* विजय गायकवाड | Vijay Gaikawad

live

नमस्कार आपले स्वागत आहे. 'सगळे जण तुम्हाला शोधत येतील.आनंदाने तुडुंब भरलेली माणसे सर्वांनाच आवडतात! पण ते तुम्हाला दुःखी,उदास अशा अवस्थेत पाहू शकत नाहीत! तेव्हा आनंदी-हसतमुख रहा आणि मित्रांचा सहवास वाढवा! जर तुम्ही दुःखी राहिलात तर मात्र सगळे जण तुम्हाला सोडून जातील. जीवनातील आनंद-प्रसन्नता भरभरून वाटा! पण एकटे दुःखी रहाल, तर त्या दुःखातच बुडून जाल !' सॉलिट्यूड, ईला व्हीलर विलकॉक्स जगण्याच्या तयारीसाठी नव्हे तर,जगण्यासाठी माणूस जन्माला आला आहे,असं 'बोरिक पास्तरनाक' यांनी म्हटलेलं आहे.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! वाचन हे आहाराहून जास्त महत्त्वाचे असते.जिम र्‍होम यांनी अँथोनी रॉबीन्स यांना शिकवले होते की 'एक वेळ रोजचे जेवण चुकव,पण वाचन अजिबात चुकवू नको.' याप्रमाणे मी अखंडपणे वाचत आहे. माणसांपासून माणसांपर्यंत जाण्याचा,प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाण्याचा जीवनाचा राजमार्ग पुस्तकातून जातो. कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात. पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये. म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,कवी सचिन शिंदे,संतोष शेळके,अनिल फारणे,सहित प्रकाशन,डॉ.रवींद्र श्रावस्ती,डॉ.सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,संजय बापट,मनोहर सुर्वे,विनायक पाटील,संतोष पाटील,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, मेनन पिस्टन रिंग मधील सहकारी मित्र शेखर सुर्यवंशी..। पुस्तकातील घटना प्रसंग हे मी लिखित स्वरूपात सध्या व्हाट्सअप वरती टाकत असतो.हे सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी,पुस्तके देणारी लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत. ... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ. मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. विजय कृष्णात गायकवाड

६/२/२५

कार्याचा लेखाजोखा / ACCOUNT OF WORK 

नवीन वर्षाचा पहिला महिना... 


एक वर्ष आणखी सरलं...  


जन्मल्यापासूनचा आयुष्य पट कधी कधी आपोआप समोर ठाकतो. मनात असो का नसो....! 


आयुष्यात केलेल्या भल्या बुऱ्या गोष्टी,नाठाळपणा, अवखळपणा,अजाणतेपणे केलेल्या अनेक चुका आठवतात....


कधी हसू येतं... कधी रडायला होतं... ! 


सारं काही पुस्तकात मांडलंय... 


पण पुस्तकाने तरी माझ्या किती गोष्टी झेलायच्या आणि सहन करायच्या ? 


मला आठवतं, मी लहान होतो.... 

अंगात भरपूर "कळा" होत्या, पण एकही "कला" नाही...! 


शाळेत गॅदरिंग असायचं... 


माझ्या शाळेतली मुलं मुली याप्रसंगी विविध गुणांचे प्रदर्शन करायची... 


यावेळी गॅदरिंग चा फायदा घेऊन मी सुद्धा "गुन" उधळायचो...! 


गॅदरिंग च्या शेवटच्या दिवशी,बक्षीस समारंभ असायचा..... स्टेजवर खुर्च्या लावण्याची तयारी सुरू असायची... त्यात प्रमुख वक्ते,कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रमुख पाहुणे यांच्या खुर्च्या असायच्या. 


जमिनीवर उकिडवे बसावे.... 

तसा मी चप्पल घालून या खुर्च्यांवर बसायचो...आणि काम करणाऱ्या बिचाऱ्या माझ्याच वयाच्या मुलांच्या चुका काढत राहायचो. 


एकदा मुख्याध्यापकांनी हे पाहिलं,काही न बोलता त्यांनी हातातल्या पट्टीने मला फोडून काढलं. 


तरीही, स्स हा.... स्स ... म्हणत मी सरांना विचारलं होतं,सर नुस्ता खुर्चीत बसलो होतो,इतकं का मारताय ? 


'नालायका, तुला माहित आहे का ? या खुर्च्या कोणाच्या आहेत ?' 


'हा सर,आपल्या शाळेच्या आहेत,म्हणून तर बसलो ना...' 'कळली तुझी अक्कल बावळटा,आपले आजचे प्रमुख वक्ते, कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष, आणि आपल्या महाराष्ट्राचे वैभव जे आजचे आपले प्रमुख पाहुणे आहेत...या खुर्च्या त्यांच्यासाठी मांडल्या आहेत...'


'हा मं... ते यायच्या आधी मी बसलो तं काय झालं मं...' मी तक्रारीच्या सुरात पायाच्या अंगठ्याने जमीन टोकरत बोललो.... 


सोबत माझं स्स...हा... चालूच होतं. 


त्यांना माझा धीटपणा आवडला ? 

की माझी निरागसता ?  

माहित नाही .... 


परंतु त्यांच्या चेहऱ्यावरचा राग निवळला... 


ते मला म्हणाले बाळा,'प्रत्येक खुर्ची ही खुर्चीच असते... पण त्यावर कोण बसतो;यावर त्या खुर्चीची किंमत ठरते.'


'खुडचीची किंमत काय आसंल सर...?' माझा भाबडा मध्यमवर्गीय प्रश्न. 


आभाळाकडे पहात ते म्हणाले,'आपलं आयुष्य जो दुसऱ्यासाठी खर्ची घालतो,त्या प्रत्येकाला अशा खुर्च्या सन्मानाने मिळतात बाळा... याची किंमत पैशात नाही रे...'


'मला पण पायजे अशी खुडची' जेवताना मीठ मागावं, तितक्या सहजतेने सरांना मी बोलून गेलो. 


'तुझे एकूण गुण पाहता,हि खुर्ची तुझ्या नशिबात नाही... या खुर्चीत तुला बसायचं असेल तर अंगात काहीतरी पात्रता निर्माण कर ... लायक हो... नालायका...!'


हे शब्द आहेत साताऱ्यामधल्या माझ्या शाळेचे,माझ्या वेळेचे मुख्याध्यापक सर यांचे...!


माझ्या याच शाळेने आणि माजी विद्यार्थ्यांनी मला पाच वर्षांपूर्वी जीवन गौरव पुरस्कार दिला.... 


शाळा तीच... प्रांगण तेच ...स्टेज तेच... 


मी बदललो होतो... ! 


मुख्याध्यापक सेवानिवृत्त झाले होते. 


मी अट घातली होती,कार्यक्रमाला आदरणीय मुख्याध्यापक सरच हवेत... 


स्टेजवर मी सन्माननीय म्हणून लिहिलेल्या खुर्चीवर आखडून बसलो होतो...पण यावेळी पाय खुर्चीवर नाही,जमिनीवर होते...


संयोजकांना मी विनंती केली होती,जे काही मला द्याल ते मुख्याध्यापक सरांच्या हातूनच मला द्यावं.... ! 


सन्मानचिन्ह आणि मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप होतं. 


माझ्या विनंतीनुसार,मुख्याध्यापक सरांनी मला ते मानपत्र दिलं... 


सरांच्या पायावर डोकं ठेवून मी त्यांना म्हणालो, 'सर मला ओळखलं का ?'


त्यांनी चष्मा वर खाली करून मला ओळखण्याचा प्रयत्न केला... पण नाही...! 


मी सर्वसामान्य माणूस.... 


किती विद्यार्थी त्यांच्या हातून गेले असतील... ? 


ते मला इतक्या वर्षानंतर कसं ओळखतील ? आणि मी तरी असे काय दिवे लावले होते त्यांनी मला ओळखायला ? देवाला तरी सगळ्याच लोकांचे चेहरे कुठे आठवत असतात... ???


मग मी त्यांना शाळेतल्या दोन-चार आठवणी सांगितल्या... 


आत्ता सरांना आठवले....


'अरे गधड्या.... नालायका... मूर्खा... बावळटा... तुच आहेस होय तो DOCTOR FOR BEGGARS ?'


मी खाली मान घालून हो म्हणालो...! 


यावर अत्यानंदाने त्यांनी मला मिठी मारली...'


यानंतर सरांचे वृद्ध डोळे चकमक चकमक .... चकाकत होते...! कष्टाने वाढवलेल्या,जगवलेल्या झाडाला पहिलं फळ येतं,तेव्हा शेतकरी ज्या कौतुकाने त्या झाडाकडे बघेल...त्याच नजरेने सर माझ्याकडे बघत होते. 


'मी तुझ्या कामात काय मदत करू ? मी तुला आता काय देऊ ?  


ती वृद्ध माऊली,इकडे तिकडे पहात,जुन्या सफारीच्या खिशात भांबावून उगीचच इकडे तिकडे हात घालत बोलली...'


जुन्या सफारीची विण उसवली होती... 

हे माझ्या नजरेतून सुटलं नाही...


मी खिशात जाणारे त्यांचे दोन्ही हात पकडून बोललो... 'सर,काही द्यायचं असेल तर हातावर एक छडी द्या... माझी तितकीच पात्रता आणि लायकी आहे सर....' 


यावर लहान मुलासारखे ओठ मुडपून त्यांनी हसण्याचा प्रयत्न केला... 


तो हसण्याचा प्रयत्न होता की रडू आवरण्याचा... ? मला कळलं नाही... ! 


ते म्हणाले... 'गधड्या.... नालायका... मला वाटलं आता तरी तू सुधारला असशील...पण तू अजून सुधारला नाहीस रे....' असं म्हणत माझ्या नावाच्या खुर्चीवर सरांनी मला हाताला धरून बसवलं....! 


आता ओठ मुडपून,हसणं आवरण्याची आणि रडणं सावरण्याची माझी कसरत सुरू झाली...


जाताना कानात म्हणाले,'आता या खुर्चीवर मांडी घालून किंवा पाय वर ठेवून बसलास तरी चालेल,मी तुला ओरडणार नाही... हि खुर्ची तु कमावली आहेस बाळा...' 


यानंतर ते स्टेजच्या मागे निघून गेले....


यानंतर माझ्या कौतुकाची भाषणांवर भाषणे झाली.... 


मला यातलं काहीही ऐकू आलं नाही.... 


मला फक्त ऐकू आले.... ते माझ्या मास्तरचे हुंदके... !!!


---------+++++++++-----------++++++++


साताऱ्यात त्यावेळी खूप साहित्य संमेलनं व्हायची... 


आम्ही दोन चार मित्र या संमेलनाला जायचो... 


व्हीआयपी लोकांसाठी तिथे एक कॉर्नर केला होता... त्यावेळी एसी नव्हते,पण कुलर होते... 


वर्गात उकडतंय,म्हणून या कुलरचं वारं घेण्यासाठी आम्ही येत होतो,अन्यथा साहित्यातलं आम्हाला काय ढेकळं कळतंय... ? 


निर्लज्जपणे आम्ही खुर्च्यांवर पाय ठेवून कुलरचं वारं घेत बसायचो ... 


संयोजक मंडळी येऊन मग आम्हाला कुत्रं हाकलल्यागत हाकलून द्यायचे... 


------++++++---+++++------+++--+++


एखाद्या कार्यक्रमात पहिल्या तीन रांगा व्हीआयपी साठी असतात...आम्ही पोरं पहिल्या रांगेमध्ये बसायचो... इथूनही संयोजक आम्हाला कानाला धरून उठवायचे..! 


मागून शब्द कानावर पडायचे... लायकी आहे का तुमची पहिल्या रांगेत बसायची ? 


या सर्व जुन्या बाबी मी अजून विसरलो नाही. 


आज किती वेळा मी प्रमुख पाहुणा झालो असेन, अध्यक्ष झालो असेन,वक्ता झालो असेन... पण त्या खुर्चीत बसलो की अजूनही मला भीती वाटते... 


मुख्याध्यापक सर येतील पट्टी घेऊन.... 


आज कित्येक मोठ्या मोठ्या साहित्यिकांमध्ये,अनेक मोठ्या मोठ्या लोकांमध्ये उठबस होते... व्हीआयपी लाउंज मध्ये बसवलं जातं...पण आजही भीती वाटते आपल्याला इथून कोणी उठ म्हटलं तर... ? 


हाताला धरून आज पहिल्या रांगेमध्ये बसवलं जातं.... तरीही माझ्या नजरेत धाकधूक असते...आपल्याला इथून कोणी उठवलं तर... ?


पूर्वी एखाद्या कार्यक्रमांमध्ये माईक चालू असायचा.... 


कोणाचं लक्ष नाही असं पाहून,मी माईक हातात घ्यायचो... उं... ऐं ... खर्र... खिस्स.... फीस्स... असे आवाज काढून बघायचो... माइक वर आपला आवाज कसा येतो ते बघायचो... मीच गालातल्या गालात हसायचो. तेवढ्यात पाठीमागून शाळेतल्या शिक्षिका यायच्या,आणि पट्टीचे फटके मारून स्टेजवरून खाली उतरवायच्या.मागील दहा वर्षात किमान पाच हजार व्याख्यानासाठी उभा राहिलो असेन....


मात्र अजूनही माईक पुढे गेलो,तरी भीती वाटते.... मागून कोणी तरी येईल आणि पट्टीचा फटका मारेल.... !


त्यावेळी केलेल्या चुकांची अजूनही भीती वाटते... 


मी केलेल्या चुका या "गुन्हा" नव्हत्या... 

पण त्या चुकाच होत्या... ! हे आज कळतंय. 


आमचे एक गुरुजी होते... ते म्हणायचे, 'आपल्याला आपली चूक समजली म्हणजे समजा निम्मी सुधारणा झाली... !' 


'आपल्याला आनंदी आणि सुखी राहायचं असेल तर कायम माघार घ्यायची,कुणाशी वाद घालायचा नाही...' हे खुद्द ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरी मध्ये सांगितलं आहे. 


माझ्यासारख्या रेड्याला हे काय कळणार ? पण ज्ञानेश्वर माऊली होऊन माझ्या शिक्षकांनी मला हे सांगितलं. 


'बाळा कुणाच्या कर्जात राहू नकोस पण आयुष्यभर एखाद्याच्या ऋणात रहा...' हे सांगणारी माणसं,आता देवा घरी निघून गेली.... 


देवाचीच माणसं हि.... तिथेच जाणार... !


मी अजूनही शोधतोय यांना... 


तुमच्या आयुष्यात जर अशी माणसं असतील,तर हृदयाच्या तळ कप्प्यात आत्ताच यांना सांभाळून ठेवा, पुन्हा ते भेटत नाहीत माऊली !


वो फिर नही आते... 


वो... फिर नही आ....ते...  !!!


गतकाळात केलेल्या या चुका पुसायची मला जरी संधी मिळाली तरी मी त्या पुसणार नाही. 


कारण या चुकांनीच मला बरंच काही शिकवलं...


"मान" म्हणजे काय हे समजून घ्यायचं असेल तर आधी एकदा अपमानाची चव घ्यावीच लागते...


पोट भरल्यानंतर जी "तृप्तता" येते ती अनुभवण्यासाठी, कधीतरी उपाशी राहण्याची कळ सोसावीच लागते...


आपण "बरोबर" आहोत हे समजण्यासाठी आधी खूप चुका कराव्या लागतात...


जिथं अंधाराचं अस्तित्व असतं, तिथंच प्रकाशाला किंमत मिळते...


पौर्णिमेच्या चंद्राचं कौतुक सर्वांनाच असतं... पण हा चंद्र पाहायला सुद्धा रात्र काळीकुट्टच असावी लागते... ! 


त्याच्या प्रकाशाला काळ्या मध्यरात्रीचीच किनार लाभलेली असते... नाहीतर दिवसा दिसणाऱ्या चंद्राकडे कोण पाहतं ? 


आपल्या आयुष्यात आलेल्या काळ्या रात्री आपणही अशाच जपून ठेवायच्या... 


आता थोड्याच वेळात उजाडणार आहे;हे स्वतःलाच सांगत राहायचं... 

अमावस्या काय कायमची नसते... 

बस्स पंधराच दिवसात माझ्याही आयुष्यात पौर्णिमा येणार आहे,हे स्वतःला बजावत राहायचं...! 


आणि पुढे पुढे चालत राहायचं... !!!


नवीन वर्षाच्या सर्वांना शुभेच्छा देऊन,या महिन्यात केलेले काम थोडक्यात सांगतो. 


१. ज्यांना कोणाचाही आधार नाही अशा पाच ताई आपल्या मुलाबाळांसह भीक मागायच्या. या पाचही जणींना कामाला तयार केलं आहे.त्यांना नवीन हातगाड्या घेऊन दिल्या आहेत.२६ जानेवारी या पवित्र दिवसापासून त्यांनी काम सुरू करून भिकेपासून स्वातंत्र्य मिळवले आहे. 


भिक्षेकरी म्हणून नाही तर गावकरी म्हणून जगायला सुरुवात केली आहे... भारताचे नागरिक आणि प्रजा म्हणून त्यांना आता ओळख मिळेल... माझ्यासाठी खऱ्या अर्थाने यावेळचा २६ जानेवारी प्रजासत्ताक झाला. ! 


२. रस्त्यावर पडलेली एक ताई,हॉस्पिटलमध्ये उपचार करून हिला बरं केलं.काम सुरू कर भीक मागणं सोड अशी गळ घातली.तिने मान्य केलं.तिची एकूण प्रकृती आणि अशक्तपणा पाहता हातगाडी ढकलणे तिला शक्य नव्हते.हॉस्पिटलमध्ये तिच्याशी बोलत असताना, बाबागाडीमध्ये बाळाला बसवून एक ताई चाललेल्या मला दिसल्या.हिच आयडिया मी उचलून धरली,विक्री करायचे साहित्य बाबा गाडीत ठेवून विक्री करायची, बाबागाडी ढकलायला सुद्धा सोपी...


समाजात आवाहन केले,आपणास गरज नसेल तर, तुम्ही वापरत नसाल तर मला बाबागाडी द्या... 


बाबागाडीचा हट्ट लहानपणी कधी केला नाही,आज मोठेपणी मात्र मी बाबागाडी मागितली...


"लहान बाळाचा हट्ट" समजून,समाजाने माझा हा हट्ट सुध्दा पुरा केला. 


हि ताई कॅम्प परिसरात बाबा गाडीत साहित्य ठेवून बऱ्याच वस्तूंची विक्री करते. 


बाबागाडीचा उपयोग बाळाला फक्त "फिरवण्यासाठीच" होतो असं नाही... "फिरलेलं" आयुष्य पुन्हा "सरळ" करण्यासाठी सुद्धा होतो... ! 


३. मागे एकदा एक परिचित भेटले.मला म्हणाले, 'घरात काही जुन्या चपला आहेत,तुला देऊ का ?' 


मी द्या म्हणालो 


त्यांच्या सोबतीने त्यांच्या इतर मित्रांनी सुद्धा घरातल्या नको असलेल्या चपला आणून दिल्या. 


आठ दहा पोत्यांमध्ये भरलेल्या या चपलांच्या आता जोड्या कशा जुळवायच्या ? 


चौथी की पाचवीच्या परीक्षेत जोड्या जुळवा असा एक प्रश्न असायचा,माझ्या तो आवडीचा. 


आज डॉक्टर झाल्यानंतर सुद्धा जोड्या जुळवा हाच प्रश्न समोर पुन्हा एकदा आला. 


मग आमच्या काही भिक्षेकरी मंडळींना हाताशी घेतलं, साधारण निर्जन स्थळी जाऊन सगळी पोती खाली केली... आणि आम्ही सगळेजण लागलो जोड्या जुळवायला... ! 


काही चपला आमच्या लोकांना वापरायला दिल्या, उर्वरित चपला जुन्या बाजारात आमच्या लोकांना विकायला दिल्या. 


"चपलीची पण किंमत नाही" असा आपल्याकडे एक शब्द प्रयोग आहे.पण याच चपला विकून,आमच्यातले अनेक लोक भीक मागणे सोडून प्रतिष्ठा मिळवत आहेत. चप्पलला किंमत असेल - नसेल; पण आमच्या लोकांची किंमत वाढवली ती या पायताणांनीच...! 


माझ्या दृष्टीने या चपलांची किंमत अनमोल आहे...! 


४. दोन लोकांना ओळखीच्या माध्यमातून स्वच्छता सेवक आणि सिक्युरिटी गार्ड म्हणून नोकरीस लावून दिले आहे. 


५.रस्त्यावर ते जिथे बसतात रस्त्यावर दवाखाना थाटून वैद्यकीय सेवा नेहमीप्रमाणे सुरू आहे,हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करणे सुरू आहे,डोळ्यांचे ऑपरेशन करणे, चष्मे देणे रक्ताच्या विविध तपासण्या करणे, कानाची तपासणी करून ऐकायचे मशीन देणे इत्यादी इत्यादी वैद्यकीय बाबी सुरू आहेत. 


६. हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असणाऱ्या गरीब रुग्णांना रोजच्या रोज जेवण देत आहोत.पूर्वी भीक मागणाऱ्या लोकांची एक टीम तयार करून त्यांच्याकडून सार्वजनिक भाग स्वच्छ करून घेत आहोत त्या बदल्यात त्यांना कोरडा शिधा देत आहोत,साबण टूथपेस्ट, टूथ ब्रश या सुद्धा गोष्टी पुरवत आहोत. 


(सध्या भीक मागणाऱ्या अनेक लोकांना भीक मागणे सोडायचे आहे परंतु अंगात कोणतेही कौशल्य नाही. अशांसाठी एखादे प्रशिक्षण केंद्र तयार करून,त्यांना प्रशिक्षण देऊन,त्यांच्याकडून काही वस्तू तयार करून घेऊन त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध करून द्यायची; असे स्वप्न गेल्या सहा वर्षांपासून पाहत आहे,अनेक कारणांमुळे ते सत्यात येऊ शकले नाही.परंतु येत्या महिन्याभरात असे प्रशिक्षण केंद्र उभे करण्याची पूर्वतयारी सुरू आहे.याबाबत सविस्तर माहिती काही दिवसात देणार आहे)


असो..


आपण ज्या समाजात राहतो तिथे वय वाढलेल्या लोकांना ज्येष्ठ म्हटलं जातं...


मी ज्या समाजासाठी काम करतो, तिथे वय वाढलेल्या लोकांना म्हातारडा - म्हातारडी थेरडा - थेरडी म्हटलं जातं...आपण ज्या समाजात राहतो तिथे कुणी गेलं तर, ते देवा घरी गेले,कैलासवासी झालेअसे शब्दप्रयोग केले जातात.आमच्याकडचं कोणी गेलं तर म्हणतात... त्ये मेलं... खपलं


वरील सर्व शब्द;अर्थ जरी एकच सांगत असले, तरीसुद्धा शब्दाशब्दांमध्ये प्रचंड अंतर आहे. 


हे अंतर आहे...हा फरक आहे फक्त प्रतिष्ठेचा...! 


हे जे काम आपल्या सर्वांच्या साथीनं सुरू आहे,ते फक्त या शब्दातले अंतर कमी करण्यासाठी... 


शब्दातला फरक मिटवण्यासाठी...


"प्रतिष्ठा" नावाचा "गंध" त्यांच्या कपाळी लावण्यासाठी... !!! 


जानेवारी महिन्याचा लेखाजोखा आपल्या सर्वांच्या पायाशी सविनय सादर... !


३१ जानेवारी २०२५


डॉ.अभिजीत सोनवणे,डॉक्टर फॉर बेगर्स


४/२/२५

स्वतःची सुटका करा.Free yourself.

आपण हाती घेतलेल्या प्रकल्पासाठी जर आपल्याला आपलं योगदान द्यायचं असलं तर त्यावर विचार करण्यासाठी विनाव्यत्यय सर्वोच्च योगदान आणि कोणत्याही मानसिक दडपणाशिवायचा एकांतवास आणि अवकाश आपल्याला मिळायला हवा हे त्यांना पूर्णपणे माहीत होतं.इथे आपल्याला सर आयझॅक न्यूटन यांचं उदाहरण घेता येईल.त्यांनी सातत्याने दोन वर्षं ज्या सिद्धांतावर काम केलं,त्यातूनच पुढे 


'प्रिन्सिपिया मॅथमॅटिका'चं सुप्रसिद्ध लेखन आकाराला आलं.पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण आणि गतीचे तीन नियम यांच्या संबंधीची महत्त्वपूर्ण माहिती संपूर्ण एकांतवासाच्या त्यांच्या कालावधीतूनच लोकांसमोर आली.याच माहितीतून पुढील तीनशे वर्षांमध्ये जबरदस्त अशा शास्त्रीय विचारसरणीचा आधार अवघ्या जगाला मिळाला.


रिचर्ड एस.वेस्टफॉल यांनी लिहिलं आहे :ज्या काळात न्यूटन साऱ्या जगाच्या कौतुकाचा विषय झालेले होते, त्या वेळी त्यांना विचारलं गेलं होतं की,"गुरुत्वाकर्षणाचा शोध त्यांनी कसा लावला?" त्यांचं उत्तर होतं,"यावर आणि फक्त यावरच सातत्याने विचार करून." ज्या गोष्टीवर त्यांनी लक्ष केंद्रित केलं होतं,त्यावरच ते अविरतपणे विचार करत होते.ज्याचं वर्णन अनन्यसाधारण पद्धतीने असं करता येईल.किंबहुना 'जवळ जवळ अनन्यसाधारणपणे' असंही म्हणता येईल. जरा वेगळ्या शब्दांमध्ये हे मांडायचं म्हटलं,तर 'सखोल विचारप्रक्रियेसाठी न्यूटन यांनी स्वतःसाठी 'अवकाश' निर्माण केला,आणि या विनाव्यत्यय कालावधीने त्यांना या विश्वाचे महत्त्वपूर्ण गुणधर्म शोधून काढण्याची क्षमता दिली."


न्यूटन यांच्या कामाच्या पद्धतीने प्रभावित होऊन मी पण त्यांच्या इतक्या तीव्रपणे नाही,तरीही त्यांचा आदर्श समोर ठेवून जास्तीत जास्त एकाग्रतेने आणि स्वतःसाठी वेगळा वेळ राखून ठेवत हे पुस्तक लिहायचं ठरवलं. दिवसाचे आठ तास मी फक्त लेखन करायचा निर्धार केला.पहाटे ५:०० वाजल्यापासून ते दुपारी १:०० वाजेपर्यंतचा वेळ माझ्या लेखनासाठी असणार होता.


आठवड्यातले पाच दिवस मी लेखनाला देणार होतो. त्यासाठी मी काही नियम ठरवले. ई-मेल्स, फोन, कुणालाही अपॉईंटमेंट देणं आणि कुठल्याही प्रकारचा व्यत्यय,या गोष्टींना या आठ तासांमध्ये पूर्णपणे मज्जाव करणं माझ्यासाठी गरजेचं होतं.मी जे ठरवतो,तसं दर वेळी घडतंच असं नाही,पण तरीही या स्वतःवर लादून घेतलेल्या शिस्तीचा बराच फायदा झाला.ई-मेल्स पाठवणाऱ्यांसाठी मी त्यात एक सेटिंग करून घेतलं होतं,

ज्याच्यामुळे माझं पुस्तक पूर्ण होईपर्यंत मी 'मॉन्क मोड'मध्ये असल्याचं त्यांना कळणार होतं! याचा थोडक्यात अर्थ असा की,त्या काळात मी स्वतःवर घालून घेतलेली जास्त प्रमाणातली शिस्त,मनाची एकाग्रता,निर्मितीक्षमता,काही एक ध्येय मनाशी ठरवणं, या गोष्टी अधिक महत्त्वाच्या होत्या.या पद्धतीने मी वागायचं ठरवलं,त्याचा मला किती मोठ्या प्रमाणावर फायदा झाला,त्याचं शब्दात वर्णन करणंसुद्धा अशक्य आहे.मला हवं होतं त्या प्रकारचं स्वातंत्र्य या काळाने मला भरभरून दिलं.सखोल चिंतन आणि मनन, विचारप्रक्रिया आणि लेखन यांच्यासाठी माझा असा जो अवधी मी तयार केला होता,त्यामुळे माझं पुस्तक तर खूपच झपाट्याने लिहून झालं,पण माझा उरलेला वेळ मी कसा घालवतो यावरही मला नियंत्रण ठेवणं जमायला लागलं.


हे खरं तर सगळ्यांच्याच बाबतीत घडतं,पण तुमच्या व्यस्त दिनक्रमातून तुम्ही शेवटचा स्वतःसाठी असा वेळ कधी बाजूला काढून ठेवला होता? स्वस्थ बसून फक्त विचार करण्यासाठी? सकाळी कामावर जाता जाता दिवसभरात तुम्हाला काय काय करायचंय,त्याची नोंद करून ठेवणं किंवा तुम्ही हजर असलेल्या मीटिंगमध्येच काही वेळ तुमचं मन भरकटून ते दुसऱ्या प्रकल्पात अडकणं या गोष्टी मला इथे अभिप्रेत नाहीयेत.मी तुम्हाला विचारतोय,ते विनाव्यत्यय मोकळा वेळ आणि तुमचं चित्त विचलित होणार नाही,तुम्ही फक्त विचार आणि विचारच करू शकाल,अशा फक्त तुमच्या असलेल्या अवधीविषयी !


मला माहीत आहे की सध्याच्या आपल्या या यंत्रयुगात, अति जास्त प्रमाणात चलनवलन सुरू असलेल्या जगात हे अर्थातच खूप कठीण आहे.एकदा ट्विटरच्या एका प्रमुख व्यक्तीने मला विचारलं होतं,"कंटाळा येणं म्हणजे काय? या गोष्टीची तुम्हाला अलिकडे आठवण तरी येते का? कारण आता कंटाळा येण्याइतका वेळच आपल्याजवळ उरलेला नाहीये." 


खरंय त्याचं म्हणणं.अगदी काही वर्षांपूर्वी असं चित्र बघायला मिळत होतं.तुमचं विमान ठरलेल्या वेळेपेक्षा उशिरा निघणार असेल,किंवा एखाद्या डॉक्टरच्या प्रतीक्षा कक्षात तुम्ही तुमचा नंबर येण्याची वाट बघत असाल, तर इथे तिथे बघत राहणं किंवा खूप कंटाळा येणं या गोष्टी आपोआपच घडत असत.आज चित्र बदललं आहे. विमानतळावर आपलं विमान सुटण्याच्या प्रतीक्षेत असलेली किंवा एखाद्या प्रतीक्षालयात ताटकळत बसलेली प्रत्येक व्यक्ती स्वतःचा फोन,लॅपटॉप किंवा तशाच प्रकारच्या एखाद्या गोष्टीत रमून गेलेली दिसते. कारण अर्थातच कुणालाच कंटाळून नुसतं बसायला आवडत नाही.पण कंटाळा येऊ नये म्हणून आपण ज्या दुसऱ्या कुठल्यातरी गोष्टी करण्याच्या मोहात पडतो, त्यामुळे सखोल विचार करून एखादी गोष्ट करण्याची प्रक्रियाच आपल्या बाबतीत घडत नाही.


✓ इथे आणखी एक विरोधाभास दिसून येतो. आजूबाजूच्या व्यस्त जगात सगळ्या गोष्टी इतक्या जलदगतीने घडत असताना आपल्याला मात्र आपल्या दैनंदिन जीवनात स्वतःसाठी मोकळा वेळ,विचार करण्यासाठी अवधी मिळणं यांची अधिकाधिक निकड भासते आहे.सर्वत्र गलबला माजला असतानाच आपल्याला स्वतःसाठी शांतपणे विचार करण्यासाठी, मन एकाग्र करता यावं यासाठी मोकळा अवकाश तयार करून घेणं गरजेचं होतंय !


आपला दिनक्रम कितीही व्यस्त असला तरीही त्यातून आपल्याला स्वतःसाठी थोडा तरी मोकळा वेळ,आपला स्वतःचा स्वतंत्र अवकाश निर्माण करणं खरं तर शक्य असतं.लिंक्डइनचे सीईओ जेफ वायनर यांचच उदाहरण पाहू या.प्रत्येक दिवशी ते स्वतःसाठी दिवसातले दोन तास बाजूला ठेवतात.मात्र या वेळात कोणतंच काम किंवा इतरही काही गोष्टी ते करत नाहीत.ही एक साधीशी सवय त्यांनी स्वतःला लावून घेतली आहे.कारण एकापाठोपाठ एक मीटिंग्जमधून आपल्याला नेमकं काय साधायचं आहे,कोणतं काम कशाप्रकारे पुढे न्यायचं आहे,या बाबतीत विचार करायला त्यांना क्षणभरही फुरसत मिळेनाशी झाली होती.


सुरुवातीला त्यांना वाटत होतं की आपण स्वतःचे जरा जास्तच लाड करतो आहोत.त्यात आपल्या हाती असलेला वेळ वाया जातोय.पण नंतर हळूहळू त्यांच्या लक्षात यायला लागलं.आपण करतोय ते बरोबर आहे,याची त्यांना जाणीव झाली. आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाची असलेली आपल्यातली निर्मितीक्षमता आपल्याला या आणि फक्त याच मागनि जाताना सापडणार आहे हे त्यांना जाणवायला लागल. स्वतःच्या दिवसभरातल्या वेळावर आता आपली सत्ता आहे, आपण आता त्या वेळाचे गुलाम उरलेलो नाही, ही भावना त्यांना आता समाधान देते आणि त्यासाठी आपण अनुसरलेल्या मार्गाची ही सुरुवात आहे याची त्यांना पूर्णपणे खात्री आहे. या संदर्भात त्यांनी माझ्याजवळ खुलासा केला तो असाः


 "एक दिवस मला असा आठवतोय की,परिस्थितीच्या रेट्याने असेल किंवा इतर काही कारणाने असेल,पण सकाळी पाच वाजल्यापासून रात्री नऊ वाजेपर्यंत मी एकतर कॉन्फरन्स कॉल्सवर तरी होतो,नाही तर एकामागून एक होणाऱ्या मीटिंग्जमध्ये तरी ! मला आठवतंय की त्या दिवशी रात्री मी कमालीचा वैफल्यग्रस्त झालो होतो.मी दिवसभरासाठी आखलेल्या वेळापत्रकाचा माझ्यावर जराही ताबाच उरला नव्हता. उलट त्या वेळापत्रकाला मीच वेठीला धरलं होतं.पण नंतर मला लगेचच त्या वैफल्यग्रस्ततेचे आभार मानावेसे वाटले.कारण त्या भावनेनेच मला माझ्या तशा प्रकारच्या दिवसांमधून बाहेर पडायला मदत केली.मी सध्या ज्या प्रकारे माझा दिवस आखून घेतला आहे,जी भूमिका मी त्या दिवशी स्वीकारली,तिच्यामुळे तो तशा प्रकारचा दिवस माझ्यासाठी शेवटचाच ठरला."


हा जो अवकाश त्यांनी आता जाणूनबुजून स्वतःसाठी तयार केला आहे,त्याच्यामुळे त्यांच्या मनातल्या काही महत्त्वपूर्ण प्रश्नांविषयी विचार करायला त्यांना आता सवड मिळाली आहे."पुढल्या तीन ते पाच वर्षांत आपल्या कंपनीचं स्वरूप कसं असेल? सध्याच्या आपल्या आधीच लोकप्रिय असलेल्या उत्पादनात आणखी कोणकोणत्या प्रकारच्या सुधारणा करता येतील? किंवा मग ग्राहकांची एखादी आजपर्यंत पूर्ण न करता आलेली गरज कशा प्रकारे पूर्ण करता येईल?" अशा प्रश्नांची उत्तरं त्यांना आता शोधता येतात.आपल्या स्पर्धकांपेक्षा वेगळं काही तरी करून आपल्या उत्पादनांची गुणवत्ता,त्यांच्यातलं वेगळेपण,यांच्यात अधिक वाढ कशी करता येईल ? तसंच एखाद्या उत्पादनात काही कमतरता आढळली,तर ती कशा प्रकारे भरून काढता येईल ? असे अनेक प्रश्न हाताळायला त्यांना वेळ मिळतो.मानसिकदृष्ट्या स्वतःला अधूनमधून ताजंतवानं करण्यासाठीसुद्धा त्यांनी राखून ठेवलेला हा वेळ ते वापरतात.यामुळे फक्त समस्या सोडवण्याच्या विचारांपुरताच या वेळेचा उपयोग न करता त्यांच्या टीमचे प्रमुख या नात्याने टीममधल्या लोकांना प्रशिक्षण देण्याचं कामही ते करतच असतात.


स्वतःसाठी असा स्वतंत्र,वेगळा वेळ बाजूला काढून ठेवणं हा आता जेफ यांच्यासाठी फक्त सवयीचा भाग उरलेला नाही.त्यामागे एक सखोल विचारधारा आहे. अधिकाचा हव्यास,अधिकाचा पाठलाग,

आणि तोही बेशिस्तपणे केलेला,कोणत्याही संस्थेसाठी किती घातक ठरू शकतो,त्याचे किती दुष्परिणाम होऊ शकतात, संस्थांच्या वरिष्ठांच्या आयुष्यावरही त्याचे किती विपरित परिणाम होऊ शकतात,ते त्यांनी प्रत्यक्षपणे अनुभवलं होतं.आणि म्हणूनच त्यांच्यासाठी अशा त-हेचा अवकाश ठेवणं ही एक विचारधारा आहे.एखादी घोषणा किंवा वापरून गुळगुळीत झालेली म्हण अथवा वाक्प्रचार नाही.


वाचनासाठी स्वतंत्र अवकाश ठेवा...!


अशाच प्रकारचे आणखी एक स्फूर्तिदायक उदाहरण आपल्याला सीईओ बिल गेट्स यांच्या विचारपद्धतीत दिसून येतं. गेट्स अगदी नियमितपणे (आणि हे सगळ्यांना माहीत आहे) एखादा आठवडा सुट्टी घेतात. मायक्रोसॉफ्टमधली त्यांची दैनंदिन कर्तव्यं या काळात ते बाजूला ठेवतात ते फक्त विचार करण्यासाठी आणि वाचन करण्यासाठी ! 'बिल अँड मेलिंडा गेट्स फाऊंडेशन'च्या सिॲटल वॉशिंग्टन इथल्या मुख्यालयात आयोजित करण्यात आलेल्या गेट्स यांच्या बरोबरच्या प्रश्नोत्तरांच्या सत्राला मी एकदा हजर राहिलो होतो. योगायोगाने त्यांचा तो विचार करण्याचा आठवडा नुकताच पूर्ण झालेला होता.त्यांच्या या पद्धतीबद्दल मी ऐकलेलं होतं,तरी मला हे माहीत नव्हतं की,


१९८० सालापासूनच त्यांचा हा परिपाठ होता आणि मायक्रोसॉफ्टचा आजचा जो प्रचंड विस्तार झाला आहे, तिथवर ही कंपनी पोहोचेपर्यंतच्या काळातही ते कधी त्यापासून ढळले नाहीत.


याबद्दल जरा सविस्तरपणे जाणून घेताना लक्षात येतं की,

कंपनीच्या इतिहासातल्या सर्वाधिक व्यस्त आणि सर्वाधिक गडबड गोंधळाच्या काळातसुद्धा गेट्स वर्षातून दोन वेळा एक एक आठवडा स्वतःसाठी वेळ, स्वतःसाठी अवकाश राखून ठेवत होते. स्वतःला सगळ्यांपासून वेगळं ठेवत होते.त्या एकांतवासाचा उपयोग त्यांनी अनेक लेखांच्या (११२) आणि पुस्तकांच्या वाचनासाठी,तंत्रज्ञानाची सखोल माहिती घेण्यासाठी आणि आणखी काही तरी भव्यदिव्य करण्यासाठी केला.आजही त्यांनी स्थापन केलेल्या या संस्थेचा दैनंदिन कारभार चालवताना मधेमधे येणाऱ्या, चित्त विचलित करणाऱ्या अनेक गोष्टींपासून बाजूला जाण्यासाठी,फक्त विचार करण्यासाठी ते आवर्जून सवड काढतात.एक पूर्ण आठवडा बाजूला काढून ठेवणं अवघड किंवा अशक्य वाटत असेल,तर तुमच्या दैनंदिन दिनक्रमातूनच रोज थोडासा वेळ 'विचार करण्याचा आठवडा' समजून बाजूला काढण्याचेही काही मार्ग आहेत.मला उपयुक्त वाटलेली एक पद्धत म्हणजे, पहिली वीस मिनिटं फक्त चांगल्या आणि दर्जेदार साहित्याच्या वाचनात घालवावीत.(छोटे-मोठे लेख, वर्तनमानपत्र,

किंवा नवीनच बाजारात आलेली,पण वाचकांकडून फारशी मागणी नसलेली कादंबरी,हे सर्व टाळावं.) सकाळी उठल्याबरोबर ई-मेल्स बघण्याची माझी सवय या वाचनाने पुरती बदलून तर टाकलीच, शिवाय हे वाचन माझ्या दिवसाच्या सुरुवातीचा केंद्रबिंदू झालाय.

त्याच्यामुळे माझा दृष्टिकोनही विस्तारला गेलाय आणि कठीण प्रसंगांमध्ये गरजेच्या असलेल्या काही उपयुक्त गोष्टी आणि कल्पना सुचण्यासाठी मला त्यांची मदतही झाली.प्रेरणादायी साहित्याला माझी नेहमीच पहिली पसंती असते.पण तरीही याबाबतीत प्रत्येकाची आवडनिवड वेगवेगळी असू शकते. तरीही ज्यांना अशा प्रकारचं साहित्य वाचायला आवडतं,त्यांच्यासाठी काही वाचनीय पुस्तकांची नावं मी सुचवू शकतो- 


Zen, the Reason of Unreason, The Wisdom of Confucius, The Torah, The Holy Bible, Tao, to Know and Not Be Knowing, The Meaning of the Glorious Koran: An Explanatory Translation; As a Man Thinketh, The Essential Gandhi, Walden, or, Life in the Woods, The Book of Mormon, the Meditations of Marcus Aurelius, Upnishads. 


अशाच त-हेची आणखीही असंख्य पुस्तकं आहेत. यातलं कुठलंही पुस्तक निवडून ते वाचा.तुमची खात्री पटेल की ही पुस्तकं आपल्या सध्याच्या मुबलक संपर्कसाधनांच्या युगाच्याही कित्येक वर्षं आधी लिहिली गेली आहेत आणि तरीही ती कालातीत आहेत. नेमक्या कोणत्या गोष्टी आपल्यासाठी महत्त्वाच्या आहेत,याचे आपल्या मनाशी जे अंदाज आपण बांधलेले असतात, त्यांना अशा तहेचं साहित्य नक्कीच आव्हान देतं.


तुमच्या दिवसातले दोन तास,वर्षातून दोन आठवडे किंवा रोज सकाळी पाच मिनिटं,यापैकी कोणताही एक पर्याय निवडा.महत्त्वाचं आहे ते फक्त तुमच्या व्यस्त आयुष्यातून थोडासा अवकाश तुम्ही स्वतःसाठी निर्माण करणं !


०२.०२.२५ या लेखातील शेवटचा भाग…।

२/२/२५

स्वतःची सुटका करा.Free yourself.

संपूर्ण एकांतवासाशिवाय उत्तम दर्जाचं आणि महत्त्वाचं काम होणं शक्यच नाही. - पाब्लो पिकासो


'फ्रँक ओ'ब्रायन हे Conversations या कंपनीचे संस्थापक आहेत.कॉन्व्हर्सेशन्स ही एक मार्केटिंग सर्व्हिसेस देणारी न्यूयॉर्कस्थित कंपनी असून 'अमेरिकाज फास्टेस्ट ग्रोईंग कंपनीज'पैकी एक म्हणून Inc ५००/५००० च्या यादीतही तिचं नाव सुचवलं गेलं होतं.सध्याच्या जगात कामांच्या ठिकाणी ज्या जबरदस्त वेगाने कामं सुरू आहेत,त्याला प्रतिसाद म्हणून त्यांनी एक काहीशी मूलभूत क्रांतिकारी अशी पद्धत चालू केली आहे.महिन्यातून एकदा ब्रायन हे पन्नास कर्मचारी असलेल्या त्यांच्या कंपनीतल्या प्रत्येक कर्मचाऱ्याला त्यांच्या खोलीत बोलावून घेतात.पूर्ण दिवस हे कर्मचारी त्यांच्या बरोबर असतात.तिथे फोन आणण्यावर बंदी आहे आणि ई-मेल्सही बेकायदेशीर ठरवलेल्या आहेत.या मीटिंगमध्ये खास असा कोणताच विषय चर्चेला घेतला जात नाही. फक्त परस्परांशी बोलण्यासाठी,काही गोष्टींवर चर्चा करण्यासाठी,विचारविनिमय करण्यासाठी सगळ्यांना एकत्र बोलावलं जातं.इथे लक्षात घेण्याजोगी एक गोष्ट आहे ती म्हणजे,ही मीटिंग महिन्याच्या अधल्यामधल्या शुक्रवारी ते कधीही घेत नाहीत.कारण त्या सुमाराला एकंदरीतच निर्मितीक्षमता काहीशी कमी झालेली असते आणि लोकांची खऱ्या अर्थाने कुठलीच कामं होत नसतात.

म्हणूनच सबंध दिवस चालणारी ही मीटिंग दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी ते घेतात.कंपनीतल्या अंतर्गत शिस्तीसाठीसुद्धा ही मीटिंग नसते.त्यांचे ग्राहकसुद्धा Do-Not-Call Monday ला आपला फोन कॉल घेतला जाईल अशी अपेक्षा ठेवत नाहीत.


ही जी पद्धत त्यांनी सुरू केली आहे,ती या हेतूने की, त्यांचे कर्मचारी सतत फक्त कामातच गुंतून राहिले तर आवश्यक कामं कोणती,हेच त्यांच्या लक्षात येणार नाही.महत्त्वाचं काय आहे,याचा शोध घेण्यासाठी त्यांना थोडा अवकाश मिळण्याची गरज आहे. 


त्यांनी लिहिलं आहे की, "मोकळा श्वासघेण्यासाठी,आजूबाजूला काय चाललंय हे जाणून घेण्यासाठी आणि विचार करण्यासाठी निवांतपणा मिळण्यासाठी थोडा तरी वेळ वेगळा राखून ठेवणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. तुम्हाला अभिनव संशोधन करायचं असेल,अधिक प्रगल्भ व्हायचं असेल,स्वतःची प्रगती करून घ्यायची असेल तर त्यासाठी तुमच्या विचारांमध्ये एका विशिष्ट पातळीपर्यंत स्पष्टता यायलाच हवी."


स्वतःची सुटका करून घ्या.उपलब्ध नसण्याचे फायदे,

इसेंशियलिझम -ग्रेग मॅकेऑन - अनुवाद - संध्या रानडे,

मायमिरर पब्लिशिंग हाऊस,


याशिवायही या मीटिंगचा ब्रायन यांना आणखी एक फायदा होतो.एखाद्या लिटमस चाचणीसारखा ! अनावश्यक कामांमध्ये त्यांचे कर्मचारी नको इतका वेळ घालवत आहेत का,हे या वेळी त्यांना बघता येतं.


एखादा कर्मचारी जर खूप काम असल्यामुळे मीटिंगला येत नाहीये असं माझ्या लक्षात आलं,तर त्यातून दोन निष्कर्ष निघतात.एक असा की,आमच्याकडे एखादं काम पूर्ण कार्यक्षमतेने होत नसावं किंवा मग आम्हाला आणखी काही कर्मचाऱ्यांची गरज आहे."


जेव्हा त्यांचे कर्मचारी विचार करण्यात बराच वेळ घालवतात,

तेव्हा तो त्यांचा 'खराखुरा' खूप व्यग्र असण्याचा काळ असतो.आपल्याला थोड्या पण अत्यावश्यक गोष्टी आणि भारंभार क्षुल्लक गोष्टी यांच्यातला फरक जाणून घेण्यासाठी मोकळा अवकाश हवा असतो.पण सध्याच्या आपल्या या वेळेची प्रचंड कमतरता जाणवणाऱ्या कालखंडात आपल्याला तसा तो अजिबातच मिळत नाही.किंबहुना कामाची आखूनरेखून केलेली ती पद्धतच तशी असते.


एका कंपनीच्या प्रमुखाबरोबर मी काम करत होतो,तेव्हा त्याने कबूल केलं होतं की गेली पाच वर्षं तो त्या कंपनीत काम करत असताना ठरलेल्या वेळेपेक्षा खूप जास्त वेळ थांबून काम करत होता आणि त्याचं कारण मी विचारलं,तेव्हा तो म्हणाला होता,"मी माझ्या कंपनीच्या कामात इतका कमालीचा व्यग्र होतो की,मी कंपनीत इतका वेळ थांबणं योग्य आहे की नाही याचा निर्णय घेण्याइतकासुद्धा रिकामा वेळ माझ्याजवळ नव्हता." उगवणाऱ्या प्रत्येक दिवसाबरोबर कामाच्या संदर्भात नव्यानव्या मागण्या पुढे येत असत.इतक्या की, थोडा वेळ विचार करण्यासाठी पाऊलभर मागे सरकून एकंदर परिस्थितीचा आढावा घेण्याइतकीसुद्धा सवड त्याला मिळत नव्हती.


असंच आणखी एक उदाहरण ! जागतिक स्तरावरच्या एका मोठ्या तंत्रज्ञान क्षेत्रातल्या वरिष्ठ व्हाईस प्रेसिडेंटशी बोलताना मला असं कळलं की,ते आठवड्यातले पस्तीस तास मीटिंगमध्ये घालवतात.या मीटिंगमध्येच ते इतके गुंतून गेलेले असतात की स्वतःच्या करिअरसंदर्भात काही आखणी करायला, स्वतःच्या भविष्याविषयी विचार करायला त्यांना कधी तासभरसुद्धा वेळ मिळत नाही.मग स्वतःच्या कंपनीच्या प्रगतीकडे लक्ष देणं तर फारच दूरची गोष्ट झाली. स्वतःला कुणाशी तरी बोलायला,चर्चा करायला,नेमकं काय चाललंय आणि काय करणं गरजेचं आहे,याचा विचार करायला ते वेळ देत नव्हते.त्याऐवजी त्यांचा वेळ ते अखंड चालू असलेली प्रेझेंटेशन्स आणि जुनाट कल्पनांना चिकटून बसणाऱ्या,नव्याचा स्वीकार करायला फारशी तयार नसणाऱ्या कंपनीच्या वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या लोकांशी सुरू असलेल्या चर्चा यांच्यातच वाया घालवत होते आणि याच्यातून काहीही निष्पन्न होत नव्हतं.


काय अत्यावश्यक आहे आणि काय नाही याचा निर्णय घेण्यापूर्वी तुम्ही तुमचे पर्याय आधी पारखून घ्या. अनावश्यकतावादी अगदी सहजपणे नव्या कल्पना स्वीकारतात,पूर्णपणे नवी संधी मुठीत पकडण्याची धडपड करतात,किंवा अगदी नुकत्याच आलेल्या ई-मेलला तातडीने उत्तर पाठवतात.आवश्यकतावादी मात्र स्वतःला अवसर देणं पसंत करतात.ते पर्याय पारखून घेतात,त्यावर सखोल विचार करतात.


अनावश्यकतावादी - आयुष्याचा विचारसुद्धा करायला फुरसत नसते इतके कामात व्यग्र असतात.


आवश्यकतावादी - आयुष्याचा सखोलपणे विचार करण्यासाठी अवकाश निर्माण करतात.


काही गोष्टी ठरवण्यासाठी 'स्वतःचा'

 वेगळा अवकाश ठेवा.


एखादी गोष्ट पारखून घेण्यासाठी स्वतःला पुरेसा वेळ देण्याचं महत्त्व माझ्या मनावर ठसलं ते माझ्या कामानिमित्त मी स्टॅनफर्ड इथल्या डी.स्कूलमध्ये (अधिकृत नाव Hasso Plattner Institute of Design - Stanford) होतो,त्या काळात ! मी एका कोर्सच्या संबंधात शिक्षण देण्यासाठी तिथे गेलो असताना तिथल्या वर्गात पाऊल टाकल्याबरोबर एक गोष्ट माझ्या लक्षात आली ती म्हणजे,तिथे पारंपरिक पद्धतीच्या खुर्चा ठेवण्यातच आल्या नव्हत्या.त्याऐवजी फोमचे मोठे चौकोनी ठोकळे तिथे बसण्यासाठी ठेवले होते.अर्थातच ते आरामदायी मुळीच नव्हते,हे लवकरच माझ्या लक्षात आलं.डी.स्कूलमधली प्रत्येक गोष्ट आखूनरेखून केली होती.त्याचप्रमाणे बसण्यासाठी ठेवलेले हे ठोकळेही विशिष्ट पद्धतीनेच डिझाईन केलेले होते.ते आरामदायी असणार नाहीत हे जाणीवपूर्वक ठरवून ! अशा त-हेच्या ठोकळ्यांवर काही वेळ बसलं की, विद्यार्थी हमखास उठणारच,हे धोरण त्यामागे होतं. ते उठले की जरा वेळ इकडेतिकडे फिरणार,

एक दुसऱ्याला भेटणार.वर्गात जसे ते एकमेकांच्या फक्त डावी-उजवीकडे बसतात,तसं अर्थातच इथे होणार नव्हतं आणि तोच मुख्य हेतू होता,त्यांची बसण्याची आसनं आरामदायी न करण्यामागे.डी.स्कूलने विद्यार्थ्यांना इथे तिथे मन गुंतवण्याची आणि विचार करायला त्यांना वेळ देण्याची ही अभिनव पद्धत इथे वापरली होती.अशाच प्रकारचा विचार मनात ठेवून डी. स्कूलने एक लपता येईल अशी जागा तयार केली होती. 


तिचं नाव होतं, 'बूथ नॉयर'. ही एक अशी छोटीशी खोली होती जी जाणूनबुजून जेमतेम एक ते तीन माणसं मावतील एवढी छोटी केली होती.या खोलीला खिडकी नव्हती.खोलीत बाहेरचे कुठलेली आवाज येऊ शकत नव्हते,आणि चित्त विचलित होईल,अशी कुठलीही गोष्ट त्या खोलीत मुद्दामच ठेवलेली नव्हती. 'मेक स्पेस' या पुस्तकाचे लेखक स्कॉट डुर्ले आणि स्कॉट विथॉफ्ट म्हणतात त्याप्रमाणे,"कमी तंत्रज्ञानापेक्षाही कमी किंबहुना - यात तंत्रज्ञान नाहीच." ही छोटीशी खोली जमिनीत घट्ट बसवलेली आहे.डोर्ले आणि विथॉफ्ट म्हणतात की, "ती तिथून कुठेही जाणार नाहीये." तुम्हाला तिथे जाण्याचं फक्त एकच कारण असेल आणि ते म्हणजे विचार करण्यासाठी तुम्हाला निवांतपणा हवा असणं. विचार करण्यासाठी आणि मनाच्या एकाग्रतेसाठी अशी जागा तयार केलेली असल्यामुळे विद्यार्थी काही काळ इथे येऊ शकतात आणि पुढच्या कामाचं चित्र स्पष्टपणे त्यांच्या नजरेपुढे उभं राहण्यासाठी त्याची मदत होते.


का कुणास ठाऊक,पण मन एकाग्र करण्याच्या बाबतीत लोकांचे विचार काहीशा चुकीच्या पद्धतीने जोडलेले असतात.काही लोक तर सरळ सरळ 'एकाग्रता' ही एखादी गोष्ट आहे असं समजतात.हे खरं आहे की मनात काही ध्येय असणं या दृष्टीने ती आपल्यात असते.पण त्याच वेळी ही गोष्टसुद्धा खरी आहे की,आपलं मन आपण समजून उमजून एकाग्र करतो.कोणतंही ध्येय मनाशी ठरवण्यासाठी आपण सवड काढून मन एकाग्र करणं गरजेचं आहे.


मी जेव्हा एकाग्रता हा शब्द वापरतो,त्या वेळी मला असं अजिबातच अभिप्रेत नसतं की,कोणती तरी एखादी समस्या किंवा कुठली तरी एखादी शक्यता मनात ठेवून सातत्याने आणि झपाटल्यासारखं फक्त त्याचाच विचार करत रहायचं! मला इथे अभिप्रेत आहे,ते शंभरएक समस्या आणि शक्यता यांच्या खोलात शिरून त्यावर विचार करण्यासाठी स्वतःला मोकळा वेळ देणं. स्वतःच स्वतःसाठी अवकाश निर्माण करणं ! आपले डोळे जितक्या सहजपणे एखाद्या गोष्टीवर नजर केंद्रित करतात,तितक्याच सहजतेने आवश्यकतावादी व्यक्ती त्यांच्या मनाशी ठरवलेल्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करून सातत्याने जुळवून घेत राहतात,त्या गोष्टींमध्ये लक्ष घालतात.त्यात पुरत्या बुडून जात नाहीत.


अलिकडेच माझी डी.स्कूलमध्ये एक मीटिंग झाली.या वेळी ती दुसऱ्या एका खोलीत होती.या खोलीत बसण्यासाठी कुठलीच आसनं नव्हती आणि डेस्कही नव्हते.फक्त जमिनीपासून खोलीच्या छतापर्यंत पांढरे फळे लावलेले होते आणि त्यावर कधीही चिकटवता किंवा काढता येण्याजोगे कागदाचे असंख्य रंगांचे तुकडे चिकटवलेले होते.तिथे माझी जेरेमी युटली यांच्याशी भेट ठरली होती.आम्ही दोघे मिळून एका विशिष्ट प्रकारच्या वर्गाची रचना करणार होतो.त्याचं वर्णन जेरेमीने क्षणार्धात आणि थोडक्यात करून टाकलं. 'आयुष्याची आखणी - आवश्यकतावादी विचारसरणीने.'


या वर्गाचा मूळ हेतू आहे;तो तिथे विद्यार्थ्यांना त्यांच्या आयुष्याची आखणी करण्यासाठी अवकाश देण्याचा. दर आठवड्याला विचार करण्यासाठी त्यांना एक कारण ठरवून दिलेलं असतं.त्यांचे लॅपटॉप्स आणि स्मार्टफोन बंद करून ठेवण्याची त्यांच्यावर सक्ती करण्यात येते आणि त्याऐवजी सर्व शक्ती त्यांना त्यांच्या मनाच्या एकाग्रतेवर केंद्रित करायला सांगितलं जातं.मोजक्या, पण महत्त्वाच्या गोष्टी आणि खूप साऱ्या चांगल्या वाटणाऱ्या गोष्टी यांच्यातला फरक ओळखायला त्यांनी शिकावं,यासाठी त्यांना काही विशिष्ट प्रकारची कामं नेमून दिलेली असतात.खरं म्हणजे हे शिकण्यासाठी,ही सवय स्वतःला लावून घेण्यासाठी तुम्ही डी.स्कूलमध्येच जायला हवं असतं असं नाही,आपण सगळेच स्वतःसाठी सवड काढायला शिकू शकतो.


लक्ष केंद्रित करण्यासाठी हवा असलेला अवकाश


माझ्या माहितीतले एक कार्यकारी अधिकारी अतिशय बुद्धिमान आहेत आणि स्वतःला नेमकं काय करायचंय याचं त्यांना पूर्णपणे भान आहे.मात्र त्यांचं मन वारंवार वेगवेगळ्या गोष्टींकडे वळत असतं.कधीही पाहिलं तरी ते द्विटर, जी-मेल,फेसबुक आणि इस्टंट मेसेजिंग यातच व्यग्र असतात आणि एकाच वेळी या सगळ्यात ते गुंतलेले असतात.कोणत्याही प्रलोभनांना न जुमानता स्वतःसाठी अवकाश जपण्याच्या प्रयत्नांमध्ये त्यांनी एकदा त्यांच्या एका कनिष्ठ सहकाऱ्याला त्यांच्या कॉम्प्युटरच्या इंटरनेटच्या सर्व केबल्स काढून टाकायला सांगितलं.पण शेवटी इतर अनेक मार्ग शोधून काढत ते ऑनलाईन राहण्याचा प्रयत्न करतच राहिले.त्यांनी हाती घेतलेला तो एक महत्त्वपूर्ण आणि मोठा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी ते अक्षरशः धडपडत होते.म्हणून मग त्यांनी एक वेगळं असं पाऊल उचलायचं ठरवलं. इंटरनेटची सुविधा नसणाऱ्या एका मोटेलमध्ये स्वतःचा फोन घरीच ठेवून ते राहायला गेले आणि आठ आठवड्यांच्या संपूर्ण एकांतवासात त्यांनी स्वतःला जखडून घेतलं,तेव्हाच स्वतःचा तो प्रकल्प ते पूर्ण करू शकले.माझ्या दृष्टीने ही एक अतिशय खेदजनकच अशी घटना आहे.एवढ्या मोठ्या अधिकाऱ्याला इतकं टोकाचं पाऊल का उचलावं लागलं ? पण त्यांचे हे पाऊल टोकाचं असलं तरी त्यांच्या सद्हेतू बद्दल माझ्या मनात जराही शंका नाही किंवा त्यावर मला काही भाष्यही करायचं नाही.


शिल्लक राहिलेला भाग पुढील लेखामध्ये…