* विजय गायकवाड | Vijay Gaikawad

live

नमस्कार आपले स्वागत आहे. 'सगळे जण तुम्हाला शोधत येतील.आनंदाने तुडुंब भरलेली माणसे सर्वांनाच आवडतात! पण ते तुम्हाला दुःखी,उदास अशा अवस्थेत पाहू शकत नाहीत! तेव्हा आनंदी-हसतमुख रहा आणि मित्रांचा सहवास वाढवा! जर तुम्ही दुःखी राहिलात तर मात्र सगळे जण तुम्हाला सोडून जातील. जीवनातील आनंद-प्रसन्नता भरभरून वाटा! पण एकटे दुःखी रहाल, तर त्या दुःखातच बुडून जाल !' सॉलिट्यूड, ईला व्हीलर विलकॉक्स जगण्याच्या तयारीसाठी नव्हे तर,जगण्यासाठी माणूस जन्माला आला आहे,असं 'बोरिक पास्तरनाक' यांनी म्हटलेलं आहे.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! वाचन हे आहाराहून जास्त महत्त्वाचे असते.जिम र्‍होम यांनी अँथोनी रॉबीन्स यांना शिकवले होते की 'एक वेळ रोजचे जेवण चुकव,पण वाचन अजिबात चुकवू नको.' याप्रमाणे मी अखंडपणे वाचत आहे. माणसांपासून माणसांपर्यंत जाण्याचा,प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाण्याचा जीवनाचा राजमार्ग पुस्तकातून जातो. कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात. पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये. म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,कवी सचिन शिंदे,संतोष शेळके,अनिल फारणे,सहित प्रकाशन,डॉ.रवींद्र श्रावस्ती,डॉ.सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,संजय बापट,मनोहर सुर्वे,विनायक पाटील,संतोष पाटील,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, मेनन पिस्टन रिंग मधील सहकारी मित्र शेखर सुर्यवंशी..। पुस्तकातील घटना प्रसंग हे मी लिखित स्वरूपात सध्या व्हाट्सअप वरती टाकत असतो.हे सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी,पुस्तके देणारी लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत. ... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ. मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. विजय कृष्णात गायकवाड

१६/१२/२४

सरकणाऱ्या पाण्याचं गुपित / The secret of moving water

जमिनीतून उंच झाडाच्या टोकापर्यंत पाणी पोचतं तरी कसं? ज्या पद्धतीने याचं उत्तर दिलं जातं त्यातून आपली जंगलाची जाण लक्षात येते.झाडं एकमेकांशी कशी बोलतात किंवा त्यांना यातना होतात का,या अभ्यासापेक्षा झाडातून पाण्याचा प्रवाह कसा होतो हे कळणं त्यामानाने सोपं आहे. आणि हे सोपं वाटतं त्यामुळे अनेक शास्त्रज्ञांनी या प्रश्नाला उत्तरं दिली आहेत.माझ्या विद्यार्थ्यांबरोबर मला या विषयावर गप्पा मारायला मजा येते. झाडातून पाण्याचा प्रवाह कसा होतो याची दोन मुख्य कारणं दिली जातात - केशाकर्षण (कॅपिलरी ॲक्शन) आणि पानांतून होणारे बाष्पोत्सर्जन (ट्रांस्पिरेशन).


नाश्त्यामध्ये कॉफी पिताना आपल्याला केशाकर्षणचे प्रात्यक्षिक दिसते.केशाकर्षणामुळे कॉफीचा पृष्ठभाग कपाच्या कडेहून उंच राहू शकतो. केशाकर्षण  तर कपाच्या उंचीपर्यंतच कॉफी असती.या फोर्समुळे अरुंद भांड्यातले द्रव्य गुरुत्वाकर्षणाला झुगारून अधिक उंची गाठू शकते. पानगळ होणाऱ्या झाडात पाणी पोहोचविणारी नलिका ०.०२ इंच रुंदीची असतात आणि ती पाण्याला वर ढकलू शकते.

सूचीपर्णी वृक्षात तर नलिकांची रुंदी जेमतेम ०.०००८ इंच असते.पण फक्त नलिका अरुंद आहेत म्हणून पाणी वरती जातं असं म्हणणं चुकीचं आहे,कारण अत्यंत अरुंद नलिकेतही पाणी जमिनीपासून फार फार तर तीन फूट वरती चढवता येण्याइतकीच ताकद असते.


द हिडन लाईफ ऑफ ट्रीज,पी ट र वो ह्ल ले बे न

अनुवाद - गुरुदास नूलकर,अरविंद घनश्याम पाटकर

 मनोविकास प्रकाशन


आणि म्हणूनच ट्रांस्पिरेशन ही दुसरी प्रक्रिया झाडाच्या मदतीला येते.उबदार वातावरणात सूचीपर्णी आणि रुंद पानातून हवेची वाफ सोडली जाते.एखाद्या विशाल बीच वृक्षातून या पद्धतीने दिवसाला शेकडो गॅलन पाणी बाहेर पडतं.यामुळे झाडाच्या पाणी वाहतुकीच्या नलिकेतून जमिनीतलं पाणी शोषून घेतलं जातं.जोपर्यंत पाणीपुरवठा थांबत नाही तोपर्यंत शोषण होत राहतं,कारण पाण्याचे रेणू एकमेकांना चिकटून वरती खेचले जातात.पानातून वाफ बाहेर गेली की तिथे रिकामी जागा तयार होते आणि जागा भरण्यासाठी पुढचा रेणू वरती सरकतो.


ट्रांस्पिरेशनही कमी पडलं तर झाडात द्रवाभिसरण (ऑस्मॉसिसची) सोय असते.जर एखाद्या पेशीत आजूबाजूच्या पेशींपेक्षा साखरेची घनता जास्त झाली,तर त्या पेशीत शेजारच्या पेशीतून पाणी सरकतं आणि घनता एकसारखी करून घेतली जाते.असं जेव्हा मुळापासून शेंड्यापर्यंत सर्व पेशीतून होतं,तेव्हा पाण्याचा प्रवाह मुळापासून शेंड्यांपर्यंत होऊ लागतो.


वसंत ऋतूच्या आधीच्या कालावधीत पानं पूर्णपणे उघडण्याच्या आधी झाडात पाण्याचा दाब सर्वाधिक असतो.या काळात झाडाला जर स्टेथस्कोप लावला तर चक्क प्रवाहाचा आवाज ऐकू येतो. 


ईशान्य अमेरिका आणि कॅनडामध्ये याचा फायदा करून घेतला जातो.इथले लोक मॅपल झाडातून सिरप गोळा करतात.फक्त याच काळात झाडातून सिरप मिळते.

पानझडीच्या या काळात झाडांवर जास्त पाने नसतात,

त्यामुळे बाष्पोत्सर्जनही कमी असते.आधी पाहिल्याप्रमाणे केशाकर्षणाने पाणी जेमतेम तीन फूटच उंच चढू शकते.पण पूर्ण झाडाच्या खोडात पाणी तुडुंब भरलेले असते,मग आता फक्त 'द्रवाभिसरण' हेच एक कारण ठरते पाण्याच्या प्रवाहाचे.पण मला द्रवाभिसरण पुरेसं आहे असंही वाटत नाही.कारण 'द्रवाभिसरण' हे मुळांमध्ये आणि पानांमध्येच शक्य आहे,जिथे पेशी एकमेकांना खेटून असतात.झाडाच्या खोडात तर फक्त लांबच लांब,सलग नलिका असतात पाणी वाहून नेण्याकरता !


मग आता पाणी प्रवाहाचे नेमके उत्तर काय असेल? 


खरं तर आजही ते आपल्याला पुरेसं कळलेलं नाही. पण नवीन संशोधनामुळे बाष्पोत्सर्जन आणि केशाकर्षण यांवर प्रश्नचिन्ह उभं केलं आहे. युनिव्हर्सिटी ऑफ बर्न,स्विस फेडरल इन्स्टिट्युट फॉर फॉरेस्ट,स्नो अँड लँडस्केप रिसर्च आणि स्विस फेडरल इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी,झुरिच संस्थांच्या शास्त्रज्ञांनी केलेल्या एका संशोधनात रात्री झाडाच्या बुंध्यातून अगदी हळू अशी पाण्याची खळखळ ऐकू आली. 


रात्रीच्या वेळेस पानातून प्रकाश संश्लेषण थांबलेलं असल्यामुळे पाण्याची वाफ तयार होत नाही.म्हणून रात्री बहुतांश पाणी बुंध्यात स्तब्धपणे उभं असतं. पण मग हा आवाज कसला?शास्त्रज्ञांच्या मते हा आवाज कार्बन-डाय-ऑक्साईडच्या बुडबुड्यांचा असू शकतो.हे बुडबुडे खोडांच्या बारीक नलिकेत साठवलेल्या पाण्यामध्ये असतात.याचा अर्थ असा की,बुडबुड्यांमुळे नलिकेतून पाण्याच्या स्तंभ अखंड असत नाही.हे जर बरोबर असेल तर मग केशाकर्षण,बाष्पो

त्सर्जन,द्रवाभिसरण या कशाचं झाडामधील पाणी वाहतुकीत फार काही योगदान नाही असचं म्हणावं लागेल.


किती प्रश्नांची आपल्याकडे उत्तरं नाहीत!पाणी वाहतुकीच्या प्रक्रियेचं आपलं ज्ञान चूक ठरलं म्हणून असेल किंवा नवीन माहिती मिळाली म्हणून असेल,पण आपल्या ज्ञानात नक्कीच भर झाली आहे.किती प्रश्नांची आपल्याकडे उत्तरे नाहीत! पाणी वाहतुकीच्या प्रक्रियेचे आपलं ज्ञान तोडकं आहे.म्हणायचं की आपल्याला आणखी एका रहस्याचं उत्तर सापडवायचं आहे,असे म्हणू या! दोन्ही गोष्टी औत्सुक्य वाढवणाऱ्याच आहेत,नाही का? पण आपल्या ज्ञानात नक्की भर झाली आहे.

१४/१२/२४

सहयोग असा प्राप्त करा.Receive such cooperation

दुसऱ्या व्यक्तीच्या विचारांऐवजी आपल्या सगळ्यांनाच आपल्या विचारांवर जास्त विश्वास असतो.यात समजदारी नाही आहे की,आम्ही आपल्या विचारांना दुसऱ्याच्या गळ्याच्या खाली उतरवण्याकरता आपला पूर्ण जोर लावावा.

याच्याऐवजी हे चांगलं नाही होणार का की आम्ही फक्त सूचवावं आणि समोरच्या व्यक्तीला निष्कर्ष काढू दे.


एडॉल्फ सेल्ट्ज ऑटोमोबाईल शोरूमचे सेल्स मॅनेजर आहेत आणि माझ्या एका कोर्सचे विद्यार्थी आहेत.त्यांच्या समोर अचानक ही समस्या आली की, त्यांना हताश आणि विखुरलेल्या ऑटोमोबाईल सेल्समन्सच्या समूहात उत्साह निर्माण करावा लागला. त्यांनी एक सेल्स मीटिंग बोलावली आणि सेल्समनला विचारले की त्यांना कंपनीकडून काय काय हवं आहे? त्यांचे विचार ऐकण्याच्या वेळी त्यांनी सुचवलेले उपाय फळ्यावर लिहिले.

यानंतर त्यांनी सांगितलं,तुम्हाला माझ्याकडून जे हवंय,ते सगळं तुम्हाला मिळेल.आता मी तुमच्याकडून हे जाणू इच्छितो की,मला तुमच्याकडून काय अपेक्षा ठेवायला पाहिजे.उत्तरं लवकर आणि वेगाने आली - निष्ठा,इमानदारी,टीमवर्क,प्रत्येक दिवशी आठ तास मन लावून काम करणे,उत्साह,जोश इत्यादी. मीटिंग एक नवी प्रेरणा,एका नवीन आशेबरोबर संपली.


 एका सेल्समनने तर चौदा तास रोज काम करण्याचं वचन दिलं आणि मिस्टर सेल्ट्जने मला सांगितलं की, या मीटिंगच्या नंतर त्यांच्या कंपनीची विक्री खूप वाढली.


मिस्टर सेल्ट्ज सांगतात,या लोकांनी माझ्याबरोबर एक प्रकारचा नैतिक करार केला होता.जेव्हापर्यंत मी माझ्याकडून दिल्या गेलेल्या वचनाला जागेन,या लोकांनापण आपल्या वचनावर कायम राहावं लागेल. त्यांच्या इच्छांना विचारणं हा एक जादूचा उपाय होता, ज्यानी कमाल केली."


कोणीही या गोष्टीला पसंत नाही करत की,त्याला काही विकलं जातंय किंवा त्याला काही समजावलं जातंय. आम्ही सगळे या गोष्टीला पसंत करतो की,आम्ही स्वतः काही गोष्टीचा विचार करू किंवा आपल्या मनानी कोणतीही विकत घेण्याचा निर्णय घेऊ.आम्हाला आपल्या इच्छांनी, आपल्या विचारावर काम करणं आवडतं.


मिस्टर वेसनचं उदाहरण घ्या.त्यांनी हे सत्य ओळखण्याच्या आधी हजारो डॉलर्सचं कमिशन गमावलं होतं.मिस्टर वेसन स्टाइलिस्ट्स आणि टेक्सटाइल निर्मात्यांना स्केच विकत होते.मिस्टर वेसन तीन वर्षांपासून प्रत्येक आठवड्यात न्यू यॉर्कच्या एका नामी स्टाइलिस्टकडे जात होते.मिस्टर वेसननी सांगितलं खरं तर त्यांनी मला भेटायला कधी नाही म्हटलं नाही,पण त्यांनी माझं कोणतंच स्केच विकत घेतलं नाही.तो नेहमी माझं स्केच लक्षपूर्वक बघत असे आणि त्याच्या नंतर म्हणायचा : नाही,वेसन मला असं वाटतं की हे स्केच आमच्या काही कामाचे नाहीत.


दीडशे वेळा असफल झाल्यानंतर वेसनला असं जाणवलं की,बहुतेक त्याचं डोकं बरोबर काम नाही करत आहे म्हणून त्याने एक आठवडापर्यंत मानवीय व्यवहाराला प्रभावित करण्याच्या कलेवर होत असलेल्या एका कोर्समध्ये भाग घेतला म्हणजे त्याला नवीन विचार मिळतील आणि त्याच्यात नवीन उत्साह जागेल.

त्यांनी आपल्या शिकलेल्या नव्या उपायांवर अंमल करण्याचा निर्णय घेतला.एक दिवस तो आपल्या हातात अर्धा डझन अर्धवट स्केच घेऊन विकणाऱ्याच्या ऑफिसमध्ये पोचला आणि म्हणाला,मला तुमच्याकडून मदत हवीय.माझ्याजवळ काही अर्धवट स्केच आहेत. काय तुम्ही मला सांगाल की,तुम्हाला याला कोणत्या प्रकारांनी बनवायचं आहे?जेणेकरून तुमच्या हे कामास येतील? विकत घेणाऱ्याने काही न सांगता काही वेळ स्केचकडे बघितलं आणि शेवटी सांगितलं,तुम्ही या स्केचेसना इथेच सोडून जा आणि थोड्या दिवसांनंतर येऊन भेटा.वेसन तीन दिवसांनंतर भेटायला गेला.खरेदी करणाऱ्यांनी त्यांना जे सुचवलं होतं त्याप्रमाणे त्या हिशेबानी त्यानं स्केच पूर्ण केले आणि निकाल हा लागला की सगळेच स्केचेस स्वीकारले गेले.


यानंतर खरीददाराने वेसनला खूप साऱ्या स्केचेस्ची ऑर्डर दिली आणि मिस्टर वेसनने ते सगळे स्केचेसपण त्याच्याच विचारांच्या मदतीने बनवले.मिस्टर वेसनचं म्हणणं होतं की,मी तोपर्यंत याकरता असफल होत राहिलो कारण की मी त्याला माझ्या मनाची गोष्ट विकत होतो.मी ते विकायला बघत होतो,जे मला वाटत होतं की,त्याने विकत घ्यायला पाहिजे.मग मी माझी शैली पूर्णपणे बदलून टाकली.मी त्याला त्याचे मत विचारले. यामुळे त्याला असं वाटलं जसा तो स्वतःवर डिझाइन बनवतो आहे आणि एका प्रकाराने असंच होत होतं. मला त्याला स्केचेस विकावे नाही लागले.त्यांनी आपल्या मनानीच स्केच विकत घेतले.


समोरच्या व्यक्तीला हा अनुभव द्या की हे विचार त्याचेच आहेत.हे बिझनेसमध्ये आणि राजनीतीमध्येही काम करतं आणि कौटुंबिक जीवनामध्येसुद्धा. 


ओक्लाहामाच्या पॉल एम.डेविसने आपल्या क्लासला सांगितलं की,त्यांनी कोणत्या प्रकारे या सिद्धान्तावर अंमल केला.मी माझ्या कुटुंबासोबत सुट्टीमधल्या एका ट्रीपचा खूप छान आनंद घेतला.मी नेहमीच ऐतिहासिक जागेवर फिरण्याची स्वप्नं पाहत होतो.जसं गेटिसबर्गमध्ये गृहयुद्धाची रणभूमी,फिलाडेल्फिया मध्ये इंडिपेंडन्स हॉल आणि आमच्या देशाची राजधानी.मी जिथे जाऊ इच्छित होतो त्यात वॅली फोर्ज,जेम्सटाउन आणि विलियम्यबर्गही सामील होते.


मार्चमध्ये माझी पत्नी नॅन्सीने म्हटलं की,उन्हाळ्यात तिच्या हिशेबाने न्यू मेक्सिको पॅरिझोना,कॅलिफोर्निया,नेवाडा इत्यादी पश्चिम राज्यांचं भ्रमण करायला योग्य राहील.अनेक वर्षांपासून या जागांवर जाण्याची इच्छा होती.सरळच होतं की,या दोन्ही ट्रीप्स एकाच वेळी होऊ शकत नव्हत्या.


"आमची मुलगी ॲनने ज्युनियर हायस्कूलमध्ये अमेरिकेच्या इतिहासाचा कोर्स पूर्ण केला होता आणि ती आपल्या देशाला आकार देणाऱ्या घटनांमध्ये खूप रुची ठेवत होती.मी तिला विचारलं की काय ती आमच्या बरोबर पुढच्या सुटीत त्या जागांना भेट देऊ इच्छिते का, ज्याच्या बाबतीत तिने फक्त पुस्तकात वाचलं आहे.तिने म्हटलं जर असं होईल तर तिला खूप आनंद होईल.या चर्चेच्या दोन दिवसांनंतर जेव्हा आम्ही डिनर टेबलावर बसलो तेव्हा ॲनने घोषणा केली की,जर आम्ही सगळे सहमत असलो तर या उन्हाळ्याच्या सुट्टीत पूर्व राज्यांमध्ये फिरून येऊ शकतो,कारण हा ॲनकरता खूपच रोमांचकाही प्रवास होईल आणि आम्हाला सगळ्यांनापण यामुळे मजा येईल.आम्ही लगेच सहमत झालो.

याच मनोवैज्ञानिक तंत्राचा प्रयोग एका एक्स-रे निर्मात्याने केला.ब्रूकलिनच्या एका मोठ्या दवाखान्यात एक्स-रे मशिनची गरज होती.हा दवाखाना अमेरिकेमधील सगळ्यात चांगला एक्स-रे डिपार्टमेंट म्हणवण्याकरता अत्याधुनिक उपकरणं लावायचं म्हणत होता.एक्स-रे डिपार्टमेंटच्या प्रभारी डॉक्टर एलकडे खूप सारे सेल्समन येऊन आपल्या कंपनीच्या मशिन्सची तारीफ करायचे.

परंतु एक निर्माता जास्त चतुर होता.तो मानवी स्वभावाला आपल्या प्रतिस्पर्ध्यापेक्षा जास्त चांगलं जाणत होता.त्याने डॉक्टर एल.ला या प्रकारे एक पत्र लिहिलं :


आमच्या फॅक्टरीने आताच एक नवीन एक्स-रे मशीन बनवली आहे.ही मशीन आत्ताच आमच्या ऑफिसमध्ये आली आहेत.आम्ही जाणतो की ही मशिन्स निर्दोष असणार नाहीत.आम्ही त्याच्यात सुधार करायचं म्हणतो आहोत.

आम्ही तुमचे आभारी राहू जर तुम्ही येऊन या मशिन्सला बघून आम्हाला सांगाल की,यांना आम्ही तुमच्या व्यवसायाकरता कोणत्या तऱ्हेने अधिक उपयोगी आणि उत्तम बनवू शकू.मला माहिती आहे की तुम्ही खूप व्यस्त आहात,याकरता मी तुम्हाला घ्यायला तुमच्या सांगितलेल्या वेळेला गाडी पाठवीन.


डॉ.एल.ने आमच्या वर्गासमोर ही घटना ऐकवताना म्हटले,हे पत्र मिळाल्यावर मला खूप आश्चर्य वाटले.मी आश्चर्यचकितही होतो आणि खूशही.पहिल्यांदाच कोणत्या तरी एक्स-रे मशीन निर्मात्याने मला सल्ला मागितला होता.यामुळे मला असं वाटलं की मी महत्त्वपूर्ण होतो.मी त्या आठवड्यात खूपच व्यस्त होतो; पण मी एक डिनर अपॉइंटमेंट कॅन्सल केली आणि मशीन बघायला गेलो.मशीनला मी जितके लक्षपूर्वक बघितलं,तितकाच मी या निर्णयाला पोहोचलो की हे मशीन खूपच चांगलं आहे.कोणीच मला ही मशीन विकायचा प्रयत्न केला नव्हता.मला जाणवलं की,जणू काही दवाखान्यात ते उपकरण विकत घ्यायचा विचार माझाच होता.मी त्याला चांगल्या क्वालिटीचं असल्यामुळे विकत घेतलं होतं.


राल्फ वॉल्डो इमर्सनने आपल्या निबंधात सेल्फ-रिलायन्समध्ये सांगितलं आहे की,प्रत्येक महान कामात आम्ही आपल्या नाकारलेल्या विचारांना ओळखतो.ते एक विशिष्ट ज्ञान घेऊन आमच्याकडे परततं.


जेव्हा वुड्रो विल्सन व्हाइट हाउसमध्ये होते,तेव्हा कर्नल एडवर्ड एम.हाउस राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मामल्यात बरीच दखल घेत होते. विल्सन कर्नल हाउच्या गोपनीय सल्ला आणि उहापोहावर जितके निर्भर होते,तितके आपल्या कॅबिनेटच्या मंत्र्यांवर नव्हते.(मित्र जोडा,आणि प्रभावशाली बना,डेल कार्नेगी,अनुवाद - कृपा कुलकर्णी, मंजुल प्रकाशन)


कर्नल प्रेसिडेंटला प्रभावित करण्याकरता कोणती पद्धत वापरत होते ? सौभाग्यानी आम्हाला ही गोष्ट माहीत आहे,कारण हाउसने स्वतः ही गोष्ट आर्थर डी.हाउडने स्मिथला सांगितली होती,ज्यांनी त्याचा उल्लेख द सॅटरडे इव्हनिंग पोस्टमध्ये छापलेल्या आपल्या लेखात केला आहे.


जेव्हा मी प्रसिडेंटशी चांगल्या प्रकारे परिचित झाले, तेव्हा मी हे ओळखलं की त्यांच्याकडून आपली गोष्ट मनवण्याचा सगळ्यात चांगला उपाय हा आहे की कोणताही विचार त्यांच्या समोर हलक्या फुलक्या ढंगांनी सांगा,ज्यामुळे त्यांच्या मनात याविषयी रुची निर्माण होईल म्हणजे ते स्वतः याच्या बाबतीत विचार करतील.पहिल्या वेळी तर असं संयोगाने झालं होतं.मी व्हाइट हाउसमध्ये गेलो होतो आणि मी त्यांच्या समोर एक अशा नीतीचा प्रस्ताव ठेवला होता ज्याबाबत ते त्या वेळी सहमत नव्हते.अनेक दिवसांनंतर डिनर टेबलवर त्यांनी माझ्या समोर माझ्याच विचारांना या प्रकारे ठेवलं जसा की तो उपाय त्यांच्याच डोक्यातून निघाला आहे. मी हैराण झालो.हाउसने प्रेसिडेंटला टोकून म्हटलं की, हा तुमचा विचार नाही आहे.हा तर माझा विचार आहे. नाही,हाउसनी असं काहीच केलं नाही.ते खूप बुद्धिमान होते.त्यांना श्रेय घेण्याची पर्वा नव्हती.त्यांना तर परिणाम हवा होता.याकरता त्यांनी विल्सनला हे वाटू दिलं जसा की,तो त्यांचाच विचार आहे.हाउस यापेक्षाही पुढे गेले. त्यांनी विल्सनना या विचारांबद्दल सार्वजनिक रूपानी श्रेय दिलं.आम्हाला हे लक्षात ठेवलं पाहिजे की,


आम्ही या लोकांच्या संपर्कामध्ये असतो ते सगळे तितकेच मानवीय आहेत जितके की वुड्रो विल्सन होते.

याकरता आम्हाला कर्नल हाउसच्या टेक्निकचा प्रयोग करायला हवा.


एकदा न्यू ब्रुन्सविकच्या सुंदर कॅनाडाई प्रदेशाच्या एका व्यक्तीने याच टेक्निकचा प्रयोग माझ्यावर केला आणि त्याने मला आपलं ग्राहक बनवलं.एकदा मी न्यू ब्रुन्सविकमध्ये फिशिंग आणि कॅनोइंग करण्याची योजना बनवत होतो.याकरता मी टुरिस्ट ब्यूरोकडून कॅपस् ची माहिती मिळवली.स्पष्ट होतं की माझं नाव आणि पत्ता मेलिंग लिस्टमध्ये टाकले गेले.माझ्याजवळ खूपशा कैंप मालकांची पत्रं,बुकलेट आणि छापलेल्या प्रसंशेचे कोटेशन आले.मी हैराण होतो.मला समजत नव्हतं की,मी आता काय करू? तेव्हा एका कँपच्या मालकाने चतुराईने काम केलं.त्याने मला न्यू यॉर्कच्या खूप लोकांची नावं आणि टेलिफोन नंबर लिहून पाठवून दिलं आणि मला सांगितलं की,मी त्यांना फोन करून विचारू शकतो की,त्यांची व्यवस्था कशी आहे.


योगायोगाने मी त्या सूचीमधल्या एका व्यक्तीला ओळखत होतो.मी त्याला फोन करून त्याचा अनुभव विचारला आणि यानंतर मी कँपच्या मालकाला आपल्या पोचण्याची तार केली.दुसरे लोक मला आपल्या सेवा विकण्याचा प्रयत्न करत होते.या व्यक्तीने मला त्याच्या सेवांना विकत घेण्याकरता विवश केलं,त्यामुळे तो कँपवाला जिंकला.


अडीच हजार वर्षांपूर्वी लाओत्से नावाच्या चिनी दार्शनिकाने अशी गोष्ट सांगितली होती,ज्यावर हे पुस्तक वाचणारे अंमल करू शकतात,नद्या आणि समुद्र शेकडो पहाडांवरच्या धारांचं पाणी याकरता ग्रहण करू शकतात कारण ते स्वतः खाली असतात.यामुळे ते पहाडावरच्या झऱ्यांवर अधिपत्य करू शकतात.या प्रकारे संतसुद्धा स्वतःला माणसांपेक्षा खालच्या पातळीवर ठेवतात म्हणजे ते त्यांच्यापेक्षा वर जाऊ शकतील.त्यांच्या पाठीमागे ठेवतात म्हणजे ते त्यांच्या आधी राहू शकतील.याच कारणामुळे संत माणसांपेक्षा वरच्या स्तरावर असतात;पण माणसांना त्याचा त्रास होत नाही,सामान्य माणसांना त्यापासून कुठलेच दुःख होत नाही."


दुसऱ्या व्यक्तीला असे वाटू द्या की,हा विचार तिचाच आहे.

१२/१२/२४

दोन बिबळ्यांचं युद्ध / The war of two leopards

एक म्हणजे तिथे जवळपास कुठेही बसण्यासाठी योग्य जागा नव्हती आणि दुसरं म्हणजे कुठेही बसायला माझी तयारी नव्हती.त्या जागेपासून सर्वात जवळचं,एका निष्पर्ण आक्रोडाचं झाड तिथून तीनशे यार्ड लांब होतं त्यामुळे तिथे बसण्याचा प्रश्नच येत नव्हता आणि स्पष्टपणे कबूल करायचं झालं तर जमीनीवर कुठेतरी बसण्याचं धैर्य माझ्याकडे नव्हतं.मी त्या गावात संध्याकाळी आलो होतो.चहा पिणं,त्या मुलाच्या आईची कथा ऐकणं,बिबळ्याचा माग काढणं या सर्व गोष्टींमध्ये बराच वेळ खर्च झाला होता आणि आता मला किमान सुरक्षित वाटेल असा आडोसा किंवा लपणं तयार करणं यासाठी हाताशी वेळच उरला नव्हता.त्यामुळे मी जमीनीवर बसायचं ठरवलं तरी अक्षरशः कुठेही बसावं लागणार होतं;त्यात निवडीला वावच नव्हता.त्यात परत माझ्यावर हल्ला झाला असता तर मला ज्या हत्याराचा सराव होता त्याचा,म्हणजे रायफलचा, काहीही उपयोग नव्हता कारण वाघ किंवा बिबळ्या यांच्याशी आमनेसामने संपर्क झाला तर बंदुकांचा काहीही उपयोग नसतो.


ही सर्व मोहीम उरकून अंगणात परतल्यावर मी मुखियाला एक पहार,मजबूत लाकडी मेख,हातोडा व कुत्र्याची साखळी एवढ्या वस्तू आणायला सांगितल्या. पहारीने अंगणातली एक फरशी मी उचकटून काढली, त्या खड्ड्यात ती लाकडी मेख खोलवर ठोकली आणि साखळीची एक कडी त्यात अडकवली.त्यानंतर मुखियाच्या मदतीने मी त्या मुलाचा मृतदेह तिथे आणून ठेवला आणि साखळीचं दुसरं टोक त्याला बांधून टाकलं.आपल्या आयुष्याचा शेवट ठरवणारी अदृश्य शक्ती - तिला काही लोक नशीब तर काही लोक 'किस्मत' म्हणतात- कधीकधी फार क्रूर खेळ करते. 


गेल्या काही दिवसात या अज्ञात शक्तीने एका कुटुंबाची रोटी कमावणाऱ्याचा बळी घेऊन त्यांना उघडं पाडलं होतं,

आयुष्यभर काबाडकष्ट करून शेवटची काही वर्ष त्यातल्या त्यात सुखासमाधानात घालवण्याची स्वप्न रंगवणाऱ्या म्हातारीच्या आयुष्याची दोरी अतिशय वेदनामयरित्या तोडली होती आणि आता...या छोट्या पोराच्याही आयुष्याचा दोर कापला होता.

त्याच्याकडे बघूनच समजत होतं की त्या विधवा स्त्रीने त्याचं पालनपोषण किती काळजीपूर्वक केलं होतं.त्यामुळेच रडता रडता ती मध्येच थांबून म्हणत होती,"देवा, माझ्या पोराने असा काय गुन्हा केला होता की इतक्या उमेदीच्या वयात त्याच्या वाट्याला इतका भयानक मृत्यू यावा ?


अंगणातली फरशी काढतानाच मी सांगितलं होतं की त्या मुलाच्या आईला आणि बहिणीला त्या इमारतीच्या अगदी शेवटच्या खोलीत नेलं जावं.माझी सर्व तयारी झाल्यावर मी झऱ्यावर जाऊन हातपाय धुतले, ताजातवाना झालो व गवताच्या थोड्या पेंढ्या आणायला एकाला पाठवून दिलं.ते कुटुंब राहत होतं त्या घरासमोरच्या व्हरांड्यावर मी त्यातल थोडं गवत पसरवून ठेवलं.आता अंधार पडला होता व आसपास जमलेल्या सर्वांना रात्रभर शक्य तेवढी शांतता ठेवा अशी शेवटची सूचना देऊन मी घरी पाठवून दिलं.


गवताच्या गादीवर आडवा पडून व पुढे गवताचा थोडा ढीग रचून मी समोर पाह्यलं तर मला मृतदेह अगदी स्पष्ट दिसत होता.

आदल्या रात्री कितीही गोंगाट केला गेला असला तरी मला खात्री होती की आज रात्री बिबळ्या भक्ष्यावर येणार आणि भक्ष्य त्याच्या जागी न सापडल्याने तो दुसरा बळी मिळवण्यासाठी गावात येणार.ज्या सहजपणे त्याला या नव्या गावात शिकार मिळाली होती त्यामुळे त्याची उमेद वाढली असणार. म्हणूनच आज रात्री मी बराच आशावादी होतो.


संध्याकाळभर आभाळात ढग जमत होते पण एकदा त्या बाईच्या रडण्याचा आवाज सोडला तर रात्री ८ वाजल्यापासनं सर्व काही चिडीचिप होतं.चमकणाऱ्या वीजा आणि दूरवरून येणारा ढगांचा गडगडाट मोठ्या वादळाची ग्वाही देत होते.जवळजवळ पुढचा एक तास हे वादळ घोंगावत होतं आणि चमचमणाऱ्या वीजांचा प्रकाश इतका प्रखर होता की अंगणात एखादा उंदीर जरी आला असता तरी मला दिसला असता.अगदी मी त्याला अचूक उडवूही शकलो असतो.पाऊस थांबला पण आभाळ अजूनही भरलेलंच असल्याने अगदी काही इंचापर्यंतही दिसत नव्हतं.आता मात्र जिथे कुठे पडून राहायला असेल त्या ठिकाणाहून तो बिबळ्या निघण्याची वेळ आली होती व तो येण्याची वेळ ही तो आडोशाला जिथे कुठे बसला होता त्या ठिकाणावर अवलंबून होती.


त्या बाईच्या रडण्याचा आवाजही बंद झाला होता आणि चहूकडे संपूर्ण शांतता पसरली होती.मला याच क्षणाची अपेक्षा होती कारण मला बिबळ्याच्या हालचाली कळण्यासाठी श्रवणशक्तीवर अवलंबून राहावं लागत होतं आणि याचसाठी मी कुत्र्याची साखळी वापरली होती.माझ्या अंगाखालचं गवत पूर्ण वाळलेलं होतं व अंधारात कानात तेल घालून मी ऐकत असताना कोणतं तरी जनावर माझ्या पायाजवळ आल्याचं मला ऐकायला आलं.

गवतातून काहीतरी सरपटत,अगदी दबकत येत होतं.मी यावेळी शॉर्टस घातली होती आणि माझा गुडघ्यापर्यंतचा पाय उघडा होता.याच भागाला त्या केसाळ जनावराचा मला स्पर्श झाला.


हा नरभक्षकच असणार आणि तो दबकत माझ्या गळ्यावर पकड घेण्यासाठी पुढे येत असणार.आता पाय रोवण्यासाठी डाव्या खांद्यावर थोडा दाब देणार आणि त्याचं लक्ष विचलित करण्यासाठी मी ट्रीगर दाबणार एवढ्यात एका छोट्या प्राण्याने माझे हात व छाती यांच्यामधल्या पोकळीत उडी मारली.ते एक छोटं मांजराचं पिल्लू होतं.वादळात सापडल्यानंतर प्रत्येक घराचा दरवाजा बंद आहे हे कळल्यावर ते माझ्याकडे उब आणि संरक्षणासाठी आलं होतं.


त्या पिल्लाने माझ्या कोटाच्या आत उब मिळवली आणि त्याने मला दिलेल्या क्षणिक भीतीच्या धक्क्यातून मी सावरतोय तेवढ्यात मला खालच्या शेतांमधून,खालच्या पट्टीतील गुरगुर ऐकू आली आणि तिचा आवाज हळूहळू वाढत जाऊन तिचं रुपांतर एका मोठ्या हिंस्त्र लढाईत झालं.असं युद्ध याआधी मी कधीही अनुभवलं नव्हतं. झालं होतं असं की बिबळ्याने काल जिथे भक्ष्य टाकून दिलं होतं तिथे तो आता आला होता,पण ते तिथे न मिळाल्याने फारशा चांगल्या मूडमध्ये नसतानाच त्या इलाक्याच्या मालकी हक्कावर दावा सांगणारा दुसरा बिबळ्या योगायोगाने नेमका तिथेच उपटला होता.अशा लढाया निसर्गात शक्यतो होत नाहीत.कारण शिकारी जनावरं स्वतःचा इलाका सोडून दुसऱ्याच्या राज्यात अतिक्रमण करत नाहीत. जर एकाच लिंगाची दोन जनावरं क्वचित कधी समोरासमोर आलीच तर ती एकमेकांची ताकद आजमावतात आणि जो कमी ताकदीचा आहे तो माघार घेतो.


आपला हा नरभक्षक जरी वयाने जास्त असला तरी ताकदवान होता आणि तो वावरत असलेल्या पाचशे चौ.मैल टापूत त्याला आजपर्यंत आव्हान मिळालं नसणार.पण इथे भैसवाड्यात मात्र तो आगंतुक - Tresspasser होता आणि आता हे स्वतः होऊन ओढवून घेतलेले युद्ध त्याला लढावंच लागणार होतं.तेच आता तो करत होता !


माझी ही संधी तर आता हुकल्यातच जमा होती.कारण जरी तो या लढाईत जिंकला तरी झालेल्या जखमांमुळे त्याला त्याच्या भक्ष्यामध्ये स्वारस्य उरणार नव्हतं. असंही होण्याची शक्यता होती की तो या लढाईत मारला जाईल... हा मात्र त्याच्या कारकीर्दीचा अनपेक्षित अंत ठरला असता,जेव्हा शासन आणि समस्त जनता यांचे एकत्रित प्रयत्नसुद्धा त्याला मारण्यात गेली आठ वर्षे अयशस्वी ठरले होते ! मॅनइटींग लेपर्ड ऑफ रुद्रप्रयाग मूळ लेखक - जिम कॉर्बेट, अनुवाद - विश्वास भावे


पाचसहा मिनिटं चाललेली ही पहिली 'राऊंड' संपली पण ती अनिर्णित राह्यली असावी.कारण मला अजूनही दोन्ही जनावरांचे आवाज ऐकायला येत होते.दहा-पंधरा मिनिटांच्या मध्यंतरानंतर शंभर ते चारशे यार्ड दूरवर ही लढाई परत एकदा सुरू झाली.ही फेरी छोटी होती पण तेवढीच हिंस्त्र आणि भयानक होती.बहुतेक स्थानिक इलाक्याचा मालक वरचढ ठरत असावा व तो हळूहळू आगंतुकाला 'रिंग'च्या बाहेर हाकलत नेत असावा. त्यानंतर बराच काळ शांततेत गेला.नंतर ते युद्ध डोंगराच्या कडेवर सुरू झालं आणि हळूहळू माझ्या कानांच्या टप्प्याच्याही बाहेर गेलं.अंधाराचे अजूनही पाच तास बाकी होते.पण माझी भैंसवाड्याची मोहीम फसली होती.त्याचप्रमाणे या लढाईत नरभक्षक बिबळ्याचा अंत होईल ही अपेक्षाही फोल ठरली होती.या लढाईत त्याला खूप जखमा झाल्या असणार,पण त्यामुळे त्याची नरमांसाबद्दलची हवस कमी होण्याचं काही कारण नव्हतं.मांजराचं ते पिल्लू रात्रभर शांतपणे झोपलं. जेव्हा पहाटेचा पहिला प्रकाश पूर्वेकडे दिसू लागला तसा मी अंगणात उतरलो,तो मृतदेह तिथून उचलला व जरा लांब एका छपराखाली सावलीत नेऊन ठेवला आणि त्यावर कांबळं पांघरून ठेवलं.मी दरवाजा ठोठावला तेव्हा मुखिया अजून झोपेतच होता.त्याने चहा करतो असं सांगितलं पण त्याला थोडातरी वेळ लागणार हे कळल्यामुळे मी नकार दिला आणि यापुढे नरभक्षक या गावी कधीही येणार नाही असं आश्वासन देऊन मृतदेहाची विल्हेवाट व्यवस्थित लावण्याचं वचन घेऊन मी रुद्रप्रयागच्या वाटेला लागलो.


आपण एखाद्या कामात कितीही वेळा अपयशी ठरलो तरी प्रत्येक अपयशानंतर आपल्याला नव्याने नैराश्य येतंच! मागच्या काही महिन्यात मी कित्येक वेळेला इन्स्पेक्शन बंगल्यातून,'या वेळेला तरी मला यश मिळेल' अशी आशा घेऊन बाहेर पडलो होतो आणि प्रत्येक वेळेला निराश होऊनच परतलो होतो.आणि आजही नव्याने मला निराशेने घेरलंच! माझं अपयश फक्त माझ्याशीच संबंधित असतं तर फारसं काही वाटलं नसतं,पण हा तर इतरांच्या जीवाशी खेळ चालला होता. केवळ दुर्भाग्य... मी माझ्या या सर्व अपयशाला खरोखर दुसरं काही कारणच देऊ शकत नव्हतो... हे दुर्भाग्य सातत्याने माझा पाठपुरावा करत होतं आणि त्याचा एकत्रित परिणाम म्हणजे आता मला वाटायला लागलं होतं की जे काम मी अंगावर घेतलंय ते माझ्याकडून व्हावं ही नियतीची इच्छा नसावी.आसपास कुठेही झाड नसलेल्या ठिकाणीच बिबळ्याने त्या मुलाला टाकावं, त्या स्थानिक बिबळ्याला फिरायला तीस चौ.मैल इतका प्रदेश उपलब्ध असताना बरोबर नरभक्षक ज्या ठिकाणी भक्ष्य शोधायला आला होता त्याच ठिकाणी तो तडमडावा ? याला दुर्दैवाशिवाय दुसरं काय म्हणणार ?


अठरा मैलांचं ते अंतर काल फार वाटलं होतं.पण आज ते जास्तच लांब वाटत होतं आणि डोंगरही जरा जास्तच उंच वाटत होते.वाटेत लागणाऱ्या प्रत्येक गावात लोक माझी वाट पाहत होते पण त्यांना सांगण्यासाठी माझ्याकडे काय होतं तर वाईट बातमी ! पण त्यांची अढळ श्रद्धा होती की या जगात कोणीही 'ठरवून दिलेल्या' वेळच्या आधी मरू शकत नाही. अशा श्रद्धा एखाद्या महाकाय पर्वतालाही हलवू शकतात !


सकाळचा संपूर्ण वेळ अशा नैराश्याला माझी सोबत करू दिल्याबद्दल मला स्वतःची लाज वाटत असतानाच मी शेवटचं गाव सोडलं.या गावात मला घटकाभर बसायला सांगून चहाही दिला गेला व आता परत एकदा ताजातवाना होऊन रुद्रप्रयागचे शेवटचे चार मैल चालायला सुरुवात केली.


 तसं अचानक माझ्या लक्षात आलं की आपण नरभक्षकाच्या ठशांवरूनच चालतो आहोत.


आपल्या मानसिक अवस्थेमुळे आपल्या निरीक्षणशक्तीवर कसा परिणाम होतो बघा!


नरभक्षकाने हीच वाट कित्येक मैल मागेच पकडली असणार,पण साध्याभोळ्या गावकऱ्यांशी जरा गप्पा मारल्यावर आणि त्यांनी दिलेला चहा घेतल्यानंतर जेव्हा मी नैराश्याच्या गर्तेतून बाहेर आलो तेव्हा आता प्रथमच मी हे ठसे बघत होतो.आदल्या रात्रीच्या पावसामुळे इथली लाल माती मऊ झाली होती आणि त्यावर ते माग स्पष्ट दिसत होते.त्यावरून समजत होतं की तो बिबळ्या त्याच्या सामान्य चालीने इथून गेला होता.अर्धा मैल पुढे गेल्यावर त्याने वेग वाढवला होता आणि याच वेगात तो गुलाबराईच्या जवळच्या घळीच्या तोंडाशी गेला होता. नंतर मात्र तो त्या घळीतून निघून गेला होता.


वाघ किंवा बिबळ्या जेव्हा त्यांच्या नेहमीच्या वेगाने चालत असतात तेव्हा मागचं पाऊल पुढच्या पावलावर पडतं आणि अशावेळी फक्त मागच्याच पायाच्या पंजाचे ठसे तुम्हाला पूर्ण दिसू शकतात.पण जर काही कारणामुळे त्यांनी वेग थोडा वाढवला तर मागचं पाऊल पुढच्याच्या थोडं पुढे पडतं व त्यामुळे त्याच्या चारही पावलांचे ठसे दिसू शकतात. मागच्या व पुढच्या पावलाच्या ठशांतील अंतरावरून मार्जारकुळातील जनावरांच्या चालण्याच्या वेगाचा अंदाज आपल्याला बांधता येतो.या वेळेला सकाळचा वाढत जाणारा प्रकाश हे त्याच्या वेग वाढवण्याचं कारण असणार.


मागच्या अनुभवावरून मला या नरभक्षक बिबळ्याच्या चालण्याच्या क्षमतेची कल्पना आलीच होती,पण ती फक्त सावजाच्या शोधात भटकताना ! त्या ठिकाणी मात्र इतकी मजल मारण्यामागे याहीपेक्षा सबळ कारण होतं. त्याला 'ट्रेसपासिंग' चा कायदा तोडल्याबद्दल अद्दल घडवणाऱ्या त्या बिबळ्यांपासून जास्तीत जास्त अंतर दूर जायचं होतं.ही शिक्षा किती भयंकर होती ते पुढे मला प्रत्यक्ष दिसणारच होतं….!! - 




१०/१२/२४

दोन बिबळ्यांचं युद्ध / The war of two leopards

आमचा रुद्रप्रयागपर्यंत पाठलाग केल्यानंतर तो बिबळ्या यात्रामार्गावरून गुलाबराईत व नंतर घळ ओलांडून एका ओबडधोबड पायवाटेवरून होता.ही वाट रुद्रप्रयागच्या पूर्वेकडच्या गावांमध्ये राहणारे लोक हरिद्वारका जाता येताना वापरत असत.


बद्रीनाथ-केदारनाथची यात्रा हंगामी असते आणि हिमालयातली ही दोन ठिकाणं ज्या शिखरांवर आहेत तिथलं बर्फ वितळण्याची वेळ आणि परत हिमवर्षाव सुरू होण्याची वेळ यावर यात्रेचा हंगाम केव्हा सुरू होईल व केव्हा संपेल ते अवलंबून असतं.या दोन्ही मंदिरांच्या प्रमुख पुजाऱ्याने काही दिवसापूर्वीच हा रस्ता यात्रेकरूंना खुला झाल्याचा टेलिग्राम केला होता. देशभरातील लाखो भाविक या टेलिग्रामची आतुरतेने वाट पहात असतात त्यामुळे गेले काही दिवस यात्रेकरूंचे छोटे छोटे गट रुद्रप्रयागमधून जाताना दिसू लागले होते.


गेल्या काही वर्षात नरभक्षकाने बऱ्याच यात्रेकरूंचे बळी याच मार्गावर घेतले होते आणि त्याची सवयच पडून गेली होती की या यात्रा हंगामाच्या काळात यात्रामार्गावरून खालच्या रस्त्याने त्याच्या हद्दीपर्यंत जायचं,तिथून रुद्रप्रयागच्या पूर्वेकडच्या गावांना भेटी देत देत लांब वळसा घालून रुद्रप्रयागच्या वरच्या बाजूला पंधरा मैलांवर परत यात्रामार्गावर यायचं.या लांबलचक फेरीला लागणारा काळ भले थोडा बदलत असेल पण मला त्या बिबळ्याचे माग रुद्रप्रयाग ते गुलाबराईच्या पट्ट्यात सरासरी पाच दिवसांनी दिसायचे.

त्याचमुळे बंगल्यावर परत येत असताना मी रस्ता नीट नजरेखालून घालता येईल अशी जागा शोधली आणि पुढच्या दोन रात्री एका गंजीवर आरामात बसून काढल्या.


हे दोन दिवस आसपासच्या गावातून कोणतीच विशेष बातमी आली नाही.तिसऱ्या दिवशी मी यात्रामार्गावर पुढे सहा मैल जाऊन तिथल्या एखाद्या गावाला बिबळ्याने भेट दिली आहे का ते बघायला गेलो होतो.



अशी १२ मैलांची रपेट करून दुपारी बंगल्यावर आल्यावर उशीरानेच ब्रेकफास्ट करत होतो,तेवढ्यात थकली भागलेली दोन माणसं घाईघाईत तिथे आली आणि बातमी दिली की रुद्रप्रयागच्या आग्नेयेला अठरा मैलांवरच्या भैंसवाडा गावात एका पोराचा बळी गेलाय.इबॉटसनने सुरू केलेली माहिती यंत्रणा चांगलीच काम देत होती.या प्रणालीनुसार नरभक्षकाच्या इलाक्यातील सर्व बळींची बातमी देणाऱ्यांना त्या त्या बातमीनुसार रोख बक्षिसं जाहीर केली होती.बोकडासाठी दोन रूपये यापासून सुरू होत नरबळीसाठी वीस रुपये अशी ती बक्षिसं होती.त्यामुळे आम्हाला या सर्व बातम्या अत्यंत कमी वेळात मिळत.आताच आलेल्या त्या दोन माणसांच्या हातात मी दहा दहा रूपये ठेवले.त्यातल्या एकाने माझ्याबरोबर परत भैंसवाड्यापर्यंत यायचं कबूल केलं पण दुसरा मात्र नुकताच आजारातून उठल्यामुळे लगेच अठरा मैलांची चाल त्याला झेपणार नव्हती म्हणून रुद्रप्रयागमध्येच राहणार होता.त्यांची कथा ऐकत मी ब्रेकफास्ट संपवला आणि बरोबर फक्त रायफल, काही काडतुसं आणि टॉर्च घेऊन दुपारी १ वाजता मी निघालो.बंगल्यासमोरचा रस्ता ओलांडून डोंगर चढायला सुरुवात केल्या केल्याच माझ्या सोबत्याने मला सांगितलं की आपल्याला फार अवघड वाटेने दूरचा पल्ला गाठायचा आहे आणि अंधार पडायच्या आत पोचणं आवश्यक आहे.शक्यतो मी जेवणानंतर लगेच चढ चढून जायला नाखूष असतो पण आज मात्र इलाजच नव्हता.

पहिले काही मैल जवळ जवळ चार हजार फूट चढ चढताना मला त्याच्या वेगाशी जमवून घेणं फार जड गेलं.पण तीन मैलानंतरचा तुलनेनं सपाट भाग आल्यावर मला बळ आलं आणि त्यानंतर मात्र मी पुढे राहून वेग कायम ठेवला. 


रुद्रप्रयागला येता येता त्या दोघांनी वाटेवरच्या गावात ही सर्व बातमी दिली होती आणि ते मला भैसवाड्याला घेऊन जायला निघालेत असंही सांगितलं होतं.मी निश्चित येणार याबद्दल तिळमात्रही शंका गावकऱ्यांना नसावी;कारण वाटेवरच्या प्रत्येक गावात सर्वच्या सर्व गावकरी माझी वाट बघत थांबलेले असायचे.

त्यातल्या काही जणांनी मला शुभेच्छा दिल्या तर काहींनी त्या बिबळ्याला खतम केल्याशिवाय कृपा करून गढवालमधून जाऊ नका अशी विनंती केली.


माझ्या सोबत्याने तर मला सांगितलंच होतं की आपल्याला अठरा मैल चालायचंय आणि जसे आम्ही एका पाठोपाठ एक डोंगर व दऱ्या ओलांडून जात होतो तसं मला समजून चुकलं की माझ्या अपेक्षेपेक्षा ही चाल फारच दमछाक करणारी आहे व तीही मर्यादित वेळात काटायची होती.


सूर्य अस्ताला जात होता तसा अशाच अनंत टेकड्यांपैकी एकीच्या माथ्यावरून मला समोरच्या डोंगराच्या माचीवर आमच्यापासून शंभर यार्ड अंतरावर माणसांचा घोळका दिसला.आम्हाला पाहताच त्यातली काही माणसं अलग झाली आणि डोंगर उतरायला लागली तर बाकीचे आम्हाला भेटायला पुढे आले... त्यात त्या गावचा मुखिया होता.त्याने शुभवर्तमान दिलं की त्याचं भैंसवाडा गाव पलीकडच्या डोंगराच्या माथ्यावर आहे आणि त्याने त्याच्या पोराला पुढे पाठवून चहा तयार ठेवायला सांगितलं आहे.


१४ एप्रिल,१९२६ हा दिवस गढवाली लोकांच्या चांगलाच लक्षात राहील कारण त्या दिवशी 'रूद्रप्रयागच्या नरभक्षक बिबळ्या'ने त्याचा शेवटचा नरबळी घेतला.त्यादिवशी संध्याकाळी भैंसवाडा गावातली एक विधवा स्त्री तिच्या मुलांना-नऊ वर्षाची मुलगी व बारा वर्षाचा मुलगा- आणि शेजारच्या आठ वर्षाच्या मुलाला घेऊन गावापासून जवळच असलेल्या एका झऱ्यावर संध्याकाळच्या जेवणासाठी पाणी भरायला गेली होती.


गढवालमध्ये सर्वत्र आढळणाऱ्या रांगेत घरं असलेल्या इमारतीमधल्या एका घरात ते कुटुंब राहत होतं.ही घरं एकमजली असतात,खालचा आखूड उंचीचा तळमजला सरपण ठेवण्यासाठी किंवा धान्य साठवण्यासाठी वापरला जातो तर वरच्या मजल्यावर बरीच राहती घरं असतात.त्यातल्या मधल्या एका घरात ते कुटुंब राहत होते.चार फूट रुंदीचा लांबलचक व्हरांडा या सर्व घरासमोरून गेला होता.पाच-सहा पायऱ्यांचे छोटे छोटे जिने अंगणातून व्हरांड्यात येत होते आणि प्रत्येक जिना दोन दोन घरं वापरायची.साठ फूट रुंद व तीनशे यार्ड लांब अशा अंगणाभोवती बुटकी भिंत बांधली होती.हे चार जण पाणी भरून येताना शेजारचा मुलगा सर्वात पुढे होता.जेव्हा ते सर्वजण जिन्यापर्यंत आले तेव्हा त्या मुलाला तळमजल्यावरच्या जिन्यामागच्या खोलीत कोणतं तरी जनावर दिसलं पण त्याला तो कुत्रा वाटल्याने,त्याबद्दल तो कुणाकडेच बोलला नाही.त्या मुलाच्या मागे विधवेची मुलगी,

नंतर ती स्वतःआणि सर्वात मागे तिचा बारा वर्षाचा मुलगा होता.

दोन तीन पायऱ्या चढल्यानंतर त्या बाईला मुलाने घेतलेली पितळी घागर पायरीवर पडल्याचा आणि गडगडत खाली गेल्याचा आवाज आला.त्याच्या निष्काळजीपणाबद्दल जरा बडबड करत तिने तिची घागर वर 'व्हरांड्यावर ठेवली आणि तिच्या मुलाने काय नुकसान करून ठेवलंय ते बघायला ती मागे वळली.पायऱ्यांच्या खाली तिला पालथी पडलेली घागर दिसली.खाली उतरून तिने ती उचलली आणि मुलाला शोधत आजूबाजूला बघू लागली.आसपास कुठेही तो न दिसल्याने तिला वाटलं की तो घाबरून कुठेतरी लपून बसलाय... तशी तिने हाका मारायला सुरूवात केली.


भांड्यांचा आवाज आणि लगोलग त्या बाईच्या हाका ऐकून शेजारपाजाऱ्यांचे दरवाजे उघडले आणि त्यांनी काय प्रकार आहे अशी चौकशी करायला सुरुवात केली. कदाचित तो मुलगा तळमजल्यावरच्या एखाद्या खोलीत लपून बसला असल्याची शंकाही बोलून दाखवली गेली. आता अंधार बराच पडल्याने शेजाऱ्याने कंदील पेटवला आणि पायऱ्या उतरून खाली येऊ लागला.एक दोन पायऱ्या उतरल्यावर त्याला ती बाई उभी होती त्या अंगणातल्या एका पांढऱ्या फरशीवर रक्ताचा थेंब दिसला.त्या माणसाचं उत्तेजित आवाजातलं बोलणं ऐकून आसपासचे लोक गोळा झाले आणि अंगणात आले.त्यातच एक म्हातारा होता आणि त्याने त्याच्या मालकाबरोबर बऱ्याच शिकार मोहिमांमध्ये भाग घेतला होता.शेजारच्याकडून कंदील घेऊन त्याने रक्ताचा माग काढत अंगण पार केलं व कंपाऊंडची भिंत ओलांडली. त्या भिंतीमागे एकदम आठ फूट खाली एक रताळ्याचं शेतं होतं... तिथल्या मऊ मातीत त्याला बिबळ्याच्या फाकलेल्या पायाचे ठसे दिसले.


गावातल्या सर्वांनी नरभक्षक बिबळ्याबद्दल ऐकलं होतं पण त्या दिवसापर्यंत हा बिबळ्या त्या गावापासून १० मैलांच्या आत फिरकला नव्हता.त्यामुळे त्या क्षणापर्यंत,त्या मुलाला नरभक्षकाने उचललं असेल अशी शंकासुद्धा कोणाला आली नव्हती.


आता मात्र काय झालंय ते कळताच त्या बाईने धाय मोकलून रडायला सुरुवात केली,तर इतर जण धावत जाऊन घरातून ढोल आणि ताशे घेऊन आले,काहींनी तर बंदूकासुद्धा आणल्या व काही मिनिटातच प्रचंड हलकल्लोळ सुरू झाला.रात्रभर ढोल बडवले जात होते आणि बंदूकांचे बार उडवले जात होते.सकाळी त्या मुलाचा मृतदेह सापडला तसं ताबडतोब दोन माणसांना माझ्याकडे पिटाळलं गेलं होतं.


मुखियाबरोबर गावात शिरत असतानाच मला शोक करणाऱ्या त्या विधवेचं रडणं ऐकू आलं आणि तीच सर्वप्रथम मला सामोरी आली.मला अशी दृश्य पाहण्याचा फारसा अनुभव नव्हता तरीही माझ्या अननुभवी नजरेला देखील समजत होतं ती बाई नुकतीच एका भावनिक वादळातून बाहेर आली आहे आणि आता लागोपाठ पुढचं वादळ येत आहे.मला अशा अवस्थेतल्या माणसांशी कसं वागावं हे कळत नाही त्यामुळे त्या बाईचं म्हणणं सर्वात शेवटी ऐकावं असं मी ठरवलं पण तिला त्या सर्व कथेतली तिची बाजू काहीही करून सांगायचीच होती तेव्हा शेवटी मी तिच्या मनासारखं होऊ दिलं.


जसजशी तिची कथा उलगडत जात होती तसं मला समजलं की तिला गावकऱ्यांबद्दलच्या तक्रारीला वाट करून द्यायची मला 'जर त्याचा बाप आज जिवंत असता तर त्याने धाडस दाखवलं असतं पण गाववाल्यांनी मात्र बिबळ्याचा पाठलाग करून पोरांचा जीव वाचवण्याचा प्रयत्नसुद्धा केला नाही'असं तिचं म्हणणं होतं.मग मात्र मी सांगितलं की तिचं चुकतंय... बिबळ्याच्या दाताची पक्कड त्या मुलाच्या गळ्याभोवती पडताक्षणीच त्याची मान धडावेगळी झाली असणार आणि कोणी कितीही प्रयत्न केला असता तरी काहीच उपयोग झाला नसता.तिथे अंगणात चहा पित उभा असताना आणि माझ्याभोवती जमलेल्या शेकडो माणसांकडे पाहत असताना माझा विश्वासच बसत नव्हता की बिबळ्याच्या आकाराचं जनावर, संध्याकाळच्या प्रकाशात,कोणाच्याही नजरेला न पडता अंगण ओलांडून तळमजल्याच्या खोलीत आलं कसं आणि गावातल्या एकाही कुत्र्याला त्याचा सुगावा कसा लागला नाही? मुलाला घेऊन त्या बिबळ्याने आठ फूट भिंतीवरून खाली ज्या शेतात उडी मारली होती तिथे मी उतरलो व ओढत नेल्याच्या खुणांवरून रताळ्याचं शेत ओलांडून पुढच्या आणखी एका बारा फूट बांधावरून पलीकडच्या शेतात गेलो. या दुसऱ्या शेताच्या कडेला रानटी गुलाब चार फूट उंचीचं झुडुपांचं कुंपण होतं.या ठिकाणी बिबळ्याने मुलाच्या गळ्याभोवतीची पक्कड सोडली होती आणि कुंपणापलीकडे जायला कुठे फट सापडते का याचा शोध घेतला होता.तशी फट न मिळाल्याने त्याने मुलाला पाठीकडच्या भागात पकडून त्याच्यासकट कुंपणापलीकडे उडी मारली होती,आणि पलीकडच्या दहा फूट बांधावरून खाली गेला होता.या तिसऱ्या बांधाच्या पायथ्याला गुरांची वाट होती.या वाटेवरून थोडं अंतर चालत गेल्यावर त्याला गावातल्या माणसांचा आरडाओरडा आणि ढोल वाजवण्याचे आवाज ऐकायला आले होते.त्यामुळे तिथेच त्या मुलाला पायवाटेवर टाकून देऊन तो डोंगर उतरून खाली गेला होता.रात्रभर चालू असलेल्या गोंगाटामुळे तो दुसऱ्यांदा मात्र त्याच्या भक्ष्याकडे पतरला नव्हता.याच ठिकाणी त्या मुलाचा मृतदेह परत आणून ठेवणे आणि जवळपास कुठेतरी लपून वाट बघणे हा एकमेव पर्याय समोर होता. पण इथे माझ्यासमोर दोन अडचणी उभ्या राहिल्या.


शिल्लक राहिलेला उर्वरित भाग पुढील लेखामध्ये…!

८/१२/२४

डॉ.आंबेडकर आणि गांधीजी / Dr.Ambedkar and Gandhiji 

१९३९ ची ऑगस्टची सहा तारीख.गांधीजींना डॉ. आंबेडकरांना भेटण्याची तीव्र इच्छा होती.त्याच दिवशी गांधीजींनी त्यांना निरोप पाठवला.


" तुम्ही तरी भेटायला या किंवा दुसरे दिवशी सकाळी आठला मीच येईन." आंबेडकरांना गांधीजींकडे येणे गैरसोईचे असेल किंवा त्यांना वेळच नसेल तर आपल्याला त्यांच्याकडे येण्यास आनंद वाटेल, असेही गांधीजींनी आवर्जून लिहिले होते.


आंबेडकर सांगलीहून नुकतेच आले होते.तशात त्यांना ताप भरला होता.तरी पण आपण गांधीजींना भेटायला येऊ असा आंबेडकरांनी प्रतिनिरोप पाठवला. दुर्दैवाने आंबेडकरांच्या तापाचा पारा १०६ वर गेल्याने ती भेट पुढे ढकलली गेली.


१४ ऑगस्टला दुपारी दोन वाजता मणिभुवन येथे गांधीना भेटण्याकरता बाबासाहेब गेले.देवरावनाईक,शिवतरकर,

प्रधान,बाबूराव गायकवाड, कद्रेकर वगैरे त्यांचे शिष्यलोक त्यांच्याबरोबर होते. 


डॉ.आंबेडकर दृष्टिपथात आले तेव्हा तिसऱ्या मजल्यावर गांधीजी आपल्या पक्षातील लोकांशी काही बोलत होते.मधून मधून ते फळेही खात होते. डॉक्टर आणि त्यांच्या बरोबरच्या लोकांनी गांधींना नमस्कार केला.व ते एका सतरंजीवर बसले. मुस्लिम व युरोपियन नेत्यांखेरीज इतरांशी ज्या नेहमीच्या पद्धतीने गांधी वागत त्याच पद्धतीने त्यांनी पहिल्यांदा डॉक्टरांच्याकडे दुर्लक्ष केले व ते मिस स्लेडशी बोलत राहिले.

आपल्या बाबतीत गांधींकडूनही थोडासा भेदभाव दाखवला गेला म्हणून डॉक्टरांच्या लोकांनाही क्षणभर वाईट वाटले. लगेच गांधी आंबेडकरांकडे वळले.आंबेडकरांना गांधी पहिल्यांदाच पहात होते.औपचारिक बोलणे झाल्यावर गांधींनी मुख्य गोष्टीकडे आपला मोहरा वळवला.


गांधी : मग काय डॉक्टर?तुम्हाला या बाबतीत काय म्हणायचे आहे?


आंबेडकर :आपण मला आपली मतं ऐकून घेण्यासाठी इथं बोलावले आहे.कृपया आपल्याला काय सांगायचे आहे ते सांगा किंवा आपण मला काही प्रश्न विचारा व मी त्यांची उत्तरे देईन.


गांधी : (आंबेडकरांच्या रोखाने पहात) मला याची पूर्ण कल्पना आहे की तुमच्या मनात माझ्यविषयी आणि काँग्रेसविषयी कटुता आहे.अस्पृश्यतेच्या समस्येवर मी हायस्कूलमध्ये आल्यापासून विचार करीत आहे.त्यावेळी तुमचा जन्मदेखील झाला नव्हता.तुम्हाला कदाचित कल्पना असेल,या प्रश्नाचा काँग्रेसमध्ये अंतर्भाव करण्याकरिता मी अतोनात प्रयत्न केले आहेत.हा निव्वळ सामाजिक आणि धार्मिक प्रश्न असल्याने राजकारणात त्याला थारा देऊ नये,असे अनेक काँग्रेस नेत्यांचे म्हणणे होते. म्हणून त्याला मी विरोध केला.अस्पृश्यांच्या उद्धाराकरिता आत्तापावेतो वीस लाख रुपये काँग्रेसने खर्च केले आहेत.आणि ही खरोखरीच खेदाची गोष्टी आहे की तुमच्यासारखेच लोक मला आणि काँग्रेसला विरोध करीत आहेत.तुम्हाला आपली बाजू मांडायची असेल तर तुम्ही ते खुशाल करू शकता.


आंबेडकर : महात्माजी,माझ्या जन्मापूर्वी अस्पृश्यांविषयी विचार करायला आपण सुरुवात केलीत हे सत्य आहे.बहुतेक वृद्ध आणि वयस्क माणसे वयावर भर देण्याचाच प्रयत्न करतात.हेही खरे आहे की आपल्यामुळे काँग्रेसमध्ये अस्पृश्यांच्या प्रश्नाला मान्यता मिळाली.पण मला आपल्याला असे स्पष्टपणे सांगायचे आहे की निव्वळ औपचारिक मान्यतेखेरीज काँग्रेसने या प्रश्नाविषयी काहीही केलेले नाही.आपण म्हणता काँग्रेसने अस्पृश्योद्धाराकरिता वीस लाख रुपये खर्च केले.मी म्हणतो,तो सगळा पैसा पाण्यात गेला. असे आर्थिक साहाय्य मिळाले असते तर माझ्या लोकांचा दृष्टिकोन आणि त्यांची आर्थिक परिस्थिती यांत मी कमालीचा बदल घडवून आणला असता आणि त्याकरिता आपली माझी भेट यापूर्वीच होणे आवश्यक होते.पण मी तुम्हाला सांगतो की, अस्पृश्यता निवारण्याचे काँग्रेसचे हेतू प्रामाणिक नाहीत.जर खरोखरीच काँग्रेसने यात प्रामाणिकपणे लक्ष घातले असते तर अस्पृश्यतानिवारण हा तिचा एक मुख्य कार्यक्रम राहिला असता.खादीचा वापर हे जसे प्रत्येक काँग्रेस कार्यकर्त्याचे अविभाज्य कर्तव्य होते,

तसेच अस्पृश्यतानिवारणाचे ठरले असते.ज्याच्या घरात कामासाठी हरिजन स्त्री अगर पुरुष नाही,एखादा हरिजन विद्यार्थी नाही, आठवड्यातून एकदा तरी जो अस्पृश्यासमवेत जेवण घेत नाही,अशाला काँग्रेसचे सदस्यत्व नाकारणे हा उत्तम उपाय होता.अशी तुमची एखादी तरी अट आहे काय? फार कशाला?याच प्रश्नाची दुसरी हास्यास्पद बाजू बघायची तर जिल्हा काँग्रेस समितीच अस्पृश्यांच्या मंदिरप्रवेशाला विरोध करीत होती व तिकडे तुम्हा लोकांचे जाणून बुजून दुर्लक्ष होत होते....आपण असेही म्हणू शकाल की, काँग्रेसला संख्याबल पाहिजे आहे,तेव्हा अशी अट लादणे शहाणपणाचे होणार नाही. त्यावर माझे म्हणणे असे की,काँग्रेसला तत्त्वापेक्षाही लोकांची फिकीर अधिक आहे.हा माझा तुमच्यावर आणि काँग्रेसवर आरोप आहे.आपण म्हणता की, ब्रिटिश सरकार आपले मत बदलीत नाही. मलादेखील असेच म्हणावयाचे आहे की,हिंदू आमच्या प्रश्नाबाबत आपले मत बदलावयास तयार नाहीत.आणि जोवर असे आहे तोवर आमचा काँग्रेसवरही विश्वास बसणार नाही आणि हिंदूंवरही. आमचा आमच्या स्वतःच्या हिंमतीवर विश्वास आहे. आम्हाला आदर वाटतो तो देखील आमच्याबद्दलच.मोठे नेते आणि महात्मे यांच्यावर विश्वास ठेवायला आम्ही तयार नाही.मला थोडे स्पष्ट बोलू द्या.इतिहास असे स्पष्ट सांगतो की,तुताऱ्या वाजविणारे महात्मे नुसती धूळच वर उठवतात, जमिनीची पातळी उंचावत नाहीत.काँग्रेसच्या लोकांनी आमच्या चळवळीला का विरोध करावा किंवा मला तरी देशद्रोही का समजावे?"


आंबेडकर थोडेसे अस्वस्थ झाले.त्यांचा चेहरा रागाने लालेलाल झाला.डोळे आग ओकू लागले.क्षणभर ते थांबले.आणि धारदार आवाजात त्यांनी पुढे बोलायला सुरुवात केली.


आंबेडकर : गांधीजी,मला मातृभूमीच नाही.


गांधी : (किंचित भारलेल्या स्वरात त्यांना मध्येच थांबवून) तुम्हाला तुमची मातृभूमी आहे.आणि माझ्याकडे राउंड टेबल कॉन्फरन्सचे जे काही रिपोर्ट्स आले आहेत त्यांवरून हेच सिद्ध झाले आहे की,तुम्ही देशाविषयी कळकळ बाळगणारे एक थोर देशभक्त आहात.


आंबेडकर : आपण म्हणता मला मायभूमी आहे. तरीही मी निक्षून सांगतो की मी खरोखरीच पोरका आहे.मी या देशाला माझा देश म्हणून कुठल्या तोंडाने म्हणू? हा धर्म तरी माझा कसा? कारण इथे आम्हाला कुत्र्यामांजराच्या पलीकडली वागणूक दिली जाते.इथे आम्हाला पाणीदेखील प्यायला बंदी आहे.कोणत्याही स्वतःविषयी अभिमान बाळगणाऱ्या या अस्पृश्याला हा देश आपला आहे असे वाटणार नाही.या देशाविषयी अभिमानही वाटणार नाही.आम्हा लोकांवर इतका अन्याय झालेला आहे आणि इतकी घोर दुःखे आम्ही सहन करीत आहोत की,यातून एखादेवेळी देशद्रोह घडला तर त्याला आम्ही जबाबदार नाही,ही जबाबदारी संपूर्णपणे देशाची आहे.मला कुणी देशद्रोही ठरवले तर त्याची मला खंत वाटत नाही.कारण या देशद्रोहाची मुळेच मुळी या देशात रुजलेली आहेत. आपण म्हणता त्याप्रमाणे खरोखरीच माझ्या हातून काही देशसेवा घडली असेल,देशाला फायद्याचे आणि उपकारक कृत्य घडले असेल तर त्याला कारण माझ्यातले देशभक्तिपर विचार हे नसून माझी सद् सद् विवेकबुद्धी हीच आहे.माझ्या लोकांचे हक्क प्रस्थापित करण्याकरिता कोणतेही देशद्रोही कृत्य करायची माझी तयारी आहे.ते पाप आहे असे मला वाटत नाही.कारण आज युगानयुगे हा अन्याय माझ्या लोकांवर लादलेला आहे.जर माझ्या देशाला माझ्या या कृत्यामधून काही इजा पोहोचली नाही तर त्याचे कारणही माझी सदसद्विवेकबुद्धी हेच म्हणावे लागेल.माझी सदसद्विवेकबुद्धी मला सांगते की,माझ्या देशाला कसलाच धक्का न पोहोचवता आजवर मानवी हक्कांपासून वंचित झालेल्या माझ्या लोकांना त्यांचे हक्क मिळवून दिले पाहिजेत." वातावरण कमालीचे तापले होते. चेहऱ्यावरचे भाव बदलत होते.गांधी थोडे अस्वस्थ झाले.

आंबेडकरांच्या भाषणाला थोडे निराळे वळण लावायचा त्यांचा विचार होता.त्याच वेळी आंबेडकरांनी अत्यंत शांततेने त्यांना एक प्रश्न विचारला.हाच प्रश्न या मुलाखतीचे खरे उद्दिष्ट होता.


आंबेडकर : प्रत्येकाला हे माहीत आहे की,मुस्लिम आणि शीख - सामााजिक,राजकीय व आर्थिकदृष्ट्या अस्पृश्यांहून अधिक पुढारलेले आहेत.राउंड टेबल कॉन्फरन्सच्या पहिल्या बैठकीत मुस्लिमांच्या मागण्यांना राजकीय मान्यता मिळाली व त्यांना राजकीय संरक्षणही मिळाले.याच वेळी दलित समाजाच्या राजकीय हक्कांनाही त्यांनी मान्यता दिली.

दलितांना राजकीय संरक्षण व त्यांचे प्रतिनिधित्वही त्यांनी मान्य केले होते.आम्हाला असे वाटते की दलितांच्या दृष्टीने हे फायद्याचे आहे. आपले या बाबतीत काय मत आहे?


गांधी : हिंदूंपासून दलितांच्या राजकीय वेगळेपणाला माझा तीव्र विरोध आहे.तो एक फार मोठा आत्मघात ठरेल.


आंबेडकर : (उठत) आपल्या स्पष्ट मतप्रदर्शनाबद्दल मी आपला फार आभारी आहे.या प्रश्नाबाबत आम्ही निश्चित कुठे आहोत याची पूर्ण कल्पना आता आम्हाला आली.मी आपली रजा घेतो.आंबेडकरांनी सभागृह सोडले.आपल्या हक्कांविषयीची तीव्र जाणीव त्यांच्या मनामध्ये उफाळून आली होती.ते हक्क मिळवण्याकरिता ते अविरत धडपडणार होते.(गांधी नावाचे महात्मा,संपादन : रॉय किणीकर,साहाय्यक,

अनिल किणीकर,डायमंड पब्लिकेशन,पुणे...)


ही मुलाखत अशाप्रकारे खिन्न - गंभीर वातावरणात पार पडली.गांधी म्हणजे भारतीय राजकारणाचे अध्वर्यू,

हुकूमशाहा,भारतीय लोकांचे अनभिषिक्त सम्राट.असा माणूस आज एकदम बिथरला गेला होता.त्यांच्यातून विजेची एक लहर झपाटून गेली.पुन्हा गांधींशी संवाद करणे म्हणजे कायमची कटुता व न संपणारे दुःख निर्माण करण्यासारखे होते.एका हिंदू पुढाऱ्याची ही हिंमत गांधीजींना आश्चर्यात टाकणारी होती.परंतु विरोधाची धार तीव्र होती. हीच मुलाखत गांधी - आंबेडकरवादाची नांदी ठरली.


आणखी एक आश्चर्याची गोष्ट म्हणजे गांधींना वाटत होते की आंबेडकर हे हरिजन नसून ब्राह्मण आहेत. ते इंग्लंडला जाईपर्यंत त्यांची ही समजूत कायम होती. - अनुवाद- रॉय किणीकर


सत्याचे प्रयोग...


जरी देव्हाऱ्यातून,उठून गेले देव 

मोडला जरी,देव्हारा जपुनी ठेव । 

कापूर जळू दे,जळणे त्याचे काम 

कोसळली पृथ्वी,म्हणताना 'हे राम'।।


का कुणी पाहिले,सत्याचे ते रूप 

कुणी सांगितले रे,असत्य म्हणजे पाप। 

सत्यार्थ जन्मते,असत्य व्यभिचाराचे 

फुलतात अग्निकण,त्यातून संघर्षाचे ।।


महान जीवन गांधीजींचे 

अवतरले दुसरे सिद्धार्थ ।

 सत्य,अहिंसा अन् शांतीचे 

राजघाट हे प्रयागतीर्थ ।।


चरखा,चष्मा,चपला,चटई 

का बापूजींची हीच कमाई। 

चमत्कार तो मिठाचा मोठा 

तीन गोळ्या... मृत्यु झाला खोटा ॥


इतिहास घडविला,त्यांची झाली कीर्ति 

इतिहास तुडविला,त्यांचीदेखील कीर्ति । 

गहिरवला अश्रू,कीर्तिस्तंभावरला 

पिंडास कावळा,अजून नाही शिवला ॥


रॉय किणीकर..