* विजय गायकवाड | Vijay Gaikawad

live

नमस्कार आपले स्वागत आहे. 'सगळे जण तुम्हाला शोधत येतील.आनंदाने तुडुंब भरलेली माणसे सर्वांनाच आवडतात! पण ते तुम्हाला दुःखी,उदास अशा अवस्थेत पाहू शकत नाहीत! तेव्हा आनंदी-हसतमुख रहा आणि मित्रांचा सहवास वाढवा! जर तुम्ही दुःखी राहिलात तर मात्र सगळे जण तुम्हाला सोडून जातील. जीवनातील आनंद-प्रसन्नता भरभरून वाटा! पण एकटे दुःखी रहाल, तर त्या दुःखातच बुडून जाल !' सॉलिट्यूड, ईला व्हीलर विलकॉक्स जगण्याच्या तयारीसाठी नव्हे तर,जगण्यासाठी माणूस जन्माला आला आहे,असं 'बोरिक पास्तरनाक' यांनी म्हटलेलं आहे.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! वाचन हे आहाराहून जास्त महत्त्वाचे असते.जिम र्‍होम यांनी अँथोनी रॉबीन्स यांना शिकवले होते की 'एक वेळ रोजचे जेवण चुकव,पण वाचन अजिबात चुकवू नको.' याप्रमाणे मी अखंडपणे वाचत आहे. माणसांपासून माणसांपर्यंत जाण्याचा,प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाण्याचा जीवनाचा राजमार्ग पुस्तकातून जातो. कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात. पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये. म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,कवी सचिन शिंदे,संतोष शेळके,अनिल फारणे,सहित प्रकाशन,डॉ.रवींद्र श्रावस्ती,डॉ.सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,संजय बापट,मनोहर सुर्वे,विनायक पाटील,संतोष पाटील,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, मेनन पिस्टन रिंग मधील सहकारी मित्र शेखर सुर्यवंशी..। पुस्तकातील घटना प्रसंग हे मी लिखित स्वरूपात सध्या व्हाट्सअप वरती टाकत असतो.हे सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी,पुस्तके देणारी लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत. ... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ. मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. विजय कृष्णात गायकवाड

२२/५/२३

संघप्रिय कीटांतील स्पर्धा..

संघप्रिय कीटकांच्यातही प्रामुख्याने झगडा चालतो,तो असतो टापूंसाठी.मुंग्यांचा एकेक परिवार एक राणी व तिची संतती - ही आपापल्या वारुळांभोवतीचा जमेल तेवढा मोठा टापू आपल्या ताब्यात ठेवतात.आपल्याच जातीच्या इतर वारुळांच्या मुंग्यांना तिथून हाकलतात,

आणि ज्यांच्याशी आहाराबाबत स्पर्धा होऊ शकेल अशा इतर जातींच्या मुंग्यांनाही.अशा स्पर्धेत मुंग्या काही एकदम हातघाईवर येत नाहीत.सुरुवात होते नुसत्या शक्तिप्रदर्शनाने.वारूळ पुराणात रॅफच्या अभ्यास निबंधातले विस्तृत उतारे आहेत.


हे दोन वारुळांमधले मुंग्यांचे गट भेटले आणि एकमेकांपुढे नाचायला लागले.पण हे काही शृंगारिक नृत्य नव्हते.तो तर एक सामना होता, दोन वारुळांमधला आपापला मुलूख काबूत ठेवण्याबद्दलचा.दोन्ही बाजूच्या मुंग्या विरोधी पक्षाची ताकद आजमावत होत्या.जोखताना स्वतःच्या ताकदीची जाहिरातही करत होत्या. असं करण्यात कोणत्याच मुंगीला धोका नव्हता; मृत्यूचा सोडाच,पण जखमांचाही.हे होतं शत्रूला जोखणं आणि आपली शक्ती दाखवणं; पहेलवानांनी एकमेकांपुढे शड्डू ठोकण्यासारखं. ह्यात आपली सरशी होईल,आपला टापू सांभाळून राहता येईल,असं दोन्ही वारुळांच्या मुंग्यांना वाटत होतं.


हे शक्तिप्रदर्शन ही काही युद्धाची सुरुवात नव्हती. माणसांची सैन्यं जशी एकमेकांना दरडावायला मिरवणुका काढतात,आपापसातच सराव-युद्ध खेळतात,तसा हा प्रकार होता.भारत-पाक सीमेवर 'वाघा बॉर्डर' ठाण्यावर जसे रोज थाडथाड पाय आपटत दोन्हीकडचे सैनिक एकमेकांवर गुरकावतात,तसा हा खेळ.दोन्ही वारुळांना आपली ताकद दुसऱ्याला दाखवायची होती,एवढंच सामान्यतः एकांडे पशू अशा शक्तिप्रदर्शनावरच मिटवतात.दोघा प्रतिस्पर्ध्यांपैकी एक कोणीतरी आपल्याला हे भांडण जड जाईल असे ठरवून पड घेतो.. परस्परांना इजा करायचे टाळतो.कोणीच दुसऱ्याला जिवे मारायचा विचार करत नाही. 


पण निसर्गाच्या रहाटगाडग्यात संघप्रिय जातींनी हा संयम सोडून दिला आहे.आप्त निवडीच्या गणितात एकेका वैयक्तिक प्राण्याला काही खास किंमत नसते.

पुऱ्या परिवाराचाच विचार असतो. तेव्हा आपापल्या संघाच्या हितसंबंधांसाठी त्याचे सदस्य शिर तळहातावर घेऊन लढायला तयार असतात.

आपापल्या टापूचे संरक्षण करण्यासाठी स्वतःचा जीव गमावायला सज्ज असतात,आणि अर्थातच जोडीने प्रतिस्पर्ध्याचा खून पाडायला.एकांड्या पशूंत स्वार्थत्यागाला जशी सक्त मर्यादा असते,

तशीच क्रौर्यालाही मर्यादा असते. 


ह्याउलट संघप्रिय पशूंत जसा शर्थीचा स्वार्थत्याग पाहायला मिळतो,तसेच अपरिमित क्रौर्यही.म्हणून अशा मुंग्यांच्यात शक्तिप्रदर्शन संपले की धुमश्चक्री सुरू होऊ शकते.रॅफच्या अभ्यासनिबंधात ह्याचेही वर्णन आहे.


आता दिखाऊ शक्तिप्रदर्शन संपले.कोणतीच मुंगी ताठ उभी राहून उंची वाढवेना,की पोट फुगवून आकार वाढवेना.आता एकमेकींवर चढून आपल्या करवती

सारख्या जबड्यांनी शत्रूचे वेगवेगळे अवयव तोडायचा प्रयत्न होऊ लागला. कवच नसलेल्या भागांना दंश करून विषाचा मारा होऊ लागला.जखमी झालेल्या शत्रूंची खांडोळी उडवली जाऊ लागली.लवकरच सगळं क्षेत्र मेलेल्या आणि जायबंदी मुंग्यांनी भरून गेलं. बहुतेक मेलेल्या मुंग्या पायवाट-वारुळाच्या होत्या.त्यांच्यात राणीची सेवा करणारी,नंतर वारूळ सावरायला मदत करणारी पुढारी मुंगीही होती.तिला ओढा-मुंग्यांनी मारून तिचे तुकडे केले होते.


जर लढाईच्या वेळी पायवाट-राणी जिवंत असती आणि ओढा-मुंग्यांनी तिला पकडलं असतं,तर तत्क्षणी तिच्या खांडोळ्या उडवल्या गेल्या असत्या.


हरलेल्या वारुळांच्या राण्यांना क्षणभरही जिवंत ठेवलं जात नाही.एक म्हणजे एकच राणी चालू शकते.त्या बाबतीत मुंग्यांची मनं कठोर असतात. एकच एक म्होरक्या खपणार,बाकी सगळ्यांनी निमूटपणे त्याच्या सांगण्यानुसार वागायचं असतं! 


म्हणूनच दोन वारुळांमध्ये कधीच तह होत नाही की मैत्री होत नाही... वारुळाची जागा एकाच परिवाराच्या हुकमतीखाली राखणं हे अटळ, अपरिहार्य असतं.आणि वारुळाचं क्षेत्र काहीही करून,प्रसंगी जीव देऊनही राखावं लागतं.


आर्जेन्टीनी मुंग्यांची अगडबंब महानगरी..


मुंग्यांचे सगळे आचरण,एका बाजूनी परक्या परिवारांच्या मुंग्यांना आपल्या टापूतून हाकलणे, जमेल तेव्हा परक्या परिवारांचा मुलूख काबीज करणे,त्यासाठी जरूर तर शर्थीची लढाई करणे, असे खटाटोप,आणि दुसऱ्या बाजूनी आपल्या परिवारात एकच राणी हवी,एकीच्याच आधिपत्याखाली सगळ्यांनी आपापल्या जबाबदाऱ्या सांभाळायला पाहिजेत असा अट्टाहास,सारे सारे पूर्णत: उपजत प्रवृत्तींवर अवलंबून असते.सारे स्वाभाविक,

संस्कारजन्य असे काहीही नाही.सारे त्यांच्या जनुकांच्यात नोंदून ठेवलेले गोंदवून ठेवलेले.अर्थातच जनुकांत स्थित्यंतर होऊन ते बदलूही शकते.परंतु, ह्या भांडकुदळ व एकीलाच राणी मानण्याच्या प्रवृत्तींतून मुंग्यांच्या कुलाची भरभराट झाली आहे.त्यांना भूमितलावर महत्त्वाचे स्थान मिळाले आहे. म्हणून ह्या साऱ्या प्रवृत्ती सर्वप्रचलित झाल्या आहेत.पण अपवाद नसेल तर ती जीवसृष्टी कुठली? ह्या दोनही प्रवृत्ती सोडून दिलेली एक मुंग्यांची जात अलीकडे आढळली आहे - ह्या आहेत एक महापरिवार स्थापन करणाऱ्या आर्जेन्टीनी मुंग्या.ह्या आहेत मूळच्या आर्जेन्टिनातील पराना नदीखोऱ्याच्या रहिवासी. इथे प्रत्येक परिवाराच्या सदस्याच्या शिंगांवर त्यांचा त्यांचा खास वास चोपडलेला असतो.त्या वासामुळे आर्जेन्टीनी मुंग्या इतर मुंग्यांप्रमाणेच परक्या परिवारांच्या सदस्यांशी फटकून वागतात, आपापला टापू राखून ठेवतात. ह्या मूलप्रदेशातल्या आर्जेन्टीनी मुंग्या एका परिवारात एकाच राणीला जगू देतात.


पण गेल्या काही दशकांत आर्जेन्टीनी मुंग्या मूळच्या निवासस्थानातून बाहेर पडून जगभर समशीतोष्ण प्रदेशात पसरल्या आहेत.तिथे त्यांच्यात कायनु-बायनु जनुकीय परिवर्तन झाले आहे हे नक्की,पण नेमके काय ह्याचा अजून उलगडा झालेला नाही.


पण इतर साऱ्या मुंगी जातींच्या मानाने नव्याने वसाहत केलेल्या प्रदेशातल्या आर्जेन्टीनी मुंग्यांत जनुकीय पातळीवर प्रचंड साधर्म्य आढळते,अगदी एकाच परिवारातल्या आया-बहिणींइतके नाही,तरी खूपच - खूप,मुख्य म्हणजे ह्या जनुकीय साधर्म्यामुळे त्यांच्या शिंगांवर चोपडलेला वासही अगदी एकासारखा एक असतो,आणि म्हणून त्यांनी दुसऱ्या आर्जेन्टीनी मुंग्यांशी भांडणे बंद केले आहे.आपण सगळ्याच बहिणी- बहिणी अशा वृत्तीने त्या वागू लागल्या आहेत.ह्याच्या बरोबरच त्यांनी एक नवीच प्रजनन प्रणाली स्वीकारली आहे.बहुतेक साऱ्या मुंग्यांत विशिष्ट ऋतूत खास आहार देऊन नव्या राजकन्या व नर पोसले जातात.त्यांना पंख असतात,आणि एका मोक्यावर अनेक वारुळांतून ह्या राजकन्या आणि नर भरारी मारतात. तिथे एकमेकांना भेटतात,त्यांचा समागम होतो,आणि आता फळलेल्या आणि राणीपदाला पोचलेल्या माद्या पंख कापून नवे वारूळ स्थापतात,त्यात अंडी घालतात,मग अंड्यांतून बाहेर येणाऱ्या स्वतःच्या मुलींच्या मदतीने नव्या परिवाराची स्थापना करतात.ह्यात अर्थातच खूप खूप अडचणी येतात.दरम्यान आपले जीवितकार्य संपलेले नर तातडीने मृत्युमुखी पडतात.


आर्जेन्टीनी मुंग्यांनी हे सगळे सोडून दिले आहे. त्यांच्या राजकन्या हवेत भरारी न मारताच एखाद्या नराला भेटतात,त्याच्याशी समागम झाल्यावर आधीच्या परिवारातल्या पाच-दहा बहिणींच्या मदतीने नवा परिवार सुरू करतात. शिवाय अशा वेगवेगळ्या परिवारांच्यात स्पर्धा, भांडणे हीही भानगड नाही.सगळेच एका महापरिवाराचे सदस्य.ह्या अजब प्रणालीने नव-नव्या प्रदेशांत वस्ती स्थापन केलेल्या आर्जेन्टीनी मुंग्यांचे एक अचाट पेव फुटले आहे.टिचग्या,जेमतेम तीन मिलिमीटर लांब. कोणत्याही बारीकसारीक फटीतही सहज घुसू शकणाऱ्या.


पण भूमध्य समुद्राकाठी इटली,फ्रान्स,स्पेन व पोर्तुगाल ह्या चार देशांच्या किनारपट्टीवर सहा हजार किलोमीटर लांब,म्हणजे भारताच्या समुद्रकिनाऱ्यावर मुंबईपासून कोलकात्यापर्यंत,एवढी त्यांची एक विशाल महानगरी पसरली आहे.शिवाय अशाच आणखी दोन शेकडो किलोमीटर लांब महानगऱ्या कॅलिफोर्नियात आणि जपानातही पसरल्या आहेत. 


त्यांत परार्धावधी मुंग्या राहतात,आणि सगळ्यात आश्चर्यजनक गोष्ट म्हणजे ह्या साऱ्या तीनही खंडांवरच्या आर्जेन्टीनी मुंग्या स्वतःला बहिणी - बहिणी मानतात,त्यांना सारखेच वास येतात,त्या एकमेकींशी भांडण-तंटा काही न करता जग जिंकत राहतात !


पण हा पराक्रम गाजवताना साहजिकच ते जो मुलूख काबीज करतात तिथल्या मूलवासियांचा निःपात करतात.आर्जेन्टीनी मुंग्या कॅलिफोर्नियात जशा पसरल्या,तशा तिथल्या आधीच्या रहिवासी मुंग्यांच्या अनेक प्रजाती अंतर्धान पावल्या.मग ह्या मूल रहिवासी मुंग्यांद्वारे परागीकरण होणाऱ्या काही वनस्पती,तसेच मुंग्यांना खाऊन जगणारे शिंगवाले सरडे पण नामशेष झाले.


१८ मे २०२३ या लेखातील पुढील भाग..

२०/५/२३

आपल्यातल्या आणि परक्या मुंग्या

मुंग्या-मुंगळ्यांचे परिवार आपल्या शेजाऱ्यांशी सतत भांडत-तंडत असतात.प्रत्येक समूहाची एक राणी मुंगी आई,बाकी सगळ्या कामकरी, लष्करी मुंग्या एकमेकींच्या मुंगी बहिणी-बहिणी. सगळ्यांनी मिळून अन्न गोळा

करायचे,चावून चावून एकमेकींना भरवायचे.शिवाय राणी मुद्दाम पाझरते असे रस सगळ्यांनी चाटत राहायचे. ह्यातून प्रत्येक परिवाराचा एक विशिष्ट गंध साकारतो.आपला तो सुगंध,परक्या परिवारांचे झाडून सारे दुर्गंध.कोणी मुंगी भेटली की तिला हुंगायची,आपल्या साऱ्या भगिनी सुगंधा. दुर्गंधी असली तर ती आहे आपली हाडवैरीण.. शक्यतो त्यांना आपल्या टापूतून हाकलून द्यायचे,जमेल तेव्हा त्यांचा मुलूख काबीज करायचा,त्यासाठी


 'आम्ही मुंगळ्यांच्या पोरी नाही भिणार मरणाला' 


अशी शर्थीची लढाई करायची.मुंग्या-मधमाशांच्या परिवारांत इतर परिवार सदस्यांची ओळख केवळ आपल्याच सुगंधाची,आपल्यातलीच एवढ्यावर मर्यादित असते.


एक खाशी राणी मुंगी - मधमाशी सोडली तर

कोणीही कुणालाही बारकाव्याने वैयक्तिक पातळीवर ओळखत नसते. 


दर वर्षी नेमाने विशिष्ट ऋतूंत एका जातीच्या सगळ्या परिवारांनी नव्या पंखवाल्या राजकन्या,आणि उड्डाणाला उत्सुक,प्रेमपिपासू पंखवाले नर वाढवायचे.उडता उडता त्यांनी जोडीदार शोधायचे.समागमानंतर नरांनी शांत चित्ते मृत्यूला सामोरे जायचे,तर आता फळलेल्या राण्यांनी आपले नवे कुटुंब स्थापायसाठी झटायचे.या कठीण प्रसंगातून पार पडून जर राणीच्या थोरल्या लेकी जगल्या वाढल्या,तर त्यांनी कामाला लागायचे,आपला भगिनी परिवार जोपासायचा.


ही होती मुंग्यांची सनातन रूढी.निसर्गाच्या परीक्षेत उतरलेली.गेल्या दहा कोटी वर्षांत नव्या-नव्या जीवनप्रणाली शोधून काढत मुंग्या- मुंगळे जगभर पसरले आहेत.एकजुटीमुळे मुंग्या-मुंगळ्यांना आपल्याहून खूप मोठ्या सावजांची शिकार करणे शक्य होते. 


याचा फायदा घेत लष्करी डोंगळ्यांच्या अनेक जाती उपजल्या आहेत.यांची प्रचंड फौज कायमची एकाच वारुळात तळ ठोकून राहात नाही.मुक्काम करायचा झाला की पायात पाय गुंफवून ते आपल्या शरीरांचा तंबू बनवतात. या तंबूच्या आसऱ्यात राणीला,पिल्लांना सांभाळतात.मधूनमधून प्रजोत्पादन थांबवून दररोज कूच करत राहतात.नव्या नव्या मुलखात घुसून तिथल्या मोठ-मोठ्या किड्यांची,पैशांची, विंचवांची,बेडकांची शिकार करतात.


एक लक्ष वर्षांपूर्वी अवतरलेल्या मानवाच्या यशाचे मूलकारण टोळ्या टोळ्यांनी मोठ-मोठ्या सावजांची शिकार करणे हे होते असे समजतात.त्याच्या तब्बल दहा कोटी वर्षे अगोदर मुंग्यांनी मोठ्या कंपूंनी शिकार करायला सुरुवात केली होती.


शिकारीला मदतनीस म्हणून बारा-तेरा हजार वर्षांपूर्वी माणसाने कुत्र्याला माणसाळवले.


नंतर दुधासाठी,मांसासाठी माणसाळवले गाय, म्हैस,

मेंढी,बकरी.पण मुंगळ्यांच्या कित्येक जाती केव्हाच्याच पशुपालक बनल्या आहेत.गुराखी बिबट्या- लांडग्यांपासून आपल्या गुरांचे रक्षण करतात 


तशाच ह्या मुंग्या वनस्पतींचे अन्नरस शोषणाऱ्या मावे आणि इतर कीटकांच्या शत्रूंना हुसकावून लावतात.

या सेवेच्या मोबदल्यात हे कीटक शोषलेल्या अन्नरसातला काही हिस्सा मधुरसाचे मोठमोठे थेंब काढून,त्यात मुद्दाम जीवनसत्त्वे,अमीनो आम्लांची भर घालून आपल्या रक्षणकर्त्या मुंगळ्यांना पाजतात. 


मानवाच्या शेतीची सुरुवात काही निवडक वनस्पतींना संरक्षण देण्यापासून नऊ- दहा हजार वर्षांपूर्वी झाली.मुंग्यांनी हे पण प्राचीन काळी आरंभले होते.आपल्या बळाच्या जोरावर मुंगळ्यांच्या काही जाती विशिष्ट जातींच्या झुडपांच्या संरक्षणाची जबाबदारी उचलतात.अमेझॉनच्या जंगलात बाभळींच्या काही भाईबंदांचे व मुंग्यांचे असे लागेबांधे आहेत.मुंग्यांच्या ह्या खास जाती बाभळींनी पोकळ काट्यांच्या स्वरूपात पुरवलेल्या निवासांत राहतात.याचबरोबर त्या वनस्पती मुंग्यांसाठी खास अन्न पुरवतात.ह्याची परतफेड म्हणून मुंग्या आपल्या यजमानांवर हल्ला करणाऱ्या किडींपासून,पशूंपासून त्यांचा बचाव करतात.एवढेच नाही तर झुडपाच्या बुंध्याजवळ दुसरी कोणतीही वनस्पती वाढू देत नाहीत. 


पण शेतकरी मुंग्यांचे खास उदाहरण म्हणजे अमेझॉनच्या जंगलातील पानकाप्या मुंग्या. घराच्या एका खोलीएवढ्या प्रचंड वारुळांत ते आसपासच्या वृक्ष-वेलींची पाने तोडून आणून या पानांवर खास जातींची बुरशी जोपासतात.मग त्या बुरशीचा फराळ करतात.ही तर झाली खरी खुरी शेती.ती पण मुंग्यांनी माणसाआधी केव्हाच शोधून काढली होती.


१८ मे २०२३ या। लेखातील पुढील भाग..



१८/५/२३

विल्यम हॅमिल्टन आणि आप्त निवड..

जेबीएस हाल्डेन एका भोजन समारंभात इंग्लंडच्या चर्चचे प्रमुख,कॅन्टरबरीचे आर्चबिशप ह्यांच्या शेजारी बसले होते.धर्मगुरूंनी विचारले, 'हाल्डेनसाहेब,आपल्याला जीवसृष्टीची प्रचंड जाण आहे.मला सांगा,ही जीवसृष्टी निर्मिताना ईश्वराच्या मनात काय होते?' हाल्डेन म्हणाले, 'मी मनकवडा नाही,पण एवढे नक्की - ईश्वराला किडे-मकोडे अतिशय आवडायचे!अहो जगात किड्या- मकोड्यांच्या जितक्या चित्र विचित्र तऱ्हा आहेत,तितक्या दुसऱ्या कोणत्याही जीवकुळीच्या नाहीत!'


हे इतके किडे-मकोडे कसे अवतरले? त्यांना निसर्गात तऱ्हेतऱ्हेच्या भूमिका बजावणे शक्य झाले म्हणून,त्यांच्या छोट्या,काटक,चपट्या शरीरांनी ते जमिनीवरच्या अगणित खाचा-खोचांत राहू शकतात.वाळवीप्रमाणे लाकडापासून,डासांप्रमाणे माणसाच्या रक्तापर्यंत वेगवेगळी संसाधने वापरू शकतात.बहुतांश कीटक एकटे-दुकटे राहतात.पण त्यांतले काही मोठमोठ्या समूहांत राहू लागले.वाळव्या, मुंग्या-मुंगळे,कागद माशा,वाघ माशांसारख्या गांधिलमाशा,मधमाशा,जरी जगातील कीटकांच्या एकूण 


साडेसात लक्ष ज्ञात जातींतील केवळ तेरा हजार जाती समाजशील आहेत.


तरी त्यांची गणसंख्या,त्यांचा एकूण भार, एकांड्या कीटकांच्या कितीतरी पटीने जास्त आहे.टोळी- 'टोळीने शिकार,अळिंब शेती, माव्यासारख्या कीटकांचे जणू काय दुभत्या गाई असे पशुपालन अशा अनेक खुब्यांनी ते यशस्वी झाले आहेत.झाडांची पाने कापून त्यावर बुरशी वाढवून त्यांचा आहार करणाऱ्या ॲमेझॉनच्या वर्षावनातल्या पानकाप्या,ऑट्टा प्रजातीच्या मुंगळ्यांच्या एकेका परिवारात काही अब्ज मुंगळे असतात.


त्यांच्या वस्तीचा आकार दीड मीटर जमिनीत खोल,दोन-तीन मीटर व्यासाचे वर्तुळ एवढा अफाट असतो.त्यांच्यातली एक राणी तब्बल पंधरा-पंधरा वर्षे जगते.आयुष्यभरात अब्ज अंडी घालते.तिच्या मुलीबाळी स्वतःआजन्म ब्रह्मचारी राहतात.त्या सारख्या राबत असतात.त्यांचे आयुष्य केवळ काही महिन्यांचे असते.


अशा श्रमविभागणी केलेल्या,एकमेकांशी घनिष्ठ संबंध असलेल्या संघांत राहणे,ही प्राणि जीवनातली एक महत्त्वाची क्रांती आहे.मुख्य म्हणजे काही खास अपवाद वगळता अशा कीटसंघात एखादीच राणी संतती उत्पादन करते. बाकीच्या श्रमिक माद्या विणीच्या भानगडीत न पडता संघाकरता झटून काम करत राहतात.जर निसर्गनिवडीतून बळकट आत्मसंरक्षण,मुबलक पुनरुत्पादन हीच उद्दिष्टे साधतात,तर मग आजन्म ब्रह्मचारी राहणाऱ्या मुंग्यांची गुणवैशिष्ट्ये पुढच्या पिढीत न उतरल्याने ही प्रवृत्ती तातडीने नाहीशी कशी होत नाही?अशी प्रवृत्ती नाहीशी होत नाही,उलट फोफावू शकते, कारण प्रत्येक जीवाची जडण-घडण हजारो जनुकांच्या आधारावर चालते,आणि वैयक्तिक प्राणी नव्हे तर असे जनुक हेच निसर्गनिवडीचे मूलभूत लक्ष्य आहेत.कोणताही जीव स्वतःचे जनुक आपल्या संततीद्वारे पुढच्या पिढीत उतरवतोच,पण त्याखेरीज तिचे / त्याचे जनुक इतर रक्ताच्या नात्यातल्या आप्तांद्वारेही पुढच्या पिढीत उतरतात.तेव्हा निसर्गनिवडीचा एक भाग स्वत:चा जीव राखणे व स्वतःचे प्रजोत्पादन, ह्याच्या जोडीलाच रक्ताच्या नात्यातल्या आप्तांचे संरक्षण व प्रजोत्पादन हा असणार.


हा आहे निसर्ग निवडीची अधिक फोड करणारा आप्त निवडीचा सिद्धान्त;आणि तो विकसित केला.

इंग्लंडमधल्या हाल्डेनच्याच परंपरेत काम करणाऱ्या विल्यम हॅमिल्टनने.त्याने नेटके गणित मांडून दाखवून दिले की एखादा प्राणी स्वार्थत्याग करेल,पण हात राखून,

केवळ विशिष्ट प्रमाणात.तो एखाद्या भाईबंदासाठी कळ सोसेल, पण जर त्या भाईबंदाला पुरेसा लाभ होत असेल तरच.पुरेसा म्हणजे किती? 


सख्ख्या बहिणीला स्वतः सोसलेल्या हानीच्या दुपटीहून थोडा तरी जास्त लाभ झालाच पाहिजे,

सावत्र बहिणीला चौपटीहून जरा जास्त,चुलत बहिणीला आठ पटीहून जरा जास्त.तसेच मुलीला स्वतः सोसलेल्या हानीच्या दुपटीहून थोडा तरी जास्त लाभ झालाच पाहिजे,आणि नातीला चौपटीहून जरा जास्त.अर्थात जर एकदम चार-चार नातींना लाभ होत असेल तर दरडोई स्वतःच्या हानीइतकाच झालेला पुरे.


हे गणित साऱ्या प्राणिजगताला लागू आहे.मग मुंग्या-मुंगळे,गांधिलमाशा,मधमाशा ह्याच कीटकुलात इतक्या समाजप्रिय जाती का ? हॅमिल्टनने दाखवून दिले की ह्यामागे आहे त्यांची वैशिष्ट्यपूर्ण प्रजननप्रणाली.

सामान्यतः सर्व प्रगत प्राण्यांच्या देहपेशींत जनुकांचे दोन संच असतात एक आईकडून आलेला,एक बापाकडून.

केवळ मादीच्या अंड्यात व नराच्या शुक्रबीजांत ह्या दोन संचांची विभागणी होऊन एकच संच उतरतो.म्हणजे प्रत्येक अंड्यात किंवा शुक्रबीजात आई - बापांचे घुसळून - ढवळून दोघांचेही अर्धे अर्धे जनुक उचलले जातात.म्हणूनच - जनुक संच आई- मुलींत किंवा सख्ख्या भावंडांत निम्मे निम्मे जनुक समान असतात.


पण मुंग्या-मुंगळे,गांधिलमाशा,मधमाशा हे कीटकुल तऱ्हेवाईक आहे.त्यांच्यातले नर असतात बिनबापाचे.ह्या कीटकुलात शुक्रबीजाने फ..लेल्या,नेहमी सारख्या जनुकांचे दोन संच असलेल्या अंड्यांतून फक्त माद्या उपजतात,तर नर उपजतात न फ..लेल्या,जनुकांचे केवळ एक संच असलेल्या अंड्यांतून. ह्या तऱ्हेवाईकपणामुळे एकेका नराची सर्व शुक्रबीजे एकासारखीच एक,आवळी जावळी असतात; त्यांत काहीच वैविध्य नसते.यामुळे सख्ख्या बहिणी-बहिणीत बापाकडून आलेला जनुक संच अगदी सारखा असतो,इतर जीव -जातींप्रमाणे आईकडून आलेल्या जनुक संचात मात्र सरासरी अर्धे जनुक एकासारखे एक असतात.परिणामत: बहिणी-बहिणींत तीन-चतुर्थांश जनुक एकासारखे एक असतात, तर माय-लेकींत इतर जीवजातींप्रमाणे अर्धे. ह्याचाच अर्थ असा की आप्त निवडीच्या भाषेत आपल्या स्वतःच्या मुलींपेक्षाही बहिणींसाठी स्वार्थत्याग करणे शहाणपणाचे ठरते.हे आहे मुंग्या-मुंगळे,गांधिलमाशा,मधमाशा ह्याच कीटकुलांत इतक्या मोठ्या प्रमाणात समाजप्रिय जातींची उत्क्रान्ती होण्याचे रहस्य.


'हा मुंग्यांचा लोंढा आला,' मर्ढेकर म्हणतात, 'सहस्र जमल्या,लक्ष कोटिही,अब्ज अब्ज अन् निखर्व मुंग्या !' उत्क्रान्तीच्या पुराणातला ह्या अगणित समाजप्रिय कीटकांचा अध्याय हा वारूळ पुराणातल्या रॅफ ह्या नायकाच्या विद्यार्थिदशेतल्या प्रबंधाचा गाभा आहे. खरोखरच जगात वारेमाप मुंग्या आहेत. आफ्रिकेच्या माळरानात दर हेक्टरी पाच कोटी मुंग्या-मुंगळे सापडतात.हेच प्रमाण भारताला लावले,तर आपल्या देशात दहा हजार निखर्व- एकावर पंधरा शून्ये- इतक्या मुंग्या असायला पाहिजेत.इतक्या नाहीत,तरी शे-दोनशे निखर्व असतीलच असतील,म्हणजे 


प्रत्येक माणसामागे दहा कोटी.


समूहप्रिय किड्यांच्या ह्या वैपुल्याचे मूळ त्यांच्या स्वार्थत्यागी श्रमिकांच्यातल्या एकीच्या बळात आहे.

एकजुटीमुळे संघप्रिय कीटक एकांड्या कीटकांवर अनेक बाबतीत मात करू शकतात. संघर्षाचा प्रसंग आला तर एक-एकटे राहणारे कीटक जिवाला सांभाळून झगडतात.

कारण त्यांचे एखादे तंगडे तुटले की सगळेच संपले.पण समूहशील कीटकांना वारुळातल्या हजारोंपैकी दोन- चारशे मारल्या गेल्या तरी खपवून घेता येते.अशा संघशक्तीचा फायदा मिळून ('वारुळ पुराण',माधव गाडगीळ',ई.ओ.विल्सन,अनुवाद - नंदा खरे,मनोविकास प्रकाशन )


निसर्गातल्या टिकाऊ,उत्पादक संसाधनांवर मुंग्या मधमाशा- वाळव्या आपली निरंकुश सत्ता गाजवतात.उलट एकांड्या कीटकांना क्षणभंगुर, निरुत्पादक,अविश्वसनीय संसाधनांवर गुजराण करायला लागते.पण अशी कमी प्रतीची संसाधने नाना तऱ्हेची आहेत.याचा फायदा घेत,एकाकी कीटकांचे वैविध्य समाजप्रिय कीटकांच्या कितीतरी पट फोफावले आहे.वैविध्य आणि वैपुल्य यांचे असे उलटे नाते आहे.

१६/५/२३

कृत्रिम बुद्धिमत्ता : काल,आज आणि उद्या

माहिती मिळवण्यासाठी फोन करून चौकशी करण्याऐवजी आता संकेतस्थळांवर चॅटबॉटशी संवाद साधला जातो.यंत्रे स्वतः कॉल करून आपल्याशी बोलतात. मानवी संभाषणाचे सरूपीकरण (सिम्युलेट) करत.ठरावीक वाक्याशांना प्रत्युत्तर देण्यासाठी अशी यंत्रे समर्थ असतात.तज्ज्ञ प्रणालीच्या साहाय्याने दोन भिन्न भाषक समोरासमोर संवाद साधू शकतात. अर्थात,
त्यासाठी पूर्वनियोजित उत्तरांचा संचय त्यात केलेला असतो.

आंतरजालग्राही साधनांनी आखून दिलेला नकाशा आणि मार्ग अनुसरून आपण रस्ते शोधू शकतो आणि योग्य ठिकाणी पोहोचतो. आपल्याला माहीत आहे,की हवाई वाहतुकीचे नियंत्रण अत्यंत गुंतागुंतीचे असते.विमानांचा प्रवासमार्ग आखणे,आगमन आणि प्रस्थानाचे (लॅण्डिंग,टेक-ऑफ) नियोजन करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचे साहाय्य घेतले जाते.


ज्ञानप्राप्ती,तर्क करणे आणि स्वतःमध्ये सुधारणा घडवणे,ह्या मानवाच्या अंगी असलेल्या तीन विशेष कौशल्यांवर कृत्रिम बुद्धिमत्ता भर देते.


परंतु संशोधकांनी कृत्रिम बुद्धिमत्तेची उदिष्टे ह्यापेक्षा अधिक विस्तृत केली आहेत.त्यासाठी तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रेसर कंपन्या परिवर्तन घडवून आणत आहेत.

उदाहरणार्थ,मोठ्या संचयामधून दृश्यस्वरूपातील माहिती आणि वस्तूंचा शोध घेणारे 'इमेजनेट,भाषानुवादाकरिता प्रामुख्याने वापरले जाणारे 'गूगल ट्रान्स्लेट' बुद्धिबळ 'गो', 'शिगो' सारख्या पटांवरील खेळासाठी तयार केलेली 'अल्फा झीरो' प्रणाली.


डीप माइण्ड तंत्रज्ञानाने न्यूरल ट्यूरिंग मशीन तयार केले,ज्यामुळे संगणकात मानवी मेंदूच्या अल्पकालीन स्मृती सह क्षमता येऊ शकते.बोर्ड गेम 'गो' ह्या अत्यंत कठीण आणि अवघड प्राचीन खेळाच्या 'गो'पटूला हरवणारी गूगल निर्मित 'अल्फागो' संगणकीय प्रणालीसुद्धा डीप माइण्ड तंत्रज्ञानावर आधारित आहे.


'गुगल'ची चालकरहित गाडी आणि 'टेस्ला' कंपनीची स्वचालित गाडी,वाहन क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेची विशेष ओळख देते.दूरनियंत्रित यान (ड्रोन) निर्मिती आणि त्याच्या प्रयोगात परिस्थितीअनुसार योग्य निर्णय घेण्याची क्षमता यंत्रात असते.


"आयबीएम' निर्मित 'वॉटसन'चे वैशिष्ट्य असे आहे की ठरावीक एका कामासाठी हा संगणक तयार केला नसून विभिन्न प्रकारचे कार्य तो तितक्याच समर्थपणे करू शकतो.तो रोगचिकित्सा करू शकतो.सगळ्यांत जास्त वेळा अमेरिकन गेम शो जेपार्डीमध्ये सलग जिंकणाऱ्या जेत्या जेन केर्निम्सला हरवू शकतो. किंवा शास्त्रीय संगीतातील नादमधुर आविष्कार घडवू शकतो.

छायाचित्र,चित्रफीत,ध्वनिफीत, कोणत्याही स्वरूपातल्या माहितीचा अभ्यास वॉटसन करू शकतो.सातत्याने स्वयंअध्ययन करत असल्याने,वॉटसनने घेतलेले निर्णय योग्य आहेत की नाही,ह्याची खात्रीसुद्धा तो स्वतःच करू शकतो; कारण कृत्रिम बुद्धिमत्तेने दिलेले सल्ले विश्वासार्ह असल्याची त्याला खात्री असते.


जगात अग्रक्रमांकावर असलेल्या 'वॉस्टन डायनॅमिक्स' कंपनीने रोबोटिक्समधील आव्हानात्मक प्रश्न सोडवण्यासाठी,अनेक भ्रमण- यंत्रमानव (मोबाइल रोबोट) निर्माण केले आहेत.'स्पॉट' नावाच्या त्यांच्या चार पायांच्या यंत्रमानवाचे कार्य कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने चालते,

म्हणजे त्याच्यात कृत्रिम बुद्धिमत्ता निर्माण केली आहे. तो चपळाईने पायऱ्यांची चढ-उतार करू शकतो.वाटेतला भाग खडबडीत किंवा गवताळ असला तरी ओलांडून पार करू शकतो. त्यासाठी त्याच्या पायांची रचना निमुळती केली आहे.त्याबरोबरच तो चलाख आणि चाणाक्षही आहे.


सर्वसाधारण यंत्रमानवांना अरुंद,दाटीवाटीच्या ठिकाणी हालचालीसाठी मर्यादा येतात आणि चिंचोळ्या भागात फिरणे अडचणीचे होऊ शकते.परंतु,स्पॉटच्या पायांना चाके लावल्यामुळे तो कानाकोपऱ्यात सहजतेने पोहोचू शकतो.तो वळूसुद्धा शकतो.


स्पॉटची दिव्यदृष्टी ३६० अंशांपर्यंत बघू शकते,त्यामुळे मार्गातले अडथळे तो सहजपणे चुकवू शकतो.पूर्व

नियोजित लक्ष्य साध्य करण्यासाठी,स्पॉटला दुरून नियंत्रित करता येते.


तसेच,कोणत्या दिशेने आणि कसा प्रवास करायचा आहे;त्याचा मार्गक्रमही आधीच निश्चित करता येतो.

त्याच्यात अनेक प्रकारचे संवेदक बसवलेले असल्यामुळे धोकादायक प्रदेशात जाण्यासाठी किंवा जोखमीची कामे करण्यासाठी,तसेच बांधकाम,संशोधन,हवामानखाते,

खाणकाम इत्यादी क्षेत्रांत स्पॉट बहुउपयोगी आहे.


उद्योग-व्यवसायात काम करण्याच्या पद्धतीत बदल करण्याची,उत्पादनाच्या वाढीचा दर वाढविण्याची क्षमता कृत्रिम बुद्धिमत्तेमध्ये असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

व्यवसायांचा उत्कर्ष जागतिक अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वपूर्ण असल्याने,कृत्रिम बुद्धिमत्ता हा उत्पादनाचा एक घटक मानला जातो.तंत्रज्ञानाच्या दृष्टिकोनातून जगाची उन्नती करण्याचे साधन म्हणून कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्र विचाराधीन आहे.


'यंत्रांमध्ये विचार करण्याची क्षमता निर्माण करता येईल का?" ह्या प्रश्नाचे स्वीकारात्मक आणि होकारार्थी उत्तर शोधणे हे कृत्रिम बुद्धिमत्तेचे मूलभूत उद्दिष्ट असल्यामुळे मानवी बुद्धिमत्तेच्या क्षमतेची प्रतिकृती,यंत्रांमध्ये निर्माण करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता प्रयत्नशील आहे.

आत्मसात करण्याचा यंत्रांचा वेग लक्षात घेता,

मानवाला त्यांच्या गतीने बुद्धीला चालना देऊन धावावे लागेल.

कृत्रिम बुद्धिमत्ता आणि त्यावरील संशोधन प्रगतिपथावर असल्यामुळे बुद्धिजीवी मनुष्य सर्जनशीलतेचा उपयोग नावीन्यपूर्ण निर्मितीसाठी करत आहे.


इतक्या सहजपणे,आपल्या नकळत,आपण कृत्रिम बुद्धिमत्तेला आपल्या आयुष्यात स्थान दिले आहे,की भविष्यात यंत्रे दैनंदिन पठडीतली कामे मनुष्यापेक्षा बिनचूक आणि सफाईदारपणे करतील.पण,

ह्याच्यापलीकडे कल्पनाही करू शकणार नाही असे करण्याचे सामर्थ्य कृत्रिम बुद्धिमत्तेत आहे.


कृत्रिम बुद्धिमत्ता भविष्यात कुठपर्यंत मजल मारू शकेल?अनेक तत्त्वज्ञानी,संज्ञानात्मक शास्त्रज्ञांनी,संगणक

शास्त्रज्ञांनी कृत्रिम बुद्धिमत्ता कुठे असफल होऊ शकेल,

भवितव्य काय असेल,भविष्यात कशी असेल,याची अनुमाने लावली आहेत.काहींचा असा विश्वास आहे,की परिणामी तांत्रिक एकलता,दारिद्र्य आणि रोग दूर करील,तर इतर चेतावणी देतात,की


कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे मानवी अस्तित्व धोक्यात येऊ शकते.


असा अंदाज आहे की, २०३०पर्यंत ७०% व्यवसाय कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा किमान एक प्रकार उपयोगात आणतील.कर्मचाऱ्यांना तत्काळ सानुकूलित उपाय आणि सूचना कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने मिळू शकतील.

त्यामुळे कृत्रिम बुद्धिमत्ता संबंधित तंत्रज्ञानात कौशल्य असणाऱ्या व्यावसायिकांची मागणी वाढतच राहील.

संगणकाद्वारे संवाद साधताना दृष्टी, श्रवण,स्पर्श आणि गंधाची अनुभूती देण्याचे तंत्रज्ञान उदयोन्मुख आहे.

प्रशिक्षण देऊन कुशल कर्मचारीवर्ग तयार केला जात आहे.


कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे कर्मचारी आणि व्यावसायिकांना नवीन कौशल्य आत्मसात करणे आवश्यक होईल.कामाचे स्वरूप बदलेल, त्याबरोबरच नवीन संधी आणि रोजगार उपलब्ध होतील.उदाहरणार्थ : यंत्र स्वयं अध्ययन तर्कात सुधारणा करण्यासाठी संशोधक,मुबलक अपक्क माहितीस्रोताचा तपास करणे,नमुना ओळखण्यासाठी प्रणाली तयार करणे,प्रशिक्षण देणे.


भारत सरकारच्या 'स्किल इंडिया' उपक्रमाअंतर्गत 'प्रधानमंत्री कौशल विकास योजना राबवली जात आहे,ज्यात तंत्रज्ञान, संगणकीय कौशल्य आत्मसात करण्यावर भर दिला जातो.


कृत्रिम बुद्धिमत्तेचे दीर्घकालीन ध्येय,सर्व कार्यामध्ये मानवी संज्ञानात्मक क्षमतांना मागे टाकण्यात यंत्रांना यशस्वी करणे,म्हणजे 'अनन्यसाधारण' बुद्धिमत्ता निर्माण करण्याचे आहे.मनुष्याची विचार करायची पद्धत खूप गुंतागुंतीची असते.आपण कसा अर्थ लावतो, एखाद्या गोष्टीचा आपल्याला काय बोध होतो; आपल्या भावना,

श्रद्धा,विश्वास,समज,समजूत, अशा अनेक गोष्टी विचारात घ्याव्या लागतात..


त्याशिवाय सामान्यबोध किंवा व्यावहारिक ज्ञान, म्हणजे दैनंदिन जीवनात काही गोष्टी मनुष्याला माहीत असतील असे गृहीत धरलेले असते.


तो कृत्रिम बुद्धिमत्तेच्या बाबतीत अजूनही न सुटलेला प्रश्न आहे.


१९५० - बहुज्ञ अॅलन ट्युरिंगनी 'कम्प्युटिंग मशिनरी अँड इंटेलिजन्स' ह्या शोधपत्रात सुप्रसिद्ध 'ट्युरिंग टेस्ट' प्रस्तुत केली.


१९५६ - संगणकशास्त्रज्ञ जॉन मॅक्कार्थी यांनी डार्टमाउथ परिषदेत कृत्रिम बुद्धिमत्तेची संकल्पना सर्वप्रथम मांडली.


१९६९- केवळ सूचनांचे क्रमवार पालन करण्याशिवाय,हेतू सफल करण्याचे उद्दिष्ट ठेवून कार्य करण्यासाठी सक्षम असा पहिला व्यापकउद्देशीय चलित यंत्रमानव 'शँकी' तयार झाला.


१९९७ - महासंगणक 'डीप ब्लू'ने विश्वविजेत्या बुद्धिबळपटूला खेळात हरवले. 'डीप ब्लु' निर्माण करणाऱ्या 'आयबीएम'च्या दृष्टीने मोठा टप्पा समजला जातो. 


२००२ - व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी असा पहिला 'रोबोटिक व्हॅक्यूम क्लिनर' तयार करण्यात आला.


२००५ - 'स्टॅनली' ह्या यंत्रमानवाने 'डीएआरपीए ग्रॅण्ड चॅलेंज' मनुष्याच्या साहाय्याशिवाय वाहन चालवून जिंकले.


२००५ - शोधक आणि भविष्यवादी रे कुर्झवील यांनी 'एकलता' ह्या घटनेचे भाकीत केले,जी २०४५ च्या सुमारास घडेल,जेव्हा कृत्रिम मनाची बुद्धिमत्ता मानवी मेंदूपेक्षा जास्त असेल.


२०११ - अमेरिकन गेम शो 'जेपार्डी'मध्ये सगळ्यांत जास्त वेळा जेत्या ठरलेल्या जेन केनिंग्सला 'आयबीएम' निर्मित वॉटसनने हरवल


२०११ - 'अॅपल'च्या 'आयफोन'मध्ये बुद्धिमान साहाय्यक 'सिरी' समाविष्ट झाला. 


२०१७ - देशाचे नागरिकत्व मिळवणारी मानव सदृश 'सोफिया' पहिली रोबोट ठरली.


जॉन मॅककार्थी यांनी १९५९ साली 'अॅडव्हाइस टेकर' हा काल्पनिक प्रोग्रॅम त्यांच्या 'प्रोग्रॅम्स विथ कॉमन सेन्स' ह्या शोधपत्रामध्ये प्रस्तावित केला होता.त्यात त्यांनी असे सांगितले,की तर्काच्या साहाय्याने माहितीचा बोध संगणक लावतील आणि लगेच निष्कर्ष काढून 'सुसंगत' निर्णय घेऊ शकतील.

त्यामुळे निर्णयाचा परिणाम काय होईल हे जर संगणक ठरवू आणि सांगू शकला,तर त्याच्यात 'कॉमनसेन्स' आहे असे म्हणता येईल.


चित्रपटात किंवा काल्पनिक कथांमध्ये रंगवलेले संवेदनशील यंत्रमानव प्रत्यक्षात निर्माण करणे नजीकच्या काळात शक्य होणे कठिण आहे. जरी कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्र विकसित होऊन मानवसदृश यंत्रमानव तयार करण्याची क्षमता आली,तरी नैतिकतेचे प्रश्न अडथळा ठरू शकतील.


 विचार आणि भावना समजून संवाद साधणारे तंत्रज्ञान कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आधारे तयार करण्याचे प्रयत्न सातत्याने होत आहे


भविष्यातील तंत्रज्ञान स्वयं अभिज्ञ (सेल्फअवेअर),

त्याबरोबरच अधिक चतुर,संवेदनशील आणि जागरूक असेल.मानवाचे भविष्यातील जीवन कृत्रिम बुद्धिमत्ता संचालित असेल ह्याची मानसिक तयारी करणे अपरिहार्य आहे.


विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात, विज्ञानकल्पनांमधून बुद्धिमान यंत्रमानवाच्या संकल्पनेचा कृत्रिमरीत्या परिचय जगाला झाला. त्या सुरुवात 


'विझार्ड ऑफ ओझ'च्या हृदयहीन 'टिन मॅन' पासून झाला.त्यानंतर 'मेट्रोपोलिस' चित्रपटात मानवसदृश यंत्रमानव 'मारिया'.बुद्धी आणि कार्य ह्या दोघांमध्ये हृदयाची मध्यस्थी आवश्यक आहे,असा संदेश ह्यातून दिला आहे. त्यामुळे मनुष्य आणि यंत्रांनी एकत्रितपणे समस्यांची उकल केली,तर कृत्रिम बुद्धिमत्तेची वाटचाल भविष्यातही यशस्वी होईल.


- वैशाली फाटक-काटकर,माहिती - तंत्रज्ञान तज्ञ

मासिक मराठी विज्ञान परिषद पत्रिका,

२०२२ नोव्हेंबर भाग - २ ( सदरचा हा लेख संपला.)

१४/५/२३

कृत्रिम बुद्धिमत्ता : काल,आज आणि उद्या

१९५० साली मांडलेली कृत्रिम बुद्धिमत्तेची संकल्पना आज प्रत्यक्षात आलेली दिसते. आपल्या हातातल्या भ्रमणध्वनीपासून ते मंगळावर जाणाऱ्या यानांपर्यंत आणि खेळ खेळणाऱ्या संगणकांपासून ते विनाचालक वाहनांपर्यंत आज सर्वत्र कृत्रिम बुद्धिमत्ता आपली अनिवार्यता पटवून देत आहे. विश्व व्यापून दशांगुळे उरणाऱ्या या कृत्रिम बुद्धिमत्तेचा इतिहास,प्रवास आणि भविष्याचा आढावा घेणारा हा लेख.


कृत्रिम बुद्धिमत्ता,आर्टिफिशियल इंटेलिजन्स 'एआय'चा उल्लेख आजच्या काळात सहजपणे होऊ लागला आहे.

ह्या संज्ञा जनमानसात प्रचलित होत आहेत.अमेझॉनची 'अलेक्सा', ॲपलचे सिरी सारखे मदतनीस,आपल्या प्रश्नांची उत्तरे द्यायला तत्पर आहेत,तर आंतरजालावर आपल्याला कोणत्या वस्तू खरेदी करायला आवडतील याचा अंदाज लावण्यापर्यंत,आधुनिक जगात आपल्या अवतीभोवती कृत्रिम बुद्धिमत्ता सर्वत्र आढळत आहे..


मानवनिर्मित प्रज्ञ- यंत्रमानवाच्या अस्तित्वाचा उल्लेख ग्रीक पौराणिक कथांमध्येही आल्याचे आढळते.ग्रीक तत्त्वज्ञ ऑरिस्टॉटलने तर्कशुद्ध विचार करण्याचा युक्तिवाद (सिलॉजिजम) सर्वप्रथम केला.त्यात दोन किंवा अधिक स्वीकृत विधानांवरून,तर्कशुद्ध निष्कर्ष पद्धतशीरपणे काढला जातो आणि त्या आधारे तिसरे किंवा नवीन तार्किक विधान मांडले जाते. मनुष्याला जन्मजात मिळणाऱ्या बुद्धिमतेच्या क्षमतेचा स्वतःला दाखला देणारा तो महत्त्वपूर्ण क्षण होता.


ॲरिस्टॉटलने प्रस्तुत केलेल्या संकल्पनेपासून सुरुवात झाली असली,तरी ज्या स्तरावरील कृत्रिम बुद्धिमत्ता आजच्या काळात विचारात घेतली जाते आणि विकसित होत आहे.त्याचा इतिहास केवळ गेल्या शतकातला आहे.


१९५०च्या दशकात शास्त्रज्ञ,गणितज्ञ आणि तत्त्वज्ञांच्या समुदायाने कृत्रिम बुद्धिमत्तेची संकल्पना केली.त्यात ब्रिटिश तरुण बहुज्ञ अॅलन ट्युरिंग होते,ज्यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेची गणितीय शक्यता शोधली.त्यांनी असा प्रश्न उपस्थित केला की,


'समस्या सोडवण्यासाठी आणि निर्णय घेताना मनुष्य उपलब्ध माहिती तसेच,कारणांचा आधार घेतात,तर यंत्रे तसे का करू शकणार नाहीत?' 


१९५० साली 'कम्प्यूटिंग मशिनरी अँड इंटेलिजन्स' ह्या शोधनिबंधात त्यांनी बुद्धिमान यंत्रे कशी तयार करत येतील आणि त्यांच्या बुद्धिमत्तेची चाचणी कशी करावी,

ह्यांची तार्किक चर्चा केली.ट्युरिंगची संकल्पना तात्त्विकरीत्या योग्य असली,तरी कार्य सुरु करताना अनेक अडथळे आले.संगणकांना मूलभूतपणे बदलण्याची सर्वप्रथम आवश्यकता होती; कारण १९४९ पर्यंत वापरात असलेले संगणक, 


आज्ञावली कार्यान्वित करू शकत होते,परंतु ते साठवण्याची तरतूद त्यांच्यात नव्हती.थोडक्यात सांगितलेले कार्य संगणक करू शकत होते परंतु काय केले ते स्मृतीत ठेवण्याची क्षमता त्यांच्यात नव्हती. दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे,संगणक अत्यंत खर्चिक होते.केवळ प्रतिष्ठित विद्यापीठे आणि मोठ्या तंत्रज्ञान कंपन्यांनाच ह्या अनोख्या क्षेत्रात पाऊल टाकण्याचे धारिष्ट करणे शक्य होते.


तसेच,प्रज्ञ यंत्र निर्मितीची संकल्पना निधी स्रोतांना पटवून देणाऱ्या समर्थकांची आवश्यकता होती.


संज्ञा बोध आणि आकलन (कॉग्निटिव्ह) विज्ञानावर संशोधन करणारे कृत्रिम बुद्धिमत्तेचे प्रवर्तक,जॉन मॅक् कार्थी आणि मार्विन मिन्स्की कृत्रिम बुद्धिमत्तेचे जनक म्हणून ओळखले जातात.त्यांनी दिलेली व्याख्या अशी आहे.


कृत्रिम बुद्धिमत्ता ही यंत्रांची विशिष्ट कार्य करण्याची क्षमता आहे,ज्यासाठी मानवी बुद्धिमत्तेची आवश्यकता असते.


१९५६ साली डार्टमाउथ परिषदेत,मॅक् कार्थी यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेवर मुक्त चर्चेसाठी विविध क्षेत्रांतील प्रमुख संशोधकांना एकत्र आणले. एका मोठ्या सहयोगी प्रयत्नाची कल्पना करून, कृत्रिम बुद्धिमत्ता ही संज्ञा त्यांनी,त्याच परिषदेत तयार केली.संज्ञानात्मक शास्त्रज्ञ मार्विन मिन्स्की तंत्रज्ञानाच्या भविष्याबद्दल आशावादी होते;परंतु कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्राबद्दल प्रमाणित पद्धती निश्चित करण्यासाठी परिषदेत अपेक्षेप्रमाणे यश मिळू शकले नाही.तरीही कृत्रिम बुद्धिमत्ता साध्य करण्यायोग्य आहे ह्या विचारावर एकमत झाल्यामुळे संशोधनाने वेग घेतला.


१९५७ ते १९७४ हा कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्राच्या भरभराटीचा काळ होता.जलद,वापरायला सुलभ आणि अधिक माहिती संचयित करणारे संगणक तयार होत होते,जे तुलनात्मक स्वस्त होते.यंत्र स्वयंअध्ययनाच्या ( मशीन लर्निंग) तर्कात सुधारणा होऊन,कोणती समस्या सोडवण्यासाठी कोणता तर्क उपयोगात आणायचा,ते ठरवता यायला लागले.हर्बर्ट सायमन,जॉन शॉ आणि अॅलन नेवेल ह्यांनी तयार केलेल्या 'जनरल प्रॉब्लेम सॉल्व्हर च्या साहाय्याने समस्या सोडवल्या जाऊ लागल्या,तर जोसेफ वायझेनबॉम यांनी तयार केलेल्या 'एलायझा' ह्या चॅटबॉटला बोलीभाषेचा अर्थबोध होत होता.


ह्या यशामुळे काही सरकारी संस्थांची खात्री पटली आणि कृत्रिम बुद्धिमत्ता संशोधनासाठी त्यांनी निधी मंजूर केल्यामुळे आशा आणि अपेक्षा उंचावल्या.सरकारी संस्थांना अशा यंत्रांमध्ये अधिक स्वारस्य होते,जे बोलीभाषेचे लिप्यांतर आणि भाषांतर कर शकतील,तसेच अपक्व माहितीवर (रॉ डेटा) प्रक्रिया करतील. भाषा आकलनाची मूळ तत्त्वे जरी तयार झाली असली,तरी नैसर्गिक भाषाप्रक्रियेचे (नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग) अंतिम उद्दिष्ट साध्य करण्यासाठी बराच लांबचा पल्ला गाठायचा होता.


संवाद साधण्यासाठी एका शब्दाचे अनेक अर्थ, त्याबरोबरच संदर्भ जाणून घेणे आवश्यक असते. सगळ्यांत मोठी समस्या अशी होती.काही ठोस करण्यासाठी तितक्या ताकदीच्या संगणकीय शक्तीचा अभाव त्यामुळे यंत्राद्वारे भाषानुवाद करण्यासाठी अपेक्षित यश मिळाले नाही.


त्यानंतर अडथळ्यांचे डोंगर उभे राहायला लागले आणि संशोधनाची गती मंदावली.कृत्रिम बुद्धिमत्तेचे दोन प्रमुख संशोधक,रॉजर रॉन्क आणि मार्विन मिन्स्की ह्यांनी व्यापारी समूहांना असा इशारा दिला होता,की


कृत्रिम बुद्धिमत्ता संशोधनकार्याचा उत्साह अनियंत्रित होत असल्यामुळे १९८०च्या दशकात नैराश्याची लहर उठेल.


ह्युबर्ट ड्रेफस यांनी भूतकाळातील कृत्रिम बुद्धिमत्ता संशोधनाच्या सदोष गृहीतकांवर प्रकाश टाकला आणि १९६६ च्या सुरुवातीला अचूक भाकीत केले,की कृत्रिम बुद्धिमत्ता संशोधनाची पहिली लाट सार्वजनिक आश्वासनांची पूर्तता करण्यात अपयशी ठरेल.


नोम चॉम्स्कींसारख्या समीक्षकांनी असा युक्तिवाद केला,की कृत्रिम बुद्धिमत्ता आंशिक प्रमाणात सांख्यिकीय तंत्रावर अवलंबून असल्याने संशोधन अयोग्य दिशेने जाण्याची शक्यता आहे.



१९७४ ते १९८० दरम्यान संशोधनासाठी मंजूर होणाऱ्या निधीत घट झाली.पर्यायाने संशोधनाचा वेग थंडावला,

टीका होऊ लागली,वातावरण निराशाजनक झाले.त्यामुळे हा काळ 'कृत्रिम बुद्धिमत्तेचा शीतकाल' समजला जातो.

कृत्रिम बुद्धिमत्ता समुदायात निराशावादाने सुरवात होऊन त्याला श्रृंखलाक्रियेचे स्वरूप आले.त्याचे पर्यवसान कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात उल्लेखनीय संशोधन न होण्यात झाले.


विकासकांनी दिलेली अवाजवी आश्वासने, वापरकर्त्यांच्या अवास्तव अपेक्षा आणि जाहिरातबाजीचा अतिरेक कारणीभूत झाला. काही वेळा नवीन तंत्रज्ञान उदयाला येण्याआधी त्याचा प्रमाणाबाहेर उदोउदो होतो,तसेच काहीसे झाले.कृत्रिम बुद्धिमत्तेवर अवलंबून असेलेले अब्जावधी डॉलर्सचे उद्योग-व्यवसाय कोसळू लागले.


१९८०च्या दशकात गणितीय तर्काचा विस्तार होऊन तंत्रज्ञानासाठी दिल्या जाणाऱ्या निधीत वाढ झाल्यावर उत्साह पुन्हा सळसळायला लागला.१९९०च्या दशकात कृत्रिम बुद्धिमत्तेबद्दल आस्था वाढत जाऊन आशावाद निर्माण झाला.


कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात असे उतार-चढाव आले,तरीही यशस्वी तंत्रज्ञान विकसित होत आहे.'शीतकाल' कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्राला मिटवू शकला नाही.ती अल्पकालीन स्थिती होती.आज हजारो अनुप्रयोग (अॅप्लिकेशन) कृत्रिम बुद्धिमत्तेच्या संकल्पनेवर विकसित झाले आहेत.


१९९०च्या दशकाच्या उत्तरार्धात आणि एकविसाव्या शतकाच्या सुरुवातीला कृत्रिम बुद्धिमत्तेचे तंत्रज्ञान मोठ्या प्रणालींचा घटक म्हणून वापरले जाऊ लागले.पूर्वी विज्ञानकल्पनेच्या क्षेत्रात असणाऱ्या किंवा वाङ्मयाच्या कपोलकल्पित कक्षेत असलेल्या अनेक नवकल्पनांचे वास्तवात रूपांतरण गेल्या काही दशकांमध्ये झाल्याचे प्रकर्षाने जाणवते.


यंत्रांना किती आणि काय-काय शिकवायचे त्याला कधीतरी मर्यादा येतील,त्यामुळे मानवासारखी विचारशक्ती आणि बुद्धिमत्ता जर यंत्रांमध्ये निर्माण करायची असेल,तर यंत्राच्या स्वयं-अध्ययनाची आवश्यकता भासायला लागली.जॉन हॉपफील्ड आणि डेव्हिड रुमेलहार्ट यांनी गहन अध्ययन (डीप लर्निंग) तंत्र लोकप्रिय केले,ज्यामुळे संगणकांना पूर्वानुभवरून शिकणे शक्य झाले.


मोठ्या प्रमाणातील मजकूर,प्रतिमा,ध्वनिफीत, चित्रफीत यांसारख्या असंरचित माहितीचा संचय यंत्रे गहन स्वाध्यायात करतात.मानवाच्या साहाय्यातेशिवाय पूर्वीचे संदर्भ आणि विद्यमान माहितीच्या आधारे यंत्रे स्वअध्ययन करण्यासाठी सक्षम होतात.


विशेषज्ञ तंत्राचे (एक्स्पर्ट सिस्टिम) जनक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संगणकशास्त्रज्ञ एडवर्ड फीगेनबॉमने मानवाच्या निर्णयप्रक्रियेसदृश तज्ज्ञ प्रणाली सादर केली.


एखाद्या क्षेत्रातील तज्ञाने ठरावीक परिस्थितीत दिलेल्या प्रतिसादाचे रूपांतर संगणक प्रणालीत केले,तर तीच प्रणाली वापरून तज्ज्ञ नसलेली कोणतीही व्यक्ती सल्ला देऊ शकेल,असा त्यामागचा हेतू होता. उद्योग-व्यवसायांमध्ये तज्ज प्रणाली मोठ्या प्रमाणात वापरल्या जाऊ लागल्या.


काय बदल झाला असेल ज्यामुळे कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्राला पुन्हा सोन्याचे दिवस आले असतील,असा प्रश्न मनात येतो.आज्ञावली लिहिण्याचे तंत्र बुद्धिमान झाले?की संगणक प्रणाली तयार करणारे अधिक बुद्धिमान झाले? असे दिसून येते,की संगणकाचे स्मृति-तंत्र सुधारित झाले.


संगणकाची माहिती संचयनाची मर्यादा कृत्रिम बुद्धिमत्ता विकासाला मागे खेचत होती.गॉर्डन मूर ह्यांनी निर्धारित केलेल्या 'मूर नियमानुसार संगणकाची संचयनक्षमता आणि गती दरवर्षी दुप्पट होते.परंतु,मूरने वर्तवलेला वेग आणि संचय प्रत्यक्षात साध्य करण्यासाठी विलंब होत होता.जवळपास तीस वर्षांच्या कालखंडानंतर तंत्रज्ञानाने मूरच्या नियमाला गाठले.


तर्क-वितर्काच्या आधारे कृत्रिम बुद्धिमत्ता संगणकाला विवेकी कार्यासाठी सक्षम करते. १९९७ साली,

'आयबीएम'ने बुद्धिबळात निपुण विशेषज्ञ प्रणालीचा महासंगणक 'डीप ब्लू' निर्माण केला.रशियन ग्रॅण्डमास्टर गॅरी कास्परोव्हला शह देऊन हरवणाऱ्या पहिल्या संगणकाने इतिहास रचला.कृत्रिमरीत्या बुद्धिमान निर्णय घेण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल उचलले गेल्याने,हा सामना सुप्रसिद्ध झाला.


सॉफ्टवेअर विकसित करून विंडोज कार्यप्रणालीवर कार्यान्वित केले.बोलीभाषेचा अर्थ लावण्याच्या दृष्टीने अजून एक पाऊल पुढे पडले.रोबोटिक्स शास्त्रज्ञ सिंथिया ब्रेझिल ने तयार केलेला यंत्रमानव 'किस्मत',

भावना ओळखण्यात आणि प्रदर्शित करण्यात यशस्वी ठरला.


२००५ ते २०१९ दरम्यान वाक् आणि भाष्य अभिज्ञान,

स्वचलित यांत्रिक प्रक्रिया (रोबोटिक प्रोसेस ऑटोमेशन),

वस्तु-आंतरजाल (इन्टरनेट ऑफ थिंग्स),सक्षम निवासस्थान (स्मार्ट होम) तत्सम तंत्रज्ञानाला गती मिळाली.


भाषांतर,संगणकीय प्रतिमा ओळखणे,खेळात निष्णात संगणकप्रणाली यांत बहुतांश प्रगती आणि यश २०१० पासून मिळाले.


२०१२ साली संशोधन आणि उद्योग-व्यवसायांना यंत्र- स्वयंअध्ययन क्षेत्रात स्वारस्य निर्माण झाल्यामुळे कृत्रिम बुद्धिमत्तेकरिता होणाऱ्या गुंतवणूक आणि निधीत आकस्मिक वाढ झाली.


कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षमतेला संगणकीय शक्तीच्या (वेग आणि संचय) पातळीवर आणल्यावर तंत्र हाताळू शकणार नाहीत अशी कोणतीच समस्या उरणार नाही,असे वाटायला लागले. ह्यामुळे कृत्रिम बुद्धिमत्ता संशोधनात आलेल्या उतार-चढावांच्या कारणांना पुष्टी मिळते.


आपण सध्या 'बिग डेटा'च्या युगात आहोत. आपल्याकडे प्रचंड प्रमाणात माहिती गोळा करण्याची क्षमता आहे;परंतु त्यावर प्रक्रिया करणे किचकट आणि गुंतागुंतीचे असते.

मूरचा नियम कदाचित तंतोतंत साध्य होत नसेल;परंतु संगणकीय विदा (डेटा) जमा होण्याचा वेग मंदावलेला दिसत नाही.


निरीक्षण,विश्लेषणक्षमता,समस्यांची उकल, अध्ययन हे कृत्रिम बुद्धिमत्तेचे वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्म समजले जातात.

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने प्रणाली तयार करताना,

गणिती तार्किक पद्धती बुद्धिमत्तेत विलीन होते.ह्या संयोगामुळे अपक्व माहितीमधील वैशिष्ट्य ओळखून,

विश्लेषण करून,प्रतिरूप देता येते.


यंत्र जर मनुष्याची स्वभाववैशिष्ट्ये,क्षमता आणि बौद्धिक शक्ती वेगाने स्वतःत निर्माण करू शकले,तर त्याच्यात कृत्रिम बुद्धिमत्ता आहे असे म्हणता येईल.कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने मानवी बुद्धीप्रमाणे विचार करणारा संगणक, कार्य करणारा संगणक-नियंत्रित यंत्रमानव किंवा सॉफ्टवेअर तयार करता येते.


काही यंत्रे केवळ एकाच विशेष कार्यासाठी तयार केली जातात.कार्याचा विशिष्ट उद्देश समजून घेऊन ते साध्य करण्यासाठी अशी यंत्रे समर्थ असतात उदाहरणार्थ बुद्धिबळात खेळी ओळखून सर्वोत्तम संभाव्य चाल ठरवणारी संगणक प्रणाली तर,काही यंत्रणा साठवलेल्या माहितीच्या आधारे साजेशी गाणी,प्रेक्षणीय स्थळे सुचवतात.


आपल्या घरापासून ते रस्त्यावरच्या गाड्यांपर्यंत सगळीकडे कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर होत असल्याचे दिसत आहे.आपल्या दैनंदिन जीवनावर आणि कार्यावर यंत्रे आणि संगणकांचा परिणाम होत आहे.प्रभाव पडत आहे.कृत्रिम बुद्धिमत्तेचे महत्व वाढण्याचे मुख्य कारण म्हणजे,त्यात नजीकच्या काळात झपाट्याने होणारी उत्क्रांती.स्वचलित यांत्रिक प्रक्रिया (रोबोटिक्स) आणि वस्तु आंतरजाल या तंत्रज्ञानांच्या साहाय्याने आंतरजालग्राही साधने (वेव-एनेबल्ड डिव्हायसेस) स्वतः आकलन करू शकतील,असे कौशल्य त्यांच्यात निर्माण केले जात आहे.


कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्र व्यापक होत आहे.अनेक शाखा- उपशाखांमध्ये विस्तारित होत आहे. तंत्रज्ञान,बैंकिंग,क्रय-विक्रय,शिक्षण,कृषिउद्योग, विज्ञान,आधारभूत संरचना (इन्फ्रास्ट्रक्चर),ऊर्जा अशा अनेक क्षेत्रांकरिता फलदायी ठरत आहे. अनेक अत्याधुनिक अनुप्रयोगांना कृत्रिम बुद्धिमत्तेचा आधार असल्याचे गृहीत धरले जात आहे.


वैद्यकीय क्षेत्रात,लक्षणांवरून रोगनिदान करण्यापासून,

औषधोपचार आणि शस्त्रक्रियेसंबंधित प्रक्रियेपर्यंत फार मोलाची मदत होत आहे.यंत्राच्या साहाय्याने शल्यचिकित्सा करताना किमान छेद देऊन शस्त्रक्रिया करणे संभव होत आहे.तसेच,रुग्णांचे अहोरात्र निरीक्षण करून त्यांना अखंड आरोग्यसेवा देण्यासाठी यांत्रिक मदतनीस म्हणजे चालते-फिरते यंत्रमानव तयार केले जात आहेत.


बैंक आणि वित्तीय संस्थांमध्ये कोट्यवधींची उलाढाल होत असते.तिथल्या आर्थिक व्यवहारांवर कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने लक्ष ठेवले जात आहे.डेबिट / क्रेडिट कार्डावर संशयास्पद किंवा अनपेक्षित व्यवहार आढळले, तर गैरव्यवहारांचा शोध घेणे आणि वेळीच आळा घालणे शक्य झाले आहे.


खेळ आणि मनोरंजन क्षेत्राने तर फारच भरारी घेतली आहे.आपली आवड ओळखून साधने, गाण्यांचा अल्बम आपल्यासाठी तयार करतात. चित्रपट,मालिका सुचवतात.शिवाय आंतरजालावर खेळताना इतर खेळाडूंची आवश्यकता पडत नाही.कारण त्यांची जागा बॉट्सनी घेतली आहे.चित्रालेख (ग्राफिक्स) आणि 'चेतनीकरण'(ॲनिमेशन) प्रगत झाल्यामुळे आभासी वास्तव (व्हर्च्युअल रिअँलिटी) विश्व आपल्या पसंतीप्रमाणे आपल्याला आपल्या उभे करता येते.


मासिक मराठी विज्ञान परिषद पत्रिका,नोव्हेंबर २०२२

वैशाली फाटक-काटकर,माहिती - तंत्रज्ञान तज्ञ

भाग - १