* विजय गायकवाड | Vijay Gaikawad

live

नमस्कार आपले स्वागत आहे. 'सगळे जण तुम्हाला शोधत येतील.आनंदाने तुडुंब भरलेली माणसे सर्वांनाच आवडतात! पण ते तुम्हाला दुःखी,उदास अशा अवस्थेत पाहू शकत नाहीत! तेव्हा आनंदी-हसतमुख रहा आणि मित्रांचा सहवास वाढवा! जर तुम्ही दुःखी राहिलात तर मात्र सगळे जण तुम्हाला सोडून जातील. जीवनातील आनंद-प्रसन्नता भरभरून वाटा! पण एकटे दुःखी रहाल, तर त्या दुःखातच बुडून जाल !' सॉलिट्यूड, ईला व्हीलर विलकॉक्स जगण्याच्या तयारीसाठी नव्हे तर,जगण्यासाठी माणूस जन्माला आला आहे,असं 'बोरिक पास्तरनाक' यांनी म्हटलेलं आहे.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! वाचन हे आहाराहून जास्त महत्त्वाचे असते.जिम र्‍होम यांनी अँथोनी रॉबीन्स यांना शिकवले होते की 'एक वेळ रोजचे जेवण चुकव,पण वाचन अजिबात चुकवू नको.' याप्रमाणे मी अखंडपणे वाचत आहे. माणसांपासून माणसांपर्यंत जाण्याचा,प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाण्याचा जीवनाचा राजमार्ग पुस्तकातून जातो. कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात. पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये. म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,कवी सचिन शिंदे,संतोष शेळके,अनिल फारणे,सहित प्रकाशन,डॉ.रवींद्र श्रावस्ती,डॉ.सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,संजय बापट,मनोहर सुर्वे,विनायक पाटील,संतोष पाटील,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, मेनन पिस्टन रिंग मधील सहकारी मित्र शेखर सुर्यवंशी..। पुस्तकातील घटना प्रसंग हे मी लिखित स्वरूपात सध्या व्हाट्सअप वरती टाकत असतो.हे सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी,पुस्तके देणारी लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत. ... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ. मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. विजय कृष्णात गायकवाड

१७/१/२५

औषधांशिवाय आरोग्य / Health without drugs

एक रुग्ण त्याच्या डॉक्टरांना लिहिलेल्या खुल्या पत्रात म्हणतो,करुणा म्हणजे फक्त हातात हात धरणे नाही.ते एक चांगले औषध आहे.याची आठवण करून देणारे हे पुस्तक आहे.लेखकांचे व प्रकाशकांचे आभार व धन्यवाद…


काही शब्द रोजच्या वापराने इतके गुळगुळीत झालेले असतात की पुन्हा नव्याने त्यांच्याकडे बघावं लागतं.आरोग्य हाही त्यातलाच एक.


आपल्या शारीरिक स्वास्थ्याचे दोन भाग आहेत : शारीरिक क्षमता ("Physical Fitness") आणि आंतरिक आरोग्य ("Health") हे दोन्हीही अत्यंत महत्त्वाचे आहेत,दोन्हींकडे आपण लक्ष दिलं पाहिजे तरच परिपूर्ण स्वास्थ्य आपल्याला मिळेल.


शारीरिक क्षमता :

दूरवर चालणं-धावणं,वजन उचलणं,मैदानी खेळ, योगासनं करू शकणं,टेकडी चढणं ह्यांसारख्या गोष्टी शारीरिक क्षमतेमध्ये येतात.हे सहजपणे करणाऱ्या व्यक्तीला आपण  ते फिट आहेत असं म्हणतो.व्याख्या करायची झाली तर शारीरिक क्षमता म्हणजे आपले अवयव,स्नायू वापरून शरीराबाहेरच्या आव्हानाला तोंड देऊ शकणे.साधारणतः शारीरिक क्षमता ही डोळ्यासमोर सहजपणे दिसू शकते.अनेकदा अशा 'फिट' व्यक्तींमध्ये त्यांच्या-त्यांच्या क्षमतेप्रमाणे बळकट स्नायू,चपळता,दमश्वास टिकवता येणे,शारीरिक कौशल्य दिसून येतं.


आंतरिक आरोग्य :


शरीराच्या आतल्या सगळ्या यंत्रणा योग्य पद्धतीने काम करत असल्या तर आंतरिक आरोग्य चांगलं आहे असं म्हणता येईल.मेंदू व्यवस्थित विचार करू शकतो आहे, हृदय रक्ताभिसरण करतंय,

मूत्रपिंडं रक्तशुध्दी करतायत, पंचेंद्रियं आपापलं काम नीट करत आहेत असं सगळं असेल तर चांगलं आरोग्य आहे.शिवाय ह्यात पचनसंस्था योग्य पद्धतीने काम करते आहे,हे ही आलंच.


ही पचनसंस्था आपल्याला अन्नामधून दोन गोष्टी मिळवून देतेःऊर्जा आणि कच्चा माल.आपल्याला रोजच्या जगण्यात प्रत्येक क्षणी ऊर्जेची गरज असते. याखेरीज शरीरात अनेक प्रकारच्या पेशी-अवयवांची दुरुस्ती करावी लागत असते ज्यासाठी लागणारा कच्चा माल अन्नातून येतो.आपल्या शरीरात काही लाख कोटी पेशी असतात.त्यातल्या कुठल्या ना कुठल्या लाखो पेशी दररोज मरत असतात,तितक्याच पुन्हा बनवाव्या लागतात.हाडे,स्नायू यांची झीज भरून काढावी लागते. यासाठी ऊर्जा आणि कच्चा माल लागतो.आत आलेल्या अन्नाचं योग्य प्रकारे ऊर्जा आणि कच्च्या मालात रूपांतर होणं,आणि शरीरातल्या सर्व प्रक्रिया योग्य पद्धतीने चालू राहणं ही उत्तम आंतरिक आरोग्याची दोन प्रमुख लक्षणं आहेत.


आपण अनेकदा 'Metabolism' हा शब्द वापरतो. कोणाचं "Metabolism Slow" आहे म्हणून पटकन वजन वाढतं,कोणाचं "Fast" आहे म्हणून कितीही खाल्लं तरी वजन वाढायची चिंता नसते,असं आपण ऐकतो-बोलतो.यात Me- tabolism Slow असणं म्हणजे आपल्या शरीराचा Basal Metabolic Rate (BMR) हा कमी असणं.Fast असणं म्हणजे BMR जास्त असणं.


BMR हा अनेक गोष्टींवर अवलंबून असतो :


(१) साठवलेली चरबी सोडून उरलेलं वजन (ज्याला Lean Mass असं म्हणतात) (२) वजन, (३) वय आणि लिंग, (४) वाढीचं वय, (५) सध्या असलेला आजार, (६) आजूबाजूच्या हवेचं तापमान, (७) त्या व्यक्तीची अनुवांशिकता (Genetics).


Metabolism हे खरं तर एक फार लांब-रुंद, ढोबळ नाव आहे. शरीर चालवण्यासाठी जे जे करावं लागतं ते सगळंच Metabolism मध्ये येतं. दोन प्रकारच्या प्रक्रिया Metabo- lism मध्ये असतात.


१. Catabolism : शरीरात जे काही विघटन चालू

असतं ते ह्या प्रकारात मोडतं.उदा.अन्नाचं विघटन होऊन कच्चा माल तयार होणं.


२. Anabolism : शरीराला जे काही नवीन बनवावं

लागतं किंवा दुरुस्त करावं लागतं त्या प्रक्रिया यात येतात. उदा. नवीन पेशी बनवणे, पेशींची वाढ होणे, नवीन स्नायू बनवणे, हाडांची झीज भरून काढणे, इ.


शारीरिक क्षमता (Fitness) आणि आंतरिक आरोग्य (Health) या दोघांचंही महत्त्व एकमेकांशी जोडलेलं,पण तरीही वेगळं आहे.या दोन्ही गोष्टींवर लक्ष दिल्यानेच पूर्ण स्वास्थ्य अनुभवायला मिळू शकतं.


आपण वर बघितल्याप्रमाणे अन्नपचन,शरीरातल्या बाकी प्रक्रिया (ज्यात चरबी साठवणे / वापरणे हेही आलं.) ह्या सर्व आंतरिक आरोग्यामध्ये येतात.शारीरिक क्षमतेवर केलेल्या कामाने ह्या सर्वांना मदत जरूर होते,पण ह्याबद्दलचा एक मुद्दा स्पष्ट करणं महत्त्वाचं आहे. त्यासाठी दोन उपमा बघूयाः


आपल्याकडे स्कूटर,कार असं जे वाहन असतं ते त्याच्या-त्याच्या आंतरिक रचनेप्रमाणे इंधनाची,तेलाची मागणी करतं.त्यात टाकलं जाणारं इंधन हे कुठलंही असून चालत नाही पेट्रोलवर चालणाऱ्या वाहनात डिझेल टाकलं तर वाहन बिघडतं.म्हणजेच हे इंधन, आणि वंगणासाठी तेल हे वाहनाच्या आंतरिक आरोग्याशी संबंधित आहे.


आता जर कोणी म्हणाला की,आज मी माझ्या वाहनात पेट्रोल ऐवजी डिझेल टाकतो.आणि रोजच्या १० किलोमीटर ऐवजी २० किलोमीटर चालवतो.म्हणजे मग चुकीच्या इंधनामुळे निर्माण झालेली उणीव भरून निघेल." तर आपण त्याला वेड्यात काढू !


त्या वाहनासारखंच आपल्या शरीराचंही आहे.माझ्या आंतरिक प्रक्रियांसाठी अयोग्य इंधन (अन्न) मी खाईन पण आज दुप्पट व्यायाम करीन,जास्त अंतर चालीन आणि सर्व काही ठीक होईल ही आपली गैरसमजूत आहे !


शारीरिक क्षमतेवर नेहेमीपेक्षा जास्त काम करून आपण आंतरिकप्रक्रियांमधली उणीव भरून काढू शकतो असं आपल्याला सांगण्यात आलंय,पण ते खरं नाही.


 चार आग्रहाचे गुलाबजाम जास्त खा आणि नंतर मैलभर चालून ये किंवा व्यायामशाळेत जास्त घाम गाळ,म्हणजे मग काही होत नाही असं आपल्याला वाटतं.पण हे म्हणजे,जुळ्या भावांपैकी एकाची भूक भागवण्यासाठी दुसऱ्याला चार घास जास्त देण्यासारखं आहे !


आपल्या परिपूर्ण आरोग्याचे दोन भाग शारीरिक क्षमता आणि आंतरिक आरोग्य हे जुळ्या भावांसारखे आहेत.ते एकमेकांना मदत करू शकतात,पण त्यापैकी एकाकडे दुर्लक्ष करून चालत नाही.एवढंच नाही तर असं दुर्लक्ष केल्याची उणीव दुसऱ्याकडे जास्त लक्ष देऊन भरून काढता येत नाही !


आपण कदाचित "You cannot outrun a bad diet" असं वचन ऐकलं असेल.त्याचा अर्थ हाच आहे की अधिक शारीरिक क्षमता आंतरिक आरोग्याला थोडासा टेकू देऊ शकेल,पण त्यांची जागा घेऊ शकत नाही. Fitness cannot compensate for bad health.


शारीरिक क्षमतेचा संबंध आपल्याला रोजच्या जगण्यात शरीराबाहेर जी कामं करावी लागतात त्याच्याशी आहे. तुम्ही सहज जिने चढू शकता का ? थोडंसं धावून बस पकडू शकता का ? भाजीच्या पिशव्या,प्रवासाच्या बॅगा घेऊन निदान काही अंतर सहज चालू शकता का ? कुटुंबियांबरोबर,मित्रांबरोबर लांबवर फिरायला जाऊ शकता का? बसमध्ये विमानात बसताना आपापली बॅग वरच्या कप्प्यात ठेवू शकता का? मुलांबरोबर / नातवंडांबरोबर खेळू शकता का ? त्यांना कडेवर घेऊ शकता का ?आपलं वय जसं वाढत जाईल तसं हे सगळं करण्याची आपली इच्छा असतेच आणि ते करू शकण्याची क्षमता आपण राखली पाहिजे.त्यासाठी नियमित व्यायाम, खेळ हे गरजेचं आहे. आणि आपण आधी पाहिल्याप्रमाणे,हा विषय शारीरिक क्षमतेचा आहे.


दुसरा विषय आंतरिक आरोग्याचा


तुम्हाला जीवनशैलीचे आजार आहेत का किंवा त्याची सुरुवात झाली आहे का? वजन आणि पोटाचा घेर वाढलेला असणं,उच्च रक्तदाबासाठी औषध असणं, रक्तातील इन्सुलिनची किंवा ग्लुकोजची पातळी वाढलेली असणं,स्त्रियांमध्ये मासिक पाळी नियमित नसणं / पीसीओडी चा त्रास असणं,इ.लक्षणं चालू झाली आहेत का ? वेगळ्या शब्दातः जर तुम्हाला हे सर्व त्रास नियंत्रणात ठेवायचे असतील,उद्या त्यांचं रूपांतर गंभीर आजारात होऊ दयायचं नसेल आणि निरोगी दीर्घायुष्य जगायचं असेल तर आंतरिक आरोग्यावर काम करणं अत्यंत गरजेचं आहे.


नुसतं "मी रोज एक तास चालतो" अशी शारीरिक क्षमतेशी निगडित कारणं देऊन उपयोग नाही किंवा "मला आत्ता काही होत नाहीये" अशी वरवरची कारणं देऊनही चालणार नाही.आंतरिक आरोग्यावर स्वतंत्रपणे बारीक लक्ष दिलं पाहिजे.


आरोग्य म्हणजे नक्की काय ? आधुनिक भस्मासुर, जीवनशैलीच्या आजारांचं वास्तव आणि उपाय,मंदार गद्रे,औषधांपासून मुक्ती देणारा डॉक्टर


अनेकदा आपल्याला शारीरिकदृष्ट्या सक्षम व्यक्तींना जीवनशैलीचे आजार होताना दिसतात.आपण बोलून जातो,की "अरे, तिला कसा मधुमेह झाला? ती तर रोज चालायला जातेच,आणि योगासनंही करते." किंवा त्याला कसा उच्च रक्तदाब आणि हृदयविकार जडला? तो तर नियमित व्यायाम करतो,हिमालयात ट्रेकिंगलाही जातो.

शारीरिक क्षमता आणि आंतरिक आरोग्य हा फरक लक्षात घेतला तर आता ह्या प्रश्नांचं उत्तर मिळतं. वरून शारीरिकरीत्या सक्षम दिसणाऱ्या व्यक्तीच्याही शरीरातल्या प्रक्रिया बिघडलेल्या असू शकतात.अर्थात-उत्तम आंतरिक आरोग्य आहे म्हणून तुम्ही उद्या सहज १० किलोमीटर पळू शकाल,उत्तम वजनं उचलू शकाल,किंवा डोंगर चढू शकाल असंही नाही.त्या प्रकारच्या शारीरिक क्षमता कमवायला तुम्हाला त्यांचा सराव करावाच लागेल.म्हणजेच,Fitness & Health are different. One cannot compensate for the other हे आपल्या लक्षात येतं.


शिल्लक राहिलेला भाग पुढील लेखांमध्ये…!




१५/१/२५

अंधारातला नेम A name in the dark

भारतात लोकांच्या जेवणाच्या वेळा या ऋतू आणि व्यक्तीगत आवडीनिवडी यावर ठरतात.तरीही बऱ्याच भागात ठरलेल्या वेळा म्हणजे सकाळी ८ ते ९ न्याहारी, १ ते २ दुपारचं जेवण आणि ८ ते ९ रात्रीचं जेवण. रुद्रप्रयागमधल्या गेल्या काही महिन्यातल्या वास्तव्यात माझ्या जेवणाच्या वेळा अतिशय चमत्कारिक होत्या. सकाळचा नाश्ता दुपारी,दुपारचं जेवण रात्री किंवा दिवसभरात एकदाच दोन्ही वेळचं जेवण.पण 


" जेवणातील घटक आणि नियमितपणा यावर आरोग्य अवलंबून असतं." 


आणि ह्या समाजाला छेद देणारी गोष्ट म्हणजे या माझ्या अनियमित जेवणांमुळे माझ्यावर काहीही वाईट परिणाम झाला नाही... फक्त मी थोडासा सडसडीत मात्र राहिलो.


कालच्या ब्रेकफास्टनंतर सकाळपर्यंत मी काहीही खाल्लं नव्हतं आणि भला आजची रात्रसुद्धा बाहेर जागून काढायची असल्यामुळे मी चांगलं भरपेट खाऊन घेतलं आणि तासभर डुलकी काढून गुलाबराईला निघालो. तिथल्या पंडितला मला धोक्याची सूचना द्यायची होती की आता नरभक्षक त्याच्या गावाच्या आसपास आला आहे.पहिल्या वेळी मी रुद्रप्रयागला आलो होतो तेव्हाच माझी ह्या पंडितशी दोस्ती झाली होती आणि त्याच्याशी दोन शब्द बोलल्याशिवाय मी पुढे जायचो नाही.याची दोन कारणं होती;एक म्हणजे नरभक्षकाबद्दल आणि तिथून जाणाऱ्या-येणाऱ्या यात्रेकरूंबद्दल सांगण्यासारखे कित्येक मनोरंजक किस्से त्याच्याकडे होते आणि दुसरं म्हणजे नरभक्षकाच्या प्रत्यक्ष हल्ल्यातून बचावलेल्या दोन व्यक्तींपैकी तो एक होता.(दुसरी व्यक्ती म्हणजे हाताच्या जखमेसरशी थोडक्यात बचावलेली ती बाई) (मॅनइटींग लेपर्ड ऑफ रुद्रप्रयाग मूळ लेखक - जिम कॉर्बेट,अनुवाद - विश्वास भावे)अशीच एक गोष्ट त्याच्या माहितीतल्या आणि जवळच्याच खेड्यातल्या एका स्त्रीबद्दल होती.रुद्रप्रयाग बाजारातून घराकडे निघताना ती बाई गुलाबराई गावात जरा उशीराच पोचली.अंधार पडायच्या आत आपण आपल्या गावातपोचू शकणार नाही ह्या भीतीमुळे तिने पंडितला ती रात्र त्याच्या पिलग्रिम शेल्टरमध्ये काढू देण्याची विनंती केली.

त्यावर त्याने असं सुचवलं की यात्रेकरूंना लागणाऱ्या चीजवस्तू ठेवण्याचं त्याचं जे गुदाम होतं त्याच्या दरवाजासमोर ती झोपली तर एका बाजूने गुदामाची खोली आणि दुसऱ्या बाजूने त्या ठिकाणी झोपलेले ५० यात्रेकरू यामुळे ती सुरक्षित राहील.या झोपड्याची रस्त्याकडची बाजू उघडीच असायची,पण डोंगराकडच्या बाजूला मात्र भिंत होती. गुदामाची खोली या शेल्टर्सच्या मधोमध होती पण ती डोंगराच्या आत घुसल्याने त्याच्यापुढची जमीन सलग राह्यली होती.त्यामुळे ती बाई जेव्हा गुदामाच्या दरवाजासमोर झोपली तेव्हा तिच्या आणि रस्त्याच्या

मधोमध पन्नास यात्रेकरू होते.रात्री केव्हातरी यात्रेकरूंपैकीच एक बाई विंचू चावला म्हणून ओरडत उठली.तिथे कुठलाही दिवा नव्हता पण आगकाडीच्या प्रकाशात पाह्यलं तर त्या बाईच्या पायाला छोटा ओरखडा उठला होता.त्यातून थोडं रक्तही येत होतं.त्या बाईने छोट्या गोष्टीचा एवढा बाऊ केल्याबद्दल

कुरकूर करत आणि विंचवाच्या दंशातून तसंही रक्तबिक्त काही येत नाही.अशी काहीबाही बडबड करत सर्वजण परत झोपी गेले.

आंब्याच्या झाडाच्या वरच्या बाजूला असलेल्या आपल्या घरातून पंडित जेव्हा सकाळी तिथे आला तेव्हा त्याला त्या खेडेगावातल्या बाईची साडी शेल्टर समोरच्या रस्त्यावर पडलेली दिसली आणि त्यावर रक्त होतं.खरंतर पंडितने त्याच्या मते सर्वात सुरक्षित जागा त्या गाववाल्या बाईला दिली होती.तरीही पन्नास यात्रेकरूंच्या गर्दीतून बिबळ्याने तिलाच उचललं होतं आणि तिला तोंडात पकडून तिथून बाहेर पडताना चुकून यात्रेकरूंपैकी एकीच्या पायाला त्याचं नख लागलं होतं.पन्नास यात्रेकरूंना सोडून त्याच बाईला मारल्याबद्दल पंडितने जे स्पष्टीकरण दिलं ते असं की त्या सर्वांमध्ये तिचेच कपडे रंगीत होते. ह्या स्पष्टीकरणात तथ्य नाहीये.बिबळे वासाचा वापर करून शिकार करत नाहीत ते हे गृहीत धरूनही माझं स्पष्टीकरण असं आहे की त्या सर्व गर्दीत फक्त त्याच बाईच्या अंगाचा वास त्याला ओळखीचा वाटला असणार. आता हे फक्त तिचं दुर्दैव होतं, 'किस्मत' होती का फक्त त्या छपराखाली झोपण्यामधला धोका ओळखणारी ती एकच व्यक्ती होती आणि तिची ही भीती काहीतरी विलक्षण रीतीने बिबळ्यांपर्यंत पोचली असती व तो आकर्षित झाला असावा ?


या घटनेनंतर लगेचच पंडितची नरभक्षकाशी आमनेसामने भेट झाली.या घटनेचा अचूक दिवस काढायचा असेल तर तो रुद्रप्रयाग हॉस्पिटलच्या नोंदीमधून मिळू शकेल,पण त्याची या ठिकाणी आवश्यकता नाही.या गोष्टीच्या दृष्टीने महत्त्वाचं एकच सांगता येईल की ती उन्हाळ्याच्या दिवसात घडली.मी पंडितला भेटण्याच्या चार वर्ष आधी.. म्हणजे १९२१ मध्ये !


एकदा एका संध्याकाळी मद्रासवरून दहा यात्रेकरू तिथे आले व त्यांनी पंडितला ती रात्र त्याच्या शेल्टर्समध्ये काढू देण्याची परवानगी मागितली.गुलाबराईत आणखी एक नरबळी गेला तर त्याच्या पिलग्रिम शेल्टरचं नाव बदनाम होईल या भीतीने त्याने त्यांना तसंच पुढे दोन मैल चालत रुद्रप्रयागला जायला सांगितलं.

त्याच्या सांगण्याचा या यात्रेकरूंवर काहीही परिणाम होत नाहीये हे पाहिल्यावर मात्र त्याने त्यांना त्याच्या घरातच आश्रय दिला.मी मागे सांगितलंच आहे की हे घर यात्रामार्गावरच्या आंब्याच्या झाडापासून डोंगराच्या बाजूला पन्नास यार्डावर होतं.पंडितचं घरसुद्धा त्या भैसवाड्यातल्या घरांच्याच धर्तीवर बांधलेलं होतं, तळमजल्याच्या खोल्या सरपण व धान्य साठवण्यासाठी तर राहती घरं वरच्या मजल्यावर;अंगण,थोड्या पायऱ्या, त्यानंतर व्हरांडा आणि पायऱ्या संपताच समोरच राहात्या खोलीचं दार !


पंडित व त्याच्यावर आज लादल्या गेलेल्या दहा यात्रेकरूंचं रात्रीचं जेवण झाल्यावर त्यांनी त्या खोलीत स्वतःला बंद करून घेतलं.या खोलीत हवा आत बाहेर जायला काही वावच नव्हता आणि हवेत अतिशय उकाडा होता.उकाडा फारच असह्य झाला तसा पंडित रात्री केव्हातरी उठला आणि दरवाजा उघडून बाहेर व्हरांड्यांत आला.तिथे जिन्याच्या दोन्ही बाजूच्या खांबांना हात देऊन उभा राहतोय आणि बाहेरची ताजी हवा छातीत भरून घेतोय तेवढ्यात त्याचा गळा चिमट्यात पकडावा तसा पकडला गेला.खांबावरची हाताची पक्कड तशीच ठेवून त्याने त्याच्या पायाचे तळवे हल्लेखोराच्या छातीवर ठेवून जीव खाऊन लाथ मारली. त्यासरशी बिबळ्याची त्याच्या गळ्यावरची पक्कड सुटली आणि तो पायऱ्यांवरून खाली धडपडत गेला.


आता आपली शुद्ध हरपणार असं वाटल्याने पंडित जरा बाजूला सरकला व त्याने जिन्याच्या रेलिंगवर आधारासाठी हात ठेवले.त्याक्षणी बिबळ्याने दुसऱ्यांदा खालून झडप मारली.

पंडितच्या डाव्या दंडात त्याची नखं रूतली.रेलिंगचा आधार घेतल्याने पंडित खाली पडला नाही पण एकीकडे रेलिंगवर रोवलेले पंडितचे हात व खालून बिबळ्याचं वजन यामुळे त्याची नखं हाताला दंडापासून ओरबाडत ओरबाडत मनगटापाशी सुटली. एव्हाना पंडितचे भीतीदायक आवाज ऐकून यात्रेकरूंनी दरवाजा उघडला होता.बिबळ्याने तिसरी झडप मारण्याच्या आत त्यांनी पंडितला चटकन घरात ओढून घेतलं आणि मागे दरवाजा घट्ट लावून घेतला.रात्रभर त्या गरम उबट हवेमध्ये पंडित गळ्याला पडलेल्या भोकांमधून श्वास घेण्याचा प्रयत्न करत होता,बिबळ्या गुरगुरत दारावर नख्यांनी ओरखडे काढून दरवाजा फोडण्याचा प्रयत्न करत होता तर यात्रेकरू घाबरून किंचाळत होते ! दिवस उजाडल्यावर यात्रेकरूंनी पंडितला रुद्रप्रयागच्या काला कमलीवाला हॉस्पिटलमध्ये नेलं.तिथे गळ्यात नळ्या घालूनच त्याला अन्न द्यावं लागलं.सहा महिन्यानंतर तब्येतीची पार मोडतोड झालेल्या अवस्थेत पंडितला घरी आणलं गेलं.त्यानंतर पाच वर्षांनी त्याचे फोटो काढले गेले.त्याच्या चेहऱ्याच्या डाव्या बाजूचे व्रण आणि डाव्या हाताच्या ओरबाडल्याच्या खुणा प्रत्यक्षात स्पष्ट दिसत असल्या तरी फोटोत मात्र अस्पष्ट दिसतात.


पंडित नेहमी माझ्याशी बोलताना बिबळ्याचा उल्लेख 'सैतानी शक्ती' म्हणून करायचा व पहिल्याच दिवशी त्याने मला विचारलं होतं की त्याला आलेल्या अनुभवाचा विचार केला तर ही 'सैतानी शक्ती' एखाद्या प्राण्याचं रूप घेऊ शकत नाही याला मी काय पुरावा देऊ शकतो? त्यानंतर गंमतीने मीही त्याच्याशी बोलताना बिबळ्याचा उल्लेख 'सैतानी शक्ती' असाच करायचो.त्या संध्याकाळी गुलाबराईत आल्यावर मी पंडितला भेटलो आणि त्याला माझ्या भैंसवाड्याच्या फसलेल्या मोहिमेबद्दल सांगितलं.

आता हा सैतान गुलाबराईच्या जवळपासच वावरत असल्याने त्याने स्वतःसाठी आणि त्याच्या पिलग्रिम शेल्टर्समध्ये राहायला येणाऱ्या यात्रेकरूंसाठी जादा खबरदारी घ्यावी अशीही सूचना मी त्याला दिली.ती रात्र व त्यानंतरच्या तीन रात्री मी त्या यात्रामार्गावरच्या गंजीवर बसून रस्त्यावर लक्ष ठेवत घालवल्या.चौथ्या दिवशी इबॉटसन पौरीहून आला.इबॉटसन आला की मला नेहमी नव्याने उत्साह वाटायचा,कारण इतर स्थानिक लोकांप्रमाणे त्याचीही अशीच धारणा होती की नरभक्षक आज मारला गेला नाही तर कोणालाही दोष देण्यात अर्थ नाही,आज नाही तर उद्या तो संपणारच!माझ्याकडे त्याला सांगण्यासारख्या बऱ्याच गोष्टी होत्या.मी त्याला छोट्यामोठ्या घटना पत्रातून नियमितपणे कळवायचो आणि त्यातलाच काही सारांश शासनाला द्यायच्या अहवालात तो टाकत असे.पुढे तो प्रसारमाध्यमांकडेही जात असे.पण छोटे छोटे तपशील मात्र प्रत्यक्षच सांगण्यात मजा असते आणि त्यालाही ते ऐकायची उत्सुकता होतीच.अर्थात इबॉटसनकडेही मला सांगण्यासारखं खूप काही होतं;ते जास्त करून प्रसारमाध्यमांनी जो या प्रकरणाचा गाजावाजा चालवला होता त्याबद्दल होतं.देशातल्या कानाकोपऱ्यात आवाहन करून इच्छुकांना नरभक्षकाला मारण्यासाठी बोलावलं जावं असा सर्वत्र दबाब होता.या प्रसारमाध्यमांच्या मोहिमेमुळे इबॉटसनकडे फक्त एक उत्तर व एक सूचना आली होती.उत्तर एका शिकाऱ्याकडून आलं होतं व त्याच्या म्हणण्यानुसार जर त्याच्या प्रवासाची व राहण्याजेवणाची समाधानकारक सोय झाली तर तो गढवालला येण्याचा विचार करेल.सूचना करणाऱ्याने असा सल्ला दिला होता की नरभक्षकाला मारण्याचा सर्वात सोपा व खात्रीचा उपाय म्हणजे एका बोकडाच्या अंगाला विष चोपडावं,ते विष त्यानेच चाटू नये म्हणून त्याची मुसकी आहे तसंच राहू द्यावं व नंतर त्याला बिबळ्यासाठी आमिष म्हणून बांधावं,म्हणजे मग बिबळ्या त्याला मारेल आणि विषबाधा होऊन तोही मरेल.त्या दिवशी आम्ही बराच गप्पा मारत बसलो आणि माझ्या आतापर्यंतच्या अपयशाचा संपूर्ण आढावा घेतला.जेवण करताना मी त्याला रुद्रप्रयाग-गुलाबराई रस्त्यावरून साधारण दर पाच दिवसांनी जाण्याच्या बिबळ्याच्या सवयीचा उल्लेख करत आणि त्या रस्त्यावर पुढच्या दहा रात्री बसायचा माझा इरादाही सांगितला.या दहा दिवसांमध्ये एकदा तरी तो त्या रस्त्यावरून जाणार असा माझा अंदाज होता.मी अगोदरच कित्येक रात्री जागून काढल्या होत्या आणि आता आणखी दहा रात्री काढायच्या म्हणजे माझ्यावर फारच ताण येणार होता त्यामुळे इबॉटसनने या योजनेला जरा नाखुषीनेच होकार दिला.पण मी आग्रहच धरला आणि त्याला सांगितलं की जर या काळातही मला अपयश आलं तर मात्र मी नैनितालला परत जाईन व ज्या कोणाला माझी जागा घ्यायची इच्छा असेल त्याला मी रणांगण मोकळं करून देईन.संध्याकाळी इबॉटसन माझ्यासोबत गुलाबराईला आला आणि त्याने मला त्या पिलग्रिम शेल्टर्सपासून शंभर यार्डावरच्या आंब्याच्या झाडावर मचाण बांधायला मदत केली.झाडाच्या बरोबर खाली आणि रस्त्याच्या मधोमध आम्ही मजबूत लाकडी खुंट ठोकला व एका बोकडाच्या गळ्यात घंटा बांधून त्याला या खुंटाला बांधून टाकलं.


पौर्णिमेच्या आसपासचीच रात्र होती तरीही गुलाबराईच्या पूर्वेकडच्या उंच पहाडांमुळे गंगेच्या खोऱ्यात चंद्रप्रकाश फारच कमी वेळ मिळणार होता. जर उरलेल्या अंधाऱ्या काळात बिबळ्या आला तर त्या बोकडाच्या गळ्यातल्या घंटेमुळे मला समजणार होतं.सर्व जय्यत तयारी झाल्यावर इबॉटसन परत बंगल्यावर गेला.दुसऱ्या दिवशी अगदी सकाळीच तो माझ्या दोन माणसांना पाठवून देणार होता.झाडाखालच्याच एका दगडावर बसून सिगारेट ओढत रात्र पडायची वाट बघत असतानाच पंडित आला आणि माझ्या शेजारी बसला. पंडित "भक्ती" (माळकरी) होता आणि त्यामुळे धूम्रपान करत नसे.संध्याकाळी मचाण बांधताना त्याने आम्हाला पाह्यलं होतं.आता तो मला पटवू लागला की पलंगावर आरामशीर पडून राहायचं सोडून रात्रभर कशाला जागायचं? मी त्याला सांगितलं की हीच नव्हे तर पुढच्या नऊ रात्री मी तेच करणार आहे.कारण जरी मी त्या 'सैतानी शक्ती' किंवा दुष्टात्म्याला मारू शकलो नाही तरी किमान त्याच्या घराचं आणि पिलग्रिम शेल्टर्सचं संरक्षण तरी करू शकेन.त्या रात्री एकदा एका भेकरानं डोंगरावर अलार्म कॉल दिला पण त्यानंतर रात्रभर विशेष काहीच घडलं नाही.सकाळी माझी माणसं आली तसं त्यांच्या हातात माझा रग आणि रायफल देऊन मी वाटेवर पगमार्कस दिसतायत का ते वघत बघत इन्स्पेक्शन बंगल्याकडे निघालो.पुढचे नऊ दिवस माझ्या कार्यक्रमात काहीही बदल नव्हता.संध्याकाळी लवकरच मी माझ्या दोन माणसांना घेऊन बंगल्यावरून निघायचो आणि मचाणावर जागा घेतल्यावर दोन माणसांना परत पाठवायचो.

कोणत्याही परिस्थितीत उजेड नीट पडल्याशिवाय बंगल्याबाहेर पडायचं नाही ही सक्त ताकीद मात्र त्यांना असे.सकाळी नदीपलीकडच्या डोंगरामागून सूर्य उगवत असतानाच माणसं परत येत.त्यानंतर आम्ही एकत्रच बंगल्यावर जायचो.


या दहा रात्रींमध्ये पहिल्या रात्रीचा भेकराचा अलार्म कॉल सोडला तर विशेष काहीच घडलं नाही. नरभक्षकाचा वावर मात्र आसपास होता याचे सबळ पुरावे मिळत होते.दोन रात्री त्याने घराचे दरवाजे फोडून एकदा एक बोकड आणि दुसऱ्यांदा मेंढी उचलली होती. बऱ्याच धडपडीनंतर मला ही दोन भक्ष्य मिळाली कारण त्यांना बरंच लांब ओढून नेलं गेलं होतं.पण त्या एकाच रात्री भक्ष्याचा संपूर्ण फडशा पडल्यामुळे त्याच्यावर बसण्यात काहीच अर्थ नव्हता.


शिल्लक भाग पुढील लेखामध्ये…!

१३/१/२५

३.८ मज्जासंस्था-१ / 3.8 Nervous system-1

शिवाय,मज्जातंतू हे हृदयातून न निघता ते मेंदूतून निघतात हे सांगून ॲरिस्टॉटल कसा चूक होता हेही सांगितलं.याबरोबरच हालचालींसाठी लागणारे मज्जातंतू (मोटर नर्व्हज) आणि संवेदनेसाठी लागणारे मज्जातंतू (सेन्सरी नर्व्हज) हे वेगळे असतात हेही हिरोफिलसनं दाखवून दिलं.त्यानं डोळ्यांतल्या दृष्टिपटलापासून (रेटिनापासून) निघणाऱ्या मज्जातंतूंचा

(ऑप्टिक नर्व्हज) शोध घेतला.हिरोफिलस सार्वजनिक शवविच्छेदन करे. दूरदूरहून अनेक लोक ते बघण्यासाठी येत.


नर्व्हज सिस्टिम (मज्जासंस्था)


ग्रीकांचा वारसा नंतर रोमनांनीही चालू ठेवला. हिरोफिलसनंतर जवळपास ५०० वर्षांनंतर म्हणजे इ.स. १३०-२०० च्या दरम्यान गेलन (Galen) नावाचा एक प्रसिद्ध डॉक्टर आणि वैज्ञानिक होऊन गेला.ग्रीस आणि रोम या दोन्ही ठिकाणी त्याचं वास्तव्य होतं.गेलन याला मात्र आपल्या मेंदूतच आपलं मन दडलेलं आहे याची खात्री होती.त्या काळी माणसाच्या मृतदेहाचं विच्छेदन करणं हा त्या माणसाचा मृत्यूनंतर होणारा अपमानच आहे असं मानलं जाई.त्यामुळे त्यानं अनेक डुकरं, माकडं आणि गुरंढोरं यांचं विच्छेदन केलं.त्यानं डुकराच्या मेंदूपासून त्याच्या अवयवांपर्यंत जाणारे त्या अवयवांच्या हालचालीसाठी उपयुक्त असणारे मोटर नर्व्हज आणि त्या अवयवांच्या संवेदनांसाठी उपयुक्त असे सेन्सरी नर्व्हज कापून टाकले आणि ते कापल्यावर त्यांच्यावर काय परिणाम होतात यांच्या निरीक्षणांची बारकाईनं टिपणं करून ठेवली.पाठीच्या कण्यापासून (स्पानयल कॉर्ड) निघणाऱ्या मज्जातंतूंप्रमाणे त्यानं अनेक मज्जातंतू एकएक करत कापायला सुरुवात केली.कुठला मज्जातंतू कापल्यावर शरीरातल्या कुठल्या भागावर काय परिणाम होतो हे गेलनला बघायचं होतं. स्वरयंत्राकडे जाणारा मज्जातंतू जर कापला तर आवाजच करता येत नाही हे त्यानं न्याहाळलं होतं. गेलननंतर साधारणपणे १३०० वर्षांनी लिओनार्दो दा विंची (इ.स.१४५२-१५१९) नं काही महत्त्वाची विच्छेदनं केली आणि मेंदूतल्या टिश्यूजचं महत्त्व दाखवून दिलं,त्यानं बैलाच्या मेंदूतल्या पोकळीमध्ये वितळलेलं मेण ओतलं,ते सेट होऊ दिलं आणि नंतर मेंदूचं विच्छेदन करून आजूबाजूच्या टिश्यूजचं निरीक्षण केलं.मज्जातंतू हे मेंदूपर्यंत येऊन संपुष्टात येतात हे त्यानं शोधून काढलं. मेंदूच्या या भागाला कालांतरानं

'बॅलॅमस' असं म्हणायला लागले.


लिओनार्डोच्याच काळी व्हेसॅलियस (इ.स.१५१४-१५६४) नावाचा एक शरीरशास्त्रज्ञ होऊन गेला.त्यानं नुकत्याच मारलेल्या अनेक प्राण्यांचे मेंदू तपासले.मेंदू हाच आपल्या सगळ्या कृतीच्या आणि भावनांच्या केंद्रस्थानी असतो या निष्कर्षापर्यंत तोही येऊन पोहोचला.


मेंदूच्या पोकळीत एक द्रवपदार्थ भरलेला असतो आणि तो मेंदूमधून संदेश पोहोचवण्यासाठी उपयोगी पडतो असं देकार्तनं सांगितलं.या मेंदूतल्या द्रवपदार्थाला तो 

ॲनिमल स्पिरिट असं म्हणे.मनात जेव्हा शरीरामधल्या एखाद्या विशिष्ट भागाची हालचाल घडवून आणायची इच्छा होते तेव्हा मेंदूचा त्या विशिष्ट द्रवपदार्थानं भरलेला भाग मन एका ठरावीक दिशेनं वाकवते.त्यामुळे मेंदूतलं द्रव त्या दिशेच्या मज्जातंतूंमधून वाहायला लागतं. 


त्यामुळे त्या मज्जातंतूंच्या आजूबाजूचे स्नायू फुगतात आणि हालचाल करायला लागतात अशी देकार्तची थिअरी होती.अशा तऱ्हेनं देकार्तनं त्याचं हायड्रॉलिक यांत्रिक मॉडेल मांडलं.शरीरातल्या नर्व्हजमध्ये असलेल्या झडपांच्या (व्हॉल्व्हज) मुळे हा द्रवपदार्थ मज्जातंतूंमध्ये किती येतो आणि त्यातून तो किती बाहेर पडतो हे नियंत्रित होतं अशी त्याची थिअरी होती. उदाहरणार्थ,आपण जर एखाद्या शेकोटीत पेटलेल्या आगीत हात नेला तर आपल्या त्वचेजवळचे रिसेप्टर्स हे उत्तेजित होऊन मेंदूतल्या पोकळीजवळची झडप उघडली जाते आणि त्यामुळे तो द्रवपदार्थ तिथल्या मज्जातंतूंमध्ये वाहायला लागतो.त्यामुळे आपल्या तिथल्या स्नायूंना सूचना मिळून आपण हात बाजूला घेतो असं देकार्तनं मांडलं.पण ही हात चटकन काढून घेण्याची क्रिया खूप विचारपूर्वक केलेली नसते.ती जवळपास क्षणार्धात म्हणजे आपोआपच होते.म्हणून यांना रिफ्लेक्स ॲक्शन म्हणायला लागले.देकार्तनं आपले स्नायू हे मज्जातंतूमध्ये शिरणाऱ्या द्रवपदार्थामुळे हालचाल करतात असं जे हैड्रॉलिक मॉडेल मांडलं ते चूक असल्याचं लुइगी गॅल्व्हनी (१७३७ ते १७९८) या इटालियन शास्त्रज्ञानं दाखवून दिलं.स्नायूंना किंवा त्यांना जोडलेल्या मज्जातंतूंना जर विद्युतप्रवाह दिला तर ते स्नायू हालचाल करू शकतात,त्यात गेलेल्या द्रवपदार्थामुळे नाही हे त्यानं बेडकांवर केलेल्या प्रयोगांवरून सिद्ध केलं.


मन आणि मेंदू यांच्यातला संवाद हा मेंदूतल्या पोकळीजवळ असणाऱ्या पिनियल ग्लँडमध्ये होतो असं देकार्तनं मांडलं.मेंदू हा बराच सममितीय (सिमिट्रिक) असतो.पण त्यात मध्यभागी असणारा पिनियल ग्लैंड नावाचा एक भाग मात्र एकटाच असतो.त्याला जोडीदार नसतो.फार पूर्वीपासून माणसाला याविषयी कुतूहल होतं.आत्मा इथंच वास्तव्य करतो असं पूर्वीच्या हिंदू साधूंना वाटायचं.पण देकार्तनं वेगळंच मत मांडलं.आज मात्र ४०० वर्षांनंतर देकार्तची थिअरी फारशी कुणी गंभीरपणे घेत नाही.


मेंदू हा एकसंध आहे की त्याचे अनेक भाग असून,ते शरीराच्या वेगवेगळ्या गोष्टी नियंत्रित करतात याविषयीचा एक वाद मेंदूविज्ञानात अनेक वर्षं रंगणार होता.त्या नाट्यातलं एक पात्र होतं थॉमस विलीस (Thomas Willis १६२१-१६७५).थॉमस हा देकार्तचा समकालीन होता.रॉयल सोसायटीचा संस्थापक असलेल्या विलीसनं रॉबर्ट हुकला आपला मदतनीस म्हणून नेमलं होतं.विलीसनं माणसाच्या मेंदूचे अनेक भाग किंवा कप्पे असतात असं मानलं.

स्मृती,इच्छा, कल्पनाशक्ती या वेगवेगळ्या गोष्टी मेंदूतल्या वेगवेगळ्या भागांमुळे नियंत्रित होतात असं विलीस म्हणे.विलीसनं ॲ्नॅटॉमी ऑफ द ब्रेन' नावाचं पुस्तक लिहिलं.त्या वेळचा प्रसिद्ध ड्राफ्ट्समन आणि आर्किटेक्ट आणि लंडनमधल्या सेंट पॉलच्या कॅथिड्रलचा रचनाकार ख्रिस्तोफर रेन यानं विलीसच्या पुस्तकाकरता चित्रं काढली होती.आजचं मेंदूविज्ञान विलीसनं मानलेले कप्पे जसेच्या तसे फारसे जरी मानत नसले तरी मेंदूतले वेगवेगळे भाग वेगवेगळ्या गोष्टी नियंत्रित करतात हे त्याचं म्हणणं मात्र मान्य करतं.यामुळेच न्यूरॉलॉजी हा विषय सुरू झाला आणि खरं म्हणजे हा शब्दही विलीसनंच पहिल्यांदा वापरला.यामुळेच मेंदूच्या तळाशी असलेल्या रोहिण्यांना विलीसच्या सन्मानार्थ 'सर्कल ऑफ विलीस' या नावानं ओळखलं जातं.


जोहॅन्स पुर्किंजे


मेंदूच्या रचनेविषयी आपल्याला जे समजलं त्यात चेकोस्लाव्हियाचा प्रोफेसर जोहॅन्स पुर्किजे (Johannes Purkinje) १७८७ -१८६९) याचा खूपच मोठा वाटा आहे.मेंदूकडे सूक्ष्मदर्शकातून बघून त्याबद्दल टिपणं करणारा तो पहिलाच शरीरशास्त्रज्ञ होता. माणसांच्या बोटांच्या ठशांचा अभ्यास केल्याबद्दलही त्याला प्रसिद्धी मिळाली होती.मेंदूच्या खालच्या आणि मागच्या बाजूला सेरेबेलम (Cerebellum) नावाचा एक भाग असतो.सेरेबेलममुळे आपण आपला तोल राखू शकतो आणि सगळ्या हालचालीचं सुसूत्रीकरण करू शकतो. सेरेबेलममधल्या एका पेशीचं वर्णन प्रथम पुर्किंजेनं केलं त्यानं वर्णन केलेली ही पेशी खूपच गुंतागुंतीची होती.ही पेशी इतर मज्जापेशींबरोबर चित्रविचित्र तऱ्हेनं जोडली गेलेली होती.पुर्किंजेनं ही पेशी शोधल्यामुळे या पेशीला 'पुर्किंजे पेशी' असं म्हणायला लागले.एका पुर्किंजे पेशीला इतर २ लाख पेशींकडून संदेश येत असतात.ही पेशी खूप मोठीही होती.मानवी केसाएवढी ती जाड होती.पुर्किंजेनं शोधलेली ही पेशी सेरेबेलममधल्या इतर पेशींपेक्षाही सहापट मोठी होती.ही पेशी मोठी असल्यामुळेच त्या काळीही पुर्किंजे ती न्याहाळून त्याचं वर्णन करू शकला होता.आपल्या शरीरात एकूण अशा २.६ कोटी पुर्किंजे पेशी असतात असा कोणीतरी अंदाज बांधला आहे.या पेशी मेंदूत इतर ठिकाणीही विखुरलेल्या असल्या तरी मुख्यत्वेकरून त्या सेरेबलमध्येच सापडतात.


या सगळ्या संशोधनामुळे पुर्किंजेला त्या काळात इतकी अफाट प्रसिद्धी मिळाली होती,की युरोपबाहेरील लोक त्याला पत्र पाठवताना पाकिटावर फक्त पुर्किंजे,युरोप एवढाच पत्ता लिहीत असत आणि अर्थातच पुर्किंजेला ती पत्रं मिळत असत..


११.०१.२५  या लेखातील शेवटचा भाग...



११/१/२५

३.८ मज्जासंस्था-१ / 3.8 Nervous system-1

नर्व्हजच्या माध्यमातून शरीरातल्या संवेदनांचे मार्ग झाडांची मुळं आणि फांद्या यांसारखी सगळ्या शरीरात पसरलेली असतात.अलेसांड्रो बेनेडिट्टी १४९७


या विश्वात मेंदूइतकी गुंतागुंतीची आंतररचना असणारी कुठलीच यंत्रणा सापडणं जवळपास अशक्यच आहे. जरी दोन माणसांचे मेंदू वरवर सारखेच दिसत असले तरी त्यात असंख्य भावनांचे कल्लोळ,आशानिराशेचा लपंडाव, राग,लोभ,वासना,आनंद,दुःख,नैराश्य अशा अनेक भावनांच्या छटा या सगळ्या गोष्टी उमटत असतात हे बघून थक्क व्हायला होतं.आपण ज्या तऱ्हेनं विचार करतो,ज्या तऱ्हेनं नव्या गोष्टी शिकतो,कलेचा आनंद घेतो,आपली बुद्धी,आपला स्वभाव आणि आपले मूड्ज यांचे पडसाद एवढ्या छोट्याशा अवयवात घडत असतात हे या विश्वातलं एक आश्चर्यच आहे.


या मेंदूची रचना कशी आहे? या प्रश्नानं माणसाला हजारो वर्षांपासून चकवलं आहे.पण ही रचना कळणार कशी? मग माणसांनी मेलेल्या माणसांच्या कवटीला भोक पाडून मेंदूचं निरीक्षण करायला सुरुवात केली.हे सगळं ४००० वर्षांपूर्वीपासून चालू झालं.पण त्या काळी आपला आत्मा हा मेंदूत नसून आपल्या हृदयात वास्तव्य करतो असंच लोकांना वाटायचं.अति प्राचीन काळी इजिप्तमध्ये माणूस मेल्यानंतर त्याचं हृदय बराच काळ जपून ठेवलं जाई.पण मेंदू मात्र नष्ट करण्यात येई! नाकाच्या मागच्या बाजूला कवटीला एक मोठं भोक पाडून त्यातून तो मेंदू खरवडून काढून मग तो फेकून देत. तसं केलं नाही तर मेंदूचा भाग कुजून जाईल म्हणून ते हा उपद्रव्याप करायचे.त्या वेळच्या इजिप्शियन सर्जन्सनी थोडंफार जे लिहून ठेवलंय त्यावरून त्या काळी लोकांच्या मेंदूविषयी काय कल्पना होत्या हे लक्षात येतं.


एडविन स्मिथ (Edwin Smith) नावाच्या माणसाला सापडलेला पपायरस (Papyrus) हा याविषयीचा इतिहासातला सर्वात जुना दस्तऐवज ख्रिस्तपूर्व २५०० मधला आहे. तो बहुधा इम्होटेप (Imhotep) यानं लिहिला असावा असं म्हटलं जातं.

डोक्याला आणि हातापायाला जखमा झाल्या आहेत अशा ४८ रुग्णांची वर्णनं यात आहेत.एडविन स्मिथ या इजिप्तच्या इतिहासकाराच्या हाती जेव्हा ही वर्णनं पडली.तेव्हा त्यानं १८६२ साली ती लक्झर (Luxor) हून परत आणली.पण त्याला त्यांचा अर्थ न लागल्यामुळे त्यांचं महत्त्वही कळलं नव्हतं.पण १९३० साली जेम्स ब्रेस्टेड (James Brested) या शिकागो ओरिएंटल इन्स्टिट्यूटच्या डायरेक्टरनं जेव्हा बारकाईनं बघितलं तेव्हा हा ५००० वर्षांपूर्वीचा दस्तऐवज असल्याचं त्याच्या लक्षात आलं.यात ज्या केसेसचं वर्णन केलं होतं त्यातल्या सहाव्या केसमध्ये मेंदूच्या कार्याबद्दल खूपच महत्त्वाची माहिती होती.त्यात मेंदूवरची आवरणं (मॅब्रेन्स),मेंदूमधला सेरेब्रोस्पायनल द्रवपदार्थ याबद्दल माहिती होती.या पपायरसमध्ये आणखीही खूप माहिती होती.मेंदूच्या एका भागाला दुखापत किंवा जखम झाल्यावर शरीराच्या विरुद्ध बाजूचे अवयव कसे लुळे पडतात याविषयीही लिहिलं होतं.मेंदूला एका विशिष्ट ठिकाणी इजा झाल्यावर त्याचा बोलण्यावर कसा परिणाम होतो याचंही त्यात विवेचन केलं होतं.


 १८६० साली डॉ.पॉल पिअरे ब्रोका यानं आपल्या मेंदूतला कुठला भाग आपल्या बोलण्यावर नियंत्रण ठेवतो हे शोधून काढलं.पण साधारण ५००० वर्षांपूर्वी इजिप्शियनांनी ते ओळखलं होतं !


आपल्या शरीराचा हृदयाइतकाच किंवा त्यापेक्षाही जास्त महत्त्वाचा अवयव म्हणजे मेंदू आहे हे माणसाला कळायला हजारो वर्षं जाणार होती. 


ग्रीक विचारवंतांमध्येही मेंदू,आत्मा आणि मन यांच्याविषयी कुतूहल होतंच.ख्रिस्तपूर्व ५१० मध्ये अल्केमॉन (Alcmaeon) नावाचा एक विचारवंत राहायचा.पायथँगोरसचा हा शिष्य होता.त्यानंच सर्वप्रथम विच्छेदनाची (डिसेक्शन) कल्पना मांडली. त्याला मेंदूचं महत्त्व सगळ्यात पूर्वी कळलं होतं. आपल्याला ज्या जाणिवा (सेन्सेशन्स) होतात त्यांचं केंद्रस्थान मेंदूतच आहे हे त्यानं ओळखलं होतं.त्यानं एका प्राण्याचा डोळा काढला आणि डोळ्यांपासून संदेश कसा आणि कुठे जातो याचा त्यानं मागोवा घेतला तेव्हा तो संदेश मेंदूपर्यंत जातो हे त्याच्या लक्षात आलं. अल्कॅमेऑनची काही मतं मात्र गंमतशीरच होती. 


आपल्या मेंदूतल्या रक्तवाहिन्या पूर्णपणे भरलेल्या असल्या की आपल्याला झोप येते आणि त्या रिकाम्या झाल्या म्हणजे आपल्याला जाग येते असं काहीसं चमत्कारिक मत तो मांडत असे.तसंच आपल्या डोळ्यांत अश्रूप्रमाणेच अग्नीही असतो असंही तो म्हणे! गंमत म्हणजे त्यानं ऑप्टिकल नर्व्ह बघितली असूनही आपल्या सेन्सेसमधून मेंदूपर्यंत संदेश हवेतून प्रवास करतात असं तो म्हणे !


हिप्पोक्रेट्सलाही हृदयापेक्षा मेंदूच महत्त्वाचा वाटे. मेंदूमधूनच सुख,दुःख,वेदना,आनंद,हास्य,द्वेष वगैरेंसारख्या भावना निर्माण होऊन आपल्यासमोर प्रगट होतात असं तो म्हणे.मेंदूमुळेच आपण विचार करू शकतो,बघू आणि ऐकू शकतो,सुंदर आणि कुरूप किंवा सुखकर आणि दुःखदायी किंवा चांगलं आणि वाईट यांच्यात फरक करू शकतो असंही तो म्हणे.आपण वेडे आहोत की शहाणे,आपल्याला कशाची भीती आणि चिंता वाटते,आपल्याला झोप येते का नाही आणि आली तर कशी आणि केव्हा,

आपल्यामध्ये विसरभोळेपणा कसा येतो आणि आपण गोष्टी लक्षात कशा ठेवतो याचं रहस्य मेंदूतच दडलं आहे असं त्यानं म्हणून ठेवलं होतं. इतक्या पूर्वी आधुनिक प्रयोगशाळा आणि उपकरणं नसताना त्यानं हे म्हणून ठेवावं हे एक आश्चर्यच होतं.


आपली कारणमीमांसा आपल्या मेंदूत,आपला आत्मा आपल्या हृदयात तर आपली भूक आपल्या पोटात दडलेली असते आणि या सगळ्या गोष्टी आपल्या पाठीतल्या कण्यातल्या 'मॅरोज'नं एकमेकांशी जोडलेल्या असतात,आपल्या भावना रक्तवाहिन्यांमधून वाहतात असं प्लेटोला वाटायचं.आपल्या स्मृती या मेणाच्या ब्लॉकसारख्या असतात,त्यावर आपण काही कोरलं तर जसं ते टिकून राहतं तशीच आपली स्मृती असते आणि मेण जसं लवकर वितळतं तसंच काहींच्या लक्षात फारसं राहात नाही असं तो म्हणे.पुढे सतराव्या शतकात जॉन लॉक आणि विसाव्या शतकातला बिहेवियरिस्ट (वर्तनवादी) मानसशास्त्रज्ञ जॉन वॉटसन (John Watson) हे दोघंही असंच काहीतरी मांडणार होते.आपला अनुभव आपल्या मनाच्या कोऱ्या पाटीवर जे लिहीत असतो त्यातूनच आपलं ज्ञान वाढतं असं त्याचं म्हणणं होतं.(सजीव-अच्युत गोडबोले,अमृता देशपांडे,मधुश्री पब्लिकेशन)


ख्रिस्तपूर्व ३८४-३२२ च्या दरम्यान ॲरिस्टॉटल हा प्लेटोचाच शिष्य एक मोठा तत्त्वज्ञ म्हणून प्रसिद्ध होता.ॲरिस्टॉटलला मेंदूपेक्षा हृदय जास्त महत्त्वाचं वाटे. किडे,अळ्या,शेलफिश आणि अनेक खालच्या प्राण्यांमध्ये धडधडणारा हृदयासारखा अवयव होता, पण त्यांना मेंदू आहे का हे मात्र स्पष्ट होत नव्हतं. त्यांच्या शरीरातल्या सगळ्या रक्तवाहिन्या हृदयाकडेच धाव घेत होत्या.

स्पर्श केल्यावर हृदय कसं एकदम झटका लागल्यासारखं आखडतं,पण मेंदूला स्पर्श केल्यावर तसं काहीच होत नाही हेही ॲरिस्टॉटलनं न्याहाळलं होतं.कोंबडीचं डोकं कापल्यावरही ती काही काळ का होईना पण पळू शकते हे त्यानं बघितलं तेव्हा तर मेंदूपेक्षा हृदयच जास्त महत्त्वाचं आहे आणि तेच शरीराला नियंत्रित करतं,त्यातच आपल्या आत्म्याचं वास्तव्य असतं याबद्दल त्याची खात्री पटली.मेंदूचं महत्त्व हृदयाएवढं नक्कीच नाही आणि रक्त थंड करणं हेच मेंदूचं काम आहे असंही त्याचं मत बनलं.त्याच्या मते मनासकट इतर अनेक गोष्टींना हृदय हेच जबाबदार होतं.ॲरिस्टॉटलचा प्रभाव हा मानवी संस्कृतीवर एवढा जबरदस्त पडला,की त्यामुळेच माणूस मनाचा संबंध किंवा त्यातल्या भावनांचा संबंध हा अजूनही हृदयाशी जोडतो.

त्यामुळेच प्रेमी माणसं एकमेकांना दिल देऊन बसतात वगैरे.अनेक शतकांनंतर शेक्सपीअरनं 'मर्चेंट ऑफ व्हेनिस' मध्ये याविषयी दोन ओळी लिहिल्या होत्या.आपली कल्पनाशक्ती कशात वास्तव्य करते?हृदयात की मेंदूत? असा त्यात त्यानं सवाल केला होता.


ख्रिस्तपूर्व तिसऱ्या शतकात शरीररचनाशास्त्राचा (ॲनॅटॉमी) पितामह समजला जाणारा हिरोफिलस (Herophilus) ख्रिस्तपूर्व ३३५-२८०) आणि हिरोफिलसचा तरुण वारस इरँसिस्ट्रस(Erasistratus) या शरीररचनाशास्त्रज्ञांनी हजारो मानवी शरीरांचं शिवविच्छेदन केलं आणि मज्जातंतू नर्वस या रक्तवाहिन्यांपेक्षा वेगळा असतात हे दाखवून दिलं.


शिल्लक राहिलेला भाग पुढील लेखांमध्ये…

९/१/२५

एक चमत्कारी पध्दत / A miracle method

लक्षात ठेवा,दुसरे लोक पूर्णपणे चुकीचे ठरू शकतात;  पण त्यांच्या नजरेत ते मुळीच चुकीचे नसतात. त्यांच्यावर टीका करू नका.कोणीही मूर्ख असं करू शकतो.त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करा.केवळ समजदार,सहिष्णू आणि विरळ लोकच असं करायचा प्रयत्न करतात.समोरची व्यक्ती असा व्यवहार का करते आहे किंवा असा का विचार करते आहे याच्या मागे कोणते ना कोणते कारण असते त्या कारणाला समजून घ्या आणि तुम्हाला त्याच्या कार्याची किल्ली मिळून जाईल. स्वतःला इमानदारीने त्याच्या जागी ठेवण्याचा प्रयत्न करा.स्वतःला हे विचारा जर मी त्याच्या जागेवर असतो,तर त्याला कसं वाटलं असतं ? जर तुम्ही असं कराल तर चिडण्यापासून तुमचा बचाव होईल आणि आपला वेळही वाचवाल.


कारण कारणात रस घेऊन तुम्ही परिणामावर टीका करण्यापासून वाचू शकाल.याशिवाय यामुळे मानवीय संबंधाची तुमची कलाही वेगाने विकसित होईल.


केनेथ एम.गुडने हाउ टू टर्न पीपल इन्टु गोल्ड पुस्तकात लिहिलं आहे,एका मिनिटकरता थांबून विचार करा. तुमची तुमच्यामध्ये रुची खूप आहे;पण दुसऱ्यांच्या बाबतीत ती खूपच कमी आहे.

जगामध्ये प्रत्येक व्यक्ती असाच विचार करते.जर तुम्ही हे माहीत करून घेतलं तर लिंकन आणि रुजवेल्टसारखं तुम्हीपण मानवीय संबंधाचा एकुलता एक पाया समजू शकाल.तुम्ही समजू शकाल की लोकांना प्रभावित करण्याकरता तुम्हाला समोरच्याचा दृष्टिकोन सहानुभूतीपूर्वक समजला पाहिजे.


हेम्ससटेड,न्यू यॉर्कचा सॅम डगलस त्याच्या पत्नीला सांगायचा की,तो लॉनच्या स्वच्छतेसाठी मेहनत करून स्वतःचा वेळ वाया घालवतो आहे.त्याची पत्नी आठवड्यातून दोनदा लॉनचे तण साफ करत होती,खत घालत होती,गवत कापत होती.इतक्या मेहनतीनंतर पण लॉनची अवस्था तशीच दिसायची,जशी की ती चार वर्षं आधी होती,जेव्हापासून ते त्या घरात राहायला आले होते.सॅमची ही गोष्ट ऐकल्यावर त्यांच्या पत्नीला खूप राग यायचा आणि त्यांची पूर्ण संध्याकाळ वाया जायची.


आमच्या कोर्समध्ये भाग घेतल्यावर डगलसला जाणवलं की,तो इतक्या वर्षापासून मूर्खासारखा व्यवहार करतो आहे.त्याने हा स्वप्नातही विचार नव्हता केला की पत्नीला हे काम करताना आनंद येत असेल आणि याकरता आपल्या मेहनतीच्याबद्दल तारीफ ऐकायला आवडेल.


डिनरच्या नंतर एका संध्याकाळी त्याच्या पत्नीने सांगितले की,ती त्या लॉनमधून तण स्वच्छ करायचं म्हणतीये आणि तिने आपल्या पतीलाही बरोबर चलण्याविषयी आग्रह केला.आधी तर पतीने नाही म्हटलं पण नंतर विचार केल्यावर तो तिच्या बरोबर लॉनमध्ये गेला आणि तण उपटायला आपल्या पत्नीला मदत करू लागला.

जाहीरच आहे की,पत्नी खूश झाली आणि दोघांनी कठोर परिश्रम करत आणि बरोबर गप्पा मारत एक तासाचा वेळ घालवला.


यानंतर त्याने बगिच्यात काम करून आपल्या पत्नीला नेहमीच मदत केली आणि आपल्या पत्नीची प्रशंसा करत सांगितलं की,सफाईच्या नंतर त्यांचं लॉन पहिल्यापेक्षा चांगलं दिसू लागलंय.त्यांनी सांगितलं, काँक्रीटसारख्या कडक जमिनीतसुद्धा त्याच्या पत्नीच्या मेहनतीमुळे लॉनची हालत खूपच सुधारली आहे. परिणामतःदोघांचे वैवाहिक जीवन सुखी झाले कारण की,डगलस आपल्या पत्नीच्या दृष्टिकोनातून बघायला शिकला होता.


आपलं पुस्तक ग्रेटिंग थ्रू टू पीपलमध्ये डॉ.जेराल्ड एस. निरेनबर्ग लिहितात,चर्चेमध्ये सहयोग तेव्हा मिळतो जेव्हा तुम्ही हे दाखवता की,तुम्ही समोरच्या व्यक्तीच्या भावना आणि विचारांना आपल्या भावना आणि विचारांच्या त-हेने महत्त्वाच्या मानता.जर तुम्हाला असं वाटतं की,समोरचा श्रोता तुमच्या विचारांना पसंत करेल तर तुम्हाला तुमची चर्चा या प्रकारांनी सुरू करावी लागेल की,समोरचा तुमच्या चर्चेची दिशा समजू शकेल. तुम्हाला जे म्हणायचं आहे ते म्हणताना या गोष्टीची कल्पना करा की,जर तुम्ही श्रोत्यांच्या जागी आहात तर तुम्ही काय ऐकणं पसंत कराल.श्रोत्याच्या दृष्टिकोनातून पाहिल्यावर श्रोताही तुमच्या दृष्टिकोनाचा स्वीकार करतो.


मला आपल्या घराजवळच्या पार्कमध्ये फिरायला आणि घोड्यावर रपेट मारायला खूप आवडतं.एक ओकचं झाड असं आहे ज्याचं मला विशेष प्रेम आहे;पण प्रत्येक ऋतूत मी हे पाहून दुःखी होतो की पार्कात नेहमीच आग लागते ज्याच्या कारणामुळे अनेक झाडं आणि झुडपं जळून राख होतात.ही आग सिगारेट पिणाऱ्यांमुळे नाही लागत.जंगलात आग नेहमीच मुलं करत असलेल्या शेकोटीमुळे लागते.जे तिथे पिकनिक मनवायला येतात आणि अंडी किंवा फ्रैंकफर्टर बनवण्याकरता आग पेटवतात.अनेक वेळा तर आग इतकी भीषण लागते की,अग्निशामक दलाला बोलवावं लागतं.पार्कात एका कोपऱ्यात एक बोर्ड लागला आहे ज्यात लिहिलं आहे की,आग लावण्यावर दंड आकारला जाईल आणि त्याला शिक्षा दिली जाईल;पण हा साइनबोर्ड अशा ठिकाणी लावला गेला आहे जिथे कोणाची नजर पडणार नाही आणि जास्त करून लोक याला बघू शकत नाहीत.पार्काच्या सुरक्षेकरता एक पोलीसपण पहाऱ्यावर असतो;पण तो आपल्या कामाकडे गंभीरपणे बघत नाही आणि यामुळेच दर वर्षी आग लागते.एकदा तर मी पोलिसाकडे धावत गेलो व त्याला सांगितलं की, पार्कमध्ये आग लागली आहे.ती जोरात पसरते आहे आणि याकरता फायर ब्रिगेडवाल्यांना लगेच फोन करायला पाहिजे;पण पोलिसाने उदासीनतेने उत्तर दिले की,हे त्याचं काम नाहीये.कारण ती जागा त्याच्या एरियात येत नाही.हे ऐकून मी खूपच उद्विग्न झालो आणि यानंतर त्या पार्कची जबाबदारी स्वतःवर घेतली. सुरुवातीला तर मी दुसऱ्या लोकांचा दृष्टिकोन समजण्याचा प्रयत्नच करत नव्हतो.जेव्हा पण मी आग पेटवताना बघायचो,तेव्हा मी दुःखी होऊन जायचो आणि त्यांना धमकी द्यायचो की पार्कात आग पेटवल्यामुळे त्यांना शिक्षा पण होऊ शकते आणि मी कोण्या अधिकाऱ्यासारखा आवाज काढून त्यांना आग विझवायचा आदेश देत होतो आणि मी त्यांना हे पण सांगायचो की,जर त्यांनी आग नाही विझवली तर मी त्यांना अटक करवीन.मी त्यांचा दृष्टिकोन समजण्याचा प्रयत्न न करताच आपल्या आतला राग काढत राहायचो.परिणाम? ते माझी गोष्ट ऐकायचे मन मारून अन् चिडून माझी गोष्ट मानायचे.होऊ शकतं की,माझ्या निघून जाण्यानंतर ते परत आग पेटवत असतील आणि त्यांना हे वाटत असेल की पूर्ण पार्कला आग लागली पाहिजे.


अनेक वर्षं गेल्यानंतर मला मानवी संबंधांच्या बाबतीत ज्ञान झालं आणि मी समोरच्या दृष्टिकोनातून गोष्टींना बघायच्या प्रवृत्तीला विकसित केलं आणि कूटनीतीचा प्रयोग करायला सुरुवात केली. ऑर्डर द्यायच्याऐवजी मी जवळ जाऊन या प्रकारचं बोलत होतो :


"मजा करताय,मुलांनो? खायला काय बनवता आहात? जेव्हा मी छोटा होतो तेव्हा मलापण आग पेटवायला मजा यायची आणि मला आजपण पसंत आहे;पण तुम्ही लोक बहुतेक हे नाही जाणत की पार्कमध्ये आग लावणं धोकादायकही होऊ शकतं.मला माहिती आहे की,तुम्ही लोक काही नुकसान करू इच्छित नाही;पण दुसरी मुलं इतकी सावधान नाही राहत.ते येतात आणि बघतात की तुम्ही आग लावलीत.मग तेपण शेकोटी पेटवतात आणि घरी जाताना ते या आगीला विझवत नाहीत,ज्यामुळे सुकलेल्या पानांना आग लागते आणि झाडंही जळतात.जर आपण सावधानी बाळगली नाही तर होऊ शकतं की,सगळीच झाडं जळून जातील. जंगलात आग लावण्याच्या गुन्ह्यामुळे तुम्हाला शिक्षाही होऊ शकेल;पण मी ऑर्डर नाही देऊ शकत आणि तुमच्या आनंदात बाधाही आणू इच्छित नाही.मला असं वाटतं की,तुम्ही पिकनिकचा पूर्ण आनंद लुटावा;पण काय हे चांगलं होणार नाही की,तुम्ही तुमच्या आसपासचा सुकलेला पाला पाचोळा दूर कराल आणि जाताना आगीवर धूळ टाकाल ? पुढच्या वेळी तुम्ही जेव्हा शेकोटी पेटवाल तेव्हा त्या पहाडावरच्या बनलेल्या सँडपिट मध्ये आग लावा.यामुळे काही नुकसान होणार नाही.ऐकण्याकरता धन्यवाद,मुलांनो, मजा करा." 


दोन्ही शैलीत कितीतरी फरक होता.या प्रकारच्या शैलीमुळे मुलं सहयोग करायच्या मूडमध्ये यायची.ती उदास होत नव्हती,ती माझ्यावर चिडत नव्हती,त्यांना आदेशाचं पालन करण्याकरता जबरदस्ती केली नव्हती. त्यांना आपली लाज वाचवायचा मोका मिळाला होता. त्यांनाही चांगलं वाटत होतं आणि मलाही चांगलं वाटत होतं,कारण मी त्यांच्या दृष्टिकोनातून विचार केल्यानंतरच परिस्थितीचा सामना केला होता.


जेव्हा आम्ही समोरच्या व्यक्तीच्या दृष्टिकोनातून गोष्टींन बघतो,तेव्हा आमच्या व्यक्तिगत समस्या आणि तणावही कर्मी होतो.न्यू साउथ वेल्स,ऑस्ट्रेलियाच्या एलिझाबेथ नोवाकाला आपल्या कारचे पैसे भरायला सहा आठवडे उशीर झाला.त्यांनी सांगितलं "एका शुक्रवारी माझ्याकडे अकांउंटचा फोन आला की, जर मी सोमवारच्या सकाळपर्यंत १२२ डॉलर जमा नाही केले,तर कंपनी कारवाई करेल.यादरम्यान मी पैशाची व्यवस्था नाही करू शकले.

यामुळे जेव्हा सोमवारच्या सकाळी त्यांचा फोन परत आला तेव्हा मी वाईटातल्या वाईट परिणामांची कल्पना करायला लागले;

पण विचलित होण्याऐवजी मी त्याच्या दृष्टिकोनातून परिस्थितीला बघितलं.मी त्याला झालेल्या त्रासासाठी माफी मागितली.मी सांगितलं की,त्यांच्या ग्राहकांमध्ये मीच सगळ्यात जास्त त्रास देत असेन.कारण मी बहुतेक आपलं पेमेंट उशिरा करते.तत्काळ त्याच्या आवाजात फरक पडला आणि त्याने मला आश्वस्त केलं की अशी काही गोष्ट नाहीये.काही लोक तर खूपच त्रास देतात. त्यांनी मला अनेक उदाहरणं दिली की,अनेक वेळा तर ग्राहक गैरव्यवहारावर उतरतात,खूप खोटं बोलतात आणि जास्त करून तर त्याच्याशी बोलायला टाळतात. मी काहीच बोलले नाही.मी फक्त ऐकत राहिले आणि त्याला त्याच्या समस्या सांगण्याचा पूर्ण मोका दिला.मग माझ्या काहीच न सांगण्यावरून पण त्याने म्हटलं की, जर मी लगेच पूर्ण पैसे नाही दिले तरी चालतील.मी फक्त या महिन्याच्या शेवटापर्यंत फक्त २० डॉलर्स जमा करावेत आणि बाकीचे पैसे आपल्या सोयीने द्यावेत." 


मित्र जोडा आणि प्रभावशाली बना,डेल कार्नेगी,

मंजुल प्रकाशन) 


उद्या कोणाला आग लावायला मना करण्यापूर्वी किंवा सामान विकत घेण्यापूर्वी किंवा आपल्या प्रिय चॅरिटीमध्ये दान देण्याच्या आधी तुम्ही जरा थांबून आपले डोळे बंद करून समोरच्याच्या दृष्टीने गोष्टींना बघण्याचा प्रयत्न कराल का? स्वतःला विचारा की, समोरचा हे का करण्याची इच्छा करेल? याला वेळ लागेल;पण यामध्ये आपले शत्रू नाही निर्माण होणार आणि तुम्हाला चांगले परिणाम मिळतील.

यामुळे तणाव कमी होईल आणि तुमच्या चपलापण झिजणार नाही


हार्वर्ड बिझनेस स्कूलचे डीन डॉनहॅमचं सांगणं होतं


"मी कोणत्याही मीटिंगच्या आधी एखाद्या व्यक्तीच्या ऑफिसच्या समोरच्या फुटपाथवर दोन तासांपर्यंत फिरणं पसंत करेन;पण मी या गोष्टीची कल्पना केल्याशिवाय आत नाही घुसणार की मी काय सांगणार आहे आणि त्याची आवड आणि लक्ष्याच्या बाबतीत माझ्या ज्ञानाच्या आधारावर समोरचा त्याचं काय उत्तर देईल."


तुम्ही या पुस्तकातून फक्त एक गोष्ट शिकाल - नेहमी आपल्या दृष्टिकोनाबरोबर समोरच्याच्या दृष्टिकोनाचा पण विचार करा आणि समोरच्याच्या दृष्टिकोनातून बघा - जर तुम्ही या पुस्तकातून फक्त ही गोष्ट शिकलात तरी यामुळे तुमच्या करियरमध्ये खूप प्रगती होऊ शकते.


एक फॉर्म्युला जो तुमच्याकरिता चमत्कार करेल.


प्रामाणिकपणे समोरच्या व्यक्तीचा दृष्टिकोन समजून घेण्याचा प्रयत्न करा....