* विजय गायकवाड | Vijay Gaikawad

live

नमस्कार आपले स्वागत आहे. 'सगळे जण तुम्हाला शोधत येतील.आनंदाने तुडुंब भरलेली माणसे सर्वांनाच आवडतात! पण ते तुम्हाला दुःखी,उदास अशा अवस्थेत पाहू शकत नाहीत! तेव्हा आनंदी-हसतमुख रहा आणि मित्रांचा सहवास वाढवा! जर तुम्ही दुःखी राहिलात तर मात्र सगळे जण तुम्हाला सोडून जातील. जीवनातील आनंद-प्रसन्नता भरभरून वाटा! पण एकटे दुःखी रहाल, तर त्या दुःखातच बुडून जाल !' सॉलिट्यूड, ईला व्हीलर विलकॉक्स जगण्याच्या तयारीसाठी नव्हे तर,जगण्यासाठी माणूस जन्माला आला आहे,असं 'बोरिक पास्तरनाक' यांनी म्हटलेलं आहे.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! वाचन हे आहाराहून जास्त महत्त्वाचे असते.जिम र्‍होम यांनी अँथोनी रॉबीन्स यांना शिकवले होते की 'एक वेळ रोजचे जेवण चुकव,पण वाचन अजिबात चुकवू नको.' याप्रमाणे मी अखंडपणे वाचत आहे. माणसांपासून माणसांपर्यंत जाण्याचा,प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाण्याचा जीवनाचा राजमार्ग पुस्तकातून जातो. कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात. पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये. म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,कवी सचिन शिंदे,संतोष शेळके,अनिल फारणे,सहित प्रकाशन,डॉ.रवींद्र श्रावस्ती,डॉ.सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,संजय बापट,मनोहर सुर्वे,विनायक पाटील,संतोष पाटील,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, मेनन पिस्टन रिंग मधील सहकारी मित्र शेखर सुर्यवंशी..। पुस्तकातील घटना प्रसंग हे मी लिखित स्वरूपात सध्या व्हाट्सअप वरती टाकत असतो.हे सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी,पुस्तके देणारी लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत. ... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ. मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. विजय कृष्णात गायकवाड

१०/२/२४

गॅलिलिओ गॅलिली - डॉयलॉग.. Galileo Galilei - Dialogue..

गॅलिलिओला आपल्या वडिलांमुळे संगीताची गोडी लागली.ल्यूट वाद्य शिकून त्यावर त्यानं अनेक संगीत रचना केल्या.होमर,दान्ते आणि व्हर्जिल यांची काव्यं गॅलिलिओला तोंडपाठ होती.आपल्या वडिलांचं कलासक्त मन, झपाटलेपण,बंडखोर वृत्ती,पुरोगामी विचारांची कास,प्रयोगशीलता आणि सर्जनशीलता या गोष्टींचा प्रचंड मोठा प्रभाव गॅलिलिओवर पडला.


पिसामधल्या चर्चमध्ये जायला गॅलिलिओला खूप आवडायचं.एका दंत कथेप्रमाणे १५८३ साली गॅलिलिओ फक्त १७ वर्षांचा असताना


एका रविवारी धर्मगुरूंचं पिसामधल्या कॅथिड्रलमध्ये कंटाळवाणं प्रवचन सुरू असताना त्यानं छतावर लटकणारा एक नक्षीदार दिवा बघितला.वाऱ्याच्या झोताबरोबर तो दिवाही झोके घेत होता.त्या झोक्याचं लयबद्ध मागेपुढे होणं गॅलिलिओला अचंबित करून गेलं;पण ते बघत असतानाच त्याला एकदम एक ब्रेन वेव्ह आली आणि तो नाचतच घरी आला आणि त्यानं लगेचच प्रयोगाला सुरुवात केली.त्यानं दोन वेगवेगळ्या वजनाच्या वस्तू घेतल्या.झोका लहान असो वा मोठा किंवा लंबकाचं (पेंड्युलमचं) वजन कमी असो वा जास्त,जोपर्यंत लंबकाच्या दोरीची लांबी तेवढीच राहते,तोपर्यंत त्याच्या आंदोलनाला तेवढाच वेळ लागतो असा निष्कर्ष गॅलिलिओनं प्रयोगांनंतर निरीक्षणं करून काढला.दोरीची लांबी बदलली तर मात्र हा आंदोलनासाठी लागणारा वेळ बदलतो हेही त्याला समजलं.या सगळ्या प्रयोगांसाठी त्या काळी घड्याळ नसल्यानं वेळ मोजण्यासाठी त्यानं हाताची नाडी वापरली.याच पेंड्युलमचा वापर नंतर

गॅलिलिओनं त्याचे 'गतीचे नियम' मांडण्यासाठी केला आणि याच पेंड्युलमचा वापर करून ह्यूजेन्सनं पहिलं घड्याळ बनवलं. त्या कॅथेड्रलमध्ये अजूनही एक दिवा जतन करून ठेवला आहे.तो 'गॅलिलिओचा दिवा' म्हणून आजही ओळखला जातो.


गॅलिलिओला आकिर्मिडीज आवडायचा. आकिर्मिडीजची 'युरेका युरेका' ही गॅलिलिओच्याच सुपीक डोक्यातून निघालेली दंतकथा असावी,असं बऱ्याच जणांचं म्हणणं आहे.गॅलिलिओनं आकिर्मिडीजच्या सिद्धान्ताप्रमाणे एक छोट्या आकाराचा वैज्ञानिक तराजू बनवला.गॅलिलिओनं बनवलेला हा खास तराजू (हायड्रोस्टॅटिक बॅलन्स) सर्वसामान्य तराजूपेक्षा खूपच वेगळा होता.याची खासियत म्हणजे या तराजूचा वापर करून कुणीही एखाद्या संमिश्र धातूमधल्या दोन धातूंचं नेमकं प्रमाण शोधू शकायचा.


याच वेळी ॲरिस्टॉटलला देव मानून त्याचा शब्द प्रमाण मानणाऱ्या लोकांचा गॅलिलिओला राग यायला लागला.'जड वस्तू ही हलक्या वस्तूपेक्षा जमिनीवर आधी पडते.'असं ॲरिस्टॉटलनं दीड हजार वर्षांपूर्वी मांडलेलं म्हणणं त्याला पटत नव्हतं.

ॲरिस्टॉटलच्या शब्दांची शहानिशा न करता झापडबंद समाज आणि विद्वान यांनीही ते मान्यही केलं होतं.गॅलिलिओचं म्हणणं नेमकं याच्या उलट होतं.भिन्न वजनाच्या दोन वस्तू पडताना एकाच वेळी खाली पडतात,असं त्याला म्हणायचं होतं.सत्य काय आहे हे प्रयोगानं बघायलाच पाहिजे,असं त्याच्या मनान घेतलं.अखेर त्यानं एके दिवशी याची खात्री करून घ्यायचं ठरवलं आणि दुसऱ्याच दिवशी पिसाच्या मनोऱ्यावरून जड आणि हलकी वस्तू खाली टाकून बघायचं ठरवलं. ११७४ साली बांधलेला पिसाचा मनोरा आज तर लंबरेषेपासून १७ फुट झुकलेला आहे. या मनोऱ्यापाशी गॅलिलिओनं प्रयोग बघायला बऱ्याच लोकांना बोलावलं होतं.गर्दीतून वाट काढत गॅलिलिओ स्वतः मनोऱ्याच्या दगडी भिंतीच्या आतल्या,

उभा चढ असलेल्या गोलाकार जिन्याच्या शेकडो पायऱ्या चढून वर गेला.१७९ फूट उंचीवर त्यानं एक ५० किलोचा,तर दुसरा १ किलोचा असे तोफेतले दोन गोळे ठेवले होते.गॅलिलिओनं काहीच क्षणात एकाच वेळी ते गोळे खाली सोडले. काहीच क्षणात दोन्ही तोफेचे गोळे जमिनीवर येऊन पडले;पण ते अचूकरीत्या एकाच क्षणी खाली पडले नाहीत.जेव्हा जड गोळा जमिनीवर आदळला,तेव्हा हलका गोळा जमिनीपासून २ इंचावर होता इतकंच.हा फरक हवेच्या खालून मिळणाऱ्या रेट्यामुळे आहे,असं गॅलिलिओनं सांगितलं;पण हा फरक खूपच नगण्य होता.गॅलिलिओनं १५९१ च्या सुमारास प्रयोगाच्या साहाय्यानं जड आणि हलकी वस्तू एकाच वेळी खाली पडतात,हे दाखवून दिलं आणि ॲरिस्टॉटलच्या मतांना तडा दिला.


ज्या वेळी गॅलिलिओ पडुआ विद्यापीठात प्रोफेसर होता,त्या वेळी त्याची पाओलो सार्पी, जिओव्हानी पिनेली आणि सॅग्रॅडो यांच्याबरोबर घनिष्ठ मैत्री झाली.पिनेलीच्या वैयक्तिक ग्रंथालयात ८० हजारांहून जास्त ग्रंथ होते.पिनेलीबरोबरच्या मैत्रीमुळेच गॅलिलिओला त्याच्या ग्रंथालयाचा हवा तसा उपयोग करता आला.

पिनेलीमुळे गॅलिलिओला व्हेनिसच्या शस्त्रागाराचा सल्लागार म्हणूनही काम मिळालं. अशी कामं करायला गॅलिलिओला खूप आनंद मिळत असे. त्यानं लिहिलेल्या 'डायलॉग' या पुस्तकात त्यानं याविषयी लिहिलंय.इथे असताना त्यानं किल्ल्यांची तटबंदी या विषयावर एक प्रबंध लिहिला.तसंच १५९४ मध्ये त्यानं शेतीला पाणीपुरवठा करणारं एक यंत्र बनवलं आणि व्हेनिसमध्ये त्याचं चक्क पेटंटही घेतलं पेटंट कायद्याच्या इतिहासात पेटंट मागणाऱ्या पहिल्या काही संशोधकांमध्ये गॅलिलिओ मोडतो.इतकंच काय,पण गॅलिलिओनं जहाजबांधणीतले अनेक प्रश्न भौतिकशास्त्राच्या मदतीनं सोडवले,लष्कराच्या कामातही त्यानं आपल्या बुद्धीचा प्रत्यय दाखवला.तोफेच्या गोळ्याचा अचूक मारा करण्यासाठी तोफ किती अंशाच्या कोनात ठेवायला हवी हे त्यानं गणिताच्या मदतीनं शोधून काढलं.गॅलिलिओचा मित्र संग्रॅडो खूप श्रीमंत असल्यामुळे गॅलिलिओला पैशांची चणचण भासायला लागली की तो त्याची प्रतिष्ठा वापरून त्याचा पगार वाढवण्याचं काम करत असे,जेव्हा गॅलिलिओनं 'डायलॉग' आणि 'डिसकोर्सेस' हे दोन ग्रंथ लिहिले त्यात आपल्या या जिज्ञासू आणि बुद्धिमान मित्राची आठवण म्हणून त्याच्याच नावाचं पात्र निर्माणकरून त्याला साहित्यविश्वात अजरामर केलं.


 १५९३ साली गॅलिलिओनं भौतिक- शास्त्रातलं अत्यंत उपयोगी असं तापमापक ( थर्मामीटर) हे साधन पाण्याचा वापर करून बनवलं.त्यानंतर काही वर्षांनतर गॅलिलिओनं पाण्याऐवजी वाइनचा वापर केला;पण नंतर १६७० मध्ये पाऱ्याचा वापर करण्यात आला; पण थर्मामीटरच्या कल्पनेचा जनक म्हणून गॅलिलिओचंच नाव घ्यावं लागेल.या काळात त्यानं गोलभूमिती,तरफ,पुली,

स्क्रू या विषयांवर निबंध लिहिले.गॅलिलिओनं वेग (व्हेलॅसिटी) याची कल्पना वैज्ञानिक परिभाषेत मांडली. गॅलिलिओनं बल किंवा जोर (फोर्स) याचीही कल्पना मांडली.कुठलाही पदार्थ जोपर्यंत आपण त्यावर बाहेरून कुठलाही जोर लावत नाही तोपर्यंत त्याच वेगानं प्रवास करत राहतो. ही त्याची नैसर्गिक प्रवृत्तीच असते,असं गॅलिलिओनं मांडलं. यानंतर कुठलीही वस्तू आपल्या जागेवरून हलायला जो प्रतिकार करते त्याला गॅलिलिओ 'जडत्व (इनर्शिया)' असं म्हणे.गॅलिलिओच्या या विचारांवर आणि नियमांवरच पुढे न्यूटननं त्याचे गतीचे नियम विकसित केले.गॅलिलिओनं उच्चतम प्रतीचा एक कंपास बनवला होता.तो समुद्री यात्रा करणाऱ्यांसाठी खूपच उपयुक्त ठरला.त्यानं आपल्या हयातीत सूक्ष्मदर्शक,पेंड्युलमचं घड्याळ,खूप कमी वजन मोजण्यासाठी केलेला तराजू आणि पंप अशा अनेक गोष्टींचे शोध लावले.


१६०९ साली गॅलिलिओनं दुर्बीण (टेलिस्कोप) बनवली आणि मग त्यानं अशा दुर्बिणी (टेलिस्कोप्स) विकायला सुरुवात केली.मग हे टेलिस्कोप्स इतके लोकप्रिय झाले की,ते घरोघरी दिसायला लागले आणि प्रतिष्ठेचा भागही बनले. याच दुर्बिणीतून गॅलिलिओच्या जागी दुसरा कोणी असता तर त्यानं लांबवरून येणारं जहाज बघितलं असतं;पण त्याऐवजी त्यानं आपली दुर्बीण फक्त आकाशाकडे वळवली आणि त्या क्षणापासून संपूर्ण विज्ञानाचा आणि खगोलशास्त्राचा इतिहासच बदलला! या दुर्बिणीतून गॅलिलिओनं चंद्रावरचे डोंगर, दऱ्या,विवरं अशा अनेक गोष्टी न्याहाळल्या. चंद्रावर दिसणारे डाग हे डाग नसून तिथल्या डोंगराच्या पडणाऱ्या सावल्या आहेत हे गॅलिलिओला जाणवलं.या सगळ्या शोधांवर मग गॅलिलिओनं 'द स्टारी मेसेंजर' नावाचं पुस्तकही लिहिलं.१६१० साली गॅलिलिओनं गुरुच निरीक्षण करून त्याभोवती फिरणारे उपग्रह आणि चंद्र शोधून काढले.गुरूला आणखी उपग्रह आहेत ही गोष्ट त्या काळी कोणालाच ठाऊक नव्हती;पण गॅलिलिओनं आपल्या दुर्बिणीतून गुरूच्या भोवती फिरत असलेले चार चंद्र शोधले. गुरूभोवतीचे चंद्र बघून,चंद्र हे काही फक्त पृथ्वीलाच नाहीयेत,त्यामुळे पृथ्वी ही काही या विश्वात केंद्रस्थानी मानण्याचं कारण नाही, हे कोपर्निकसचं म्हणणं बरोबर असलं पाहिजे,'असं त्याचं ठाम मत झालं. या पुस्तकामुळे गॅलिलिओ रातोरात चक्क हिरो बनला;पण पृथ्वीला केंद्रस्थानी मानणाऱ्या चर्चला गॅलिलिओचं म्हणणं पटणंच शक्य नव्हतं. त्यामुळे 'चंद्रावरचे पर्वत,डाग आणि दुर्बिणीतून दिसणाऱ्या इतरही गोष्टी खऱ्या नसून त्या दिशाभूल करणाऱ्या आहेत,'असंच चर्च म्हणायला लागलं.


८ जानेवारी १६४२ रोजी गॅलिलिओ मृत्युमुखी पडला.खेदाची गोष्ट ही की,पोप रागावेल म्हणून १७३७ सालापर्यंत म्हणजे शंभरएक वर्षं गॅलिलिओचं स्मारकसुद्धा उभं राहिलं नाही. विसाव्या शतकातला प्रसिद्ध जर्मन नाटककार बॉल्ड ब्रेख्त याच्या लेखणीतून साकारलेलं 'द लाइफ ऑफ गॅलिलिओ' हे नाटक गॅलिलिओच्या आयुष्याच्या दुसऱ्या कालखंडावर भाष्य करतं. पुढे १९७५ मध्ये याच नाटकावर आधारित 'गॅलिलिओ' नावाचा चित्रपटही निघाला.


एखाद्या पदार्थांचे गुणधर्म प्रयोगाच्या आधारानं मांडताना गॅलिलिओनं गणिताचा आधार घेतला आणि या विषयाचं महत्त्व अधोरेखित केलं. आपलं कुतूहल फक्त 'का?' विचारून थांबायला नको,तर 'कसं?' असा प्रश्नही आपण स्वतःला विचारला पाहिजे आणि त्या दिशेनं शोध घेतला पाहिजे,अस तो म्हणे.


कोणतीही गोष्ट प्रयोगानं सिध्द केल्याशिवाय त्यानं खरी मानली नाही. त्यामुळेच गॅलिलिओला पहिला आधुनिक शास्त्रज्ञ म्हणता येईल.


गॅलिलिओच्या मृत्यूनंतर तब्बल ३४० वर्षांनी म्हणजे १९८२ साली 'सूर्य आणि पृथ्वी यांच्यापैकी कोण कुणाभोवती फिरतो याविषयीची जुनीच केस पुन्हा चर्चमध्ये उभी राहिली.मग त्यावर १० वर्षं विचार आणि उलटसुलट वाद-प्रतिवाद झाले.शेवटी सगळे पुरावे बघून १९९२ साली एकदा कुठे पोप पॉल दुसरे यांनी 'गॅलिलिओला चांगली वागणूक मिळाली नाही आणि पृथ्वीच (सूर्याभोवती) फिरते' हे कबूल केलं. तेव्हा ही बातमी 'न्यू यॉर्क टाइम्स'च्या मथळ्यावर झळकली

होती!त्याअगोदर तीन वर्ष म्हणजे १९८९ साली झेप घेतलेलं 'गॅलिलिओं' नावाचं अंतराळयान १९९५ साली जेव्हा गुरूपर्यंत पोहोचलं तेव्हा विसाव्या शतकानं गॅलिलिओला केलेला तो सलामच होता! गॅलिलिओच्याच दुर्बिणीनं याच गुरूभोवती फिरणारे चार चंद्र बरोबर ३८५ वर्षांपूर्वी टिपले होते!गॅलिलिओ,

त्याचं विपुल लेखन आणि विशेष म्हणजे त्याचा 'डायलॉग' हा ग्रंथ याचे ऋण जगातला कुठलाही माणूस कधीच विसरू शकणार नाही, हे मात्र खरं!


'का?' असं विचारून थांबायला नको,तर 'कसं?' असा प्रश्नही स्वतःला विचारला पाहिजे आणि त्या दिशेनं शोध घेतला पाहिजे.कोणतीही गोष्ट प्रयोगानं सिद्ध केल्याशिवाय खरी मानू नका.


०६.०२.२४ या लेखातील शेवटचा भाग…


तळटिप - हूशार माकड गब्बरसिंग हा 

०६.०२.२४ रोजी लिहिलेला लेख सोयरे वनचरे-अनिल खैर मधून घेतला होता.

Clever Monkey Gabbarsingh ..|


८/२/२४

हूशार माकड गब्बरसिंग / Clever Monkey Gabbarsingh ..|

२००० सालची गोष्ट असेल.एका बुधवारी आम्ही माझ्या ऑफिसमध्ये आठवडाभराच्या कामांचं नियोजन करत होतो.तेवढ्यात भोसरीच्या एम.एस.ई.बी.ऑफिसमधून माकडाचा कॉल आला.माकडाचा कॉल म्हणजे माकडाने केलेला कॉल नव्हे,तर वस्तीत शिरलेल्या माकडाच्या बंदोबस्तासाठी नागरिकांनी केलेला कॉल! त्या दिवशी आम्ही सगळेच बिझी होतो.त्यामुळे त्या कॉलवर एकट्या नेवाळेला पाठवलं;पण नेवाळे माकडाला बरोबर न घेता फक्त परिस्थितीचा अंदाज घेऊन परतला. तेव्हाच लक्षात आलं की प्रकरण वेगळं आहे.भोसरीत फिरणारं हे माकड आमच्या मंकी हिलच्या माकडांसारखं बॉनेट जातीचं माकड नव्हतं.ते होतं लाल तोंडाचं हिसस जातीचं माकड.प्हिसस माकडांचं वास्तव्य महाराष्ट्राच्या उत्तरेकडील राज्यांमध्ये असतं.या माकडांची शेपूट आखूड असते.त्याचं तोंड आणि ढुंगण लालसर असतं.बॉनेट माकडापेक्षा ते स्वभावाने आक्रमक असतं.त्यामुळे त्याला पकडणं सोपं काम नव्हतं.दुपारी माकड पकडण्याचं सामान घेऊन आम्ही तयारीनिशी भोसरीला गेलो.


तेव्हा महाराजांना झाडावर चांगलीच डुलकी लागली होती.त्यांची वामकुक्षी पूर्ण होईपर्यंत तिथेच बसून राहिलो.

झोप झाल्यावर माकड झाडावरून खाली उतरलं.त्याचा अंदाज घेण्यासाठी आम्ही एका ओट्यावर थोडी फळं ठेवली.त्या फळांकडे साफ दुर्लक्ष करून ते तीन पायांवर उड्या मारत कुठे तरी पसार झालं. त्याच्या गळ्याला बांधलेली साखळी त्याने पुढच्या उजव्या हाताला गुंडाळून घेतली होती. साखळी कुठे अडकू नये किंवा तिला धरून कुणी आपल्याला पकडू नये म्हणून त्या हुशार माकडाने ही युक्ती शोधून काढली होती.


थोड्या वेळाने पाहिलं,तर हातात साखळी गुंडाळलेल्या अवस्थेत ते माकड हायटेन्शन वायरच्या खांबावर चढताना दिसलं.त्यामुळे आमचंही टेन्शन वाढलं.इलेक्ट्रिकचा शॉक बसून मेलेली माकडं मी खूप वेळा पाहिली होती.आता या माकडाचा प्रवास त्याच दिशेने सुरू होता.त्याला हुसकावण्याचाही काही उपयोग होत नव्हता. खांबावर वरपर्यंत चढून ते थोडा वेळ थांबलं.

आम्हाला वाटलं,आता उतरेल खाली;पण उलट त्याने हवेत उंच झेप घेऊन थेट ट्रान्सफॉर्ममरवरच उडी मारली.हे सगळं उजव्या हातातला साखळीचा गोळा सांभाळत.त्या महाकाय ट्रान्सफॉर्ममरमधून आजूबाजूच्या कारखान्यांना वीजपुरवठा करणाऱ्या अजस्त्र वायरी जोडलेल्या होत्या. त्यातल्या एका जरी केबलला त्याचा किंवा त्याच्या हातातल्या साखळीचा स्पर्श झाला असता तर? कल्पनाच करवत नाही.खाली जमलेल्या शे-दीडशे बघ्यांबरोबर आमचीही भीतीने गाळण उडाली.


पण माकड मात्र अत्यंत शांत होतं.एखाद्या ज्ञानी योग्याप्रमाणे ते आत्मविश्वासाने फिरत होतं.नशिबाने थोड्या वेळाने ट्रान्सफॉर्मरचा नाद सोडून ते पुन्हा झाडावर येऊन विसावलं.खाली जमलेले बघे हळूहळू पांगू लागले.अंधार झाला आणि आम्हीही माघारी फिरलो.


दुसऱ्या दिवशी गुरुवार होता.भोसरी परिसरातल्या कारखान्यांच्या सुटीचा वार. गुरुवारी अनेकदा वीजपुरवठाही दिवसभर खंडित केला जातो.वीज- तारांजवळ वाढणाऱ्या झाडांच्या फांद्या कापण्याचं काम केलं जातं. त्यामुळे आज माकडाला धोका थोडा कमी होता. पार्कवरचं काम उरकून आम्ही दुपारी पुन्हा भोसरीला गेलो.काल ओट्यावर ठेवलेली फळं गायब झाली होती.ती माकडाने खाल्ली की आणखी कुणी लंपास केली कळायला मार्ग नव्हता.आज पुन्हा केळी आणि सफरचंद ठेवून आम्ही माकडावर लक्ष ठेवून लपून बसलो. मोठ्या रुबाबात गळ्यातली साखळी सांभाळत दोनच मिनिटांत ते माकड झाडावरून खाली उतरलं.

केळ्यांचा घड घेऊन ते पुन्हा एकदा ट्रान्सफॉर्मरवर जाऊन बसलं.तीन-चार केळी त्याने सोलून खाल्ली,उरलेली फेकून दिली आणि खाली येऊन सफरचंद घेऊन झाडावरच्या त्याच्या मुक्कामी जाऊन बसलं.

संध्याकाळपर्यंत खाली आलंच नाही.आम्ही पुन्हा एकदा माघारी निघालो.दुसऱ्या दिवशी सकाळीच पुन्हा भोसरी गाठलं.आज त्या माकडाला पकडायचं असं ठरवून आम्ही पिंजरा घेऊन गेलो होतो.आम्ही गेलो तेव्हा ते नेहमीप्रमाणे ट्रान्सफॉर्मरवरून उड्या मारत फिरत होतं.आम्ही तत्परतेने पिंजरा लावला.आमिष म्हणून त्यात सफरचंद लावलं. चांगली तीन वेळा ट्रायल घेतली.तीनही वेळा ट्रायल अयशस्वी झाली.माकड पकडण्यासाठी हा विशिष्टप्रकारचा पिंजरा आम्हीच विकसित केलेला होता.हा पिंजरा दीड फूट रुंद,दोन फूट उंच आणि तीन फूट लांब असतो.त्याच्या झडपेची उघडझाप वरच्या बाजूने होते. पिंजऱ्याच्या वरच्या बाजूला एक सरकती सळई असते.लोखंडी पिंजऱ्याच्या आतमध्ये जाणारा एक हुक तिच्या एका टोकाला जोडलेला असतो. त्यावर एखादं फळ घट्ट दाबून अडकवायचं. सळईच्या दुसऱ्या टोकाशी झडप जोडलेली असते.झडपेला एका स्प्रिंगने ताणून सळईच्या दुसऱ्या टोकाच्या तोंडाशी अलगद उघडून लॉक करायचं असतं.फळाच्या आमिषाने माकड आत घुसून फळ ओढू लागतं,तेव्हा सळईच्या दुसऱ्या टोकामधून झडप मोकळी होऊन स्प्रिंगच्या ताकदीने मिटली जाते आणि बंद होते. पिंजऱ्याच्या आकारात आणि आमिषाच्या प्रकारात थोडेफार बदल करून अशाप्रकारे प्राणी पकडता येतात.तो पिंजरा लावला आणि आम्ही परत पार्कवर आलो.माकड अडकलं की आम्हाला फोन करा,असं आसपासच्या लोकांना बजावून ठेवलं.दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत भोसरीतून फोन आला नाही म्हणून तिथे गेलो,तर पिंजरा रिकामाच होता. 


दरम्यान,माकडाने जवळच्या वस्तीत आणि शाळेत धुमाकूळ घालायला सुरुवात केली होती. मुलांच्या डब्यांतील खाऊ पळवणं,मुलींच्या वेण्या ओढणं,

बोचकारणं असे उद्योग सुरू होते.त्यानंतर चार दिवस झाले तरी माकड काही त्या पिंजऱ्याकडे फिरकलं नाही.अनेक आमिषं बदलून पाहिली;माकड काही केल्या पिंजऱ्यात येईना.चार-पाच दिवस असेच गेले.मर्कटलीला वाढू लागल्या.शेवटी त्याला भुलीचं इंजेक्शन देऊन पकडण्याशिवाय पर्याय उरला नाही.हे इंजेक्शन पंचवीस-तीस फुटांवरून देता येतं. यासाठी विशिष्ट प्रकारची फुंकनळी वापरली जाते.तिला ब्लो-पाइप म्हणतात.

त्यामुळे औषधासहित अख्खी सिरींज प्राण्यापर्यंत पोहोचते आणि टोकदार पोकळ सुईतून भुलीचं औषध हवेच्या दाबाने प्राण्याच्या शरीरात टोचलं जातं.एकदा ठरल्यावर सगळी तयारी करून भोसरी गाठलं.माकड त्याच्या नेहमीच्या झाडावर बसलं होतं.पशुवैद्यांच्या सूचनेनुसार भुलीचं औषध भरून मी सिरींज ब्लो-पाइपमध्ये लोड केली.माकड बेसावध आहे,असं बघून नेम धरून फुंकली;पण तेवढ्या वेळात काही तरी वेगळं घडतंय हे त्या चलाख माकडाला कळलं.सिरींज फुंकताना मी त्याच्या खांद्याचा नेमका वेध घेतला होता;पण सिरींज खांद्यापर्यंत पोहोचण्याआधी माकडाने अत्यंत चपळाईने खाली उडी मारली. सिरींज खांद्याला लागण्याऐवजी झाडात शिरली. आम्हाला हुलकावणी देण्यात माकड पुन्हा एकदा यशस्वी झालं.पिंजरा आणि भुलीचं इंजेक्शन हे दोन्ही प्रयत्न माकडाने हाणून पाडले होते.आजवर मी अनेक माकडं पकडली,पण याच्याएवढं हुशार माकड कधी भेटलं नव्हतं.ते आम्हाला आता चांगलंच ओळखू लागलं होतं. आमची गाडी दूरवर दिसली तरी ते आम्ही पोहोचू शकणार नाही एवढ्या उंचीवर जाऊन आमची गंमत बघत असे.दरम्यान,आता या माकडाच्या कारवाया शहरभर समजू लागल्या होत्या.वन विभागाबरोबरच आयुक्तांकडेही तक्रारी होऊ लागल्या होत्या.पालिकेच्या जनरल बॉडीमध्येही हा विषय निघाला आणि एक साधं माकड पकडू शकत नसल्याबद्दल आमच्यावर खूप टीकाही झाली.आम्ही तर पूर्णच हताश झालो होतो.

अशातच एक आशेचा किरण दिसला.मिरजेमध्ये शेख आडनावाचे काही मुस्लिम बांधव माकड पकडण्यात तरबेज असल्याचं समजलं.त्यांच्यापैकी शब्बीर हनीफ शेख यांच्याशी फोनवर चर्चा झाली.


थोडीफार घासाघीस करून माकड पकडण्यासाठी ते तयार झाले.वरिष्ठांच्या आणि वन विभागाच्या परवानगीने मी त्यांच्यावर हे काम सोपवलं.शब्बीर शेख यांच्याकडे माकड पकडण्याची कला कुठून आली ही एक वेगळीच गोष्ट.थोडं विषयांतर करून थोडक्यात सांगतो.नाथ संप्रदायातील एक योगी काही काळ मिरजेत मुक्कामी होते.गाव सोडून निघताना त्यांना अवगत विद्या त्यांनी गावकऱ्यांना शिकवल्या. माकड पकडण्याची विद्या शिकायला कोणीही हिंदू बांधव पुढे आला नाही.शेख कुटुंबीयांनी मात्र ती शिकण्याची तयारी दर्शवली,असं शब्बीर शेख यांच्याकडून कळलं.


शब्बीरभाईंनी आल्यावर माकडाची सगळी चौकशी केली.आम्हीही छोटे छोटे तपशील त्यांना सविस्तर सांगितले. ते म्हणाले, "हे नक्कीच अतिशय हुशार माकड आहे.त्यामुळे तुमच्यापैकी कुणीही त्याला माझ्यासोबत दिसता कामा नये. काय करायचं ते मी करेन." म्हटलं,

मान्य.दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांना घेऊन भोसरी गाठली. मुक्कामाच्या बरीच अलीकडे गाडी थांबवली. भरभर चालत शब्बीरभाई पुढे निघाले.त्यांनी आम्हालाही थोडं लांबून त्यांच्या मागे येत राहण्याची खूण केली.

आम्हाला पाहून माकड इकडे-तिकडे उड्या मारू लागलं.पण शब्बीरभाई आमच्यासोबत आहेत हे मात्र त्याला कळलं नाही.शब्बीरभाईंनी बऱ्याच वेळ त्या माकडाचं निरीक्षण केलं आणि आम्ही पार्कवर परतलो. परतल्यावर पुन्हा चर्चा सुरू.शब्बीरभाई म्हणाले, "माकड चालाक आहे.एकदा का माझा प्रयत्न फेल गेला,तर नंतर ते माकड कोणाच्या बापालाबी हाती लागणार न्हाई.तेव्हा एक-दोन दिवस मी फक्त वॉच ठेवतो आणि बराबर टायमाला पकडतो." त्यांच्या प्लॅनला हो म्हणण्याशिवाय आमच्याकडे पर्यायच नव्हता.


शब्बीरभाईंनी पार्कवरच मुक्काम केला. भोसरीला ते बसने जात-येत.आम्ही आमिषासाठी त्यांना फळं,काजू,

बदाम,पिस्ते वगैरे देऊ केलं;पण त्यांनी हसून ते सगळं बाजूला ठेवलं.तिसऱ्या दिवशी त्यांनी लाकडी फळ्या एकमेकांना जोडून छोटासा तात्पुरता पिंजरा तयार केला आणि भाड्याचा टेम्पो घेऊन माकडाकडे गेले.आम्ही खूप लांबवरच गाडी थांबवून ते काय करतात पाहत होतो.

त्यांच्या हातात एक मक्याचं कणीस होतं.कणीस पुढे करत ते थेट माकडासमोरच जाऊन उभे राहिले. त्यांनी तयार केलेला पिंजरा तिथेच बाजूला ठेवला होता;पण ते नटखट माकड पळून जाण्याऐवजी आज्ञाधारक मुलासारखं त्यांच्यासमोर आलं.माकडाशी ते काही तरी बोलत होते.माकडाने एकदाच बावरून इकडे-तिकडे पाहिलं आणि ते शब्बीरभाईंच्या आणखी जवळ आलं.

त्यांनी माकडाला पिंजऱ्यात जाण्याची खूण केली.

कदाचित तोंडानेही काही बोलत असावेत.माकड पटकन पिंजऱ्यात शिरलं.बक्षीस म्हणून त्यांनी हातातलं कणीस त्याला दिलं आणि पिंजऱ्याचं फळकुट बंद केलं.

आमच्याकडे पाहून ते हसले आणि म्हणाले, 'गब्बरसिंग मिल गया!' पुढे त्याचं नाव गब्बरसिंगच पडलं.आमच्या पार्कवरचं ते पहिलं 'न्हिसस' माकड! शब्बीरभाईंनी त्याच्यावर कोणती जादू केली ते आम्हाला कळलं नाही. 


त्यांच्या गुरूने शिकवलेल्या विद्येचं गुपित ते आम्हाला सांगणार नाहीत,हे उघडच होतं. कदाचित देहबोली आणि थेट संवाद यातून त्या माकडाला काही संदेश गेला असावा. कोण जाणे! 


६/२/२४

डॉयलॉग - गॅलिलिओ गॅलिली.. Dialogue - Galileo Galilei

गॅलिलिओनं (१९३२) लिहिलेलं 'डायलॉग कन्सर्निंग द टू चीफ वर्ल्ड सिस्टम्स' हे पुस्तक जगभर गाजलं.याचंच सुटसुटीत नाव म्हणजे 'डॉयलॉग'! या पुस्तकात कोपर्निकसची पद्धती आणि आधुनिक गतिशास्त्र यांच्यातला संबंध खूपच सोप्या रीतीनं गॅलिलिओनं उलगडला. 'डायलॉग' हे पुस्तक बुद्धिवंताला ज्या प्रमाणात समजेल आणि आवडेल,त्याच प्रमाणात सामान्यातल्या सामान्य माणसालाही समजेल याची काळजी घेत गॅलिलिओनं यात वैज्ञानिक दृष्टिकोन,रंजक आणि रसाळ भाषा आणि नर्मविनोदी पद्धत यांचा वापर केला.गॅलिलिओ एक भौतिकशास्त्रज्ञ,गणितज्ञ, खगोलशास्त्रज्ञ आणि एक तत्त्वज्ञ असं सगळंच काही होता! गॅलिलिओला 'आधुनिक खगोलशास्त्राचा आणि भौतिकशास्त्राचा पितामह' असंही म्हटलं जातं.इतकंच नाही तर 'आधुनिक विज्ञानाचा पितामह' म्हणूनही अख्खं जग गॅलिलिओला ओळखतं.त्या काळी गॅलिलिओला 'ताऱ्यांचा ख्रिस्तोफर कोलंबस' असंही म्हणत.प्रत्यक्ष निरीक्षण आणि तर्कशुद्ध विचार यांची सांगड घालून निष्कर्ष काढणारा गॅलिलिओ हा पहिलाच शास्त्रज्ञ म्हणता येईल.


गॅलिलिओ वैज्ञानिक तर होताच, पण तो एक उत्तम लेखक आणि कुशल वाक् पटूही होता.! 'सगळे प्राकृतिक नियम हे गणिती नियमांचं पालन करतात'असं पहिल्यांदा गॅलिलिओनं म्हटलं.


जवळजवळ १६ व्या शतकापर्यंत फारसे मोठे वैज्ञानिकही नव्हते.कोपर्निकस आणि केप्लर यांचा अपवाद सोडला तर ख्रिस्तपूर्व ३८४ साली जन्मलेल्या ॲरिस्टॉटलपासून ते गॅलिलिओच्या जन्मापर्यंत जवळजवळ २००० वर्ष ॲरिस्टॉटल आणि टॉलेमी यांचं तत्त्वज्ञान अणि ख्रिश्चन धर्म यांचा प्रचंड पगडा पाश्चात्त्य विचारसरणीवर खूपच मोठ्या प्रमाणात होता.


सूर्य पृथ्वीभोवती फिरतो किंवा दोन वस्तू खाली सोडल्या तर त्यातली जड वस्तू हलक्या वस्तूपेक्षा आधी जमिनीवर पडते,असं ॲरिस्टॉटल म्हणायचा.


 टॉलेमीनं त्याच्याच सुरात सूर भरला होता.ॲरिस्टॉटलनं मांडलेल्या विचारांच्या विरोधात किंवा चर्चच्या विरोधात बोललं तर लगेचच त्याच्यावर कारवाई करून त्याच्या कृतीला धर्मद्रोह ठरवून कठोरातली कठोर शिक्षा होत असे.ॲरिस्टॉटल आणि टॉलेमी या दोघांना विरोध करण्याची त्या काळी कोणामध्येच हिंमत नव्हती.ती हिंमत पहिल्यांदा वयाच्या अवघ्या २७ व्या वर्षी गॅलिलिओनं दाखवली.पृथ्वी सूर्याभोवती फिरते,असं त्यानं म्हटलं.


गॅलिलिओच्या आधी पोलंडमधल्या निकोलस कोपर्निकस आणि योहान केप्लर यांनी ॲरिस्टॉटलच्या मांडणीला विरोध केला.सगळे ग्रह सूर्याभोवती फिरतात,असं कोपर्निकस यानं मांडलं आणि ते लंबवर्तुळाकार कक्षेत फिरतात,असं केप्लर यानं मांडलं.मात्र चर्चच्या विरोधात जाण्याची ताकद त्यांच्यातही नव्हती.


१६२९ च्या नोव्हेंबर महिन्यात गॅलिलिओनं लिहिलेलं' 'डायलॉग कन्सर्निंग टू चीफ वर्ल्ड सिस्टिम्स' या शीर्षकाचं पुस्तकजगभर गाजलं. याचंच सुटसुटीत नाव म्हणजे 'डायलॉग' ! हे पुस्तक लिहिताना गॅलिलिओनं खूपच सावध भूमिका घेतली होती.आपलं म्हणणं थेट मांडण्याऐवजी टॉलेमी आणि कोपर्निकस यांच्यात होणाऱ्या संवादाच्या स्वरूपात त्यानं हे पुस्तक लिहिलं.

यामुळे तत्कालीन धर्ममार्तंड आपल्याला त्रास देणार नाहीत,असं गॅलिलिओला वाटलं.त्यानं सुरुवातीलाच कोपर्निकसच्या सिद्धान्ताची एक गोष्ट यात मांडली असून त्यात कोपर्निकसन ती गोष्ट गृहीत धरा,असं म्हटल्याचं लिहिल होतं,असं लिहिलं. थोडक्यात,चर्चनं आक्षेप घेतलाच तर आपण कोपर्निकस बरोबर असल्याचं कुठे ठामपणे म्हणतोय,असं सांगायचं असं त्यानं ठरवलं.हे पुस्तक लिहिताना कुठेही टोकाची भूमिका घ्यायची नाही,टीका करायची नाही,असं बरंच काही ठरवूनही जेव्हा गॅलिलिओ लिहायला लागला,तेव्हा मात्र त्याचा मुळातला टिंगलखोर स्वभाव जागा झाला आणि त्याचे संवाद चांगलेच परखड,रोखठोक आणि मसालेदार झाले, गॅलिलिओला लॅटिन आणि ग्रीक या दोन्ही भाषा उत्तम येत असल्या तरी त्यानं 'डायलॉग कन्सर्निंग टू चीफ वर्ल्ड सिस्टिम्स' हे पुस्तक मुद्दामच इटालियन प्राकृत भाषेत लिहून प्रकाशित केलं.हे पुस्तक त्यानं त्या काळच्या लॅटिन या तथाकथित उच्चभ्रूच्या भाषेत न लिहिता जाणीवपूर्वक मातृभाषेतून लिहिलं होतं.


'डायलॉग' या पुस्तकात कोपर्निकसची पद्धती आणि आधुनिक गतिशास्त्र यांच्यातला संबंध खूपच सोप्या रीतीनं गॅलिलिओनं उलगडला.या पुस्तकातले संवाद किंवा संभाषण चार दिवसांमध्ये विभागलेले दाखवले होते.

पहिल्या दिवशी ॲरिस्टॉटलच्या पद्धतीमध्येपृथ्वी आणि स्वर्ग यांच्यातल्या मूलतत्त्वामध्ये दाखवलेला फरक,दुसऱ्या दिवशी पृथ्वीचं रोजचं परिभ्रमण,

तिसऱ्या दिवशी पृथ्वीचं सूर्याभोवतीचं वर्षाचं फिरणं आणि चौथ्या दिवशी समुद्राची भरती-ओहोटी असं या पुस्तकाचं स्वरूप होतं. या पुस्तकात तीन माणसांचा संवाद मोठ्या नाट्यपूर्ण तऱ्हेने लिहिला होता.

'सिंप्लिसिओ' नावाचा एक जुनाट माणूस त्यात चितारला होता.तो त्या वेळच्या पोपप्रमाणेच काही तरी चुकीचं अवैज्ञानिक बोलतोय असं त्यात दाखवलं होतं; पण त्याचबरोबर सॅल्व्हिएटी नावाचा एक मनुष्य खगोलशास्त्रातले,कोपर्निकसचे आधुनिक विचार मांडताना दाखवला होता आणि सॅग्रडो नावाचा एक निवेदक दाखवला होता.सिंप्लिसिओ आणि सॅल्व्हिएटी यांच्यातल्या वादविवादात गॅलिलिओनं चातुर्यानं सिंप्लिसिओ जिंकतो असं वरवर दाखवलं असलं तरी 'सॅल्व्हिएटीचेच युक्तिवाद खरं तर बरोबर कसे आहेत असंच त्यातून व्यक्त होत होतं.चर्चच्या दृष्टीनं हे मात्र अतिच झालं होतं!या त्या वेळी पुस्तक प्रकाशित करण्यासाठी मुख्य चर्चची परवानगी घ्यावी लागत असे.

त्यामुळे ३ मे १६३० या दिवशी 'डायलॉग' पुस्तकाला चर्चची परवानगी मिळवण्यासाठी गॅलिलिओ स्वतः

आपल्या पुस्तकाचं बाड घेऊन रोमच्या दिशेनं निघाला; पण चर्चला गॅलिलिओचे निष्कर्ष न पटल्यामुळे पुस्तकाची प्रस्तावना आणि त्यातले निष्कर्ष पुन्हा चर्चच्या सूचनेप्रमाणे लिहावेत आणि मग गॅलिलिओनं या तात्पुरत्या स्वरूपात पुस्तक प्रकाशित करावं अशी चर्चनं त्याला परवानगी दिली.त्याच वेळी नेमकी प्लेगची साथ सगळीकडे थैमान घालत पसरत चालली होती.या धुमश्चक्रीतही गॅलिलिओनं अथक प्रयत्नांनी पुस्तकाच्या तीस प्रती छापल्या.याच पुस्तकात कूपमंडूक,संकुचित विचारसरणीच्या लोकांचं प्रतिनिधित्व करणारा सिंप्लिसिओ म्हणतो, 'आम्ही ॲरिस्टॉटल काय म्हणतो हे मानायचं नाही तर मग आम्हाला मार्गदर्शन कोण करणार?' त्या वेळी गॅलिलिओचं संग्रडो हे पात्र उत्तर देतं, 'आपल्याला अशा मार्गदर्शनाची गरजच का पडावी? आपल्याला कान,नाक, डोळे, हात आणि विचार करायला लावणारी बुद्धी मिळाली आहे.आपण स्वतंत्रपणे विचार करून यांचा वापर करायला हवा हे महत्त्वाचं नाही का?' अशा प्रकारचे संवाद लिहिताना गॅलिलिओला सगळ्या बाजू मांडताना,प्रत्येक बाजू बरोबरच आहे असं वाटण्याची ताकद त्या त्या संवादामध्ये असली पाहिजे याची जाणीव होती.'डायलॉग' हा ग्रंथ म्हणजे वाचकांसाठी बौद्धिक मेजवानीच होती.गोष्टीवेल्हाळ गॅलिलिओनं 'डायलॉग'मध्ये अनेक विषय हाताळले.

त्यामुळे त्याची व्यापकता वाढून तो एक अतिशय महत्त्वाचा ग्रंथ मानला गेला.


'डायलॉग' हे पुस्तक बुद्धिवंताला ज्या प्रमाणात आवडेल,त्याच प्रमाणात सामान्यातल्या सामान्य माणसालाही समजेल याची काळजी घेत गॅलिलिओनं यात वैज्ञानिक दृष्टिकोन,रंजक आणि रसाळ भाषा आणि नर्मविनोदी पद्धत यांचा वापर केला.गॅलिलिओनं लिहिलेलं 'डायलॉग' हे इतकं लोकप्रिय झालं की,त्या काळच्या पंडितांनाही ते पुस्तक वाचावं लागलंच. हे पुस्तक वाचताना गॅलिलिओनं काहीही स्पष्ट लिहिलं नसलं तरी लोक मात्र 'अरेच्च्या, हे पात्र हुबेहुब आपल्या पोपसारखंच आहे'असं म्हणायला लागले.


त्यातून पंडितांनी ते पुस्तक वाचून पोपचे कान भरायला सुरुवात केली.पोपच्या दरबारातले अनेक जण गॅलिलिओवर तसेही जळत होतेच. त्यांना गॅलिलिओची लोकप्रियता खटकत होतीच.गॅलिलिओच्या वादंग उठवणाऱ्या 'डायलॉग' या पुस्तकावर अखेर बंदी टाकण्यात आली.तसंच गॅलिलिओला रोमच्या पोपसमोर हजर होण्याचा आदेश निघाला.रोममध्ये पोहोचताच गॅलिलिओला पकडून सरळ तुरुंगात टाकण्यात आलं.त्या काळी चर्चचं स्वतंत्र न्यायालय असे.त्यामध्ये धर्माविरुद्ध कृती केलेल्यांचे खटले चालत.आरोप सिद्ध होण्यापूर्वी तुरुंगात डांबलेल्यांचा अतोनात छळही केला जात असे.

गॅलिलिओ हा धर्मद्रोही आणि पाखंडी असल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला होता.गॅलिलिओला कबुलीपत्रावर स्वाक्षरी करायला सांगितलं.आपण स्वाक्षरी केली नाही तर अतिशय क्रूरपणे ते आपल्याला ठार मारतील हेही त्याला दिसत होतं.तरीही सुरुवातीला सुनावणीच्या वेळी गॅलिलिओनं आपल्या छळाला न घाबरता आपण कुठल्याही वाईट हेतूनं हे पुस्तक लिहिलं नसून आपल्याकडून तसं कबूल करून घेणार असल्यास मी मृत्यूला जवळ करेन,असं स्पष्टपणे सांगितलं;पण शेवटी परिस्थितीसमोर गॅलिलिओनं हार मानली आणि


 दुसऱ्या सुनावणीच्या वेळी कबुलीपत्रावर अखेर स्वाक्षरी केली आणि पृथ्वी सूर्याभोवती फिरते,असं आपण पुन्हा कधीही म्हणणार नाही अशी बायबलवर हात ठेवून शपथ घेतो, असंही वचन दिलं; पण गॅलिलिओच्या कबुलीपत्रानंही पोपचं समाधान झालंच नाही.


त्याला अंधारकोठडीत डांबण्याचा आदेश पोपनं काढला.आयुष्याच्या शेवटी गॅलिलिओची दृष्टी पूर्णपणे गेली.जो माणूस ग्रहतारे बघायचा,विश्वाचं रहस्य उलगण्याचा प्रयत्न करायचा,माणसाला सत्याकडे नेण्याचा मार्ग दाखवायचा त्याच्या सभोवती फक्त अंधार आणि अंधारच उरला होता.


गॅलिलिओच्या अखेरच्या काळात अंधारकोठडीचा अस्कानिओ हा जेलर गॅलिलिओचा निस्सीम चाहता बनला होता.त्यानं अनेक नियम धाब्यावर बसवून गॅलिलिओला दुर्बीण बनवण्यासाठी एक चांगल भिंग उपलब्ध करून दिलं.त्यामुळे गॅलिलिओ न संपणाऱ्या रात्रीमध्ये आकाशातल्या ग्रहताऱ्यांचं निरीक्षण करू लागला.तसंच त्यानं गॅलिलिओच्या बुद्धीची कोंडी होऊ नये यासाठी अनेक वैज्ञानिक,कवी आणि संगीतकार यांना एकत्र करून गॅलिलिओबरोबर बोलण्यासाठी मोकळीक दिली.अस्कानिओच्या सहकार्यामुळेच गॅलिलिओच्या मनानं पुन्हा फिनिक्स पक्ष्याप्रमाणे उभारी घेतली आणि 'डिस्कोर्सेस (मीमांसा)' या अजरामर ग्रंथाची निर्मिती केली.


'डिस्कोर्सेस (मीमांसा)' या ग्रंथात गॅलिलिओनं पृथ्वीवरच्या पदार्थांना गती कशी मिळते याविषयी लिहिलं.हा ग्रंथ विज्ञानाच बायबल समजलं जातं.त्यानं काळ आणि अवकाश याबद्दल लिहिलेलं लिखाण वाचलं तर थक्क व्हायला होतं.त्यात गतीचे नियम आणि द्रव्याचे गुणधर्म यावर त्यानं लिहिलं.दृष्टी अधू झालेली आणि वृद्धत्वामुळे शरीराची साथ नाही अशा परिस्थितीतही गॅलिलिओच्या लिखाणाला कुठलीच शक्ती अडथळा आणू शकली नाही. त्याचं हे पुस्तक त्याला 'सगळ्यात आनंददायी' वाटायचं.'डायलॉग' मधलीच सॅल्व्हिएटी,

सॅग्रडो आणि सिम्प्लिसिओ ही पात्रं त्यानं 'डिस्कोर्सेस'

मध्ये घेतली आणि या पात्रांना सजीव करत आपलं म्हणणं मांडलं.हा ग्रंथ लॅटिन आणि इटालियन भाषेचे मिश्रण आहे.यात पदार्थांच्या गुणधर्माबरोबरच स्थापत्यशास्त्र,लष्करासाठी वापरलं जाणारं तंत्रज्ञान याविषयीही लिहिलं आहे.हा ग्रंथ वाचताना वाचकाजवळ केवळ कुतूहल असून उपयोगाचं नाही,तर त्याचं गणित आणि भूमिती या विषयांतलं आकलन चांगलं पाहिजे,कारण यातल्या युनिफॉर्म मोशनविषयीचं लिखाण गणिती भाषेत मांडलं आहे.'डिस्कोर्सेस'चं लिखाण पूर्ण होताच आता ते प्रसिद्ध करायचं कसं,हा मोठ्ठा प्रश्न गॅलिलिओसमोर होता.एके दिवशी फ्रेंच राजदूत काऊंट फ्रान्सिस द नोइ यानं चर्चची खास परवानगी काढून गॅलिलिओची भेट घेतली; पण काऊंट नोइला गॅलिलिओ भेटल्यावर नेमकं काय घडणार आहे हे ठाऊक नव्हतं. 


गॅलिलिओची भेट होताच गॅलिलिओनं मोठ्या विश्वासानं आपल्या आयुष्याची पुंजी म्हणता येईल असा महत्त्वाचा 'डिस्कोर्सेस' हा ग्रंथ त्याच्या हाती सोपवला.काऊंट नोइनं पॅरिसला पोहोचताच तो ग्रंथ तिथल्या लुडविक एल्गेवीर या डच प्रकाशकाच्या हातात दिला.१६३८ मध्ये तो लिडन इथे प्रसिद्ध झाला.चर्चनं गॅलिलिओच्या ज्ञानावर इतकी बंधनं घातलेली असताना गॅलिलिओचे अफाट परिश्रम,

चिकाटी आणि तीव्र इच्छा यांच्या जोरावर तो प्रसिद्ध झाला.याच काळात गॅलिलिओनं गणितावरचा 'द आसेयर' नावाचा ग्रंथ लिहिला.या ग्रंथात गणितासारख्या रुक्ष विषयावरची मांडणी अत्यंत रसाळ,समर्पक अणि रोचक भाषेत केलेली आहे.यातली चिकाला या कीटकाची गोष्ट तर खूपच मंत्रमुग्ध करणारी आहे.रोमच्या पोपलादेखील गॅलिलिओची ही चिकाल्याची गोष्ट खूपच आवडली होती.रोमच्या पोपला साहाय्य करणारा धर्मशास्त्राचा प्राध्यापक (पुढे तो फादर झाला) रिकार्डी यानं तर गॅलिलिओच्या या ग्रंथांची प्रशंसा करताना म्हटलं होतं, 


'गॅलिलिओच्या 'द आसेयर'नं या युगाचं वैभव वाढवण्यात मोलाची भर टाकली असून या ग्रंथात बावनकशी सोन्यासारखं सत्य युक्तिवादाच्या आधारानं मांडलेलं असून ते बघताना मी या काळात जन्माला आल्याचा मला अभिमान वाटतो.'


 'द आसेयर' या ग्रंथात गॅलिलिओनं विज्ञान आणि गणित यांचं ज्ञान मानवी आयुष्यात किती महत्त्वाचं आहे हे सांगून प्रत्येकानं या ग्रंथाची गणिती भाषा शिकली पाहिजे याचा आग्रह धरला.या ग्रंथात त्रिकोण,वर्तुळ आणि अनेक भौमितिक आकृत्या यांच्या भाषेत गॅलिलिओनं आपलं म्हणणं मांडलं होतं.त्याच्या प्रत्येक लिखाणातून त्याची युक्तिवाद करण्याची शैली आणि हातोटी लक्षात येते.

गॅलिलिओ म्हणायचा, 


'आकांडतांडव करून आपलं म्हणणं खरं करणारे लोक जास्त आणि सुसूत्र आणि सुबद्ध पद्धतीनं आणि युक्तिवादानं आपलं म्हणणं निष्कर्षापर्यंत पोहोचवणारे लोक खूप कमी असतात.माणसांना जितकी कमी माहिती असते,जितकं त्यांना कमी कळतं तितके ते लोक जास्त आत्मविश्वासानं बोलतात; पण याउलट ज्या लोकांना खूप ज्ञान मिळवायचं असतं,खूप गोष्टी शिकायच्या असतात आणि समजून घ्यायच्या असतात,ते लोक आपले शब्द नेमके,मोजके आणि खूप सावधगिरीनं वापरतात.' त्याचं हे वाक्य नंतर खूपच लोकप्रिय झालं.त्या काळी हॉलंडमध्ये गॅलिलिओचंच नाव झळकायला लागलं,कारण 


एके दिवशी हॉलंडच्या दरबारात समुद्रावरचे अचूक अक्षांश-रेखांश सांगणाऱ्या शास्त्रज्ञाला ३० हजार सुवर्णमुद्रा बक्षिसीदाखल मिळतील, असं जाहीर झालं.गॅलिलिओच्या कानावर ही बातमी पडताच त्यानं आपली जुनी बाडं शोधून त्यातलं नौकानयनावर लिहिलेलं आपलं लिखाण उघडलं.त्यात त्यानं सिलाटोन नावाच्या शिरस्त्राणाचा शोध लावला होता आणि त्याची निर्मितीही केली होती.गॅलिलिओनं डचांना ते कळवताच त्यांच्या सरकारनं ते विकत घेतलंच,पण बक्षिसीच्या रकमेबरोबरच ५०० सुवर्णमुद्रांनी गुंफलेला एक हार गॅलिलिओला सन्मानादाखल पाठवला.इतक्यावरच ते थांबले नाहीत,तर ॲमस्टरडॅमच्या ॲथेनाईयममध्ये त्याच्या नावाचं खास सिंहासन निर्माण केलं आणि गॅलिलिओ

विषयी आपल्याला वाटणारा आदर आणि प्रेम व्यक्त केलं.ज्या गॅलिलिओला रोमनं धिक्कारलं,ज्याचा छळ केला,त्याच गॅलिलिओला हॉलंडमध्ये इतकं नावाजलं जातंय बघून चर्चची मान शरमेनं खाली झुकली;

पण पराभव मान्य करण्याइतकं उदार मन त्यांच्याकडे नसल्यामुळे त्यांनी गॅलिलिओला परदेशी सोनं स्वीकारता येणार नाही असं सांगितलं.


गॅलिलिओनं 'डायलॉग','द आसेयर' याबरोबरच 'द लिट्ल बॅलन्स','ऑन मोशन','मेकॅनिक्स','द स्टारी मेसेंजर','लेटर ऑन सनस्पॉट्स','लेटर टू द ग्रँड डचेश ख्रिस्तिना','डिसकोर्स ऑन द टाईड् स,'डिसकोर्स ऑन द कॉमेट्स' आणि 'डिसकोर्स अँड मॅथमॅटिकल डेमॉन्स्ट्रेशन रिलेटिंग टू न्यू सायन्सेस' एवढं प्रचंड लिखाण केलं.


दान्तेच्या 'गेट ऑफ हेल' मधल्या नरकाचं स्वरूप दाखवण्यासाठी गॅलिलिओनं विज्ञानाचा आधार घेत मांडणी केली होती आणि ऐकणारे चकित झाले होते! गॅलिलिओवर विज्ञानाचा इतका प्रचंड पगडा होता की,सर्वसामान्यां- पर्यंत सोप्या भाषेत ते कसं पोहोचवता येईल याचाच ध्यास त्याला लागलेला असे.त्याचं लिखाण नेमकं,मुद्देसूद,तर्कशुद्ध याबरोबरच तितकंच रसाळ,रंजक आणि सौंदयांन भरलेलं होतं.त्याचं लिखाण वाचताना वाचकांसमोर अमर्यादित असा शब्दभांडार अनुभवायला मिळतो. विज्ञानाबरोबरच तत्त्वज्ञान आणि तत्त्वज्ञाना

बरोबरच विनोद आणि उपहासानं भरलेलं सामाजिक व्यंग तो अतिशय सुंदर वाक्यरचनेतून उलगडून दाखवत असे. गॅलिलिओच्या लिखाणाबद्दल भाष्य करताना,


 इटालियन टीकाकार नतालिनो सॅपेनो यानं म्हटलंय,'गॅलिलिओन आपल्या लिखाणातून मानवी मूल्यं मांडताना प्रभावी आशयघन शैलीचा वापर केलाय.गॅलिलिओनं अशा प्रकारचं लिखाण करून इटालियन साहित्यिकांच्या भावी पिढ्यांसाठी आदर्श घालून दिला आहे. वाचकाच्या मनःपटलावर ठसा उमटवणारा गॅलिलिओ- सारखा दुसरा साहित्यिक दुसरा होणे नाही.'


(जग बदलणारे,ग्रंथ दीपा देशमुख,मनोविकास प्रकाशन


अशा या आधुनिक विज्ञानाचा जनक समजल्या जाणाऱ्या गॅलिलिओचा जन्म १५ फेब्रुवारी १५६४ साली इटली

मधल्या टस्कनी प्रांतातल्या पिसा इथे विन्चॅन्सो गॅलिली आणि ज्युलिया अमान्नाती या जोडप्याच्या पोटी झाला.


उर्वरित भाग नंतरच्या लेखामध्ये…!

४/२/२४

जाणून घेऊ काही नोंदी...! Let's know some records..|

वाळवी,मुंगी-मुंगळे,मधमाशा हे आहेत तीन सर्वांहून प्रगत संघप्रिय कीटक.ह्यांच्यात आघाडीवर आहेत आग्या माशा - या आकाराने सर्वात मोठ्या मधमाशा.ह्या दरडींवर,

झाडांवर, मोठ्या इमारतींच्या वळचणीला मोठमोठी पोळी बांधतात.त्यांच्या पोळ्यांतल्या मधाच्या साठ्यावर डल्ला मारायला अस्वले,माणसे सरसावतात.या शत्रूवर आग्या माशा हल्ला करतात.त्यांना नांगीने डंख करतात.ती नांगी तुटते.त्याबरोबर कोथळा बाहेर पडून त्या मृत्युमुखी पडतात.पण असे आत्मघातकी हल्ले चेवाने करतात.

मधमाशा फुलांतल्या मधावर,परागांवर उपजीविका करतात.तो गोळा करण्यासाठी लांब-लांब जायला त्यांची तयारी असते.त्यात भरपूर कष्ट असतात.कदाचित जिवाला धोका असला,तरी त्यांना पर्वा नसते.तेव्हा एखादे झाड कित्येक किलोमीटर दूर अंतरावरही फुलले तरी तिकडे धाव घेतात.असे समृद्ध अन्नस्रोत बरोब्बर कुठे आहेत हे एकीला कळल्यावर बाकीच्या भगिनीमंडळाला ते ठिकाण व्यवस्थित सांगता आले तर मोठ्या झुंडीने तिथे पोचून मध-पराग गोळा करणे फारच लाभदायक ठरणार,

अशी माहिती एकमेकींना नेटकेपणे पुरवण्यासाठी मधमाशांनी एक प्रतीकात्मक नाचबोली विकसित केली आहे. एखादे घबाड सापडून तिथून मध,पराग गोळा करून एखादी मधमाशी पोळ्यावर परतली की ती पोळ्याच्या पृष्ठभागावर नाचायला लागते. तिचा उत्साह पाहात,त्याने आकर्षित होऊन दुसऱ्या मधमाशा तिची नक्कल करत,तिच्या मागेमागे स्वतःही नाचतात.या नाचाच्या दिशेतून मधाच्या स्रोताची दिशा कळते - कारण या स्रोताचा आणि सूर्याकडे पाहिल्यास सूर्याच्या दिशेचा जो कोन होतो,तो नाचाच्या दिशेशी नेटकेपणे जोडलेला असतो.नाचताना मधमाशा आपला पृष्ठभाग हलवत असतात.या कंबर घुसळण्याच्या वेगाचा आणि किती अंतरावर मधाचा स्रोत आहे याचाही संबंध नेटकेपणे जोडलेला असतो.मूळ स्रोत सापडवणारी माशी नाचत असताना तिने आणलेला मध,पराग यांच्या सुगंधावरून हे कोणत्या जातीचे झाड आहे याचाही अंदाज येतो. अशा त-हेने मागे-मागे नाचून इतर मधमाशा हा नवा, आकर्षक स्रोत कसला, कोणत्या दिशेला, किती अंतरावर आहे हे ताडतात आणि तडक तो हुडकायला निघतात.


सामान्यतः प्राण्यांचे संदेश इथे आणि आत्ता पुरते मर्यादित असतात.त्यांच्यात जास्त खोलवर अर्थ फार क्वचित दिसून येतो.पण मधमाशांच्या नाचबोलीतून त्या बऱ्याच वेळापूर्वी सापडलेल्या,दूरवरच्या मध-

परागांच्या स्रोताची माहिती एकमेकींना पुरवतात.हे साधू शकते कारण मानवी भाषेप्रमाणेच मधमाशांची नाचबोली ही एक सांकेतिक भाषा आहे. 


आपल्या भाषेत वेगवेगळे आवाज आणि अर्थ यांचा असाच सांकेतिक संबंध जोडलेला असतो. दोन वेगळ्या भाषांत एकाच ध्वनीचा अगदी वेगळा अर्थ असू शकतो.तो ठराविक संबंध संकेताची माहिती असल्यानेच समजतो. मी कर्नाटकात प्रथम गेलो आणि कानडी भाषा शिकण्याचा मनापासून प्रयत्न करायला लागलो. तेव्हा एका शब्दाने चक्रावलो.एका विद्यार्थिनींच्या शाळेत वक्तृत्व स्पर्धा होती.मुली जोरात उत्साहात भाषणे करत होत्या. सगळ्या मधूनमधून जोरात म्हणायच्या - हागु,हागु,

कानडीत हागु म्हणजे तसेच,मराठीत तर विष्ठा आणि हेच दोन ध्वनी उलट्या क्रमाने म्हटले, गुहा,तर त्याचा अर्थ आणखीच वेगळा.सगळे ध्वनी केवळ चिन्हे,खुणा,

निशाण्या आहेत. रूढीने त्यांना वेगवेगळे अर्थ चिकटतात. माणसाच्या दहा कोटी वर्षे आधी मधमाशा असे संकेत वापरू लागल्या होत्या!


मोराचा ह्या कसा पिसारा फुलला ?


आजन्म ब्रह्मचर्य पत्करलेल्या,आत्मसमर्पण करणाऱ्या कामकरी मुंग्या मधमाशांचे जनुक निसर्ग निवडीत का टिकून राहतात ह्या डार्विनच्या पहिल्या कूटप्रश्नाचा असा अंशत: उलगडा झालेला आहे.त्याला दुसरे गूढ वाटत होते ते होते मोराच्या पिसाऱ्याचे लोढणे काही धोका डोकावला तर सुटसुटीत लांडोरी चट्कन् उडू शकतात.पण मोरांना हे जमत नाही.त्यांना धावपट्टीवरच्या विमानासारखे पळत जाऊन,वेग घेऊन मगच उडता येते. 


शिवाय दर वर्षी एवढी पिसे वाढवण्यात भरपूर शक्ती वाया जाते.निसर्ग ही उधळपट्टी का सहन करतो? डार्विननी सुचवले की लांडोरी भला मोठा पिसारा फुलवणाऱ्या मोराकडे जास्त आकर्षित होत असाव्यात.स्वयंवरात अशा विशालपुच्छ मोरांना इतरांहून अधिक बायका मिळत असणार,आणि म्हणून जरी त्यांना मृत्यूचा जास्त धोका असला तरी त्यांचे गुणधर्म पुढच्या पिढीत अधिक प्रमाणात उतरत असणार. डार्विनच्या शब्दात अशी 'लैंगिक निवड' 'निसर्ग निवडी'वर मात करताना दिसते.(मधुमक्षिका,वारूळ पुराण नंदा खरे )


पण लांडोरी निष्कारण स्वतःचा जीव धोक्यात लोटण्याचा वेडगळपणा करणाऱ्या मोरांकडे का आकर्षित होतात ? आमोट्झ झहावी नावाच्या इस्रायली शास्त्रज्ञाने ह्याचे रहस्य समजावून दिले आहे.तो म्हणतो की लांडोरींना असे विशालपुच्छ मोर भावतात कारण त्यांचे भलेमोठे पिसारे हे ते भरभक्कम नर आहेत असे सिद्ध करतात. त्याच्या ह्या मांडणीला लोढण्याचा किंवा जोखडाचा सिद्धान्त अथवा धुरातत्त्व - handicap principle असे नाव दिले गेले आहे.कमकुवत नरांना मोठे लोढणे वाढवणे, पेलणे कुठून जमणार? इतर काही सोंगे घेता येतील,पण प्रचंड पिसारा बाळगायचे सोंग घेता येणार नाही - मोठा पिसारा हे बळकटपणाचे लक्षण असणारच.मोरांच्या स्वयंवरात लांडोरी ठरवतात की भपकेदार पिसारा फुलवणारा मोर सगळ्यात दणकट असला पाहिजे,अशा जोडीदाराचे आनुवंशिक गुण आपल्या पिल्लांत उतरले पाहिजेत,अन् त्याला पसंत करतात.जरी अशा मोराच्या डोईवर मोठा भार असला तरी त्याला भरपूर जोडीदारणी मिळाल्याने असे तोऱ्यात दिमाख दाखवणारे सौंदर्य जीवसृष्टीत फैलावत राहतो.थव्यात - घोळक्यात राहणाऱ्या सगळ्या पशु-पक्ष्यांत मोरासारखीच इतरांवर कुरघोडी करण्याची खटपट अखंड चालू असते. कारण ह्यात सरशी होणारे प्राणी जगण्या-फळण्यात जास्त यशस्वी ठरतात.म्हणून समाजप्रिय पशू असे सच्चे संदेश पुरवणारी नानाविध लोढणी गळ्यात बाळगून वावरत असतात - त्यांचा भपका ऐटीने मिरवत फिरत असतात.मोरांकडून धडे घेऊन थिओडोर व्हेब्लेन नावाच्या अर्थशास्त्रज्ञाने मानवाच्या चंगळवादी जीवन शैलीचे इंगित आपल्याला समजावून दिले आहे.व्हेब्लेन म्हणतो की हातात अतोनात पैसे खुळखुळायला लागले की माणसाला आपल्याला खरेखुरे उपयोगाचे काय आहे याचा विसर पडतो.त्याच्या डोक्यात येते की जगातले खरे सौंदर्य आहे दिमाखात,जीवनातली खरी खुमारी आहे दुसऱ्याला हिणवण्यात.मग तो आपण किती श्रीमंत आहोत,बेपर्वाईने किती अपव्यय करू शकतो हेच दाखवण्याच्या मागे लागतो.मानवी समाजात मोठी जोखीम सांभाळणाऱ्यांना धुरंधर असे बिरुद दिले जाते. गुरुचरित्रात सरस्वतीगंगाधर म्हणतो ना : होईल सुख संसारी । राज्य दिधले धुरंधरी ।। धुरंधरचा शब्दश: अर्थ आहे जोखड पेलणारा,लोढणे ओढणारा.असे लोढणे वागवण्यातून प्रतिष्ठा लाभते. संदेश : खरे आणि खोटे


प्राण्यांच्या जगातही फसवाफसवी चालतेच. सगळ्याच फुलपाखरांच्या थोड्या जातीच खास आकर्षक रंगांनी नटलेल्या असतात.ह्या एक तर असतात विषकन्या,नाही तर मायावती ! सुरवंटांपासून आपला बचाव करण्यासाठी रुईसारख्या काही वनस्पती विषारी चीक,किंवा इतर विषारी रसायने बनवतात.अशा वनस्पती बहुतेक जातीची फुलपाखरे टाळतात.पण असेही बहाद्दर सुरवंट आहेत,की जे हे विष सहन करू शकतात.म्हणजे पचवत नाहीत,पण आपल्या शरीरात साठवून ठेवतात.हे साठवलेले विष प्रौढ फुलपाखरांच्या शरीरात उतरते,आणि त्यामुळे कीटक

भक्षक पक्षीही त्यांच्या वाटेस जात नाहीत.मग अशा जातींत जोडीदारांना आकर्षित करून घेण्यासाठी रंगीबेरंगी बनले तरी पक्षी-सरड्यांना बळी पडण्याची किंमत मोजावी लागत नाही.पण निसर्ग संधिसाधू आहे.विषारी फुलपाखरे पक्ष्यांच्या तावडीतून सुटतात म्हटल्यावर त्यांच्या सारख्याच दिसणाऱ्या,पण बिनविषारी तोतयांचीही उत्क्रांती सुरू झाली.ह्या तोतयांना असतो दुहेरी फायदा,विष साठवायचे कष्ट नाहीत,तरीही शत्रूपासून बचाव होतो.ह्या सुंदऱ्या विषारी नाहीत,पण मायावी आहेत.काही डोकेबाज माकडांनी खोटे संदेश देण्यात ह्यापुढे मजल मारली आहे.माझे मित्र राणा सिन्हा ह्यांनी लालतोंड्या माकडांचा खोलात अभ्यास केला आहे.एकदा ते त्यांच्यातल्या एका प्रेमाच्या त्रिकोणाचे निरीक्षण करत होते.दोन नर एका माजावर आलेल्या मादीला वश करण्याचा आटोकाट प्रयत्न करत होते.शेवटी तिने एकाच्या बाजूने कौल दिला.


दुसरा नर निराश होऊन झाडावर चढला.आणि त्याने काय केले?त्याचा प्रतिस्पर्धी आणि त्या मादीचे मीलन सुरू होणार,तेवढ्यात त्याने जोरात बिबट्या आला रे आला,अशी धोक्याची आरोळी दिली.बिचारे प्रेमी सैरावैरा दोन दिशांनी दोन वेगवेगळ्या झाडांवर चढायला धावले.आणि हे महाशय? आपण शांतपणे झाडावरून उतरले!जर त्याला खरेच बिबट्या आला अशी आशंका असती तर तो कधीच झाडावरून उतरला नसता.उलट आणखी शेंड्यावर गेला असता. तो चक्क थापा मारत होता..!



२/२/२४

जेरिमिया इतिहासातील युद्धविरोधी… Anti-War in Jeremiah History...

जेरिमियाचा खटला झाला.सुरू झाला.न्यायाधीशासमोर तो उभा होता.त्याच्यावर ज्यांनी आरोप लादले होते,

त्यांच्यासमोर तो उभा होता. बोललेल्या शब्दांपैकी एकही शब्द मागे घ्यावयास तो तयार नव्हता.परंतु जे न्यायाधीश होते,त्यांचा जे आत्मा राजाच्या आत्म्यापेक्षा अधिक उदात्त होता.त्या धर्मात्म्याचे अलौकिक धैर्य पाहून ते विरघळले.

त्या महान संस्फूर्त पुरुषाने न्यायाधीशांना आपलेसे केले.त्यांनी दोषमुक्त ठरविले.


काही काळ जेरिमिया जेरुसलेम सोडून स्वतःच्या जन्मगावी जाऊन राहिला.परंतु तिथेही त्याला शांती नव्हती.त्याच्या क्रांतिकारक जहाल मतांमुळे भटभिक्षुक त्याच्यावर दातओठ खात होते.त्या भटभिक्षुकांनी काही गुंड हाताशी धरले. एकदा जेरिमिया एकटाच जात होता.रस्त्यात कोणी नव्हते.त्या मारेकऱ्यांनी त्याच्यावर हल्ला केला.जेरिमिया मोठ्या मुश्किलीने वाचला.तो कसातरी जिवानिशी सुटला.पॅलेस्टाईनमधील संस्कृतिसंरक्षक,नीतिधर्मरक्षक निराश झाले. परंतु त्यांनी जेरिमियाचा पिच्छा सोडला नाही. त्यांनी जेरिमियाच्या घरातील नोकरांना वश करण्याचे प्रयत्न केले.

जेरिमियाच्या अत्रात विष कालवले जावे,म्हणून त्यांनी उद्योग केले.परंतु तो कट जेरिमियाच्या लक्षात आला आणि तो वेळीच वाचला.तो पुन्हा जेरुसलेमला आला.


आपल्या देशबांधवांच्या दुष्टपणासमोर आरसा धरण्याचे स्वतःचे जीवितकार्य त्याने पुन्हा सुरू केले.


मंदिरात पुन्हा एकदा एक महोत्सव चालला होता.पुन्हा हा देवाचा खलिफा तिथे अकस्मात गेला.या वेळेस त्याच्या हातात मातीचा एक नवा खुजा होता.'प्रार्थना बंद करून माझ्या पाठोपाठ या',असे तो त्यांना म्हणाला.नंतर तो खुजा एखाद्या झेंड्याप्रमाणे हातात उंच धरून तो बाहेर पडला.ते मडके उंच धरून शहरातील सारी घाण जिथे नेऊन टाकीत असत,तिथे तो गेला. त्याच्याभोवती आता चांगलीच गर्दी जमली. त्या कचऱ्याच्या ढिगाऱ्याजवळ तो गेला.त्याने ते मडके तिथे फोडले व त्याचे तुकडे त्याने त्या कचऱ्यात फेकले,नंतर लोकांकडे तोंड करून तो म्हणाला,"याप्रमाणे तुमचे,तुमच्या या शहराचे मी तुकडेतुकडे करील." शांतताभंग करणारा, अव्यवस्थित वागणारा म्हणून त्याला अटक करण्यात आली.

घोड्याच्या चाबकाने त्याला फटके मारण्यात आले.रात्रभर त्याला खोडा देण्यात आला.सकाळी त्याला सोडून देण्यात आले.सुटल्याबरोबर पुन्हा तो लोकांसमोर उभा राहिला.ती शापवाणी त्याने पुन्हा उच्चारली. सर्वांना विस्मय वाटला.त्या पागल प्रेषिताची ती बंडखोरी,तो आडदांडपणा,ती निःशक,निर्भय स्पष्टोक्ती थांबविण्याचा उपाय त्यांना सापडेना.याच सुमारास उत्तरेकडून इजिप्त व दक्षिणेकडून बाबिलोन पॅलेस्टाइनचा चुराडा उडविण्यासाठी तयारी करीत होते.जात्याच्या दोन तळ्यांच्या मध्ये मूठभर दाण्यांचा चुरा व्हावा,तसे पॅलेस्टाइनचे होणार होते.जेरुसलेमच्या गादीवर या वेळेस झेडेका हा राजा होता.तो मागील राजांप्रमाणे नव्हता.

झेडेका शांतिप्रिय होता. परंतु तो दुबळ्या मनाचा होता.

सल्लागार जो जो सल्ला देतील, तसा तो वागे.नवे सल्लागार आले, तर पुन्हा निराळा विचार.त्याला'स्वतःचे'

निश्चित असे,मतच जणू नव्हते.पॅलेस्टाइन या वेळेस नावाला का होईना; परंतु बाबिलोनच्या अधिसत्तेखाली होते.बाबिलोनचे हे जू जणू काही फार जड नव्हते.

जेरुसलेममधील काही चळवळ्यांनी बाबिलोनच्या राजाविरुद्ध बंड पुकारावे असे राजाला सुचविले.परंतु ही गोष्ट होऊ नये म्हणून जेरिमियाने आकाशपाताळ एक केले.तो पुरतेपणी जाणत होता,की बंड होताच बाबिलोनचा राजा जेरुसलेमला वेढा घालील. त्या वेढ्यात जेरुसलेम टिकाव धरणार नाही ही गोष्टही स्पष्ट होती.

कोकराने सिंहांशी झुंजावे, तसा तो प्रकार झाला असता.

जेरुसलेममधले उतावळे लोक बंडासाठी फार मोठी किंमत द्यायला तयार होते.ते स्वतःचे प्राण द्यावयास तयार होते.इतकेच नव्हे;तर स्वतःच्या बायकामुलांचेही बलिदान करावयास ते सिद्ध होते.जेरुसलेम शहराचे केवळ स्मशान झालेले जेरिमियाच्या प्रखर कल्पनाशक्तीस दिसत होते. सर्वत्र प्रेतांचे खच पडले आहेत,तरुण स्त्रियांची विटंबना होत आहे.मुले पाण्याचा घोट मिळावा,भाकरीचा तुकडा मिळावा म्हणून दीनवाणी हिंडत आहेत,तहानलेले कुत्रे धन्याचे रक्त चाटीत आहेत,रस्त्यावर मृतांची व मृत प्राण्यांची शरीरे राशीवारी पडली आहेत,असे हे भीषण दृश्य जेरिमिया कल्पनाचक्षूनी पाहात होता.


त्या काळातील वेढा म्हणजे काय वस्तू असे,ते जेरिमिया ओळखून होता.म्हणूनच स्वतःचे सारे वक्तृत्व उपयोगी आणून त्या बंडाविरुद्ध तो प्रचार करीत होता.जेरिमिया म्हणाला, "बाबिलोनच्या राजाला सोन्याची खंडणी देणे पत्करेल,परंतु रणदेवतेला रक्ताचा नैवेद्य देणे नको."


थोडा वेळ राजा झेडेकाने जेरिमियाचे ऐकले, परंतु त्याच्या प्रमुख सल्लागारांचे मत लढाईला अनुकूल होते.याच सुमारास इजिप्तमधून एक लष्करी शिष्टमंडळ आले होते.सल्लागार राजाला म्हणाले,"इजिप्तच्या या लष्करी अधिकाऱ्यांस मेजवानी द्या. इजिप्तची मदत आपणास मिळावी म्हणून प्रयत्न करा."जेव्हा इजिप्तचे प्रतिनिधी जेरुसलेममध्ये आले,तेव्हा जेरिमिया मानेवर जू घेऊन रस्त्यावर आला.इजिप्शियन लष्करी अंमलदारांचे गणवेश झगमगत होते.त्यांची ती शस्त्रे लखलखत होती.आणि हा जेरिमिया कसा होता? भुरेभुरे केस,मेंढ्याच्या कातड्याचा तो गबाळ वेश आणि मानेवरील जड जोखडाने वाकलेली अशी त्याची ती करूणास्पद मूर्ती होती! तेथील तो विरोध डोळ्यांत भरण्यासारखा होता.लोकांनी विचारले, "मानेवरील या जोखडाचा अर्थ काय?'जेरिमिया म्हणाला,

"तुमच्या मुलाबाळांचा तलवारीला व दुष्काळाला बळी देण्यापेक्षा बाबिलोनचे जू परवडले हा याचा अर्थ.

"कितीतरी आठवडे जेरिमिया मानेवर जू घेऊन रस्त्यावरून जात होता.


 शेवटी एके दिवशी लष्करी पक्षाचा एक उत्साही सभासद हनानिआ याने ते जू ओढून घेतले व त्याचे तुकडे केले. ते मोडीत असता हनानिआ म्हणाला,"याप्रमाणेच बाबिलोनचे सर्व राष्ट्रांच्या मानेवर असलेले जू मी मोडून मोडून फेकून देईन."शेवटी लष्करी पक्षाचे धोरण विजयी झाले.झेडेकाने इजिप्तशी करार केला आणि इकडे बाबिलोनशी त्याने लढाई पुकारली.मूठभर लोक जेरिमियाच्या मताचे होते.परंतु राष्ट्रात सर्वत्र युद्धोत्साह संचरला होता.सारे युद्धाने कसे बेहोश झाले होते! अशा या गदारोळात जेरिमिया व त्याची मूठभर शांतिसेना यांचे कोण ऐकणार ?


बाबिलानच्या राजाचे नाव नेबुचदनेझर त्याने इजिप्शियनांना ताबडतोब शरण आणिले आणि जेरुसलेमला वेढा घातला.अशा वेळेस देशात शांतीची गोष्ट काढणे म्हणजे देशद्रोह होता.परंतु जेरिमिया शांतीचा संदेश देतच राहिला. तो म्हणाला, "युद्ध पुकारलेत,ही चूक केलीत.परंतु अजूनही बाबिलोनच्या राजाशी तह करण्यास हरकत नाही." तो याच्याही पुढे गेला.लढू न शकणाऱ्या सर्व नागरिकांस तो म्हणाला."मुलांनो,स्त्रियांनो,

म्हाताऱ्यांनो,दुर्बलांनो ! या शहरात उद्या उपासमारीने उंदराप्रमाणे मरण्याऐवजी तुम्ही खुशाल शत्रूकडे जा.तिथे तुम्हाला अन्नपाणी मिळेल,दवापाणी मिळेल. माझे ऐका." जेरिमिया हा पंचमस्तंभी आहे. बाबिलोनची बाजू घेणारा देशद्रोही आहे,असे सारे म्हणू लागले.खरे पाहिले तर जेरिमिया देशद्रोही नव्हता व बाबिलोनचा पक्षपातीही नव्हता.तो उदार हृदयाचा एक महात्मा होता. इतर सारे पिसाटाप्रमाणे वागत असता तो समतोल वृत्तीने वागत होता.युद्ध पुकारणाऱ्या राष्ट्रांना एक प्रकारचे आंधळेपण येत असते.जेरिमियाने स्वतःची दृष्टी निर्मळ ठेवली होती,डोके शाबूत ठेवले होते.लोकांनी जेरिमियाला पकडले.चौकशीचा देखावाही न करता राजवाड्याखालच्या एका अंधाऱ्या व दुर्गंधीमय अशा नरककुडांत त्यांनी त्याला टाकले.इकडे अद्याप वेढा होता.आणि तिकडे त्या नरकात जेरिमिया खितपत पडला होता.शेवटी गुप्तपणे राजाने त्याला बोलावले.राजा भ्याड होता.परंतु त्या निर्भय व उदार महात्म्याविषयी त्याला मनातल्या मनात आदर वाटे.जेरिमिया आपले विचार बदालावयास तयार नव्हता.सुटकेसाठी स्वतःच्या आत्म्याशी प्रतारणा करावयास तो तयार नव्हता. तो राजाला एवढेच म्हणाला,"या नरककुंडांतून काढून मला तुरुंगात ठेवा.मानवी प्राण्याला सडून मरायला या स्थानापेक्षा तुरुंग बरा."


राजाने ऐकले आणि राजवाड्यातच एके ठिकाणी त्याला स्थानबद्ध करण्यात आले. पुन्हापुन्हा तो झेडेकाना सांगत होता,की बाबिलोनच्या राजाला शरण जा.परंतु कोणी ऐकेना.त्या मूर्ख व हट्टी राजाचा अभिमान पार वाहून जाईल इतके रक्त अद्याप सांडले नव्हते.


नेबुचदनेझरने शहराभोवतालाचे पाश अधिकच आवळले.

शहरातील लोकांस काय करावे समजेना.आपला दुबळा राग कोणावरतरी काढावा,असे त्यांना वाटू लागले.त्यांना जेरिमियाच्या रक्ताची तहान होती.त्याच्या प्राणांवर ते उठले.स्वतःच्या हालअपेष्टातून आंधळे होऊन,जो एक पुरुष त्यांना या हालअपेष्टातून वाचवू पाहात होता,

त्याच्यावरच ते उठले.लोकांनी राजाला घेरले.जेरिमियाला पकडून चिखलाच्या खळग्यात टाका.असे ते म्हणाले.

चिखलाच्या एका खोल खळग्यात त्याला टाकण्यात आले.तो जसजसा धडपडे तसतसा, तो आणखी आणखी खाली जाई.त्याचे पाय वर निघतना जेरिमिया चिखलात बुडणार,गुदमरून मरणार ! सुदैवाने,एका निग्रो गुलामाला दया आली.त्याने जेरिमियाला चिखलातून दोरीने ओढून वर घेतले आणि वेळीच त्याचे प्राण वाचविले.जेरिमिया कोठे पळून गेला नाही. स्वतःचे जीवितकार्य त्याच्यासमोर होते.तो पुन्हा राजाकडे गेला.ही शेवटची वेळ होती. शत्रूजवळ,'ताबडतोब तह करा'असे पदर पसरून त्याने मागणे मागितले.परंतु झेडेकाने त्याला पुन्हा दूर घालविले,आणि वेढा चालूच राहिला.


पुढे अठरा महिन्यांनी शहर घेतले गेले.ज्यू राजाचे मुलगे ठार मारण्यात आले.पित्याच्या डोळ्यांदेखत पुत्रांचे वध झाले.नंतर झेडेकाचे डोळे काढण्यात येऊन त्याला शृंखलाबद्ध करून बाबिलोनला नेण्यात आले.

बाबिलोनच्या दरबारात जेरिमियाला मानाची एक जागा देऊ करण्यात आली.परंतु स्वतःच्या राष्ट्राचे तुकडे करणाऱ्या खुनी शत्रूशी त्याला काही एक कर्तव्य नव्हते.तो आपल्या देशबांधवांबरोबर वनवासात गेला.जेरिमियाला देशद्रोही समजून झेडेकाने छळले.बाबिलोनच्या राजाने मूर्ख म्हणून त्याला हाकलून दिले.


जेरिमियाचे शेवटी काय झाले ते नक्की माहीत नाही.परंतु काही प्राचीन इतिहासकारांचा पुरावा खरा मानला,तर जेरिमियाला इजिप्तमध्ये दगड मारून ठार करण्यात आले,असे म्हणावे लागते.रानवट लोकांना जेरिमियाने उपदेशिले,"तुम्ही सज्जन माणसे बना;तुमच्यापासून प्रभूला ही अपेक्षा आहे."परंतु त्या रानवटांना तो अपमान वाटला.त्यांनी त्याला ठार केले.


मायकेल एंजेलो या विख्यात चित्रकाराने जेरिमियाचे फार योग्य अशा स्थितीत चित्र काढले आहे.वृद्ध जेरिमिया निराश व भग्न हृदय असा बसलेला आहे.सभोवती सारे शहर उद्ध्वस्त झालेले आहे.शहराच्या त्या ढिगाऱ्यावरच जेरेमिया बसलेला आहे.त्याचे डोळे जमिनीकडे खाली जसे खिळलेले आहेत! आजूबाजूचे दुःख व विनाश पाहण्याचे त्याला धैर्य नाही.तो डोळे वर करू शकत नाही.


त्याचे जीवन म्हणजे उद्विग्न करणारी विफलता होती. त्याने शांतीचा संदेश दिला;परंतु जगाने तो ऐकला नाही.लक्ष न देणाऱ्या जगाला त्याने शांतीचे उपनिषद दिले. स्वतःच्या नगरीचे वैभव राहावे,राष्ट्राचा प्राण वाचावा म्हणून त्याने प्राणपर कष्ट केले.परंतु धूळ व राख यांच्या राशीखाली जेरुसलेम गडप झाले.आणि तेथील नागरिक वाळूच्या कणांप्रमाणे जगभर वारेमाप फेकले गेले.त्या थोर इटालियन चित्रकाराने जेरिमिया म्हणजे 'मृतप्राय जातीचा पराभूत व भग्नमनोरथ असा प्रेषितच' जणू रंगविला आहे.परंतु मायकेल एंजेलोचे हे चित्र कित्येक शतकांपूर्वीचे आहे.


आज जेरिमियाला आपण निराळ्या प्रकाशात पाहू शकतो.जुडा येथील टेकड्यांवर उभा राहून जेरिमिया विजयी मुद्रा धारण करून शेकडो,हजारो वर्षांच्या अंतरावरून पाहात आहे.२५०० वर्षांपूर्वी त्याने जी वाणी उच्चारली,ती वाऱ्यावर गेली.परंतु त्याचे ते शब्द आता पकडले गेले आहेत.ज्यू लोकांचे जे अविशिष्ट असे विस्कळीत राष्ट्र आहे,त्याने जेरिमियाचे ते शब्द परंपरेने आजपर्यंत आणून पोहोचविले आहेत.त्या शब्दांचा प्रतिध्वनी निःशस्त्रीकरणाच्या सभांतून,जागतिक न्यायमंदिराच्या विचारविनिमयातून,राष्ट्रसंघाच्या बैठकींतून ऐकू येत आहे.जेरिमिया उभा आहे. स्वत:च्या परिश्रमाला येणाऱ्या फळांकडे तो लांबून पाहतो आहे.त्याच्या सौम्य मुखमंडलावर विजयाचे मंद स्मित झळकत आहे.

जीवनाचा खरा मार्ग शांतीचा आहे,ही गोष्ट अस्पष्टपणे का होईना,आता मानवाच्या ध्यानात येऊ लागली आहे.


अत्याचाराचा प्रतिकार करू नका.असे सांगणारा जेरिमिया हा महान आचार्य होता.सर्व इतिहासातील अत्यंत प्रचंड व भव्य अशा चळवळीचा तो संस्थापक होता.


३१.०१.२४ या भागातील शेवटचा भाग..हा भाग संपला…