* विजय गायकवाड | Vijay Gaikawad

live

नमस्कार आपले स्वागत आहे. 'सगळे जण तुम्हाला शोधत येतील.आनंदाने तुडुंब भरलेली माणसे सर्वांनाच आवडतात! पण ते तुम्हाला दुःखी,उदास अशा अवस्थेत पाहू शकत नाहीत! तेव्हा आनंदी-हसतमुख रहा आणि मित्रांचा सहवास वाढवा! जर तुम्ही दुःखी राहिलात तर मात्र सगळे जण तुम्हाला सोडून जातील. जीवनातील आनंद-प्रसन्नता भरभरून वाटा! पण एकटे दुःखी रहाल, तर त्या दुःखातच बुडून जाल !' सॉलिट्यूड, ईला व्हीलर विलकॉक्स जगण्याच्या तयारीसाठी नव्हे तर,जगण्यासाठी माणूस जन्माला आला आहे,असं 'बोरिक पास्तरनाक' यांनी म्हटलेलं आहे.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! वाचन हे आहाराहून जास्त महत्त्वाचे असते.जिम र्‍होम यांनी अँथोनी रॉबीन्स यांना शिकवले होते की 'एक वेळ रोजचे जेवण चुकव,पण वाचन अजिबात चुकवू नको.' याप्रमाणे मी अखंडपणे वाचत आहे. माणसांपासून माणसांपर्यंत जाण्याचा,प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाण्याचा जीवनाचा राजमार्ग पुस्तकातून जातो. कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात. पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये. म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,कवी सचिन शिंदे,संतोष शेळके,अनिल फारणे,सहित प्रकाशन,डॉ.रवींद्र श्रावस्ती,डॉ.सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,संजय बापट,मनोहर सुर्वे,विनायक पाटील,संतोष पाटील,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, मेनन पिस्टन रिंग मधील सहकारी मित्र शेखर सुर्यवंशी..। पुस्तकातील घटना प्रसंग हे मी लिखित स्वरूपात सध्या व्हाट्सअप वरती टाकत असतो.हे सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी,पुस्तके देणारी लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत. ... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ. मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. विजय कृष्णात गायकवाड

८/४/२५

कॅटो कपटपटूंचा शिरोमणी / Cato's head of impostors

मार्कस पोर्सियस कॅटो हा रोममध्ये सार्वजनिक नीतीचे नियंत्रण करणारा मंत्री होता.कार्थेजचे वैभव त्याच्या हृदयात शल्याप्रमाणे सलत असे.ते त्याला पाहावत नसे. जेव्हाजेव्हा कॅटो सीनेटमध्ये भाषण करी,तेव्हा तेव्हा विषय कोणताही असो,त्याचा समारोप करताना तो पुढील वाक्य उच्चारल्यावाचून राहत नसे - 


" सभ्य गृहस्थ हो,म्हणून माझे निक्षून सांगणे आहे की, कार्थेजचा विध्वंस केलाच पाहिजे."


विनवुड रीड याने कॅटोचे पुढीलप्रमाणे उत्कृष्ट वर्णन केले आहे :कॅटो हा एक अवाढव्य माणूस होता,त्याचे डोळे मांजरासारखे हिरवे-करडे होते,केस कोल्ह्याच्या केसांसारखे होते,दात इतके मोठे होते की,ते जणू हत्तीचे सुळेच वाटत.त्याचा चेहरा अती कुरूप व भीषण होता. त्याचे तोंड पाहावे असे कोणासही वाटत नसे.

त्याच्यावर जनतेने शेकडो काव्यचरण रचले होते.त्यात त्याची भीषण कुरूपता वर्णिलेली असे.एका काव्यचरणात म्हटले होते की,यमाची नरकपुरीही कॅटोला आत घ्यावयाला धजत नसल्यामुळे त्याला तेथील वैतरणेच्या तीरावरच भटकत फिरत राहावे लागेल."


दुसऱ्याच्या सुखात बिब्बा घालण्यात त्याला परमसुख वाटे.काही रोमन लोक कंटाळले होते.जरा विसावा मिळावा; ग्रीक जीवनातील सौंदर्योपासनेचा थोडा आस्वाद घ्यावा,असे त्यांना वाटत होते.पण कॅटो त्याला तयार नव्हता.ग्रीक तत्त्वज्ञान,सौंदर्योपासना व कलापूजा यांचा तो पक्का द्वेष्टा होता.त्याने ग्रीक तत्त्वज्ञान्यांना हद्दपार केले,ग्रीक पुस्तके आक्षिप्त ठरविली व प्रतिष्ठित रोमनांनी पोरकट ग्रीक पद्धतीचा अवलंब करू नये असे जाहीर केले.

करमणुकीची ग्रीक साधने क्षुद्र व अश्लील आहेत,असे त्याने प्रतिपादिले.प्रत्येकाचे प्रत्येक रोमनाचे जीवन म्हणजे जणू मरणयात्रा.त्यात ना आनंद ना करमणूक,ना उत्साह,ना कला; असे त्याने करून टाकले. न्मल्यापासून मरेपर्यंत कंटाळवाणी व दीर्घ अशी स्मशानयात्रा म्हणजे जीवन,असे त्याने केले.


सर्व रोमनांना स्पार्टन शिस्त शिकवावी असे त्याचे मत होते.स्पार्टन क्रूरता व निष्ठुरता रोमनांच्या अंगात शिराव्यात,रोमन राष्ट्र स्पार्टन राष्ट्राप्रमाणे व्हावे;सर्व रोम म्हणजे जणू एक लष्करी छावणी व्हावी,असे त्याला वाटत होते.स्पार्टन लोकांचे गुण-अवगुण दोन्ही त्याच्या स्वतःच्या ठायी पराकाष्ठेने होते.तो पुरा पुरा शिपाईवृत्तीचा होता.त्याच्या नसानसांत शिपाईगिरी भरलेली होती.त्याला युद्धाविषयी मनोरम भ्रम नव्हते.युद्ध म्हणजे गंमत नसून मरण-मारण आहे,हे तो जाणून होता. युद्धात धीरोदात्तत्ता वगैरे गुण प्रकट करावेत,असे काव्य त्याच्याजवळ नव्हते. शत्रूचे लोक व त्यांची बायकामुले यांस जितक्या लवकर व जितक्या अधिक संख्येने मारता येईल तितके चांगले,असे त्याचे मत होते.कार्थेजियनांविरुद्ध स्पेनमध्ये जी रोमन लढाई झाली,तीत आपण रोज एक शहर धुळीस मिळवीत होतो,

अशी फुशारकी तो मारीत असे.


तो इतक्या साधेपणाने वागे की,तो कंजूस आहे असे लोकांस वाटे.आपल्या शेतातील एका लहान झोपडीत तो राही व वकिली करण्यासाठी रोज घोड्यावर बसून तो जवळच्या शहरात जाई व तिसरे प्रहरी घरी परत येई. नंतर तो कमरेपर्यंत उघडा होऊन घामाघूम होईपर्यंत शेतांतील मजुरांबरोबर काम करी व त्यांच्यासारखेच साधे अत्र -कांदाभाकर खाई व त्यांचेच साधे पेय द्राक्षासव,पित असे.रात्री तो आपले अन्न स्वतःच शिजवी.तो ओटच्या पिठाची लापशी करी व त्याची बायको भाकरी भाजून देई.


स्वतः अविश्रांत काम करणारा असल्यामुळे आपल्या गुलामांनीही मरेपर्यंत काम करावे अशी त्याची अपेक्षा असे. 'गुलाम झोपलेला नसेल,तेव्हा काम करीतच असला पाहिजे,'असे त्याचे एक वचन होते.


घरी कधी मेजवानी वगैरे असली व त्या वेळेस त्याच्या गुलामांच्या हातून बारीकशी चूक झाली,तरी तो स्वतः गांठाळ वादीच्या चाबकाने त्यास फटके मारी.आपल्या नोकरांना शिस्त कशी लावावी,हेच जणू तो आलेल्या पाहुण्यास शिकवी.आपल्या म्हाताच्या झालेल्या गुलामांनाही तो शांततेने मरू देत नसे,त्यांना तो कमी किमतीस विकून टाकी,घाण झालेला,वाईट झालेला माल काढून टाकावा,तसा हा सजीव माल तो विक्रीस काढी.कॅटोचे चरित्र लिहिताना प्ल्युटार्क म्हणतो, " माझी सेवाचाकरी करून म्हातारा झालेला बैलही माझ्याने विकवणार नाही,

वृद्धगुलामाची गोष्ट तर दूरच राहो !"


कॅटो उत्कृष्ट वक्ता होता.तो संताप्रमाणे बोले;पण डुकराप्रमाणे कुकर्मे करी.'वाणी संतांची व करणी कसाबाची',असा तो होता.


शेजाऱ्याच्या अनीतीवर तो कोरडे उडवी,तरीपण तो स्वतःच्या काळातला सर्वांत मोठा पापशिरोमणी व शीलभ्रष्ट मनुष्य होता.पिळवणूक करू नये असा उपदेश तो लोकांस करी,पण स्वतः मात्र अत्यंत पिळवणूक करी.आपल्या मुलीदेखत पत्नीचे चुंबन घेतल्याबद्दल त्याने एका सीनेटरवर नीतिउल्लंघनाचा खटला भरला व कठोर भाषण केले.पण दुसऱ्यांच्या बायकांचे पती जवळ नसताना तो त्यांचे मुके खुशाल घेई ! सार्वजनिक भाषणात तो सदैव म्हणे," दुबळ्या म्हातारपणाला सद्‌गुणाच्या काठीचा आधार सदैव हवा." तो एकदा म्हणाला,"वार्धक्य आधीच विकृत व विद्रूप असते.ती कुरूपता व विकृतता आणखी वाढवू नका." पण एकदा आपल्या सुनेला भेटावयास गेल्या वेळी त्याने तिच्या दासीलाच भ्रष्ट केले! आणि त्या वेळी तो ऐंशी वर्षांचा थेरडा होता !


जे दुर्गुण त्याच्या रोमरोमांत भिनलेले होते,ज्या दुर्गुणांचा तो मूर्तिमंत पुतळा होता,त्याच दुर्गुणांसाठी तो दुसऱ्यावर मात्र सारखे कोरडे उडवीत असे.दुसऱ्याचे दोष पाहण्यात तो अग्रेसर होता.

स्वतःच्या वासना तो खुशाल तृप्त करून घेई;परंतु दुसऱ्यांच्या तसल्याच वासना मात्र दाबून ठेवून तो स्वतःच्या पापाचे जणू परिमार्जनच करी,दुसऱ्याच्या वासना दडपून टाकणे हीच जणू त्याला स्वतःला शिक्षा.स्वतःच्या देशावर त्याचे फार प्रेम होते.पण आपले आपल्या देशावर जितके प्रेम आहे त्यापेक्षा अधिक प्रेम आपल्या देशाने आपणावर करावे असे त्याला वाटे.तो देशाला जणू देवच मानी;पण देशबांधवांनीही आपणास देव मानावे असे त्याला वाटत असे.'कॅटो रोमचा जितका ऋणी आहे,त्यापेक्षा रोम कॅटोचे अधिक ऋणी आहे' असे तो म्हणे.आपणास इटालियन राष्ट्राचा भाग्यविधाता बनविण्यात परमेश्वराने फार उत्कृष्ट गोष्ट केली,असे त्याला वाटे." माझ्या हातांत इटलीचे भवितव्य सोपविण्यात परमेश्वराने फार चांगली गोष्ट केली" असे तो म्हणे.आपण म्हणजे परमेश्वराच्या हातची अपूर्व कृती असे त्याला वाटे.


रोमच्या नावाने स्वतःची महत्त्वाकांक्षा पुढे ढकलावी, आपले स्वार्थ साधावेत,अशी त्याची इच्छा होती.नाव रोमचे,स्वार्थ आपला ! रोमचे नुकसान झाले तरी हरकत नाही;पण आपला स्वार्थ साधलाच पाहिजे, असे त्याचे मत होते.पहिल्या प्रथम आपला स्वार्थ,मग रोमचा ! आधी आपली पूजा,नंतर रोमची ! पहिली महत्त्वाकांक्षा स्वतःच्या मोठेपणाची,दुसरी रोमच्या वैभवाची! रोमला बाजूस सारून तो आपला मोठेपणा साधी व जगाची होळी करून रोमला मोठे करू पाही. आपल्याच देशबांधवांना लुटून,

सावकारी करून तो स्वतःसंपन्न झाला व इतरांना लुटून तुम्ही श्रीमंत व्हा,असे त्याचे आपल्या देशबांधवांना सांगणे असे.'कार्थेज लुटा,धुळीस मिळवा व गबर व्हा'असे तो बिनदिक्कत उपदेशी व त्यासाठी वक्तृत्वातील सर्व प्रकार व साऱ्या हिकमती तो योजी.

उपरोध,आरोप,प्रार्थना,अश्रू, गडगडाट सारे प्रकार,साऱ्या भावना,तो उपयोगात आणी.रोमन लोकांच्या स्वार्थी भावना जागृत करण्यासाठी.त्या जागृत होऊन ते पक्के दरोडेखोर बनावेत;व त्याच्या गुन्हेगारी वृत्तीही जागृत व्हाव्यात म्हणून तो अपूर्व भाषणे करी.तो पराकाष्ठेचा नाटकी होता.त्याचे हावभाव,त्याचा आवेश त्याचे सारे काही बेमालूम असे.एकदा आपले सीनेटमधले भाषण त्याने संपविले न संपविले,तोच त्याच्या झग्याच्या टोकाला बांधलेले अंजीर गाठ सुटून एकदम भराभर खाली पडले.काही सिनेटरांनी ते अंजीर उचलले व किती सुंदर केवढाले तरी मोठे हे.अशी त्याची प्रशंसा केली.लगेच कॅटो जणू सहज म्हणाला,असे अंजीर कार्थेजच्या आसपास होतात.गलबतांतून रोमपासून तेथवर जाण्याला फक्त तीन दिवस लागतात.


सिनेटमधील त्याची भाषणे म्हणजे द्वेष-मत्सरांची जणू उपनिषदेच असत.ती धटिंगणांसमोर गायिलेली जणू द्वेषाची गीतेच असत.

त्याचे शब्द ऐकण्यास श्रोते जणू उत्सुक असत.त्याचे रानवट बेत हाणून पाडण्यासाठी मूठभर प्रामाणिक लोक प्रयत्न करीत,

पण अशा मूठभरांच्या विरोधाला कोणी भीक घालीत नसत, तिकडे कोणी लक्षही देत नसत. वृद्ध व पोक्त सिनेटरही युद्धासाठी उत्सुक होते.कारण,लढणारा व मरणारा तरुण;व विजयध्वज मिरवून वैभवाचे वारसदार होणार मात्र वृद्ध सिनेटर,अशी वाटणी निश्चित होती. पैसेवाले,पेढीवाले हेही कॅटोच्याच बाजूचे होते.कारण, त्यांना कार्थेजियनांच्या स्पर्धेची दहशत वाटे.कार्थेजची सत्ता,संपत्ती व वैभव ही वाढली तर रोमचे कसे होणार, आपल्या व्यापाराचे काय होणार,अशी साधार भीती त्यांना सदैव भेडसावीत असे.कॅटोप्रमाणे त्यांनाही वाटे की,रोमची भरभराट व्हावयास पाहिजे असेल तर कार्थेजचा नाश झालाच पाहिजे.कार्थेजच्या स्वारीची सर्व सिद्धता झाली. पण स्वारी करण्याला कारण मिळेना.योग्य सबब सापडेना.पण कॅटोचे बेत अशाने थोडेच अडणार होते?असल्या क्षुद्र गोष्टी त्याच्या मनोरथांच्या आड येणे शक्यच नव्हते. निमित्त सापडत नसेल,तर निर्माण केले पाहिजे,असे तो म्हणे,युद्ध करण्यासाठी एक सबब त्याने तयार केली. ज्याप्रमाणे त्याने रोमन जनतेत युद्धाची इच्छा उत्पन्न केली.त्याप्रमाणे त्याने रोमन जनतेत युद्धाची इच्छा उत्पन्न केली,दुसऱ्या प्यूनिक युद्धाच्या अखेरीस 'रोमशी मित्रभावाने वागणाऱ्या कोणत्याही राष्ट्राशी आम्ही लढाई करणार नाही',असे कार्थेजियनांनी कबूल केले होते. पण त्यांना केलेला करार मोडणेच भाग पडावे अशी परिस्थिती कॅटोने उत्पन्न केली.नुमिडियाचा राजा मॅसिनिस्सा याला त्याने कार्थे जियनांच्या प्रदेशावर स्वारी करण्याचा हुकूम दिला.कार्थेजियनांची शेतेभाते जाळा,गुरेढोरे पळवा,अशी आज्ञा त्याने केली. मॅसिनिस्साने आज्ञेनुसार केले.

शक्य तोवर कार्थेजियनांनी कळ सोसली;पण शेवटी बचावासाठी म्हणून त्यांनी परत प्रहार केला नव्हे,तसे करणे त्यांना भागच पडले.योजिलेले कारस्थान सिद्धीस गेलेले पाहून रोमन लोकांना मनातल्या मनात खूप आंनद झाला.ते म्हणू लागले," कार्थेजने हे काय केले? यांनी असा कसा करारभंग केला? आम्ही तर थक्कच झालो या नीच कृत्यामुळे फसवे व अप्रामाणिक आहेत तर एकूण हे! रिपब्लिकच्या मित्रावर हल्ला करण्याचे पाप यांनी कसे केले?" सिनेटरांनी कार्थेजला तत्काळ कळविले, " तुमची व आमची लढाई सुरू झाली आहे."


कार्थेजियन जाणत होते की,ते युद्ध म्हणजे त्यांना मरणच होते.

त्यांनी तहासाठी रोमला वकील पाठविला व कळविले,

मॅसिनिस्सावर आम्ही चाल केली खरीच.ही जी दुर्दैवी घटना घडून आली,त्याबद्दल कराल ती शिक्षा भोगावयाला आम्ही तयार आहोत.मॅसिनिस्सावर हल्ला करणाऱ्यात जे दोन प्रमुख पुढारी होते,त्यांना त्यांनी रोमच्या समाधानार्थ व ते तशी मागणी करतील हे आधीच ओळखून ठार करून टाकले.रोमन लोकांची मैत्री परत मिळावी म्हणून काहीही करावयास ते तयार होते. 'तुमच्या मैत्रीच्या अटी कृपा करून कळवा' असे त्यांनी रोमला परोपरीने विनविले.


मानवजातीची कथा,हेन्री थॉमस,अनुवाद-सानेगुरुजी, मधुश्री पब्लिकेशन,जगातील कपटपटूंचा शिरोमणी कॅटो


"ठीक आहे," सीनेटरांनी उत्तर कळविले,"ज्याअर्थी तुम्ही नीट वळणावर आला आहात,त्याअर्थी तुमचा देश कायदे,तुमची कबरस्थाने,तुमची मालमत्ता,तुमची स्वतंत्रता,सारे आम्ही तुम्हाला परत देत आहोत.पण तुम्ही आपल्या सिनेटरांचे तीनशे मुलगे आमच्याकडे ओलीस म्हणून पाठवा.तसेच अतःपर आमच्या वकिलांचे सांगणे सदैव ऐकत जा,व ते सांगतील ते ते बिनबोभाट मान्य करीत जा."


ही रानवट व खुनशी मागणीही कार्थेजियनांनी कबूल केली.त्याने रोमन वकिलांच्या ताब्यात तीनशे मुलगे दिले. एका गुलामवाहू जहाजात गुराढोरांप्रमाणे कोंबून हे अभागी जीव रोमला पाठविण्यात आले! ते तीनशे मुलगे मिळताच रोमची आणखी नवी मागणी आली, "कार्थेजने निःशस्त्र झाले पाहिजे,सारी हत्यारे खाली ठेवली पाहिजेत." पुन्हा एकदा खाली मान घालून कार्थेजियनांनी हीही अट कबूल केली.शस्त्रागारे व दारूची कोठारे रिकामी करण्यात आली.खाजगी घरांच्याही झडत्या झाल्या.बचावाचे प्रत्येक साधन हिरावून घेण्यात आले.दगड वगैरे फेकण्याची तीन हजार यंत्रे व दोन लाख चिलखते रोमन लोकांच्या स्वाधीन करण्यात आली. रोमने जी जी मागणी केली ती ती कार्थेजने मान्य केली.कार्थेज अगतिक व दुबळे होऊन पडले होते.पुन्हा एकदा कार्थेजचे वकील रोमन वकिलांकडे जाऊन विचारते झाले. "रोमनांना अजून काही पाहिजे आहे का?"


कॉन्सल्सनी उत्तर दिले, "आता आणखी फक्त एकच गोष्ट पाहिजे;

कार्थेजचा संपूर्ण नाश!" हे शब्द ऐकून कार्थेजच्या वकिलांना अपार दुःख झाले,सहस्र वेदना झाल्या.पण त्यांनी सारे दुःख गिळून शांतपणे सांगितले, "ठीक, आम्हाला शहर सोडून जाण्यास थोडा वेळ द्या. आम्हाला आमच्या घरादारातून हाकलून देण्यापूर्वी सामानसुमान बांधावयाला तरी थोडा अवसर द्या की!" रोमन कॉन्सल्सनी औदार्याचा मोठा आव आणून ही विनंती मान्य केली व त्यांना थोडा अवधी दिला.


काही दिवसांनी कार्थेजच्या दरवाज्यासमोर रोमन फौजा दाखल झाल्या.शहरात शिरून विध्वंसनाचे काम सुरू करावयाला रोमन सैनिक फार अधीर झाले होते.पण त्यांना जेथे जे दिसले त्यामुळे ते द्विडमुख झाले.शहराचे दरवाजे बंद होते व बुरुजाबुरुजाचे ठिकाणी सशस्त्र थवे उभे होते.कार्थेजियनांनी आपल्या सर्व गुलामांना मुक्त केले होते.शहराच्या रक्षणार्थ सारे स्त्री-पुरुष,सारी मुलेबाळे,

लहानथोर हत्यारे घडवीत होते.शस्त्रे बनविण्याचे काम रात्रंदिवस अखंड चालू होते.लोखंड वगैरे धातू मिळावेत म्हणून मोठमोठ्या इमारती पाडून टाकण्यात आल्या.संरक्षक यंत्रे बनविण्यासाठी त्यांचे लाकूड घेण्यात आले.त्या यंत्रांना बांधण्यासाठी दोऱ्या हव्या होत्या;म्हणून स्त्रियांनी आपले लांब केस कापून त्यांच्या दोऱ्या बळून दिल्या ! आपल्या शहराचे प्राण ते विकणार होते;पण शत्रूकडून जास्तीतजास्त किंमत वसूल केल्याशिवाय मात्र शहर ताब्यात द्यावयाचे नाही असा निश्चय त्यांनी केला होता.


शहराचे तट भंगून रोमनांकडे कब्जा जावयास तीन वर्षे लागली.शहर घेतल्यावर त्यांतील सर्व नागरिकांना ठार करण्याला त्यांना सतरा दिवस लागले.कित्येक लाखांची वस्ती ! पण अखेर त्यांतील केवळ मूठभर शिल्लक राहिले! शेवटी त्यांनाही गुलाम करून विकण्यात आले.साऱ्या शहरात एकही उभी भिंत राहिली नव्हती.शिपायांचे हे विध्वंसनाचे काम संपले तेव्हा मारलेल्या पाच लाख कार्थेजियनांच्या शरीरांवर सर्वत्र सहा फूट उंचीचा राखेचा ढीग शहरभर पडला होता! रोमच्या लष्करी भव्यतेचे हे केवढे थोर स्मारक !


मिळालेल्या विजयाचा समारंभ करण्यासाठी रोमन फौजा परत आल्या.पण त्यांचे स्वागत करण्याला समारंभाचा तो स्वामी कॅटो तिथे नव्हता.कार्थेजियनांच संबंध जातच्याजात नष्ट करुन टाकण्यात अत्यंत दुष्ट कुकर्माचा तो मुख्य योजक होता.त्या लाखो अगतिक लोकांच्या करूण किंकाळ्या त्याच्या वृद्धकानांना मधुर संगीताप्रमाणे वाटल्या असत्या.पण त्याच्या अनंत खटपटीने ते फळ देवांनी त्याला पाहू वा चाखू दिले नाही.ख्रि.पू. १४९ साली तो मरण पावला.कार्थेजचा संपूर्ण निःपात होण्यापूर्वीच तीन वर्षे तो मेला.






५/४/२५

असा टाळा त्रास Avoid such trouble

टेक्सास येथील कॉमर्स बँक शेअर्सचे अध्यक्ष बेंटॉन लव्ह यांच्या मते,कंपनी जितकी मोठी तितकी अलिप्तता जास्त.ते सांगतात,

अशा ठिकाणी वातावरण अधिक उबदार ठेवण्याचा एक मार्ग म्हणजे लोकांना त्यांच्या पहिल्या नावाने ओळखणे.जेव्हा एखादा अधिकारी मला म्हणतो की,मला एखाद्या कामगाराचे नाव आठवत नाही तेव्हा तो त्याच्या धंद्यातील महत्त्वाचा भागच विसरलाय असे मी समजतो आणि त्याचे कामही घसरत चालले आहे असे समजण्यास काही हरकत नसते.


कॅलिफोर्निया येथील TWA या एअरवेची फ्लाइट अटेंडंट कारेन क्रिश हिने एक निश्चय केला होता की, ती तिच्या केबीनमधील जास्तीत जास्त प्रवाशांची शक्य तितक्या वेळेस नावे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करेल. त्यांचे चांगले फळ असे मिळाले की,

वैयक्तिकरीत्या तिला व तिच्या कंपनीला अनेकदा शुभेच्छा मिळाल्या, आशीर्वाद मिळाले.एका प्रवाशाच्या मते- मी यापूर्वी TWA मधून प्रवास केला नव्हता,पण आता इथून पुढे मी TWA शिवाय अन्य कशानेच प्रवास करणार नाही. तुम्ही माझ्या वैयक्तिक गरजांकडे लक्ष पुरवले आणि माझ्या दृष्टीने ते सगळ्यात महत्त्वाचे आहे.'


लोकांना त्यांच्या नावाचा इतका अभिमान असतो की,ते चिरकाल,निरंतर टिकावे यासाठी ते कितीही किंमत मोजायला तयार असतात.पी.टी.बारनम हा प्रख्यात कलाकार अत्यंत बढाईखोर व कठोर हृदयाचा म्हणून प्रसिद्ध होता,पण आपले नाव लावणारे मुलगे आपल्याला नाहीत म्हणून तो अतिशय निराश होता.तेव्हा त्याने त्यासाठी त्याचा नातू सी.एच.सीले याला स्वतःबारनम सीले हे नाव लावण्यासाठी पंचवीस हजार डॉलर्स देऊ केले.


गेली अनेक शतके गर्भश्रीमंत मंडळी विद्वान लोकांना, कलाकारांना,लेखकांना,संगीतकारांना आश्रय देत आली आहेत ते अशासाठी की,त्यांची निर्मिती,कलाकृती त्यांनी या लोकांच्या नावे अर्पण करावी.


वाचनालये आणि संग्रहालये या ठिकाणी तर शतकानुशतके अशा महान,विद्वान कलाकारांचा, लेखकांचा आणि त्यांच्या महान कार्याचा कधीही विसर पडू देणार नाही,अशी व्यवस्थाच केलेली असते.


न्यूयॉर्क पब्लिक लायब्ररीमध्ये ॲस्टर आरि लेनॉक्सचा सुंदर संग्रह आहे.मेट्रोपॉलिटिअन म्युझियममध्ये बेंजामिन अल्टमॅन आणि जे.पी.मॉर्गन यांच्या कार्याचा गौरव केला आहे.प्रत्येक चर्चमध्ये खास फलक बनवलेले असतात,ज्यांच्यावर देणगीदारांची नावे लिहिलेली असतात.विद्यापीठाच्या परिसरातील प्रत्येक इमारतीवर त्या इमारतीसाठी ज्या कोणी पैशाची मदत केली असेल,त्याचे नाव दिलेले असते.


अनेक लोकांना नावे आठवत नाहीत.याचे अगदी साधे कारण हे असते की,नावे लक्षात ठेवण्यासाठी लागणारा वेळ व ऊर्जा खर्च करण्याची त्यांची इच्छा नसते.नाव पुन्हा पुन्हा उच्चारण्याचे श्रम ते घेत नाहीत.खरे म्हणजे ते अशी खोटीच कारणे सांगतात की,ते कामात खूप व्यग्र असल्यामुळे नावे त्यांच्या लक्षात राहत नाहीत.


पण तुम्हीच सांगा,ते फ्रँकलिन डी.रूझवेल्टपेक्षा अधिक व्यग्र असू शकतील का? जर रूझवेल्ट वेळ काढून नावे लक्षात ठेवतो,अगदी त्याच्या संबंधात आलेल्या मेकॅनिकचे नावही त्याला आठवते,तर आपल्याला का नाही आठवत ? तुम्हाला हे सप्रमाण सिद्ध करणारी खरी घडलेली घटना सांगतो.मि.रूझवेल्ट यांचे दोन्ही पाय पॅरालाईज्ड झाल्यामुळे सर्वसामान्य गाडी ते चालवू शकत नव्हते.

म्हणून क्रिसलर कंपनीने मि.रूझवेल्ट यांच्यासाठी स्पेशल कार बनवली.मि.चेंबरलेन स्वतः एका मेकॅनिकला घेऊन व्हाईट हाउसमध्ये ती गाडी घेऊन आले.या अनुभवाचे कथन करणारे स्वतः चेंबरलेनने लिहिलेले पत्र माझ्या टेबलावर पडलेले आहे. तो म्हणतो- मी प्रेसिडेंट रूझवेल्ट यांना ती स्पेशल गाडी कशी हाताळायची हे शिकवले,कारण सामान्य गाडीपेक्षा त्यात खूप वेगळ्या गोष्टी होत्या,पण प्रेसिडेंटने मला माणसांना कसे कौशल्यपूर्ण पद्धतीने हाताळायचे ते शिकवले.जेव्हा मला व्हाईट हाउसमध्ये बोलावले गेले, तेव्हा प्रेसिडेंटने अत्यंत आनंदाने व उत्साहाने आमचे स्वागत केले.त्यांनी मला माझ्या नावाने हाक मारली. त्यामुळे मला खूप मोकळे वाटले आणि माझी मुख्यतः खात्रीही पटली की,ज्या गोष्टी मी त्यांना सांगणार आहे किंवा दाखवणार आहे त्यात त्यांना मनापासून रस आहे. ती गाडी अशा पद्धतीने तयार केली गेली होती की,ती वापरायला पायांची गरज नव्हती.ती पूर्णपणे हातांनी चालवता येणार होती.ती गाडी पाहण्यासाठी खूप गर्दी जमली,तेव्हा प्रेसिडेंट रूझवेल्ट म्हणाले-मला असे वाटते की,ही सर्वोत्तम गाडी आहे.तुम्हाला फक्त काय करायचे आहे,तर बटणाला स्पर्श करायचा आहे.बाकी तुम्हाला काहीच कष्ट घ्यावे लागणार नाहीत.मला ही गाडी खूप आवडली आहे.ती कशी बनवली हे मला माहिती नाही, पण त्या गाडीच्या आत नेमके काय आहे ते जाणून घेणे मला आवडेल.जेव्हा रूझवेल्टच्या मित्रांनी आणि साहाय्यकांनी गाडीच्या मशीनचे कौतुक केले तेव्हा त्यांच्यासमोरच प्रेसिडेंट म्हणाले-मि.चेंबरलेन तुम्ही ही गाडी बनवण्यासाठी जे कष्ट घेतले व जो वेळ दिला त्याची मी सदैव आठवण ठेवेन.खरोखरच तुम्ही हे फार उत्तम काम केले आहे ! त्यांनी रेडिएटरचे कौतुक केले.मागचे पाहण्याच्या आरशाचे कौतुक केले.घड्याळाचे,स्पॉट लाइट्सचे,सीट कव्हर्स व कार्पेटचे,

ड्रायव्हर सीटचे आणि खास पद्धतीने बनवलेल्या त्या छोट्या सुटकेसेसचे आणि त्यावरील त्याच्या नावाच्या आद्याक्षरांचे;असे सगळ्यांचे कौतुक केले.वेगळ्या शब्दात सांगायचे,तर मी त्यांच्यासाठी केलेल्या प्रत्येक गोष्टीची त्यांनी दखल घेतली.त्यांनी या सगळ्या बारीकसारीक गोष्टी मिसेस रूझवेल्टला आणि मिस पर्कीन्सला म्हणजे त्यांच्या सेक्रेटरीलासुद्धा समजावून सांगितल्या.

त्यांनी त्यांच्या व्हाईट हाउसमधल्या हमालालासुद्धा या प्रसंगात सामावून घेतले.ते म्हणाले - जॉर्ज,आता गाडीतील या सुटकेसेसची काळजी तुलाच घ्यायची आहे.


जेव्हा प्रेसिडेंटची शिकवणी पूर्ण झाली तेव्हा ते माझ्याकडे वळले व म्हणाले - अच्छा मि.चेंबरलेन,एक बोर्ड मीटिंग अर्ध्या तासापासून थांबवून ठेवली आहे. त्यामुळे मला आता तिकडे गेलेच पाहिजे.


मी माझ्याबरोबर तो मेकॅनिक व्हाईट हाउसमध्ये नेला होता.

त्याचीही मी रूझवेल्ट यांच्याबरोबर ओळख करून दिली होती.तो त्यांच्याशी फारसे बोलला नव्हता आणि रूझवेल्टनीसुद्धा त्याचे नाव एकदाच ऐकले होते.तो मेकॅनिक अत्यंत लाजाळू होता.तो शांतपणे सगळे ऐकत होता,पण निघण्यापूर्वी रूझवेल्टनी या मेकॅनिकचीसुद्धा दखल घेतली होती.त्याच्याबरोबर हस्तांदोलन केले होते. त्याला त्यांनी नावाने हाक मारली होती आणि वॉशिंग्टनला येण्याबद्दल त्याचे आभारही मानले होते. रूझवेल्ट यांनी जे मनात आले ते त्यांनी केले आणि ते मनापासून केले.उगीच घाईघाईने उरकून टाकल्यासारखे त्यांचे वागणे नव्हते,हे मला जाणवले.


न्यूयॉर्कहून परत आल्यानंतर काही दिवसांत मला रूझवेल्ट यांनी सही केलेला एक फोटोग्राफ आणि माझ्या मदतीबद्दलचे आभाराचे चार शब्द असलेले पाकीट मिळाले.रूझवेल्ट यांना एवढे सगळे करायला वेळ कसा मिळतो याचे मला खूप आश्चर्य वाटले.


फ्रैंकलिन डी.रूझवेल्टला हे माहिती होते की, लोकप्रियता मिळवण्याचा सगळ्यात सोपा,खात्रीचा आणि महत्त्वाचा मार्ग म्हणजे लोकांची नावे लक्षात ठेवणे आणि त्यांना महत्त्व देणे,पण आपल्यापैकी किती लोक हे करतात ?कित्येकदा जेव्हा आपली नवीन कोणाशी ओळख होते तेव्हा आपण थोडा वेळ गप्पा मारतो आणि गुडबाय म्हणण्यापूर्वीच त्याचे किंवा तिचे नाव विसरूनसुद्धा जातो.राजकारणी व्यक्तीने हे लक्षात ठेवले पाहिजे की, आपल्या मतदारांची नावे लक्षात ठेवणे हे मुत्सद्दीपणाचे लक्षण आहे आणि त्यांची नावे विसरल्यास तो स्मृतिभ्रंश समजावा.तुमच्या उद्योगधंद्यात आणि सामाजिक जीवनात नावे लक्षात ठेवणे जितके महत्त्वाचे आहे,तितकेच ते राजनीतीमध्येसुद्धा महत्त्वाचे आहे.


तिसरा नेपोलियन हा फ्रान्सचा राजा होता आणि नेपोलियन दि ग्रेटचा पुतण्या होता.तो नेहमी अभिमानाने सांगत असे की,राज्यकारभाराच्या कर्तव्याखेरीज तो त्याला भेटलेल्या सगळ्या लोकांची नावे लक्षात ठेवे.त्याची काय युक्ती होती? एकदम सोप्पी ! त्याला जर ते नाव स्पष्ट ऐकू आले नाही,तर तो म्हणायचा- माफ करा ! मी नीट ऐकले नाही आणि जर ते नाव जरा विचित्र वाटले,तर तो म्हणायचा - तुम्ही त्याचे स्पेलिंग काय लिहिता ?आणि त्याच संभाषणात तो पुन्हा पुन्हा अनेकदा ते नाव उच्चारून मनातल्या मनात त्या माणसाचा आणि नावाचा संदर्भजोडून ठेवत असे.त्याचे हावभाव,त्याचे व्यक्तिमत्त्व याचीही नोंद ठेवत असे.


जर ती व्यक्ती विशेष महत्त्वाची असेल,तर तो आणखी विशेष कष्ट घेत असे.जेव्हा तो एकटा असे तेव्हा तो एखादा कागद घेऊन त्यावर ती नावे लिहीत असे.ती पुन्हा काळजीपूर्वक वाचत असे.त्या अक्षरांवर लक्ष केंद्रित करत असे आणि मनामध्ये त्या नावाची खूणगाठ बांधत असे आणि मग तो कागद तो फेकून देई.अशा प्रकारे तो ती नावे डोळ्यांमध्ये आणि कानांमध्ये साठवून ठेवत असे.


इमर्सन म्हणतो - या सगळ्यामध्ये बराच वेळ जात असे, पण चांगल्या सवयी लावून घेण्यासाठी छोटे-छोटे त्याग करावेच लागतात.


आपल्या संपर्कात येणाऱ्यांची नावे लक्षात ठेवून त्याचा योग्य वेळी वापर करणे हे काही फक्त राजे किंवा उच्च अधिकाऱ्यांसाठी उपयोगी ठरते असे नव्हे,तर सगळयांनाच त्याचा कधी न कधी उपयोग होतो.केन नॉटिंगहॅम हा इंडियाना येथील जनरल मोटर्समध्ये काम करणारा एक कामगार होता.सहसा त्या परिसरातील हॉटेलमध्येच तो दुपारी जेवण घ्यायचा.एका काउंटरमागे जी स्त्री सँडविचेस बनवायची तिचा चेहरा खूप रागीट होता व तिच्या कपाळावर सदोदित आठ्या असायच्या. ती कोणाचीच फारशी दखल घेत नव्हती.तो म्हणाला- मी जेव्हा तिला मला काय पाहिजे ते सांगितले तेव्हा तिने एका छोट्या तराजूवर हॅमचे माप केले आणि एक लेट्यूसचे पान आणि बटाट्याच्या चकत्या घालून मला सँडविच दिले.दुसऱ्या दिवशी तेथेच मी रांगेत उभा होतो. तीच स्त्री ! त्याच आठ्या! फक्त फरक हा होता की, आज तिच्या गळ्यात तिच्या नावाचा टॅग होता.मी ते वाचले व तिला म्हणालो,हॅलो युनिस ! आणि काय पाहिजे ते तिला सांगितले.आज ती तराजू विसरली.तिने हॅमची चळत आणि तीन लेट्यूसची पाने माझ्या सँडविचमध्ये घातली आणि प्लेटमधून उतू जातील एवढे बटाट्याचे चिप्स घातले.


म्हणूनच मी पुन्हा सांगतो,नावात किती जादू आहे ते समजून घ्या आणि ज्या माणसांच्या आपण सहवासात येतो,त्या-त्या प्रत्येक माणसाचे स्वतःचे असे एक खास वेगळेपण असते,

वैशिष्ट्य असते,वेगळे व्यक्तिमत्त्व असते हे लक्षात घ्या.त्याचा स्वीकार करा.नावच त्या वेगळेपणाला लेबल लावते.आपण एखाद्याचे नाव घेऊन जेव्हा एखादी विनंती करतो किंवा त्याच्याबद्दल विशेष माहिती गोळा करतो तेव्हा त्या विशिष्ट परिस्थितीत आपले काम होण्याची शक्यता निर्माण होते,

अन्यथा नाही.अगदी एखाद्या वेट्रेसपासून ते उच्चपदस्थ अधिकाऱ्यापर्यंत नावातच सगळी जादू असते.


लक्षात ठेवा,अगदी कोणत्याही भाषेत प्रत्येक माणसाला त्याचे नाव हेच सगळ्यात जास्त महत्त्वाचे वाटते व ऐकण्यास सर्वांत गोड असा तोच एक शब्द आहे,असे त्याचे मत असते.


०४.०४.२५ या लेखातील दुसरा भाग…

४/४/२५

त्रास असा टाळावा / Avoid trouble

विनाकारण होणारा त्रास टाळा,त्यासाठी हे करा.


इ.स. १८९८ मध्ये न्यू यॉर्कमधील रॉकलँड शहरात एक दुर्घटना घडली.एका लहान मुलाच्या अंत्ययात्रेला जाण्यासाठी त्याचे शेजारी तयारी करत होते.त्याचवेळी जिम फेअरले त्याच्या घोड्यावरून धान्याच्या कोठाराकडे जात होता.हवा प्रचंड थंड आणि जमिनीवर सर्वत्र बर्फ पसरले होते.घोडाही बरेच दिवसांत फिरला नव्हता आणि जेव्हा त्याला पाणी प्यायला नेले तेव्हा अचानक त्याच्या जणू अंगात आले,तो उधळला आणि जिम फेअरले खाली पडून त्याचे प्राण गेले.अशा त-हेने स्टोनी पॉइंट खेड्यात त्या आठवड्यात दोन मृत्यू घडले.जिम फेअरलेच्या मागे त्याची पत्नी,तीन मुले आणि इन्शुरन्सचे काही पैसे उरले.


त्याचा मोठा मुलगा,दहा वर्षांचा जिम वीटभट्टीमध्ये कामाला जात असे.माती मळून ती विटांच्या साच्यात घालायची आणि विटा भाजायच्या अशी कामे तो करीत असे.जिमला लहानपणी शाळेत जास्त शिकता आले नाही,पण त्याच्यात नैसर्गिकरीत्या अगर दैवी देणगीदाखल म्हणा असा एक गुण होता की,


लोक त्याच्यावर प्रेम करायचे.कालांतराने तो राजकारणात शिरला आणि हळूहळू त्याने तिथे आपला जम बसवला. इतरांमध्ये फारशी नसलेली एक विलक्षण क्षमता त्याच्या अंगी होती व ती म्हणजे तो लोकांना नावानिशी लक्षात ठेवायचा.


तो कधीच उच्च माध्यमिक शाळेत जाऊ शकला नव्हता, पण वयाच्या एकोणपन्नासाव्या वर्षापूर्वीच त्याला चार कॉलेजेसनी डिग्री प्रदान केली होती आणि तो डेमोक्रॅटिक नॅशनल कमिटीचा अध्यक्ष आणि युनायटेड स्टेट्सचा पोस्टमास्तर जनरल झाला होता.


एकदा जिम फेअरलेची मुलाखत घेत असताना मी त्याला त्याच्या यशाबद्दल प्रश्न विचारले.तेव्हा तो म्हणाला,काबाडकष्ट! त्यावर मी म्हणालो,माझी चेष्टा करतोस का?त्यावर त्याने मला विचारले की,मग तू सांग,माझ्या यशाच्या मागचं कारण ! मी म्हणालो,

तुम्हाला दहा हजार लोकांची पहिली नावे माहिती आहेत,

म्हणून असेल. नाही! फक्त दहा हजार नाही,मला पन्नास हजार लोकांची पहिली नावे माहिती आहेत.अर्थात अशी चूक मी परत करणार नाही.जेम्सच्या या विलक्षण क्षमतेमुळेच तर फ्रैंकलिन डी रूझवेल्टला त्याने व्हाईट हाउसमध्ये नेऊन बसवले. १९३२ साली फेअरलेने त्याचा प्रचार केला होता.


स्टोनी पॉइंटसारख्या खेड्यातील ऑफिसमध्ये क्लार्क म्हणून काम करत असताना,तसेच जिप्समचा विक्रेता म्हणून फेअरले जेव्हा गावागावांतून फिरत असे तेव्हासुद्धा माणसांना त्यांच्या नावानुसार लक्षात ठेवण्याची त्याची स्वतःची एक यंत्रणा होती.


त्याची पद्धत अत्यंत साधी आणि सरळ होती. कोणत्याही नवीन माणसाशी ओळख झाल्यावर तो त्याच्या किंवा तिच्याबद्दल सगळी माहिती गोळा करत असे.तो त्याचे/तिचे संपूर्ण नाव,पत्ता,त्यांच्या सवयी, त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी,त्यांचे नोकरी,धंदा,व्यवसाय, त्यांची राजकारणाबद्दलची मते हे सगळे माहिती करून घेत असे आणि त्याच्या मनात त्या व्यक्तीच्या चित्रासह ही सगळी माहिती नोंदवून ठेवत असे.नंतर ती व्यक्ती त्याला परत भेटल्यावर,मध्ये एक वर्ष जरी गेलं असलं तरीही तो त्या व्यक्तीची बारकाईने चौकशी करत असे.त्यात तो अगदी तिच्या परसदारातील झाडाचीसुद्धा चौकशी करी.


मित्र जोडा आणि प्रभावशाली बना अनु - कृपा कुलकर्णी मंजुल पब्लिशिंग हाऊस


रूझवेल्टच्या प्रेसिडेंटपदाच्या निवडणुकीपूर्वी साधारण काही महिने प्रचारमोहीम सुरू असताना जेम्स फेअरले याने पश्चिमेकडील आणि उत्तर-पश्चिमेकडील देशांमधील लोकांना रोज शंभर या हिशेबाने पत्रे लिहिली.नंतर ट्रेनमधून,घोडागाडीतून,

गाड्यांमधून आणि बोटींमधून, मिळेल त्या वाहनांमधून नव्वद दिवसांमध्ये जमेल तसा प्रवास करून वीस देश आणि सुमारे बावीस हजार मैलांचा प्रदेश त्याने पालथा घातला.एखाद्या शहरात गेल्यावर तेथील लोकांना चहा,नाष्टा,लंच,डिनर या वेळात भेटून तो त्यांच्याशी जिव्हाळ्याचे संबंध प्रस्थापित करे आणि पुढच्या प्रवासाला निघे.नंतर तो जेव्हा पूर्वेकडे परत येत असे तेव्हा भेटलेल्या गावांतील एका माणसाला तरी पुन्हा पत्र पाठवत असे व तो ज्या ज्या लोकांशी बोलला होता त्यांची यादी घेऊन त्या हजारो लोकांना स्तुतिसुमने उधळणारी पत्रे फेअरलेकडून जात असत.या पत्रांची सुरुवात डिअर बिल किंवा डिअर जेन अशी असे आणि पत्रांखाली तो स्वतःची सही करे.त्याला अगदी लहानपणीच हे वास्तव समजले होते की,


सर्वसामान्यपणे प्रत्येक माणूस इतर कोणाच्याही नावापेक्षा स्वतःच्या नावाबद्दल फार जागरूक असतो.त्याला त्यामध्येच रुची असते.तुम्ही त्याचे नाव लक्षात ठेवले आणि त्याला त्या नावाने अचूकपणे संबोधले,तर तुम्हाला त्याच्याकडून फार हृद्य प्रतिसाद मिळतो,पण तुम्ही जर ते नाव विसरलात किंवा चुकीचे उच्चारलेत,तर लक्षात ठेवा,तुमचं काही खरं नाही! 


तुम्हाला एक उदाहरण सांगतो,पॅरीसमध्ये अमेरिकन रहिवाशांसाठी असणाऱ्या जाहीर भाषणकलेसंबंधीचा कोर्सचे फॉर्म्स एक फ्रेंच टायपिस्ट टाईप करत होते. त्यांना इंग्रजी भाषा विशेष अवगत नव्हती.त्यामुळे त्यांच्याकडून टायपिंग करताना काही नावे चुकली.तेव्हा त्यावेळी पॅरीसमधील एका खूप मोठ्या अमेरिकन बँकेच्या मॅनेजरने मला पत्र लिहून चांगलेच फैलावर घेतले होते.उच्चार कठीण असणारी नावे लक्षात ठेवणे खूप अवघड असते.मग लोक ते नाव उच्चारण्याचे टाळतात किंवा ते लक्षात ठेवण्याचे कष्टही घेण्याऐवजी एखादे टोपणनाव ठेवून मोकळे होतात.सिड लेव्हीच्या निकोडेनस पॅपॅडौलस नावाच्या एका गिऱ्हाईकाला लोक निक म्हणत.लेव्ही मला सांगत होता,ते नाव लक्षात ठेवण्यासाठी मला विशेष मेहनत करावी लागली.त्याला मोठ्याने हाक मारण्यापूर्वी मी अनेकदा मनातल्या मनात रंगीत तालीम करत असे.त्यानंतर मी जेव्हा त्याला अभिवादन करून त्याचे पूर्ण नाव घेतले तेव्हा त्याला खूप आश्चर्य वाटले,कारण काही मिनिटे तरी तो स्तब्धच होता.त्याच्या तोंडून शब्दसुद्धा फुटत नव्हता.नंतर तो बोलला तेव्हा त्याचे डोळे पाणावले होते.मि.लेव्ही, गेल्या पंधरा वर्षांपासून मी काम करत आहे,पण आजपर्यंत कोणीही माझे संपूर्ण नाव योग्य रीतीने उच्चारण्याचा प्रयत्नही केला नाही.


आता कळले ना तुम्हाला ॲण्ड्रयू कार्नेगीच्या यशामागे कोणते सत्य दडले आहे?


स्टीलकिंग म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या ॲण्ड्रयू कार्नेगीला स्टीलच्या उत्पादनाबद्दल खरंतर फारच थोडी माहिती होती.त्याच्याकडे काम करणाऱ्या शेकडो लोकांना या कामाची त्याच्यापेक्षा अधिक माहिती होती.पण ॲण्ड्रयू कार्नेगीला हे माहिती होते की लोकांशी कसे वागावे ? त्यामुळेच तर तो एवढा श्रीमंत झाला होता.

आयुष्यात त्याने फार लहानपणापासूनच संघटनकौशल्य, नेतृत्वगुण दाखवले होते.फक्त दहा वर्षाचा असतानाच स्वतःच्या नावाचे लोकांना किती अप्रूप असते.ते त्याला समजले होते आणि लोकांचे सहकार्य मिळवण्यासाठी त्याने या गोष्टींचा चांगला उपयोग करून घेतला.त्याची एक गंमतशीर आठवण आहे. 


तो जेव्हा स्कॉटलंडमध्ये राहणारा एक लहान मुलगा होता,तेव्हा त्याने एक सशीण आणली ! ती गरोदर होती. थोड्याच दिवसात तिला पिल्ले झाली.इतक्या पिल्लांना खायला घालायला छोट्या ॲण्ड्रयूकडे काहीच नव्हते, पण त्याच्या डोक्यात एक भन्नाट कल्पना आली.त्याने त्याच्या सगळ्या मित्र-मैत्रिणींना सांगितले की, त्यांच्यापैकी जे कोणी या पिल्लांना खायला आणेल त्या प्रत्येकाचे नाव त्यांच्या सन्मानार्थ एकेका सशाला देण्यात येईल.आणि मग जादूच झाली!ॲण्ड्यूची समस्या चुटकीसरशी सुटली! त्याने मोठा झाल्यावरसुद्धा अशाच युक्त्या वापरून आणि याच मानसशास्त्राचा आधार घेऊन लाखो रुपये कमावले.एकदा कार्नेगीला पेनिसिल्व्हानिया रेलरोडला स्टील विकायचे होते. पेनसिल्व्हानिया रेलरोडचा प्रेसिडेंट थॉम्पसन होता.मग कार्नेगीने पिट्सबर्गमध्ये एक स्टील उत्पादनाचा भव्य कारखाना उभारला आणि त्या कारखान्याला,थॉम्पसन स्टील वर्क्स असे नाव दिले.


आता तुम्हाला एका कोड्याचे उत्तर शोधायचे आहे.जेव्हा पेनिसिल्व्हानिया रेलरोडला स्टील हवे होते,तेव्हा थॉम्पसनने ते कुठून विकत घेतले असेल ? सिअसरी बक यांच्याकडून ? छे! छे! तुम्ही चुकलात.


कार्नेगी आणि जॉर्ज पुलमन स्लिपींग कार बनवण्याच्या श्रेष्ठत्वावरून भांडत असताना कार्नेगीला म्हणजे स्टीलकिंगला पुन्हा आपल्या बालपणीच्या सशांची आठवण झाली.ॲण्ड्रयू कार्नेगीच्या ताब्यात असलेल्या दि सेंट्रल ट्रान्सपोर्टेशन कंपनीचे पुलमनच्या मालकीच्या कंपनीशी स्लिपींगकारचा उद्योग मिळवण्यासाठी भांडण चालू होते.हे कॉण्ट्रॅक्ट युनियन पॅसिफिक रेलरोडकडून मिळवायचे होते.कमी किमतीचे टेंडर भरणे,

लांगूलचालन करणे,एकमेकांच्या चहाड्या सांगणे असे सगळे प्रकार केल्यानंतर पूलमन व कार्नेगी दोघेही युनियन पॅसिफिकच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सना भेटण्यासाठी न्यूयॉर्कला गेले.त्यावेळी दोघे एकमेकांसमोर आले तेव्हा कार्नेगी म्हणाला,मि.पुलमन, गुडमॉर्निंग ! तुम्हाला असे वाटत नाही का की,आपण दोघेही स्वतःला मूर्ख सिद्ध करत आहोत?


पुलमन म्हणाला- म्हणजे ? मला समजले नाही !


त्यावर कार्नेगीने त्याच्या मनात काय आहे ते स्पष्टपणे सांगितले.

त्याच्या मते दोन्ही कंपन्यांनी एकत्रितपणे काम करणे इष्ट होते.

एकमेकांच्या विरोधात काम करण्यापेक्षा एकमेकांच्या साथीने काम केल्यास दोन्ही कंपन्यांचा किती जास्त फायदा होईल याचे अत्यंत आकर्षक चित्र त्याने पुलमनसमोर उभे केले.पण अजूनही पुलमनला ते संपूर्णपणे पटले नव्हते.शेवटी त्याने विचारले,आपल्या या नवीन कंपनीचे नाव काय असेल? कार्नेगीने त्यावर तत्काळ उत्तर दिले- त्यात विचार काय करायचा? दि पुलमन पॅलेस कार कंपनी असेच असेल.पुलमनची कळी खुलली.आणि त्यानंतर एक औद्योगिक इतिहास घडला. वैयक्तिक पातळीवर लोकांना जाणून घेणे आणि त्यांच्या सन्मानार्थ काही करणे या कार्नेगीच्या हातोटीमुळेच कार्नेगी इतका यशस्वी झाला आणि म्हणूनच न मागता त्याला लोकांनी पुढारीपण बहाल केले.तो नेहमी अभिमानाने त्याच्या कामगारांना त्यांच्या पहिल्या नावाने हाक मारत असे.तसेच त्याला रास्त अभिमान होता की जोपर्यंत वैयक्तिकरित्या सूत्रधार होता तोपर्यंत त्याच्या कारखान्यात एकदाही संप झाला नव्हता.


शिल्लक भाग पुढील लेखामध्ये…

२/४/२५

ओल्या रानाचा नाद / The sound of wet forest

वाई - महाबळेश्वर या घाटाच्या रस्त्यानं पावसाळ्याच्या सुरुवातीस जाऊ लागलं,की पहिल्यांदा पाचगणीचं दुरून दर्शन होतं.पाचगणी हे गाव सिल्व्हर ओक वृक्षांच्या राईत वसलं आहे.विरळ ढगांच्या पडद्याआड सिल्व्हर ओकची उंचच उंच झाडं दिसू लागतात. काळपट रंगाचे सरळसोट बुंधे,त्यांवर एकही फांदी नाही, आणि शेवटी हिरवं छत. वाऱ्यामुळं हिरव्या पानांच्या पाठी चांदीसारख्या चमकत असतात.


पाचगणीपासून नऊ - दहा किलोमीटर अंतरावर हिरव्यागार जंगलाला सुरुवात होते.ही जंगलं सदापर्णी वृक्षांची आहेत.

पिसा,अंजन,हिरडा व आवळा या झाडांच्या गर्दीत जांभळीची झाडं प्रामुख्यानं दिसतात. या वनक्षेत्रातच गुरेघर वन-संशोधन केंद्र आहे.हे गुरेघर म्हणजे प्राचीन काळातील 'गुरुगृह' ही सिद्धभूमी आहे.इथं मी पावसाळ्याच्या सुरुवातीला जाई.नंतरही पावसाळ्यात आठ-दहा दिवस जावं लागे.तिथं विविध भूखंडांत रोपं लावण्याचं काम चालू असताना त्यांचं निरीक्षण करता येई.रात्री माझा मुक्काम तिथल्या वनकुटीत असे.आजूबाजूला घनदाट जांभळीची झाडी. त्यांच्या सावलीत लाल कौलांची वनकुटी उभी आहे. समोर विटा-सिमेंटनं बांधलेलं एक गोल टेबल आहे.त्या टेबलासमोर वेताच्या खुर्चीवर बसून मी केलेल्या कामाचा आढावा घेई,तर कधी लागवडीविषयी वनकर्मचाऱ्यांना सूचना देई.इथं सकाळी उठून बसलो असता,पहिल्या पावसाचा मृदगंध आसमंतात दरवळलेला असे.वर,समोर झाडांची घनदाट हिरवी छतं दिसत.आभाळाचं दर्शन होत नसे.मध्येच छतावर पडलेल्या सूर्यप्रकाशामुळं हिरव्या पानांच्या कितीतरी छटा दिसत.पानांवरील पाण्याचे थेंब मोत्यासारखे चमकत.छोट्या रंगीत पाखरांची चांदीच्या घंटीच्या आवाजाची किलबिल चाललेली असे.झाडावरचे जांभळांचे घोस पिकून काळेभोर दिसू लागत.पावशा पक्षी एकमेकांना साद घालताना दुरून ऐकू येई.


एकदा इथं बसलो असताना ओढ्याच्या दरडीतून निघालेली घोरपड जंगलाकडं सरसर निघालेली दिसली.मध्येच ती थांबे,मध्येच पुढचे दोन पाय उंच करून उभी राही.इकडंतिकडं पाही,पुन्हा सरसर चालू लागे.ती शांतपणे जमिनीवर पडून होती.काही तरी पाहात होती.काही तरी एकाग्रतेनं ऐकत होती.डोकं एका बाजूकडून दुसऱ्या बाजूला हलवीत होती.

कोणाची तरी साद तिला ऐकू येत होती.कोणाची,हे तिलाच माहीत ! मध्येच ती आपलं डोकं उंच करी.नंतर पुन्हा खाली आणी.जवळच असलेल्या वारुळातील वाळवींना कल्पना नव्हती,की त्यांच्या हालचालींची चाहूल बाहेर कोणाला तरी ऐकू येतेय आणि काहींचा मृत्यू बाहेर वाट पाहतोय. घोरपडीच्या उघड्या कानांना पंख फुटलेल्या लक्षावधी वाळवींच्या पंखांची सळसळ बाहेर ऐकू येत होती. अनुभवानं व अंतर्ज्ञानानं तिला कळलं,की आता आपल्याला मेजवानी मिळणार !


आकाश एकाएकी ढगांनी काळवंडलं.पावसाचे काही थेंब झाडांच्या छतावर पडून त्याची साद जंगलभर पसरली.या आवाजाबरोबर पंख फुटलेली वाळवी वारुळातून एखाद्या फवाऱ्याप्रमाणं बाहेर पडू लागली. तशी घोरपड त्यांच्यावर तुटून पडली.परंतु त्यांतील कित्येक कीटक तिच्या तडाख्यातून सुटून,हवेत आपल्या नाजूक,नवीन फुटलेल्या पंखांनी आसमंतात उडू लागले. त्यांचं हे पहिलं आणि शेवटचं उड्डाण होतं.


झाडांच्या छतावरून त्यांना आकाशाचं दर्शन झालं,तसं त्या गिरक्या घेत धरतीकडं पुन्हा झेपावल्या.काहींचे पंख गळून गेले.त्या जमिनीवर काहीही इजा न होता आदळल्या.बाकीच्या सहज उडत खाली आल्या.चपळ हालचालीनं त्यांचेही पंख झडून गेले.जिकडं तिकडं त्यांच्या पंखांचा खच पसरला.त्या पंखांच्या ढिगाऱ्यात त्यांनी जुगण्यासाठी आसरा घेतला.एकटी घोरपडच तिथं मेजवानी करीत नव्हती.थोड्याच वेळात तिथं कोतवाल आले.सात बहिणींचे थवे किलकिलू लागले.आकाशातून आभोळ्या झाडांच्या छता-छतांतून सहज उतरल्या.पावशा व कोकीळ हजर झाले.हा सारा पक्षिगण त्या वाळवीवर तुटून पडला.निसर्गानं या असहाय वाळवींना कसलंही संरक्षणाचं कवच दिलं नाही.माद्या धडपडत मातीच्या आश्रयाला गेल्या.त्यांच्या मागोमाग नर गेले.जंगलातल्या वाटेनं मी हिंडू लागलो, की नेच्यांचे कोंब जमिनीतून बाहेर येताना दिसत. 


आरारुटाची हिरवी पानं फुटू लागत.अशा पाउलवाटांवर रानकोंबड्या,चकोत्री,तित्तिर आणि लावे यांचे कळप चरताना दिसत.माझी चाहूल लागताच कारवीच्या झुडपांत दिसेनासे होत.एखाद्या झाडाच्या फांदीवर बसून तित्तिर उच्च स्वरात ओरडून पावसाचं आगमन सुचवी.


महिनाभरानं मृद् गंधआणि पाखरांच्या गोड गाण्याच्या आठवणी घेऊन मी पुण्यात परत येई.


जुलै महिन्यात तिथं पुन्हा गेलो,की तिथं चांगलाच पाऊस झालेला असे.असा पाऊस पडू लागला,की मला वनकुटीत बसून राहणं शक्य होत नसे.अंगात रेनकोट व पायांत गमबूट चढवून मी जंगलाची वाट धरी.अशाच मुसळधार पावसात उंच डोंगरावर चालत जाई. पावसाच्या धारा पहिल्यांदा झाडांच्या छतावर पडत असतात.नंतर छतावरचं पाणी हळूहळू जमिनीवर पडत राहातं.

उघड्यावरचा मुसळधार पावसाचा मारा आपण सहन करू शकत नाही;परंतु या झोडपण्याचा वेग जंगलात कमी होतो.


उंचावर आल्यावर मी आजूबाजूचा निसर्ग पाहात राहायचो.

पावसानं सारी वनश्री सुस्नात झालेली असे. समोरचं सृष्टिसौंदर्य क्षणोक्षणी बदलायचं.या क्षणी दिसलेलं दृश्य पुढच्या क्षणी बदलायचं.कधी ढगाळ वातावरणानं तिथल्या हिरव्यागार जंगलावर झाकोळ पसरे.वाटे,प्रचंड शिळांचा एखादा समूह हलतोय.परंतु तो आभाळी वातावरणाचा दृश्य परिणाम असे.मध्येच वाऱ्या वादळाचा प्रचंड झोत येई.झाडांची छतं त्या वाऱ्यावर वेडीवाकडी डुलायची.स्फटिकाप्रमाणं दिसणाऱ्या,

वाहणाऱ्या निर्झर व जलप्रपात यांचा निनाद ऐकू यायचा.असं दिवसभर पावसात न्हाऊन निघाल्यावर सायंकाळी मी वनकुटीत परत येई आणि पेटलेल्या आगोटीच्या नारंगी प्रकाशात उबेला बसून राही.ओले कपडे बदलून अंगात पायजमा व अंगरखा घातल्यावर पावसाचं ओझं काढून टाकल्यासारखं वाटे.नंतर मग मधून एक-एक घोट चहाचा आस्वाद घेण्यात मोठा आनंद असे.


वनकुटीच्या खिडक्या-दरवाज्यांना बारीक छिद्रांची जाळी लावल्यामुळं मच्छर,कृमिकीटक अथवा साप-किरडूंना प्रवेश नसे.परंतु त्याच वेळी बाहेरचा काळाकुट्ट अंधार पाहता येई.त्या अंधारात पडत असलेल्या पावसाच्या सरींचा प्रकाश दिसे.

जवळच असलेल्या देवदार वृक्षांच्या राईतून वाऱ्याचा सूऽसूऽऽ आवाज येई.वाटे,मी समुद्रकिनाऱ्यावरील एखाद्या निवासस्थानात राहतोय.झाडाझाडांवर बसलेल्या असंख्य काजव्यांच्या प्रकाशामुळं त्या झाडांना अंधारातदेखील आकार येई.

बेडकांचा डराँव डराँव आवाज ऐकू येई.रात्रभर कौलांवर पाऊस वाजत असे.अहोरात्र अशा त-हेनं संततधार पडणाऱ्या पावसाला एक प्रकारचा नाद असतो. 


जेवणानंतर अंगाभोवती ब्लॅकेट लपेटून मी पलंगावर टेकून पावसाचा तो नाद ऐकत खिडकीबाहेर पाहात असे.

शमादानीवरच्या दिव्याची वात कमी करी.यामुळं खोलीत उजळ अंधार,तर बाहेर दाट काळोख ! मधूनच ढगांचा गडगडाट आणि विजेचा कानठळ्या बसवणारा आवाज येई.त्या क्षणिक प्रकाशात सारं जंगल उजळून निघे.अशा आनंदघन समयाला दुःखाची किनार का असावी? मी ग्रेसची कविता मनातल्या मनात गुणगुणत झोपी जाण्याचा प्रयत्न करीत असे :


पाऊस कधींचा पडतो


झाडांची हलतीं पानें


हलकेंच जाग मज आली


दुःखाची मंद सुरानें


मध्यरात्रीनंतर शुक्ल पक्षातील चंद्राचा प्रकाश ढगांआडून पाझरत साऱ्या जंगलभर पसरे,तेव्हा ही वनसृष्टी मोठी गूढरम्य दिसे.अशा वेळी पावशे पक्षी एकमेकांना साद घालीत गात असत.मधूनच रातवा पक्ष्याचा आवाज येई. मध्येच वाद्याची तार छेडावी,तसा घुबडाचा घुत्कार ऐकू येई.पुन्हा विलक्षण शांतता !


अशाच एका रात्रीनंतर पाखरांच्या गोड किलबिलाटानं जाग आली.बाहेर उजाडलं होतं.आदल्या दिवशी खूप पाऊस पडला होता.वादळानं उन्मळून पडलेलं एक झाड ओढ्याच्या प्रवाहाबरोबर वाहात जाऊन अरुंद पात्रात आडवं अडकून बसलं होतं.पाऊस थांबल्यावर ओढ्याकाठानं भटकताना मोठा आनंद होतो.मी त्या झाडाच्या मध्यभागी खोडावर बसून आजूबाजूला,वर खाली पाहू लागलो.काठावर वाढलेले पाचू रंगाचे नेचे हवेत डुलत होते.पाण्याचे तुषार त्यांवर पडले,की ते हिरकणीसारखे चमकत.दगडा शिळांवर हिरवंगार शेवाळ धरलं होतं.दाढी वाढावी तसं वृक्षावृक्षांतून शेवाळ लोंबत होतं.विणीच्या ओढीनं मासे पाण्याच्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेनं उड्या घेत जाताना त्यांच्या चांदीसारख्या पाठी चमकत होत्या.दगडाच्या आडोशानं बीळ करून राहात असलेले खेकडे तिरप्या चालीनं पाण्यातून इकडून तिकडं जाताना दिसत होते.या जंगलात आढळून येणारे खेकडे फार मोठ्या आकाराचे होते.एक खेकडी प्रवाहात आपली पिलं सोडताना दिसली.तिच्या पोटाखाली हजारावर ढेकणांच्या आकाराची छोटी छोटी पिलं असावीत.प्रवाहाच्या मध्यभागी येऊन ती हळूहळू त्यांना नितळ पाण्यात सोडीत होती.पिलं प्रवाहाबरोबर वाहत जाताना स्वच्छ व निर्मळ दिसत होती.त्यांना असं निराधार करून पाण्यात सोडून दिल्यावर ती कशी जगत असतील,काय खात असतील,कशी वाढत असतील, शत्रूपासून आपला बचाव कसा करून घेत असतील, याविषयी फारशी माहिती उपलब्ध असलेली माझ्या पाहण्यात नाही. यानंतर केवळ तीन महिन्यांत त्यांची वाढ पूर्ण झालेली मी पाहिलेली आहे.


जंगलातील बेडकांच्या विणीची तऱ्हा वेगळीच असते. अंडी घालण्याची वेळ जवळ येताच बेडकी नराला आपल्या पाठीवर घेते.दोघे मिळून ओढ्यावर ओणवलेल्या झाडाच्या फांदीवर जातात.उभयता आपल्या पायांनी पानं धरून गुंडाळतात.मादी त्यात अंडी घालते.त्यात नर बीज सोडतो.परिणामी,सुमारे शंभर एक अंड्यांतून अर्भकं निर्माण होतात. 


प्रथमावस्थेत त्या पानांभोवती साबणाच्या फेसासारखं आवरण असतं.या फेसामुळंच पानांची टोकं एकत्र चिकटली जातात.मग ही बेडूक नर-मादी घरटं सोडून निघून जातात.अंडी विकसित झाल्यावर अर्भकं पानं फाडून खालच्या वाहत्या पाण्यात पडतात आणि प्रवाहाबरोबर वाहात जातात.


पाखरमाया,मारुती चितमपल्ली,साहित्य प्रसार केंद्र सिताबर्डी,नागपूर


वन्य जीव जन्माला येताना क्वचितच दिसतात.कधी कधी ओढ्याकाठानं भटकत असताना त्यांच्या जन्माची रहस्यं अशी सहज दृष्टीला पडतात.इथं आभाळातून पडलेला एखाद-दुसरा थेंब विलीन होताना दिसे.वेली सर्पासारखे वेढे घेत वृक्षावर चढलेल्या होत्या.नुकत्याच दिसू लागलेल्या सूर्यप्रकाशात कोळ्याची जाळी चांदीच्या तारांसारखी चमकत होती ते विलक्षण दृश्य होतं !


श्रावण महिन्यात जिकडं-तिकडं हिरवंगार दिसे.पाऊस कमी झालेला.मधूनच पावसाच्या सरी येत.या दिवसांत अवर्णनीय सृष्टिसौंदर्याचं दर्शन होतं.जंगलातील झाडं वाढताना दिसतात.कधी तरी अनेक वर्षांपूर्वी बालकवी ठोमरे या जंगलात भटकताना त्यांना मराठी साहित्यात अजरामर झालेली 'फुलराणी' ही कविता स्फुरली :


हिरवे हिरवे गार गालिचे - हरित तृणाच्या मखमालीचे; त्या सुंदर मखमालीवरती - फुलराणी ही खेळत होती...


या दिवसांत जंगलातील खडकाळ वाटांनी फिरण्यात मोठी मजा असते.जंगलं नेहमीच सुरक्षित नसतात. पावसाळ्यात जंगलातील भटकंती कधी कधी जीवघेणी असते.इतर क्षेत्रांपेक्षा जंगलं विजेला अधिक आकर्षित करतात.प्रचंड वेगानं वाहात असलेल्या प्रवाहात तुमचे पाय क्षणभरही तळाला लागत नाहीत.निसरड्या पात्रातून घसरलात,तर तुम्ही सरळ वाहात जाल ! विषारी फुरशी झाडांच्या छतावरून उड्या घेत असतात. आताही वाटेनं जाताना रस्त्यावरच पट्टेरी मण्यार वेटोळं घालून बसली होती.एखाद्या बचनागाच्या फुलासारखी सुंदर दिसत होती.अंदाजे तीन फुट लांबीची.

तिच्या अंगाभोवती गोलाकार काळे आणि पिवळे जर्द पट्टे होते. मण्यार सहसा दंश करीत नाही;परंतु चावली,तर या 'महासर्पा'च्या विषावर इलाज नाही.माझी चाहूल लागताच ती फुलवातीसारखं डोकं वर काढून झुडपाकडं सरपटत निघून गेली. पण म्हणून पावसाळ्यात जंगलात जाऊ नये,असं नव्हे. वर्षा ऋतूत जंगलाचं एक आगळंवेगळं सौंदर्य दिसतं जे एरवी कधी अनुभवता येत नाही.पायांची चेहऱ्याइतकीच काळची घेऊन जागृतपणे वनभ्रमण केलं,तर ते अत्यंत फलदायी ठरतं.संत कबीर यांनी एका ठिकाणी म्हटलं आहे :


जिन जागा तिन मानिक पाया।


अशा वेळी त्याची आठवण होते आणि मन सुखावतं.