* विजय गायकवाड | Vijay Gaikawad

live

नमस्कार आपले स्वागत आहे. 'सगळे जण तुम्हाला शोधत येतील.आनंदाने तुडुंब भरलेली माणसे सर्वांनाच आवडतात! पण ते तुम्हाला दुःखी,उदास अशा अवस्थेत पाहू शकत नाहीत! तेव्हा आनंदी-हसतमुख रहा आणि मित्रांचा सहवास वाढवा! जर तुम्ही दुःखी राहिलात तर मात्र सगळे जण तुम्हाला सोडून जातील. जीवनातील आनंद-प्रसन्नता भरभरून वाटा! पण एकटे दुःखी रहाल, तर त्या दुःखातच बुडून जाल !' सॉलिट्यूड, ईला व्हीलर विलकॉक्स जगण्याच्या तयारीसाठी नव्हे तर,जगण्यासाठी माणूस जन्माला आला आहे,असं 'बोरिक पास्तरनाक' यांनी म्हटलेलं आहे.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! वाचन हे आहाराहून जास्त महत्त्वाचे असते.जिम र्‍होम यांनी अँथोनी रॉबीन्स यांना शिकवले होते की 'एक वेळ रोजचे जेवण चुकव,पण वाचन अजिबात चुकवू नको.' याप्रमाणे मी अखंडपणे वाचत आहे. माणसांपासून माणसांपर्यंत जाण्याचा,प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाण्याचा जीवनाचा राजमार्ग पुस्तकातून जातो. कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात. पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये. म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,कवी सचिन शिंदे,संतोष शेळके,अनिल फारणे,सहित प्रकाशन,डॉ.रवींद्र श्रावस्ती,डॉ.सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,संजय बापट,मनोहर सुर्वे,विनायक पाटील,संतोष पाटील,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, मेनन पिस्टन रिंग मधील सहकारी मित्र शेखर सुर्यवंशी..। पुस्तकातील घटना प्रसंग हे मी लिखित स्वरूपात सध्या व्हाट्सअप वरती टाकत असतो.हे सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी,पुस्तके देणारी लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत. ... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ. मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. विजय कृष्णात गायकवाड

९/९/२३

मुंग्यांतील गुलामी - Slavery in Ants

भर उन्हाच्या काळात थोडा वेळ सावलीला थांबावं म्हणून मी मोहरानात प्रवेश केला. मोहाची रुंद पानं जमिनीवर अंथरून त्यावर आडवा झालो.माझं लक्ष वर झाडाकडे गेलं. फुटबॉलच्या आकाराएवढी पानांची घरटी जिकडे

तिकडे दिसत होती.जिथे दोन पानं एकमेकांना जोडली होती,तिथे पांढरी रेषा दिसत होती.इतक्यात झाडावरून लाल रंगाच्या तीनचार मुंग्या अंगावर पडल्या.त्या मानेवरून खांद्याकडे गेल्या तेव्हा त्या भागाची अशी काही आग झाली की,शेवटी शर्ट काढून झटकावा लागला.तेव्हा आढळून आलं की,त्या शर्टाला चिकटून बसल्या होत्या.

त्यांचंच हे कृत्य होतं.नकळत मला त्यांनी कडकडून चावा घेतला होता.नंतर मी सावरून बसलो.आजूबाजूला ऐनाडीची झुडपं दिसत होती.तिथून आता उठून जाण्याच्या विचारात असताना माझं लक्ष ऐनाडीच्या झुडपाखाली गेलं.तिथे लाल मुंग्या आणि काळ्या मुंग्या अगदी लढाईच्या तयारीत असताना दिसल्या.अशी दृश्यं फार क्वचितच पाहायला मिळतात.म्हणून मी तिथेच सावरून बसलो.ज्यांनी हल्ला चढविला होता,त्या लाल मुंग्या होत्या.


असंच एकदा आंब्याच्या झाडावरती पानांनी बनविलेल्या गोलाकार घरट्यांचं निरीक्षण करताना एका घरट्यात या लाल आणि काळ्या मुंग्या गुण्यागोविंदानं नांदताना मला दिसल्या. मला आश्चर्य वाटून मी त्या घरट्याचं निरीक्षण करू लागलो.ते घरटं लाल मुंग्यांचं होतं यात शंका नव्हती.

लाल मुंग्यांनी काळ्या मुंग्यांना गुलामासारखं पाळलं होतं.

या काळ्या मुंग्यांना त्या जेव्हा अंड्यात होत्या तेव्हापासून लाल मुंग्यांनी पकडलं होतं.हा सारा वृत्तान्त मी डार्विनच्या 'ओरिजिन ऑफ स्पेसीज' या ग्रंथात 'वन्य जीवांचे स्वभावतः गुणधर्म' या सदरात वाचला होता.परंतु त्याचा प्रत्यय कधी काळी जंगलातील भटकंतीत येईल असं वाटलं नव्हतं. डार्विनच्या पुस्तकातील या लाल आणि काळ्या मुंग्यांच्या मालक- गुलाम संबंधाविषयीचा तपशील विस्मरणात जात असता आत्ताचं हे दृश्य अचानक दिसलं.


या लाल मुंग्यांचं वारूळ मोहाच्या मुळाखालीच होतं.

मोहरान डोंगराच्या पायथ्याला होतं.तिथून थोड्या अंतरावर काळ्या मुंग्यांचं वारूळ होतं. माझ्या येण्या-जाण्याच्या वाटेवर असलेल्या मोहरानातून जात असताना या वारुळाच्या आजूबाजूला लाल मुंग्या हिंडताना मला दिसल्या.मी लगेच त्यांना पाहण्यासाठी थांबलो. त्यांची संख्या सुमारे साठसत्तर तरी असावी.त्या जिकडेतिकडे काळ्या मुंग्यांच्या वारुळाभोवती रेंगाळत होत्या.अन्नाच्या शोधात त्या जलद गतीनं जाताना मोठ्या शोधक वृत्तीनं ये-जा करताना दिसतात.तशा त्या आज दिसत नव्हत्या.

त्या तिथल्या तिथेच चकरा मारीत होत्या.जवळच्या गवताच्या काड्यांवर चढत होत्या.शेंड्यावर जाऊन आपल्या मिशांची हालचाल करताना दिसत होत्या.मध्येच दोन मुंग्या एकमेकींच्या तोंडाजवळ तोंड नेऊन काहीतरी हितगुज करीत. अशा वेळी त्यांच्या मिशीची बरीच हालचाल होई. बराच वेळ निरीक्षण केल्यावर आढळून आलं की,या टोळक्यांचं इथे जमणं निरुद्देश नव्हतं. त्यांच्या येणाऱ्या खास पलटणीसाठी ही प्राथमिक स्वरूपाची टेहळणी होती.काळ्या मुंग्या अस्वस्थ दिसल्या.एखाद्या लाल मुंगीची अवचित भेट होताच काळी मुंगी लगेच वळण घेऊन वेगानं आपलं वारूळ गाठायची.अन् मुळाच्या जाळीत जमलेल्या आपल्या बांधवांना जाऊन मिळायची.या काळ्या मुंग्यांचा जमाव जणू लाल मुंग्यांनी लादलेल्या युद्धाला कसं तोंड द्यायचं याचा विचार करायला जमला असावा. लढाईपूर्वी टेहळणीला निघालेल्या या लाल मुंग्यांचं हे काम दोनतीन दिवस तरी चालू होतं.लहानलहान पलटणी करून लाल मुंग्या,

काळ्या मुंग्यांच्या वारुळाजवळ कूच करीत होत्या. वारुळाजवळ आपसात त्यांच्यात चकमक उडत होती.

काळ्या मुंग्या लाल मुंग्यांवर जिवाची बाजी लावून तुटून पडायच्या,परंतु लाल मुंग्या धीम्या चालीनं वारुळाकडे चाल करीत होत्या.वाटेत भेटलेल्या काळ्या मुंग्यांना त्या डसायच्या.तीक्ष्ण चावा घेऊन धडापासून मुंडकं अलग करायच्या.


डोंगरावरून लाल मुंग्यांचं सैन्य खाली वारुळाकडे कूच करीत होतं.एकदीड तासाच्या अवधीत ते वारुळापासून दोनतीन हात अंतरावर पोचलं.सैन्याच्या शिस्तीप्रमाणे इथून ते तीन भागांत विभागलं गेलं.त्यातील एका तुकडीनं सरळ वारुळावर हल्ला चढविला.बाकी दोन तुकड्या सांडशीच्या आकारात जाऊ लागल्या.हे सारं पाहून मी आश्चर्यानं थक्क झालो.त्या जागेला जबर युद्धभूमीचं स्वरूप आलं होतं. वरून नजर टाकली की त्यांची व्यूहरचना लक्षात येई.पहिली तुकडी आता गवतावरून धावत होती.दुसरी आणि तिसरी तुकडी वारुळाकडे आगेकूच करीत होती.पहिल्या तुकडीशी सामना करीत असलेल्या काळ्या मुंग्यांना इतर दोन तुकड्यांच्या हालचालीची कल्पना नव्हती.शेवटी काळ्या मुंग्यांना कळून चुकलं की,लाल मुंग्यांच्या घेरावात त्या पूर्णपणे अडकून पडल्या आहेत. तेव्हा हताश होऊन त्या जगण्याची इच्छा गमावून बसल्या.लाल मुंग्यांनी काळ्या मुंग्यांना जसं चोहोकडून घेरलं तशा त्या वाट फुटेल तिकडे सैरावैरा धावू लागल्या.काही मुंग्या तर या प्रयत्नात सरळ लाल मुंग्यांच्या आयत्या वाटेतच सापडल्या.लाल मुंग्यांनी त्यांना लगेच ठार केलं. काही काळ्या मुंग्यांनी आपल्या वारुळात प्रवेश केला.वारुळातील काही अंडी त्यांनी प्रवेशद्वाराजवळ एकत्रित करायला सुरवात केली.काही जणी अंडी तोंडात धरून ती सुरक्षित ठिकाणी ठेवण्यासाठी जाऊ लागल्या.परंतु हे सारं करायला त्यांना फार उशीर झाला होता.वारुळाभोवती घेराव करून आगेकूच करणाऱ्या त्या लाल सेनेनं वारुळाचा सारा भाग व्यापून टाकला.जिकडेतिकडे मुंग्यांचे पुंजके दिसू लागले.

काळ्या मुंग्यांच्या जबड्यात अंडी होती. त्यांचा पाठलाग लाल मुंग्या करीत होत्या. तोंडातील अंडी सोडून देण्यास त्यांना भाग पाडत होत्या.प्रतिकार केला की लगेच त्यांना ठार करण्यात येई.काही भित्र्या काळ्या मुंग्या,समोर लाल मुंग्या दिसताच,तोंडातील अंडी टाकून लगेच पळून स्वत:चा जीव वाचवीत.साऱ्या क्षेत्राला युद्धभूमीचं स्वरूप आलं होतं.दोन्ही पक्षातील मुंग्यांची डोकी धडावेगळी झालेली दिसत.मृत्यूचं थैमान माजलं होतं.कसाबसा जीव वाचवून काही काळ्या मुंग्या या मृतांच्या सड्यातून धावत होत्या,तर काही काळ्या मुंग्या त्यांनी सोडून दिलेली अंडी गोळा करून परत आपल्या तळाकडे कूच करीत होत्या.


दुसऱ्या दिवशी सकाळी लवकरच मी त्या ठिकाणी पोचलो.युद्धविराम झाल्याचं मला आढळून आलं.काळ्या मुंग्यांचं वारूळ ओस पडलं होतं.जखमी आणि मृत मुंग्यांचा तिथे ढीग पडला होता.लाल मुंग्यांचं अथवा काळ्या मुंग्यांचं सैन्य आता कुठेच दिसत नव्हतं.मी लगेच लाल मुंग्यांच्या वारुळाकडे धाव घेतली.अगदी शेवटची तुकडी काळ्या मुंग्यांची अंडी घेऊन नुकतीच तिथे पोचली होती.वारुळाच्या प्रवेशद्वारावर गुलाम काळ्या मुंग्यांनी धन्याचं स्वागत केलं.


वन्य जीवांत अशा प्रकारची जीवघेणी युद्धं होत नाहीत.काळ्या मुंग्यांना गुलाम करणाऱ्या लाल मुंग्या त्याला अपवाद आहेत.एरवी स्वत:चा जीव

वाचविण्याकरता त्यांच्यात झुंजी होतात किंवा त्या भक्ष्यावर हल्लाही करतात.मोर कीटक किंवा मुंगीमारच्या रूपानं मुंग्यांना देखील शत्रू आहेत. प्रौढ मोर कीटकाचा स्वभाव चतुरासारखाच असतो.दिसायला निष्पाप, परंतु अर्भकावस्थेत तो एखाद्या राक्षसासारखा खादाड असतो.

त्याकरिता भक्ष्य तो मोठ्या युक्तीनं पकडतो.अर्भकावस्थेत त्याचं शरीर गोलाकार असून डोकं मोठं असतं.(निळावंती - मारुती चितमपल्ली,प्रकाशक - मकरंद भास्कर कुलकर्णी,साहित्य प्रसार केंद्र,नागपूर) त्याचा जबडा सांडशीसारखा असतो.मेळघाटातील सेमाडोह येथील सिपना नदी पाऊस पडताच दुथडी भरून वाहायची.तेव्हा नदीकाठच्या दोन्ही बाजूंना असलेल्या झाडाझुडपांभोवती बारीक रेतीचा थर साचायचा.तो किंचित सुकला की कीटकसृष्टीचं निरीक्षण करण्यासाठी मी सकाळीच काठाकाठानं जाऊ लागायचो.इथल्या भुसभुशीत जमिनीवर अक्षरश: शेकडो छिद्रं दिसत.आकारानं शंकूसारखी.अर्धाअधिक इंच खोल.तुम्हाला माहीत आहेच की मुंग्यांइतकं उद्योगी कुणी नसतं.सारख्या घाईगडबडीत त्या इकडून तिकडे जाताना दिसतात.कुठेकुठे त्या अडखळतात,खाली पडतात.परंतु पुन्हा उठून पूर्ववत् चालू लागतात.अशा मुंग्यांच्या वाटेवर ही छिद्रं दिसतात.त्या छिद्रांत एखाद-दुसरी मुंगी कोलमडून पडे.मात्र तिला त्या छिद्रातून परत बाहेर पडता येत नसे.ती वर चढण्याचा प्रयत्न करी.परंतु प्रत्येक वेळी रेती ढासळल्यानं ती खाली पडे.या संधीची वाट पाहत त्या छिद्राच्या तळात मोर कीटक दडून बसलेला असे.मुंगीला लगेच रेतीत ओढून तो तिच्या शरीरातील द्रव शोषून घेई. 




७/९/२३

भास एक भय कथा ... Language is a horror story.

माझ्या अंगावर सर्रकन काटा आला..!


...उताराच्या अगदी कडेला असताना गवताचा भारा बांधायला मी खाली वाकलो,तेवढ्यात वाघाने माझ्या अंगावर उडी घेतली आणि त्याच्या चार सुळ्यांपैकी एक माझ्या उजव्या डोळ्याखाली,दुसरा माझ्या हनुवटीमध्ये आणि उरलेले दोन माझ्या मानेत रुतवले.मी पाठीवर पडलो आणि वाघ माझ्या छाताडावर होता. त्याचं पोट माझ्या पायांवर होतं. पाठीवर असताना माझे हात पसरले गेले होते.माझ्या उजव्या हाताला 'ओकचं' एक रोपट लागलं... तेव्हाच माझ्या मनात एक कल्पना चमकली - वरच्या बाजूला असलेलं ते ओकचं रोपट मी हाताने पकडल असतं आणि मोकळे असलेले दोन्ही पाय जळवून वाघाच्या पोटाला टेकवल असते, तर मी त्याला लांब ढकलू शकलो असतो आणि पळून जाऊ शकलो असतो.वाघाला अजिबात जाणवू न देता मी अगदी हळूहळू माझे दोन्ही पाय वर घेतले आणि त्याच्या पोटावर टेकवले.त्यानंतर माझा डावा हात वाघाच्या छातीवर टेकवला आणि सगळ्या ताकदीनिशी त्याला विरुद्ध दिशेने ढकललं.


जिम कॉर्बेट - कुमाऊँचे नरभक्षक


अशीच उत्कंटा वाढविणारी अंधारी भय कथा खाली देत आहोत.ही कथा आपल्या जीवनाबरोबर असते,अगदी बालपणापासून,आपल्या प्रत्येकामध्ये असा 'सदा' असतोच.ही कथा आपले मित्र श्री.विष्णू गोपाळ सुतार,

हरोली यांनी लिहिली आहे.


भास…


तिन्हीसांज टळून गेली होती.अंधार पडत चालला होता.पण सदाचा अजून पत्ता नव्हता.शाळेतून अजून घरी आला नव्हता.सदाची आई त्याची काळजी करत होती.

वाटंकडं डोळं लावून चुलीवरच्या तव्यात भाकरी टाकत ती सदाचीच वाट बघत होती.इतक्यात सदा आला.

अंगणातून आईला म्हणाला आई च्या दे मला.शंकऱ्याच्या घरला अब्यासाला जानार हाय.


सदाला बघून सुमाला बरं वाटलं.तुकाराम आणि सुमाचा एकुलता एक पोर सदा.मूल जगेल याचा भरवसा नसताना जिवंत राहिलेलं बाळ म्हणून काय कवतुक.मुद्दाम दुसरं मूल होऊ दिलं नाही. सदालाच लाडाकोडानं हातावरच्या फोडासारखं जपलं.पोरगं हुशार निघालं.चौथी आणि सातवीत केंद्रात नंबर काढलं.यंदा सदा दहावीत होता. अभ्यासातही हुशार होता.शाळेतल्या मास्तरांचाही त्याच्यावर जीव होता.शाळा चालू होण्यापूर्वी एक तास सकाळी आणि शाळा सुटल्यावर एक तास तो रोज जादा अभ्यासासाठी शाळेतच रहायचा.त्यामुळंच आज त्याला उशीर झाला होता.चहा पिऊन तो परत अभ्यासाला जाणार होता.


हायपाय धुवून सदा आत आला.त्याला बघून सुमा म्हणाली,"सदा ,माज्या राजा,एक काम हाय रं. ह्यबघ.त्यास्नी एकाएकी थंडी वाजून आलीया.

अंगात ताप भरलाया.तोंडातनं सबुद भाईर ईना."


तुकाराम तापानं,फणफणत होता.दिवसभर पाणी पाजून अंग केंगाटून गेलं होतं.चहा पिऊन पुन्हा पाण्याकडं जावं म्हणून तो घरी आला होता. तासावर पाणी घेतलं होतं.

त्याला गडबडीनं पाण्याकडं जायचं होतं.चहा पितानाच त्याला अचानक कसंतरीच व्हायला लागलं.थंडी वाजायला लागली.बघता बघता अंग तापायला लागलं.

म्हणून वाकळ घेऊन गपगार पडून होता.पाणी पीत सदा आईचं बोलणं ऐकत होता.अचानक कसा ताप आला त्याला कळेना. आई म्हणाली.,"उपाद्याचा डाक्तर आल्ता.

टुचून गेलाया.सकाळपतूर कमी ईल म्हणालाय.पर सदा,रानात उसाला पानी लावून आल्यात रं.आन आत्तापतूर पाट भरला आसंल.तवा आच्चादिस अब्यास र्‍हाऊ दे.तेवढा पाट फिरवून ये जार र सोन्या." 


सदा गुमान आईच ऐकत होता.नाही म्हणाव असं त्याला वाटत होतं.चौगुले सरांना त्याच्याकडून खूप अपेक्षा होत्या.'बोर्डात आला पाहिजेस बग' या सरांच्या वाक्यानं सदाचा हुरूप वाढला होता. त्यालाही खात्री होतीच.थोडंच दिवस उरलं होतं परीक्षेला म्हणून ज्यादा अभ्यास करत होता. आताही त्याला जायच नव्हतं पण नाईलाज होता.

पलिकडच्या खोलीत तुकाराम निपचित पडला होता.

सदानं तुकारामाच्या अंगावरची वाकळ बाजूला सारुन कपाळाला हात लावला. झटक्यासरशी त्यानं आपला हात बाजूला केला. अंग तव्यासारखं भाजत होतं.सदा उठला. अंगातली शाळेची कापडं काढली.रोजची कापडं त्यानं अंगात घातली.आईनं दिलेला चहा घेऊन खांद्यावर टॉवेल टाकून शेताकडे जायला तो घरातून बाहेर पडला.

आत्तापर्यंत बाहेर खूपच अंधार पडला होता.गार हवेची एक झुळूक सदाला चाटून गेली.तसं त्यानं खांद्यावरचा टॉवल डोक्याला गुंडाळला.हाताची घट्ट मिठी छातीभोवती आवळून तो चालू लागला.रात्रीच्या वेळी एकट्यानं शेताकडं जाण्याची सदाची ही पहिलीच वेळ होती.या आधी गेला होता पण; सोबत वडील असताना!


गाव दूर राहिला आणि आता अंधारात त्याला रस्ताही नीट दिसेना.जसजसं पुढं जाऊ लागला तसं त्याला भीती वाटू लागली.रातकिड्यांचा किर्रर्र आवाज त्याच्या कानात घुमू लागला. थंडीमुळे कुत्री उगाच ओरडत होती.सोबतीला कुणी असतं तर बरं झालं असतं असं त्याला वाटू लागलं.

रस्त्याच्या कडेला अंगाचं मुटकुळं करून बसलेलं काळं कुत्रं सदाच्या चाहुलीनं जागं झालं.स्वतःच्याच विचारात असणारा सदा त्यामुळे एकदम दचकला.त्याच्या अंगाला घाम सुटला.मनात देवाचं नाव घेत तो चालू लागला. पण भीती काय कमी होत नव्हती.त्यातच भर म्हणजे पाणंदीजवळच धनगराच्या सोना म्हातारीला जाळल्याचं त्याला आठवलं.अंगावर काटा आला.तो दचकून गेला.

इथूनच परत जावं असंही त्याला वाटायला लागलं.पण त्याला तसं करता येत नव्हतं.देवाचं नाव घेत तो पुन्हा चालू लागला.रस्ता सोडून तो आता पाणंदीत आला. जरा वेळ तो तिथंच थांबला.दिवसभर उन्हात तापलेली रानं शांत विश्रांती घेत आभाळाकडं बघत निवांत पडलेली होती.वाऱ्यामुळे शिवारातली पिकं डोलत होती.त्याची मंद झुळूक लागताच सदानं पुन्हा डोक्याला टॉवेल बांधला आणि तो चालू लागला.


रानडुकरांनी रानात हैदोस मांडलाय आणि राखणीला माणसं रानात होती हे त्याला माहित होतं.आता त्याला डुकरांचीपण भीती वाटू लागली.तसाच गडबडीत तो झपाझप पावलं उचलत राहिला.इतक्यात रानातनं एक बॅटरीचा झोत त्याच्या अंगावर पडला.त्यानं तो जास्तच दचकला.मागं फिरून त्या झोताच्या दिशेन त्यानं पाहिलं.

रानातनं आवाज आला, "कोन हाय रे तिकडं?" सदाला आवाज ओळखता आला नाही. घाबरतच तो म्हणाला,मी ..मी.. सदा हाय निकमाचा." बॅटरीचा झोत जवळ जवळ येऊ लागला.कोण असावं याचा काहीच अंदाज सदाला लागेना. डोक्याचा टॉवल काढला.एकदम जवळ आल्यावर बॅटरीचा झोत बंद करत जाधवाचा आंदा म्हणाला, "कोण? सदा?अरे तू? हिकडं काय करतुयास? आनी इतक्या राच्च्याला का आलाईस?"


जाधवाच्या आन्दाला पाहून सदाला जरा बरं वाटलं.

तो म्हणाला, "आन्दूदा, तू हाईस व्हय. भिलो की गा एकदम". आन्दा म्हणाला."भ्यायला काय झालं .. रं? काय भूत बीत वाटलो की काय तुला? पर तू हिकडं काय करतुयस?" सदा म्हणाला,"रातीच्या वक्ताला कवा आलू न्हाय एकटं. म्हणून जरा घाबरलो बग.आरं, आबास्नी बरं न्हाई.तापानं आंग भाजून गेलयां.थंडीनं हुडहुडी भरलीया.

निपचित पडून हायती बग. आनि हिकडं तर पाट भरलाया.तासावर पानी घेतलंया कदमाच्या हिरीचं.आनी घरात माज्याशिवाय दुसरं कोन हाय? पाट परतायला आलूया. तू हिकडं काय करालाईस?"


"आरं ही डुकरं काय बसू देत्यात व्हय मर्दा! कसलं चांगलं पिक आलंया आनी ही एकसारखं दमवाय लागल्यात.

राखनीला आलोय न्हवं.मी हाय.अन्ना हाय,रव्या हाय सुताराचा".आन्दानं खुलासा केला.एवढ्या रात्री आपल्या सोबत कुणीतरी आहे याचं सदाला बरं वाटलं.आता आन्दाला घेऊनच शेताकडं जावं असा विचार करुन तो आन्दाला म्हणाला, "आन्दूदा,मग जरा चल की माज्यासंग.पाट परतून येवूया. एकट्याला भ्या वाटायल्या रं".आन्दानं लागलीच कबूली दिली.चालता चालता आन्दानं शाळेचा विषय काढला. "चौगुले मास्तर तुमाला हाईत काय रं शिकवायला ?" सदा म्हणाला, "हाईत की. मराठी शिकवित्यात. नाद करायचा नाई सरांचा. लई भारी शिकीवत्यात.कवा कवा तर एवढं हशिवत्यात.तास सपूच ने वाटतोय त्यांचा." "गणिताला कोन हाय रे?" आन्दानं विचारलं. "परीट सर".सदान सांगितलं."परीट सर? आरं लई मारतंय बाबा ते.आमाला तर नुसतं फोडून काढलंय बग त्यानं." आन्दानं भूतकाळ आठवला."आमच्या वर्गातली बी लई मार खात्यात.पर माज्यावर लई जीव सरांचा. वर्गात सगळ्यांच्या आदी माजं उत्तर तयार आसतंय. मला लई आवडतंय गणित."आन्दाला सदाचं कौतुक वाटलं आणि नवे मुख्याध्यापक, बदललेली शिक्षक मंडळी,शिक्षणाचं वातावरण यावर बोलत बोलत ती दोघं शेतापर्यंत कधी आली ते समजलंच नाही.सदानं पाटाचा अंदाज घेतला.पाट भरलाय हे बघून पुढच्या पाटाला पाणी फिरवण्यासाठी तो खोरं शोधू लागला. अंधारात त्याला ते कुठे सापडेना.म्हणून आन्दाकडं त्यानं खुरपं मागितलं. आन्दाकडं खुरपं नव्हतं.पण राखणीची काठी होती.काठीनंच पाट फोडून रात्रभर पाणी चालावं म्हणून त्यानं चार पाटाला पाणी लावलं.राखणीची

काठी त्याला परत केली.दोघेही मागं फिरले,बोलत बोलत ती दोघं रस्त्यावर आली.आन्दाचं आभार मानावं म्हणून सदानं मागं पाहिलं आणि ........सदाला एकदम घामच फुटला.हाताची बोटं आपोआप तोंडात गेली.हातपाय लटपटू लागले.त्याला काहीच कळेनासं झालं.तो मटकन खालीच बसला.त्याचा विश्वासच बसेना.कारण आन्दा तिथं कुठं नव्हताच.आता तर आपल्याबरोबर होता आणि एवढ्यात कुठं गेला याचं त्याला आश्चर्य वाटलं. त्यानं इकडं तिकडं पाहिलं.आन्दाला चारदोन हाकासुध्दा मारुन बघितल्या.आन्दाचा कुठूनच आवाज आला नाही.पण त्यानं कुत्री मात्र जागी झाली आणि ओरडायला लागली.

आवाज ऐकून कदमाचा शिवन्या आणि सुताराचा रव्या सदाजवळ आले. "काय रं? कुणाला हाक मारतुयस?


"ते....ते आन्दूदाला हाक मारतोय पर ओ दीना न्हवं."

"आरं आन्दा आलाय कुटं अजून". "आता हूता माज्यासंग आनि".....

"आरं कसं असंल? अजून याचा हाय त्यो."


आता मात्र सदाला काहीच कळेना.आन्दूदा अजून आलाच न्हाई तर माज्याबरोबर कोन हुतं या विचारानं त्याची बोबडीच वळली.दरदरून घाम फुटला.आन्दाचाच विचार करत झपाझप पावलं टाकत तो पळतच घराकडे आला. अंगातली कापडे घामानं भिजली होती.भरलेला तांब्याच त्यानं तोंडाला लावला.आईलाही काही कळंना.

त्याचा तो अवतार बघून चिंतागत होऊन ती त्याला म्हणाली, "आरं जेवणार हाईस की अजून. आनी पानी कशाला प्या लागलाईस? ताट करुन ठेवलंय चल जेव चल.सदानं हात धुतलं आणि तो ताटावर बसला.पण त्याचं लक्ष जेवणाकडे नव्हतं.तसाच त्यानं जेवणाठी घास उचलला.घास तोंडात घालणार इतक्यात बाहेरुन आवाज आला.


"तुकामा हाय का घरात?" सदाच्या आईन पुढं होऊन बघितलं. आणि दारातल्या आन्दाला बघून ती म्हणाली,


"आन्दा? काय रे? काय काम हुतं?" आन्दा  म्हणाला, "व्हय.रानाकडं चाल्लोय.' चिंतागती आई म्हणाली, "इदुळा?"


``आवं काय सांगायचं काकू,रानात डुकरानी नुस्ता धुडघूस घाटलाया.आवं पिक चांगलं आलंया आनी ही डुकरं दमवाय लागल्यात न्हवं. 


"आनि रं. आत तरी ई की.आई" म्हणाली.आत येत आन्दा म्हणाला.


"न्हाई, जातू की.शिवन्या आन रव्या हैती रानात. वाट बगत असतील.' 

"होंच्याकडं काय काम हुतं?"


"व्हय ते ब्याटरी मागाय आल्तो.राखणीला चाल्लोय.माझ्या ब्याटरीतला मसाला सपलाय न्हवं.' ..


"थांब हं देतो." असं म्हणत सदाची आई उठली.सदाकडे बघून आन्दानं विचारलं,"काय सदा यावं का जेवायला ?"


.... आणि घरात आलेल्या आन्दाला बघून सदाच्या हातातला घासच गळून पडला. काहीच न बोलता तो आन्दाकडं बघतच राहिला….


५/९/२३

विचारवंत कन्फ्यूशियस - thinker Confucius. भाग २

पिता ज्याप्रमाणे मुलाबाळांची तरतूद ठेवतो, त्यांची सर्व काळजी घेतो,तसे राजाने प्रजेचे पालन केले पाहिजे, "एखाद्या महत्त्वाच्या खटल्यात निकाल देण्यासाठी कन्फ्यूशियसला बोलवण्यात आले,तर एकदम निकाल देण्यापूर्वी तो आधी पुष्कळशा शहाण्या लोकांचा विचार घेई.व मग न्याय देई.पुढे भविष्यकाळात जी ज्युरीपद्धती जगात आली,तीच जणू कन्फ्यूशियसच्या डोळ्यांसमोर होती.गुन्हेगारांना शिक्षा देणे हेच त्याचे मुख्य ध्येय नसून गुन्हे कमी कसे होतील,हे तो आधी मुख्यतःपाही.त्या वेळेस साऱ्या चीन देशभर भुरट्या चोरांचा व उचल्यांचा बुजबुजाट झाला होता! याला आळा घालण्यासाठी म्हणून प्रमुख नागरिक त्याला प्रश्न करीत.तो म्हणे,

"चोरी बंद करायचा एकच मार्ग आहे.आणि तो म्हणजे तुम्ही तुमचा स्वार्थ कमी करा.तुम्ही लोभ सोडला म्हणजे चोरांनी न्यावे इतके जास्त तुमच्याजवळ उरणारच नाही."

आपल्या राजाची कीर्ती वाढावी;आपले राष्ट्र सुधारलेले व्हावे,म्हणून कन्फ्यूशियसचे जे प्रयत्न चालले होते त्यात त्याला बरेचसे यश येत होते. परंतु ली प्रांतांचा राजा लू प्रातांचा मत्सर करी, द्वेष करी.कन्फ्यूशियसच्या नेतृत्वाखाली लू प्रांतांची कीर्ती पसरत आहे.ही गोष्ट ली प्रातांधिपतीस सहन झाली नाही.कन्फ्यूशियसचे लू प्रातांच्या राजावर जे वजन होते,ते नष्ट व्हावे म्हणून त्याने एक साधी युक्ती केली.त्याने लू राजाकडे ऐंशी नृत्यांगना पाठविल्या.युक्ती सफल झाली.राजा त्या नृत्यांगनांत इतका रमला की, कन्फ्यूशियस व त्याचे प्रयोग सारे विसरून गेला.कन्फ्यूशियसला या गोष्टींचा तिटकारा आला. तो आपला स्वतःचा लू प्रांत सोडून रागाने निघून गेला आणि पुन्हा जगभर भटकू लागला. जगाच्या करुणेवर,जगाच्या आधाावर त्याने स्व:ला सोपविले.या वेळेपर्यंत कित्येक हजार शिष्य त्याला मिळाले होते.तरीही आपले जीवन विफल आहे असे,त्यास वाटे.राजे पशुसमान होते,प्रजा अडाणी होती.आणि त्याचे उत्तम पुरुषाचे ध्येय अद्याप स्वप्नातच होते. मानवजातीस स्वतः प्रमाणे बनविण्याचा त्याने प्रयत्न केला.परंतु ज्या मातीवर तो प्रयत्न करू पाहात होता.ती माती टणक होती.त्याची सौम्य बोटे त्या मातीस आकार देऊ शकेनात.प्रवास करताना पुष्कळ वेळा खुनी व दरोडेखोर त्याच्यावर हल्ला चढवीत.पुष्कळ वेळा त्याला अन्नाशिवायही दिवस काढावे लागले.तरीही तो ध्येयापासून च्युत झाला नाही;स्वीकृत कार्य त्याने सोडले नाही.


या वेळचे स्वतःचे एक सुंदर शब्दचित्र त्याने काढले आहे.तो लिहितो; "कन्फ्यूशियस इतका तहानलेला आहे,की पुष्कळ वेळा खाण्यापिण्याचीसुद्धा त्याला आठवण राहत नाही.आपल्या प्रयत्नांना यश येत आहे असे जरा दिसले की त्या आनंदात तो सारे दुःख विसरून जातो.ज्ञानोपासना करताकरता व ध्येयार्थ धडपडत असता वार्धक्य जवळ येत आहे हे त्याच्या लक्षातही येत नाही "


हाती घेतलेले उद्योग निराशेने सोडून द्यायला तो अद्याप तयार नव्हता.जनतेला दैनंदिन व्यवहारात मार्गदर्शन व्हावे म्हणून प्राचीन ग्रंथांचे संपादन व संकलन त्याने सुरु केले.

जुन्या चिनी बायबलातून त्याने जणू नवीन बायबल करारच चिनी जनतेस दिला.कन्फ्यूशियस बुद्धाप्रमाणे नास्तिक होता. स्वर्ग किंवा नरक यांवर त्याचा विश्वास नव्हता. त्याचा एकाच गोष्टीवर अपरंपार विश्वास होता. तो म्हणजे स्वतःच्या मानवबंधूंवर कन्फ्यूशियसची श्रद्धा होती.की जर शंभर वर्षे नीट सुव्यवस्थित राज्यकारभार चालेल, तर पृथ्वीवरचा सारा अत्याचार नाहीसा होईल.


या ध्येयाने प्रेरित होऊन लोकांवर कशा रीतीने राज्य चालवावे याविषयीची निश्चित सूत्रावली त्याने लिहून ठेवली आहे.शिस्त यावी म्हणून नानाविध विधिविधाने त्याने सांगितली आहेत, जीवनातील प्रत्येक गोष्ट त्याने कोणत्यातरी विधीशी जोडली आहे.हे विधीचे अवडंबर मोठे डोळ्यांत भरण्यासारखे आहे.झोपडीत राहणारा शेतकरी राजवाड्यातील राजाइतकाच प्रतिष्ठित.राजाला राजाचे विधी.शेतकऱ्याला शेतकऱ्याचे.

परंतु उभयतांच्याही जीवनात त्या त्या गंभीर विधींमुळे एक प्रकाराची प्रतिष्ठा आली.कन्फ्यूशियसने आपल्या लोकांवर जे हे औपचारीक असे नानाविध बाह्यविधी लादले, त्यांचे आपणास आज हसू येते.अती गुंतागुंतीचे व काहीकाही बाबतीत तर ते हास्यास्पद असे दिसतात.या विधींमुळे चिनी राष्ट्र हे सर्व जगात अगदी बारीकसारीक गोष्टींकडेही फार पाहणारे, बाह्य देखाव्यावर भर देणारे असे झाले.परंतु यामुळे एक प्रकारचा स्वाभिमानही त्यांच्यांत आला.दुसऱ्यांस मान देणे व स्वत:चाही मान सांभाळणे या दोन्ही गोष्टी ते शिकले.राजाही पूजनिय आणि शेतकरीही पूजनिय,कन्फ्यूशियसच्या शिकवणीचे सार एका वाक्यात सांगायचे झाले तर असे म्हणता येईल, की "स्वतःशी प्रामाणिक रहा व शेजाऱ्यांशी प्रेमाने व सहिष्णुतेने वागा." दुबळ्या निःस्वार्थतेच्या तत्त्वज्ञानाऐवजी त्याने त्यांना उदार आणि दुसऱ्यांच्या डोळ्यांत न खुपणारा असा सुसंस्कृत स्वार्थ शिकविला. स्वार्थ तुमच्याजवळ असणारच. परंतु तो शहाणा स्वार्थ असू दे. कन्फ्यूशियसच्या मनात चीन हे प्रतिष्ठित नागरिकांचे राष्ट्र करावयाचे होते. असहिष्णू व अहंकारी लोकांची जात निर्मिण्याऐवजी सभ्य अशा सद्गृहस्थांची जात त्याला निर्मावयाची होती.चिनी राष्ट्र सद्गृहस्थांचे व्हावे असे स्वप्न रात्रंदिवस तो मनात खेळवीत होता.राजाला वा रंकाला तो स्वतः समानतेने वागवी.राजाचे स्थान वैभवाचे व थोर म्हणून त्यालातो मान देई आणि गरीब थोर मनाने व उदात्तेने कसे कष्ट सोशीत आहे हे पाहून त्यालाही मान देई. तो "ज्यांना ज्यांना जीवनात दुःख,क्लेश आहेत,ज्यांची जीवने विकल नि विफल झाली आहेत,ज्यांना अपयश आले आहे, अशा सर्वांच्या दुःखात तो सहभागी होऊ इच्छित असे.कन्फ्यूशियसवर त्याचा एक शिष्य यामुळे एकदा रागावला. "दरिद्री लोकांत,सर्वसामान्य जनतेत मिसळण्याची तुमची ही वृत्ती आम्हाला आवडत नाही." असे तो शिष्य म्हणाला. कन्फ्यूशियस त्याला शांतपणे म्हणाला, "दुःखी कष्टी दुनियेशी मी एकरूप नको होऊ.तर कोणाबरोबर होऊ?"

परंतु दरिद्री नारायणाविषयी जरी त्याला सहानुभूती वाटत असली,तरी भावनांनी वाहून जाणारा,विरघळून जाणारा तो नव्हता.तो आपला तोल,सुवर्णमध्य कधी विसरत नसे.

त्याची सहानुभूतीही व्यवहारी होती.मानवजातीला ओलांडून सर्व प्राणिमात्रांस कवटाळू पाहणारी अशी त्याची सहानुभूती नव्हती.तो म्हणे, "जगापासून दूर निघून जाणे अशक्य आहे.ज्या पशुपक्ष्यांशी आपले काही साधर्म्य नाही, त्याच्यांशी एकरूप कसे व्हायचे? " कन्फ्यूशियस पशुपक्ष्यांसाठी तहानलेला नव्हता.देवदूतांना भेटायला हपापलेला नव्हता.त्याच्या डोळ्यांसमोर स्वतःची ही मानवजात नेहमी असे. तिचा तो विचार करी.तिचे सुख - दुःख पाही.तसे अपकाराची फेड उपकाराने करावी,

द्वेषाला प्रेमाने जिंकावे,अहंकाराबरोबर नम्रता घ्यावी. असा संदेश त्याने कधी दिला नाही.एका गालावर मारले तर दुसरा गाल पुढे करावा असे त्याचे मत नव्हते.हे मत त्याला शहाणपणाचे वाटले नाही. "शत्रूबरोबर न्यायाने वागा व मित्राबरोबर प्रेमाने वागा." असा त्याचा दूरदर्शी उपदेश आहे. शत्रूबरोबर न्यायाने वागा,परंतु त्याच्यावरही प्रेम करून त्याला चिडवू नका.अशाने तो शत्रू अधिकच रागावेल. 'मला लाजावता काय?" असे तो म्हणेल.आगीत तेल ओतल्याप्रमाणे ते होईल. दुसऱ्याने इजा केली असता त्याचा सूड घेऊ पाहणे हे पशुवृत्तीचे द्योतक आहे.परंतु त्याला क्षमा करणे हेही मूर्खपणाचे आहे.एकंदर गोष्टीचा नीट विवेकाने निर्णय करा व तदनुसार वागा. शत्रूचे हक्कही सांभाळा व स्वतःची प्रतिष्ठाही सांभाळा.आपल्या अन्यायी शेजाऱ्यांशी वागण्याचा सुसंस्कृत माणसाचा हाच एक मार्ग आहे. एकदा त्याच्या शिष्यांनी त्याला विचारले, "एका शब्दांत तुमच्या शिकवणीचे सार सांगा." कन्फ्यूशियस म्हणाला, "जशास तसे." शिष्य म्हणाले, "याचा अर्थ अधिक स्पष्ट करा." तो म्हणाला, "जे तुम्ही स्वतःच्या बाबतीत करू इच्छिणार नाही ते दुसऱ्यांच्या बाबतीत करू नका."

कन्फ्यूशियसने जो हा सुवर्णनियम सांगितला,तोच पाचशे वर्षांनी पुढे ख्रिस्तानेही सांगितला.परंतु दोघांचेही म्हणणे त्यांच्या समकालीनांनी ऐकले नाही.समकालीन जनतेने दोघांचीही उपेक्षाच केली.त्याचे अखेरचे दिवस दुःखाचे होते.त्याचे प्रिय शिष्य मरण पावले,पत्नींशी काडीमोड करूनही तिच्यावर तो प्रेम करी. तीही मेली.त्याचा एकुलता एक मुलगाही वारला. तो म्हणाला, "आता मीही जाणे बरे.माझीही वेळ आता आलीच आहे. "

तो अत्यंत दारिद्र्यात निवर्तला.त्याचे वय बहात्तर वर्षांचे होते. त्याचे हेतू विफल झाले होते.त्याची स्वप्ने धुळीस मिळाली होती.मानवावरचा त्याचा विश्वास ढासळला होता.फारच थोड्या लोकांनी त्याचे शब्द हृदयाशी धरले.

आणि जे त्याच्या शिकवणीप्रमाणे वागत त्यांचा छळ होई.आरंभी ख्रिश्चनांचा त्यांच्या क्रांतिकारक जहाल मतांबद्दल जसा छळ झाला,तसाच कन्फ्यूशियसच्या शिष्यांचाही झाला.एका चिनी सम्राटाने कन्फ्यूशियसची सारी पुस्तके जाळण्याचा हुकूम त्याच्या मृत्यूनंतर दोन वर्षांनी दिला.पुष्कळ श्रद्धावान पंडितांनी भक्तीमुळे ग्रंथ न जाळता लपवून ठेविले.परंतु कायदेभंग करणाऱ्या अशा पंडितांना जिवंत पुरण्यात आले.

परंतु आज पाश्चिमात्यांत बायबल जितके लोकप्रिय आहे तितकेच चीनमध्ये कन्फ्यूशियसचे ग्रंथ लोकप्रिय आहेत. ख्रिस्ताप्रमाणे कन्फ्यूशियसही आता देव झाला आहे.

ख्रिस्त व कन्फ्यूशियस दोघांनीही सज्जन मानवांची एक नवीन जात निर्माण करण्याचा महान उद्योग केला.शिष्ट मानव नव्हेत; तर खऱ्या अर्थाने सौम्य व शांत असे सद्गृहस्थ.परंतु आतापर्यंत ख्रिस्त व कन्फ्यूशियस या दोघांचेही कोणी ऐकले नाही.दोघांच्याही शिकवणीपासून जग दूरच राहिले आहे.कोट्यवधी चिनी लोक कन्फ्यूशियसच्या नावाची पूजा करतात; परंतु कन्फ्युशियससारखे आपले मत उदार व उदात्त व्हावे अशी खटपट कितीसे करीत असतील ? तसेच जे स्वतःला ख्रिश्चन म्हणवतात,अशांपैकी किती जणांना ख्रिस्ताने शिकवलेला धर्म समजला असेल,समजत असेल ?


ख्रिस्ताचा आध्यात्मिक पिता कन्फ्युशियश 

०३.०९.२३ या लेखातील शेवटचा भाग ..

३/९/२३

थोर विचारवंत कन्फ्यूशियस / The great thinker Confucius.

जेव्हा रस्त्यात एखादा चिनी आपणास भेटतो, तेव्हा अहंकार-प्रदर्शक तुच्छतेने आपण त्याच्याकडे पाहतो.परंतु चिनी मनुष्यही त्याच तुच्छतेने आपणाकडे पाहत असतो. असे तुम्हाला सांगितले,तर तुम्हाला एकदम धक्का बसल्यासारखे होईल,नाही ? चिनी मनुष्य आपणा पाश्चिमात्यांस अडाणी,अहंकारी अशी जंगली लोकांची एक जात.असे मानतो.तीन हजार वर्षांपर्यंत चिनी जनतेने ज्ञानी पुरुषांची वीरपुरुष समजून पूजा केली.तलवारीची पूजा न करता त्यांनी ज्ञानाची पूजा केली.जी राष्ट्रे आपल्या सैनिकांना नि आपल्या कुबेरांना श्रेष्ठ नागरिक समजतात,

अशा राष्ट्राविषयी चिनी मनुष्य आदर दाखविणे सुतराम अशक्य आहे.चिनी लोकांस स्वतःच्या इतिहासाचा फार अभिमान वाटतो.त्यांच्या दंतकथांप्रमाणे त्यांची संस्कृती वीस हजार वर्षांची जुनी आहे.या दंतकथा आणखी असे सांगतात,की चिनी लोकांचे पूर्वज हे जवळ जवळ पशुतम स्थितीतच होते.ते गुहांमध्ये राहात,कातडी पांघरीत.नंतर कित्येक शतकांनी एक महान राजवंश आला. त्या राजांनी लोकांना शेती शिकविली;त्यांनी त्यांना सुधारणा नि

संस्कृती दिली.डार्विनच्यापूर्वी कित्येक हजार वर्षे ज्ञानगाथा रचणाऱ्या त्या चिनी ऋषिमुनींना उत्क्रांतीची अंधूक का होईना, कल्पना असावी असे वाटते.

संस्कृतीच्या पुरातनत्वाविषयीची त्यांची कल्पना अतिशयोक्तीची आहे,काव्यमय आहे.चीन देशातील संस्कृतीच्या प्रत्यक्ष खुणा ख्रिस्तपूर्व दोन हजार वर्षांपासूनच्या सापडतात.या वेळेस त्यांनी चित्रलिपीचा आरंभ केला होता.तिची वाढ ते करू लागले होते.( मानव जातीची कथा,हेन्री थॉमस,अनुवाद - सानेगुरुजी,मधुश्री पब्लिकेशन,ख्रिस्ताचा आध्यात्मिक पिता कन्फ्यूशियस या मधील लेख )


चीनच्या आरंभीच्या इतिहासात शत्रूच्या स्वाऱ्यांचा त्यांना त्रास झालेला दिसत नाही. चीनलाही विजयध्वज मिरवीत जाण्याची इच्छा नव्हती.चीनमध्ये सैनिक हा खालच्या दर्जाचा मानला जाई.सैनिकांची प्रतिष्ठा तिथे नव्हती. खाटीक,व्यापारी,सैनिक हे एकाच दर्जाचे,वरचे स्थान ज्ञानोपासकांना असे.राजांची स्तुती त्यांच्या दिग्विजयांसाठी केली.जात नसे,तर शांतता ठेवीत म्हणून.

चिनी प्रजा युद्धाचा तिरस्कार करी. जीवन सुसंस्कृत असावे असे त्यांना वाटे.सज्जन व सुसंस्कृत अशा उदात्त जीवनाची भक्ती त्यांच्या ठायी होती.अशा निर्मळ जीवनाविषयी त्यांना परमादर वाटे.रेशमाच्या किड्यांची त्यांनी वाढ केली.रेशमाचा व्यापार त्यांनी सुरू केला. पागोडाचे अद्भुत शिल्प त्यांनी निर्मिले व त्याची वाढ केली.एकावर एक तंबू उभारल्याप्रमाणे त्यांचे हे शिल्प दिसते.त्यांनी वैद्यकीचा अभ्यास केला,काव्याची जोपासना केली.ताऱ्यांच्या गतींशी त्यांनी परिचय करून घेतला.

बहुजन समाजाला शिक्षण मिळावे व राज्यकारभार नीट चालावा म्हणून पंडितवर्गाची,मांदरिनवर्गाची संस्था त्यांनी स्थापिली.या वर्गात वंशाला मान नसून ज्ञानाला मान असे.

येथे ज्ञानाची प्रतिष्ठा होती.एखाद्या झाडूवाल्याचा मुलगाही मांदारिन होऊ शकत असे.आवश्यक असे ज्ञान त्याने मिळवलेले असले म्हणजे झाले.उलट,एखादा मांदारिनाचा मुलगाही जर त्याला विद्वता नसेल, तर झाडूवाला होत असे. हे मांदारिन म्हणजे आळशी लोक नव्हते.ते सनदी नोकरीत शिरत. राजाला देशाची व्यवस्था ठेवण्यासठी ते मदत करीत.चीनमध्ये राजसत्ता होती.परंतु अनियंत्रित जुलूम नव्हता.बहुतेक चिनी प्रांतांना प्रबुद्ध अशा राजसत्तेचा अनुभव येई.परंतु असे समजू नका,की त्या काळातील चीन म्हणजे निर्दोष भूमी होती.राजाला मदत करणारे पंडित हे नेहमीच प्रामाणिक असत असे नाही.

राजाची मर्जी मिळविण्यासाठी खुशामतीचा वक्र रस्ताच अधिक जवळचा असतो,असे त्यांना आढळून आले होते.लाचलुचपतीस भरपूर वाव होता. धनार्जन करण्याच्या संधी येत आणि तत्त्वज्ञानी असणारे हे मुत्सद्दीही मोहाला बळी पडल्याशिवाय राहात नसत.कधी कधी तत्त्वज्ञान्यालाही स्वतःचे खिसे सोन्याने भरलेले असावेत असे वाटते.तसेच हे तत्त्वज्ञानी जर कधी प्रामाणिक निघाले,तर राजे त्यांचा सल्ला ऐकतच असे होत नसे.या प्राचीन चिनी लोकांत पूर्णता होती.असे समजण्याचे कारण नाही.काही अतिरंजित इतिहासकारांनी चीन म्हणजे जणू स्वर्ग असे चित्र रंगविले आहे,ते बरोबर नाही.चिनी लोकांमध्ये इतरत्र आढळणारा आणखी एक दोष होता.ते फार अहंकारी होते.जे जे परकी येत,ते त्यांना सैतानी वाटत.परकीयांना ते सदैव तिरस्काराने वागवीत.त्यांच्या देशाचे प्राचीन नाव 'मध्यदेश', 'मध्यराज्य' असे होते.त्यांची अशी समजूत होती,की परमेश्वराने आपणास पृथ्वीच्या मध्यभागी ठेवले आहे.इतर राष्ट्रांपेक्षा आपणच प्रभूचे अधिक लाडके असे त्यांना वाटे. आपण काय ते श्रेष्ठ;असे मानण्याचा मूर्खपणा करण्यात ते अर्वाचीनांच्या बरोबरीचे होते.परंतु कितीही दोष असले,तरी चिनी लोक ख्रिस्तीशकापूर्वीच्या नवव्या शतकात उच्च संस्कृतीवर होते.ही गोष्ट नाकबूल करण्यात अर्थ नाही.परंतु नंतर दुर्दिन आले.हूणांशी त्यांचा संबंध आला.हे हूण चीनच्या पश्चिमेस होते.ते शेळ्या-मेंढ्या पाळीत.ते रानटी होते.शांतताप्रिय चिनी लोकांत लष्करी सत्तेचे विष त्यांनी पोहोचवले.हे पाश्चिमात्य जंतू त्यांच्यात शिरले. चीनमध्ये आजही पाश्चिमात्य लष्करशाहीचे जंतू शिरताना दिसत आहेत.हूणांशी संबंध आल्यामुळे सत्तालालसेचे जे विष चिनी राष्ट्रांत शिरले ते नष्ट करावयास बरीच वर्षे लागली.कितीतरी यादवी युद्धे झाली.आणि नंतर अराजकतेचा काळ आला.सारा देश जणू वेडापिसा बनला.सर्वत्र हाणामारी! वाटेल त्याने उठावे व लहान राज्य स्थापावे.देशाचे शत खंड झाले,

अनेक छोटीछोटी राज्ये सर्वत्र निर्माण होऊन ती परस्परांस नष्ट करू पाहात होती.यावेळी बाहेरचे रानटी लोक आले.

विस्कळीत चीन या रानटी टोळधाडीपुढे टिकाव धरू शकला नाही.परंतु सुदैवाने याच सुमारास चीनमध्ये थोर विचारवंत जन्माला आले.त्यांनी लोकांना पुन्हा समतोलपणा दिला.विवेक दिला.या ज्ञानी व चारित्र्यसंपन्न लोकांत दोन मुकुटमणी होते.एक लाओत्से व दुसरा कन्फ्यूशियस.


लाओत्से ख्रिस्त पूर्व सहाव्या शतकात जन्मला. कन्फ्यूशियसपेक्षा लाओत्से पन्नास वर्षांनी वडील.अती पूर्वेकडील भागातील लाओत्से,बुद्ध व कन्फ्यूशियस हे तीन परत थोर महात्मे,मानव जातीचे हे सदगुरू एकाच शतकात झाले,ही महत्त्वाची गोष्ट ध्यानात धरण्यासारखी आहे. धन्य ते शतक !


जॉन दी बॅप्टिस्ट हा जसा ख्रिस्ताचे आगमन सुचविणारा होता,त्याप्रमाणे लाओत्से कन्फ्यूशियसचा जणू अग्रदूत होता.त्याने कन्फ्यूशियससाठी भूमिका तयार करून ठेवली.त्याने कन्फ्यूशियसच्या आगमनाचे जणू शिंग फुंकले.परंतु कन्फ्यूशियसची विचारसरणी जशी स्पष्ट असे,त्याची भाषा जशी साधी व सरळ असे,तसे लाओत्सेचे नसे.लाओत्सेच्या विचारांत विशदता नव्हती.तो थोडा गूढवादी होता. लाओत्से लोकांना उपदेशी, "न्यायावर प्रेम करा; नेमस्त व संयमी बना; प्रमाण राखा, देहान्त शिक्षा रद्द करा; युद्धाचा धिक्कार करा, जगण्यासाठी हे जग अधिक सुखाचे व आनंदाचे करा." ही ध्येये अती सुंदर होती यात शंका नाही. परंतु प्राथमिक अवस्थेतील राष्ट्राला ही ध्येये जरा अमूर्तच होती,

अर्थहीन,दूरची अशी होती. लाओत्से पुष्कळ वेळा रहस्यमय बोले,गूढ बोले. त्याच्या म्हणण्याचा भावार्थ फारच थोड्यांच्या लक्षात येई.त्या बेबंदशाहीच्या काळात चीनला जर कशाची खरोखर जरूर असेल,तर ती व्यवहार्य व समजण्यास सोप्या अशा निश्चित आचारनियमांची होती.दैनंदिन व्यवहारात सर्वांनी कसे वागावे ते सांगणारी व सर्वसंग्राहक अशी सोपी.सुटसुटीत स्मृती त्यांना हवी होती. लाओत्से हे करू शकत नव्हता.तो फार उंच पडे लोकांनी लाओत्सेला देव बनविले.आणि भविष्यकालीन मोक्षप्राप्तीसाठी ते त्याची प्रार्थना करू लागले.परलोकासाठी लाओत्से,परंतु इहलोकी कन्फ्यूशियसच त्यांचा खरा मार्गदर्शक होता. कन्फ्यूशियस किंवा कुंग-फू-त्सी या नावाचा "तत्त्वज्ञानी कुंग" असा अर्थ आहे. त्याच्या पित्याचे नाव शुहलिंग,तो पित्याचे बारावे अपत्य होता.शुहलिंग हा सैनिक होताकू-प्रांतात तो राहात असे.चीनमध्ये सैनिकांना सामान्यतः मान कमी.परंतु त्या वेळेस सैनिकांची किंमत जरा वाढली होती.नैतिक मूल्यांचे जरा पुन्हा मूल्यमापन केले गेले.त्या वेळेस सर्वत्र लष्करी धिंगाणे चालले होते.

गावांचे,शहरांचे रक्षण करणे अगत्याचे असे.कोण कधी हल्ला करील,याचा नेम नसे.म्हणून सैनिकांची प्रतिष्ठा जरा वाढली होती.शुहलिंग हा शूर शिपाईगडी होता.त्याला खूप मानमान्यता मिळाली होती.अनेक पदव्या मिळाल्या होत्या.तथापि तो सुखी नव्हता.त्याला नऊ मुली झाल्या,

परंतु मुलगा नव्हता.त्याची एक रखेली होती.तिच्यापासून त्याला दोन मुलगे झाले.परंतु ते औरस नव्हते.सनातनी चिनी मनुष्यास एक तरी औरस पुत्र असावा असे वाटे, जसे सनातनी ज्यूस अद्याप वाटते.मृत पित्यासाठी जे विधी करावयाचे,ते चिनी लोकांत व ज्यू लोकांत फक्त औरस पुत्रच करू शकतो.म्हणून शुहलिंगने पुन्हा लग्न करण्याचे ठरविले. त्याचे वय सत्तरहून अधिक होते.नऊ मुलांची माता ती पहिली पत्नी त्याने दूर केली आणि एका लहान मुलीबरोबर त्याने लग्न केले.चीनमध्ये पत्नीला पुत्र होत नाही ही सबब काडीमोडीसाठी होई आणि हे जे अप्रस्तुत व असमान असे विषम लग्न लागले,त्याचे फळ म्हणून पूर्वेकडील अत्यंत शहाणा मनुष्य जन्माला आला.

ख्रि.पू.५५१ मध्ये कन्फ्यूशियस जन्मला.वयाच्या

तिसऱ्या वर्षी कन्फ्यूशियस पितृहीन झाला.कन्फ्यूशियस अती बुद्धिमान होता.लहान वयातच त्याची अलौकिक बुद्धी दिसू लागली. त्याच्या त्या निरोगी व धष्टपुष्ट शरीरात अत्यंत प्रभावी असे मन होते;अती प्रभावशाली बुद्धी होती.तो व्यायामाचा फार भोक्ता होता.परंतु त्यापेक्षाही काव्याचा व संगीताचा अधिक भक्त होता.भराभरा त्याने सारे ज्ञान आत्मसात केले. वयाच्या पंधराव्या वर्षीच त्याचे गुरुजन त्याला म्हणाले,"तुला शिकवायला आता आमच्याजवळ काही उरले नाही."पुढे दोन वर्षांनी त्याला अकस्मात स्वत:चा अभ्यास सोडावा लागला.त्याची आई गरीब होती.तिला त्याची मदत हवी होती.आईला आधार देणे त्याचे कर्तव्य होते.आपल्या देशाच्या लहान राज्यातील शेतीखात्यात तो कारकून झाला.सतरा वर्षांच्या मुलाला ती जागा झेपायला जरा कठीणच होती.परंतु कन्फ्यूशियसने कुरकूर केली नाही.वास्तविक स्वतःचा जेवढा बोजा, त्याहूनही तो अधिक उचली.त्याला जणू ती सवयच होती.कारकुनी डोक्यावर असतानाच लग्न करून त्याने बायकोचा आणखी बोजा उचलला.लग्नाच्या वेळेस त्याचे वय केवळ एकोणीस वर्षांचे होते.एका वर्षांने त्याला पहिला मुलगा झाला.त्याचे हे लग्न सुखप्रद झाले नाही. का ते कळत नाही.कदाचित त्याच्या पत्नीला सुंदर सुभाषितांपेक्षा अधिक रूचकर व स्वादिष्ट अशा अन्नाची जरुरी असावी.कन्फ्यूशियस आपल्या शिष्यांना उपदेशाचे,सुंदर सूत्रमय वचनांचे खाद्य देई;परंतु पत्नी या शब्दांनी थोडीच संतुष्ट होणार!तिला प्रत्यक्ष पोटभर अन्न हवे होते.


चोविसाव्या वर्षी त्याची आई त्याला सोडून गेली. सनातनी चिनी रूढीप्रमाणे मातृशोकप्रदर्शनार्थ त्याने नोकरी सोडली.मातृशोकप्रदर्शनाची मुदत अडीच वर्षांची असे.

कन्फ्यूशियसने ती अक्षरक्ष: पाळली.कन्फ्यूशियस आपल्या देशाचे सारे रीतिरिवाज पाळण्यात अत्यंत दक्ष असे.कन्फ्यूशियस जरी तरुण होता,वयाने अद्याप फारसा मोठा नव्हता.तरी स्वतःच्या मित्रमंडळींत सौम्य व शांत स्वभवाचा,तसेच अती बुद्धि मान म्हणून त्याची ख्याती झाली.त्याची बुद्धी खरोखरच तेजस्वी होती.त्याचे मन प्रगल्भ होते. एका मित्रांनी आग्रह केल्यावरून तो फिरता आचार्य झाला,परिवाजक उपदेशक झाला.तो जेथे जेथे जाई तिथे तिथे निष्ठावंत शिष्यांचा मेळावा त्याच्याभोवती जमे.बैलगाडीत बसून तो या गावातून त्या गावी जात असे.

मधूनमधून विश्रांतीसाठी तो मुक्काम करी.एखाद्या नदीकाठी थांबे;शिष्यांना प्रवचन देई.प्रश्नोत्तरे चालत,चर्चा होई.कधी भाताच्या शेताजवळ मुक्काम पडावा. कधी चेरी झाडांनी सुगंधित केलेल्या स्थानी ते थांबत.अशा रीतीने सर्वत्र संचार करीत असता संसाराला उपयोगी असे ज्ञान तो सर्वत्र पेरीत जाई.ते विचार देशभर पसरले.जे श्रीमंत असत त्यांच्याजवळून तो थोडी गुरुदक्षिणा घेई.जे गरीब असत.त्यांनी मूठभर तांदूळ किंवा वाळलेला मांसखंड दिला,तरी त्याला समाधान असे.उदार व उदात्त जीवनाची शिकवण त्याने सर्वत्र दिली. तोच त्याचा अविरत उद्योग होता.श्रेष्ठ अशा मानवांचा एक नवीन वंशच तो चीनमध्ये जणू निर्मू पाहात होता. जणू श्रेष्ठ पुरुषांचे प्रतिष्ठित असे राष्ट्रच निर्माण करण्याचे त्याचे ध्येय होते.


लोकांना नीट वळण द्यायचे असेल, तर आधी न्यायी राज्यव्यवस्था हवी,ही गोष्ट कन्फ्यूशियसच्या लक्षात आली.तो हेतू मनात धरून तो सर्व प्रांतांतून भटकला. तो निरनिराळ्या राजांना भेटला व म्हणाला, "मी तुमचा प्रधान होऊ का? चांगला राज्यकारभार निर्माण करतो.माझे विचार प्रत्यक्षात आणतो." हा तत्त्वज्ञानी अशा राजाच्या शोधात होता. इतिहासातील अत्यंत विचित्र व आश्चर्यकारक असा हा शोध होता.कधीकधी वाटे,की त्याच्या शोधात त्याला यश येईल,एखादा राजा त्याला प्रयोगाला वाव देईल. त्या वेळचा 'चि' प्रांत म्हणजे अती बंडखोर प्रांत होता.त्या प्रांतांच्या राजाने आपल्या दरबारी कन्फ्यूशियसला महत्त्वाची जागा देऊ केली.परंतु एका मत्सरी मंत्र्याने राजाचे कान फुंकले आणि आयत्या वेळेस राजाने नकार दिला. कन्फ्यूशियस पुन्हा आणखी एखादे प्रयोगार्ह राज्यक्षेत्र शोधीत निघाला.तो आपल्या स्वतःच्या लू प्रांती आला.लू प्रांताच्या राजाने त्याला एका शहराचा मेयर नेमले.नंतर त्याने त्याला सर्व राज्यातील मुख्य न्यायाधीश म्हणून नेमले. तो न्यायमंत्री झाला.

कन्फ्यूशियस सम्राटाला म्हणाला,"लोकांना सदैव शांती दे व पोटभर अन्न दे.


 उर्वरित भाग पुढील लेखामध्ये.. 


१/९/२३

ह्युएन त्संगच्या पावलांवरून - मिशी सरण २ In the Footsteps of Hiuen Tsang

मिशीने कमीत कमी सामान बरोबर घ्यायचा प्रयत्न केला होता,तरीही ते बऱ्यापैकी जड़ होतं. चीनमधल्या प्रवासात वेगवेगळ्या शहरांमधील माणसांच्या गर्दीने ती हैराण झाली होती. चीनमधली यलो रिव्हर म्हणजे पीत नदी ही सुसंस्कृत चीन आणि गावंढळ चीन यांच्यामधली सीमारेषा आहे.असं म्हटलं जातं. श्वेन ग्लांग हे या नदीचं मूळ नाव. ही नदी क्विलियन पर्वतराजीच्या पायथ्याकडून वाहते.

मिशीची आगगाडी या नदीला समांतर अशी उत्तरेकडे जाऊन लिआंगझू या ठिकाणी थांबली. लिआंगझूच्या उत्तरेला मंगोलियाचा मैदानी प्रदेश सुरू होतो.या शहराच्या रक्षणासाठी बांधलेल्या चीनच्या भिंतीच्या भागाचं रेल्वे स्टेशनवरूनच दर्शन होतं.मिशीला या शहरात ह्युएन त्संगची स्मृती जागवणारं काहीही दिसलं नाही.दरम्यान, चीनमधल्या रेल्वे प्रवासात रेल्वे यंत्रणेशी आणि खाली उतरून गावांमधून भटकताना सरकारी यंत्रणेशी वाद ही अपरिहार्य घटना असते हे एव्हाना तिला समजून चुकलं होतं.मिशीचा पुढला प्रवास मुख्यत्वे पश्चिमेकडे जाणाऱ्या 'सिल्क रूट' मार्गे होणार होता.गोबीचं वाळवंट पार करून गेल्याशिवाय तो मार्ग भेटणार नव्हता.आधुनिक साधनांनी आणि प्रस्थापित मार्गाने जातानाही मिशीला खूप थकवा जाणवला.ह्युएन त्संगच्या काळात तर गोबी वाळवंट पार करणारी व्यक्ती परतणार नाही हे गृहीत धरलं जायचं.

वाटेत तहान-भुकेने मेलेल्या माणसांचे आणि त्यांच्या प्राण्यांचे सांगाडे पडलेले दिसत असत.ह्युएन त्संग चांग गावाला पोहोचला तेव्हा तिथल्या सर्व भिक्खूंनी आणि अखेरीस राजानेसुद्धा त्याने जीव धोक्यात घालून पुढचा प्रवास करू नये म्हणून ह्युएन त्संगची विनवणी केली.पण ह्युएन त्संग निश्चयाचा पक्का होता.मिशीला अडवणारं मात्र कुणीच नव्हतं. तुर्फानपासून सिल्क रूट पुढे नैर्ऋत्येकडे वळतो.कोल टाग पर्वतराजी ओलांडून बोस्टांग सरोवराच्या काठाने तो यांकीला पोहोचतो.ह्युएन त्संग या प्रदेशाला ओ- की - नीचं राज्य म्हणतो.इथे अरेबिक आणि चिनी अशा दोन भाषा बोलल्या जातात.पूर्वी या शहराला 'यांघी शहर' असं म्हटलं जायचं.त्याचा अर्थ 'आगीचं शहर' मिशीने आता वाटेत लागणाऱ्या ठिकाणांची नावं नीट लक्षात ठेवायला सुरुवात केली;कारण त्या प्रत्येक नावामागे एक कहाणी होती,काही अर्थ होता. इथेच

ह्युएन त्संगच्या तांड्यावर दरोडखोरांनी हल्ला चढवला.

लूटमार करून ते नाहीसे झाले. त्यानंतर ह्युएन त्संगला पंचवीस-तीस परदेशी व्यापारी भेटले. ते चीनहून परत मध्य आशियाकडे निघाले होते.सर्वांनी एकत्रच मुक्काम केला.पण त्या व्यापाऱ्यांना घाई असावी.कारण ह्युएन त्संग आणि त्याचे भिक्खू साथीदार जागे झाले तेव्हा ते व्यापारी गायब झाले होते.सकाळी ह्युएन त्संगचा तांडा पुढे निघाला,तर काही अंतरावर त्या व्यापाऱ्यांची हत्या झालेली त्यांना दिसली.त्यांचे मृतदेह अस्ताव्यस्त पसरले होते.हुई लीने ही हकीकत थोडक्यात लिहून ठेवली आहे.

मिशी आता १३०० वर्षांनंतर त्याच मार्गावरून निघाली होती. सुदैवाने तिच्या मार्गात असा धोका नव्हता.


इथून पुढे मिशीला किर्गिझस्तानमध्ये प्रवेश करायचा होता.आता हळूहळू तिच्या चिनी ज्ञानाची उपयुक्तता कमी कमी होत होती.या प्रदेशात मुस्लिम उघूरवंशीयांचं प्रमाण अधिक आहे.चीनपेक्षा त्यांना किर्गिझस्तान देश अधिक जवळचा वाटतो.मिशीने आगगाडीने काशगर गाठलं.

काशगर आणि मुख्य चिनी भूप्रदेश यांच्यामध्ये जाणवण्या

इतका फरक होता. काशगरमध्ये तिला एक्झल हा जर्मन तरुण, एक इस्त्रायली तरुणी,तसंच तिचा न्यूझीलंडवासी मित्र भेटले.ते सारे खुजेराब खिंडीतून किर्गिझस्तानातून पुढे पाकिस्तानमध्ये जाणार होते.मिशीला किर्गिझस्तानात पोचवायची व्यवस्था करणारा माणूस आता टाळाटाळ करत होता.त्याच वेळी तिला बर्नार्ड आणि कॉन्स्टन्स हे जर्मन जोडपं भेटलं.त्यांनाही किर्गिझस्तानात जायचं होतं.

ह्युएन त्संग काशगरहून किर्गिझस्तानात घोड्यावर बसून गेला होता. वाटेत त्याचे सात साथीदार अति थकवा,गार वारे,वेगवेगळे आजार यामुळे निजधामास गेले होते.मिशी आणि तिचे तीन साथीदार टोयोटा लँड क्रूझरमधून तोच रस्ता अगदी आरामात काटत होते.वाटेत त्यांना ह्युएन त्संगच्या त्या सात साथीदारांच्या कबरी लागल्या.


चीन आणि किर्गिझस्तानच्या सीमारेषेवरची सुरक्षा

व्यवस्था खूपच कडक होती.मिशीचं भारतीय पारपत्र बघून तिथला अधिकारी चक्रावला.मिशी म्हणजे चीनमधून किर्गिझस्तानात प्रवेश करणारी त्या सुरक्षा अधिकाऱ्याला भेटलेली पहिली भारतीय व्यक्ती होती.त्याने तिला अनेक प्रश्न विचारून तिच्या भारतीयत्वाची खात्री करून घेतली आणि मगच तिच्या पारपत्रावर प्रवेश दिल्याचा शिक्का उमटवला.या प्रकारात तासभर तरी गेलाच. आता टोरुगार्ट खिंड ओलांडून ते किर्गिझस्तानात शिरले.अनेक उघूर व्यापारी बिश्केक इथल्या बाजारात माल विकत घ्यायला आणि विकायला निघाले होते.आजही सिल्क रूट हा व्यापारी मार्ग होता. दोन-अडीच हजार वर्षांपासून तो प्रामुख्याने व्यापारासाठीच तर वापरला जात होता. किर्गिझस्तानात बनाईने पुढच्या प्रवासाची व्यवस्था आधीच केली होती.त्याची एक सहकारी झेन्या राजधानी बिश्केकहून गाडी घेऊन हजर होती.परदेशी प्रवाशांनी काशगर ते बिश्केक हा प्रवास सार्वजनिक वाहनाने करण्यास दोन्ही शासनांची परवानगी नव्हती.त्यामुळे आधीच खासगी वाहनाची सोय करावी लागली होती.

ह्युएन त्संगने ज्या ठिकाणाहून किर्गिझस्तानात प्रवेश केला त्याहून हे ठिकाण बऱ्याच दक्षिणेला होतं.त्यामुळे मिशीला पुन्हा ह्युएन त्संगचा माग काढणं भाग पडलं.

ह्युएन त्संगने या प्रवासात अनेक साथीदार गमावले होते.हुई लीला त्या प्रवासाचं वर्णन ऐकवताना ह्युएन त्संगच्या डोळ्यांतून अश्रूंची धार वाहत होती. किर्गिझस्तानातसुद्धा वाटेवर जागोजाग कबरी होत्या.

व्यापारी मार्ग असल्यामुळे जागोजागी दरोडेखोरांचं भय असे.पर्वतराजीचे चढ-उतार जीवघेणे होतेच.त्यात अतिथंड,शुष्क आणि विरळ हवासुद्धा जीवघेणी ठरत होती.किर्गिझस्तानातून मिशी उझबेकिस्तानात समरकंद इथे आली.हे बाबराचं गाव. उझबेकिस्तानातून अमुदर्या नदी ओलांडून ह्युएन त्संगने अफगाणिस्तानात प्रवेश केला होता. त्यानंतर हिंदुकुश पर्वतराजी ओलांडून तो गांधार

मध्ये आला होता.मग सिंधू नदी ओलांडून काश्मीरच्या खोऱ्यात असलेल्या हुंझामध्ये त्याने प्रवेश केला होता.(हुंझा हा खरं तर काश्मीरचा भाग, पण १९४८ साली तो पाकिस्तानने बळकावला.आपण त्याला पाकव्याप्त काश्मीर म्हणतो.) ह्युएन त्संगला इथे विरळ हवेचा त्रास झाला होता.अधूनमधून भास होत होते.खोल दऱ्यांतून वाहणारे जलप्रवाह रिबिनीसारखे दिसत होते.

बारामुल्लाची खिंड ओलांडून त्याने काश्मीरच्या खोऱ्यात प्रवेश केला होता. इ.स. ६२८ मध्ये ह्युएन त्संग काश्मीरमध्ये पोहोचला तेव्हा त्याचा प्रवास सुरू होऊन एक वर्ष झालं होतं. त्याने त्या काळातील २४ राज्यं आणि १३,८०० किमी इतकं अंतर ओलांडलं होतं.ह्युएन

त्संगच्या काळात समरकंद हे एक महत्त्वाचं आणि भरभराटीला आलेलं शहर होतं. ह्युएन त्संग त्याचा उल्लेख 'सा-मो-की एन' असा करतो.इथल्या नर्तिकांना चिनी सम्राटाच्या दरबारात खूप मागणी होती.समरकंद सोडून गाढवाच्या पाठीवर बसून केशला जाताना मिशी आजारी पडली.तिला उलट्या आणि जुलाब सुरू झाले.

ताप होताच.अंगात त्राण उरले नव्हते.पण सुदैवाने थोडी विश्रांती घेतल्यावर मिशीचा ताप उतरला.तिला बरं वाटू लागताच तिच्या रशियन मार्गदर्शक साथीदाराच्या मदतीने तिने अफगाणिस्तानकडे कूच केलं.मिशीचा प्रवास अफगाणिस्तानात पोहोचेपर्यंत तसा सरळ झाला असंच म्हणावं लागेल.आंतरराष्ट्रीय प्रवासात खुष्कीच्या मार्गाने प्रवास करताना ज्या अडचणी येतात त्यात शारीरिक अडचणी,आजार हे गृहीत धरावेच लागतात.सर्वांत जास्त त्रास सरकारी अधिकाऱ्यांचा आडमुठेपणा,टेबलाखालून होणारे व्यवहार व लालफीत यांचा असतो.या अनुभवातून मिशी तावून-सुलाखून पार पडली होती.ह्युएन त्संगला सरकारी अडचणी आल्या नव्हत्या.त्या काळात ज्ञानाला किंमत होती. ह्युएन त्संगच्या ज्ञानपिपासू वृत्तीची हकीकत सर्वदूर पसरलेली होती.त्याच्या मार्गात सर्वत्र बौद्धमठ होते.त्यामुळे तो मुक्कामाला जिथे जाईल तिथे त्याचं स्वागतच झालं होतं.त्या काळात इस्लाम नुकताच जन्माला येत होता. त्याचा प्रसार झाला नव्हता.ही गोष्टही ह्युएन त्संगच्या पथ्यावर पडली होती.मिशी अफगाणिस्तानमध्ये गेली तेव्हा तिथली बौद्ध शिल्पं शाबूत होती.तिच्यापुढे पहिली अतिशय गंभीर अडचण इथेच पहिल्यांदा उभी राहिली. ती जरी हाँगकाँगवासी असली,

अमेरिकी पद्धतीचं इंग्रजी बोलत असली,तरी तिने भारतीय नागरिकत्व सोडलेलं नव्हतं.तिचा पासपोर्ट अजूनही भारतीयच होता.त्यामुळे तिला पाकिस्तानने वास्तव्य परवाना नाकारला. नाकारला.त्यामुळे अफगाणिस्तानातून पाकिस्तानात न जाता मिशी थेट भारतात परतली.ह्युएन त्संग भारतात जसा फिरला तशी तीही फिरली.त्या काळात म्हणजे २००१ मध्ये तिला काश्मीरमध्ये जाऊ नको.असं सांगण्यात आलं,तरी ती गेली.भारतातून परतताना ह्युएन त्संग (तेव्हा अस्तित्वात नसलेल्या) पाकिस्तानमधून गेला होता.मिशीने भारतातून पाकिस्तानात जाण्याचा परवाना मिळवला आणि मग ह्युएन त्संगच्या मार्गावरून प्रवास करायचा आपला निश्चय पूर्ण केला.


ह्युएन त्संगने भारतात दहा वर्षं वास्तव्य केलं.जाताना तो ६५७ सूत्रं आपल्याबरोबर घेऊन गेला.चीनमध्ये परतल्यावर त्याने आपला एक मठ स्थापन केला तिथे तो त्याच्या अभ्यासानुरूप बौद्ध मत शिकवू लागला. त्याची ही पाठशाळा त्याच्या मृत्यूबरोबर अस्तंगत झाली.पण त्याच्यामुळे चीनमधील बौद्ध मताला आणि बौद्धधर्माला लेखी आधार मिळाला. 


प्रथमच चिनी भाषेत बौद्ध सूत्रांचं अचूक आणि यथोचित भाषांतर उपलब्ध करून देणारा आणि त्याच्यावर टिप्पणी करणारा आद्य चिनी भाष्यकार म्हणून तो मान्यता पावला.


मिशी ह्युएन त्संगची ही सारी हकीकत त्याच्या आणि हुई लीच्या शब्दांत सांगते,ह्युएन त्संगच्या प्रवासाचं यथातथ्य चित्र आपल्या डोळ्यासमोर उभं करते आणि ते सांगता सांगताच आपल्या स्वतःच्या प्रवासाचं वर्णन अशा तऱ्हेने करते की ह्युएन त्संगच्या प्रवासातल्या अडचणी आणि संकटं आपल्यापुढे प्रकर्षाने उभी राहावीत.या तिच्या शैलीमुळे तिच्याबद्दलचा कौतुकमिश्रित आदर वाढीस लागतो हे नक्की.बरं,ती फक्त ह्युएन त्संगच्या प्रवासा

पुरतीच आपली लेखणी मर्यादित ठेवत नाही,तर अफगाणिस्तानात आणि पाकिस्तानात फिरताना सिकंदर,

त्यानंतरचे ग्रीक, त्यांच्या संस्कृतीचं आपल्याला मिळालेलं देणं, आपण त्यांना काय दिलं,या साऱ्याची सहजगतीने नोंद करून इतिहासाचा मोठा पट आपल्यापुढे उभा करते.

मिशीचं हे पुस्तक माहितीने ठासून भरलेलं असलं तरी कुठेही नीरस आणि कंटाळवाणं झालेलं नाही.एकीकडे ह्युएन त्संगचा प्रवास,दुसरीकडे तिचा स्वत:चा प्रवास,तिला वाटेत भेटलेल्या सहप्रवाशांची स्वभावचित्रणं,त्याचबरोबर त्या जागेचा इतिहास, त्या जागेसंबंधीच्या दंतकथा अशा बऱ्याच गोष्टींची उकल करत मिशी वाचकाला परत ह्युएन त्संगच्या घरी घेऊन जाते आणि हा प्रवास संपतो.


३०.०८.२३ या लेखातील शेवटचा भाग…