* विजय गायकवाड | Vijay Gaikawad

live

नमस्कार आपले स्वागत आहे. 'सगळे जण तुम्हाला शोधत येतील.आनंदाने तुडुंब भरलेली माणसे सर्वांनाच आवडतात! पण ते तुम्हाला दुःखी,उदास अशा अवस्थेत पाहू शकत नाहीत! तेव्हा आनंदी-हसतमुख रहा आणि मित्रांचा सहवास वाढवा! जर तुम्ही दुःखी राहिलात तर मात्र सगळे जण तुम्हाला सोडून जातील. जीवनातील आनंद-प्रसन्नता भरभरून वाटा! पण एकटे दुःखी रहाल, तर त्या दुःखातच बुडून जाल !' सॉलिट्यूड, ईला व्हीलर विलकॉक्स जगण्याच्या तयारीसाठी नव्हे तर,जगण्यासाठी माणूस जन्माला आला आहे,असं 'बोरिक पास्तरनाक' यांनी म्हटलेलं आहे.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! वाचन हे आहाराहून जास्त महत्त्वाचे असते.जिम र्‍होम यांनी अँथोनी रॉबीन्स यांना शिकवले होते की 'एक वेळ रोजचे जेवण चुकव,पण वाचन अजिबात चुकवू नको.' याप्रमाणे मी अखंडपणे वाचत आहे. माणसांपासून माणसांपर्यंत जाण्याचा,प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाण्याचा जीवनाचा राजमार्ग पुस्तकातून जातो. कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात. पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये. म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,कवी सचिन शिंदे,संतोष शेळके,अनिल फारणे,सहित प्रकाशन,डॉ.रवींद्र श्रावस्ती,डॉ.सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,संजय बापट,मनोहर सुर्वे,विनायक पाटील,संतोष पाटील,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, मेनन पिस्टन रिंग मधील सहकारी मित्र शेखर सुर्यवंशी..। पुस्तकातील घटना प्रसंग हे मी लिखित स्वरूपात सध्या व्हाट्सअप वरती टाकत असतो.हे सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी,पुस्तके देणारी लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत. ... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ. मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. विजय कृष्णात गायकवाड

२०/२/२५

व्यक्ती आणि आग्रह / Person and Urge

काही असो मला वाटतं की,माझा माजी विद्यार्थी जेम्स एल.थॉमसची ही खरी गोष्ट वाचायचा आनंद तुम्हाला नक्कीच मिळेल.


एका ऑटोमोबाईल कंपनीच्या सहा ग्राहकांनी सर्व्हिसिंगचे बिल चुकवायला नाही म्हटले. कुठल्याही ग्राहकाने पूर्ण बिलावर आक्षेप घेतला नव्हता;पण सगळ्यांचे हे म्हणणे होते की,त्यांना जरुरीपेक्षा जास्त बिल दिले गेले होते.बिल कार्डावर प्रत्येक ग्राहकाचे हस्ताक्षर होते.यामुळे कंपनीला माहीत होतं की,त्यांचा दावा खरा आहे आणि कंपनीने हीच गोष्ट ग्राहकांना पत्रात लिहून पाठविली.ही पहिली चूक होती.


क्रेडिट डिपार्टमेंटच्या माणसांनी वसुली करता ही पावलं उचलली.तुम्हाला काय वाटतं की,ते सफल झाले असतील ?


१.कंपनीचे एजंट प्रत्येक ग्राहकाच्या घरी गेले आणि त्यांना साफ साफ सांगितले की,ते त्या बिलाच्या वसुली करता आले आहेत.ज्याचा भरणा बराच काळापर्यंत झाला नाही.


२.त्यांनी हे स्पष्ट सांगितले की,कंपनी पूर्णपणे बरोबर होती,यामुळे ग्राहक पूर्णपणे चूक होते.


३.त्यांनी हे सांगितले की,ऑटोमोबाईलची जितकी समज ग्राहकांना आहे त्याच्यापेक्षा खूप जास्त ऑटोमोबाईल कंपनीला आहे.याकरता ग्राहकांनी वाद घालायला नको.


४.परिणाम : वाद चालत राहिला.


यामधल्या कोणत्यापण पद्धतीने ग्राहक राजी झाला का? आणि त्याने आपले बिल भरले? तुम्हीच याचं उत्तर स्वतःच देऊ शकता.


ज्या स्थितीत क्रेडिट मॅनेजर कायद्याची कारवाई करण्याच्या मूडमध्ये आला होता,तेव्हाच सौभाग्याने हा मामला जनरल मॅनेजरच्या लक्षात आला. मॅनेजरने पैसे न चुकवणाऱ्या ग्राहकांची तपासणी केली आणि त्यांना हा पत्ता लागला की,हे सगळे ग्राहक बहुतेक आपल्या बिलाचे पैसे लगेच चुकते करतात.याकरता या गोष्टीची संभावना होती की, कुठे तरी वसुलीच्या पद्धतीत काहीना काही गडबड झाली आहे.

याकरता त्यांनी जेम्स एल.थॉमसला बोलावलं आणि त्याला सांगितलं की,तो या वसूल न होणाऱ्या बिलांची वसुली करेल.


मिस्टर थॉमसने काय पावलं उचलली हे त्यांच्याच शब्दांत ऐका.


१.प्रत्येक ग्राहकाकडे मीपण एक जुनं बिल वसूल करायला गेलो होतो.एक असं बिल ज्याच्या बाबतीत आम्हाला माहीत होतं की,आम्ही पूर्णपणे बरोबर आहोत;परंतु मी या बाबतीत एकपण शब्द नाही सांगितला.मी सांगितलं की,मी हे माहीत करून आलोय की,कंपनीने त्यांच्या करता काय केलं आणि काय नाही केलं.


२.मी हे स्पष्ट केलं की,जोपर्यंत मी ग्राहकांची पूर्ण गोष्ट ऐकत नाही,तोपर्यंत मी या बाबतीत आपलं मत नाही सांगू शकतं.

मी त्यांना सांगितले की,कंपनी नेहमीच बरोबर नसते आणि कंपनीकडूनपण चुका होऊ शकतात.


३.मी त्यांना सांगितले की,माझी रुची केवळ त्यांच्या कारमध्ये होती आणि आपल्या कारबद्दल आपण जितके जाणतो तितके कोणी दुसरा नाही जाणू शकत.आपल्या कारच्या मामल्यात ते सगळ्यात मोठे विशेषज्ञ आहेत. 


४.मी त्यांना बोलू दिलं आणि मी पूर्ण रस घेऊन आणि सहानुभूतीने त्यांची गोष्ट ऐकत राहिलो.तेच त्यांना हवे होते.


५.शेवटी जेव्हा मित्रत्वाचं वातावरण बनलं,तेव्हा मी पूर्ण मामल्याला त्याच्या विवेक आणि अंतरात्मावर सोडून दिलं.मी आदर्शवादी कारणांचा सहारा घेतला.मी म्हटलं,"आधी मी तुम्हांला सांगू इच्छितो की,मला असं वाटतं की,कंपनीने या प्रकरणाला व्यवस्थितरीत्या नाही सांभाळलं.कंपनीच्या लोकांमुळे तुम्हाला खूपच त्रास आणि असुविधा झाली.असं व्हायला नको होतं.मी माझ्या कंपनीकडून तुमची माफी मागतो.आतापर्यंतच्या चर्चेतून मी समजलो की,तुमच्यात खूप धैर्य आणि समजदारी आहे.याकरता आता मी तुमच्याकडून एक मदत मागतो आहे.दुसरा कोणीच हे काम तुमच्यापेक्षा जास्त चांगल्या पद्धतीने नाही करू शकत.कारण याच्या बाबतीत कोणा दुसऱ्या व्यक्तीपेक्षा तुम्ही जास्त जाणता.हे राहिलं तुमचं बिल.मी तुमच्यावर भरोसा करू शकतो.

याकरता मी हे तुमच्यावर सोडून देतो की,तुम्ही आम्हाला किती देऊ शकता.हे तुमचं बिल आहे आणि तुम्हाला जितके पैसे द्यायचे आहेत तितके देऊ शकता. तुमचा निर्णय आम्हाला मान्य असेल." ग्राहकांनी बिलाचे पैसे पूर्ण चुकवले का ? चुकवले आणि त्यांना असं केल्यामुळे रोमांचक अनुभवपण मिळाला.बिलाची राशी १५० डॉलर्सपासून ४०० डॉलर्समध्ये होती;परंतु काय ग्राहकाने स्वार्थपूर्ण वागण्याचा परिचय दिला? हो त्यांच्यातल्या एकाने असं केलं.एका माणसाने या विवादित पैशाच्या जास्तीत जास्त भरणा केला आणि यापेक्षाही मोठी गोष्ट ही की,या सगळ्या सहा ग्राहकांनी पुढच्या दोन वर्षांत आमच्या कंपनीकडून नवीन कार्स विकत घेतल्यात.थॉमसचं म्हणणं आहे,"अनुभवाने मला हे शिकवलं की,जेव्हा ग्राहकांच्या बाबतीत कोणती माहिती नाही मिळू शकली,तर हे मानणं योग्य होईल की तो इमानदार,गंभीर आहे आणि बिलाचा भरणा करायला इच्छुक आहे;परंतु तेव्हाच जेव्हा त्याला हा विश्वास होईल की,बिल बरोबर आहे.याला वेगळ्या पद्धतीने आणि बहुतेक अधिक स्पष्टपणे याप्रमाणे सांगू शकतो की,ग्राहक बहुतेक इमानदार असतात आणि बिलाचा भरणा करू इच्छितात.या नियमाला खूपच कमी अपवाद असतात आणि माझा विश्वास आहे की,अशा लोकांना जर जाणीव करून दिली की,तुम्ही त्यांना इमानदार समजता,तर ते तुमच्या बरोबर इमानदारीनेच वागतील.


आदर्शवादी सिद्धान्तांचा आधार घ्या.


१८.०२.२५ या लेखामधील दुसरा शेवटचा भाग…

१८/२/२५

व्यक्ती आणि आग्रह / Person and Urge

मी मिसुरीच्या जेसी जेम्सच्या भागात मोठा झालो होतो.मी मिसुरीच्या कियर्नेमध्ये जेम्स फार्ममध्ये गेलो,जिथे जेसी जेम्सचा मुलगा अजूनही राहत होता.त्याच्या पत्नीने मला किस्से ऐकवले की, कोणत्या प्रकारे जेसी ट्रेन्स आणि बँकांना लुटायचा आणि लुटलेल्या पैशांना गरिबांमध्ये वाटून टाकत होता म्हणजे ते त्यांची गहाण ठेवलेली जमीन सोडवू शकतील.जेसी जेम्स स्वतःला त्याच प्रकारे आदर्शवादी आणि परोपकारी समजत होता,जसा की डच शुल्ट्ज,क्राउले किंवा अल केपोन किंवो 'गॉड फादर' समजतात.


खरं तर असं आहे की,तुम्ही ज्या लोकांना भेटता त्यातले जास्त करून स्वतःला चांगले आणि निःस्वार्थ समजतात.


जे.पियरपोंट मॉरगनने एकदा सांगितलं होतं की, कोणतेही काम करण्याच्या मागे माणसाकडे साधारणतः दोन कारणं असतात.पहिलं कारण वास्तविक असतं आणि दुसरं ऐका-बोलायला बरं वाटतं.हे सांगायची जरूरत नाहीये की,प्रत्येक माणूस वास्तविक कारण जाणतो;परंतु आम्ही सगळे लोक आतून आदर्शवादीअसतो म्हणून आम्ही त्या कारणांच्या बाबतीत विचार करणं पसंत करतो जी ऐका-बोलायला चांगली वाटतात.  यामुळे जर तुम्ही लोकांना बदलू इच्छिता,तर आदर्शवादी कारणांचा सहारा घ्या.


काय हा आदर्शवादी उपाय बिझनेसमध्ये कामी येतो?


या बघू या...


ग्लेनोल्डन,पेनसिल्व्हेनियामध्ये फॅरेल-मिशेल कंपनीच्या हॅमिल्टन जे.फॅरेलचंच उदाहरण घ्या. फॅरेलला एका चिडक्या भाडेकरूने घर सोडून जायची धमकी दिली होती.खरं तर करारानुसार त्याला चार महिने तिथेच राहायचं होतं,तरीपण त्याने ही नोटीस दिली होती की,तिथून तत्काळ घर सोडून जातो आहे.करार काहीही झाला तरी.


फॅरलने सांगितलं की,ह्या लोकांनी माझ्या घरात थंडीचा ऋतू घालवलेला होता,जेव्हा घरं पूर्ण वर्षात सगळ्यात महाग असतात.मला माहीत होतं की, शरद ऋतूच्या आधी नवीन भाडेकरू मिळणं कठीण आहे.मी स्वच्छ बघू शकत होतो की,भाड्याची कमाई माझी पूर्ण बुडणार आहे आणि विश्वास ठेवा मी पूर्णपणे वेडा झालो होतो.


खरं तर मी असं केलं असतं की,मी त्यांच्याकडे जाऊन त्याला लीजचा करार परत वाचायचा सल्ला दिला असता.मी सांगितलं असतं की,जर त्याने घर रिकामं केलं तर त्याला पूर्णच्या पूर्ण भाडे एक रकमेत चुकवावं लागेल आणि मी न्यायाचा उपाय करून त्याच्याकडून पैसे वसूल करू शकलो असतो आणि मी तेच केलं असतं.पण मी रागानी वाद वाढवण्याऐवजी दुसऱ्या टेक्निकचा उपयोग करण्याचा निश्चय केला.मी म्हणालो की,मिस्टर डो, मी तुमची गोष्ट ऐकली आहे आणि मला अजून पण विश्वास बसत नाही की तुम्ही घर रिकामं करताय. अनेक वर्षांपासून भाड्यानी घर देण्यामुळे मला मानवी स्वभावाचं बरंच ज्ञान झालं आहे आणि तुम्ही जेव्हा हे घर घ्यायला आले होते तेव्हाच मी पाहिलं होतं की,तुम्ही वचनाचे पक्के आहात.मला आताही असंच वाटतं म्हणून मी तुमच्या समोर हा जोखमीचा प्रस्ताव ठेवतो आहे.


हा राहिला माझा प्रस्ताव,यावर काही दिवस विचार करा आणि मगच मला उत्तर द्या.जर तुम्ही पहिल्या तारखेपर्यंत येऊन मला हे सांगाल की,तुम्ही अजूनही घर सोडू इच्छिता तर मग मी तुम्हाला वचन देतो की,मी तुमच्या निर्णयाला शेवटचा निर्णय मानेन.मी तुम्हाला जाऊ देईन आणि हे मानेन की, तुमच्याबद्दलची माझी समजूत खोटी होती;परंतु माझा अजूनही विश्वास आहे की,तुम्ही आपल्या वचनाचे पक्के आहात.तुम्ही कराराचे पालन कराल. आपण तर माणूस आहोत किंवा बंदर आणि पर्याय निवडणं बहुतेक आपल्या हातात असतं.पुढच्या महिन्यात तो भाडेकरू आला आणि त्याने मला आपणहून भाडं दिलं.त्यांनी सांगितलं की,त्याने आणि त्याच्या पत्नीने यावर चर्चा केली आणि थांबण्याचा निर्णय घेतला.ते या निष्कर्षावर आले की,त्यांच्या सन्मानाला वाचवण्याचा त्याच्याजवळ हाच एकुलता एक उपाय होता की,ते लीजच्या करारानुसार चालतील.


जेव्हा लॉर्ड नॉर्थक्लिफला नको होतं की,पेपरवाले त्याचा एक खास फोटो प्रकाशित करतील,तर त्यांनी संपादकाला एक पत्र लिहिलं.पत्रात काय त्यांनी लिहिलं होतं 'कृपया माझा तो फोटो छापू नका, कारण मी त्या फोटोला पसंत करत नाही?

'नाही, त्यांनी एक आदर्शवादी गोष्ट सांगितली.त्यांनी प्रत्येक माणसाच्या मनात असलेल्या आईच्या प्रती प्रेम आणि सन्मानाच्या भावनेचा सहारा घेतला. त्यांनी लिहिलं,'कृपा करून माझा तो फोटो छापू नका.तो फोटो माझ्या आईला पसंत नाही आहे.' जॉन डी.रॉकफेलर ज्यूनियरला आवडत नव्हतं की, पेपरवाले कॅमेरामन त्यांच्या मुलांचे फोटो घेतील. त्यांनी हे नाही सांगितले की,मला माझ्या मुलांचे फोटो घेतलेले आवडत नाहीत.नाही त्यांनी आपल्या आतल्या आवाजाचा सहारा घेतला जो मुलांच्या नुकसानापासून वाचवतो.त्यांनी हे सांगितले की, तुमच्यापैकी अनेक लोकांची मुले असतील आणि तुम्हाला तर माहीतच आहे की,मुलांचा इतका प्रचार होणं त्यांच्या दृष्टीनं चांगलं नसतं.


प्रत्येक व्यक्ती ही आग्रह पसंत करते.मित्र जोडा आणि प्रभावशाली बना,डेल कार्नेगी,अनुवाद- कृपा कुलकर्णी,मंजुल प्रकाशन.


मॅनचा गरीब मुलगा रायरस एच के. कर्टिस जेव्हा आपलं करियर सुरू करत होते ज्यात त्यांना द सॅटरडे इव्हनिंग पोस्ट आणि लेडिज होम जनरलचा मालक करून करोडोंची कमाई करून दिली.ते आपल्या लेखकांना तितके पैसे देऊ शकत नव्हते, जितके त्यांचे प्रतिस्पर्धा देऊ शकत होते.ते फक्त पैशांकरता प्रसिद्ध लेखकांकडून लेख लिहून घेऊ शकत नव्हते.याकरता त्यांनी आदर्शवादाचा सहारा घेतला.

उदाहणार्थ,त्यांनी लिटील विमेनची अमर लेखिका लुईसा मे अल्कॉटलापण आपल्या समाचार पत्रात लिहिण्याकरता राजी केलं आणि त्यांनी हे तेव्हा केलं जेव्हा ती आपल्या प्रसिद्धीच्या शिखरावर होती.त्यांनी हे कसं केलं? शंभर डॉलरचे चेक देऊन जो त्यांचा नाही;पण त्यांच्या फेव्हरेट चॅरिटीच्या नावावर होता.


संदेहवादी व्यक्ती इथे हे सांगू शकते की,हे सगळं नॉर्थकिफ आणि रॉकफेलर किंवा कुण्या भावूक कादंबरीकाराकरता योग्य असू शकेल; पण मी हे बघणं पसंत करेन की,हे त्या कठोर लोकांच्या बरोबर कसं सफल होईल,ज्यांच्याकडून मला वसुली करावी लागते.


तुमचं बरोबर असू शकतं.कुठलाही सिद्धान्त सगळ्या बाबतीत सफल होत नाही.प्रत्येक व्यक्तीला लागू पडत नाही.जर तुम्ही त्या परिणामांपासून संतुष्ट आहात जे तुम्हाला आज मिळत आहे,ते तुम्हाला बदलायची काय गरज आहे? परंतु जर तुम्ही असंतुष्ट आहात तर हा प्रयोग करून बघायला काय हरकत आहे?


राहिलेला शिल्लक भाग पुढील लेखांमध्ये…!

१६/२/२५

मोठी माँ / elder mother

'वाचून वाचून डोळे दुखायला लागलेत' असं कुणी तरी म्हणाल्याचं मोठी माँनी ऐकलं मात्र,लगेच त्याच्यावर उपचार करण्याचं त्यांच्या मनाने घेतलं.शोधता शोधता त्यांना कधी तरी,कुणातरीसाठी आणलेली डोळ्यांच्या मलमाची ट्यूब सापडली.ट्यूब पाचसात वर्षांपूर्वी आणलेली होती. .माँना औषधांच्या एक्सपायरी डेटची माहिती असण्याचं काहीच कारण नव्हतं.त्यामुळे परीक्षेच्या काळात मुलांच्या डोळ्यांना आराम मिळावा ह्या प्रेमळ हेतूने त्या ट्यूबचं मलम मुलांच्या डोळ्यांत घालण्याचा घाऊक कार्यक्रम माँनी हाती घेतला.डोळे दुखणाऱ्या वा न दुखणाऱ्या प्रत्येक डोळ्यात ट्यूबचं मलम घातलं गेलं.ट्यूबमधलं मलम संपेपर्यंत माँ थांबल्या नाहीत.सगळ्यांच्या डोळ्यांची त्यांच्या दृष्टीने त्यांनी काळजी घेतल्यानंतरच त्यांनी समाधानाने श्वास घेतला.डोळ्यांत मलम घालून मुलं जरा लवकरच झोपली.दुसरा दिवस परीक्षेचा होता.


सकाळी पहिला मुलगा उठला तो चाचपडतच.त्याला काहीच दिसत नव्हतं.भरभर बाकीची मुलंही उठली किंवा उठवली गेली असावीत.कुणालाच काहीही दिसत नव्हतं.वाड्यात सगळीकडे हलकल्लोळ माजला.ही बातमी थोड्याच वेळात गल्लीत आणि आणखी थोड्या वेळात गावभर पसरली.सगळीकडे एकच खळबळ माजली.गावात आय स्पेशालिस्ट नव्हताच.म्हणून जनरल डॉक्टरांना बोलावलं.त्यांनी सगळ्यांचे डोळे तपासले.

औषध दिलं. 'डोळ्यांत जाऊन बसलेला चिकट मलम हळूहळू बाहेर पडल्यावर दोन दिवसांनंतर व्यवस्थित दिसू लागेल' असं त्यांनी म्हटलं,तेव्हा सगळ्यांनी सुटकेचा निःश्वास टाकला.


पाचच मिनिटांत पुढचा प्रश्न सगळ्यांना आठवला तो म्हणजे आजच्या आणि उद्याच्या परीक्षेचं काय ? सकाळी सकाळीच बाबाजी आणि बापू शाळेच्या हेडमास्तरांना आणि संस्थेच्या विश्वस्तांना भेटायला गेले. विचारान्ती प्रत्येक मुलाला एक एक लेखनिक देण्याचं ठरलं आणि मग एकच धांदल उडाली.दहाबारा लेखनिकांच्या शोधार्थ घरची मंडळी बाहेर पडली. सुदैवाने गावात असलेल्या दुसऱ्या शाळेच्या परीक्षा मागच्या आठवड्यातच संपल्या होत्या. त्यामुळे थोड्याशा शोधानंतर प्रत्येकाला लेखनिक मिळाला. दहाबारा लेखनिक एका एका मुलाला धरून रांगेत वाड्याबाहेर पडण्याचं विलक्षण दृश्य पाहण्यासाठी सगळी गल्ली जमली होती. ही ऽऽऽ लांबलचक प्रभात फेरी शाळेत पोहचली तेव्हा कुठे सगळ्या वाड्याला हायसं वाटलं.मारवाडी समाज सर्वत्र पसरला असला तरी त्याची मुळं राजस्थानात आहेत. 


यशाच्या लहानपणी मारवाडमधून त्या समाजाचे भाट यायचे.ह्या भाट लोकांचं बोलणं वैशिष्ट्यपूर्ण असायचं.ते गाण्याच्या स्वरूपात बरंचसं संभाषण करायचे.येताना ते चॉकलेटच्या फ्लेवरचा चहा वगैरे वस्तू विकायला आणायचे.ह्या भाटांना सुमारे पंचवीस कुटुंबं नेमून दिलेली असत.त्या त्या कुटुंबात दोनदोन दिवस राहून ते त्या कुटुंबांच्या वंशावळीची त्यांच्या जवळच्या चोपड्यांत नोंद करीत.

भाट परत जाताना त्यांना कुटुंबातील लोक धान्य,पैसे वगैरे देत.

हळूहळू भाट येण्याची पद्धत कमी कमी होत गेली.त्यामुळे काही कुटुंबांत कुटुंबातलीच एखादी व्यक्ती वंशवृक्षाची नोंद करते.


यशाच्या वाड्यात राहणाऱ्या कुटुंबाच्या नोंदी यशाचा मित्र शांतिलाल करायला लागला.यशाच्या माहितीप्रमाणे त्याच्याजवळ भाटाकडून लिहून घेतलेल्या नोंदीवरून कुटुंबाच्या सुमारे तीनशे वर्षांपासूनच्या पूर्वजांची नावं लिहिलेली आहेत.वाड्यातली दोन्ही कुटुंबं इतकी एकरूप झाली की,एकमेकांच्या खाण्यापिण्याच्या सवयीदेखील अंगीकारल्या गेल्या.पापडांची मेथ्या घालून केलेली भाजी किंवा डालबाटी आता यशाच्या वाड्यावरही सर्रास होऊ लागली.कणकेत गूळ घालून भज्यांसारखे गोळे करून तळलेले गुलगुले यशाला आणि त्याच्या बहिणींनाही फार आवडत.बाबाजी त्यांच्या समाजाच्या तुलनेने त्यावेळी आर्थिकदृष्ट्या अति समृद्ध नसले तरी नियत,दिलदारी ह्या निकषांवर त्यांना समाजात फार मान होता.दर रंगपंचमीला समाजातील प्रतिष्ठित मंडळींना बाबाजी घरी बोलवत.सगळे एकत्र पोटभर भजे-गुलगुले खात.प्रकाश आणि शांतिलालमुळे मारवाडी समाजाच्या धार्मिक गोष्टींची यशाला बरीच माहिती झाली.त्याची धाकटी बहीण मुक्ता तर बाबाजींच्या बरोबर बऱ्याच वेळा स्थानकातदेखील जाई. 


नवकार मंत्रासारखे छोटे छोटे धार्मिक श्लोक / मंत्र तिचेही पाठ झाले होते.नवकार मंत्रात भगवान महावीर, गुरू अशा आराध्य दैवतांना वंदन करून शेवटी सर्वे सुखिनःसन्तु अशी पसायदानासारखी प्रार्थना केलेली आहे.जैन धर्मियांचे धर्मासंबंधी नियम 'आगम' ह्या ग्रंथात नमूद केले आहेत.बाबाजींच्या आदर्शाखाली सगळं कुटुंब हे नियम पाळत असतं.


सामाईक म्हणजे तोंडाला मुँहपत्ती बांधून नवकार किंवा इतर मंत्रांचं पठण होत असे.ह्या सामाईकाचा वेळ 'आग्रम' मध्ये नमूद केल्यानुसार ४८ मिनिटांचा असे. माणसाचं शरीर आणि मन हे ४८ मिनिटांपर्यंत स्थिर राहू शकतं असा समज असल्याने सामाईकचा वेळ तेवढाच ठेवलेला आहे.


बाबाजींप्रमाणेच मोठी माँसुद्धा फार धार्मिक होत्या. त्यांची दररोजची सामाईक कधीच चुकली नाही. सूर्यास्ताच्या आत जेवणं करणं,त्याला ते ब्याळू म्हणत,हा नियमसुद्धा त्या बारा महिने पाळत.स्थानकात गुरुमहाराजांचा मुक्काम असला की,त्यावेळी मोठी माँ नियमितपणे प्रवचन ऐकायला जात.हे गुरुमहाराज घरोघरी जाऊन भिक्षा मागून जेवत असत.


असेच एकदा एक गुरुमहाराज स्थानकात वस्तीसाठी आले होते.पावसाळा असल्याने त्यांचा मुक्काम नेहमीपेक्षा मोठा होता.

जैन मुनींच्या समूहातल्या मुख्य मुनींनी मनात एक संकल्प सोडला होता आणि तो पूर्ण होईपर्यंत अन्नग्रहण करणार नाही असं ठरवलं होतं. दररोज गावात आलेले चार जैन मुनी गावातील प्रतिष्ठित व्यक्तींबरोबर भिक्षेसाठी घरोघरी जात.वेगवेगळ्या घरातील कुटुंबीय मुनींचा उपवास आपल्यामुळे सुटावा ह्या भावनेने वेगवेगळे अंदाज बांधत.कुणी दहा अनाथांना सांभाळेल तर कुणी धर्मशाळा बांधील वगैरे सांगून प्रयत्न करीत.पण मुनींच्या संकल्पाचा अंदाज कुणालाच येत नव्हता.सर्व समाजात हा चर्चेचा विषय झाला होता. किंबहुना चिंतेचा विषय झाला होता.


मुख्य मुनींच्या अन्नत्यागाचा आजचा बारावा दिवस होता.दुपारी बाराच्या सुमारास चारही जैन मुनी इतर प्रतिष्ठित व्यक्तींबरोबर वाड्यात शिरले.बाबाजी आणि मोठी माँबरोबर सगळं कुटुंब त्यांच्या स्वागतासाठी उभं होतं.यशाच्या घरचेही सगळे तिथे उत्सुकतेने गेले. अचानक बुरख्याच्या आडून मोठी माँ म्हणाल्या,


"महाराज आपण आमच्या घरी अन्न घेतल्यास आम्ही दोघे ह्यापुढे आयुष्यभर ब्रह्मचर्य व्रत पाळू !"


मुनींच्या चेहऱ्यावर हास्य पसरलं.ते म्हणाले,"हाच माझा संकल्प होता.तुम्ही दोघे आज एकमेकांशी बोला. आम्ही उद्या परत येऊ.तुमचा निर्णय पक्का असेल तर उद्या आम्ही तुमच्याकडचं अन्न घेऊ."


मोठी माँ तेव्हा फक्त पंचेचाळीस वर्षांच्या होत्या आणि बाबाजी पन्नाशीचे.एकदा मुनींचा संकल्प समजल्यावर त्यासाठी आणखी चोवीस तास थांबणं साध्याभोळ्या आणि निष्पाप प्रेमळ माँना अयोग्य वाटलं. त्या म्हणाल्या,"उद्यापर्यंत कशाला थांबायचं ?


तुमच्या सगळ्यांच्या समक्षच त्यांना विचारते,त्यांना माझा हा विचार मान्य आहे का म्हणून.गावातल्या प्रतिष्ठितांसमोर अवघडलेल्या बाबाजींनी माँना नकार दिला नाही.मुनींनी माँच्या हातून अन्नदान स्वीकारून आपला उपवास सोडला.


महात्मा गांधींच्या ब्रह्मचर्यव्रताची आणि सत्याच्या प्रयोगाची जगभर चर्चा झाली.वाहवा झाली. आजही होतेय. पण यशाच्या लहानशा गावातील नव्हे,यशाच्या वाड्यातील सात्त्विक मोठी माँनी एका सात्त्विक अतिथीच्या अन्नग्रहणासाठी आयुष्यातला मोठा निर्णय घेऊन अतिथिधर्माचा एक आदर्श सर्वांच्यापुढे ठेवला होता !


१४.०२.२५ या लेखातील शेवटचा दुसरा भाग…।!

१४/२/२५

मोठी माँ / elder mother

गावातला बापूंचा वाडा प्रसिद्ध वाड्यांपैकी एक होता. गल्लीच्या मध्यभागी चौसोपी असा भव्य वाडा प्रथमदर्शनीच मोठा प्रेक्षणीय वाटे.बघताक्षणीच त्याची छाप पडे.गल्लीत महादेवाचं,दत्ताचं आणि मारुतीचं अशी तीन देवळं होती.पण गावात दुसऱ्या एका परदेशी गल्लीच्या जवळच्या गल्लीतसुद्धा तीन देवळं होती. म्हणून तिला 'तीन देवळांची गल्ली' म्हणत.पूर्वी बापूंच्या वाड्याच्या गल्लीला 'देशपांड्यांची गल्ली' असं नाव होतं.बहुदा पूर्वी गल्लीत बहुसंख्य देशपांड्यांची घरं असावीत.बापूंचा वाडा हा खरं तर त्यांच्या पहिल्या पत्नीच्या वडिलांचा.त्यांचंही आडनाव देशपांडेच.ते गेल्यावर हा एवढा मोठा वाडा सुनसान पडला होता. बापू रेव्हेन्यू खात्यात होते.त्यामुळे दर पाच वर्षांनी त्यांच्या बदल्या होत.

जिल्ह्यातल्या एकूण एक तालुक्याच्या गावी त्यांचं वास्तव्य झालं.रिटायरमेंटनंतर सध्याच्या गावी राहायला जायचा विचार असल्याने बापूंनी तो कुलूपबंद ठेवला होता.गावातल्याच काही उपद्रवी मुलांनी बाहेरच्या भिंतींवर खोडसाळपणे मोठ्या अक्षरांत 'भुताचा वाडा' असं लिहून ठेवलं होतं.


बापू चांदवडला मामलेदार म्हणून काम करत असतानाची गोष्ट.

एका रविवारी ते माईंबरोबर बोलत असताना सकाळीसकाळी दोन तरुण भेटायला आले. त्यांनी त्यांची ओळख सांगितली.बापूंना जिल्ह्यातल्या जवळजवळ सगळ्या महत्त्वाच्या कुटुंबांची माहिती होती.शिवाय त्यांची स्मरणशक्तीसुद्धा विलक्षण तीक्ष्ण असल्याने त्यांची माहिती सविस्तर आणि विश्वसनीय असे.ह्या तरुणांनी ओळख सांगताच ते भाईजींच्या पाच मुलांपैकी दोन मोठे असल्याचं बापूंच्या लगेच लक्षात आलं.भाईजी हे मारवाडी समाजातील एक सज्जन व्यापारी होते.सध्या धंद्यातील चढउतारांमुळे कुटुंबाची आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नव्हती.भाईजींच्या आयुष्यात एक दुर्दैवी घटना घडल्याचंही बापूंच्या कानावर आलं होतं.त्या काळी जिल्ह्यामध्ये एका दरोडेखोराने भयंकर उच्छाद मांडला होता.तो व्यापाऱ्यांच्या कुटुंबावर दरोडे घाली.लुटालूट करी. नुसतीच लुटालूट करत नव्हता तर जाताना कुटुंबप्रमुखाचं नाक वस्तऱ्याने कापून मगच तिथून निघून जात असे. 'त्या नाकांची माळ करून ती मी नासिक इथल्या सरकारवाड्याला घालीन!' असा पण त्याने केला होता म्हणे ! एका छोट्याशा गावात सचोटीने व्यापार करणाऱ्या भाईजींच्या घरावर त्या दरोडेखोराने दरोडा घातला.लुटीबरोबर त्याने भाईजींचं नाकही कापून नेलं.त्या दोघांनी आपलं इथे येण्याचं कारण बापूंना सांगितलं. त्यांना राहायला जागा हवी होती.बापूंनी विचार केला, कुटुंब माहितीतलं आणि चांगलं आहे.त्यांच्या इथे राहण्यामुळे वाडाही वावरता राहील.आपोआपच देखभालही होईल.म्हणून त्यांनी वाडा भाड्याने दिला. मात्र काही वर्षांनी आपण निवृत्त झाल्यावर इथेच राहायला येणार हे लक्षात घेऊन त्यांनी वाड्याचा दर्शनी भाग स्वतः साठी राखून ठेवला आणि मागचा अर्धा भाग त्या मुलांना भाड्याने दिला.बापू निवृत्त होऊन तिथे राहायला जाईपर्यंत ते मारवाडी कुटुंब तिथे चांगलं स्थिरावलं.

नुसतंच स्थिरावलं असं नाही तर विस्तारलंसुद्धा.भाईजी आणि आजी ह्यांना एकूण पाच मुलं.त्या मुलांनाही बरीच मुलं.त्यात बापूंच्या तिघांची भर पडून अंदाजे पंधराएक मुलं तरी त्या वाड्यात झाली.गावगोत - माधव सावरगांकर,प्रकाशक संजय शिंदे,अष्टगंध प्रकाशन,ठाणे…!


भाईजींच्या थोरल्या मुलाला घरात बाबाजी म्हणत.बापू आणि गावातले काही लोकही त्यांना बाबाजीच म्हणत. बापूंची मुलं कधी त्यांना बाबाजी तर कधी मामाजी म्हणत.बाबाजी एक आदर्श कुटुंबप्रमुख होते.आपल्या आणि आपल्या भावांच्या कुटुंबात किंवा त्यांच्या मुलांत त्यांनी कधीच भेदभाव केला नाही.मधल्या दालनात भिंतीला टेकून बसलेले आणि आजूबाजूच्या वेगवेगळ्या वयांच्या आणि इयत्तांच्या मुलांचा अभ्यास घेणारे बाबाजी आजही यशाच्या डोळ्यांसमोर येतात.पाची भावांचा आपसातला एकोपाही वाखाणण्याजोगा होता.एवढ्या मोठ्या कुटुंबात बायका-बायकांत अथवा मुलांमध्ये कुरबुरी होणं स्वाभाविक होतं.पण त्या भावांपर्यंत कधीच पोहचत नसत आणि पोहचल्या तरी पाची भाऊ त्याचा ना आपसात उल्लेख करत ना त्यांचा एकमेकांशी असलेल्या संबंधावर कधी परिणाम झाला.


सगळ्यात मोठी सून म्हणजे बाबाजींची पत्नी.म्हणजे मोठ्या बिन्नी.सगळी मुलं त्यांना 'मोठी माँ' म्हणत. बापूंची मुलं त्यांचा उल्लेख 'मोठ्या बिन्नी' असा करत असली तरी त्यांना संबोधताना 'मोठी माँ' असंच म्हणत.


पिवळा किंवा लाल घागरा,त्यावर तशीच गर्द रंगाची ओढणी असा मोठी माँचा पेहराव असे.सगळ्या वाड्यात आणि कुठल्याही विषयांत त्यांचा मुक्त संचार असे. मोठी माँच्या हालचालीदेखील खूप चपळ असत. त्यामुळे बापू त्यांना गमतीने 'पंजाब मेल' म्हणत.बापूंचा सगळ्या वाड्यात चांगलाच दरारा असे.कुठे बाहेरगावी जाताना किंवा जाऊन आल्यावर अथवा कुठल्याही सणावाराला त्यांच्या घरातलीच काय,पण मारवाडी कुटुंबातली सगळी मंडळी प्रथम बापूंना नमस्कार करत. बापूंना नमस्कार करणं हासुद्धा एक समारंभच असे.


बापू ओसरीवर बनियन-धोतर नेसून पेपर वाचत अथवा पान खात बसलेले असत.कुणी नमस्कार करायला आला की,बापू सावकाश उठत.खुंटीवरची टोपी काढून डोक्यावर ठेवत.नंतर नमस्कार स्वीकारून तोंड भरून आशीर्वाद देत.मोठी माँचा मात्र खाक्याच वेगळा.त्या नेहमीप्रमाणे घाईघाईने येत.

खुंटीवरची टोपी काढून बापूंच्या डोक्यावर ठेवत.

नमस्कार करीत आणि बापूंच्या डोक्यावरून टोपी काढून परत खुंटीवर ठेवत.कधी कधी बापूंचा आशीर्वाद संपेपर्यंत मोठी माँ वाड्याच्या बाहेरच्या अंगणात गेलेल्या असत. 


सर्व मुलांवर सुलतानाप्रमाणे मोठी माँची अनिर्बंध सत्ता चालत असे.परसदारी आडाजवळच्या मोरीत मुलांना आंघोळी घालणं हा तर जुल्माचा अतिरेक असायचा. दिसलं पोरगं की,धर त्याला नि घाल दोन तांबे त्याच्या अंगावर,असा मोठी माँचा कार्यक्रम असे.

शंकर तर म्हणे, 'ह्या कामाच्या सपाट्यात कधी एखादुसऱ्या मुलाला त्या दोनदोनदा आंघोळ घालत असतील !'


मोठी माँ स्वभावाने मात्र फारच मऊ होत्या.एवढ्या तेवढ्या गोष्टींनी त्यांच्या डोळ्यांत टचकन् पाणी येई. माँचं वाड्याच्या बाहेर पडणं फारसं होत नसे.फक्त गावात गुरुमहाराज आले की,त्या प्रवचनाला, स्थानकात (जैनांचं प्रार्थनास्थळ) नियमित जात.दर शिवरात्रीला मात्र वाड्यातल्याच पंधरावीस मुलांचा घोळका बरोबर घेऊन त्या एसटी स्टँडजवळच्या गुऱ्हाळात उसाचा रस प्यायला घेऊन जात.मोठी माँ स्वतः फारशा शिकलेल्या नव्हत्या.पण बाबाजींचं सगळ्या मुलांना दररोजचं जवळ बसवून शिकवणं आणि घरातल्या दहाबारा मुलांचं शाळेला जाणं किंवा मुलांचं घरातल्या मोकळ्या आणि शांत जागी अभ्यास करत असलेलं दृश्य नेहमी दिसत असल्यामुळे माँना शिक्षणाचं महत्त्व चांगलंच माहीत होतं. त्यांचा स्वतःचा मुलगा शांतिलाल आणि मुलगी पुष्पा खूप हुशार होते. शिवाय प्रकाश आणि मदन हे दोघे पुतणेही अभ्यासात फार पुढे होते.शांतिलाल आणि प्रकाश हे यशाच्या बरोबरीचे.प्रकाश तर बहुतांशी बापू राहत असलेल्या भागातच असायचा.त्याला यशाच्या घरची कालवणं आवडायची.प्रकाश त्याच्या घरातून ताट वाढून घेऊन यायचा आणि यशाच्या पंक्तीला बसायचा. दोन्ही घरांचा घरोबा दृष्ट लागण्यासारखा होता.पुढच्या पिढीनेही तो जपला.एकदा फारच मजेशीर प्रसंग घडला. वार्षिक परीक्षा जवळ आली होती. 


वाड्यावरची सगळी मुलं कसून अभ्यासाला लागली होती.मोठी माँ सगळ्या मुलांची काळजी स्वतःघेत होत्या किंवा इतर जावांकडून करवून घेत होत्या.त्यात पहाटे उठणाऱ्या मुलांना चहा देणं,त्यांच्या जेवणाची वेळ सांभाळणं,रात्री त्यांना आठवणीने दूध देणं वगैरे बाबी असत.परीक्षा एका दिवसावर आली होती.


शिल्लक भाग पुढील लेखामध्ये….!

१२/२/२५

ओक अजस्र भेदरट / oak eternal tree

मी ज्या जंगलाची व्यवस्था सांभाळतो त्यातून हिंडताना मला काही धोक्यात सापडलेले ओक वृक्ष दिसतात. काही वेळा ते खरंच खूप त्रासात असतात.त्यांच्या पायाकडच्या भागात शोषण करणाऱ्या पानाच्या तुऱ्यांची वाढ चालू झाली की ओक वृक्षाची मृत्यूशी झुंज चालू झाली असे समजावे.यातून ओक बिथरलेला, घाबरलेला असल्याचे दिसते.झाडांच्या बुंध्याला जमिनीच्या बाजूकडे पाने फुटे लागतात.हे पानांचे झुबके बुंध्याला चहूबाजूंनी घेरून उगवतात.पण जास्त काळ ती टिकू शकत नाही,लवकरच गळून पडतात.कारण तिथे सूर्यप्रकाश पोचत नाही.त्यांना फक्त लख्ख प्रकाशात प्रकाशसंश्लेषण करता येते.त्यामुळे या अंधारात वाढणाऱ्या पानांना सूर्यप्रकाश मिळत नाही आणि लवकरच ती गळून जातात.एखादं सशक्त झाड अशा प्रकारची बुंध्याशी वाढ करण्यात शक्ती वाया घालवत नाही.आपली उंची वाढवण्यात त्याला अधिक रस असतो.झाडाला शांतता मिळाली की त्याची उंची वाढत राहते.पण मध्य युरोपीय जंगलातून ओक वृक्षांना तशी शांतता नसते.कारण या इथे बीच वृक्षांचे राज्य चालते.स्वजातीयांबरोबर बीच मनमिळावू असतात,पण ओक सारख्या इतर प्रजातींना ते छळून कमकुवत करतात.


जो पक्षी बीचचे बीज मातीत पुरून ठेवतो आणि तिथून त्या बीच वृक्षांची अरेरावी सुरू होते.त्या पक्ष्याला भरपूर खाद्य मिळत असल्यामुळे काही बिया तो पुरून ठेवतो. काही काळानंतर ती बी रुजते आणि बीचचे रोपटे जमिनीतून वर डोकावते.काही दशकं ते शांतपणे वाढत राहते,तोपर्यंत त्याची जाणीव होत नाही.त्या रोपट्याची आई कुठेतरी दूरवर असते पण ओक वृक्ष त्याला निरागसपणे सावली आणि सुरक्षा पुरवीत असतो. जमिनीवर सलोख्याचे संबंध असलेले भासते मात्र बीच आणि ओक वृक्षात जमिनीखाली जगण्याची झटापट चालू होते.


ओकची मुळे नसतील तिथे सगळीकडे बीच आपली मुळे पसरवत राहते.त्यातून अन्न आणि पाणीपुरवठा स्वतः कडे खेचून घेतला जातो आणि यामुळे ओक वृक्ष कमकुवत व्हायला लागतो.साधारण दीडशे वर्षांत त्या बीचची उंची ओकहून जास्त होते.आता त्याला सूर्यप्रकाश थेट मिळू लागतो आणि जोमाने वाढ होण्याची शक्ती येते.आपल्या डौलदार पसाऱ्याचा उपयोग करून घेत ९७ टक्के सूर्यप्रकाश तो स्वतःकडे खेचून घेतो आणि ओक वृक्ष दुय्यम दर्जाचा होऊन जातो.त्याचे साखर उत्पादन एकदम कमी होऊ लागते, बचत केलेली ऊर्जा वापरावी लागते आणि हळूहळू ओक अन्नापासून वंचित राहतो.


आता त्याला लक्षात येते की आपल्याला बीचहून उंच वाढता येणार नाही.या भीतीपोटी ओककडून एक चूक होते.ती म्हणजे तो आता नियमाविरुद्ध जाऊन आपल्या पायाशी नवीन फुटवे आणि पाने उगवू लागतो. ही पालवी मोठी आणि मऊ असते व त्याला कमी सूर्यप्रकाश चालून जातो.पण ३ टक्के सूर्यप्रकाश फारच कमी पडतो,कारण तो ओक वृक्ष आहे,बीच नव्हे.आणि काही काळातच ही पालवी झडून जाते व त्यांना तयार करण्याची शक्ती वाया जाते.अशा उपासमारीच्या स्थितीत ओक अजून काही दशकं तग धरू शकतो पण त्यानंतर मात्र त्याची ताकद संपते.आता लाकडात भोक पाडणारे कीटक (वुड बोरिंग बीटल) त्याची सुटका करून देण्यास सरसावतील.हे बीटल आपली अंडी ओकच्या सालात घालतात आणि त्यातून निघणाऱ्या अळ्या झाडाची त्वचा फस्त करण्यास सुरुवात करतात.


तर मग हा खरंच एक अजस्र ओक आहे का एक अगडबंब भित्रा आहे? इतकं दुर्बळ झाड अविचल आणि दीर्घायू असल्याचं कसं भासतं? बीचच्या वृक्षांमध्ये ओक कितीही दुर्बल दिसत असला तरी स्पर्धक नसले की मात्र तो एकदम राकट असतो.आपल्या स्वजातीयांच्या कुशीत उगवलेला बीच फार फार तर दोनशे वर्षे जगतो. पण शेताच्या कडेला उघड्यावर उगवणारा ओक वृक्ष मात्र पाचशेच्या वर वर्ष जगू शकतो.ओक वृक्षाला जर विजेचा धक्का बसून मोठी जखम झाली किंवा त्याचं खोड दुभंगलेलं असेल तर काय होते?


ओकला याचा फार त्रास होत नाही कारण त्यात टॅनिन नावाचे रसायन तयार होते ज्यामुळे जखमेत बुरशीला पोषक वातावरण नसतं आणि बुरशीची विघटन प्रक्रिया संथ होऊन जाते.या टॅनिनमुळे अनेक कीटकही परावृत्त होतात आणि याच टॅनिनमुळे वाइनची चवही खुलते (ओकच्या लाकडापासून बनवलेल्या पिपात वाईन मुरायला ठेवली जाते). जरी मुख्य फांद्या तुटल्या आणि झाडाला खोल जखमा असल्या तरी ओक वृक्ष पुन्हा आपली पालवी पुनरुज्जीवित करू शकतात


आणि अजून एखादं शतकभर तरी तग धरतात.बहुतांश बीच वृक्ष असे करू शकणार नाहीत आणि स्वतःच्या जंगलाच्या बाहेर तर नक्कीच नाही.वादळाने झोडपलेलं कमकुवत झालेलं बीच झाड फार-फार तर एखाद दोन दशकं जगते.मी काम करतो त्या जंगलातील ओक वृक्ष आपण खूप कणखर आहोत असे मिरवितात.तिथे दक्षिणेकडे तोंड केलेल्या एका उबदार उतारावरच्या दगडांना घट्ट पकडून ठेवणारे काही ओक वृक्ष आहेत.उन्हाळ्याचा तीव्र सूर्यप्रकाश त्यावरील सर्व आर्द्रता सुकवून टाकतो आणि थंडीत बोचऱ्या बर्फाने दगड झाकले जातात.त्यामुळे तिथे दगडफूल 'लायकेन' ही वनस्पती अतिशय तुरळक उगवलेली दिसतात आणि पण तिच्यामुळे तापमान नियंत्रित होऊ शकत नाही. याचा परिणाम म्हणजे एका शतकानंतरही त्या उतारावरच्या छोट्या छोट्या झाडांची वाढ जेमतेम आपल्या मनगटाएवढी होते आणि उंची पंधरा फुटापेक्षाही कमी वाढते.त्यांचे स्वजातीय ओक इतरत्र अनुकूल वातावरणात जोमात वाढून कमीत कमी शंभर फूट उंची गाठतात,पण इथल्या प्रतिकूल परिस्थितीत त्यांना झुडपांइतक्या उंचीवर समाधान मानावे लागते. पण ते जगतात,काटकसरीने तग धरून राहतात.अशा अस्तित्वाचा मोठा फायदा म्हणजे इतर स्पर्धक टिकत नाहीत.तर असंच म्हणावं लागेल की अभावाच्या जगण्यातही काही फायदा नक्कीच असतो.


बलाढ्य ओक का अजस्त्र भेदरट द हिडन लाईफ ऑफ ट्रीज,पी ट र वो ह्ल ले बे न,अनुवाद - गुरुदास नूलकर,

अरविंद घनश्याम पाटकर,मनोविकास प्रकाशन


ओक वृक्षाचे जाड साल हे बीचच्या गुळगुळीत पातळ सालापेक्षा अधिक घाव सहन करू शकते.यावरून जर्मनमध्ये एक म्हण आहे 'जर रानडुकराला ओक वृक्षाच्या खोडावर आपली पाठ घासावी वाटली तर भल्या थोरल्या ओक वृक्षाला काहीच चिंता नसते, त्याला काहीच इजा होणार नाही.


महत्वाची नोंद…


अ शॉर्ट हिस्ट्री ऑफ निअरली एव्हरीथिंग,बिल ब्रायसन,अनुवाद-प्रसन्न पेठे,मंजुल पब्लिकेशन


आपलं अस्तित्वच नव्हतं तिथपासून ते आज आपण येथे असेपर्यंतचा सारा प्रवास..


अणू म्हणजे खरं तर प्रचंड मोठे मोकळे अवकाश आहे आणि आसपास जी एक घनता किंवा दरवाजा दिसतो ते खरं म्हणजे मायाच आहे! जेव्हा खऱ्याखुऱ्या सत्यतेच्या जगात दोन वस्तू जवळ येतात (बऱ्याचदा या उदाहरणासाठी बिलीयर्डचे चेंडू वापरले जातात.) ज्या एकमेकांवर आपटत नाहीत. उलट टिमथी फेरीसने समजावून दिल्यानुसार 'उलट ऋणभाराने भारीत असलेली त्यांची क्षेत्रं एकमेकाला एकमेकांपासून दूर ढकलतात! जर त्यांच्यात कुठलाच धन वा ऋण भार नसता, विद्युतक्षेत्र नसतं, तर त्यांनी एकमेकांवर न आदळता उलट दोन आकाशगंगांप्रमाणे एक दुसऱ्यातून आरपार पलीकडे प्रवेश केला असता. ओरखडा न उमटता !' जेव्हा तुम्ही खुर्चीत बसता,तेव्हा तुम्ही खरं तर त्यात बसलेले नसता, तर त्या खुर्चीपासून वर एक अँगस्ट्रॉम (एका सेंटिमीटरचा एक दशलक्ष शंभरावा भाग) इतक्या उंचीवर तरंगत असता! कारण तुमच्यातले इलेक्ट्रॉन्स आणि खुर्चीतले इलेक्ट्रॉन्स एकमेकांना अगदी दृढनिश्चयाने विरोध करत असतात!


स्टीफन हॉकिंग्ज यांनी निरीक्षण नोंदवल्या

नुसार (तेही काहीशा उत्तेजित होऊन), 


'जोपर्यंत आपण विश्वाची सद्यःस्थिती अचूकपणे मोजू शकत नाही,तोपर्यंत आपण भविष्यात काय घडणार आहे,तेही सांगू शकत नाही!


असाही एक हळवा टप्पा


१८०८ साली लेक तुर्कानाच्या परिसरात किमेयुला 'KNM-ER' ही साधारणपणे १७ लाख वर्षांपूर्वीची स्त्री सापडली (सांगाडा) ज्यामुळे शास्त्रज्ञांना हे कळून चुकलं की,होमो इरेक्टस हा मानवसदृश प्राणी फारच कुतूहलपूर्ण आणि गुंतागुंतीचा आहे.आधी वाटला त्यापेक्षाही ! त्या स्त्रीची हाडं ही वेडीवाकडी झालेली होती आणि खडबडीत वाळूखाली झाकली गेली होती. हा परिणाम 'हायपरविटॅमिनॉयीस-ए' नावाच्या एका अत्यंत वेदनादायी स्थितीचा!आणि हे घडतं जेव्हा तुम्ही एखाद्या मांसभक्षी प्राण्याचं यकृत खाता तेव्हा ! याचा अर्थच असा होता की,होमो इरेक्टस हे मांसाहारी होते आणि त्या हाडांची ती विचित्र वाढ दर्शवत होती की,त्या स्त्रीने तो आजार अंगावर बाळगत काही आठवडे किंवा काही महिने काढले असावेत! कदाचित,कुणीतरी तिची देखभाल केली असावी! जिव्हाळा-कणव दाखवण्याच्या मानवी स्वभावाचा पैलू दर्शवणारी त्या मानवसदृश्य प्राण्याच्या उत्क्रांती मधला एक हळवा टप्पा.