* विजय गायकवाड | Vijay Gaikawad

live

नमस्कार आपले स्वागत आहे. 'सगळे जण तुम्हाला शोधत येतील.आनंदाने तुडुंब भरलेली माणसे सर्वांनाच आवडतात! पण ते तुम्हाला दुःखी,उदास अशा अवस्थेत पाहू शकत नाहीत! तेव्हा आनंदी-हसतमुख रहा आणि मित्रांचा सहवास वाढवा! जर तुम्ही दुःखी राहिलात तर मात्र सगळे जण तुम्हाला सोडून जातील. जीवनातील आनंद-प्रसन्नता भरभरून वाटा! पण एकटे दुःखी रहाल, तर त्या दुःखातच बुडून जाल !' सॉलिट्यूड, ईला व्हीलर विलकॉक्स जगण्याच्या तयारीसाठी नव्हे तर,जगण्यासाठी माणूस जन्माला आला आहे,असं 'बोरिक पास्तरनाक' यांनी म्हटलेलं आहे.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! वाचन हे आहाराहून जास्त महत्त्वाचे असते.जिम र्‍होम यांनी अँथोनी रॉबीन्स यांना शिकवले होते की 'एक वेळ रोजचे जेवण चुकव,पण वाचन अजिबात चुकवू नको.' याप्रमाणे मी अखंडपणे वाचत आहे. माणसांपासून माणसांपर्यंत जाण्याचा,प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाण्याचा जीवनाचा राजमार्ग पुस्तकातून जातो. कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात. पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये. म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,कवी सचिन शिंदे,संतोष शेळके,अनिल फारणे,सहित प्रकाशन,डॉ.रवींद्र श्रावस्ती,डॉ.सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,संजय बापट,मनोहर सुर्वे,विनायक पाटील,संतोष पाटील,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, मेनन पिस्टन रिंग मधील सहकारी मित्र शेखर सुर्यवंशी..। पुस्तकातील घटना प्रसंग हे मी लिखित स्वरूपात सध्या व्हाट्सअप वरती टाकत असतो.हे सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी,पुस्तके देणारी लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत. ... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ. मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. विजय कृष्णात गायकवाड

२७/१/२४

मानवी शरीराचे विच्छेदन.. Dissection of the human body

मध्ययुगाच्या शेवटी शेवटी इटलीमध्ये पुन्हा मानवी शरीराचं विच्छेदन करायला सुरुवात झाली.खरं तर ही सुरुवात भलत्याच गरजेपोटी झाली होती.त्या काळी इटलीमधली सालेर्नो आणि बोलोना ही विद्यापीठं गाजत होती.तिथे अनेकदा संशयास्पद मृत्यू झालेल्या केसेस सोडवण्यासाठी यायच्या.त्यामुळे या व्यक्तीचा मृत्यू कसा झाला हे कदाचित पोस्टमार्टेम केल्यानंतर योग्यप्रकारे कळू शकेल आणि त्यातून पीडित व्यक्तीला योग्य न्याय आणि गुन्हेगाराला योग्य शिक्षा मिळेल असं वाटायला लागलं.यामुळे मग कायद्याच्या या गरजेपोटी मानवी शवविच्छेदनाला (डिसेक्शनला / पोस्टमार्टेमला) परवानगी मिळाली.


अशा त-हेनं डिसेक्शनला परवानगी मिळाली तरी स्वतंत्र संशोधनाला अजूनही परवानगी नव्हती.त्या वेळची डिसेक्शन्स ही फक्त गेलन, ॲरिस्टॉटल आणि अविसेना यांनी मांडलेली तत्त्वं पुन्हा शिकण्यासाठीच केली जायची.

त्या काळचे शिक्षकही यांचीच पुस्तकं वाचून शिकलेले होते. आणि ते पुन्हा तेच शिकवण्यात धन्यता मानत होते.

त्यामुळे ज्या चुका या लोकांनी केल्या होत्या त्या न सुधारता चक्क अनेक पिढ्या तशाच चालत राहिल्या! ज्या गोष्टी चुकीच्या आहेत किंवा ब्लॅक बॉइलसारख्या ज्या गोष्टी शरीरात कुठे दिसतच नाहीत त्यावर तसाच विश्वास ठेवला गेला त्या तपासायला किंवा सुधारायला अनेक शतकं कुणी धजावलंच नाही!याला थोडासा छेद देण्याचा प्रयत्न मोंडिनो दे लुझी (१२७५-१३२६) यानं केला होता.त्यानं स्वतः डिसेक्शन करून आणि काही आधीच्या पुस्तकांतून वाचून असं स्वतःचं ॲनॅटॉमीवरचं एक पुस्तक लिहिलं.ते त्या काळी गाजलंही.त्यातून त्याला 'रिस्टोअरर ऑफ ॲनॅटॉमी'

अशी पदवीही मिळाली होती.पण त्यानंही या पुस्तकात अनेक गोष्टी आधीच्या पुस्तकांतल्याच जशाच्या तशा छापल्यामुळे आधीच्या पुस्तकांतल्या काही चुकाही तशाच त्याच्या याही पुस्तकात पुन्हा आल्या.त्यामुळेच त्यानं या चुका पूर्णपणे टाळून बायॉलॉजीला नवं रूप दिलं असं म्हणता येणार नाही.पण या वेळेपर्यंत डिसेक्शन करून मानवी शरीराचा अभ्यास सुरू झाला हेच काय कमी म्हणायचं ? मोंडिनो दे लुझी याला खरं तर मध्ययुगातल्या अंधारात दीप घेऊन उभारलेला वाट दाखवणारा मार्गदर्शकच म्हणावा लागेल.

कारण मोंडिनोच्या उल्लेखाशिवाय ॲनॅटॉमीचा इतिहास पूर्णच होऊ शकत नाही.मोंडिनो हा इटलीमधला प्रसिद्ध डॉक्टर,ॲनॅटॉमिस्ट आणि बोलोना विद्यापीठात सर्जरीचा प्रोफेसर होता. त्यानं ॲनॅटॉमीचं ज्ञान पुनरुज्जीवित केलं,

असं त्याच्या समर्थकांना वाटतं.त्यामुळे त्यांनी त्याला रिस्टोअरर ऑफ ॲनॅटॉमी अशी पदवीच दिली होती.काही ठिकाणी तर 'लिओनार्दो दा विंची' याच्यावरही मोंडिनोचा प्रभाव पडला होता असा उल्लेख आहे.पण काही लोकांना मात्र मोंडिनोनं प्रत्यक्ष डिसेक्शन अगदी कमी वेळा केलं असं वाटतं.अर्थात,हे म्हणणंही योग्य वाटावं असा तो काळ होता. कारण त्या काळी माणसाचं अभ्यासासाठी डिसेक्शन करायला परवानगीच नव्हती त्याकाळी फक्त खून झालेल्या लोकांचे डिसेक्शन करायलाच परवानगी होती.त्यामुळे ॲनॅटॉमीच्या अभ्यासावर फारच मर्यादा येत होती.त्यामुळे मोंडिनोनं कमी डिसेक्शन्स केली असावीत हाही कयास योग्यच आहे.


मोंडिनोबद्दल आणखीही एक गोष्ट सांगितली जाते.जेव्हा मानवी शरीराचं डिसेक्शन करायचं असेल तेव्हा तो एक सार्वजनिकरीत्या होणारा कार्यक्रमच असायचा.तेव्हा मोंडिनो स्टेजवरच्या एका खुर्चीत हातात गेलनचं पुस्तक घेऊन बसायचा आणि गेलनच्या पुस्तकाचा काही भाग मोठ्यानं वाचायचा.त्याचा एक सहायक प्रत्यक्ष डिसेक्शन्स करायचा आणि दुसरा मोंडिनो वर्णन करत असलेला भाग हातातल्या रुळानं दाखवायचा.अशा प्रकारे गेलननं सांगितलेल्या ॲनॅटॉमीचाच पुन्हा अभ्यास करणं किंवा गेलनची शिकवण ताडून पाहणं असा हा कार्यक्रम चालायचा.यात अर्थातच मोंडिनोला गेलनच्या चुकाही दिसल्या होत्या.पण गेलनविरुद्ध बोलणं किंवा लिहिणं म्हणजे त्या काळी पाठीवर मोठा दगड घेऊन प्रवाहाच्या अगदी उलट पोहण्यासारखंच होतं.तरीही मोंडिनोनं हे धाडस केलं.मोंडिनोनं 'अनाथॉमिया' (Anathomia) हे अनॅटॉमीवरचं पुस्तक लिहिलं.पण त्यानं उघड उघड गेलन आणि त्या आधीच्या वैज्ञानिकांविरुद्ध फार जास्त लिहिलं नाही.त्यामुळे त्याच्या पुस्तकात तीन प्रकारच्या चुका झाल्या होत्या.पहिली म्हणजे गेलन आणि आधीच्या लोकांच्या चुका जशाच्या तशा त्याच्या लिखाणात उतरल्या होत्या.दुसरी प्रकार म्हणजे गेलनला जे म्हणायचंय त्याचा मोंडिनोनं अनेकदा चुकीचा अर्थ काढल्यामुळे झालेल्या चुका आणि तिसरी प्रकार म्हणजे मोंडिनोनं गेलन आणि ॲरिस्टॉटल या दोघांना जे म्हणायचं आहे त्याचा सुवर्णमध्य काढायचा प्रयत्न केला,त्यात झालेल्या गफलती! अशा प्रकारच्या चुका होऊनही मॉडिनो गाजला ते त्याच्या स्वतः डिसेक्शन करून शोधून काढायच्या प्रयत्नामुळे.मोंडिनोमुळे प्रयोगात्मक बायॉलॉजीला पुन्हा नव्यानं सुरुवात झाली ही फार महत्त्वाची पायरी होती.


आता इटलीमध्ये बायॉलॉजी या विज्ञान शाखेचा पुन्हा नव्यानं अभ्यास सुरू झाला होता याला दोन कारणं होती,एक म्हणजे युरोपियन लोक मुळातच चुळबुळ्या आणि शोधक वृत्तीचे होते आणि आता ॲरिस्टॉटल आणि गेलन अशा पूर्वी होऊन गेलेल्या वैज्ञानिकांचं काम पुन्हा हाती लागल्यामुळे बायॉलॉजीवरच्या अभ्यासानं पुन्हा वेग घ्यायला सुरुवात केली होती.फक्त बायॉलॉजीच नाही तर या काळात जवळपास सगळ्याच कला,साहित्य,संगीत आणि विज्ञान या क्षेत्रात नव्यानं प्रगती व्हायला लागली होती.या काळाला २.२ पुनरुत्थान (रेनायसान्स) म्हणतात.त्यातच गंमत म्हणजे चित्रकारही बायॉलॉजीचा अभ्यास करायला लागले होते! (या मध्ये लिओनार्दो दा विंची यांनी काढलेले रेखाटन सुद्धा आहे.) रेनायसान्समध्ये चित्रकलाही नव्यानं बहरत होती.याच काळात कलाकार दोनमितीय कागदावर तीनमितीय चित्र कसं दाखवायचं हे शिकत होते.त्यासाठी ते मानवी शरीराचा बाह्याकार आणि आतली हाडं आणि स्नायू यांची रचना अभ्यासत होते.या सगळ्याचा परिपाक म्हणजे रेनायसान्समध्ये बहरलेले लिओनादों दा विंची,मायकेल अँजेलो, बेलिनी,एल ग्रिको,राफाएल असे जगप्रसिद्ध चित्रकार!आताच्या फायटर प्लेन्सना राफाएल हे नाव याच राफाएल या चित्रकारामुळे दिलं गेलंय..! 

त्यामुळे हे चित्रकारही चक्क हौशी ॲनॅटॉमिस्ट झाले होते! लिओनार्दो दा विंचीनं (१४५२ ते १५१९) अनेक डिसेक्शन्स करून मानवी शरीराचा अभ्यास केला होता.

त्यानं प्राण्यांचीही डिसेक्शन्स केली होती.यात महत्त्वाची गोष्ट अशी,की ॲनॉटॉमिस्टना कोणताही प्राणी किंवा माणूस यांच्या शरीराचं डिसेक्शन केलं,की त्यातल्या अवयवांचं ज्ञान व्हायचं,पण ते त्यांना जे दिसतंय ते इतरांना दाखवू शकायचे नाहीत. पण लिओनार्दो दा विंची किंवा इतर चित्रकारांना मात्र समोर दिसतंय त्या प्राण्याच्या किंवा माणसाच्या अंतर्गत रचनेचं हुबेहूब चित्र काढण्याचं कसब लाभलं होतं.त्यामुळे याचा फायदा चित्रकार आणि बायॉलॉजिस्ट्स या दोघांना तसेच चित्रकला आणि बायॉलॉजी या दोन्ही क्षेत्रांना झाला.


यातून लिओनार्दोनं माणसाचे डोळे आणि हात हे अवयव कसे काम करतात याचा सखोल अभ्यास केला आणि ते चक्क लिहून आणि  चित्र काढून ठेवलं.शिवाय,तो विमानही तयार करायच्या खटपटीत होता.त्यामुळे यंत्र,पक्षी, पंख यांचाही त्यानं अभ्यास केला होता.

त्यानं झाडाच्या जीवनचक्राचाही अभ्यास करून त्याची रेखाटनं काढली होती.पण दुर्दैवानं या गोष्टींचा विज्ञानाला त्या काळात काहीही फायदा झाला नाही,कारण त्यानं या गोष्टी आपल्या डायऱ्यांमध्ये सांकेतिक भाषेत लिहून ठेवल्या होत्या! ही सांकेतिक भाषा आता आता आधुनिक काळात आपल्याला काही प्रमाणात उकलली आहे.


ॲनॅटॉमी विकसित होत गेली तशीच नॅचरल हिस्ट्रीही विकसित होत गेली.पंधरावं शतकच मुळी नवनव्या गोष्टींच्या शोधांचं आणि एक्स्प्लोरेशनचं होतं.या काळात युरोपियन लोकांना आफ्रिका,अमेरिका आणि भारत या देशांचा शोध लागत होता.या ठिकाणची माणसं, त्यांची संस्कृती,आचार-विचार,या ठिकाणचे आधी न पाहिलेले प्राणी-पक्षी वनस्पती या सगळ्याच गोष्टींचा नव्यानं शोध लागत होता.सोळाव्या शतकातला इटालियन बॉटनिस्ट (वनस्पतिशास्त्रज्ञ) प्रॉस्पेरो अल्पिनी (१५५३-१६१७) हा खरं तर काही काळ इटलीतल्या पडुआ विद्यापीठात डॉक्टर आणि बॉटनिकल गार्डनचा प्रमुख व्यवस्थापक होता. थोडक्यात,तो आजच्या काळात असता तर बॉटनी डिपार्टमेंटचा एचओडी असला असता. यानंतर प्रॉस्पेरो अल्पिनी हा इजिप्तमधल्या कैरोमध्ये राजदूत म्हणून चार वर्षं गेला होता. कैरोमध्ये असताना त्याला पाम आणि खजूर या झाडांचा अभ्यास करायला मिळाला.या झाडांमध्ये नर झाड आणि मादी झाड अशी दोन वेगवेगळी झाडं असतात याची त्याला पहिल्यांदाच कल्पना आली! (आपल्याकडे पपईमध्ये नर आणि मादी अशी वेगवेगळी झाडं असतात.) नर पामच्या आणि मादी पामच्या फांद्या एकमेकींमध्ये मिसळतात तेव्हाच या झाडांना फळं धरतात किंवा यांना फळं धरण्यासाठी माणसानं एका फुलाचे पराग दुसऱ्या झाडाच्या फुलावर शिंपडावे लागतात,असं त्यानं लिहून ठेवलं आहे. 


याआधी थिओफ्रॉस्ट्सनं जवळपास दोन हजार वर्षांपूर्वीच हे सांगून ठेवलं होतं.पण हे सगळं ज्ञान मधल्या काळात लुप्त झालं होतं आणि आता झाडं ही नपुंसकलिंगी असतात असंच सगळे मानत होते.

पुढे वनस्पतींचं वर्गीकरण करताना हे तत्त्व कार्ल लिनियसला फार उपयोगी पडणार होतं.त्यामुळे आल्याच्या गटातल्या वनस्पतींना त्यानं अल्पिनीच्या सन्मानार्थ 'अल्पिनिया' हे नाव दिलं.यानंतर या अल्पिनीनंच कॉफीचं झाड आणि केळी पहिल्यांदा युरोपात नेली.कॉफी आणि केळी यांचं युरोपीय भाषांत वर्णन करणारा तो पहिलाच होता.त्यानंतर तिकडेही कॉफी हे पेय आधी औषध म्हणून आणि नंतर रिफ्रेशिंग पेय म्हणून प्रसिद्ध झालं.


त्यानं 'दे प्लांटिस इजिप्ती लायबर' (De Plantis Aegypti liber) हे इजिप्तमधल्या वनस्पतींवर पुस्तक लिहिलं.त्यात त्यानं इजिप्तमध्ये सापडणाऱ्या अनेक वनस्पतींची युरोपियनांना पहिल्यांदाच ओळख करून दिली.सजीवांच्या अभ्यासानं आता जवळपास कळसच गाठला होता.स्विस निसर्ग अभ्यासक कोनार्ड फॉन जेस्नर (Konard Von Gesner) (१५१६-१५६५) यानं त्यावेळी उपलब्ध असलेल्या सजीवांची जवळपास सगळीच माहिती संकलित केली.याला तर आजच्या भाषेत 'ह्यूमन सर्च इंजिन' किंवा 'गुगल' म्हटलं तरी कमीच पडेल इतकं मोठं काम त्यानं करून ठेवलं आहे.याला 'स्विस प्लिनी' असंच म्हटलं जातं.

कोनार्डचा जन्म १५ मार्च १५१६ या दिवशी स्वित्झर्लंडमधल्या झुरिच इथं अत्यंत गरीब कुटुंबात झाला. लहानपणापासूनच तो फार हुशार होता.त्याची तल्लख बुद्धी त्याच्या वडिलांना आणि शिक्षकांना लक्षात आल्यावर त्यांनी कोनार्डला नातेवाइकांपैकीच एका काकांकडे पाठवलं.ते काका औषधी वनस्पतींपासून वेगवेगळी औषधं तयार करायचे.इथेच त्याला वनस्पतींबद्दल प्रेम निर्माण झालं.त्यांनी आपल्या ओळखीनं थोड्याच काळात त्याला मोठ्या विद्यापीठात

अभ्यासासाठी पाठवलं.तिथेही त्यानं लवकरच अनेक भाषा शिकून घेतल्याशिवाय थिओलॉजी आणि वैद्यकाचाही अभ्यास केला.पण त्याचा कल मात्र वेगवेगळ्या ठिकाणी फिरून वेगवेगळे प्राणी आणि कोनार्ड फॉन जेस्नर वनस्पतींचे नमुने गोळा करून त्यांची माहिती संकलित करून ठेवणं याकडे होता.तो सजीवांचं निरीक्षण आणि अभ्यास करण्यात खूप वेळ घालवायचा. शिक्षणासाठी कोनार्ड अनेक गावं आणि अनेक विद्यापीठं फिरला.जिथं जाईल तिथून तो सगळंच शिकून यायचा आणि मुख्य म्हणजे तिथली माणसं जोडून यायचा आणि नंतरही त्या लोकांशी पत्रव्यवहार आणि संपर्क ठेवून असायचा! दुर्दैवानं त्याच्या वयाच्या १७ व्या वर्षीच त्याचे वडील काफीच्या लढाईत मारले गेले.आता पुन्हा शिक्षणाचा प्रश्न उभा राहिला. तेव्हा पुन्हा त्याच्या लहानपणचे झुरिचमधले एक शिक्षक पुढे आले आणि त्यांनी कोनार्डचं पालकत्व स्वीकारलं.त्यांनी कोनार्डच्या शिक्षणासाठी मदत केली.दुसऱ्या एका शिक्षकानं त्याला राहायला जागा दिली आणि अन्नपाण्याची व्यवस्था लावून दिली.नंतर तीन वर्षांनी त्यानं स्ट्रासबर्ग विद्यापीठात प्रवेश घेतला.तिथे तो हिब्रू भाषा शिकला.वयाच्या १९ व्या वर्षी त्याचं तितक्याच गरीब घरातल्या मुलीशी लग्न झालं. दुर्दैवानं त्याचे सासरे त्याला काहीही हुंडा देऊ शकले नाहीत.या वेळेपर्यंत त्यानं आपली एक ग्रीकोलॅटिन डिक्शनरी (शब्दकोश) प्रकाशित केली होती.त्याच्या जोरावर आणि काही मित्रांच्या मदतीनं बर्नमध्ये नव्यानंच सुरू झालेल्या एका विद्यापीठात एक तुटपुंज्या पगाराची नोकरी पत्करली.दारिद्र्याचे असे दशावतार चालू असतानाच एकीकडे त्याचं वेगवेगळ्या विषयांवरचं चौफेर वाचन,अभ्यास आणि संशोधन चालूच होतं.अर्थात,(सजीव, अच्युत गोडबोले अमृता देशपांडे)

वनस्पतिशास्त्रावर तर त्याचं जिवापाड प्रेम होतं.

तीन वर्ष बर्नमध्ये शिकवल्यानंतर कोनार्ड जेस्नर ब्रसेलमध्ये वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी गेला आणि १५४१ मध्ये डॉक्टर होऊन बाहेर पडला ! त्यानंतर त्यानं पुढे आयुष्यभर पोटापाण्यासाठी वैद्यकीय व्यवसाय केला.परिस्थिती थोडी सुधारल्यावर त्यानं पुन्हा अनेक देश आणि अनेक प्रदेश पालथे घालायला सुरुवात केली.त्यात डोंगरदऱ्या,पर्वत आणि बर्फाच्छादित प्रदेशही होते.

जमिनीवरच्या वनस्पती आणि प्राणी तर तो गोळा करून अभ्यास करायचाच,पण बर्फाच्या नद्यांखाली लपलेले प्राणी आणि वनस्पतीही त्यानं शोधून त्यांची माहिती जमा करून ठेवली.अर्थात,हे काम सोपं नव्हतंच.हे करताना त्यानं माणसाला पूर्वी माहीत नसलेल्या अनेक वनस्पती आणि प्राणी यांची माहिती जमा केली आणि ती व्यवस्थित संकलित करून प्रकाशित केली. अनेक गोष्टी पहिल्यांदाच करणारा तो भन्नाट एक्सप्लोरर होता.त्यानं तपकिरी उंदीर, प्रयोगात वापरले जाणारे गिनीपिग्ज,तुर्की कोंबडा (टर्की),'सिलसिला' या सिनेमात आपण बघतो ती ट्युलिप्सची फुलं, माणसाच्या शरीरातला लालसर रंगाचा अडिपोज टिश्यू अशा एकमेकांशी दूरवरही संबंध नसलेल्या गोष्टी पहिल्यांदाच शोधून काढल्या ! शिवाय, युरोपियनांना तंबाखूचे परिणाम सांगणारा हा पहिलाच असामी होता.खरं तर इतकं करून थांबला असता तरी आज त्याचं नाव अजरामर झालं असतं.

पण त्यानं पुढे तर अजस्र म्हणता येईल असंच काम केलं. यानंतर त्यानं 'बिब्लिओथिका'(Bibliotheca) नावाचं आतापर्यंत होऊन गेलेल्या सगळ्या लेखकांची नावं आणि त्यांची संक्षिप्त माहिती सांगणारं पुस्तक लिहिलं.१५४५ साली प्रकाशित झालेल्या या पुस्तकात त्यानं जवळपास चार हजार पुस्तकं आणि शेकडो लेखकांची माहिती जमा करून लिहिली होती. यावरूनच त्याला लेखनाची,

लेखकांची आणि ज्ञानाची किती कळकळ होती ते कळतं.०४.१२.२३ या लेखातील पुढील भाग..




२५/१/२४

एक प्राणप्रतिष्ठापना… A Prana Pratishtanam...

काही वेळा काही लोकांच्या आयुष्यात हे असं का घडलं असावं ? याचं खूप डोकेफोड करून सुद्धा उत्तर मिळत नाही... ! एखादा ढाण्या वाघ पिंजऱ्यात बंद असतो... 

या वाघात धम्मक असते,तरीही बंदिस्त पिंजऱ्यात त्याला जेरबंद केलं जातं... तो अस्वस्थपणे येरझाऱ्या घालत असतो...! आणि कोणीही चिडूक मीडुक मग बाहेरून त्याला खडे मारत किंवा काठीने ढोसत असतं....


एखाद्या गरुडाला पिंजऱ्यात बंद करून ठेवतात... आकाशातला राजा हा .... पिंजऱ्यात बंद असतो आणि पिंजऱ्या बाहेरून मग कावळे सुद्धा याच्यावर शिरजोर होतात... ! कोणत्या परिस्थितीमुळे किंवा चुकीमुळे,त्यांची अशी ही अवस्था झाली असेल काही कळत नाही...! जे सध्या पिंजऱ्यात बंद आहेत,असे अनेक वाघ आणि गरुड मला या महिन्यात रस्त्यावर भेटले... ! 


काही जणांसाठी हा पिंजरा म्हणजे 'परिस्थिती'

असते..काहींसाठी 'त्यांच्या घरातलेच लोक'आणि काहींसाठी मात्र त्यांच्याच हातून'नकळत झालेल्या चुका "..! 


अशाच पिंजऱ्यात अडकलेले हे तीन जण...


यापैकी एक आहे महाराष्ट्राबाहेरचा,याचं बऱ्यापैकी शिक्षण झालंय,अतिशय उत्तम इंग्लिश बोलतो... इतर दोघे महाराष्ट्रातले...


उद्भवलेल्या परिस्थितीमुळे म्हणा,घरातल्या लोकांमुळे म्हणा किंवा स्वतःच्या चुकांमुळे म्हणा... परंतु आज हे रस्त्याकडेला जीवन जगत आहेत दुसऱ्यांच्या दयेवर...! 


यांपैकी दोघांच्या पायाला अति गंभीर जखमा आहेत,एकाला तर पाय कापायचा सल्ला मिळाला... ! 


थोडफार जे उरलंय ते हि कापुन टाका,हा सल्ला पचवायला त्याच्याच जन्माला जायला हवं...!

ट्रीटमेण्ट घ्यायला पैसे नाहीत,आणि सहनही होत नाही,अशा अवस्थेत रस्त्याबाजुला थंडीत मुकाट पडून राहायचं...! 


वेदनेचा आणि असहाय्यतेचा कळस आहे हा...


कळस नेहमी मंदिरावरच शोभून दिसतो... परंतु वेदनेचा कळस,माणसाच्या डोक्यावर बसला की तो माणूस भेसुर दिसतो...! 


तिसऱ्याची कहाणी थोड्याफार फरकाने अशीच...


वाघाच्या डोळ्यात वेदनेचं पाणी पाहिलंय का कुणी ? 


आई दुखतंय गं ... म्हणून जमिनीवर गडाबडा लोळणारा वाघ पाहिलाय का कुणी ? 


पंख तुटलेला गरुड सरपटत आपल्याजवळ केविलवाणे पणे येताना पाहिलाय का कोणी ? 


हे पाहणं सुद्धा खूप वेदनादायी असतं... !!! 


वेगवेगळ्या वेळी,वेगवेगळ्या स्थळी,माझी या तिघांशी भेट झाली... तिघांचेही पिंजरे उघडून;आधी जखमांवर फुंकर मारली,त्यानंतर मलमपट्टी केली... मनाला उभारी येईल असं बोलत गेलो…कुणी असो नसो,मी आहे तुमच्यासोबत हे त्यांच्या मनावर बिंबवत गेलो....! शेवटी स्वतःच्या पायावर तिघांना आत्मविश्वासाने उभं रहायला आज जानेवारी २०२४ उजाडावा लागला...! 


मारलेल्या फुंकरीने तीन विझणारे निखारे पुन्हा उजळले...! 


इथं,मला माझी चुलीवर स्वयंपाक करणारी आजी आठवते... 


चुल विझली विझली,म्हणता म्हणता,

जिवाचा आकांत करून म्हातारी,इकडून तिकडून लुगडं सावरत,फुंकर मारायची,चुलीतल्या विझणाऱ्या लाकडांना ती इकडे तिकडे अशी हलवायची, जणू त्यांना जागं करण्याचा प्रयत्न करायची…!


फुंकर मारताना धूर व्हायचा,हा धुर तिच्या नाका तोंडात जायचा,तिला ठसका लागायचा, आजूबाजूची राख डोळ्यात जायची,एका हाताने पदर घेऊन ती डोळे पुसत राहायची,पण फुंकर मारणं थांबवायची नाही..... लाकडं पेटेपर्यंत म्हातारी मागं हटायची नाही....


एकदा का मात्र चुल पुन्हा ढाण ढाण पेटली,की पदराने डोळे पुसत,गालातल्या गालात ती विजयी वीराप्रमाणे हसायची... यावेळी चेहऱ्यावरची प्रत्येक सुरकुती न सुरकुती उल्हसित व्हायची.... ! 


चूल पेटली... त्यात एवढा कसला आनंद ??? 

हे त्यावेळी मला न उलगडलेलं कोडं...


आज कळतंय,ते समाधान चूल पेटवण्याचं नव्हतं.हे समाधान होतं;विझणाऱ्या कुणाला

तरी पुन्हा पेटून उठताना पाहण्याचं...!!! 


आज हे तिघेही वैद्यकीय दृष्ट्या पायावर उभे आहेत... 


पण नुसतंच पायावर उभं राहणं महत्त्वाचं नसतं... महत्त्वाचं असतं ते पुन्हा चालायला सुरुवात करणं...आणि आपण चालताना,वाटेत पडलेल्या दुसऱ्या कुणालातरी उभं राहायला मदत करून,सगळ्यांनी मिळून एकत्र धावणं....! 


आयुष्याची हिच तर खरी वारी... ! 


दुसऱ्याला उठवून पळायचे,म्हणजे स्वतःच्या पायात धमक हवी...मनगटात जोर हवा... 


या तिघांनाही आता स्वतंत्र व्यवसाय टाकून दिले आहेत. 


एकाला इमिटेशन ज्वेलरी घेऊन दिली आहे, वजन काटा घेऊन दिला आहे,ज्या रस्त्यावर, जिथे तो निपचीत पडला होता,तिथेच तो आता ज्वेलरी विकतो...वजन काट्यावर लोक वजन करून त्याला पैसे देतात....माझ्यासाठी तो स्वतःच आता एक दागिना झाला आहे...! 


चर्मकारीचे सामान घेऊन,दुसरा आता पुढील आठवड्यात,बूट पॉलिश करून,चपलांबरोबर स्वतःच्या फाटलेल्या आयुष्याला सुद्धा टाके घालून फाटकं आयुष्य सावरेल. 


तिसऱ्याला आज २२ जानेवारी २०२४ रोजी एक हात गाडी घेऊन दिली आहे.भंगार गोळा करून, विक्री करण्याचा व्यवसाय त्याने सुरू केला आहे.समाजातील कित्येक जण अडगळीत पडलेल्या आपल्या आईबापांना,भंगार समजून उकिरड्यावर फेकतात…

आम्ही ते उचलतो.या अर्थाने मी ही एक भंगारवालाच की...! 


माझ्या या मुलाला भंगार गोळा करताना,असे कोणाचे आई-वडील सापडू नयेत इतकीच माझी प्रार्थना... ! परवा त्यांच्या बोलण्यात आलं,'आम्हाला उठवून कुणीतरी उभं केलं, आयुष्यात इथून पुढे आमच्या परीने आम्ही सुद्धा कोणालातरी मदत करण्याचा नक्की प्रयत्न करू'.माझ्यासाठी हा आनंदाचा परमोच्च क्षण होता... !!! 


दिवा पेटवणे हि झाली प्रकृती.... परंतु दिव्याने दिवा पेटवणे हि झाली संस्कृती...! 


आज २२ जानेवारी २०२४ उजाडला...


सकाळपासूनच मंगलमय वाद्यांचे सूर कानावर पडत होते... तिकडे एक नगरी सजली होती, इकडेही एक नगर सजले होते... तिकडे हर्ष आणि उल्हास होता,

तसाच इकडेही हर्ष आणि उल्हास होता... तिकडे प्राणप्रतिष्ठापना होत होती आणि इकडेही वेगळ्या पद्धतीने आमची प्राणप्रतिष्ठापना झाली होती...!


दिनांक २२ जानेवारी २०२४


डॉ.अभिजीत सोनवणे,डॉक्टर फॉर बेगर्स

भिक्षेकऱ्यांचे डॉक्टर..! 

२३/१/२४

‘मॅट्रिक फेल’ विजय,पुस्तकांच्या विश्वात.. 'Matric Fail' Vijay,in the world of books..|

'गर्दीतून चालताना माणसांचा एकमेकाला धक्का लागतो;पण दाटीवाटीने भरारी घेणारे पक्षी एकमेकांना धडकत नाहीत.कारण,गर्दीत असूनही त्या प्रत्येकाने वैयक्तिक क्षेत्र जपलेले असते.त्यात दुसऱ्यांकडून घुसखोरी केली जात नाही.थव्यानं भरारी घेताना प्रत्येकाला पुढच्या-मागच्या बाजूच्याचे नैसर्गिक भान असते. त्यामुळे थव्याने वेग वाढविला वा कमी केला तरीही प्रत्येकजण एकमेकांशी जुळवून घेतात. म्हणून तो थवा एकसंध भरारी घेतो.यात आजूबाजूच्या पक्ष्यांमधील गती बदल अल्पांशात शेजाऱ्यांना समजतो,त्यामुळे मोठ्या थव्यातील पक्ष्यांची भरारी घेतानाची लहर १५ मिलिसेकंदापेक्षा कमी वेळा हललेली असते.ही दिगंबर गाडगीळ यांच्या 'पक्षीगाथा' पुस्तकातील  संशोधनात्मक मांडणी... अशा जगण्यातलं ज्ञान देणाऱ्या कित्येक

पुस्तकांमधील संदर्भ विजय गायकवाड यांना तोंडपाठ आहेत.


हातकणंगले तालुक्यातील टोप येथील या 'मॅट्रिक फेल'अवलियाला वाचनाचं प्रचंड वेड.वडील नेहमीच मोठ्यानं ग्रंथ वाचतात.ते कानावर पडत राहिल्यामुळे वाचनाला प्रारंभ झाला. त्यातच 'चौकट आणि थडगं यामध्ये काही फुटांचं अंतर असतं', हेन्री डेव्हिड थोरो यांच्या वाक्याने ते पुस्तकांशी अधिक जोडले गेले.


वाचनवेड्या विजय यांचा दिवस पहाटे चार वाजता सुरू होतो.नित्यनेमाने ते व्यायाम करतात.त्यानंतर आरशासमोर उभारून त्यातल्या प्रतिमेशी संवाद साधतात.'माझ्यातला मी माझ्यासाठी खूप काही करतो, हे जाणतो म्हणून त्याचे दररोज आभार मानतो.' त्यांना आलेली ही प्रचिती.त्यानंतर ते घराच्या मागे असलेल्या आडातून पाणी भरतात.तिथून पुढे एक ते दीड तास वाचन.साडेसातला ते शिरोली एम.आय.डी.सी.तील एका फौंड्रीमध्ये कामासाठी जातात.'बेभरवशाच्या नोकरीवर जातो,तेही भरवशाने.कारण,सोबत पुस्तकाने दिलेली ताकद असते.दिवसभर शारीरिक कष्टाचं काम करण्यासाठी.फौंड्रीतील उष्णतेचा शरीरावर परिणाम होऊनसुद्धा मी शांत आहे.कारण,माझ्या अंगात पुस्तकांनी शांतता भिनवलेली आहे.

( मानवी आयुष्यात शांतता महत्वाची असते.)

तुझ्यावर कोणाचाही प्रभाव असता कामा नये, तुझ्यावर केवळ तुझाच प्रभाव हवा.,'हे जगण्याचं तत्त्वज्ञान त्यांना पुस्तकांनी दिलंय.


सिमेंटच्या पत्र्याच्या दोन खोल्यांच्या घरात दाम्पत्यासह राहणाऱ्या विजय यांची राहणी साधी आहे.त्यांची खरी भूक आहे पुस्तक वाचनाची.महिन्याला तुटपुंजा पगार हातात पडतो.त्यातील दीड ते दोन हजार रुपये प्रतिमहिना ते पुस्तक खरेदीसाठी खर्चतात.असे करत करत आतापर्यंत त्यांच्या भांडारात ६० हजारांच्या पुस्तकांचा समावेश झाला आहे.सायंकाळी पाचपर्यंत ते कामावरून घरी येतात. तास - दीड तास ते पुस्तकात रमून जातात. पुस्तकं ही दिवसभर आलेला कामाचा शीण घालवून अंगात नवी ऊर्जा निर्माण करतात,असं त्यांचा अनुभव सांगतो.केवळ घेतलं पुस्तक आणि वाचून काढलं एवढंच न करता,ते त्यावर चिंतन करतात.त्यातील महत्त्वाचं साररूपात मोबाईलवर संग्रहित ठेवतात.त्यातून त्यांनी ब्लॉग लिहायला सुरुवात केली.आजपर्यंत त्यांनी २५० ब्लॉग लिहिले असून,त्याचे १३,८८० फॉलोअर्स आहेत.तसेच ते विविध विषयांवर व्याख्यानेही देतात.

'मला केवळ एकच गोष्ट माहीत आहे ती म्हणजे मला काहीही माहीत नाही.' हे सॉक्रेटिसचे पुस्तकातील प्रेरणादायी वाक्य त्यांच्यात वाचनाची ऊर्मी वाढविते.


'मेंदू व वर्तनासंबंधी हादरा देणारे संशोधन करीत गोलमन दाखवून देतात की,जेव्हा उच्च बुद्धिमत्तेचे लोक अडखळतात त्यावेळी मानवी मेंदूत असे घटक कार्यरत होतात ज्यामुळे साधारण बुद्ध्यांकाची व्यक्ती आश्चर्यजनकरीत्या बाजी मारून नेते.ते घटक म्हणजे आत्मजाणीव किंवा सजगता,स्वयंशिस्त आणि समानुभूती.हुशारीचा वा चलाखीचा नवा अर्थ सांगणारे हे घटक जन्माच्या वेळी निश्चित होत नसतात.बालपणीचे अनुभव या घटकांना आकार देत असले तरी मोठेपणी भावनिक बुद्धिमत्तेची जोपासना करून तिला बळकट करता येते आणि तिचा तात्कालिक फायदा आरोग्य, नातेसंबंध आणि काम यासाठी करून घेता येतो.'डॅनिअल गोलमन लिखित 'इमोशनल इंटेलिजन्स' या पुष्पा ठक्कर अनुवादित 'भावनिक बुद्धिमत्ता' पुस्तकाच्या पहिल्या पानावरील हे वाक्य.विजय यांनी वाचनातून मेंदूत साठविलेलं जीवनाचं अनमोल तत्त्वज्ञान त्यांनी कथन करत रहावं,इतकं सफाईदारपणे ते याविषयी बोलत राहतात.त्यांनी आतापर्यंत पाश्चात्य लेखकांची अनुवादित पुस्तकं वाचनावर जास्तीत जास्त भर दिला आहे.या लेखकांच्या मांडणीत संशोधनात्मक आणि नावीन्य असते,त्यामुळे ते त्यांना आवडते.


हेन्री थोरो यांच्या जयंत कुलकर्णी यांनी भाषांतरित केलेल्या 'वॉल्डन' या पुस्तकामध्ये जीवन कसं जगायचं आणि आपण कसं जगतो, यातील अंतर मांडले आहे.

थोरोंनी मांडलेल्या अशा कितीतरी विचारांचा पगडा विजय यांच्या मनावर पडला आहे.बेंझामिन फ्रँकलीन यांच्या 'मेल्यानंतर तुम्हाला भरपूर झोपायचे आहे. आतातरी जागे रहा,मिळालेला प्रत्येक क्षण मोलाचा आहे,तो उपयोगात आणा,'या विचाराला प्राधान्य दिलं पाहिजे,असं विजय यांचं मत आहे.


संग्रहातील काही पुस्तके-इगो इज द् एनिमी - रॉयन हॉलीडे,इमोशनल इंटेलिजन्स - डॅनियल गोलमन,जग बदलणारे ग्रंथ - दीपा देशमुख,ह्युमनकाइंड - रूट्बर्ग ब्रेगमन,कुरल - सानेगुरुजी,सजीव - अच्युत गोडबोले,

दगड - धोंडे,वारूळ पुराण-नंदा खरे, मृत्यू सुंदर आहे? - डॉ.रवींद्र श्रावस्ती,अभिनव जलनायक-सतीश खाडे,द सीक्रेट-रॉन्डा बर्न,चकवा चांदणं मारुती चितमपल्ली,द सेकंड सेक्स-सिमोन द बोव्हुआर,इसेंशियलिझम-ग्रेग मँकेआँन,आर्टिफिशिअल इंटेलिजन्स-अच्युत गोडबोले,

शरीर,गन्स,जर्म्स अँड स्टील-जेरेड डायमंड,द पावर ऑफ पर्सिस्टन्स-जस्टीन सँच,द आर्ट ऑफ रिसायलेन्स-गौरांगदास,द गॉड डेल्युजन - रिचर्ड डॉकिन्स, सर्वोत्तम देणगी-जिम स्टोव्हँल,थिंक लाईक अ विनर-डॉ.वॉल्टर डॉयले स्टेपलस्.


- भरत बुटाले- (लेखक, 'लोकमत'च्या कोल्हापूर आवृत्तीत वरिष्ठ उपसंपादक आहेत.)

Lokmat ePaper - http://epaper.lokmat.com/articlepage.php?articleid=LOK_KOLK_20240121_18_7.


Dr. Deepak Shete: वाचनाचा दीपस्तंभ : विजय गायकवाड वाचनाच्या गोडीमुळे निर्माण होणारी सिद्धता दर्शवणारे माझे जिवलग मित्र विजय गायकवाड,टोप यांचा आज दै.लोकमतमध्ये प्रसिद्ध झालेला वाचनीय लेख आपणही वाचून वाचण्याची सवय अधिक वृद्धीगत करावी.ही विनंती.


- डॉ दिपक शेटे

- महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार


आज रविवार,दिनांक २१ जानेवारी २०२४ रोजीच्या दैनिक लोकमत,कोल्हापूर आवृत्ती,पृष्ठ क्रमांक १८ वरती सामाजिक लोकशाहीचे आधारस्तंभ राजर्षी शाहूजी छत्रपती महाराज यांच्या लोककल्याणकारी विचारांचे वलय असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील 'टोप' या गावचे आमचे मार्गदर्शक मित्र सन्माननीय श्री.विजय गायकवाड साहेब यांचे पुस्तकांच्या बद्दल प्रचंड प्रेम आणि पुस्तकांचे सखोल वाचन,चिंतन तसेच अनेक महत्त्वाच्या विषयांवर त्यांनी केलेली भारदस्त भाषणे,रोज सकाळी सलगपणे ब्लॉग वर त्यांचे चिंतनशील लेखन यावर अत्यंत सखोलपणे भारदस्त असा लेख लोकमत कोल्हापूर आवृत्तीचे वरिष्ठ उपसंपादक श्री.भरत बुटाले साहेब यांनी लिहिलेला आहे.याबद्दल श्री.भरत बुटाले साहेबांचे मनःपूर्वक आभार खूप खूप अभिनंदन करावे वाटते.कारण आमचे मित्र श्री.विजय गायकवाड साहेबांनी अतिशय संघर्षातून आपला पुस्तक वाचनाचा छंद तळमळीने,नित्य नियमाने जोपासलेला आहे हे साधेसुधे काम नाही.

वाचनाचा छंद,वाचनाचे वेड जोपासणे म्हणजे ही तारेवरची कसरत आहे. कारण त्यासाठी पुस्तक विकत घ्यावी लागतात, अनेक पुस्तके वाचून त्या पुस्तकांतून महत्वाच्या विषयांची विभागणी मोठ्या कौशल्याने करावी लागते.ते आदराने आपल्या मेंदूत कल्पकतेने जपून ठेवावं लागतं.कठीण विषय वाचून त्यासाठी आपल्या जीवनातील जादाचा वेळ काढावा लागतो.ते पुस्तक त्यातील संदर्भ, त्यातील महत्वाचे विचार, महत्त्वपूर्ण माहिती जपताना पुस्तक सातत्याने पुन्हा पुन्हा वाचावी लागतात.काही विषय इतके गूढ, चिंतनीय असतात की,ते वाचताना खूप वेळ द्यावा लागतो.

आपल्या दैनंदिन जीवनातून हा वेळ काढणे म्हणजे आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये मोठे कष्टाचे काम झाले आहे.एकतर आमचे मित्र श्री.विजय गायकवाड साहेब शारीरिक मेहनतीचे काम करुन सुद्धा थकून जात नाहीत तर पुन्हा नव्या जोमाने आपल्या वाचनाचे वेड मोठ्या कौशल्याने जपतात याबाबत त्यांचे मला खूप कौतुक वाटते.मी त्यांचा खूप आदर करतो.त्यांचे खूप खूप अभिनंदन करावे तेवढे थोडेच आहे. आमचे मार्गदर्शक श्री.विजय गायकवाड साहेब यांना त्यांच्या वाचनाचे वेड,वाचनाचा छंद जपण्यासाठी नैसर्गिक न्याय प्रचंड साह्य करो हिच मनापासून सदिच्छा आहे.धन्यवाद


आपला स्नेहांकित, 

शीतल खाडे सांगली.


मॅट्रिकला फेल असल्यामुळे 'मी नववी पास आहे' असं सांगणारा हा व्यक्ती. एका कंपनीत मजुरीचे काम करतो. दिवसभर प्रचंड शारीरिक श्रम केल्यामुळे शरीर थकून जाते. शरीराला आरामाची गरज असते.झालेली झीज भरून काढण्यासाठी ऊर्जेची गरज असते.

यावेळी विजय गायकवाड यांना पुस्तकातून ऊर्जा मिळते.पुस्तकातून मिळालेली ऊर्जा मनासोबत शरीर टवटवीत करत जाते.थकवा कुठल्या कुठे दूर पळून जातो.मनाभोवती विचार पिंगा घालू लागतात.त्यातून चिंतन घडतं,चिंतनातून लेखन घडतं.लेखनासोबत हा माणूस खूप छान बोलतोही.आजच्या काळात वेळेअभावी बोलणं कमी होत जाताना न चुकता, न थकता नित्यनेमाने अनेकांसोबत प्रेममय संवाद करत जातो.यांनी पुस्तक फक्त वाचली नाहीत तर ते पुस्तक आत मुरवली आहेत.पुस्तक समजून घेतली आहेत.पुस्तकं त्यांच्याशी संवाद साधू लागली आहेत.यांच्या धकाधकीच्या काळात पुस्तकं न वाचण्याची अनेक सशक्त कारणे असतानाही हा माणूस कोणतेही कारण न स्वीकारता 'पुस्तक वाचणे' एवढेच स्वीकारतो.ही खूप मोठी गोष्ट वाटू लागते. अनेक कारणांवर विजय मिळवून 'पुस्तक वाचणारा' हा विजय आगळावेगळाच वाटू लागतो.


साहेब,आजची पहिली नजर या शब्दावरून फिरली आणि डोळे भरून आले. मनाला खूप आनंद झाला.

सन्माननीय उपसंपादक बुटाले साहेबांचे खूप खूप आभार.चांगल्या योग्य व्यक्तीचा सन्मान केलात, यामुळे अनेकांना ऊर्जा मिळेल. अनेक पुस्तकांना नवीन विजय मिळतील. लोकमतचे मनःपूर्वक धन्यवाद.


सॉक्रेटिस ( माधव गव्हाणे )


अगदीच..एका व्यासंगीचा दखल ही घेतली गेलीच पाहिजे..एका बाजूला मोबाईलमध्ये वाहत गेलेली पिढी आणि दुसऱ्या बाजूला हा अवलिया.. जिथे लोकं पुस्तकं सोडून मोबाईलमध्ये रमू लागली त्याच युगात आपण पुस्तकांना आपलसं केले..ही पुस्तकं नक्की तुमचंही पुस्तकं लिहीतील हे त्रिकालाबाधीत सत्य आहे...! कवी,संतोष शेळके,पांढराशुभ्र काळोख,नेरळ,मुंबई


पुस्तकात रमनारी माणसं तिन्ही काळाचे सारथी अन् समन्वयक असतात.ज्ञानाच्या प्रकाश वाटेवर स्वप्रकशित होऊन समाजाला अतः दीप भवः होण्यास प्रेरक,पूरक आणि प्रेरणादायी ठरतात. मागील ३ वर्षात भेट न झालेले पण नियमित मोबाइलवर संपर्कात असणारे असणारे माझे कोल्हापूरचे मित्रवर्य श्री. विजय गायकवाड यांचा मागील महिन्यात प्रत्यक्ष भेटीचा योग आला अन् आम्ही एकमेकांना प्रत्यक्ष भेटलो.. रोज लेखणीतून भेटणाऱ्या मित्राला प्रत्यक्ष भेटल्याचा आनंद लेखणीबद्ध करणे अशक्यप्राय.आज या पुस्तकं वेड्या अन् लेखन प्रिय मित्राची नोंद दै. लोकमतने घेतली फार आनंद झाला.. दादा अभिनंदन. खुप खुप अभिनंदन अन् मणभर शुभेच्छा..!


कवी श्रावण सखुबाई रंगनाथराव भवर,

श्रावण सर.. संभाजी नगर


खुप खुप अभिनंदन सर,हा लेख वाचून मला अगदी गहिवरून आलं.तुमचा संघर्ष तुमचे पुस्तकावरील ते प्रेम `क्या बात'तुमच्या संपर्कात व मार्गदर्शनात असल्याचा अभिमान वाटतो....!!

पार्थ गाडेकर.. रायपुर


पुस्तके ही माणसाला काळाच्या महासागरातून सुरक्षित घेऊन जाणारी जहाजे आहेत.- विलास माने,पारगांव


तुमच्या सारख्या व्यक्तीचा सहवास असल्यावर माणुस कोणत्याही परिस्थितीत जीवनावर विजय मिळवेल कारण पुस्तक वाचन ही आपल्यातल्या यशाची पहिली पायरी आहे आणि सर्वात सोपा प्रगतीचा मार्गही आणि तो तुमच्याकडुन मिळतोय.. - -भारत गाडेकर,रायपुर


जीवन जगण्याचा  गुंता कसा सोडवायचा  हे सांगणार आणि सहज उपलब्ध असलेलं उत्तर म्हणजे पुस्तक...... एवढेच नव्हे तर मानवी आयुष्यातील प्रत्येक उत्कट व सौम्य भावना याचे वैचारिक पुरावे देणारा.... अथांग ज्ञानाचा महासागर म्हणजे पुस्तक.... व त्यातील प्रवासी म्हणजे आमचे विजयराव सर…!!

 - डॉ.संजय मोरे जीवशास्त्राचे प्राध्यापक,


वर्तमान पत्र वा पुस्तक 

अथवा असो कागद कोणताही,

मोगरा असो वा चाफा,

सुगन्ध दरवळावा दिशा चोही.!

 खूप शुभेच्छा साहेब 

दादासाहेब ताजणे,सेलू


दादा,आपण मला भेटलेला एक अनमोल हिरा आहात.आम्ही बालपणापासून पूस्तकांच्या सानिध्यात राहिलोत पण त्यांच्याशी सख्यत्व जमवू शकलो नाहीत. पण आपण अनेक वर्ष त्यांच्या प्रवासापासून दूर राहून सुध्दा त्यांचे सखा झालात. जीवनाच्या वाटेवरचा खरा अर्थ तुम्हांला कळाला.ग्रंथ हेच जीवन जगण्याचा आनंद देतात हे आपण सिध्द केल आहे.ग्रंथाच्या सहावासातून तुम्ही स्वतः च एक कधी न संपणारा ग्रंथ झालात.आपल्या ध्येयवेड्या वाचनाने मी प्रेरित झालो आहे.

विनम्र, सुभाष बाबाराव ढगे,परभणी

टीप: हे ईमेल https://www.vijaygaikawad.com वरील संपर्क फॉर्म गॅझेट मार्गे पाठवलेले आहे.


आमचे सन्मित्र,वाचनमित्र विजय गायकवाड,टोप यांच्या अफाट वाचनाची लोकमत या वृत्तपत्राने घेतलेली दखल…!

डॉ.रवींद्र श्रावस्ती.. मृत्यू सुंदर आहे?


मला केवळ एकच गोष्ट माहित आहे ती म्हणजे मला काहीही माहीत नाही. सर जशी सॉक्रेटिसकडून तुम्हाला प्रेरणा मिळते तसीच आम्हाला विजय गायकवाड सरांकडून प्रेरणा मिळते.


दादासाहेब गाडेकर,रायपुर




२१/१/२४

चुका सुधारल्या जाऊ शकतात.!! Errors can be corrected.!!

माझ्या एका चाळीस वर्षाच्या मित्राचा साखरपुडा झाला.

ज्या मुलीशी साखरपुडा झाला,तिच्या सांगण्यानुसार तो नृत्य शिकायला गेला. "देवालाच ठाऊक आहे की मला नृत्य शिकायची खूपच आवश्यकता होती,"त्याने आपली कहाणी ऐकवताना म्हटलं,"मी चाळिसाव्या वर्षीसुध्दा तसेच नृत्य करीत होतो जसे वीस वर्षांपूर्वी करत होतो,

जेव्हा मी ते शिकायला सुरुवात केली होती. म्हणजेच मला नृत्य अजिबात येत नव्हतं.मी ज्या शिक्षिकेकडे प्रथम गेलो तेव्हा बहुधा तिने खरे सांगितले होते की मला नृत्य अजिबात येत नाही. मला माझे आधीचे शिकलेले सर्व काही विसरायला हवे आणि नव्याने नृत्य शिकण्यास सुरुवात करायला हवी.पण तिचं हे म्हणणं ऐकून माझा फारच हिरमोड झाला.माझ्यात शिकण्याची इच्छाच उरली नाही.म्हणून मी शिक्षिकाच बदलली.


"दुसऱ्या शिक्षिकेनं कदाचित माझं मन राखायला मला खोटा दिलासा दिला,पण मला तिचं बोलणं आवडलं.तिने निर्विकारपणे सांगितले की माझे नृत्य जरी जरा जुन्या पध्दतीचे असले तरी माझ्यात नृत्यकलेची मूलभूत समज आहे आणि मला माझे नृत्य सुधरण्यासाठी फार कष्ट पडायचे नाहीत.पहिल्या शिक्षिकेने माझ्या दोषांवर भर दिला होता,म्हणून माझा उत्साह थंड पडला होता.दुसरीने बरोबर उलटं केलं.ती माझ्या कामाची स्तुती करायची आणि माझ्यातील दोष सौम्य करून सांगायची.ती मला नेहमी म्हणत असे,'तुम्ही एक जन्मजात नर्तक आहात, तुम्हाला उपजतच ताल अन् लयीची समज आहे.'साधा विचार केला तर मला माहीत आहे की मी चौथ्या श्रेणीचा एक बेकार नर्तक आहे आणि तसाच नेहमी राहीन;तरी पण मला हा विचार करून चांगलं वाटतं की कदाचित ती खरंही म्हणत असेल.ही गोष्ट तर पक्की आहे की तिला असे बोलायचे पैसे मिळताहेत,पण असा विचार करून काय फायदा?


"काहीही असो,मला आता हे ठाऊक आहे की मी आता एक बरा नर्तक झालोय.पण तिच्या स्तुतीशिवाय मी असा नर्तक बनलोच नसतो.माझ्यात स्वाभाविक लयीची समज आहे असं म्हटल्यामुळे माझ्यात आशा निर्माण झाली. त्यामुळे मला प्रेरणा मिळाली.त्यामुळेच मला स्वतःला सुधारण्याची इच्छा जागृत झाली."


आपली मुले किंवा आपले कर्मचारी यांना जर तुम्ही असं सांगाल की ते मूर्ख व अज्ञानी आहेत, त्यांच्यात अजिबात प्रतिभा नाही आणि ते जे काही करताहेत,ते चूक करताहेत;तर या त-हेने तुम्ही सुधारणेची प्रत्येक शक्यता नष्ट करता.पण जर तुम्ही बरोबर याच्या उलट तंत्राचा वापर केलात,म्हणजेच तुम्हाला समोरच्या माणसाच्या क्षमतेवर विश्वास आहे,त्याच्यात कठीण काम करण्याची अविकसित योग्यता आहे असा विश्वास त्याला दिलात,तर त्याचा परिणाम हा होईल की दिवस-रात्र मेहनत करून तो उत्तम काम करेल.लॉवेल थॉमस,जे मानवीय संबंधात अतिशय निष्पात आहेत,याच तंत्राचा वापर करत होते.ते लोकांत आत्मविश्वास जागवत असत,तुम्हाला साहस व आस्थेच्या माध्यमातून प्रेरित करत.


उदाहरणार्थ,मी मिस्टर व मिसेस थॉमसबरोबर वीकेंड घालवला होता.शनिवारी रात्री त्यांनी मला शेकोटीसमोर खेळीमेळीचे ब्रिज खेळायचे आमंत्रण दिले.ब्रिज?अरे,नाही! नाही! मी नाही! मला ब्रिज थोडंसुध्दा कळत नव्हतं.हा खेळ मला नेहमीच एखाद्या गुप्त रहस्यासारखा वाटे. अशक्य!लॉवेलने उत्तर दिलं,"अरे डेल,यात काही कठीण नाही! ब्रिजमध्ये फक्त लक्षात ठेवण्याची आणि कॉमनसेन्सची गरज आहे.तुम्ही स्मरशक्तीवर खूप लेख लिहिले आहेत आणि तुमच्या बुद्धीला तर सगळेच मानतात.ब्रिज तर तुमच्या डाव्या हातचा मळ आहे.तुम्ही तो कौशल्याने खेळू शकता." आणि मला काही समजायच्या आतच मी जीवनात प्रथमच ब्रिज खेळायला बसलो होतो.यामागचं कारण एकच होतं की,लॉवेलने मला हे सांगून दिलं होतं की ब्रिज खेळणं माझ्या डाव्या हाताचा मळ आहे.


ब्रिजवरून मला एली कल्बर्टसनची आठवण येते,ज्यांच्या ब्रिजच्या पुस्तकांचा अनेक भाषांमध्ये अनुवाद झाला आहे.या पुस्तकाच्या १० लाखांपेक्षा अधिक प्रती खपल्या आहेत. कल्बर्टसननी या खेळाला कधीच आपला व्यवसाय बनवला नसता,जर एका तरुण स्त्रीने त्यांना त्यांच्यातल्या प्रतिभेची खात्री दिली नसती.


जेव्हा ते अमेरिकेत १९२२ मध्ये आले तेव्हा त्यांनी तत्त्वज्ञान आणि समाजशास्त्राच्या शिक्षकाची नोकरी शोधायचा प्रयत्न केला; इतकंच काय तर त्यांनी कोळसा विकायचा प्रयत्न केला व त्यातही ते अपयशी ठरले.नंतर त्यांनी कॉफी विकायचा प्रयत्न केला आणि त्यातही अपयशी ठरले.त्यांनी थोडंफार ब्रिज खेळलं होतं,पण त्यांना त्यावेळी ही जाणीव झाली नव्हती की ते एके दिवशी ते शिकवूसुद्धा शकतील.ते केवळ ब्रिजचे एक वाईट खेळाडूच नव्हते,तर खूप हटवादीसुद्धा होते.ते इतके सारे प्रश्न विचारत आणि प्रत्येक डावानंतर इतकी चिरफाड करीत की कुणीच त्यांच्यासोबत खेळायला तयार नसत.

मग ते एका सुंदर ब्रिज शिक्षिका जोसेफाइन डिलनला भेटले. दोघांमध्ये प्रेम जमलं आणि त्यांनी विवाह केला. जोसेफाइननं बघितलं की तो आपल्या पत्त्यांचं किती कसून विश्लेषण करतो आणि तिने आपल्या पतीला हा विश्वास दिला की त्याच्यात या खेळाबद्दल विशेष प्रतिभा दडलेली आहे. कल्बर्टसनं मला सांगितलं की या प्रोत्साहनामुळे आणि केवळ त्याचमुळे त्याने ब्रिज आपला व्यवसाय म्हणून निवडला.


क्लेरेंस एम.जोन्स सिनसिनाटी,ओहियोमध्ये आमच्या अभ्यासक्रमाचे शिक्षक होते.त्यांनी सांगितलं की कशा

त-हेने प्रोत्साहन दिल्याने आणि चुकांना सुधारणे सोपे करून सांगितल्याने त्यांच्या मुलाचे जीवन पूर्ण बदलून गेले."१९७० मध्ये माझा १५ वर्षीय मुलगा डेव्हिड माझ्यासह राहण्यास सिनासिनाटीमध्ये आला. त्याने जीवनात अनेक समस्यांचा सामना केला होता.१९५८ मध्ये एका कार-अपघातात त्याच्या डोक्याला इजा झाली होती.त्याच्या मस्तकावर आजही खाच आहे.१९६० मध्ये त्याच्या आईशी माझा घटस्फोट झाला.त्या नंतर डेव्हिड आपल्या आईबरोबर डल्लासमध्ये राहू लागला.


पंधरा वर्षापर्यंत त्याने आपले बहुतांश शालेय जीवन त्या शाळांमध्ये घालवलं.जिथे मंद गतीने शिकणाऱ्यांसाठी विशेष वर्गांचे आयोजन केले जाते.कदाचित डोक्यावरच्या निशाणीमुळे शाळेच्या लोकांनी हा निर्णय घेतला असावा की त्याच्या मेंदुला इजा झाली आहे आणि त्याचं डोकं सामान्य स्तरावर काम करीत नाही.तो आपल्या वयाच्या इतर मुलांपेक्षा दोन वर्षे मागे होता,म्हणून तो सातवीतच होता.पण त्याला अजूनपर्यंत पाढे पाठ झाले नव्हते.त्याला आपल्या बोटांवर मोजता येत नव्हतं आणि तो मुश्किलीने वाचू शकत होता."एक चांगली गोष्ट मात्र होती.त्याला रेडिओ आणि टीव्ही सेटवर काम करणं खूप आवडायचं.

तो टीव्ही तंत्रज्ञ बनू इच्छित होता.मी त्या क्षेत्रात त्याला प्रोत्साहित केलं आणि त्याला सांगितलं की त्याचे प्रशिक्षण सफल व्हायला त्याचं गणित चांगलं असणं आवश्यक होतं.मी निर्णय घेतला, की मी त्याला या विषयात पारंगत व्हायला त्याची मदत करेन.


आम्ही फ्लॅश कार्डाचे चार संच घेऊन आलो:गुणाकार,

भागाकार,बेरीज आणि वजाबाकी करण्यासाठी जेव्हा आम्ही कार्डाचा उपयोग करीत असू,तेव्हा आम्ही बरोबर उत्तरांना एका वेगळ्या जागी ठेवत असू.जेव्हा डेव्हिड एखाद्या कार्डाचं अचूक उत्तर देऊ शकत नसे, तेव्हा आम्ही तो पत्ता पुन्हा बाजूला ठेवायचो.ही प्रक्रिया तोपर्यंत चाले,

जोपर्यंत त्याचं उत्तर अचूक येत नसे.प्रत्येक वेळी अचूक उत्तर दिल्यावर मी त्याची खूप स्तुती करीत असे.विशेषतः तेव्हा जेव्हा तो मागील कार्डचं अचूक उत्तर देऊ शकला नसे.प्रत्येक रात्री आम्ही सगळी कार्ड संपून जाईपर्यंत हा खेळ खेळायचो.रोज रात्री आम्ही स्टॉपवॉच घेऊन या कामाची नोंद ठेवत असू.मी त्याला वचन दिलं होतं की जेव्हा तो सर्व कार्डाचं अचूक उत्तर आठ मिनिटात देईल अन् त्याचं एकही उत्तर चूक येणार नाही,तेव्हा आम्ही ते रोज रात्री करण्याचं थांबवू.हे डेव्हिडसाठी अशक्य लक्ष्य होतं.पहिल्या रात्री या प्रक्रियेला ५२ मिनिटं लागली,

दुसऱ्या रात्री ४८,मग ४५, मग ४४,४१ आणि मग ४० मिनिटं.कमी झालेल्या वेळेबद्दल आम्ही रोज सेलिब्रेशन करायचो.मी आपल्या पत्नीला फोन करून हे सांगत असे.मी आपल्या मुलाला कवटाळत असे आणि आम्ही नाचत असू.महिन्याअखेर तो सर्व कार्डाची उत्तरं आठ मिनिटांपेक्षा कमी वेळात देऊ लागला.जेव्हा त्याच्यात एखादी छोटी सुधारणा होई तेव्हा ते गणित पुन्हा सोडवण्याचा तो आग्रह धरायचा.त्यानं हा अद्भूत शोध लावला की शिकण्यात किती मजा येते आणि ते किती सोपं आहे."स्वाभाविकच त्याला गणितात खूप चांगले गुण मिळाले.हे आश्चर्यकारक आहे की जेव्हा तुम्हाला गुणाकार करता येतो तेव्हा गणित किती सोपं होऊन जाते.जेव्हा गणितात त्याला बी ग्रेड मिळाली तेव्हा तो चकित झाला.असं आजवर कधीच झालं नव्हतं.

त्याच्यात इतर बदलही अविश्वसनीय वेगाने घडून आले.त्याची अभ्यासाची गती खूप वाढली आणि तो आपल्या चित्रकलेच्या जन्मजात गुणांचा अधिक चांगल्या त-हेने प्रयोग करू लागला. 


शालेय सत्राच्या शेवटच्या महिन्यांमध्ये त्याच्या विज्ञानाच्या शिक्षकाने त्याच्यावर एक मॉडेल बनवण्याची जबाबदारी सोपवली.त्याने एक जटिल मॉडेल बनवण्याची निवड केली.त्यासाठी चित्रकला व मॉडेल बनवण्याची क्षमता हवी होती आणि ॲप्लाईड मॅथ्समधील निपुणतासुद्धा हवी होती.शाळेच्या विज्ञान-मेळ्यात त्याच्या मॉडेलला प्रथम पुरस्कार मिळाला;तर पूर्ण सिनासिनाटी शहरातून तिसरा पुरस्कार मिळाला.


"यामुळे पूर्ण चित्रच पालटलं.हा तोच मुलगा होता जो दोन वर्ग मागे पडला होता,ज्याला 'डोक्याने कमी बुद्धीचा' म्हटलं जात होतं.त्याचे सहपाठी त्याला 'फ्रैंकस्टाईन' म्हणून चिडवत असत आणि म्हणत असत,डोक्यावर घाव आल्यावर त्याचा मेंदू बाहेर वाहून गेला असावा. अचानक त्याला आढळून आलं की तो खरोखर शिकू शकतो.काही करून दाखवू शकतो. परिणामी,आठवीच्या शेवटच्या सत्रात त्याला पूर्ण हायस्कूलमध्ये नेहमी महत्त्वाच्या जबाबदाऱ्या मिळाल्या.त्याला नॅशनल ऑनर सोसायटीसाठी निवडलं गेलं.एकदा जेव्हा त्याला आढळून आलं की शिकणं सोपं आहे, त्यानंतर त्याचं पूर्ण जीवनच बदलून गेलं.जर तुम्हाला दुसऱ्यांना सुधारण्यात मदत करायची असेल तर लक्षात ठेवा-


इतरांना प्रोत्साहित करा.त्यांना हे सांगा,की चूक सुधारणे सोपे आहे.


११.०१.२४ या लेखातील पुढील भाग..