* विजय गायकवाड | Vijay Gaikawad

live

नमस्कार आपले स्वागत आहे. 'सगळे जण तुम्हाला शोधत येतील.आनंदाने तुडुंब भरलेली माणसे सर्वांनाच आवडतात! पण ते तुम्हाला दुःखी,उदास अशा अवस्थेत पाहू शकत नाहीत! तेव्हा आनंदी-हसतमुख रहा आणि मित्रांचा सहवास वाढवा! जर तुम्ही दुःखी राहिलात तर मात्र सगळे जण तुम्हाला सोडून जातील. जीवनातील आनंद-प्रसन्नता भरभरून वाटा! पण एकटे दुःखी रहाल, तर त्या दुःखातच बुडून जाल !' सॉलिट्यूड, ईला व्हीलर विलकॉक्स जगण्याच्या तयारीसाठी नव्हे तर,जगण्यासाठी माणूस जन्माला आला आहे,असं 'बोरिक पास्तरनाक' यांनी म्हटलेलं आहे.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! वाचन हे आहाराहून जास्त महत्त्वाचे असते.जिम र्‍होम यांनी अँथोनी रॉबीन्स यांना शिकवले होते की 'एक वेळ रोजचे जेवण चुकव,पण वाचन अजिबात चुकवू नको.' याप्रमाणे मी अखंडपणे वाचत आहे. माणसांपासून माणसांपर्यंत जाण्याचा,प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाण्याचा जीवनाचा राजमार्ग पुस्तकातून जातो. कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात. पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये. म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,कवी सचिन शिंदे,संतोष शेळके,अनिल फारणे,सहित प्रकाशन,डॉ.रवींद्र श्रावस्ती,डॉ.सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,संजय बापट,मनोहर सुर्वे,विनायक पाटील,संतोष पाटील,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, मेनन पिस्टन रिंग मधील सहकारी मित्र शेखर सुर्यवंशी..। पुस्तकातील घटना प्रसंग हे मी लिखित स्वरूपात सध्या व्हाट्सअप वरती टाकत असतो.हे सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी,पुस्तके देणारी लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत. ... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ. मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. विजय कृष्णात गायकवाड

१५/६/२४

संघर्ष हेच जीवन / Struggle is life...

संघर्षातून विजय मिळतो…डॉ.अथर्व गोधंळी


ख्रिस्तोपर मोरले यांनी एका ठिकाणी सांगितले आहे.

जेव्हा तुम्ही तुमचा रस्ता तुमच्या प्रकाशात निवडता आणि त्याचा बिनशर्त स्वीकार करता,तेव्हा यश तुमचेच असते.


या पृथ्वीवर प्रत्येक माणसाची अशी एक स्वतःची कथा असते.ज्यातून तो माणूस घडत जातो. आपण ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणी आपल्या आसपास आपणाला दिसणारी,भेटणारी जी माणसं असतात.त्यांना आपण खरोखरच ओळखतो का? कधीतरी जगावेगळं काम करणाऱ्या माणसाचा सन्मान झाला की आपणा सर्वांची नजर त्या व्यक्तीला शोधायला लागते.यशस्वी झालेल्या माणसाच्या यशाचे आपण कौतुक करतो.पण ते यश मिळवण्यासाठी त्यांनी केलेला संघर्ष.तर त्या यशामध्ये त्याला सोबत करणारे यांची आपण फारशी नोंद घेत नाही.(ती घेणं गरजेचे असते.)


अशा वारंवार संघर्षातूनच ते विश्वविक्रमी बनतात.या विक्रमविराचं जगावेगळं वैशिष्ट्य म्हणजे तो नम्र असतो व त्याचे पाय जमिनीवर असतात.'प्रत्येक दिवशी मी शंभर वेळा स्वतःला आठवण करून देतो की,माझं अंतर्गत आणि बाह्य जीवन इतर लोकांच्या-

जिवंत किंवा मृत लोकांच्या कष्टावर अवलंबून आहे,आणि त्यापासून जे काही मला मिळालं आहे आणि आत्ताही मला मिळत आहे,तेवढे कष्ट मीही करून त्याची परतफेड केली पाहिजे.'अल्बर्ट आईनस्टाईन,नोबेल पुरस्कार विजेते भौतिकशास्त्रज्ञ,

हा नम्रपणाच काळजाला जाणीवपूर्वक भिडतो.

आणि आपणही नकळत नम्र होऊन जातो.


वृत्तपत्राच्या एका तुकड्यामुळे माणसाच आयुष्य बदलत असेल तर संपूर्ण वर्तमानपत्र संपुर्ण मानवी जीवन बदलू शकते.


आईच्या गोष्टी ऐकता ऐकता आपण मोठे होतो. अशीच एक गोष्ट कोल्हापूर जवळील टोप गावामध्ये अथर्व याला त्याच्या आईने सांगितली. चपाती करत असताना चपातीच्या खाली ठेवण्यासाठी एक कागद घेऊन ये असं तिने अथर्वला सांगितले.अथर्व तो कागद घेऊन आला चपाती खाली तो कागद ठेवत असताना आईने एक बातमी वाचली.तो कागद म्हणजे वृत्तपत्र होते.ती बातमी होती.वेदांगी कुलकर्णी यांनी १५९ दिवसांमध्ये..२९ हजार किलोमीटरचा सायकलवरून प्रवास केला.आणि इथूनच सुरु झाला.विश्वविक्रमाचा थरार..


आणि त्याच वेळी अथर्वने एक जगतिक विश्वविक्रम करायचे ठरविले.त्याच स्वप्नांची पुर्तता म्हणजे २९६ कि.मी.अंतर १२ तासांमध्ये पुर्ण करुन विश्वविक्रम केला.त्यावेळी तो वी मध्ये शिकत होता.तत्पूर्वी वी मध्ये असताना त्याने ने ११ व्या वर्षी तायक्वांदो मध्ये ब्लॅक बेल्ट मिळविले,आणि त्यातीलच १८ व्या वर्षी सेकंड दान ब्लॅक बेल्ट मिळविले.अथर्व संदीप गोधंळी त्याच्याकडे साधीच सायकल होती.


विश्वविक्रमाबद्दल अथर्व घरी वडिलांना बोलला.त्यावेळेला वडील म्हणाले,ज्यावेळी जोतिबाला दहा राऊंड तु मारशील त्यावेळी मी तुला गिअरची रेसिंग सायकल घेतो.मग पहाटे वाजता दिवस सुरू झाला.कुणीही मार्गदर्शक नव्हता.वडील हेच मार्गदर्शक व गुरू होते.जे नेहमीच मोटारसायकल वरून त्याच्या सोबत असायचेत.सराव,क्लास,शाळा यामध्ये कधीतरी झोप पुर्ण होत नसायची..पण लवकर उठून सराव करुन अभ्यासही जोमाने करायचा.


या विश्वविक्रमाच्या अनुषगांने पत्रकार श्रध्दा जोगळेकर यांचे मौलीक मार्गदर्शन त्यांना मिळाले. मग सुरू झाला सराव..आणि फक्त सराव..


विश्वविक्रम करण्याचे अनुषंगाने ज्या काही गोष्टी असतात जे काय मार्गदर्शन असतं.ते अतिशय महत्त्वाचे असे मार्गदर्शन कोल्हापुरातील प्रसिद्ध अमोल कोरगांवकर(बाबा) यांनी केले.


विश्वविक्रम करण्यासाठी आहार,सरावाची योग्य पद्धत काही व्यायामाचे प्रकार,यासाठी अनुभवी मार्गदर्शन गरजेचे होते.कारण हा २९६ कि.मी.प्रवास फारच कठीण होता.त्यासाठी कोच म्हणून आकाश कोरगावकर जे कोल्हापुरातील पहिले आयर्न मॅन आहेत.त्यांचे मार्गदर्शन लाभले.


या अगोदर अशाच ६ रेकॉर्डची नोंद झाली होती.पण ते रेकॉर्ड वयाच्या १६ वर्षाखालील होते,व ते १२ तासांमध्ये केले गेले होते.अथर्व हा बहाद्दर होता,अवघ्या १४ वर्षाचा.स्वतः वरील विश्वासावर मजबूत विश्वास असणारा..नविन जीवनाला सुरुवात करणारा.


या विश्वविक्रमाची नोंद घेण्यासाठी टीम प्रत्यक्ष स्थळी हजर होती.बारा तासाचे संपूर्ण चित्रण जतन करून ठेवलेलं आहे.


आणि तो क्षण आला ज्यावेळी त्याने पुर्वीचे असणारे १६ वर्षाखालील ६ रेकॉर्ड वयाच्या १४ व्या वर्षी २४० कि.मी.चे अंतर अवघ्या ९ तास ४५ मिनीटात पुर्ण केले.अगोदरच्या रेकॉर्ड नुसार ते ६ रेकॉर्ड पुर्ण करण्यासाठी १२ लागले होते.


ही घटना म्हणजे आनंदाची कधीही न संपणारी भेट होती.आई बाबा यांना आपल्या जीवनाचं सार्थक झालं असं वाटतं होतं.वडिलांनी तर तो क्षण आनंदाने नाचून साजरा केला.


अथर्वच्या नावे ११ विश्वकॉर्ड आहेत.अनेक शाळा महाविद्यालय संस्थांच्याकडून मानसन्मान व ३० ते ३५ पुरस्कार मिळालेले आहेत.


ट्रायथलॉन हा एक खेळातील प्रकार आहे.यामध्ये १.८ कि.मी.पोहणे,९० कि.मी,सायकलिंग,२१ कि.मी,पळणे सलग ९ तासात पुर्ण करण्याचा  अवधी असतो.तो त्याने अवघ्या ६ तास ३४ मिनीटात पुर्ण केला.व नवीन विश्वविक्रम केला.यासाठी त्याने अविरतपणे ४० दिवस सराव केला,जो खुपच कमी कालावधीचा होता.


२०१९ साली त्याला द डायसेस ऑफ एशिया चेन्नई तामिळनाडू यांचेकडून डॉक्टरेट इन अँथलँटिक ही पदवी बहाल करण्यात आली.यामुळे संपूर्ण भारतातून सर्वात लहान वयात डॉक्टरेट मिळणारा पहिला खेळाडू ठरला आहे.१४ वर्षांचा डॉ.अथर्व संदीप गोंधळी 'रस्ता सुरक्षा'चा बॅण्ड ॲम्बॅसडर आहे.जनजागृतीसाठी आरटीओकडून सन्मान मिळाला आहे.


डॉक्टर आई-बाबांच्या पोटी जन्माला आलेला अथर्व खूपच नम्र आणि प्रामाणिक आहे. विश्वविक्रम करूनही त्यांने नम्रपर्वक आईबद्दल एक आठवण सांगितली.मी पहाटे ४ वाजता सरावासाठी बाहेर पडत असताना,आई मला चपाती भाजी करून द्यायची.ही आठवण सांगत असताना त्याच्या डोळ्याच्या कडा नकळत ओल्या झालेल्या दिसल्या.


कृत्रिम बुद्धिमत्ता,यंत्रमानवाच्या या धावत्या जगामध्ये माणूस व त्याची भावनिक संवेदनशीलता जतन करून,संस्कारशील जीवन घडविणे दिवसागणिक कठीण होत असताना, एक चांगला माणूस घडविण्याचे हे कार्य खरोखरच कौतुकास्पद व अनुकरणीय असे आहे.जर वृत्तपत्राचा तो तुकडा तुम्हाला मिळालाच नसता तर हे स्वप्न पूर्ण झालं असतं का? त्यांनी नम्रपणे सांगितलं,ज्या वेगाने ते पूर्ण झालं त्या वेगाने ते पूर्ण झालं नसते.


काचेच्या,स्टेनलेस स्टीलच्या,एअर कंडीशनच्या,

स्टीरीओ फोनिक डेक सिस्टिम असलेल्या आणि एकलकोंड्या अशा कोशामधे गुरफटून राहणं हे अमानुषच आहे.सहजीवन,सहकार्य,पाहणे आणि दाखवणे या माणसांच्या मूळ प्रवृत्तिपासून दूर जाण्यासारखं आहे हे.मानसशास्त्रज्ञ याला व्यक्तिमत्त्वाचं विघटन म्हणतात. 


अथर्वची ही यशोगाथा सहज,नैसर्गिक पध्दतीने जीवन जगता येते,हे सांगत आहे.त्यांचे कुटुंब व या यशामध्ये असणाऱ्या सर्वांचे तो नम्रपणे आभार मानतो.कल्लेश्वर ग्रुप,टोप यांचाही तो आवर्जून उल्लेख करतो.


आपल्या वयाच्या मुलांना दिलेला संदेश बरचं काही सांगून जातो,अथर्व म्हणतो,निर्मात्याने प्रत्येकालाच वैशिष्ट्यपूर्ण बनविलेले आहे.प्रत्येकाने हे ओळखणे.मोठी मोठी स्वप्ने पहा.व ती पुर्ण करण्यासाठी संघर्ष करा.कारण संघर्ष म्हणजेच जीवन… 


विजय गायकवाड,विशेष प्रतिनिधी,कोल्हापूर,

दै.धर्मयोध्दा..पुर्वप्रसिध्दी दै.धर्मयोध्दा,सर्व संपादकीय मंडळाचे,व टिमचे आभार व धन्यवाद…


प्रतिक्रिया…


वाह,खूप सुंदर लेख.प्रत्येकाच्या आयुष्यात संधी अनेक रूपाने येत असते. फक्त संधी ओळखता आली पाहिजे.त्या संधीचे नेमके महत्व ओळखून प्रयत्न केले पाहिजेत म्हणजे आयुष्याचं सोनं व्हायला वेळ लागत नाही. नेमकं हेच अथर्वच्या रेकॉर्ड मधून कळून येतं.


    चपाती गोल करण्यासाठी आणलेला एक पेपरचा तुकडा त्याला पाहून गोल असणाऱ्या पृथ्वीतलावर अथर्वने स्वतःच अस्तित्व सिद्ध केलं याला म्हणतात संधी पकडणे. यासाठी अथर्व,त्याचे आई वडील,आणि त्याला मार्गदर्शन करणाऱ्या गुरूंचे खूप खूप अभिनंदन.या अथर्वचे यश आपल्यापर्यंत पोहोचवून अनेक अथर्व निर्माण करण्याच्या हेतूने अतिशय सुंदर लेख लिहिणाऱ्या विजय गायकवाड यांचे सुद्धा खूप कौतुक आणि अभिनंदन.- माधव गव्हाणे,सेलू, परभणी जिल्हा.









१३/६/२४

घातक..Fatal..

हा प्रसंग आहे जवळपास सात वर्षांपूर्वीचा...! 


भिक्षेकर्‍यांच्या या कामांमध्ये मी नवखा होतो कोणताही अनुभव पाठीशी नव्हता. 


भीक मागणाऱ्या लोकांमध्ये असाच एके दिवशी एका ठिकाणी गेलो असता,तिथे एक पाय नसलेली दिव्यांग ताई बसलेली होती.


माझ्याकडची मोठी बॅग बघून तिला वाटले, मी काहीतरी वाटायला आलोय,कुबड्यांचा आधार घेत धडपडत ती माझ्या जवळ आली आणि माझ्यासमोर तिने हात पसरले. मी डॉक्टर आहे... गोळ्या औषधे देतो... वगैरे वगैरे काहीतरी बोललो.... पण, यानंतर हा आपल्या काही कामाचा नाही असं समजून ती भ्रमनिरास होऊन तिथून निघाली. 


नवखा होतो... ! 


आधी छान नातं तयार करायचं आणि नंतर मगच कुणालातरी सल्ले द्यायचे,हे नंतर अनुभवातून शिकलो; परंतु त्यावेळी हे माहीत नव्हतं.... ! 


याच नवखेपणामधून म्हणालो,'बाई भीक काय मागतेस काम कर की...


व्हायचं तेच झालं... नवशिक्या ड्रायव्हर कडे गाडी दिली की तो कुठेतरी धडकवणारच....


यानंतर भयंकर रागाने ती गर्रकन वळली आणि म्हणाली ए बडे बाप की अवलाद , इधर आके शानपत्ती मत झाड...भरे पेट से किसी को सलाह देना बहुत आसान बात होती है... तेरे घर मे मा होगी,बाप होगा,सब लोग होंगे... तेरेको पाल पोसके बडा किया तो तू डॉक्टर बना... 


मेरे को ना बाप...  ना मा ... दो बच्चे और एक कुबडी मेरी.... इत्ते सहारेसे रस्ते पे औरत होके तु इज्जत संभालके जी के दिखा...!


मी ना कुणी बडा होतो किंवा ना माझा बाप कुणी बडा होता... मी अतिशय सामान्य कुटुंबातला...

अत्यंत मुश्किलीने कसाबसा झालेला डॉक्टर होतो

मी ...! तीला यातलं आता काय काय सांगू  ? 


परंतु ती जे बोलली ते सुद्धा खरं होतं...!


भरल्या पोटानं दिलेला सल्ला उपाशी पोटाला कधीच पचत नाही...! यानंतर ती दिसत राहिली... तिने काम करावं अशी माझी आंतरिक इच्छा होती. 


दरवेळी मी तिला याविषयी सुचवायचो आणि दरवेळी ती माझा पाणउतारा करायची. 


तिच्याशी बोलताना मला जाणवलं,की तिला Artificial Jewellery मध्ये रस आहे, त्याच्या खरेदी विक्री बद्दल ती बरंच काही जाणून होती,हाच धागा पकडून मी तिला म्हणालो,की तू हा व्यवसाय कर,हा व्यवसाय सुरू करण्यासाठी मी तुला लागेल ती मदत करतो. डोळ्यात भीती... चेहऱ्यावर साशंकता... नाकावर राग.... ओठांवर शिवी.... 


अशा संमिश्र भावना घेऊन,शेजारी असलेल्या कुबडीला घट्ट पकडून ती मला म्हणाली, 'इसके बदले मे तेरको क्या चाहिये रे ...?' 


मी सहज म्हणालो,'इसके बदले में चाहिये एक राखी...!' अनेक जणांकडून गोड बोलून, फसवली गेलेली ती ताई ... माझ्या इतक्या मोघम बोललेल्या शब्दांवर ती आता बरी विश्वास ठेवेल ?? 


चल रे... आया बडा... तेरी मा का... xxx 

( तिच्या या "तीन फुल्यांमध्ये" माझी अख्खी आई सामावली होती)


आपलं पद काय ?  प्रतिष्ठा काय ? आपला पगार किती ? आपली इस्टेट किती ? याला काहीही महत्त्व नसतं .... दुसऱ्याच्या मनातल्या "तीन फुल्यांमध्ये " आपण कोण आहोत ? तीच आपली औकात...!  बाकी सर्व मृगजळ...!!!


तर,यानंतर मला तिने चप्पल दाखवली होती,  मला चांगलं आठवतं आणि त्या तीन फुल्या सुद्धा.... मी विसरलो नाही,अजून इतक्या वर्षानंतर सुद्धा...!!!


असो....


या सर्व घटनाक्रमामध्ये ओघाओघानं तीची दोन्ही मुलं मात्र निरागसपणे माझ्याशी जुळली गेली.नकळतपणे मला ती मामा म्हणू लागली... मला हि दोन्ही मुलं खुप आवडायची.... दोघांशी बोलताना जाणवायचं, या मुलांमध्ये काहीतरी "स्पार्क" आहे... 


एक मुलगा कॉम्प्युटर विषयी बोलायचा.... 

एक मुलगा फुटबॉल विषयी बोलायचा... 


हि मुलं कुठून हि माहिती मिळवत असतील? 

हे ज्ञान यांना कुठून येत असेल...??? 


मी खेड्यातला आहे....  

मला जाणवलं,रानफुलांना मशागत लागत नाही,पाणी लागत नाही,खत लागत नाही, ती जगतात निसर्गाच्या किमयेवर... ! 


हि मुलं अगोदर पासून शाळेत जातच होती, परंतु पैशाअभावी कधी शाळा सुटेल हे सांगता येत नव्हतं...आता मला वाटायला लागलं,या बाईचं जाऊ दे... परंतु किमान मुलांचं आयुष्य नको बरबाद व्हायला,यांची शाळा नको सुटायला... 


नुसत्या निसर्गाच्या भरवशावर सोडून उपयोग नाही.... मुलांना योग्य तो मार्ग दाखवायला हवा.... इतकीच माझी ओढ होती.परंतु या ताईच्या परवानगीशिवाय ते शक्य नव्हतं आणि म्हणून मी कायम तिची हांजी हांजी करायचो...!


एके दिवशी तिला म्हणालो 'मुलं,मला मामा म्हणतात,त्यांच्या शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी मी घेतो,तू शेवटपर्यंत त्यांना शिकवशील याचा मला भरवसा नाही.'आता मला आठवत नाही कसं ते... परंतु यावर बराच वेळ विचार करून शेवटी तीने परवानगी दिली होती.या दोन पोरांची तेव्हापासून सर्व शैक्षणिक जबाबदारी आपण घेतली. 


मग,दोन्ही मुलांना माझा फोन नंबर दिला होता,काही अडचण आली तर, कुठून तरी मला संपर्क करा,असं सांगितलं होतं...  यानंतर मी जिथे असेन, तिथे मला मुलं भेटून जात असत,दोन्ही मुलं माझ्या संपर्कात होती...पोरांच्या फिया,युनिफॉर्म,वह्या पुस्तकं आणि लागेल ते सर्व मी देत होतो.... आता पावेतो या ताईचा माझ्यावर विश्वास बसला असावा. 


एके दिवशी,तिने मला घरचा पत्ता दिला आणि म्हणाली, 'दादा घरी ये....!' 


"दादा घरी ये" हि वाक्यें आहेत साधीच परंतु माझ्यासाठी... सुवर्ण मोलाची ..! 


जी बाई रस्त्यात चप्पल दाखवते ... माझ्या आईचा उद्धार करते... तीच परत मला जेव्हा "दादा" म्हणत घरी बोलावते तेव्हा,तेच माझ्यासाठी सीमोल्लंघन असतं.... ! भले भले मोठे लोक मला घरी बोलावतात; पण मी कोणाच्या घरी जात नाही... 


हिचा मात्र;दिलेला पत्ता शोधत;खूप मोठ्या मुश्किलीने मी तिच्या "घरी" पोहोचलो.... 


घर म्हणजे कोणाच्याही नजरेसमोर काय येतं? घराला चार भिंती असतात आणि एक छप्पर असतं...


या घराला ना छप्पर होतं... ना भिंती... पण तरीही ती त्याला घर म्हणत होती...! तिच्या या "घरात" गेल्यानंतर,मला जाणवलं, विटांच्या चार भिंती म्हणजे घर नसतं ....  जी माणसं एकत्र राहत आहेत,अशांनी एकमेकांच्या हातात हात गुंफले की आपोआप नात्यांच्या भक्कम भिंती उभ्या राहतात... दुसरा भिजू नये म्हणून पहिल्याने जे काही मनापासून केलं त्याला छप्पर म्हणतात... ! 


या कुटुंबात येऊन,घराविषयी डोक्यात असलेल्या अनेक संकल्पना बदलल्या...! तिथे जे काही फळकुट ठेवलं होतं,त्या फळकुटावर मी बसलो... 


दोन्ही पोरं येऊन मामा मामा म्हणत मला बिलगली....यानंतर ती ताई आली... तिने मला पेढा भरवला... दोन्ही मुलं खूप छान मार्कांनी पास झाली होती. या दिवशी तीनं मला राखी बांधली.राखीच्या  एका धाग्यानं ती माझ्या आईची मुलगी झाली... ! 


कधीतरी पूर्वी तीनं माझ्या आईचा फुल्याफुल्यांमध्ये उद्धार केला होता... आज या फुल्याफुल्यांची "फुलं" झाली...! यानंतर,मी तीला पुन्हा काम करण्याविषयी सुचवलं. आणि याच दिवसापासून ती आर्टिफिशियल ज्वेलरी चा व्यवसाय करू लागली.आता तिचं भीक मागणं पूर्ण थांबलं. हा माझ्या विजयाचा दिवस होता...! विश्वास बसणार नाही इतकी तिची करुण कहाणी होती... यावर अख्खी एक कादंबरी होईल... असो, तिच्याविषयी पुन्हा कधीतरी...! 


बरोबर तीन वर्षांपूर्वी तीचा मोठा मुलगा अतिशय उत्तम मार्कांनी बारावी पास झाला. त्याच्या आवडीनुसार त्याला कॉम्प्युटर सायन्सला ऍडमिशन घेऊन दिले.आज तो कॉम्प्युटर सायन्सच्या तिसऱ्या वर्षात शिकत आहे.पहिल्या दोन्ही वर्षात तो फर्स्ट क्लासने पास झाला.याच्या संघर्षाविषयी बरंच काही मांडायचं आहे... परंतु याच्या विषयी सुद्धा पुन्हा कधीतरी...! आज मला सांगायचं आहे ते धाकट्या विषयी...! शाळेत असताना "तो" अतिशय उत्तम फुटबॉल खेळायचा.शाळेतल्या प्रत्येक मुलाकडे फुटबॉलचे उत्तम क्वालिटीचे शूज (स्टड) होते,हा मात्र अनवाणी पायांना खेळायचा.तरीही फुटबॉल या खेळातला तो हिरो होता,नव्हे हिरा होता.


यानंतर जिल्हास्तरीय आंतरशालेय फुटबॉल स्पर्धा भरल्या... निवड चाचणी झाली... अर्थातच याने अनवाणी पायाने का असेना, पण अप्रतिम खेळ करून दाखवला... 


खरंतर टीमचा कप्तान होण्याची पात्रता याची... तरीही स्पर्धेमध्ये याची निवड झाली नाही... कारण होते -  तुझ्याकडे फुटबॉलचे स्टड नाहीत... स्पर्धेमध्ये नियमानुसार तुला अनवाणी खेळता येणार नाही...! 


तिथल्या स्पोर्ट्स टीचरच्या त्याने विनवण्या केल्या,परंतु त्यांनी नियमावर बोट ठेवले.मग पात्रता असूनही स्पर्धेत तो खेळू शकला नाही. 


यानंतर मला तो भेटायला आला,या चिमुकल्याच्या डोळ्यात अंगार होता, हाताच्या मुठी तो बाजूच्या भिंतीवर आपटत होता... एकूणच सिस्टीम विषयी तो भयंकर रागानं बोलत होता... बोलता बोलता तो हमसून रडायला लागला...


आपल्याच शाळेचा एक खेळाडू पुढे जाऊन आपल्याच शाळेचे नाव उज्वल करणार असेल तर शाळेने एक स्टड आपल्याच खेळाडूला घेऊन द्यायला काय हरकत होती ? 


पण नाही,नियम म्हणजे नियम...व्वा !!! 


मलाही या सर्व प्रकाराची चीड आली.पण या मुलाला सावरणं आवश्यक होतं...! 


"घातक" या चित्रपटामध्ये,अमरीश पुरी आणि सनी देओल यांच्यात एक अत्यंत भावुक प्रसंग आहे.त्यात बाप आपल्या मुलाला सांगतो,'अपने क्रोध को पालना सीखो काशी,इसे जाया मत करो.'


आपल्याला आलेला राग आदळ आपट करून त्यावेळी वाया जाऊ द्यायचा नाही, त्याला जपून ठेवायचं,याच रागाला एक हत्यार बनवायचं,पण या हत्यारानं कुणाला इजा करायची नाही,स्वतःला  आकार देण्यासाठी या हत्याराचा योग्य वेळी उपयोग करायचा.रागाचं हे हत्यार वापरायचं,  काहितरी चांगलं "घडवण्यासाठी"... काही "बिघडवण्यासाठी" नव्हे... !!! मोबाईलवर शोधून हा प्रसंग त्याला पाहायला दिला. त्याला ते कितपत पटलं,किती रुचलं,मला माहित नाही,पण तिथून तो शांतपणे निघून गेला. मला खूप वाईट वाटलं...! 


"लायक" असतानाही "नालायक" ठरवलं; की त्याच्या वेदना किती होतात याची मला जाणीव आहे.


अमेरिकेत स्थायिक असलेले माझे एक मित्र, ते स्वतःस्पोर्ट्स मॅन आहेत.व्हॉट्स ॲपवर असाच त्यांच्याशी काहीतरी संवाद साधत असताना त्यांच्याशी मी हा प्रसंग शेअर केला. 


यानंतर माझ्या काहीही ध्यानी मनी नसताना, मला एक पार्सल मिळाले,त्यात अतिशय उच्च क्वालिटीचे स्टड होते,बिलावरची किंमत डॉलर मध्ये होती... भारतीय रुपया नुसार त्याची किंमत 35 हजार रुपये इतकी असावी. 


मी भारावून गेलो. 


दुसऱ्याची वेदना कळली,की मगच संवेदना जन्माला येते... दुसऱ्याची वेदना आपण जगायला सुरुवात करतो,त्यावेळी ती समवेदना होते...! 


अमेरिकेत बसून एका चिमुकल्याची वेदना तिकडे ते जगत होते...अमेरिकेतील त्या स्नेह्यांना मी मनोमन नमस्कार केला. 


यानंतर त्या मुलाला बोलावून त्याच्या हातात स्टड दिले... स्टड पाहून त्याचे डोळे चमकले.. त्याच्या डोळ्यात मग एकाच वेळी मला चंद्र आणि सूर्य शेजारी शेजारी बसलेले भासले...! 


संपूर्ण शाळेत आता त्याच्या इतके भारी स्टड कोणाकडेही नव्हते. 


अर्थातच पुढे या मुलाची निवड झाली... गुणवत्तेपेक्षा इतर बाबींवर फोकस केल्यामुळे याची निवड होण्यास वेळ लागला पण हरकत नाही... देर सही - दुरुस्त सही...!  या एका पायताणानं त्याला मात्र कुठल्या कुठं पोहोचवलं...!  फक्त जिल्हास्तरीय नव्हे,तर राज्यस्तरीय पातळीवर फुटबॉल मध्ये हा चमकू लागला. मला याचा अभिमान होता.योग्य वेळी योग्य मुलावर समाजाच्या माध्यमातून आपण याला मदत करू शकलो याचा आत्मिक आनंद होता. 


यानंतर दहावी उत्तम मार्काने पास करून याला अकरावीत ऍडमिशन घेऊन दिले... पुढे हा बारावीत गेला... अभ्यासाबरोबर फुटबॉल ची घोडदौड जोरात सुरू होतीच.८ जून २०२४, वार शनिवार,एका मारुती मंदिराच्या बाहेर भिक्षेकऱ्यांना मी तपासात असताना कोणीतरी पाठीमागून आले आणि माझ्या तोंडात पेढा भरवला. मी वळून पाहिलं तर हा मुलगा होता... सोबत त्याची आई म्हणजे आमची ताई...! 


ती एका पायावर उभी होती,हातात कुबडी नव्हती...

तिचा हात तिच्या मुलाच्या खांद्यावर होता... त्याच्या आधाराने ती उभी होती... जणू मुलगाच तिचा दुसरा पाय झाला होता...!  हा प्रसंग मी नजरेने टिपला आणि मनात जपून ठेवला. तोंडात पेढा असल्यामुळे मुलाला मी खुणेनं विचारलं,पेढे कसले ? 


तो अत्यंत आनंदानं बोलला ; सर,मी बारावी पास झालो,६७ टक्के मार्क पडले. मी झटक्यात उठून उभा राहीलो... माझ्या त्या पोराला मी मिठी मारली... सर्व भूतकाळ मला चित्रपटातल्या प्रसंगाप्रमाणे आठवला.

या एका मिठीमध्ये आमच्या अश्रूंची अदलाबदल झाली... माझे अश्रू त्याच्या खांद्यावर आणि त्याचे अश्रू माझ्या खांद्यावर... इकडे अश्रू आमच्या डोळ्यात होते आणि तिकडे पदर त्या माऊलीने डोळ्याला लावला...


एका मिठी ने काय जादू केली...!!! 


आनंदाचा हा भर ओसरल्यावर मी त्याला म्हणालो,'चला आता पुढे काय करायचं...?' 


तो मला म्हणाला सर आता मला,भारती विद्यापीठ मध्ये BPES ला ऍडमिशन घ्यायचे आहे... 


BPES म्हणजे काय मला नेमकं कळलं नाही... पण माझीही कामं खोळंबली होती... मी गडबडीत त्याला म्हणालो,'ठीक आहे... ठीक आहे... तुला जे काही करायचं आहे, त्याबद्दल मला लिहून एक अर्ज दे... तोपर्यंत मी माझी कामं उरकून घेतो...' माझी काम होईपर्यंत तो अर्ज घेऊन आला. अर्ज पाहून मी चमकलो... अर्ज अस्खलित इंग्लिश मध्ये होता...


My dear Dr. Sonawane sir, 

SOHAM Trust,Pune


अशी सुरुवात होती... इंग्लिश मध्येच त्याने पहिल्या पॅरेग्राफ मध्ये स्वतःची परिस्थिती, शिकायची इच्छा वगैरे याविषयी लिहिलं होतं. 


दुसऱ्या पॅरेग्राफ मध्ये लिहिलं होतं


I wish to continue my further education with your kind support. 


I want to take admission for the *BPES course (Bachelor of Physical Education and Sports)*


My ultimate goal is to become a Sports Teacher... I will apply all my abilities to uplift poor children to make them good sports man and....


पुढचं मी वाचूच शकलो नाही... डोळ्यातल्या पाण्याने अक्षर धुसर केली...! एकतर अर्ज इंग्लिश मध्ये...तो ही इतका मुद्देसूद... बारावी काठावर पास झालेला मी मला आठवलो...तेव्हा आपल्याला इतकी अक्कल होती का ??? हे पोरगं खरंच मोठं झालं होतं...किंवा परिस्थितीने केलं होतं...! 


सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा,की त्याला स्पोर्ट्स टीचर व्हायचं होतं...! मी त्याला म्हणालो,'स्पोर्ट्स टीचर का रे ? इतर कितीतरी अनेक ऑप्शन आहेत तुला.'


तो भूतकाळात हरवला... इतका वेळ उभा असलेला तो आता माझ्या शेजारी बसला... आणि डोळ्यातलं पाणी लपवत तो म्हणाला, 'सर तुम्हाला आठवते का ?  काही वर्षांपूर्वी घातक पिक्चर मधला प्रसंग तुम्ही मला मोबाईलवर दाखवला होता.त्यात बाप आपल्या मुलाला सांगतो,'अपने क्रोध को पालना सीखो काशी,इसे जाया मत करो.'


मी तोच काशी होण्याचा प्रयत्न केला सर...!  


म्हणजे ? मला कळलं नाही...! 


सर,'भीक मागणारी अपंग आई,अंगात पात्रता असून सुद्धा केवळ गरिबीमुळे सर्व गोष्टींपासून वंचित राहिलेला मी,कोणाच्या घरात कोणी जन्म घ्यावा हे कोणाच्याही हातात नसतं... केवळ भीक मागणाऱ्या कुटुंबामध्ये झालेल्या माझा जन्म आणि यामुळे कायम वाट्याला आलेली अवहेलना... या सर्व बाबींमुळे मला भयंकर राग यायचा... राग कसा व्यक्त करायचा हे मात्र कळायचं नाही... वाटायचं या जगात जे जे काही चांगलं आहे ते मला कधीच मिळालं नाही...मला नाही तर कोणालाच नाही... आणि म्हणून या सर्व गोष्टी तोडून फोडून टाकाव्यात असं खूप वेळा मनात यायचं.'


'पण तुम्ही त्यावेळी मला सांगितलं, आपल्याला आलेला राग आदळ आपट करून वाया जाऊ द्यायचा नाही,त्याला जपून ठेवायचा,याच रागाला एक हत्यार बनवायचं, पण या हत्यारानं कुणाला इजा करायची नाही,स्वतःला आकार देण्यासाठी या हत्याराचा योग्य वेळी उपयोग करायचा. रागाचं हे हत्यार वापरायचं काहितरी चांगलं "घडवण्यासाठी"... काही "बिघडवण्यासाठी" नव्हे... !!!'


'या वाक्यांनी मला मार्ग मिळाला आणि मी काशी होण्याचा प्रयत्न करू लागलो...!'


'म्हणजे,त्यावेळी मी जे काही बोललो होतो, ते तुला कळलं होतं...? मी हुंदका आवरत बोललो.'


त्यावेळी तुम्ही जे काही बोलला होता सर,ते त्यावेळी "फक्त ऐकायला" आलं होतं... त्याचा "अर्थ कळायला" पुढे काही दिवस गेले... जेव्हा "अर्थ समजला", त्यावेळी जगण्याची सर्वच कोडी सुटत गेली...! मी त्याचा हात घट्ट पकडला...आज माझे शब्द मुके झाले होते... हुंदक्यांनाच आज जास्त बोलायचं होतं...! तुम्ही म्हणालात ना सर ? स्पोर्टस टीचर का व्हायचे आहे ? खूप ऑप्शन आहेत... 


सर माझा गेम चांगला असूनही शाळेमधील स्पोर्ट्स टीचरनी मला डावललं होतं...याचा राग मी मनात धरून होतो... याच रागाला मी जपलं... आता मला स्वतःला स्पोर्ट्स टीचर व्हायचं आहे... 


स्पोर्ट्स टीचर होऊन तळागाळातल्या गोरगरीब मुलांना शिकवायचं आहे...संधी द्यायची आहे...स्टड नाहीत म्हणून कोणी वंचित राहणार असेल,तर अशाला मी माझ्या पैशाने स्टड विकत घेऊन देईन,

इतकी पात्रता स्वतःच्या अंगात भिनवायची आहे... आणि हो परिस्थितीच्या विळख्यात अडकून चुकीच्या मार्गाने राग व्यक्त करणाऱ्या मुलांना *"घातक"* होण्यापासून वाचवायचं आहे...!


भविष्यात मला स्पोर्ट्स अकॅडमी उघडायची आहे,परिस्थिती वाट चुकायला लावते,अशा वाट चुकलेल्यांना,माझ्या अकॅडमी मधून, फक्त "खेळ" नाही,तर;आयुष्यात "खिलाडू वृत्ती" शिकवायची आहे.आम्ही दोघे सुद्धा रस्त्यावर बसलो होतो, आता तो उठत, निघू का सर ? म्हणाला...


बसूनच मी त्याच्या हळूहळू उभ्या राहणाऱ्या मूर्तीकडे पाहू लागलो...हळूहळू त्याचं डोकं आभाळाला टेकलं...पाय मात्र जमिनीवरच राहिले ! 


मी खुजा होऊन त्याच्याकडे डोळे भरून पाहत राहिलो.... जणु पायथ्याशी उभं राहून कुणी हिमालयाची उंची न्याहाळावी...!!! 


१५ जुलै नंतर फी भरायची आहे सर,जमेल ना आपल्याला ? 


त्याच्या या वाक्याने माझी तंद्री भंगली...


माझ्या आयुष्यावर लिहिलेल्या पुस्तकाची वर्षभर विक्री करून तो पैसा मी जून जुलै च्या दरम्यान दत्तक घेतलेल्या मुलांच्या शिक्षणाकरता वापरतो. 


अनेक मुलांच्या फिया भरून आणि शैक्षणिक साहित्य देऊन सुद्धा यातले काही पैसे उरले होते...फी भरायला अजून एक महिना शिल्लक आहे,तेवढ्यात बाकीची पुस्तकं नक्कीच विकली जातील,आणि याची संपूर्ण फी जमा होईल. मी त्याच्या खांद्यावर हात ठेवून फक्त हसलो...! 


येतो सर,म्हणत माझ्या पायाशी तो वाकला...


यावेळी मात्र रागवत मी त्याला उठवलं आणि म्हणालो,'का रे ? बारावीची परीक्षा पास झालास म्हणजे शिंगं फुटली का तुला ? 


तो घाबरला... बावरून माझ्या चेहऱ्याकडे पाहायला लागला...त्याचा हात हातात घेत म्हटलं,'कालपर्यंत मामा होतो मी तुझा,आज एकदम सर कसा झालो रे ? 


यानंतर मामा... मामा म्हणत तो झपदिशी कुशीत शिरला...यानंतर आभाळ भरलं...


जोर जोरात पाऊस कोसळायला लागला...आम्ही सर्वजण भिजून गेलो... 


हा पाऊस त्याच्या डोळ्यातला ? 

माझ्या डोळ्यातला ?? 

की त्याच्या आईच्या डोळ्यातला ??? 


ते मायलेक निघाले,मी त्यांच्या पाठमोऱ्या आकृत्या पाहत होतो...त्याने आईचा हात हाती घेतला होता,आईने मुलाच्या खांद्यावर हात ठेवला होता... आईला आधार देत तो पुढे निघाला होता... 


भविष्यातल्या पिढीला,मार्ग दाखवण्यासाठी.. *घातक" बनण्यापासून रोखण्यासाठी... त्यावेळी रस्त्यातून डौलदार चालीने चाललेला मला तो "दीपस्तंभ" भासला...! 


या दीपस्तंभाला मी सॅल्यूट केला...!!! 


त्याचवेळी आकाशातून विजांचा चमचमाट झाला... कडकडाट झाला...निसर्गाने आत्ताच त्याच्यासाठी टाळ्या तर वाजवल्या नसतील...??? 


मी आभाळाकडं पाहिलं आणि वेडा पाऊस पुन्हा सुरू झाला...!!!


दिनांक : ११ जून २०२४


डॉ अभिजीत सोनवणे,डॉक्टर फॉर बेगर्स

सोहम ट्रस्ट पुणे..


११/६/२४

निराश न होता चालत रहा - डॉ.आ.ह.साळुंखे

मी निराश नाही,कारण प्रत्येक अयोग्य प्रयत्न टाळणे योग्य दिशेने टाकलेले पुढचे पाऊल असते.- थॉमस एडिसन यांनी फार फार वर्षांपूर्वी हे सांगून ठेवलेलं आहे.इतिहास आपली पुनरावृत्ती स्वतः करत असतो.

या पुस्तकातील ऐतिहासिक वाक्याचा अनुभव आम्हाला नुकताच आला कारण होते पुढील प्रमाणे..

तो दिवस,तो क्षण,ती घटना काही क्षणापुर्वी घडून गेल्यासारखी वाटते.


माझे मार्गदर्शक मित्र माधव गव्हाणे (ज्यांना मी सॉक्रेटिस म्हणतो ) जिल्हा परिषद शाळा रायपूर तालुका सेलू जिल्हा परभणी या ठिकाणी शिक्षक म्हणून मुलांच्यात प्रसिद्ध असणारे,मुलांवर मुलांसारखे संस्कार घडवून त्यांना प्रगल्भ नागरिक करण्याचे (ज्याची सध्या फारच गरज आहे.) हे मुलुखावेगळे कार्य करणारे ज्यांचे विद्यार्थी हे तिसरी व चौथीमध्ये शिक्षण घेत आहेत आणि काही आता पुढच्या वर्गात,शाळेत शिक्षण घेत आहेत.ज्यांनी काव्य संमेलनामध्ये कविता सादर केलेल्या आहेत बालभारतीच्या 'किशोर ' सारख्या अभ्यासपूर्ण मासिकामध्ये त्यांच्या कविता,अनुभव लेखन आणि चित्र प्रसिद्ध झालेले आहेत.ती लेकरं वाचलेल्या पुस्तकांवरती परीचयात्मक लेखन करतात.


पुस्तक वाचतात व संबंधित लेखकाशी संवाद साधतात.त्यांच्याशी पत्रव्यवहार करतात.त्या पत्राला उत्तर म्हणून संबंधित लेखकांनी त्यांना पत्रेही पाठवलेली आहेत.


'तुम्हाला जर संधी मिळाली तर तुम्ही तुमची मुलं जाळून टाकाल,की तुमची पुस्तकं ?' असा विचित्र प्रश्न स्किनरनं त्याच्या पहिल्याच टेलिव्हिजनच्या कार्यक्रमात प्रेक्षकांना थेटपणे विचारला होता आणि इतकंच नाही,तर 'मी तर मुलांनाच जाळेन,कारण 'मानवी प्रगतीमध्ये माझ्या पुस्तकांमुळे माझ्या जीन्सपेक्षा जास्त योगदान मिळेल,'असं त्या प्रश्नांचं स्वत:च सरळपणे उत्तरही दिलं होतं!अर्थातच त्याच्या या विधानावर प्रचंड गदारोळ झाला; बऱ्याच उलटसुलट चर्चाही झाल्या.पुस्तकं माणसाला उत्क्रांतीमध्ये एका महत्त्वाच्या केंद्रबिंदू ठिकाणी घेऊन आली.


फार वर्षांपासून डॉ.आ.ह.साळुंखे (तात्यांना) भेटण्याचे नियोजन चालले होते.(पुस्तकातून मनाच्या पातळीवरती आम्ही त्यांना भेटलो होतोच पण प्रत्यक्षात भेट झालेली नव्हती.) संसारीक प्रापंचिक कामामुळे भेटीचा कालावधी पुढे जात होता…


काही वर्षे,दिवस,मिनिटे,सेकंद,गेली आणि दिनांक - ०४.०६.२४ या दिवशी तो भेटीचा योग आला.

'कोणीही तुमच्या मेंदूत सत्य ओतणार नाही.हे तुम्हाला स्वतःसाठी शोधायचे आहे ' नोम चोम्स्कीचा हा शोध पुस्तकाजवळ येवून थांबतो.


मी सकाळी शिरोली फाट्यावर त्या दोघांना घेवून येण्यासाठी माझा टोप गावतील एकमात्र मित्र संतोष पाटील यांना सोबत घेवून गेलो.त्यांच्यासोबत खास तात्यांना भेटण्यासाठी आलेले डॉ.नयन राठोड आले होते.नयन नाव वैशिष्ट्यपूर्ण आहे.याचा अनुभव मला आला,तो पुढे येईलच.घरी आलो आवरलं सौ.मेघाने छान स्वंयपाक केला होता.रोजच्या पेक्षा जेवण आज वेगळे लागले.मित्रांची सोबत असल्याने ते तसे झाले होते.माणसांवर प्रेम करणारे भेटीच्या ओढीने आलेले मित्र सोबत असल्याने जेवण खूप रुचकर आणि आस्वादक वाटत होते.जेवण झाल्यानंतर साताऱ्यासाठी रवाना झालो.गाडी भारत बझारचे मालक चंद्रकांत कदम (आप्पा ) यांच्या घरी जावून लावली.एसटी ने प्रवास सुरू झाला.अनेकांना आपल्या आवडत्या लोकांना भेटवण्याचे महान काम ही एसटी करत असते.मानवी नात्याशी ती जोडलेली आहे.तात्यांचे चिरंजीव राकेश साळुंखे सरांचा फोन येतच होता.एसटीमध्ये आम्ही फक्त एकाच विषयावर चर्चा करत होतो की ज्यांना फक्त आजपर्यंत आपण पुस्तकात वाचलेलं आहे त्यांच्याशी आपण काय बोलायचं..एक प्रकारचा दबावच होता.आदर,प्रेम,

जिव्हाळा या सगळ्या भावना एकत्रित उचंबळून आलेल्या होत्या.काही सुचत नव्हतं इतका आनंद ओसंडून वाहत होता.


एकदाचा या पावन भुमीत पाय ठेवला.असाच पाय इतिहासात ठेवला होता.त्याची आठवण झाली.तो प्रसंग असा होता….


मला वाटतं,आमच्या कामाची दखल ही आतिषबाजीच्या एका तुकड्या पेक्षा दैनदिन कामावरून घेतली गेली तर 

ते आम्हाला जास्त आवडेल.हे शब्द होते चंद्रावर पहिलं पाऊल ठेवलेल्या नील आर्मस्ट्रॉंग याचे..! ऑल्ड्रिन व आर्मस्ट्रॉंग २० जुलै १९६९ वेळ रात्रीचे १० वाजून ५६ मिनिटं ! ईगल चंद्रावर अलगद उतरलं.तेव्हा यानात फक्त २५ सेकंद चालेल इतकंच इंधन शिल्लक होतं..! ईगलचे दरवाजे उघडले आणि आर्मस्ट्राँगनं पहिल्यांदा आपला डावा पाय चंद्रावर ठेवला.त्याच्या पायाचा ठसा उमटला.


(आतून बाहेरून शहारलो.आम्हाला घेण्यासाठी राकेश दादा व सागर शिंगणे मनमोकळे लेखक येत होते.काही वेळ वाट पाहीली..गाड्या येत होत्या,जात होत्या.आणि एका महत्त्वाच्या क्षणी नयन राठोड म्हणाले ही गाडी आपणास घेवून जाण्यासाठी आली आहे.मी म्हणालो कशावरून ते म्हणाले थोडं थांबा..

खरोखरच ती गाडी आली.मला आश्चर्यकारक प्रश्न पडला.व त्यांनी सहजच उत्तर दिलं.


माझं नाव नयन आहे.मी वेगळं काहीतरी बघू शकतो.त्यांच्या या सेन्स चे मला कौतुक वाटले.


एकदाचे घरी आलो.तर तात्या पलंगावर पहूडले होते,

मला तर ते बुद्ध भासले.शरीर थकलेले होते पण मन अविरतपणे करुणेने भरलेले होते.माधव गव्हाणे यांना ते जवळून ओळखत होते.'माधव'आले आहेत,हे दिसताच ते पलंगा वरुन उठले आणि कसे आहात?केव्हा निघाला होता? प्रवास कसा झाला.आदी प्रश्न विचारून आस्थेने चौकशी केली.हे सर्व अनुभवताना तात्यांच्या करुणामय दृष्टीने आम्ही चिंब भिजत होतो.


तात्यांची पुस्तक वाचता वाचता आम्हाला कसं जगायचं याचं ज्ञान प्राप्त झालं.त्या ज्ञान तपस्वी महान व्यक्तीला भेटत असतानाचा प्रसंग माझ्या आयुष्यात आला.

त्याबद्दल त्या प्रसंगाचा त्या क्षणाचा मी सदैव ऋणी आहे. 


त्यांचा तो मायेचा स्पर्श मला माझ्या आईची आठवण करून देत होता.प्रेम भरभरून देणं हेच त्यांचं व्यक्तित्व आहे.हा स्पर्श खूप खूप पुरातन आहे.हे सत्य मला गवसलं.आमच्याशी व्यवस्थितपणे बोलता यावं म्हणून पलंगावरुन उठून आमच्या समोर खुर्चीत बसले.शरीराने पूर्णपणे थकलेले आहे. त्यांना खूप त्रास होतो आहे हे बघून आमच्या काळजाचं पाणी पाणी झालं.आमच्या अगोदर पासुनच तात्यांच्या छायेत असणारे सागर शिंगणे व शब्दशिवार दिवाळी अंकाचे संपादक,कवी इंद्रजित घुले यांच्याशी दिलखुलास चर्चा झाली.माधव गव्हाणे यांनी तात्यांसाठी आणलेली त्यांच्याकडील गोड मिठाई (कलम) तात्यांनी आनंदाने दोन वेळा खाल्ली.


ती मिठाई खात असताना सॉक्रेटीस यांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या होत्या.जीवनाच्या सार्थकतेची ती खुण होती.


अनेक विषयावरती जीवनाच्या पैलूं वरती आम्ही सर्वांनी चर्चा केली.बराच वेळ बसल्यानंतर तात्यांना त्रास होऊ लागला.म्हणून ते विश्रांतीसाठी पलंगाकडे गेले.आमची चर्चा सुरूच होती.काही वेळानंतर परत तात्या म्हणाले की,मला तुमच्या मध्ये परत यायचं आहे आणि चर्चा करायची आहे.ते परत आमच्या मध्ये येऊन सामील झाले.नयन राठोड यांनी त्यांचे चुलते भिमनीपुत्र मोहन नाईक आणि त्यांचे बंधू अमोल राठोड यांनी लिहिलेली काही पुस्तके तात्यांना भेट दिली.त्यांनी आपली ओळख करून दिली.


तात्यांना खळखळून हसवणारा एक प्रसंग जो माधव गव्हाणे यांनी सांगितला.त्यांच्या घरी बुद्धांची मूर्ती आहे.पोस्टमन आल्यानंतर सही करून त्यांच्याकडून आलेलं साहित्य स्वीकारलं जातं.एक वेळ उघड्या दाराच्या फटीतून त्यांचं लक्ष बुद्धांच्या मूर्ती वरती पडलं.त्यावेळी आश्चर्य वाटून त्यांनी विचारलं मला वाटत होते की तुम्ही (सर्वसाधारण प्रवर्गाचे) ओपनच आहात.या प्रसंगापासून त्यांच्या घरी काही जणांनी चहा घेण्याचं जवळजवळ टाळलेलं आहे.


मी त्यांना विचारलं आमच्यासाठी आपल्याकडून आशीर्वाद स्वरुप काही संदेश.. 


काही क्षण थांबून त्यांनी संदेश दिला.तो संपूर्ण मानव जातीसाठी आहे.'जे तुम्ही काम करत आहात ते अखंडपणे करत रहा आणि हे करत असताना अजिबात निराश होऊ नका'.हे वाक्यच आमचं जिवंतत्व बनलेलं आहे.


दुपारी तात्यांच्या घरी भोजन झालं.जेवण करत असताना राकेश दादांसोबत सुद्धा वेगवेगळ्या विषयांवर दिलखुलास आणि वैचारिक चर्चा झाली.नंतर काही पुस्तकांची खरेदी झाली आणि भरलेल्या मनाने आणि जड पावलांनी 'पुन्हा लवकरच भेटू ' असं सांगून आम्ही त्या वास्तूची परवानगी घेतली.घरी येईपर्यंत आम्ही काहीच बोललो नाही.एक प्रकारचा तृप्ततेचा अनुभव आला होता.या अनुभावाचा अनुभव घेऊनही सूर्य अस्ताला गेला.पावसानेही आमचं स्वागत केलं आणि आम्ही घरी आलो.रात्री भोजन करून झोपी गेलो.त्या रात्रीची झोप ही आमच्या साठी खरोखरची झोप होती.सर्वांचे मनापासून आभार व धन्यवाद…


विजय गायकवाड..