाने कार हटवायला तयार झाला असता आणि तो व त्याचे सहपाठी त्या शिक्षकावर अजिबात चिडले नसते.


प्रश्न विचारल्यावर केवळ आदेशच आनंददायक होत नाही तर समोरच्याची रचनात्मकता पण प्रेरित होते.जर लोकांना असं वाटलं की तो निर्णय घेण्यात त्यांचा सहभाग आहे,तर ते अधिक चांगल्या तऱ्हेने ते काम करतील.


इयान हे आफ्रिकेतल्या मॅकडोनॉल्ड मशीनचे पार्ट बनवायच्या कारखान्यात जनरल मॅनेजर होते.त्यांना एक मोठी ऑर्डर मिळणार होती.अट ही होती की त्यांना खूपच कमी वेळात माल पुरवायचा होता.त्यांना हे माहीत होतं की ते इतक्या कमी वेळात मालाचा पुरवठा करू शकणार नाहीत.कारखान्यात आधीच्या ऑर्डर्सचा माल तयार होत होता आणि या मोठ्या ऑर्डरची समयसीमा इतकी कमी होती की हे काम अशक्य वाटत होतं.इयानने मजूरांना कामाची गती वाढवा आणि उत्पादन करा असं सांगितलं नाही.त्याऐवजी त्याने सर्वांना एकत्रित केले आणि पूर्ण परिस्थिती विशद केली.त्याने सांगितले की जर ही ऑर्डर त्यांना मिळाली तर त्यांच्या कंपनीला खूप लाभ होईल आणि जर ती वेळेवर दिली गेली तर मजूरांनासुद्धा त्यामुळे लाभ होईल.मग त्याने प्रश्न विचारायला सुरुवात केली.


"आम्ही असं काही करू शकतो का की आम्हाला ही ऑर्डर मिळेल?""कुणाच्या डोक्यात असा काही उपाय आहे का,ज्यामुळे ही ऑर्डर घेणे आणि वेळेवर पूर्ण करणे शक्य होईल?" "असा काही उपाय आहे का ज्यामुळे आम्ही आमच्या कामाच्या वेळात बदल करून जी समयसीमा दिलीय,ती पूर्ण करू?" 


कर्मचाऱ्यांनी अनेक उपाय सुचवले आणि त्यांनी ती ऑर्डर घ्यायलाच हवी असे आग्रहाने म्हटले. त्यांनी 'आम्ही हे करू शकतो.' या भावनेने काम केलं,त्यामुळे त्यांना ऑर्डर तर मिळलीच,पण मालाचे उत्पादन आणि पुरवठा अगदी वेळेवर झाला.


केवळ थेट आदेश देण्याऐवजी प्रश्न विचारा.

३०.११.२३ या लेख मालेतील पुढील भाग..


आदरणीय डॉ.रवींद्र श्रावस्ती यांच्याकडून घेण्यात आलेली ही वाचनासंदर्भातील चिंतनशील अशी नोंद


१९५३ मध्ये चार्ली मंगर २९ वर्षांचे होते.त्यांचा नुकताच घटस्फोट झाला होता.राहायला घर नव्हते.तत्कालीन काळात अमेरिकेत घटस्फोट हा मोठा सामाजिक कलंक मानला जात असे..घटस्फोटानंतर अचानक लगेच त्यांचा वर्षांचा मुलगा टेडी याला कॅन्सर झाल्याचे निदान झाले.

त्यांच्या मुलाचा कॅन्सर असाध्य होता.त्यांच्याजवळ वैद्यकीय विमा नव्हता.


मुलाच्या कॅन्सर उपचारासाठी चार्ली मंगर यांचे सगळे पैसे संपले.ते कर्जबाजारी झाले.चार्ली रोज टेडीला हॉस्पिटलमध्ये भेटायचे -- आणि मग बाहेर येऊन रडत रस्त्यावर फिरायचे.टेडीचे वयाच्या ९ व्या वर्षी निधन झाले.चार्ली आतून तुटले,घटस्फोट आणि नंतर लगेच पोटच्या गोळ्याला गमावले.राहते घर गेले,

संसार तुटला, कर्जबाजारी झाले.अशा परिस्थितीत  ९९.९९% लोक दारू,ड्रग्ज किंवा आत्महत्येकडे वळले असते. चार्ली मंगेर यांनी असे काहीच केले नाही.त्यांना वाचनाची भारी आवड होती.सतत पुस्तकं वाचण्याची सवय असल्यामुळे त्यांना कदाचित पुस्तकांमधून या वाईट काळाला तरुन जाण्याचे धैर्य मिळाले असावे.


वयाच्या ५२ व्या वर्षी डोळ्यांच्या अयशस्वी शस्त्रक्रियेमुळे त्यांच्या एका डोळ्याला अंधत्व आले.हे अंधत्व इतके गंभीर होते की,त्यांची एक दिवस दोन्हीं डोळ्यांनी पूर्णतः अंध होण्याची शक्यता होती.


अशा सगळ्या घडामोडी चालू असतांना चार्ली मंगर यांचे वाचन वेड अधिक जोमाने वाढले होते.ते सतत नवनवीन गोष्टी शिकत असत त्यासाठी ते सतत नवनवीन पुस्तक वाचून काढीत.आपल्याला पूर्ण अंधत्व येऊ शकते त्यामुळे नंतर पुस्तकं वाचता येणार नाहीत या शक्यतेचा सामना करण्यासाठी  त्यांनी ब्रेल लिपी शिकून घ्यायला सुरुवात केली होती.


पण तरीही त्यांचा दुसरा डोळा शाबूत राहिला. मरणाच्या दिवसापर्यंत ते दररोज (एकाच डोळ्याने) १५ तासाहून अधिक वेळ वाचन करत असत. 


 बर्कशायर हॅथवेचे व्हाईस चेअरमन म्हणून त्यांचे काम हे मुख्यत्वे खूप वाचन करणे आणि चिंतन करणे हेच होते.

त्यामुळे त्यांची निर्णयक्षमता बेतोड होती.आणि त्यांच्या निर्णयांना वॉरेन बुफे सुद्धा च्यँलेंज करत नसत. 


पुस्तकांविषयी बोलतांना चार्ली मंगर म्हणत:


"माझ्या संपूर्ण आयुष्यात,मी असे कोणतेही ज्ञानी लोक पहिले नाहीत जे खूप वाचन करत नाहीत - एकही नाही,शून्य.वॉरन किती वाचतो - मी किती वाचतो हे पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल.आमच्या आजूबाजूच्या लोकांना वाटते की मी आम्ही दोन पाय आणि दोन हात चिकटलेले पुस्तकं आहोत." 


चार्ली मंगर ९९ वर्षे जगले.वैयक्तिक आयुष्यातील संकटांना,आरोग्याच्या प्रश्नांना हसत हसत सामोरे गेले.

त्यांच्या बोलण्यात, वागण्यात एखाद्या अध्यात्मिक दृष्ट्या प्रगल्भ माणसाची उंची होती.ते नेहमी आनंदी असत. आपल्या ज्ञानाचा,वाचनाचा वापर फक्त अर्थार्जनासाठीच नाही तर एक परिपूर्ण आयुष्य जगण्यासाठी त्यांनी केला.

वॉरेन बफे हे चार्ली मंगर यांना आपल्यापेक्षा अधिक स्मार्ट आणि इंटेलिजन्ट समजत.वॉरेन बफे यांच्या बरोबर मंगर यांनी बरेच दिवस काम केले आणि गुंतवणूक विश्वावर आपला ठसा उमटवला.


स्वतः वर इतके संकटं येऊनही ते पुन्हा कसे उभे राहू शकले असे विचारल्यावर ते म्हणाले होते, "सेल्फ पिटी म्हणजे स्व-सहानुभूती म्हणजे आपल्या संकटकाळात जगाची किंवा स्वतःची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न ही मोठी विनाशकारी प्रवृत्ती असते"


त्यांच्या भाषेत: - "सामान्यपणे,मत्सर,राग,सूड आणि स्व-सहानुभूती या विचारांच्या विनाशकारी पद्धती आहेत.

स्व-सहानुभूती (सेल्फ पिटी) हा तर वेडेपणा आहे.प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही स्व-सहानुभूतीच्या वेडेपणात वाहून जातांना बघाल,तेव्हा त्याचे कारण काय आहे याची मला पर्वा नाही,तुमचे मूल कर्करोगाने मरत आहे, तुमचे सगळे जग तुमच्याभोवती ढासळत आहे. या वेळी स्व-सहानुभूती किंवा जगाची सहानुभूती शोधून तुमची परिस्थिती सुधारणार नाहीये. संकटांना सामोरे जाण्याचा हा एक हास्यास्पद मार्ग आहे.तुमच्या जीवनात तुमच्यावर भयंकर वार होतील,नियती तुमच्यावर भयानक रीतीने अन्याय करेल तरीसुद्धा काहीही झाले तरी स्व सहानुभूतीने काहीच फरक पडत नाही. 


संकटकाळात काही लोक आणखी भरारी घेऊन उठतात आणि काही लोक कोसळून पडतात. स्व-सहानुभूती शक्यतो तुम्हाला कोसळवणार हे लक्षात घ्या.तिथे मला एपिक्टेटसची वृत्ती सर्वोत्तम वाटते.

आयुष्यातील प्रत्येक दुर्घटना ही तुम्हाला पुन्हा नाविन्याची उभारी घेण्यासाठी मिळालेली नवी संधी आहे असे त्याला वाटत होते.जीवनातील प्रत्येक दुर्घटना म्हणजे काहीतरी नवीन शिकण्याची संधी घेऊन येते आणि तुमचे काम स्व-सहानुभूतीमध्ये बुडून जाणे नाही,तर त्या भयंकर आघाताचा आपल्या आयुष्याला अधिक विधायक पद्धतीने आकार देण्यासाठी उपयोग करणे हे आहे."


चार्ली मंगर यांना विनम्र अभिवादन.त्यांच्या शिकवणी आयुष्यभर साथ देतील.


६/१२/२३

अखंड आशिर्वाद-Eternal blessings...

असाच एके दिवशी नेहमीच्या जागेवर भिक्षेकरी तपासण्यासाठी गेलो असताना,चांगल्या कपड्यातली एक आजी लगबगीने माझ्या कडे आली आणि काहीही कळण्याआधीच माझा हात हातात घेवुन कपाळाला लावून हमसुन हमसुन रडायला लागली . 


मला काहीच कळेना... ! 


खूप वेळ ती माझ्या गळ्यात पडुन नुसती रडत होती... आम्हाला पाहुन रस्त्यावरचे लोक फोटो काढत होते.

लोकांना दुस-याचा तमाशा पहायला आवडतो..! आपलं ठेवायचं झाकुन,आणि दुस-याचं पहायचं वाकुन.... !!! 


आजीचा रडण्याचा भर ओसरल्यावर मी तिची चौकशी केली,म्हणाली... मला एक मुलगा आहे, सुन आहे,नातवंडं आहेत,खुप गणगोत आहेत.परंतु माझं सर्व मी मुलाला नावावर करुन दिल्यावर तो आता लक्ष देत नाही.सुन खायला देत नाही,उठता बसता मरत का नाहीस म्हातारे? असे टोमणे मारते.अजुन किती दिवस फुकट खाणार गं ? असं विचारते. 


मी फुकट खात नाही हो डाॕक्टर ... माझ्या नावावरचं घर मी त्यांच्या नावावर केलंय... खरंतर ते माझ्या घरात राहतात...मी नाही... पण मी ते बोलुन दाखवत नाही ! 


सुनेन नातवंडांना माझ्याविषयी  काहीतरी भरवलंय,ही छोटी मुलंही मला घालुन पाडुन बोलतात.मुलाला हे सांगितलं तर,मुलगा दारू पिऊन मलाच मारहाण करतो.


मला जगायचं नाही डॉक्टर... बाळ गर्भारपणात पोटातुन लाथ मारतं,तेव्हा प्रत्येक आईला आनंदच होत असतो... पण सर्वस्व देवुनही म्हातारपणात या वयात पोरगा लाथ मारतो ते सहन होत नाही हो..! 


डाॕक्टर ,मला कसलंतरी इंजेक्शन देऊन गुपचुप मारून टाका... मी वाटलं तर कागदावर अंगठा देते.... पण मला मारुन टाका...आता नाही सहन होत....असं म्हणून ती गळ्यात पडून पुन्हा रडू लागली...मला तिचं रडू पहावेना.! 


तीची कशीबशी मी समजूत काढली आणि म्हणालो मी काय मदत करू शकतो तुम्हाला आजी ?खरं तर मी फक्त भीक मागणाऱ्या समाजासाठीच काम करतो,तरीही मी काहीतरी प्रयत्न करेन.आजी जगण्याला वैतागली होती, सारख्या मरणाच्या गोष्टी करत होती. तिला त्या घरात परत जायचंच नव्हतं.ब-याच वेळाने आजी म्हणाली माझी कुठं आश्रमात सोय होईल का ? 


हा प्रश्न ऐकून मीच शहारलो...कारण सध्या कोरोना च्या काळात कोणताच वृद्धाश्रम नवीन लोकांना स्वीकारत नाहीय. अशाही परिस्थितीत मागच्या दोन आठवड्यांपूर्वी एका बाबांची कशीतरी सोय लावली होती, त्यांची "शाल" हृदयात जपुन ठेवली आहे, ठेवणारच आहे.... पण  आता या आजीची सोय कुठे करावी मला काही कळत नव्हतं..! 


मला हो म्हणणं शक्य नव्हतं आणि नाही म्हणणं जड जात होतं...!  आजीच वय ८० असावं...


या वयात धडधाकट मुलाने तिला सांभाळण्याऐवजी तो तिला मारतो हे ऐकून अंगावर काटा आला...मी म्हटलं,

आजी तुझ्या मुलाला मी भेटतो आणि त्याच्याशी बोलतो, माझी भेट करून दे.'  


आजी म्हणाली, 'नाही बाळा, तो तुलाही मारेल आणि मलाही मारेल, मला त्याच्या पुढे नेऊ नकोस... ' थरथर कापत आजी म्हणाली... घाबरून थरथर कापणा-या मुलाला आयुष्यंभर हात देवुन, पदरात घेणारी आई, आज मुलाच्या भितीनंच थरथर कापत होती.... !


मला वाईट वाटलं... ! 


मी म्हणालो, 'मग पोलीस स्टेशनला कंप्लेंट देऊया का ?'


हातातल्या पिशवीशी सुरकुतलेल्या हातांनी चाळा करत ;खाली बघत,डोळ्यात पाणी आणून ती माऊली म्हणाली,"नको रे बाळा,पोलीस स्टेशनला कंप्लेंट केली तर,पोलीस त्याला खूप मारतील...

माझ्या लेकराला कुणी मारलेलं मला नाही सहन होणार ...! ती पुन्हा रडायला लागली…म्हातारीची ही वाक्यं ऐकुन मीच गलबललो... आयला,म्हातारे तु मला रडवलंस म्हणत, आता मीच तीच्या गळ्यात पडलो... स्वतः इतक्या विपन्नावस्थेत असुनही ती माझ्या पाठीवर सुरकुतलेला हात फिरवत धीर देत म्हणाली.... उगी ... उगी... तु का रडतोहेस बेटा... ? तुला काही त्रास आहे का ? सांग हो मला.... !


ती पुन्हा आई झाली होती ... आणि मी नुकतंच जन्मलेलं बाळ... ! सुरकुतलेला हा हात म्हणजे... हजार चिंध्या एकत्र करुन,टाके मारुन शिवलेली "वाकळ" वाटली मला... जगातली सारी ऊब या वाकळीत एकवटलेली असते... ! 


रजई,ब्लँकेट,शाॕल ही नुसती थेरं आहेत... 


पांघरायला वाकळ आणि डोक्यावर म्हातारीचा सुरकुतलेला हात हेच ख-या श्रीमंतीचं लक्षण..!


आ धार देते ती आई ! 

आ पलं म्हणते ती आई !!

आ सुदे रे  म्हणत पोटात घेते  ती आई !!! 

'ई' श्वराची 'आ' ठवण होवुच देत नाही ती आई..! पोटात घेते ती "माती"... पोटातुन जन्म देते ती "माता" फरक एका वेलांटीचा ! 


इतका त्रास देणाऱ्या मुलाला पोलीस मारतील या कल्पनेनं ती माऊली शहारली.मी पोलीस कंप्लेंट करणार नाही,याचं तीनं वचन घेतलं माझ्याकडुन तरीही म्हणाली,नकोच माझा त्रास त्यांना,जगुदे सुखानं...जमलं तर कर सोय माझी...नाहीतर मारुन टाक..तीने मला पर्यायच नाही ठेवला..! 


आता कुणाला फोन करू मला काही कळेना ! 

या काळात तीला कुणी स्विकारणार नाही,मला माहित होतं.... ! मला छोटा भाऊ समजणाऱ्या एक ताई आहेत,त्या परभणी मध्ये एक छोटासा वृद्धाश्रम चालवतात. त्यांना भीत-भीत फोन लावला.त्यांनी हो म्हणण्याची अपेक्षाच नव्हती,परंतु आजीची सर्व परिस्थिति ताईला सांगितली.वर आजीशी व्हिडिओ कॉल वर बोलणं करून दिलं. 


ताईला म्हणालो, 'या आजीशी आजच ओळख झालीये माझी... पण हिच्यात मला माझी आई दिसते...या वयात मुलगा तीला मारतो,या माराने कदाचित तीचा जीव जाईल.... आणि माराने नाही गेला तर उपासमारीनं जाईल,उपासमारीनंही नाही गेला तर सुनेच्या टोमण्यांनी तीचा जीव जाईल... ! 


मला ती जगायला हवी आहे...,मरेल तेव्हा मुलगा म्हणुन अंत्यसंस्कार मीच करणार आहे !' 


हे बोलणं ऐकतानाच या माझ्या ताईच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. 


आजीशी बोलणं झाल्यावर काहीही विचार न करता ताई मला म्हणाल्या,'दादा,आईला पाठवून दे लवकरात लवकर परभणीला...तू जर तिला आई म्हणत असशील तर माझी सुद्धा ती आईच झाली की रे ! आणि आपण आपल्या आईला असं रस्त्यावर कसं सोडणार ? तीला सांग, तुला एक मुलगी पण आहे म्हणावं... ! मी आपली आई म्हणून सांभाळ करीन तिचा...! 


मी मनातूनच ताईला साष्टांग नमस्कार घातला.! 


सख्खा मुलगा सांभाळत तर नाहीच, उलट मारहाण करतो आणि ही कोण कुठली ताई केवळ माझ्या शब्दाखातर या आजीला आपली आई म्हणून आयुष्यंभर सांभाळण्याची प्रतिज्ञा करते... ! 


ताई तुला प्रणाम माझा... !

आजी काल मंगळवारी मला भेटली. 


आज आणि उद्या म्हणजे बुधवार,गुरुवार दोन दिवस सर्व कागदपत्रे, पोलीस स्टेशन आणि इतर काही कायदेशीर बाबी पुर्ण करण्यात मला दोन दिवस तरी लागतीलच.

शेवटचे दोन दिवस आजी त्या घरात कसेतरी काढ असं तिला सांगून आलोय.आईला नेल्यावर,भविष्यात दारुड्या मुलाने आणि सुनेने माझ्याविरुद्ध काही कांगावा करायला नको म्हणून त्या मतदारसंघातील नगरसेवक यांनाही मध्यस्थ म्हणून मी घेतलं आहे.या शुक्रवारी दि. २५ सप्टेंबर २०२० रोजी सकाळी आठ वाजता आजीला मी परभणीला पाठवून देत आहे.सायंकाळी ती परभणीला पोचेल. सौ सुनीताताई अहिरे या माझ्या ताई अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत परभणी मध्ये वृद्धाश्रम चालवत आहेत.यांच्याचकडे आपण आजीची सोय करणार आहोत. आजीला भेटुन मी हे सर्व सांगितलं...म्हणालो, 'म्हातारे मज्जा आहे तुझी,आता कायम लेकीकडं राहशील...!' 


आजी म्हणाली,'अरे लेकीकडं पहिल्यांदाच जाणार मी, तीला साडी चोळी नको करायला ? जावईबापुलाही काहीतरी द्यावे लागेल... अधिक मास चालु आहे... तु काय म्हणतोस ?' 


दात नसलेल्या तोंडातुन आजी हरखुन बोलत होती.


मी गंमतीनं म्हणालो,'म्हातारे,न पाहिलेल्या लेकीला साडीचोळी, न पाहिलेल्या जावयाला अधिक महिन्याचं काहितरी गिफ्ट... आणि तुझ्या समोर उभ्या असलेल्या लेकाला काय ?' 


यावर ती आवेगानं माझ्या जवळ आली आणि माझं डोकं स्वतःच्या खांद्यावर टेकवत म्हणाली, 'माज्या सोन्या तुला अखंड आशिर्वाद ... !'


सुरकुतलेला तो हात आणि मळलेला तो पदर माझ्या अश्रुंनी भिजला नसता तरच नवल..! हा अखंड आशिर्वाद डोक्यावर घेवुन मी वाट बघतोय शुक्रवार च्या संध्याकाळची..!


याच संध्याकाळी आजी सुनिताताई ला भेटणार आहे...संध्याकाळीच दिवस आणि रात्रीची गळाभेट होत असते...  मी ही वाट बघतोय,माय लेकींच्या गळा भेटीची... ! सरत चाललेला सुर्य आणि उगवणारा चंद्र भेटतील याच दिवशी... !


मी ? .... मी कोण... ? 

मी फक्त अखंड आशिर्वाद घेतलेला.... 

साक्षीदार,या गळाभेटीचा ! 


बुधवार २३ सप्टेंबर २०२०


डाॕ.अभिजीत सोनवणे - भिक्षेकऱ्यांचे डॉक्टर

डाॕक्टर फाॕर बेगर्स

४/१२/२३

कफनीवाला आणि बिबळ्या.. Kafniwala and Leopard..

माझ्या या अपयशी मोहिमेवरून गारठलेल्या, थकलेल्या अवस्थेत रुद्रप्रयागची वाट उतरत असताना मी अतिशय निराश झालो होतो. अगदी कोणत्याही दृष्टीने पाहिलं तरी कमनशीबाने माझ्याबरोबर आणि आख्ख्या गढवाली जनतेबरोबर रडीचा डाव खेळला होता.

जिथे नरभक्षकाचा संबंध येतो तेव्हा या सर्व पहाडी मुलुखातली माणसं मला अतिंद्रिय शक्ती प्राप्त झालेली व्यक्ती मानतात;मला ते कितीही आवडत नसलं तरीही..!

मी त्यांच्या मदतीला येतोय ही बातमी इथे माझ्या आगमना अगोदरच पोचली होती.रुद्रप्रयागच्या कित्येक मैल अगोदर जी जी माणसं मला वाटेत भेटली,शेतात काम करत असताना ज्यांनी ज्यांनी मला पाह्यलं त्या सर्वांनी अतिशय विश्वास दाखवून मला ज्याप्रकारे शुभेच्छा दिल्या तो सर्व प्रकार अत्यंत हृदयस्पर्शी होता,पण तितकाच अस्वस्थ करणाराही ! जसजसा मी रुद्रप्रयागच्या जवळ येत गेलो तसतशी त्याची तीव्रता वाढतच गेली.

माझ्या रुद्रप्रयागमधल्या नाट्यमय प्रवेशाला जर कोणी साक्षीदार असता तर त्याला विश्वास ठेवणं कठीण गेलं असतं की मी एखादा जगज्जेता नसून स्वतःच्या मर्यादाचं भान असलेला एक सामान्य माणूस होतो! मला जाणीव होती की हे जे काही काम आपण हातात घेतलंय ते काम माझ्या ताकदीपलीकडचं आहे.अतिशय रौद्र,अवघड आणि पहाडी प्रदेशातल्या पाचशे चौ.मैलांमधल्या जवळजवळ पन्नास-साठ बिबळ्यांमधून नरभक्षकाला हुडकून त्याला मारायचं काम अशक्यप्रायच वाटत होतं आणि जसजसा मी हा नितांत सुंदर प्रदेश पहात गेलो तसतसं मला ते अधिकच अशक्य वाटायला लागलं.पण माझ्या ह्या भावना त्या लोकांपर्यंत पोचणं शक्य नव्हतं.त्यांच्या दृष्टीने कित्त्येक नरभक्षकाच्या तावडीतून इतरांना सोडवणारा अशी माझी प्रतिमा होती आणि आताही मी तशाच कामासाठी गढवालला आलो होतो. त्यातही,आल्यापासून २४ तासांच्या आत मी नरभक्षकाला माझ्याकडचा बोकड मारायला भाग पाडलं होतं आणि अंधार पडल्यावरही जंगलात राहायचा धोका पत्करून त्या बिबळ्याला अलकनंदा नदी ओलांडून नदीच्या या बाजूला यायला प्रवृत्त करू शकलो होतो.


या माझ्या पहिल्या यशानंतर त्या बाईचा बळी गेला होता.मी पुढची मनुष्यहानी टाळण्याचा माझ्या दृष्टीने खूप प्रयत्न केला होता पण तो फसला.या घटनेमुळेच मला लगेचच पुन्हा एकदा नरभक्षकाशी संपर्क साधण्याची संधी मिळाली होती.काल त्या गावातल्या माणसांबरोबर डोंगर चढत असताना माझ्या यशापयशाचा अंदाज बांधला तेव्हा मला खात्री वाटली की यशाची शक्यता दोनास एक तरी होती;अगदी या बिबळ्याची एका भक्ष्यावर दोनदा न येण्याची सवय माहीत असून व त्या अंधाऱ्या रात्रीत माझ्याकडे शूटींग लाईट नसूनसुद्धा! जेव्हा मी मायकेल कीनला गढवालला जाण्याची माझी तयारी आहे असं सांगितलं तेव्हा त्याने मला विचारलं होतं की आवश्यक ती सर्वसाधनसामग्री माझ्याकडे आहे का? जेव्हा त्याला समजलं की माझ्याकडे इलेक्ट्रिक शूटींग लाईटचीच कमी आहे व त्यासाठी मी कलकत्याला टेलिग्राम करणार आहे तेव्हा त्याने मला वचन दिलं की यासाठी शासनाकडून वाट्टेल ती मदत मिळेल व मी रुद्रप्रयागला पोचण्याच्या आत उत्कृष्ट दर्जाचा इलेक्ट्रिक शूटींग लाईट तेथे पोचला असेल.मी रुद्रप्रयागला पोचल्यानंतर जेव्हा मला कळलं की अजूनही लाईट आलेला नाही तेव्हा मला जरा वाईट वाटलं.पण रात्रीसुद्धा पुरेसं दिसण्याची माझी क्षमता गृहीत धरूनच मी यशापयशाचं गुणोत्तर दोनास एक असं तोललं होतं.म्हणूनच आज रात्री काम तमाम झालंच पाह्यजे या जिद्दीने मी बरोबर जास्तीची रायफल व शॉटगन घेतली होती. जेव्हा गंजीवरल्या माझ्या बैठकी

वरून मी समोरच्या एकूण दृश्याचा आढावा घेतला - कमी रेंजवरून शॉट घेण्याची संधी,माझा शॉट चुकला व बिबळ्या फक्त जखमी झाला तरी त्याला हमखास मृत्यूच्या दाढेत अडकवणारा गनट्रॅप- तेव्हा मात्र मला यशाची खात्री खूपच जास्ती वाटू लागली. पण... नंतरचं ते वादळ,माझ्या क्षमतेचाही काही उपयोग होऊ नये इतकी अंधारी रात्र आणि त्यात इलेक्ट्रिक लाईट नसणे... सरतेशेवटी प्रयत्न फसलाच व हे अपयश काही तासातच दहशतीखाली असलेल्या गढवालच्या रहिवशांना समजणार होतं ! थोडा व्यायाम,कढत पाण्याने आंघोळ आणि जेवण यामुळे नेहमी निराश मूडवर चांगला परिणाम होतो.डोंगर उतरून बंगल्यावर आल्यावर गरम पाण्याने आंघोळ आणि नंतर भरपेट नाश्ता झाल्यावर मी हळूहळू या 'कमनशीबाच्या' विचाराच्या गर्तेतून बाहेर आलो व एकूण सर्वच अपयशाचा सारासार विचार करायला लागलो.जमीनीत घुसलेल्या गोळीमुळे आलेलं नैराश्य हे वाळूवर सांडलेल्या दुधासारखंच होतं आणि जर अजूनही बिबळ्याने अलकनंदा नदी ओलांडली नसेल तर माझ्याकडे संधी होती कारण आता माझ्याकडे त्या शूर माणसाने वादळाची व मृत्यूची पर्वा न करता आणलेला लाईट होता.


आता त्या बिबळ्याने नदी ओलांडली आहे की नाही हे तपासणं सर्वप्रथम आवश्यक होतं.दोन झुलत्या पुलांवरून हे शक्य आहे याची खात्री असल्याने ब्रेकफास्ट झाल्यानंतर मी कामाला लागलो.डोक्यापासून काही इंचावरून सुसाटत गेलेल्या जड रायफलच्या बुलेटमुळे बिबळ्याला बसलेला धक्का कितीही जोरदार असला तरी त्यानंतर स्वच्छ उजेड पडण्याच्या मधला वेळ इतका कमी होता की तेवढ्या वेळात तिथून ते चटवापिपल पुलापर्यंतचा १४ मैल रस्ता पार करणं बिबळ्याला अशक्य होतं.त्यामुळे मी माझं सर्व लक्ष फक्त रुद्रप्रयागमधल्या पुलावरच केंद्रित करायचं ठरवलं.या पुलाकडे तीन वाटा येत होत्या.एक उत्तरेकडून,दुसरी दक्षिणेकडून आणि त्या दोन पायवाटांच्या मधून रुद्रप्रयाग बाजाराकडून येणारी चांगले मळलेली एक वाट होती.या पायवाटा तपासल्या

नंतर मी पूल ओलांडला आणि चांगल्या अर्ध्या मैलापर्यंत केदारनाथ रस्ता व तीन दिवसापूर्वी तो बोकड मारला गेला ती पायवाटही तपासली.बिबळ्याने नदी ओलांडली नाही याची खात्री झाल्यानंतर मी दोन्ही ब्रिज बंद करून त्या बिबळ्याला,नदीच्या माझ्या बाजूला स्थानबद्ध करण्याच्या नियोजनानुसार कामाला लागलो.योजना अतिशय साधी सरळ होती आणि नदीच्या या बाजूला पुलाच्या अगदी जवळ राहणाऱ्या रखवालदाराचं सहकार्य मिळालं तर हमखास यशस्वी होण्यासारखी होती.जवळ जवळ तीस मैल लांबीच्या मोठ्या पट्ट्यात नदीच्या दोन्ही तीरांवरच्या गावांमधलं दळणवळण व संपर्क तोडणं हे वाचताना फार कठीण वाटेल,पण प्रत्यक्षात तितकंसं कठीण गेलं नाही.

कारण नरभक्षकाने लादलेल्या संचारबंदीमुळे हा ब्रिज रात्रीच्या वेळात ओलांडण्याचं धैर्य तिथं कोणाकडेही उरलं नव्हतं.पुलाला आधार देणाऱ्या दोन्ही बाजूच्या पोलादी केबल्स ज्या टॉवर्सच्या आधाराने खेचल्या होत्या त्यांच्या कमानीमध्ये काटेरी झुडपं लावून ते बंद केले गेले.त्यानंतर ते बंद असल्याच्या व मी पहारा देत असल्याच्या काळात एकाही माणसाने पूल ओलांडायची परवानगीसुद्धा मागितली नाही.


मी डाव्या तीरावरच्या टॉवरवर एकूण वीस रात्री पहारा दिला व या रात्रींचा अनुभव मी कधीही विसरू शकणार नाही.नदीकाठच्या पुढे आलेल्या मजबूत खडकांवर ते टॉवर्स बांधले होते आणि त्या टॉवर्सवरचे आठ फूट लांब व चार फूट रुंद प्लॅटफॉर्म् स भन्नाट वाऱ्यामुळे गुळगुळीत झाले होते.टॉवर्सची उंची वीस फूट होती.या प्लॅटफॉर्मच्या वर पोचण्याचे दोनच मार्ग होते. मनोऱ्याच्या अगदी वरच्या बाजूला असलेल्या भोकातून जाणाऱ्या आणि पुढे साठ फुटांवर जमीनीत खोलवर गाडलेल्या केबल्सवरून लटकत जाणे किंवा एका तकलादू शिडीवरून चढून जाणे.मला दुसरा मार्ग त्यातल्या त्यात बरा वाटला.कारण त्या केबल्सवर एक घाणेरड्या वासाचं काळपट बुळबुळीत आवरण चढलं होतं;ते एकतर हाताला चिकटायचं किंवा कपडे कायमचे खराब होण्याची भीती होती.ही 'शिडी' म्हणजे सुतळीने सैलसर बांधलेल्या आडव्या समांतर काठ्या एकमेकांना जोडणारे विषम लांबीचे दोन बांबू होते.ही शिडी प्लॅटफॉर्मच्या खाली चार फुटांपर्यंतच पोचायची.सर्वात वरच्या काठीवर तोल सांभाळत उभं राहून गुळगुळीत प्लॅटफॉर्मवर माझे तळहात रोवून केवळ तेवढ्याच पकडीवर,

देवावर हवाला ठेवून त्या प्लॅटफॉर्मवर चढता यायचं,

हा प्रकार म्हणजे एक डोंबाऱ्याचा खेळ होता व तो दररोज खेळूनही माझी भीती काही कमी झाली नाही.हिमालयातल्या या भागातल्या सर्व नद्या उत्तरेकडून दक्षिणेकडेच वाहतात.आणि ज्या खोऱ्यातून त्या वाहतात त्या खोऱ्यातला वारा सूर्योदय तसेच सूर्यास्ताला दिशा बदलतो. दिवसाउजेडी हा वारा 'डाडू' म्हणून ओळखला जातो व तो दक्षिणेकडून उत्तरेकडे वाहतो.रात्री मात्र तो उलट्या दिशेने वाहतो.


मी प्लॅटफॉर्मवर जागा घेण्याच्या सुमारास हा वारा पडलेला असायचा.नंतर जसजसा प्रकाश कमी होत जाई तसतसा हलक्या झुळकीपासून सुरू होऊन त्याचा वेग वाढत जायचा आणि मध्यरात्रीपर्यंत त्याने झंझावाताचं रूप धारण केलेलं असे.प्लॅटफॉर्मवर आधाराला पकडण्यासाठी काहीच नव्हतं.घर्षण वाढवण्यासाठी किंवा वाऱ्याचा दाब कमी करण्यासाठी पालथं झोपलं तरी साठ फूट खाली खडकावर फेकलं जायची भीती असायचीच.

या खडकांवरून कोसळल्यावर तिथून सरळ अलकनंदाच्या गोठवण्याऱ्या पाण्यातच जलसमाधी! खरंतर साठ फूट खाली धारदार खडकांवर आपटल्यानंतर पाण्याच्या तापमानाबद्दल विचार करण्याची गरजच नाही, पण गंमतीशीर गोष्ट म्हणजे जेव्हा म्हणून मला खाली कोसळण्याची भीती वाटायची तेव्हा तेव्हा माझ्या मनात खडकाचा नव्हे तर गोठवणाऱ्या पाण्याचाच विचार यायचा! या त्रासाच्या भरीत भर म्हणजे त्या प्लॅटफॉर्मवर अगणित मुंग्या होत्या आणि त्या कपड्यांमध्ये शिरून कातडी सोलून काढायच्या.या वीस रात्रीमध्ये ती कमानीतीलं झुडुपं काढली जायची आणि आणि या सर्व काळात फक्त एकच प्राणी तो पूल ओलांडून गेला...

एक कोल्हा!


दरदिवशी पुलावर येताना माझ्या बरोबर माझी माणसं ती शिडी घेऊन यायची आणि मी शिडीवरून वर गेलो की माझ्या हातात रायफल दिल्यावर शिडी घेऊन निघून जायचे.दुसऱ्या दिवशी तिथे आलो तेव्हा आम्हाला एक ढगळ लाल पांढरी कफनी घातलेला माणूस दिसला. त्याच्या डोक्यावर,छातीवर काहीतरी चमकत होतं,हातात चांदीचा क्रॉस होता आणि तो केदारनाथच्या दिशेकडून येत होता.पुलावर पोचल्यावर तो माणूस वाकला व समोर क्रॉस धरून डोकं झुकवलं.अशा स्थितीत काही क्षण राह्यल्यावर त्याने क्रॉस उंच धरला,परत ताठ उभा राह्यला,

काही पावलं टाकली व परत वाकून डोकं झुकवलं.संपूर्ण पूल त्याने या पद्धतीने ओलांडला.माझ्या शेजारून जाताना त्याने सलाम केला पण तो त्याच्या प्रार्थनेत मग्न असल्याने मी त्याच्याशी काही बोललो नाही. डोक्यावरच्या आणि छातीवरच्या कपड्यांवर मगाशी जे काही चमकताना दिसत होतं ते चांदीचे छोटे छोटे क्रॉसच होते.या सर्व प्रकाराबाबत माझ्याप्रमाणेच माझ्या माणसांचीही उत्सुकता चाळवली गेली.तो नदीकाठचा चढ चढून रुद्रप्रयाग बाजाराच्या दिशेने जात असताना त्यांनी मला विचारलं की नक्की हा काय प्रकार असावा? तो कोणत्या देशातून आला असावा ? तो ख्रिश्चन होता हे तर उघड दिसत होतं पण आमचं प्रत्यक्ष संभाषण न झाल्याने बाकी काही तपशील कळला नव्हता. पण त्याचे लांब काळे केस,काळी कुळकुळीत दाट दाढी व चेहरेपट्टी ह्यावरून तो उत्तर भारतातलाच असावा असा माझा अंदाज होता.मॅनइटींग लेपर्ड ऑफ रुद्रप्रयाग मूळ लेखक - जिम कॉर्बेट,अनुवाद - विश्वास भावे,आरती प्रकाशन 


दुसऱ्या दिवशी सकाळी माझ्या माणसांनी आणलेल्या शिडीवरून उतरून बंगल्याकडे निघत असताना मला रस्त्यालगतच्या मोठ्या शिळेवर उभा राहून नदीकडे निरखून पाहत असलेली ती घोळदार डगल्यातील व्यक्ती परत दिसली.मला पाह्यल्यावर तो शिळेवरून उतरून माझ्याकडे आला आणि हसून ओळख दिली.मी त्याला इथे येण्याचा उद्देश विचारल्यावर तो म्हणाला की तो फार दूरवरून गढ़वाली लोकांना छळणाऱ्या सैतानी दुष्टात्म्या

पासून त्यांना मुक्ती देण्यासाठी आलाय.हे सर्व तो कसं काय करणार या माझ्या पुढच्या प्रश्नावर त्याने उत्तर दिलं की तो वाघाची एक प्रतिमा तयार करणार आहे व नंतर मंत्र म्हणून त्या दुष्टात्म्याला प्रतिमेत प्रवेश करायला भाग पाडणार आहे.त्यानंतर ती प्रतिमा गंगेमध्ये लोटून देणार आहे,तिथून ती वाहत वाहत सागराला मिळेल.त्यानंतर परत तो दुष्टात्मा इथल्या लोकांना त्रास देणार नाही.

त्याचा उद्देश तो सफल करू शकेल की नाही याबद्दल मला कितीही शंका असली तरी त्याने स्वतःहून स्वीकारलेल्या कार्याबद्दलची त्याची निष्ठा आणि विश्वास याचं मात्र मला मनोमन कौतुकच वाटलं. दररोज मी बंगल्याकडे निघत असताना तो तिथे आलेला असायचा व संध्याकाळी टॉवरवर परत यायचो तेव्हाही तो त्याचे बांबू,

दोऱ्या,रंगीबेरंगी कापडं- चिंध्या यांच्या सहाय्याने 'वाघ' बनवण्याच्या कामात मग्न असायचा.त्याचं काम जवळपास पूर्ण झालेलं असताना एकदा मोठं वादळ आलं आणि त्याची ती कलाकृती पूर्ण उद्ध्वस्त झाली. पण... ठीक आहे... गाणी गुणगुणत पुन्हा एकदा त्याने त्याचं काम सुरू केलं! सरतेशेवटी घोड्याएवढ्या आकाराचा व कोणत्याही प्राण्याशी साधर्म्य न साधणारा असा तो 'वाघ' त्याच्या पसंतीस उतरेल इतपत तयार झाला.

कुठल्याही प्रकारचा 'तमाशा' चालला असेल तर एकतरी पहाडी माणूस त्याची मजा चाखल्याशिवाय राहील काय? एका लांब काठीला तो 'वाघ' बांधून जेव्हा त्याला नदीकाठची उतरंड उतरून नदीच्या वाळवंटावर नेलं जात होतं तेव्हा जवळपास शंभर-दीडशे माणसं त्या वरातीत सामील झाली होती आणि त्यातले काही जण भांडी,ढोल-ताशे व तुताऱ्या वाजवत होते.नदीच्या वाळवंटात ती प्रतिमा सोडण्यात आली. डोक्यावर तसेच छातीवर क्रॉसेस लावलेला आणि हातात सहा फूट उंच क्रॉस घेतलेला तो माणूस वाळूत गुडघ्यावर बसला आणि अतिशय तन्मयतेने मंत्र म्हणून त्याने त्या दुष्ट्यात्म्याला त्या प्रतिमेत प्रवेश करायला भाग पाडलं.शेवटी तुताऱ्या,ढोल यांच्या गजरात ती भलीथोरली प्रतिमा गंगेच्या प्रवाहात लोटण्यात आली. मिठाई,फुलं यांचा नैवेद्य अर्पण करून शेवटी ती प्रतिमा तिच्या सागराकडच्या अंतिम प्रवासाला लागली.दुसऱ्या दिवशी तो साधू तिथं दिसला नाही.तेव्हा नदीवर सकाळी आंघोळीला आलेल्या काही माणसांना मी विचारलं की तो ढगळ कफनीवाला कुठे आहे, तो कुठे गेला? त्यावर ते म्हणाले, 'साधूपुरुष कुठून येतात हे कुणी सांगू शकेल का साहेब? आणि कोठे चाललात असा प्रश्न तरी त्यांना कोण विचारू शकतो का?'


कपाळाला चंदनाचा गंध लावलेली,त्याला साधूपुरुष म्हणणारी व कालच्या समारंभात भाग घेतलेली सर्व मंडळी हिंदू होती! पासपोर्ट,ओळखपत्र बगैरे काहीही प्रकार अस्तित्वात नसलेल्या आणि धर्माचा प्रभाव असणाऱ्या या देशात भगवी कफनी घालून,भिक्षेचा कटोरा हातात घेऊन किंवा छाती व डोक्याला क्रॉस लावून कोणीही माणूस अगदी खैबरखिंडीपासून ते कन्याकुमारीपर्यंत सहज भटकू शकेल... आणि त्याला कोणताही प्रश्न विचारला जाणार नाही याबद्दल माझी खात्री आहे.


३१.१०.२३ या लेखमालेतील पुढील भाग..

२/१२/२३

मध्ययुगातलं बायॉलॉजी.. Biology in the Middle Ages..

मध्ययुगात ख्रिश्चन धर्मानं बराच जोर धरला होता.जिथे जिथे ख्रिश्चन गेले तिथे तिथे त्यांनी आपल्या धर्माचा प्रसार केला.ग्रीसमध्ये आयोनियनांनी विज्ञानाचा पाया घातला होता.त्याला ख्रिश्चनांचा विरोध नव्हता,पण विश्वाची निर्मिती किंवा त्यातल्या सजीवांची निर्मिती यांची मुळं आपण शोधू नयेत असं त्यांचं मत होतं.त्यांच्या मते हे म्हणजे देवाच्या कामात माणसानं ढवळाढवळ करण्यासारखंच होतं.आणि नेमका हाच म्हणजे निसर्गाचे नियम शोधण्याचा घाट ग्रीकांनी घातला होता. 

आणि आता सगळीकडेच ख्रिश्चनधर्मीयांचं वर्चस्व होतं.

त्यामुळे विशुद्ध जीवशास्त्राचा (बायॉलॉजी) अभ्यास करणं दुरापास्तच झालं होतं.त्यामुळे हे विश्व आणि माणूस कसे निर्माण झाले याचे नियम प्रयोग करून शोधण्यापेक्षा बायबलमध्ये शोधावेत असं त्यांना वाटत होतं! निसर्गाचे नियम देव आणि त्याचे देवदूत असलेले संत यांनाच कळतात आणि त्यांनाच त्यात बदल करण्याचे अधिकार आहेत.आपण माणसांनी ते शोधायचा विचार करू नये अशी ख्रिश्चनांची समजूत होती.या सगळ्या वातावरणामुळे एकूणच विज्ञानाची,कलांची आणि सगळ्या समाजाचीच प्रगती खुंटली होती.यामुळेच या काळाला 'डार्क एजेस' म्हणतात.पण याही काळात काही विद्वानांनी आहे ते ज्ञान जतन करायचा प्रयत्न केला,हे विशेष! अर्थात,या काळात सगळीकडेच अंधकार होता असं नाही. अरब प्रांतात अनेक प्रकारचे अभ्यास या काळात चालू होते.अरबांनी मुहम्मद पैगंबरांच्या नेतृत्वाखाली इस्लाम धर्म स्वीकारला होता. आणि ते अरब पेनिन्सुलाच्या बाहेर आले आणि नैऋत्य आशिया आणि उत्तर आफ्रिका या भागांत वस्ती करायला लागले. इ.स. ७३० मध्ये, मुहम्मदांच्या काळाच्या एक शतकानंतर मुस्लिम अशा ठिकाणी पोहोचले,की त्यांच्या पूर्वेला कॉन्स्टॅन्टिनोपल आणि पश्चिमेला फ्रान्स होता. त्यामुळे त्यांना ख्रिश्चनांपासून कायमच धोका होता.

पण उलट त्यांनी गेलन आणि ॲरिस्टॉटल यांनी केलेल्या लिखाणाचं अरेबिक भाषेत भाषांतर करून पाश्चिमात्यांना पाठबळच दिलं.ते फक्त भाषांतर करूनच थांबले नाहीत तर त्यांनी त्या काळी उपलब्ध असलेल्या जवळपास सगळ्या वैज्ञानिक आणि वैद्यकीय ज्ञानाचा अभ्यास केला आणि त्यावर टीकात्मक लेखनही केलं! यापैकी सगळ्यात महत्त्वाचा बायॉलॉजिस्ट दहाव्या-अकराव्या शतकात होऊन गेलेला अबु अली अल हुसेन इब्न सिना (९८०-१०३७) हा होता.पाश्चिमात्यांनी त्याचंही नाव लॅटिनाइझ केलं.आज आपण सगळेच त्याला 'अविसेना' म्हणून ओळखतो! अविसेनाचा जन्म आताच्या पर्शियामध्ये झाला.अविसेनानं एकूण तब्बल ४५० पुस्तकं लिहिली.आता त्यापैकी फक्त २४० च उपलब्ध आहेत.

त्यापैकी १५० तत्त्वज्ञानावरची आहेत आणि ४० हिप्पोक्रॅट्स,ॲरिस्टॉटल आणि सेल्सस यांच्या वैद्यकीय थिअरीजवर लिहिलेली पुस्तकं आहेत.बाकीची पुस्तकं गणित, खगोलशास्त्र,झूऑलॉजी,बॉटनी,मेटाफिजिक्स, भौतिकशास्त्र,संगीत आणि काव्य या विषयांवर लिहिलेली आहेत.त्यानं वयाच्या फक्त २१व्या वर्षी लिहायला सुरुवात केली होती!


अविसेना हा लहानपणापासूनच अत्यंत अभ्यासप्रिय आणि मेहनती होता.वयाच्या दहाव्या वर्षीच त्याचं संपूर्ण कुराण पाठ झालं होतं! त्यानंतर तो ॲरिस्टॉटलच्या मेटॅफिजिक्स म्हणजे अध्यात्माकडे वळला.पण या वयात अध्यात्म ते काय कळणार? त्यालाही ॲरिस्टॉटलच्या मेटाफिजिक्समधल्या आध्यात्मिक संकल्पना कळायच्या नाहीत.मग तो रात्रभर त्या पुनःपुन्हा वाचायचा.एक वेळ अशी आली होती,की त्याचं संपूर्ण पुस्तक पाठ झालं, पण त्यातल्या संकल्पनांचे अर्थच त्याला कळत नव्हते.मग शेवटी हताश होऊन तो मशिदीत जाऊन बसला आणि मला का कळत नाही, मला वाचलेलं समजू दे,माझ्या डोक्यात ज्ञानाचा प्रकाश पडू दे अशी प्रार्थना तो ओंजळ पसरून अल्लाकडे करत राहिला. रात्रभर अशी प्रार्थना करता करता सकाळ उजाडल्यावर तो घरी जायला निघाला.तेव्हा त्याला रस्त्यावरच्या एका पुस्तकांच्या दुकानात ॲरिस्टॉटलचं मेटाफिजिक्स सोप्या भाषेत सांगणारं पुस्तक चक्क रद्दीच्या भावात मिळालं ! आपल्यासाठी मौल्यवान असलेलं असं पुस्तक अगदीच फुटकळ किमतीला विकत मिळाल्यानं त्याला इतका आनंद झाला,की त्यानं आपल्या खिशात असलेल्या बाकीच्या सगळ्या पैशाचं अन्न खरेदी करून गोरगरिबांना दान करून आपला आनंद साजरा केला! या वेळी अविसेनाचं वय फक्त पंधरा वर्ष होतं! या वयातली अविसेनाची ज्ञानाची लालसा आणि सामाजिक जाणीव पाहून त्याचं कौतुक वाटतं.ॲरिस्टॉटलचं मेटाफिजिक्स समजून घेतल्यानंतर त्यानं आपला मोर्चा वैद्यकाकडे वळवला.गंमत म्हणजे वैद्यकशास्त्र त्याला चक्क मेटाफिजिक्स आणि गणितापेक्षाही सोपं वाटलं.त्यामुळे त्यानं ते लगेचच आत्मसात केलं,आणि तो रोग्यांवर उपचारही करायला लागला.अनेकदा गोरगरिबांवर उपचार करताना त्याला त्यांची दया यायची.त्यामुळे तो त्यांच्याकडून कसलीही फी घ्यायचा नाही.उपचार करताना अविसेनानं मानवी शरीरशास्त्राचा अभ्यासही केला.आणि स्वतःचं संशोधनही केलं होतं,त्यातूनच त्यानं प्रचंड मोठं ग्रंथभांडारच निर्माण केलं.त्याचं 'बुक ऑफ हिलिंग' आणि 'कॅनन ऑफ मेडिसीन' हे दोन ग्रंथ जवळपास १७व्या शतकापर्यंत अरेबिक वैद्यकशास्त्रात संदर्भग्रंथ म्हणून वापरले जात होते.


वयाच्या ५७ व्या वर्षीं अविसेनाच्या पोटात कॉलिक्स झाले. त्यावर त्यानं स्वतःच औषधी काढ्याचे डोस एनिमा म्हणून घ्यायचे ठरवले. हे औषध स्वतः अविसेनानंच तयार केलं होतं. पण या औषधामध्ये एनिमा देणाऱ्या मदतनिसानं चुकून किंवा हेतुपुरस्सरविष मिसळलं.आणि त्यातच अविसेनाचा रमादानाच्या पवित्र महिन्यात मृत्यू झाला. अविसेनाच्या मागे त्यानं लिहून ठेवलेल्या वैद्यकाचं आणि इतर ज्ञानाचं प्रचंड भांडार मात्र डार्क एजेसमधला अंधार बाजूला सारायला पुढच्या पिढ्यांसाठी दीपस्तंभासारखं मार्ग दाखवत उभं राहिलं.याचाच प्रभाव अरबांच्या पुढच्या पिढीतल्या एका वैज्ञानिकावर होणार होता.तो म्हणजे इब्न अल नफीस हा होता.माणसाच्या शरीरात मुळात रक्त तयार कसं होतं आणि मग ते कसं वापरलं जातं यासंबंधीचा अभ्यास वैद्यकशास्त्रात अनेकांनी केला.यातूनच रक्त माणसाच्या शरीरातल्या अनेक कामांसाठी वापरलं गेल्यानंतर अशुद्ध होतं हेही संशोधकांच्या लक्षात आलं.याबद्दल इब्न अल्-नफीस (१२१३-१२८८) यानं आपल्या हृदयाचं काम कसं चालतं या प्रक्रियेवर अगदी सुरुवातीला अभ्यास केलेला होता. इब्न-अल-नफीसचं पूर्ण नाव वाचायचं असेल तर जरा श्वास रोखूनच घरावा लागतो : 


अला अल-दिन अबू अल हसन अली इब्न अबि-हज्म अल-कार्शी अल- दिमाश्की ! 


नशिबानं याऐवजी त्याला इब्न अल्-नफीस या नावानं संबोधलं तरी पुरतं! सीरियातल्या दमास्कसमध्ये जन्मलेला आणि इजिप्तच्या कैरोमध्ये नंतर काम केलेला इब्न-अल्-नफीस हा काय काय असावा? फिजिशियन, शरीररचनातज्ज्ञ (म्हणजे ॲनॅटॉमिस्ट), शरीरक्रियातज्ज्ञ (म्हणजे फिजियॉलॉजिस्ट), शल्यविशारद (म्हणजे सर्जन),डोळ्यांच्या विकारांचा तज्ज्ञ,संपूर्ण कुराण तोंडपाठ असल्यामुळे हफीझ या मुस्लिमांमध्ये सन्मानानं घेतलं जाणारं नाव मिळवणारा इस्लाम जीवनशैलीचा पूर्ण तपशील तोंडपाठ असल्यानं मुस्लिमांमध्ये हडिथ स्कॉलर मानला जाणारा, सुन्त्री पंथातल्या आचरणासंबंधीचा वकील आणि न्यायाधीश,इस्लामिक विचारवंत, तर्क शास्त्रात प्रवीण,कादंबरीकार, मानसोपचारतज्ज्ञ,

समाजकार्य करणारा, शास्त्रज्ञ, विज्ञानकथालेखक, खगोलशास्त्रज्ञ, अंतराळाविषयीच्या माहितीत प्रवीण असलेला, भविष्यवेत्ता,भूगर्भशास्त्रज्ञ,भाषाशास्त्रज्ञ, व्याकरणतज्ज्ञ आणि इतिहासकारसुद्धा! हुश्श! अशा लोकांबद्दल वाचलं की खरंच कमाल वाटते. खरं तर इब्न अल नफीसच्या संपूर्ण व्यक्तिमत्त्वाचाच अभ्यास करायला हवा. पण आपण सध्या फक्त त्यानं बायॉलॉजीत

काय केलं ते पाहू,आपल्या शरीरात असलेली पल्मनरी सर्क्युलेशन नावाची यंत्रणा दूषित रक्त शुद्ध करायच्या कामात मदत करते.या यंत्रणेचा खोलात जाऊन अभ्यास करण्यात इब्न अल्-नफीसचा मोठा वाटा होता.आजारी माणसाला बरं करण्यासाठी त्याच्यावर औषधांचे प्रयोग करून बघावेत असं त्याला वाटे.तसंच माणसाच्या मृत्यूनंतर त्यामागचं कारण शोधण्यासाठी त्याचं शरीरविच्छेदन केलं जावं असं त्या काळात सनसनाटी वाटावं असं मत त्यानं मांडलं होतं.आपली अन्नपचन प्रक्रिया नीट राहते ती चयापचय प्रक्रियेमुळे (मेटॅबॉलिझममुळे).या प्रक्रियेत आपण खाल्लेल्या अन्नाचं नीट विघटन होऊन त्याचं आपल्या शरीराचं काम नीट चालण्यासाठीच्या ऊर्जेत होत असतं. या प्रक्रियेचं विस्तारानं वर्णन प्रथमच केलं ते इब्न-अल्-नफीसनंच..


 माणसाच्या शरीररचनेशी संबंधित असलेल्या आधीच्या अनेक अर्धवट माहितीवर आधारलेल्या चुकीच्या संकल्पना त्यानं मोडीत काढल्या.तसंच त्यानं धार्मिक विषयांवरही भरपूर लिखाण केलं. पण या लिखाणामागचा उद्देश मुख्यत्वे विज्ञान आणि त्याचा रोजच्या आयुष्यातला वापर यांची सांगड घालणं हा होता.त्यासाठी त्यानं मग विज्ञानकथाही लिहिल्या.त्या काळी साध्यासुध्या आजारांवर उपाय म्हणून वाइन प्यावी असा सल्ला काही वैद्य देत असत.पण इब्न अल्-नफीसनं त्यावर कडाडून टीका केली. यामागे त्याचे वैज्ञानिक आणि धार्मिक असे दोन्ही विचार कारणीभूत होते.गेलननं माणसाच्या नाडीविषयीही चुकीची माहिती लिहून ठेवली होती.माणसाच्या हृदयातलं शुद्ध रक्त शरीराच्या इतर अवयवांकडे नेणाऱ्या रोहिण्यांमधली नाडीसारखी गती असणारी प्रक्रिया ही सतत सुरूच असते आणि या रोहिण्यांची हालचाल ही आपोआप,म्हणजे नैसर्गिकरीत्याच होत असते असं गेलनचं मत होतं. हे म्हणणं खोडून काढत इब्न-अल्-नफीसनं म्हटलं,की या नैसर्गिक प्रक्रियेबरोबरच हृदयानं या रोहिणीकडे रक्त पाठवल्यामुळेही हे होत असतं.म्हणजेच हृदय जेव्हा फुगतं तेव्हा रोहिण्यांचा आकार निमुळता होतो,आणि हृदयानं रक्त बाहेर टाकलं की ते छोटं होतं आणि रोहिण्या फुगतात.म्हणजेच हृदय आणि रोहिण्या एकाच वेळी फुगतात आणि निमुळत्या होतात हा गेलननं पसरवलेला गैरसमजही इब्न अल्-नफीसनं दुरुस्त केला. याउलट जेव्हा त्यांच्यापैकी एक जण फुगतो तेव्हा दुसरा निमुळता होतो हा वैद्यकशास्त्राच्या दृष्टीनं महत्त्वाचा शोध त्यानं लावला.तसंच आपल्या नाडीच्या ठोक्यांचं महत्त्व काय असतं हेही त्याला या अभ्यासातून उमगलं.आपली नाडी सुरू असते याचाच अर्थ आपलं हृदय आपल्या शरीरातल्या इतर अवयवांकडे एखाद्या पंपानं पाणी उपसून शेतात फवारावं तसं रक्त जणू फवारतच असतं,हा अतिशय मोलाचा शोध त्यानं लावला.जितके ठोके जास्त तितका आपल्या हृदयावरचा ताण जास्त आणि म्हणून आपलं हृदय तितकंच धोक्याच्या प्रवासाकडे चाललं आहे असं समजावं हा विचार त्यातूनच आला.माणसाच्या हृदयाखाली हाडं असतात असंही गेलननं लिहून ठेवलं होतं.तेही इब्न-अल्-नफीसनं चुकीचं असल्याचं सिद्ध करून दाखवलं.त्याशिवाय माणसाच्या शरीरातल्या अनेक अवयवांबद्दल गेलननं लिहून ठेवलेले गैरसमज त्यानं दूर केले.माणसाच्या शरीरात महत्त्वाचे म्हणावे असे एकंदर ५२९ स्नायू असतात असा अंदाज इब्न-अल्-नफीसनं बांधला होता.१२३६ साली इब्न-अल्-नफीसनं कैरोचा रस्ता पकडला.तिथं त्यानं सुरुवातीला अल-नसरी नावाच्या इस्पितळात नोकरी केली.तिथून तो अल्-मन्सुरी इस्पितळात गेला आणि तिथला प्रमुख डॉक्टर बनला.

१२४२ साली वयाच्या २९ व्या वर्षी त्यानं शरीरशास्त्राशी संबंधित अनेक नव्या गोष्टींची माहिती देणारं पुस्तक लिहिलं. पुढच्या दोन वर्षांमध्ये त्यानं वैद्यकशास्त्राशी संबंधित असलेल्या आपल्या ग्रंथाचे चक्क ४३ खंड पूर्ण करून छापलेसुद्धा! पुढच्या काही दशकांमध्ये त्यानं या विषयातली उरलेली सगळी माहिती पूर्ण करण्यासाठी टिपणं काढली.ती सगळीच्या सगळी एकत्र छापली असती तर इब्न-अल्-नफीसच्या ग्रंथाचे एकूण तब्बल ३०० खंड बाजारात आले असते!पण त्याच्या हयातीत यातले आधीचे ४३ आणि आणखी ३७ असे ८०च खंड प्रकाशित होऊ शकले. तरीही बराच काळ त्याचा हा ग्रंथ म्हणजे वैद्यकशास्त्रातला सगळ्यात परिपूर्ण कोष मानला जाई.या ग्रंथाची भन्नाट विक्री झाल्यामुळे इब्न-अ-नफीस श्रीमंत झाला होता. मिइन्न-अल-नफीसच्या काही थिअरीज मात्र एकदम भन्नाट होत्या. 

स्त्रीच्याशरीरात गर्भ कसा अंकुरतो याविषयी त्यानं गेलनवर केलेली टीकाही गंमतशीरच होती। स्त्री आणि पुरुष या दोघांच्याही शरीरात वीर्य असतं असं इब्न अल्-नफीस म्हणे.तसंच वीर्यात गतिशील तसंच स्थिर राहणारी अशी दोन प्रकारची वेगवेगळी बीजं असतात असं गेलनला वाटायचं.तसंच स्त्रीच्या वीर्याच्या तुलनेत पुरुषाच्या वीर्यात क्रियाशील बीज मात्र जास्त प्रमाणात असतात असं गेलननं लिहिलं होतं. इब्न-अल्-नफीसनं मात्र गेलनचं हे मत चुकीचं असल्याचं सांगितलं.त्यानं याबाबतीत लिहून ठेवलेलं वर्णन गंमतशीर होतं : स्त्री आणि पुरुष या दोघांच्याही वीर्यात फक्त स्थिर बीजंच असतात.गतिशील बीजं अजिबातच नसतात, पण जेव्हा पुरुषाचं गरम वीर्य स्त्रीच्या शरीरात जातं तेव्हा स्त्रीच्या वीर्याचा थंडावा या वीर्यांना एकमेकांमध्ये मिसळून जायला मदत करतो. आणि या मिश्रणातून पुढे काय घडणार हे फक्त देवच ठरवू शकतो.त्याला वाटेल त्या प्रकारे मग यातून स्त्रीच्या शरीरात गर्भ तयार होतो,आणि त्याला पुढे अवयव वगैरे फुटतात...अर्थात,हे नेमकं कसं घडतं ते देव नव्हे तर पुढे येणारे वैज्ञानिकच सांगणार होते! इब्न-अल-नफीसनं माणसाचा जीव आणि आत्मा या गोष्टी पूर्णपणे वेगळ्या आहेत अशा अर्थाचीही विधानं केली होती.ॲरिस्टॉटलच्या मते माणसाचा आत्मा नावाची गोष्ट माणसाच्या हृदयात असते.पण हे मत चुकीचं ठरवत माणसाचा आत्मा ही कुणा एका किंवा काही ठरावीक अवयवांची मक्तेदारी नसून,तो शरीरातल्या सगळ्याच अवयवांचा मिळून बनलेला असतो असं मत इब्न अल्-नफीसनं व्यक्त केलं!तसंच माणसाच्या मेंदूचं तापमान हे त्याच्या हृदयाच्या तापमानापेक्षा कमी असतं असंही इब्न-अल्-नफीसला वाटे.तसंच आपलं हृदय आपल्या हालचाली,संवेदना,आणि विचारशक्ती या गोष्टी नियंत्रित करतं हा तोपर्यंतचा चुकीचा समजही खोडून काढत प्रत्यक्षात आपला मेंदू या गोष्टी करत असतो हा महत्त्वाचा विचारही त्यानं रुजवला.


या सगळ्याखेरीज त्याची काही मतं धार्मिक दुराग्रहानं भारलेलीही असत.उदाहरणार्थ,काही मुस्लिम माणसांना दारू प्यायचं व्यसन असल्यामुळे आणि काहींचे समलिंगी संबंध असल्यामुळे इस्लामिक देशांवर शत्रूची आक्रमणं झाली असं विचित्र मत त्यानं मांडलं होतं.पण याबरोबरच त्याची काही मतं आजही लागू पडतील अशी आहेत.

उदाहरणार्थ,माणसाची प्रकृती नीट राहावी म्हणून औषधं घेत बसण्यापेक्षा आहारावर नियंत्रण ठेवणं जास्त गरजेचं आहे असं त्यानं म्हणून ठेवलं होतं.गंमत म्हणजे इब्न-अल्-नफीसनं प्रदूषणा

विषयीही प्रबंध लिहिले होते! याचाच अर्थ त्या काळीही प्रदूषण तरी असलं पाहिजे किंवा इब्न अल्-नफीसची दूरदृष्टी तरी तीक्ष्ण असली पाहिजे.


इब्न-अल्-नफीस सतत फिरतीवर असे.शेवटी त्यानं हमादानमध्ये स्थायिक व्हायचं ठरवलं, तिथल्या आजारी राजाला त्यानं बरं केल्यामुळे त्याची तिथला पंतप्रधान म्हणून नेमणूक झाली. पण तिथल्या सैनिकांनी या निर्णयाला विरोध केला आणि इब्न-अल्- नफीसची त्या पदावरून तत्काळ हकालपट्टी होऊन त्याला थेट तुरुंगात टाकलं गेलं! पण सुदैवानं आता तिथला राजपुत्र आजारी पडला.त्यामुळे इब्न-अल्-नफीसला पुन्हा तुरुंगातून राजवाड्यात स्थान मिळालं! नंतर राजा वारल्यावर त्यानं ते गाव सोडून पुन्हा आपल्या प्रवासाला सुरुवात केली.

जेव्हा तो खूपच दगदग करतोय आणि त्याचा त्याच्या तब्येतीवर दुष्परिणाम होईल असं त्याच्या मित्रांनी त्याला सुचवलं.. तेव्हा त्यानं 'मोठं पण एकसुरी आयुष्य जगण्यापेक्षा मी छोटं पण बहुआयामी आयुष्य जगणं पसंत करेन' असं उत्तर दिलं!


तो काळ म्हणजे सीरिया आणि इजिप्त यांच्यामध्ये सुरू असलेल्या धुमश्चक्रीचा होता. तत्कालीन समजुतींप्रमाणे इब्न अल्-नफीसच्या मते हे सगळं मुस्लिम लोकांनी अधर्माचं वर्तन केल्यामुळे होत होतं.दुर्दैवानं या लढायांमध्ये विज्ञान विषयाची अनेक उत्तमोत्तम पुस्तकं बेचिराख झाली.त्यामुळे खचून न जाता इब्न अल्-नफीस आणि अन्य मुस्लिम संशोधकांनी नव्यानं काही पुस्तकं लिहिली.त्यामुळे विज्ञानाची वाढ खुंटली नाही आणि या बाबतीतल्या इतिहासातल्या नोंदीही बऱ्यापैकी बचावल्या.

१२६० ते १२७७ या काळात त्यानं सुल्तान बेबर्सचा खासगी वैद्य ही राजकीय पातळीवरची भूमिका बजावली. १२८८ सालच्या अखेरीला इब्न अल्-नफीस जग सोडून गेला,त्यापूर्वी त्यानं आपल्यामागे आपलं घर, वाचनालय आणि इस्पितळ या गोष्टी मन्सुरिया नावाच्या इस्पितळाला दान केल्या जाव्यात असं लिहून ठेवलं होतं.आज जरी इब्न-अल्-नफीसचे काही विचार मजेशीरच नव्हे तर वेडगळसुद्धा वाटत असले तरी कित्येक शतकांपूर्वीच्या काळात त्यानं वैद्यकीय बाबतींमध्ये इतका खोलात विचार केला, हे त्याचं खूप मोठं योगदानच म्हटलं पाहिजे !


त्या काळापर्यंत पश्चिम युरोपातल्या या लाटेनं पुन्हा वेगळं वळण घेतलं होतं.ख्रिश्चन सैन्यानं सिसिली जिंकून घेतलं होतं.या आधीची दोन शतकं इथे मुस्लिमांनी राज्य केलं होतं आणि आता अकराव्या शतकात ख्रिश्चन सैन्यानं निअर ईस्टमधल्या धर्मयोद्ध्यांचा ताबा घ्यायला सुरुवात केली होती.पण गंमत म्हणजे आक्रमण करून जिंकून घ्यायच्या नादात अरब प्रांतामध्ये आलेल्या ख्रिश्चनांना इथले मुस्लिमही पुढारलेले आहेत हे लक्षात आलं.आणि ते फक्त हुशारच नाहीत तर कित्येक बाबतींत आपल्या

पेक्षाही पुढारलेले आहेत असं त्यांच्या लक्षात आलं. त्यानंतर मात्र युरोपियनांनी अरबांचं ज्ञान आपल्या भाषेत उतरवून घ्यायला सुरुवात केली. हे ज्ञान मूळच्या ग्रीक पुस्तकांतूनच अरब भाषेत आलं होतं आणि अरबांनी ते जपून ठेवलं होतं.हे भाषांतर करायचं महत्त्वाचं काम करणाऱ्यांपैकी इटलीचा गेरार्ड ऑफ क्रिमोना (१११४ ते ११८७) हा सगळ्यात महत्त्वाचा भाषांतरकार होता. त्यानं हिप्पोक्रॅट्स, गेलन आणि ॲरिस्टॉटल यांचं लिखाण लॅटिनमध्ये भाषांतरित केलं.तेराव्या शतकातला अल्बर्ट्स मॅग्नस हा जर्मन धर्मगुरू तर ॲरिस्टॉटलच्या पुनरुज्जीवित झालेल्या ज्ञानाच्या प्रेमातच पडला. त्यानं हे ज्ञान पुढे चालवायचा वसाच घेतला आणि त्यानं चक्क ॲरिस्टॉटलची शिकवण अनेकांना द्यायला सुरुवात केली. त्यातूनच अक्किनाज नावाचा अल्बर्ट्सचा एक विद्यार्थी ॲरिस्टॉटलच्या विचारांनी भारावूनच गेला होता.आणि आता जे काही देवधर्म चाललंय ते सोडून आपण विज्ञानाच्या मार्गानं खऱ्या ज्ञानाचा मार्ग स्वीकारायला हवा आणि तेच मनुष्यजातीच्या कल्याणाचं आहे.आणि यातूनच विज्ञानाला पुन्हा तार्किक,जडवादी दृष्टीनं पाहण्याचा पाया रचला गेला.


१५.०९.२३ या लेखमालेतील पुढील भाग