* विजय गायकवाड | Vijay Gaikawad

live

नमस्कार आपले स्वागत आहे. 'सगळे जण तुम्हाला शोधत येतील.आनंदाने तुडुंब भरलेली माणसे सर्वांनाच आवडतात! पण ते तुम्हाला दुःखी,उदास अशा अवस्थेत पाहू शकत नाहीत! तेव्हा आनंदी-हसतमुख रहा आणि मित्रांचा सहवास वाढवा! जर तुम्ही दुःखी राहिलात तर मात्र सगळे जण तुम्हाला सोडून जातील. जीवनातील आनंद-प्रसन्नता भरभरून वाटा! पण एकटे दुःखी रहाल, तर त्या दुःखातच बुडून जाल !' सॉलिट्यूड, ईला व्हीलर विलकॉक्स जगण्याच्या तयारीसाठी नव्हे तर,जगण्यासाठी माणूस जन्माला आला आहे,असं 'बोरिक पास्तरनाक' यांनी म्हटलेलं आहे.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! वाचन हे आहाराहून जास्त महत्त्वाचे असते.जिम र्‍होम यांनी अँथोनी रॉबीन्स यांना शिकवले होते की 'एक वेळ रोजचे जेवण चुकव,पण वाचन अजिबात चुकवू नको.' याप्रमाणे मी अखंडपणे वाचत आहे. माणसांपासून माणसांपर्यंत जाण्याचा,प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाण्याचा जीवनाचा राजमार्ग पुस्तकातून जातो. कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात. पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये. म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,कवी सचिन शिंदे,संतोष शेळके,अनिल फारणे,सहित प्रकाशन,डॉ.रवींद्र श्रावस्ती,डॉ.सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,संजय बापट,मनोहर सुर्वे,विनायक पाटील,संतोष पाटील,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, मेनन पिस्टन रिंग मधील सहकारी मित्र शेखर सुर्यवंशी..। पुस्तकातील घटना प्रसंग हे मी लिखित स्वरूपात सध्या व्हाट्सअप वरती टाकत असतो.हे सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी,पुस्तके देणारी लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत. ... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ. मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. विजय कृष्णात गायकवाड

१९/९/२३

टायटॅनचा अंत:स्फोट Titan's heart explodes

सन १९१२ मध्ये 'टायटॅनिक' अटलांटिक महासागराच्या तळाशी गेली.तिचे अवशेष पाहण्यासाठी पर्यटकांना घेऊन जाणारी 'टायटॅन' ही सबमर्सिबलही अंत:स्फोट होऊन या वर्षी टायटॅनिकच्या जवळच बुडाली.या दुर्घटनेची माहिती आणि कारणमीमांसा देणारा हा लेख..


टायटॅनिक :  मित्रहो,आपल्या सगळ्यांना टायटॅनिक सिनेमा अगदी सुपरिचित आहे.जेम्स कॅमेरुन या सुप्रसिद्ध दिग्दर्शकाने दिग्दर्शित केलेला आणि लिओनाडों डी काप्रियो आणि केट विन्स्लेट या जोडीचा अभिनय असलेल्या या १९९० सालातील चित्रपटाने अख्ख्या जगातल्या तरुणाईला वेड लावले होते.यात कहाणी होती ती टायटॅनिक या,त्या काळातल्या सर्वांत मोठ्या आणि जी कधीही बुडू शकणार नाही असा दावा केला जाणाऱ्या प्रवासी आगबोटीची..


टायटॅनिकचे जलावतरण उत्तर आयर्लंडमधील साउथहँप्टन इथे दि.३१ मे,१९१९ रोजी झाले. दि.१० एप्रिल,१९१२ रोजी तिने अमेरिकेतील न्यूयॉर्कला जाण्यासाठी तिच्या पहिल्या प्रवासाला सुरुवात केली.या राजेशाही बोटीवर २,२४० प्रवासी आणि कर्मचारी होते.

दुर्दैवाने एका हिमनगावर आपटून ही "कधीही न बुडू शकणारी बोट तिच्या पहिल्याच प्रवासात दि.१५ एप्रिल,

१९१२ रोजी अटलांटिक महासागराच्या तळाशी गेली.या दुर्घटनेत १५०० व्यक्तींना जलसमाधी मिळाली.


बुडाल्यानंतर टायटॅनिक कॅनडाच्या न्यूफाउंडलँडच्या किनाऱ्यापासून सुमारे साडेतीनशे किलोमीटर दूर आणि समुद्रजलपातळीच्या खाली सुमारे सुमारे ३,८०० मीटर (१२,५०० फुटांवर) अटलांटिक महासागरात विसावली आहे.हिच्या या स्थानाचा शोध एका फ्रेंच-अमेरिकन मोहिमेने दि.१ सप्टेंबर,१९८५ रोजी लावला.


ओशनगेट : ओशनगेट एक्स्पीडीशन्स ही अमेरिकन व्यापारी कंपनी २००९मध्ये स्थापन झाली.या कंपनीचा धंदा होता विविध संस्था आणि कंपन्या यांना खोल पाण्यात किंवा समुद्रतळाशी संशोधन करण्यास आवश्यक असलेल्या 'सबमर्सिबल' पुरवण्याचा.सबमर्सिबलला मराठीत 'निमज्जनीय' असा शब्द आहे;पण तो अवघड वाटत असल्यास आपण सबमर्सिबल हाच शब्द वापरू

या.

सबमर्सिबल : सबमर्सिबल म्हणजे एक प्रकारची पाणबुडी.पाणबुडी आणि सबमर्सिबल यांच्यात थोडा फरक आहे.पाणबुडी ही शक्ती, पल्ला आणि तिची कामे या बाबतीत स्वयंपूर्ण असते.स्वतःच्या शक्तीच्या बळावर बंदरातून निघणे,हवे ते अंतर कापून पाण्याच्या खाली ठरावीक खोलीवर जाणे,पाण्याखाली किंवा वर हवी ती कार्य करणे आणि परत पाण्यावर येऊन बंदरात दाखल होणे या सर्व क्रिया ती करू शकते.पण सबमर्सिबल हे एव्हढे सगळे करू शकत नाही.तिची शक्ती आणि पल्ला मर्यादित असतो.जिथे पाण्याच्या खाली जाऊन शोध घ्यायचा, तेथपर्यंत सबमर्सिकलला एक जहाज घेऊन जाते.या जहाजाला 'मातृनौका' (मदरशिप) म्हटले जाते.

त्यानंतर सबमर्सिबल पाण्याखाली सोडली जाते.

पाण्याच्या खाली असलेल्या सबमर्सिबलचा तिच्या भातृनीकेशी संपर्क असतो आणि काही मदत लागल्यास ती तसे मातृनौकेला कळवते.काम झाल्यानंतर ही मातृनौका सबमर्सिबला घेऊन परत बंदरात येते. सबमर्सिबल मनुष्याद्वारे संचालित असू शकते किंवा स्वयंसंचालित असू शकते.


 टायटॅनिक पर्यटन : ओशनगेटकडे अशा तीन सबमर्सिबल होत्या.अँटिपोडस,सायक्लॉप्स - १ आणि सायक्लॉप्स- २.सायक्लॉप्स-२ चे नंतर नामकरण करून 'टायटॅन' ठेवण्यात आले. संशोधकांना घेऊन या सबमर्सिबल समुद्रतळाशी संशोधनासाठी जायच्या.

अर्थात,त्यासाठी पैसे मोजायला लागायचे.सन २०१० पासून ओशनगेटने या सबमर्सिबल पर्यटनासाठी वापरायला सुरुवात केली.सबमर्सिबलमधून प्रवाशांना समुद्राच्या पाण्याखालून विविध बेटांची आणि किनाऱ्यांची सफर घडवून आणली जात असे.असेच एक पर्यटनस्थळ म्हणून ओशनगेटने पाण्यात बुडालेल्या टायटॅनिकची निवड केली. या सफरीसाठी २०१८ मध्ये बांधल्या गेलेल्या टायटॅन सबमर्सिबलची निवड करण्यात आली. सन २०२१ आणि २०२२मध्ये या सहली पैसे देऊन येणाऱ्या 'संशोधकासाठी आयोजित करण्यात आल्या.ही सहल खूप महाग आणि फक्त अब्जाधीशांनाच परवडेल अशी होती.असे म्हटले जाते,की या सहलीमध्ये संशोधक म्हणून जाण्यासाठी माणशी अडीच लाख डॉलर म्हणजे माणशी सुमारे एक कोटी पंचाहत्तर लाख रुपये भरावे लागत होते.


टायटॅनची शेवटची सहल : शुक्रवार,दि.१६ जून २०२३ रोजी कॅनडामधील न्यूफाउंडलँडच्या सेंट जॉन्स बंदरातून पोलर प्रिन्स ही मातृनौका टायटॅन सबमर्सिबल आणि पाच प्रवासी बरोबर घेऊन टायटॅनिक सहलीसाठी बाहेर पडते. रविवार, दि. १८ जून रोजी पोटात पाच प्रवासी

घेऊन टायटॅन सबमर्सिबल पाण्यात बुडी मारते आणि तिचा टायटॅनिकच्या अवशेषांच्या दिशेने प्रवास सुरू होतो.प्रवास सुरू झाल्यानंतर सुमारे एक तास पंचेचाळीस मिनिटांनी टायटॅनचा मातृनौकेशी संपर्क खंडित होतो.

सुमारे सहा तासांच्या अवधीनंतर टायटॅन पुन्हा पाण्यावर येणे अपेक्षित होते;पण तसे काही होत नाही. त्यानंतर सुमारे दोन तासांनी कॅनडाच्या तटरक्षक दलाकडे टायटॅन सबमर्सिबल अजून न आल्याचा संदेश येतो आणि तिच्यात फक्त ९६ तास पुरेल एव्हढाच ऑक्सिजनचा साठा असल्याचे सांगण्यात येते.त्यानंतर सुरू होते ती एक आपातकालीन शोधमोहीम.कॅनडाच्या तटरक्षक

दलाबरोबरच अमेरिकेचे नौदल आणि हवाईदल, कॅनडाचे नौदल आणि हवाईदल,अमेरिकेचे तटरक्षकदल आणि फ्रान्स हे सर्व या आंतरराष्ट्रीय शोधमोहिमेत सहभागी होतात.या शोधात दूर संचालित सबमर्सिबल,पाणबुड्या शोधून काढणारी विमाने,अशी अनेक अत्याधुनिक साधने वापरात येतात.सुमारे चार दिवसांच्या शोधानंतर अमेरिकेचे तटरक्षकदल जाहीर करते, की टायटॅन सबमर्सिबल अंतःस्फोटामुळे नाश पावली आहे आणि त्यांच्या दूरसंचालित सबमर्सिबलला टायटॅनच्या शेपटाचा भाग आणि इतर काही अवशेष सापडले आहेत.

आजच्या घडीला एकशे अकरा वर्षापूर्वीची टायटॅनिक आणि आजची टायटॅन यांचे अवशेष एकमेकांपासून सुमारे ४९० मीटर (सुमारे १,६०० फूट अंतरावर समुद्रतळाशी विसावलेले आहेत आणि टायटॅनमधील पाचही जण,म्हणजे संशोधक प्रवासी,त्यांचा मार्गदर्शक आणि चालक हे मृत्युमुखी पडले आहेत.


अंत:स्फोटाची मीमांसा : टायटॅनचा अंत:स्फोट झाला असे म्हटले जाते.स्फोट आणि अंतःस्फोट या दोन्ही क्रिया क्षणार्धात घडतात.यातील फरक दाखवणारे एक सुलभ चित्र सोबत दिलेले आहे.( हे मुळ चित्र व इतर या विषयाची चित्रे आपणास प्रत्यक्ष शशिकांत धारणे,विज्ञान प्रसारक,यांनी लिहिलेल्या मराठी विज्ञान परिषद पत्रिका - सप्टेंबर २०२३ या मासिकामध्ये बघायला मिळतील. ) स्फोटामध्ये ऊर्जा,दाब,उष्णता इत्यादींचे संक्रमण आतून बाहेर होते. स्फोट हा एखाद्या आवरणाच्या आत निर्माण झालेली मोठ्या प्रमाणावरील ऊर्जा,ते आवरण सामावून न ठेवू शकल्याने होतो;परंतु अंत:स्फोट हा बाहेरील दाबाला आवरण न टिकल्याने होतो. स्फोटात प्रसरण होते,तर अंत:स्फोटात आकुंचन होते.


पाणबुडी किंवा सबमर्सिबल या पाण्याच्या आत बुडी मारून प्रवास करीत असल्यामुळे त्यांना आणि त्यातील प्रवासी आणि उपकरणे यांना सुरक्षित ठेवण्यासाठी त्यांचे योग्य प्रकारे संकल्पन,आरेखन आणि संरचना करावी लागते. जसजशी सबमर्सिबल पाण्यात खोल खोल जाऊ लागते,तसतसा त्यावरील सर्व बाजूनी पडणारा पाण्याचा दाब वाढत जातो.साधारण ठोकताळ्यानुसार (थंब रूल),सामान्य तापमानाला दर दहा मीटर खोलीला पाण्याचा दाब (प्रेशर) १ बार (सामान्य वातावरण दाब) एव्हढा वाढत जातो.परंतु जसजसे आपण समुद्रात खोल खोल जाऊ तसतसे पाण्याचे तापमान कमी होत जाते,

घनता वाढत जाते आणि त्यानुसार पाण्याचा दाबही वाढत जातो. आपल्या या लेखाच्या संदर्भात बोलायचे झाले, तर जिथे टायटॅनिक विसावली आहे.त्या खोलीवर पाण्याचा दाब वातावरणाच्या सुमारे चारशे पट म्हणजे सुमारे ४०० बार एव्हढा असतो आणि तेथील तापमान सुमारे दोन अंश सेल्सिअस एव्हढे असते.


या खोलीवर जाण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या सबमर्सिबलचे या तापमानाला आणि दाबाला टिकाव धरू शकेल अशा रितीने संकल्पन आरेखन आणि संरचना आवश्यक असते. सबमर्सिबल बनविण्यासाठी योग्य असे पदार्थ वापरणे आवश्यक असते.म्हणूनच,सबमर्सिबल किंवा पाणबुडीसाठी उच्च सामर्थ्याचे (हाय स्ट्रेंग्थ) पोलाद किंवा टायटॅनिअम किंवा अल्युमिनिअम वापरले जाते.

पाणबुडी ज्या खोलीपर्यंत जाणे अपेक्षित आहे,त्या खोलीवरच्या दाबाचा विचार करून पाणबुडीचा किंवा सबमर्सिबलचा सांगाडा आणि तिच्या दंडगोलाकृती भिंतीच्या पोलादाच्या किंवा टायटॅनिअमच्या किंवा अल्युमिनिअमच्या पत्र्याची जाडी ठरविली जाते.इसवीसन १८०० पासून आधुनिक पाणबुड्या बनवल्या जात असल्याने हे धातू उच्च दाबाखाली कसे वागतात,

त्याचप्रमाणे अनेक वेळा पाण्याखाली दाब सहन करून पुन्हा पृष्ठभागावर येणे ही क्रिया केल्याने त्याचा या धातूंवर काय दीर्घकालीन परिणाम होतो,याचाही भरपूर अभ्यास आणि अनुभव आहे.उच्च सामर्थ्याचे पोलाद किंवा इतर धातू वापरून पाणबुडी किंवा सबमर्सिबल बनवणे हे काटेकोरपणे करावे लागणारे,उच्च गुणवत्तानियंत्रण आवश्यक असणारे,अतिशय अवघड,खूप वेळ लागणारे आणि खर्चिक काम असते.


टायटॅनचा अंत:स्फोट झाल्यानंतर अनेक तज्ज्ञांनी त्याची कारणमीमांसा मांडली आहे. तज्ञांना वाटणारे सर्वांत महत्वाचे कारण आहे.टायटॅनची बांधणी,टायटॅनचा पुढील आणि मागील भाग टायटॅनिअमचे दोन अर्धगोल वापरून बनवलेला होता,तर या दोन गोलांना जोडणारा मधला १४२ सेंटिमीटर व्यासाचा, १२७ मिलिमीटर जाडीचा आणि २.४ मीटर लांबीचा दंडगोलाकृती भाग हा प्रक्रिया केलेल्या कार्बन धाग्यांच्या (कार्बन फायबर) कापडाचे ४८० थर एकावर एक गुंडाळून बनवला गेला होता.याला मजबुती आणण्यासाठी त्यात परिवलयाच्या (हूप) दिशेने धागे टाकले होते. अशा प्रायोगिक प्रकारची ही पहिलीच सबमर्सिबल होती.तज्ज्ञांचे मत असे,की कार्बन धाग्यापासून बनविलेल्या गोष्टी हलक्या वजनाच्या असूनसुद्धा मजबूत असतात हे जरी मान्य केले,तरी या पदार्थाचा उच्च दाबाखाली समुद्राच्या पाण्यातील वर्तनाचा अजून पुरेसा अभ्यास झालेला नाही आणि अनुभवही नाही. याशिवाय दुसरा महत्त्वाचा आणि न अभ्यासला गेलेला मुद्दा म्हणजे 'श्रांती' (फटीग) जेव्हा एखादी गोष्ट अथवा यंत्राचा भाग सतत चक्रीय बलाला (सायकलिक लोड) सामोरा जातो,तेव्हा काही कालांतराने त्याच्या गुणधर्मांत आणि त्यामुळे सामन्यांत बदल होतो,कमतरता येते आणि तो अचानक नादुरुस्त होऊ शकतो किंवा मोडून पडू शकतो.फेल होऊ शकतो.याला श्रांती म्हणतात.


आपल्या रोजच्या जीवनातले श्रांतीचे उदाहरण घेतले म्हणने ही संकल्पना पटकन लक्षात येईल.आपण एक धातूची तार घेऊन वाकवती तर ती तुटत नाही परंतु तीच तार आपण वीस-पंचवीस वेळा वाकवली आणि सरळ केली,तर ती तुटते. तार तुटण्यासाठी हे वाकवून सरळ करण्याचे आवर्तन किती वेळा करावे लागेल,ते धातू-धातूवर अवलंबून असते.कार्बन धाग्यांचा अजूनही श्रांतीसाठी पूर्ण अभ्यास झालेला नाही.


टायटॅनिक च्या बाबतीतही असेच घडले असू शकेल,असे तज्ञांचे मत आहे.टायटॅनने याआधीही बुड्या मारून टायटॅनिक अवशेषांच्या सहली केल्या होत्या.प्रत्येक सहलीमध्ये ती समुद्रतळाशी गेली,की तिला उच्च दाब सहन करावा लागला असणार.त्यानंतर ती पुन्हा समुद्रपृष्ठावर आली.की तिच्यावर फक्त वातावरणाचा दाब असणार. म्हणजे दरवेळी ती एक बार ते चारशे बार,अशा दाबाचे आवर्तन पूर्ण करणार.या आवर्तनीय किंवा चक्रीय दाबामुळे निर्माण झालेल्या श्रांतीमुळे तिचे कवच फेल होऊन अंत:स्फोट झाला असू शकतो,असे तज्ज्ञांचे मत आहे.


या कार्बन धाग्यांपासून टायटॅनच्या संदर्भात अनेक संस्था आणि व्यक्तींनी ओशनगेटला इशारे दिले होते.सन २०१५मध्ये जेव्हा ओशनगेट 'डोअर मरीन' या कॅलिफोर्निया स्थित संस्थेकडे त्यांचा अनुभव परामर्श घेण्यासाठी गेली होती, त्या वेळी त्या कंपनीच्या अध्यक्षांनी कार्बन धाग्यांचा वापर करण्याबाबत नकारात्मक सल्ला दिला होता.त्याचप्रमाणे,मरीन टेक्नॉलॉजी सोसायटी या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या 'समानव जलांतर्गत वाहन समिती'ने टायटॅनचे प्रमाणन (सर्टिफिकेशन) करून घेण्याचाही सल्ला दिला होता.

परंतु,ओशनगेटने या कोणाच्याच सल्ल्याला भीक घातली नाही.उलट,ओशनगेटचे म्हणणे असे होते,की या सबमर्सिबलच्या धंद्यात खूपच अनावश्यक असे नियमन आहे,ज्यामुळे संशोधन, नवीन कल्पना आणि विकासाला वाव मिळत नाही.जर ओशनगेटने योग्य रितीने प्रमाणन करून घेतले असते,तर कदाचित ही दुर्घटना टळू शकली असती.

१७/९/२३

शांतपणे निरोप घेणारा भीमा.. Bhima saying goodbye quietly

१९९५ पुण्याच्या राजभवनमधून,म्हणजे औंध इथल्या राज्यपालांच्या निवासस्थानातून आमचे आयुक्त रवींद्र सुर्वे यांना एक पत्र आलं. राजभवनमध्ये ठेवलेल्या वन्य प्राणी व पक्ष्यांना आमच्या पार्कमध्ये हलवण्याचा विनंतीवजा आदेश होता.सुर्वेसाहेबांनी माझ्यासमोर ठेवलेलं ते पत्र वाचून मी हरखूनच गेलो.सहा मोर,दहा पोपट,पाच कासवं आणि तीन शेकरू आमच्याकडे येणार होती.आम्ही ताबडतोब होकार कळवला आणि नव्या पाहुण्यांच्या आगमनाची साग्रसंगीत तयारी सुरू केली.


एके दिवशी राजभवनातले सगळे प्राणी-पक्षी घेऊन वन विभागाची गाडी आमच्या पार्कमध्ये आली.दरम्यान,खूप साऱ्या ओल्या अणि सुक्या झाडांच्या फांद्या पिंजऱ्यामध्ये लावून आम्ही चार-पाच पिंजरे तयार ठेवले होते.त्यातल्या एका पिंजऱ्यात पोपट सोडले.कासवांच्या आधीच्याच पिंजऱ्यामध्ये नव्याने दाखल झालेली कासवं ठेवली.

आम्हाला सर्वांत जास्त आकर्षण होतं ते महाराष्ट्राचा राज्यप्राणी असलेल्या शेकरूंचं. विशेष म्हणजे या तीन शेकरूंमध्ये दक्षिणी राज्यांमध्ये आढळणाऱ्या शेकरूच्या एका वेगळ्या जातीची जोडी होती.दक्षिण भारतामध्ये आढळणारे हे शेकरू आकाराने लहान असतं. त्याच्या शेपटीवरचे केस काहीसे काळसर असतात.तर भीमाशंकर परिसरात आढळणारं शेकरू थोराड बांध्याचं असते.

त्याची शेपूट चांगलीच लांब असते आणि शेपटीवर पांढरट-चंदेरी केसांची लव असते.आमच्याकडे दाखल झालेला भीमाशंकरचा रहिवासी नर होता.दक्षिणी शेकरूंच्या जोडीला आम्ही एका पिंजऱ्यात ठेवलं आणि भीमाशंकरच्या नराला स्वतंत्र पिंजऱ्यात.भीमाशंकरच्या जंगलात सापडल्यामुळे वनाधिकाऱ्यांनी त्याचं नाव भीमा असं ठेवलं होतं.वनाधिकाऱ्यांना सापडला तेव्हा भीमा अगदीच बाळ होता.एका वादळी पावसाच्या रात्री सोसाट्याच्या वाऱ्यात हे बाळ आपल्या घरट्यासकट खाली पडल.पण सुदैवाने तेव्हाच एक शेतकरी आपल्या गाईंना चारून घरी चालला होता.त्याने भीमाला मायेने उचललं आणि घरी आणलं.त्याच्या बायकोने रात्रभर कापसाच्या बोळ्याने शेळीचं दूध पाजून त्याची काळजी घेतली.दुसऱ्या दिवशी एका तरुण वनाधिकाऱ्याकडे त्यांनी हे पिल्ल सोपवलं.त्या अधिकाऱ्याने भीमाला पुण्याला आणलं आणि काही दिवस घरीच सांभाळलं.पण थोड्याच दिवसांत त्याची बदली पुण्याबाहेर झाली. त्यामुळे त्याने भीमाला पुण्याच्या राजभवनमध्ये ठेवलं.

गव्हर्नर मॅडमचा भीमा खूपच लाडका होता.त्या पुण्यात असल्या की स्वतःच्या हाताने त्याला सुकामेवा खायला घालत असत.असा प्रवास करत करत आता भीमा आमच्याकडे दाखल झाला होता.जिथे जाईल तिथे लळा लावी.आमच्याकडे आल्यावरही थोड्याच दिवसांत भीमाने सगळ्यांची मनं जिंकली.फक्त पार्कवरच्या आम्हा लोकांचाच नव्हे,तर साऱ्या पिंपरी-चिंचवड शहराचा तो लाडका हीरो झाला.आयुक्त-महापौरांकडे येणारे पै-पाहुणे भीमाला बघायला हमखास पार्कवर येऊ लागले.अंगावर तांबू चकचकीत कोट, झुपकेदार शेपटी,छोटुकले कान आणि नटखट डोळे असा झकास रुबाब होता.त्याचा

त्याच्या पिंजऱ्यामध्ये आम्ही वेगवेगळ्या पातळीवर फांद्या बांधल्या होत्या.त्यांच्यावरून त्याला उड्या मारताना पाहून प्रेक्षक हरखून जात.त्याच्या विश्रांतीसाठी आम्ही एक घरटंही तयार केलं होतं.दुपारी आणि रात्री टुणकन उडी मारून तो त्या घरट्यात जाऊन झोपत असे.


भीमा आमच्याकडून हक्काने खायचे-प्यायचे लाडही करून घेत असे.लहानपणापासून माणसांसोबत वाढल्यामुळे असेल,पण त्याला एकटं जेवायला आवडायचं नाही.त्याच्या पिंजऱ्यातल्या ताटलीत कीपरने त्याचं अन्न ठेवून दिलं तर तो त्याकडे ढुंकूनही बघायचा नाही,पण कोणी तरी ओळखीचा माणूस जवळपास असेल तरच तो अन्नाला तोंड लावायचा.सूर्योदय झाला की स्वारी घरट्याबाहेर डोकवायची.मी हातात फळं घेऊन त्याच्या पिंजऱ्याकडे निघालो की टॉक-टॉक टॉक-टॉक आवाज सुरू व्हायचा. पिंजऱ्यात शिरण्याचा अवकाश,

भीमा थेट माझ्या खांद्यावर उडी घ्यायचा.माझ्या हातातून खाणं घेऊन खांद्यावर बसूनच तो खात असे. प्रतिभाचाही तो चांगला दोस्त झाला.तिच्या खांद्यावर बसून आवडते पदार्थ मटकावायचा.आवडत्या लोकांकडून जेवण मिळालं की स्वारी खूपच खूष असायची.


माणसांची त्याला खरोखरच आवड होती.नवख्या माणसासोबतही त्याचं छान जुळायच. एकदा प्रसिद्ध जीवशास्त्रज्ञ डॉ.रेनी बोर्जेस आमच्या पार्कवर आल्या होत्या.भीमाशंकर परिसरातील शेकरूंचा त्यांचा दांडगा अभ्यास होता.त्यांच्याही खांद्यावर भीमा मनसोक्त बागडला.आयुक्त रवींद्र सुर्वे निवृत्त होऊन त्यांच्या जागी रुजू झालेल्या प्रवीणसिंह परदेशींनाही भीमाचा खूप लळा लागला होता. त्यामुळे पिंपरी-चिंचवडमध्ये झालेल्या 'राज्य मिनी ऑलिंपिक स्पर्धे'चा स्पर्धेचा शुभंकर होण्याचा मान भीमाला मिळाला.टी. रमेश नावाच्या बॉक्सरने तर या खेळांच्या उद्घाटनावेळी शेकरूच्या अंगासारखा पोशाख 'भीमा.. भीमा..' च्या तालावर नृत्य केलं. स्पर्धा सुरू असताना शहरभर भीमाची वेगवेगळे खेळ खेळतानाची मोठमोठाली कॅरिकेचर्स लागली होती.त्यामुळे इतर प्रेक्षकांबरोबरच या स्पर्धेसाठी जमलेले खेळाडूही आवर्जून आमच्या पार्कमध्ये येऊन भीमाला भेटून जात होते.भीमा सेलिब्रिटी होताना पाहण हा आमच्यासाठी मजेशीर अनुभव होता. 


भीमाचं आणि प्रसिद्धीचं काही तरी नातं असावं. एकदा सूर्यग्रहण होतं.वेल्डिंग करण्याच्या काचेतून आम्ही आळीपाळीने सूर्यग्रहण पाहत होतो.सूर्यग्रहणाचा प्राण्यांच्या वर्तनावर काही परिणाम होतो का हे बघायला एक प्रेस फोटोग्राफरही आला होता.काचेतून आम्ही आकाशात नक्की काय पाहतोय याची उत्सुकता भीमाच्या चेहऱ्यावर दिसत होती.गंमत म्हणून आम्ही त्याच्या डोळ्यांसमोर काच धरली.त्यानेही त्या काचेतून सूर्यग्रहण बघितलं.त्या फोटोग्राफरने तो क्षण अचूक आपल्या कॅमेऱ्यात टिपला आणि दुसऱ्या दिवशीच्या पेपरमध्ये छापूनही टाकला. पुन्हा एकदा आमचा भीमा हीरो झाला.


भीमाची आणखी एक आठवण मनात अगदी घट्ट रुतून बसली आहे.त्या वर्षी असह्य उन्हाळा होता.मे महिन्याचे सुरुवातीचे दिवस होते. बसल्याजागी घाम येऊन कपडे चिंब भिजायचे. अंगाची तलखी तलखी व्हायची.एके दिवशी तर कहर झाला.तापमान ४७ अंशांच्याही वर पोहोचलं असेल.(सोयरे वनचरे,अनिल खैर,समकालीन प्रकाशन) आम्ही आणि आमचे प्राणी-पक्षी सगळेच चिडीचूप बसून होतो.पिंजऱ्यांचे पत्रे कडक उन्हाने तापून प्राण्यांची तलखी वाढवत होते.एवढ्या रणरणत्या उन्हात प्रेक्षक तरी कशाला येताहेत! अगदीच एखाद-दुसरा चुकार माणूस पार्कमध्ये फिरत होता.दुपारी दीड-दोनच्या सुमारास मी एकटाच पार्कच्या राऊंडला निघालो.सर्वच प्राणी-पक्षी मलूल झाले होते.माणसांचीच वाट लागली होती,तर बिचाऱ्या त्या मुक्या जीवांना किती त्रास होत असेल ! चक्कर मारत मारत भीमाच्या पिंजऱ्याजवळ आलो,तर तो कुठेच दिसेना.त्याच्या नेहमीच्या जागेवर तो नव्हता,की घरट्यातही.खाली पाहिलं तर पिंजऱ्यातल्या पाचोळ्यामध्ये भीमा आडवा झाला होता.मी घाबरून त्याच्याजवळ गेलो. मोठ्याने हाक मारल्यावर तो थोडासा हलला; पण उठून बसण्याएवढी हुशारी त्याला वाटत नव्हती.मी हाका मारल्या,तसे आसपासचे कर्मचारी लगोलग धावून आले.भीमाची अवस्था पाहून त्यांनी शेजारच्या तळ्यातलं पाणी पिंजऱ्यावर मारायला सुरुवात केली;पण त्याने काही फरक पडेना म्हटल्यावर आम्ही फायर ब्रिगेडचा बंब बोलावला.तेही ताबडतोब आले आणि होज पाइपने त्यांनी अख्ख्या पक्षालयावर पाणी मारायला घेतलं.पिंजऱ्यावर जणू पाऊसच सुरू झाला.

सारेच प्राणी-पक्षी सुखावले.तापलेले पिंजरे गार होऊ लागले,तसा भीमाही सावध झाला.थोड्याच वेळात त्याला हुशारी आली. पावसात तो उड्या मारत भिजला आणि आनंदी होऊन पिंजराभर नाचू लागला.आम्हाला सर्वांना हायसं वाटलं.पुढचे दोन-तीन दिवस आगीचा बंब पाणी बरसून जात होता.त्यानंतर मात्र तापमान बऱ्यापैकी खाली उतरलं आणि आमच्या जीवात जीव आला.


भीमा आमच्यासोबत १२ वर्षं होता.त्यानंतर मात्र हळूहळू त्याची दृष्टी कमी होत गेली.हालचाली मंदावल्या.आम्ही त्याच्यावर उपचार सुरू केले.सुरुवातीला त्याचा उपयोग झाला,पण नंतर त्याचं शरीर उपचारांना प्रतिसाद देईना.

आपल्या एक्झिटची वेळ जवळ आल्याचं त्याला समजलं असावं.एके दिवशी त्याने खाणं सोडलं.दुसऱ्या दिवशी मध्यरात्री कधी तरी शांतपणे तो आम्हाला सोडून निघून गेला.आजही त्याची आठवण निघाली की त्याच्या डोळ्यांतले मिश्कील भाव आठवून चेहऱ्यावर हसू उमटतं. 

१५/९/२३

रोम : पाश्चिमात्य वैद्यक - २ Rome : Western Medicine

नवनव्या प्रसंगांना सामोरं जात असताना गेलनला अनेक गोष्टी शिकायला मिळत.ते सगळे उपचार करताना तो शारीरिक आणि मानसिक विकारांवर उपचारपद्धती विकसित करत असे. त्यासाठी तो विविध प्रकारच्या वनस्पती आणि खनिजं यांच्यापासून औषधं बनवून पाही. त्यामधून मिळणाऱ्या निष्कर्षांच्या आधारे तो आपल्या उपचारपद्धती आणखी सुधारणा करे. त्यानं औषधं तयार करणं आणि ती रुग्णांना घेण्याविषयीच्या सूचना देणं (म्हणजेच फार्मसी) याविषयी अनेक पुस्तकं लिहिली!ग्रीकांना एकूणच विज्ञानाची आवड होती.आपण ज्या जगात राहतो त्या जगाविषयी सगळं समजून घेण्यासाठी आधी आपल्या परिसराची शास्त्रीय दृष्टिकोनातून ओळख करून घेतली पाहिजे असं त्यांना वाटे.याच धर्तीवर गेलनला वैद्यकशास्त्र हे विज्ञान मानलं जावं असं वाटे. त्यादृष्टीनं त्याची प्रचंड धडपड सुरू असे.प्रयोगांमधून मिळणारी माहिती आणि त्याला दिलेली आपल्या स्वतःच्या निरीक्षणांची जोड या दोन गोष्टींची सांगड घालून आपला हेतू साध्य होईल अशी त्याला खात्री वाटे.तसंच अंधश्रद्धा आणि खरं ज्ञान यांच्यातला धूसर फरक एकदम स्पष्ट करून त्या पूर्णपणे वेगळ्या झाल्या पाहिजेत यासाठी तो प्रयत्नशील असे.त्यानं यासाठी आपल्या हयातीत ३०० च्या वर पुस्तकं आणि लेख लिहिले.


दुसऱ्या शतकात,चार रोमन राज्यांच्या दरबारी वैद्य म्हणून सेवा करताना जखमांवर उपचार करण्यासाठी गेलन अनेक प्रकारची हत्यारं वापरे त्यात विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया करण्यासाठी वेगवेगळ्या आकारांच्या सुऱ्या होत्या.त्यातली एक सुरी माणसाच्या शरीरातून रक्त वाहून जाण्यासाठी वापरली जाई.त्यामुळे माणसाच्या शरीरात साठून राहिलेलं विष निघून जातं असा समज होता.गळू फोडून त्यातून पू वाहून जाण्यासाठी एक वेगळ्या प्रकारची सुरी होती.गरम करून शरीरावर झालेल्या जखमेतल्या किंवा इतर कारणांमुळे झालेल्या संसर्गाला हलकेच जाळून टाकण्यासाठी आणखी एक वेगळ्या प्रकारची सुरी होती.शरीरातल्या हाडात अडकलेला शस्त्राचा भाग काढून टाकण्यासाठी अजूनच एक वेगळ्या प्रकारची सुरी होती.वाकडं झालेलं हाड सरळ करण्यासाठी चौकोनी पात्याची स्टीलपासून बनलेली एक बोथट सुरी होती.त्या काळातली ही प्रगत हत्यारं पाहिली की फारच आश्चर्य वाटतं.


आपला चार वर्षांचा करार १६१ साली संपल्यावर वयाच्या ३१ व्या वर्षी गेलननं दुसरं काहीतरी करायचं असं ठरवलं.कारण आता त्याच्या कामात तोचतोचपणा यायला सुरुवात झाली होती.पुन्हा जन्मगावी परतण्याऐवजी त्यानं आता इटलीचा प्रवास करून रोममध्ये जायचं ठरवलं.

प्रत्यक्षात त्याला रोमला पोहोचायला एक वर्षांहून जास्त वेळ लागला.तिथे पोहोचताच त्यानं युडेमस नावाच्या त्याच्या वडिलांच्या मित्राची भेट घेतली.पण ते आजारी असल्यानं त्यांनी गेलनला त्यांच्या दुसऱ्या मित्रांना भेटायला जायचा सल्ला दिला.गंमत म्हणजे अगदी सुरुवातीच्या काळात रोमन लोकांना डॉक्टर म्हणजे अगदी कुचकामी लोक वाटायचे.घरात कुणी आजारी पडलं तर त्याला कुटुंबातल्याच कुणीतरी औषधी वनस्पती आणि जादूटोणा यांच्यासारखे उपचार करून बरं करावं अशी त्यांची इच्छा असे.त्यामुळे ग्रीसमधून पकडून आणलेले गुलाम हेच फक्त डॉक्टर्स बनायची नामुष्की पत्करायचे.त्यांना क्वॅक्स (म्हणजे एकदम फालतू) असं म्हटलं जाई. म्हणूनच हे नाव तोतया किंवा जुजबी डॉक्टर्ससाठी अजूनही वापरतात!


या पार्श्वभूमीवर इतक्या सगळ्या डॉक्टर्सच्या गर्दीत आपला निभाव कसा लागणार अशी भीती गेलनला वाटत होती.पण त्याची एक मजाच आहे.आधी उल्लेख केलेले युडेमस हे त्याच्या वडिलांचे मित्र आजारी असताना रोममधल्या डॉक्टर्सनी त्यांच्यावर केलेले उपचार कुचकामी ठरत होते.त्यामुळे त्यांनी बघूयात तरी म्हणून गेलनला त्यांच्यावर उपचार करण्यासाठी बोलावलं.

गेलननं त्यांच्या आजाराचा नीट अभ्यास करून त्याच्यावर उपाय सुचवला.तो मात्र त्यांना एकदम लागू पडला आणि त्यांची तब्येत बऱ्यापैकी सुधारली.ही बातमी रोममधल्या प्रतिष्ठित आणि श्रीमंत लोकांपर्यंत पोहोचताच त्यांची गेलनकडे रांग लागली.रोममधल्या एका सरकारी दूतावासात काम करणाऱ्या फ्लॅवियस बोईथियस नावाच्या अधिकाऱ्याच्या बायकोला गेलननं याच धर्तीवर बरं करताच खूश होऊन त्यानं गेलनला ४०० सुवर्णमुद्रांचं बक्षीस तर दिलंच,पण त्याचबरोबर आपल्या उपचारपद्धतींविषयी गेलननं व्याख्यानं द्यावीत अशी त्याला विनंती केली. गेलननं ती मान्य करताच बोईथियसनं त्याच्यासाठीची सगळी व्यवस्था केली.तसंच प्राण्यांच्या शरीरविच्छेदनाचं प्रात्यक्षिक सगळ्यांना बघायला मिळावं यासाठी त्यानं एक मोठं टेबल आणि सगळ्या अवजारांची सोयही केली.गेलनची व्याख्यानं आणि त्याची शरीरविच्छेदनाची प्रात्यक्षिकं या दोन्ही गोष्टी लवकरच रोममधल्या सुशिक्षित लोकांमध्ये करमणुकी

बरोबरच ज्ञान देणाऱ्या ठरल्या आणि 'टॉक ऑफ दी टाऊन' झाल्या.


एकदा त्यानं सगळ्या सजीवांच्या बोलण्याचा उगम हा हृदयातून नव्हे तर मेंदूतून होत असतो, हे सिद्ध करायचं ठरवलं.त्यासाठी त्यानं एका जिवंत डुकराला आपल्या शरीरविच्छेदनाच्या टेबलावर त्याचे पाय वर करून बांधून टाकलं. लगेच ते डुकर जिवाच्या आकांतानं ओरडायला लागलं.मग एका दोरीच्या साहाय्यानं गेलननं त्याच्या घशातून तोंडाकडे आवाज नेणाऱ्या वाहिन्यासुद्धा एका दोरीनं हलकेच बांधताच डुकराचा आक्रोश बंद झाला आणि ती दोरी सोडताच तो पुन्हा सुरू झाला.अशा तऱ्हेनं गेलन आता अनेक गोष्टी सप्रयोग सिद्ध करून दाखवू लागला! त्या काळातला दुसरा एक समज म्हणजे सजीवांच्या शरीरातलं रक्त एकीकडून दुसरीकडे नेण्याचं काम फक्त एकाच प्रकारच्या रक्तवाहिन्या (नीला / शिरा) च करतात,असा होता.तसंच प्राणी जिवंत राहण्यासाठी हृदयाकडून सगळ्या अवयवांकडे व्हायटल स्पिरीट नावाचा पदार्थ रोहिण्या (धमन्या) या दुसऱ्या प्रकारच्या रक्तवाहिन्या सतत नेण्याचं काम करतात,असं लोक मानत.पण गेलनचं म्हणणं होतं, की नीला आणि रोहिण्या या दोन्ही प्रकारच्या रक्तवाहिन्या रक्त नेण्याचं काम करतात. फक्त नीला शरीरातल्या अवयवांकडून अशुद्ध रक्त हृदयाकडे नेतात आणि रोहिण्या शुद्ध रक्त हृदयाकडून इतर सगळ्या अवयवांकडे नेतात,एवढाच काय तो फरक असतो. हे सिद्ध करण्यासाठी त्यानं एका प्राण्याला त्याच्या आपल्या शरीरविच्छेदनाच्या टेबलावर बांधून ठेवलं.मग त्याच्या रोहिणीला त्यानं मध्ये थोडं अंतर सोडून दोरीनं गच्च बांधून टाकलं.त्यामुळे तिच्यामधून शरीरात प्रवास करणारं रक्त एखाद्या पाण्याच्या कालव्यात दगडाचा बांध घातल्यावर जसं पाणी अडून बसतं तसं पुढे जाणं बंद झालं. मग ज्या दोन ठिकाणी त्यानं त्या प्राण्याच्या शरीरातल्या रोहिणीला गच्च बांधलेलं होतं, त्यांच्यामध्येच त्यानं सुरीनं ती रोहिणी कापून टाकली.

लगेच तिथून आधी साठलेलं रक्त भळाभळा वाहू लागलं.

म्हणजेच रोहिणीमधून रक्त जातं हा त्याचा दावा खरा होता.याच धर्तीवर त्यानं आपल्या पाठीच्या मणक्या

विषयीसुद्धा एक महत्त्वाचं प्रात्यक्षिक दाखवलं.त्यातून सिद्ध झालं की आपल्या पाठीच्या मणक्याला जर जोरदार इजा झाली तर जिथे इजा झाली असेल त्याच्या खालचा भाग लुळा पडतो,पण जर ही इजा चौथ्या किंवा त्याच्या वरच्या मणक्यावर झाली तर मात्र आपण लगेच मरतो.

अर्थात,या प्रात्यक्षिकासाठी त्याला माणसाच्या ऐवजी कोणता तरी प्राणी वापरणं भाग होतं.कुत्र्यांच्या मूत्रपिंडाचं आणि मूत्राशयाचं प्रात्यक्षिकही त्यानं दाखवलं आणि त्याचं कार्य समजावून सांगितलं. पण त्याच धर्तीवर माणसाच्या मूत्रपिंडाचं आणि मूत्राशयाचं काम चालतं हा त्याचा दावा साफ खोटा ठरला होता.!


गेलनच्या व्याख्यानांना प्रचंड गर्दी व्हायची.त्याची बोलायची शैली आणि ओघवती भाषा सर्वसामान्यांना समजेल अशी असे.त्यामुळे क्लिष्ट विषय आणि मुद्देही तो लोकांना कंटाळा येऊ न देता समजावून सांगू शके.आपले मुद्दे तो अतिशय आत्मविश्वासानं मांडायचा.हे करत असताना तो इतर डॉक्टरांची त्यांच्या हावरटपणामुळे किंवा अज्ञानामुळे झालेल्या हास्यास्पद वृत्तीची खिल्ली उडवायचा.अनेकदा तो त्यांची नक्कल करायलाही कचरत नसे! अनेक डॉक्टर्स त्यांच्या कौशल्यापेक्षा त्यांच्या श्रीमंतीसाठीच जास्त प्रसिद्ध आहेत असं तो जाहीरपणे म्हणे.साहजिकच अनेक डॉक्टर्स त्याच्याविरुद्ध भडकायचे.अनेकदा गेलन आणि त्यांच्यामध्ये जाहीरपणे वादावादी व्हायची. त्यातून गेलनचं नवनव्या माणसांशी शत्रुत्वही वाढायचं.कधीकधी गेलन आपल्या वक्तव्यांविषयी सरळ माफी मागून मोकळा व्हायचा आणि म्हणायचा,'मला माफ करा... मी असं पुन्हा कधी करणार नाही' आणि अर्थातच तो लगेच पुन्हा तसं करायचा! हे सगळं करत असतानाच तो पुस्तकं,लेख आणि डॉक्टरांसाठी मार्गदर्शनपर पुस्तिकाही लिहायचा. मुख्य म्हणजे अनेक रुग्णांवर उपचार करणं हे त्याचं सगळ्यात महत्त्वाचं आणि पहिल काम सुरूच होतं.त्या काळच्या रोमच्या सम्राटाच्या दरबारातला तो सगळ्यात मोठा डॉक्टर बनला. तसंच त्याची इतर रोग्यांना तपासायची फी जास्त असे.साधं पत्रानं कुणाला वैद्यकीय सल्ला द्यायचा तरीही तो त्यासाठी फी आकारे.अतिशय बाळबोध उपचारपद्धती आणि रोगनिदान यंत्रणा असूनही गेलन कावीळ,जुलाब,कुष्ठरोग अशा अनेक रोगांचं निदान नुसत्या निरीक्षणातून करू शके.तसंच काही जणांना काहीही झालेलं नसताना आपण आजारी आहोत असं उगीचच वाटे.(आजही असे खूप जण असतात!) त्यांना तो उगीच कसल्या तरी निर्धोक औषधांचा उपचार सुचवे.

त्यामुळे आपण कसलं तरी औषध घेऊन बरं होतोय असं खरं तर बरंच असलेल्या माणसाला वाटे आजही हे सुरूच असतं,फक्त त्याला तांत्रिक भाषेत 'प्लासेबो उपचारपद्धती' म्हणतात,इतकाच काय तो फरक !


काही काळानं गेलननं अचानकच रोम सोडायचं ठरवलं.त्याचं कारण त्यानं इतर डॉक्टरांचा कोता स्वभाव आणि त्यांच्याशी सतत होणारी भांडणं असं दिलेलं असलं तरी ते खरं नसावं.रोमची सत्ता मार्क्स ऑरेलियस आणि ल्युशियस व्हेरस यांच्या हाती आल्यापासून रोम सतत युद्धात गुंतलेलं होतं.या युद्धातून परतणाऱ्या सैनिकांनी त्यांच्याबरोबर प्लेगची साथ आणली. डॉक्टर असूनही गेलनला प्लेगची भयंकर भीती वाटे कुठल्याच डॉक्टरला त्या काळी हा रोग कुठून येतो आणि कशामुळे होतो हेच माहीत नसल्यामुळे तो बरा कसा करायचा हा प्रश्नच पडत नव्हता.या प्लेगनं एकूण लोकसंख्येच्या एकतृतीयांश जनतेला संपवून टाकलं! बहुतेक यामुळेच तातडीनं गेलननं त्याचं सगळं सामानसुमान विकून टाकलं आणि तो आपला गाशा गुंडाळून पेरॉममला परत गेला.तिथे तो इसवी सन १६८ सालापर्यंत होता.मग रोममध्ये युद्ध सुरू होतं,त्यामुळे रोमच्या राजानं गेलनला पुन्हा वैद्यकीय सेवेवर यायचं आमंत्रण दिलं.तिथे थोडे दिवस काम केल्यावर त्याला त्याचा कंटाळा आला.मग त्यानं मार्क्स ऑरेलियस या राजाला आपल्याला पर्गेमॉनला परतू द्यायची विनंती केली.तिथे राजाच्या कॉमोडस नावाच्या मुलाची काळजी घ्यायचं काम करायचं त्यानं कबूल केलं. पण ते जरा अवघडच होतं.कारण कॉमोडस जरा वेडसरच होता.गेलन रोमला परतल्यावर इकडे युद्धात रोमचे दोन्ही राजे दगावले.त्यांच्या पश्चात कॉमोडस राजा बनला.त्याची काम करायची पद्धत भयानक असल्यामुळे तो अतिशय वाईट राज्यकर्ता होता.पण तरीही गेलन त्याची मनोभावे सेवा करत होता.१९२ साली कॉमोडसची एका कटात हत्या झाली,आणि त्याची जागा सेप्टिमस सेव्हेरस नावाच्या नव्या राजानं घेतली.आता गेलन त्याचा राजवैद्य बनला.


त्याच वर्षी रोममधल्या शांती मंदिराला आग लागली आणि त्यात गेलननं तिथे ठेवलेली अनेक हस्तलिखितं आणि टिपणं नष्ट झाली. आपल्या आयुष्याची शेवटची दोन दशकं गॅलेननं रोममध्येच काढली.तिथे त्यानं बहुतेक सगळा वेळ लिखाणात घालवला.त्याच्या काही पुस्तकांची नावं तरी बघा : 'बोन्स फॉर बिगिनर्स', 'ऑन द युजफूलनेस ऑफ पार्ट्स ऑफ द बॉडी.' एकदा तर म्हणे गेलन एका वेळी बाराजणांना त्याच्या १२ वेगवेगळ्या पुस्तकांचा मजकूर डिक्टेट करत होता आणि ते १२ जण त्याची १२ पुस्तकं एकाच वेळी लिहीत होते! एकूण वैद्यकशास्त्रात गेलनचं नाव अजरामर झालं हे निश्चित !


१३.०९.२०२३ या लेखातील भाग २ रा समाप्त..

१३/९/२३

पाश्चिमात्य वैद्यक : रोम Western Medicine: Rome

रोमनं मेडिटेरियन प्रांतावर राज्य केलं तेव्हा त्यांनी बायॉलॉजीच्या प्रगतीत बराच हातभार लावला होता.त्या वेळच्या तज्ज्ञांनी रोममध्ये असलेलं आधीचं ज्ञान जपून ठेवायला आणि रोम साम्राज्यात त्याचा प्रचार आणि प्रसार करायला सुरुवात केली होती.त्याच वेळी तिसऱ्या शतकात होऊन गेलेला औलुस कॉर्नेलियस सेल्सस (Aulus Cornelius Celsus) (ख्रिस्तपूर्व २६ ते ५०) यानं एक सायन्स सर्व्हेच घेतला घेतला.त्यात त्यानं आतापर्यंत उल्लेखल्या गेलेल्या आणि वापरात असलेल्या सहाशे वनस्पतींची माहिती गोळा केली होती.आणि त्यांच्या औषधी उपयोगांबद्दल लिहिलं होतं. यातून त्याला भलतीच प्रसिद्धी मिळायला लागली होती.यातूनच त्यानं फार्माकोलॉजी (औषधनिर्माण) या बायॉलॉजीच्या शाखेचा पाया घातला.अशा प्रकारच्या एन्सायक्लोपीडियाचं काम रोमच्या इतिहासात आणखी एका महान वैज्ञानिकानं पुढे नेलं.त्याचं नाव होतं गेयस प्लिनियस सेकंड्स (इ.स.२३ ते ७९) यानं याच्या आधीच्या लेखकांनी बायॉलॉजीबद्दल लिहिलेलं जे काही सापडेल ते लिहून ठेवलं. अर्थात,त्या काळी बायॉलॉजीला 'नॅचरल सायन्स' म्हणत होते.त्यामुळे त्यानंही आपल्या खंडांना 'नॅचरल हिस्ट्री' म्हटलं आहे.त्याच्या लिखाणाचे चक्क खंड होते.त्यानं जे काही सापडेल ते सगळं लिहिलं असल्यामुळे त्यात अनेकदा विज्ञानाबद्दलच्या चुकीच्या समजुती आणि भाकडकथाही आल्या होत्या.पण तरीही त्यानं जे काही होतं त्यामागे काहीतरी कारण नक्कीच असतं' ही तार्किक कारणमीमांसा कायमच प्रमाण मानली होती. आणि त्याला पाठिंबा दिला होता.त्यामुळेच हे खंड पुढची अनेक शतकं अभ्यासली गेली होती. या माणसाला आता आपण 'प्लिनी' म्हणून ओळखतो.!


ग्रीक परंपरेतला शेवटचा आणि जवळपास सगळ्यात महत्त्वाचा बायोलॉजिस्ट ज्याला म्हणता येईल तो म्हणजे गेलन (१३० ते २००) होता.गेलनचा जन्म आशिया मायनरमध्ये झाला होता.आणि त्यानं आपलं कार्य मात्र रोममध्ये केलं.गेलनच बालपण एका श्रीमंत कुटुंबात पर्गेमॉन या गावात गेलं.त्यामुळे त्याला गेलन ऑफ पर्गेमॉन'असंही म्हटलं जातं.त्याची आई तापट स्वभावाची होती.घरात तिचा सतत आरडाओरडा सुरू असे.त्यांच्या घरी काम करणाऱ्या बायकांनी नीट काम केलं नाही तर ती त्यांचा चक्क चावा घेत असे! गेलनला भाऊ-बहिणी होत्या याविषयी काही माहिती उपलब्ध नाही.गेलनचे वडील निकॉन हे प्रसिद्ध अभियंता आणि वास्तुरचनाकार होते.त्यांना गणित,तत्त्वज्ञान,खगोलशास्त्र आणि वनस्पतिशास्त्र अशा अनेक विषयांमध्ये रस होता.गेलननं त्यांची प्रतिभा घेतलेली असली तरीही आईचा भडकपणाही त्याच्या जोडीला उचलला होता! त्या काळात युद्धात शत्रूकडच्या नागरिकांना पकडून विजयानंतर नोकर बनवलं जाई.गेलनच्या घरी असे अनेक नोकर होते. निकॉननं स्वत:च गेलनला लहानपणी शिकवलं.थोडा मोठा झाल्यावर गेलन शाळेत गेला.त्याला अभ्यासाची चांगली गोडी लागली.शाळेतला अभ्यासक्रम पूर्ण करून गेलननं वैद्यकीय अभ्यास सुरू केला.वयाच्या १३ व्या वर्षापर्यंत त्याची ३ पुस्तकंही प्रसिद्ध झाली होती.

त्याच्या गावात अस्कुलअ‍ॅपेअसच एक भलंमोठं देऊळ होतं.दंतकथेनुसार अस्कुल अ‍ॅपेअस हा वैद्यकीय बाबतींमधला एक ग्रीक देव होता,आणि तो सच्चाईनं वागणं आणि आजारातून बरं होणं यांचं प्रतीक असलेल्या अपोलो या देवाचा मुलगा मानला जाई.तसंच अस्कुलअ‍ॅपे असला काही जण जगातला पहिला डॉक्टर मानायचे.तो त्याच्या उपचारांनी मृतांनाही जिवंत करू शके म्हणे.! त्याच्या नावानं बांधलेल्या या देवळात आजार आणि रोगामुळे ग्रासलेले लोक यायचे. या देवळातल्या पुजाऱ्यांना वैद्यकीय बाबींचीही जाण असे.ते मग या रुग्णांवर उपचार करायचे. बहुतेकदा त्यांचे उपचार म्हणजे विविध प्रकारचे चहा बनवून देणं हे असायचे.काही वेळा मात्र शस्त्रक्रियाही व्हायच्या.पण त्यात बव्हंशी वेळा रुग्ण मरायचाच.कारण एक तर माणसाच्या शरीराबद्दल अजून नीटसं कुणालाच माहिती नव्हतं आणि दुसरं म्हणजे शस्त्रक्रिया करण्यापूर्वी त्यात वापरली जाणारी हत्यारं निर्जंतुक केली पाहिजेत हे अजून कळायचं होतं. रुग्णांना पडलेल्या स्वप्नांवरून त्यांच्यावर काय उपचार केले पाहिजेत याचा अंदाज मग ती पुजारी डॉक्टर मंडळी घ्यायची.कधीकधी तर म्हणे त्या रुग्णांच्या स्वप्नात अस्कुलअ‍ॅपेअस स्वतःच येऊन त्यांना आश्चर्यकारकरीत्या बरं करून टाकायचा! मग रुग्णांची आणि त्या माध्यमातून समाजाची सेवा करावी या हेतूनं अनेक प्रतिष्ठित लोकही त्या देवळात अधूनमधून राहायचे.असंच एकदा निकॉन त्या देवळात राहिला होता. तेव्हा त्याच्या स्वप्नात अस्कुल

अ‍ॅपेअस आला आणि गेलन एक महान डॉक्टर होईल असा दृष्टान्त त्यानं निकॉनला दिला. त्यामुळे गेलन १६ वर्षांचा झाल्यावर निकॉननं त्याला डॉक्टर करण्याच्या दृष्टीनं पावलं टाकली.अस्कुलअ‍ॅपअसचं देऊळ हीच गेलनचं वैद्यकशास्त्र शिकायची पहिली कर्मभूमी होती. सेतारस आणि रेफिनस हे दोघं डॉक्टर्स गेलनच्या आधी तिथे रुग्णांवर उपचार करायचे.त्यांच्या मागे मागे फिरत त्यांच्या कामाचं निरीक्षण करणं अशी गेलन आणि त्याच्या सहाध्यायांची शिकायची पद्धत असे.त्या वेळच्या काही उपचारपद्धती आज आपल्या अंगावर काटा आणतील अशा होत्या.उदाहरणार्थ,कुणाच्या अंगावर फोड आलेले असतील तर हंस पक्ष्यांच्या तीक्ष्ण चोची त्या फोडांवर ते फुटेपर्यंत जोरजोरात टोचवल्या जात! जखमा बऱ्या करण्यासाठी देवळातल्या कुत्र्यांना त्या चाटायला लावल्या जात.! आता डॉक्टरांच्या गळ्यात स्टेथोस्कोप असतो तसा त्या काळातल्या डॉक्टरांच्या गळ्यात पवित्र साप असायचा! त्यामुळेच आज एकमेकांना विळखा घातलेले दोन साप हे वैद्यकाची निशाणी म्हणून दाखवत असावेत.! आणि असं बरंच काही. एकूण तो काळच भीषण होता हे खरं!


सुरुवातीला त्यानं ग्लॅडिएटर्स म्हणजे मानवी योद्ध्यांचा सर्जन म्हणून काम केलं होतं.त्यांना झालेल्या दुखापती आणि जखमा यांच्यावर तो उपचार करायचा.त्यामुळेच त्याला मानवी शरीराच्या आतमध्ये काय असतं याचा अभ्यास करणं शक्य झालं.त्यामुळेच तो शरीरावरच्या जखमांना शरीराच्या आतमध्ये डोकावण्याच्या खिडक्या म्हणत असे! शिवाय जेव्हा जेव्हा त्याला संधी मिळेल तेव्हा त्यानं कुत्रे,माकड,मेंढी आणि इतरही अनेक प्राण्यांचं डिसेक्शन केलं होतं.त्यातून त्यानं झूऑलॉजीचा प्रचंड अभ्यास केला.त्यानं कोणत्याही प्राण्याच्या शरीरातले कोणते अवयव काय काम करतात याबद्दल त्यानं सखोल अभ्यास केला होता.त्यामुळेच आजही बायॉलॉजीच्या शास्त्रात आणि वैद्यकाच्या शास्त्रात गेलनचं नाव मोठ्या आदरानं घेतलं जातं.इतका की त्याच्या हातून कधी काही चूक होऊ शकते यावर पुढची अनेक शतकं कुणाचा विश्वासच बसत नव्हता! गेलन डुकरांच्या शरीराचा अभ्यास करून त्यावरून माणसांच्या शरीराविषयी अंदाज बांधे ! त्यासाठी वर्षातून एकदा तो आणि त्याचे विद्यार्थी एका मेलेल्या डुकराचं शरीरविच्छेदन करायचे. रोममधल्या धार्मिक प्रथेनुसार मृत माणसाचं शरीरविच्छेदन करणं निषिद्ध मानलं जात असल्यानं खरं म्हणजे गेलनकडे दुसरा पर्यायही नव्हता.पण डुकराचं आणि माणसाचं शरीर यांच्यात अनेक महत्त्वाचे फरक असतात,पण त्यामुळे डुकराच्या शरीरातल्या गुणधर्मांवरून माणसाच्या शरीराबद्दल निष्कर्ष काढणं म्हणजे अचाटच होतं.! त्यातून हे निष्कर्ष पडताळून बघायला हवेत.पण त्यासाठी माणसाचं शरीर आणणार कुठून? ते शक्य नसल्यानं मग गेलन त्याला जमतील तसे अंदाज बांधायचा.अर्थातच बरेचदा ते चुकीचेही असायचे!

दुसऱ्या शतकात,म्हणजे आजपासून २००० वर्षांपूर्वी गेलननं चार रोमन राज्यांच्या दरबारी वैद्य म्हणून सेवा केली.तलवारीचे वार,बाणामुळे झालेल्या जखमा आणि हिंस श्वापदांनी केलेले हल्ले,यांसारख्या घटना त्या काळी सतत घडायच्या.त्यावर तातडीनं उपचार करणं गरजेचं असे.ही जबाबदारी गेलनवर असे.त्यानं अनेक औषध आणि उपचारपद्धती शोधून काढल्या. पण गेलन हा वैद्यकशास्त्रातला ॲरिस्टॉटलच म्हटला पाहिजे.सुमारे १५०० वर्ष त्याचा शब्द त्याच्या नंतरची मंडळी प्रमाण मानणार होती! गेलनचा जन्म व्हायच्या सुमाराला रोमन लोकांनी युरोपमधला बराच भाग,आफ्रिकेतला काही भाग,मध्य पूर्वेकडचे देश आणि आशियातला काही प्रदेश या सगळ्यांवर आपला कब्जा केला होता.गेलनच्या काळात तो एकटाच डॉक्टर होता असं नाही,पण त्या काळात डॉक्टर्सना योग्य प्रशिक्षण कुठून मिळणार ? त्यामुळे बहुतेक सगळे डॉक्टर्स इतर डॉक्टर्सचं निरीक्षण करूनच या व्यवसायाची तंत्रं शिकायचे.तसंच आपण डॉक्टर आहोत अशी घोषणा केली की झालं, त्या माणसाला डॉक्टर मानलं जाई ! त्यासाठी अमुक अमुक पदवी किंवा अनुभव असावा अशी पात्रता चाचणीच नव्हती!थोडे दिवस हा धंदा करून बघायचा,चालला तर बरंच आहे,नाहीच चालला तर तो सोडून दुसरं काहीतरी करायचं अशी गंमत चाले! त्या काळातही आपल्याला आज होतात त्यांपैकी अनेक आजार आणि रोग व्हायचे.पण आजच्यासारखी आधुनिक उपचारपद्धती तेव्हा नव्हतीच. लसूण आणि मध हे अतिशय आरोग्यदायी पदार्थ मानले जायचे. जवळजवळ प्रत्येकजण लसूण नुसता किंवा भाजून खायचे.लोक लसणीचा रस प्यायचे, लसूण अंगाला चोळायचे आणि लसणीच्या माळा गळ्यात घालायचे!मधाचंही तेच.ते खायचे किंवा कुठेही लावायचे! [सजीव,अच्युत गोडबोले,अमृता देशपांडे,मधुश्री पब्लिकेशन]


डॉक्टरांना रोगांबद्दल अगदी बाळबोध माहिती असे.या सगळ्यामुळे माणसाचं शरीर कशाचं बनलं आहे,ते कसं चालतं,या सगळ्या गोष्टी अजून गुलदस्त्यातच होत्या.

माणसाच्या शरीरात काही आत्माबित्मा असतो की काय हे लोकांना कळत नव्हतं.त्यांना अनेक प्रश्न पडायचे. उदाहरणार्थ,माणसाच्या हृदयाचं काम नक्की काय असतं? माणूस कसा विचार करतो हे हृदयच ठरवतं का? का रक्त गरम करण्यासाठी हृदय म्हणजे माणसाच्या शरीरातली भट्टी होती का? रक्त कुठून येतं? किंबहुना रक्त बनण्याची सुरुवात कुठे होते? ते शरीरात एकीकडून दुसरीकडे कसं जातं ? रक्ताचे अनेक प्रकार असतात का? शरीरात हवा असते का? असते तर ती कुठे असते?ती रक्तवाहिन्यांमध्ये असते का? फुफ्फुसांचं काम काय असतं ? ते हृदय थंड ठेवायला मदत करतं का? यकृतामधल्या कुठल्या तरी भागामुळे आपण शूर बनतो का? आपली औदासीन्याची भावना आपल्या पोटाच्या केंद्रस्थानी एकवटलेली असते का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधायचा गेलननं विडाच उचलला होता.त्यानं शरीरशास्त्राचा अभ्यास केला, त्याविषयी खूप लिहिलं आणि शिकवलंही.पण मृत माणसाच्या शरीराचं विच्छेदन करणं हा त्या माणसाचा मृत्यूनंतर होणारा अपमानच आहे असं मानलं जाईल त्यामुळे मग गेलं वर बैल कुत्री माकडा आणि डुकरं यांच्या शहरांचा अभ्यास करून त्याचे आधारे माणसाच्या शरीरात बदल अंदाज बांधावे लागायचे त्यामुळे अर्थातच त्यात असंख्य चुका व्हायच्या.


.. अपुर्ण..



११/९/२३

साहित्याच्या तुलनात्मक अभ्यासाची स्पेनमधील आजची स्थिती - पाब्लो झांब्रानो / The Present State of Comparative Literature in Spain - Pablo Zambrano

तुलनात्मक साहित्याभ्यास ही पद्धत तिच्या अमेरिका,

फ्रान्स,जर्मनी या पूर्वापारच्या केंद्रांमध्ये शंकास्पद ठरत असताना पोर्तुगाल,मेक्सिको, अर्जेंटिना आणि स्पेन या दूरवरच्या परिघावरच्या देशांमध्ये तिच्यात मौलिक भर पडून तिचा पुनर्जन्म होतो आहे.मी खरं तर याला तिचा प्रथम जन्म म्हणेन.शंभर वर्षांपेक्षा जास्त काळ स्पेनमध्ये या संदर्भात खूप अज्ञान आणि अवहेलना होती.१९ व्या शतकाच्या उत्तराधीपासून तुलनात्मक साहित्याभ्यासात झालेल्या प्रगतीची स्पेनमध्ये कोणालाच कल्पना नव्हती.

याची कारणं स्पेनच्या इतिहासात आणि सामाजिक,

परिस्थितीत दडलेली आहेत.स्पॅनिश साम्राज्याच्या ऱ्हासकालात स्पेन उर्वरित जगापासून तुटत गेला.१९३६ ते १९३९ या काळातली यादवी आणि जनरल फ्रँकोची फॅसिस्ट राजवट इथपर्यंत हे तुटलेपण वाढतच गेलं.१९७५ मध्ये फ्रँकोचा मृत्यू झाल्यावर स्पेनमध्ये तुटलेपण संपून सांस्कृतिक पुनरुत्थानाला सुरुवात झाली.स्पेनचा जगाशी संवाद सुरू झाला आणि स्पेन EU मध्ये म्हणजे युरोपियन युनियनमध्ये सामील झालं.गेल्या वीस वर्षांच्या काळातला हा आंतरराष्ट्रीय आणि सांस्कृतिक संदर्भ लक्षात घेतला तर स्पेनमधल्या अलीकडच्या तुलनात्मक साहित्याभ्यासाच्या जोमदार प्रारंभाची संगती लागते.तिथे आता तुलनात्मक साहित्याभासात पदवी मिळविणाऱ्यांची संख्या वाढते आहे. Exemplaria : Revista International de Literatura Comparada अशासारखी या विषयाला वाहिलेली विद्यापीठीय नियतकालिकं निघत आहेत. SELGYC सारख्या संस्थांची सभासदसंख्या वाढते आहे.राष्ट्रीय स्तरावरच्या AEDEAN या साहित्यसंस्थेत तुलनाकारांचे विशेष गट नियुक्त होत आहेत.या संस्थांमध्ये आजपर्यंत फारसं खुलं वातावरण नव्हतं.अजूनही काही पारंपरिक,बंदिस्त वातावरणाच्या विभागांमधील अभ्यासकांच्या मनात या नव्या पद्धतीबद्दलच्या शंका घट्ट असल्या तरी व्यक्तिशः मला स्पेनमध्ये तुलनात्मक साहित्याभ्यास जोरकसपणे फुलणार याबद्दल शंका नाही. माझ्या या आशावादामागे भरभक्कम कारणं आहेत.दारिओ विल्येनूव्हा (University of Santiago de Compostela) सारखे अनेक अभ्यासक विद्वान स्पेनमध्ये तुलनात्मक स्वरूपाच्या सिद्धांतांच्या अभ्यासाला प्रोत्साहन देत आहेत.उदा.इझ्रेली विद्वान इतामार एवेन जोहर यांची बहुपद्धतती सिध्दांत (Polysystem Theory) किंवा जीगफ्रीड स्मिट् यांचा प्रयोगलक्ष्यी (empirial) अभ्यास. (Villanueva Avances en..... Teoria de la literatura,1994).या तात्त्विक अभ्यासाला जोड मिळते.ती वाढत्या संख्येने प्रसिद्ध होणाऱ्या पाठ्यपुस्तकांची आणि हस्तपुस्तिकांची.सध्या स्पॅनिश समाज स्वतःची ओळख पुनः पुनः तपासून पाहून निश्चित करण्याच्या प्रक्रियेत गुंतलेला आहे.आजपर्यंत बरेचदा आडबाजूला ढकलून दिलेला "कोहम्"चा प्रश्न आता ऐरणीवर आलेला आहे.स्पेनच्या इतिहासात प्रथमच भाषाबाहुल्य,संस्कृतीबाहुल्य आणि राष्ट्रकांचे बाहुल्य यांची सांगड घालण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे.गेली पाच शतकं स्पॅनिशमुळे नसलेल्या "इतर" लोकांच्या देशातील अस्तित्वाचा उच्चार आणि विचार झाला नव्हता. स्पेन हा देश निर्विवादपणे युरोपातील बहुसांस्कृतिक देशांपैकी एक देश आहे.त्यामुळे केवळ पारंपरिक तुलाभ्यासासाठीच नव्हे तर नवे सिद्धांत ताडून पाहण्यासाठीसुद्धा स्पेनची संस्कृती ही एक उपलब्धी आहे.स्पेनचे दक्षिण अमेरिकेतील प्रदीर्घ काळचे साम्राज्यवादी वसाहतवादी अस्तित्व आणि सध्याच्या युरोपातील त्याचं महत्त्वाचं स्थान यातून स्पेन हा युरो-अमेरिकन सांस्कृतिक संबंधांमध्ये महत्त्वाचा पूल बनतो.युरोपचे आर्थिक-राजकीय एकीकरण हे जोरकसपणे प्रत्यक्षात येऊ घातलं आहे ही बाब साहित्य आणि संस्कृतीच्या तुलनाकारांनी पुरेपूर वापरली पाहिजे.

स्पॅनिश अभ्यासकांनी याची सुरुवात केली आहे असं दिसतं.रोमेरो,वेगा आणि कार्बोनेल व गिलेन यांची अलीकडची प्रकाशनं या आशा भरल्या संदर्भात पाहिली पाहिजेत.हे ग्रंथ म्हणजे काही पूर्वप्रसिद्ध ग्रंथांची भाषांतरं आहेत.ही गोष्ट रोमेरोच्या बाबतीत सहज लक्षात येते;परंतु वेगा आणि कार्बोनेल जणू मूळ लेखक आहेत असं वाटतं. मात्र तरीही हे अभिजात निबंधाचे भाषांतरित संग्रह स्पॅनिश वाङ्मयाभ्यासात तुलनात्मक पद्धतीचं मोठं योगदान देतात.ते पाठ्यपुस्तकं म्हणून उपयुक्त आहेत.मात्र मलपृष्ठावर म्हटल्याप्रमाणे ह्या उपयुक्त हातपुस्तिका (manuals) नाहीत.


वेगा आणि कार्बोनेल यांच्या ग्रंथांची रचना तुलाभ्यासाचा तात्त्विक इतिहास म्हणून अगदी योग्य आहे.तीन मुख्य भागांमध्ये प्रातिनिधिक अशा खुद्द वेगा आणि कार्बोनेल यांनी अनुवाद केलेल्या संहिता आहेत.प्रत्येक भागाच्या सुरुवातीला थोडक्यात पण उपयुक्त असा त्या भागाचा परिचय करून देणारा लेख आहे. पहिला भाग ज्या जुन्या प्रमाणसूत्राना (Old paradigm) बराच अंमल गाजवला त्यांचं मूळ आणि त्यांची वाढ व प्रगती याला वाहिलेला आहे.त्यात क्रोचे टेक्स्ट,गेली,बाल्डेन स्पेर्गर,फान टीग्हेम इत्यादींचे निबंध आहेत.दुसरा भाग आहे तेच आणि त्याची नव्या प्रमाणसूत्राकडून उकल (Crisis and the New Paradigm ) वेलेक, रेमाक,फोकेमा रूपरेस्ट आणि लॉरे यांचे सकस निबंध या भागात येतात.तिसऱ्या भागात तुलाभ्यासातील अगदी अलीकडच्या दिशांची ओळख करून दिलेली आहे.यात शँतँ,शेवरिए,अ‍ॅक्रॉफ्ट,ग्रिफिथ,

टिफीन,निश्ची,स्नावडर, लान्सर,लफेव आणि झिपेत्नेक यांचे निबंध येतात. शेवटच्या भागात उपयुक्त अशी संदर्भसूची आहे.वेगा आणि कार्बोनेल यांच्या या ग्रंथाशी रोमेरोच्या ग्रंथाच्या बऱ्याच तारा जुळलेल्या होत्या.परंतु रोमेरोने प्रस्तावनेत म्हटल्यानुसार तिच्या ग्रंथाचा हेतू स्पॅनिश वाचकाला तुलाभ्यासाच्या आपल्या शतकाच्या शेवटी असलेल्या स्थितीचं दर्शन घडवणे हा आहे.या अपेक्षेने पाहिलं तर रोमेरोचा संग्रह हा वेगा आणि कार्बोनेल यांच्या पुस्तकाच्या तिसऱ्या भागाचा विस्तार आहे.रोमेरोचा ग्रंथही तीन प्रकरणात विभागलेला आहे.मात्र ही विभागणी कालक्रमानुसार न होता पद्धतीच्या सोयीनुसार झालेली आहे.पहिला विभाग प्रॉवर,मरीनो आणि बॅसनेट यांच्या सुपरिचित कल्पनांचा विस्तार करतो.दुसऱ्या विभागात क्युलर,रेमाक,स्विगर्स, फोकेमा,जिलेस्पी,क्युलर व झिपेत्नेक यांचा सिद्धांतन येतं."शिक्षणशास्त्रीय मुळे" (di- dactic orientations) या शीर्षकाच्या तिसऱ्या विभागात शेवरेल आणि फोकेमा यांचे निबंध आहेत.शेवटच्या भागात ग्रंथसूची आहे.या संग्रहाला एकच दूषण देता येईल.ते म्हणजे सर्व नसली तरी काही भाषांतरांची शैली आणि स्वर नको इतके "इंग्लिश" आहेत.रोमेरो व वेगा आणि कार्बोनेल ह्यांच्या या तुलनात्मक साहित्याभ्यासाच्या भाषांतरित लेखसंग्रहा

पाठोपाठ १९९८ मध्ये एक विलक्षण पुस्तक आलं.

क्लॉडिओ गिलेनचं Multiples Moradar (Barcelona,Tusquets १९९८). गिलेनचं खास कौशल्य म्हणजे तो वाचकाला सतत संहितेचा आनंद देत राहतो.या शतकातल्या फार महत्त्वाच्या तुलनाकारांपैकी एक असलेल्या गिलेनच्या कारकिर्दीचा समग्र आढावाच ह्या पुस्तकातून मिळू शकतो.हे सर्व निबंध पूर्वप्रसिद्ध असले तरी हा केवळ पूर्वप्रसिद्ध निबंधांचा संग्रह राहात नाही.सर्व निबंधांचे पुनर्लेखन करून विस्तृत स्पष्टीकरणेही जोडलेली असल्याने हा एकसंध,एकजीव असा प्रबंध झाला आहे."आपल्यात असलेल्या आणि आपल्याभोवती असलेल्या बहुलतेचा विचार कसा करावा ?" या प्रश्नाने गिलेनच्या प्रस्तावनेची सुरुवात होते.आपल्या ऐतिहासिक अनुभवांची परिणती एका जटिलतेत झालेली आहे; या जटिलतेचा अभ्यास ही Multiples Moradar समजून घेण्याची गुरुकिल्ली आहे.या ग्रंथाचे दोन भाग आहेत. "साहित्य आणि हद्दपारी", "साहित्य आणि निसर्गसृष्टी", "साहित्य आणि पत्ररूप लिखाण" "साहित्य आणि बीभत्सता" या चार उत्कृष्ट लेखांचा पहिल्या विभागात समावेश आहे.या लेखात कोणी आणखी काही भर घालू शकेल असे वाटत नाही.गोविंद,दान्ते,दु बेले, शेक्सपिअर इत्यादींच्या हद्दपारीचे अनुभव सांगत गिलेन शेवटी राफाऐल,आल्बर्ती आणि नोबेल विजेता युआन रामोन जिमेनेझ यांचे अनुभव नोंदवतो.गिलेनने इथे स्पॅनिश साहित्यावर फारसा भर दिलेला नसला तरी त्याचा स्वतःचा अनुभव तसाच आहे.स्पेनचं साहित्य हे हद्दपारीचं साहित्य आहे.विशेषतः १९३९च्या यादवीनंतरचं साहित्य देशाबाहेरच जन्मलं.या गोष्टीचं भान त्याला आहे. असं दिसतं.


व्यक्तिशः मला "साहित्य आणि निसर्गसृष्टी" हा निबंध फार लक्षणीय वाटला.Evgon आणि Parergon म्हणजे या दोन संकल्पना स्पष्ट करून विसाव्या शतकात साहित्य आणि चित्रकलेत निसर्गसृष्टीचं चित्रीकरण कसकसं होत गेलं याचा त्याने इथे वेध घेतलेला आहे. वर्डस्वर्थ आणि बोदले यांच्या निसर्गकवितांवरचे त्यांचे विचार मी आजवर वाचलेल्या विचारात सर्वोत्कृष्ट आहेत.परंतु वास्तववादाच्या चर्चेत फ्लोबेर आणि मादाम बोव्हरी पूर्णपणे गैरहजर आहेत.याची चुटपूट लागून राहते. फ्लोबेरच्या कादंबऱ्यांमधील निसर्गदर्शन आणि त्याची स्वच्छंदतावादी (Ro- mantic) सौंदर्यविचारावरील टीका यांच्यातील संबंधांबद्दल बरंच काही म्हणण्यासारखं आहे.त्याचप्रमाणे एमा आणि रोडोल्फ यांच्यातला प्रथम लैंगिक संबंध (भाग २ प्रकरण ९) आणि त्या गोष्टीचा कादंबरीतील तथाकथित वास्तववादी जीवनदर्शनावरचा परिणाम याबद्दलही बरंच काही म्हणता येईल."मादाम बोव्हरी" ही १९ व्या शतकातील महत्त्वाची कादंबरी मानली जाते. तेव्हा गिलेनच्या साक्षेपी नजरेने तिचा घेतलेला वेध ही वाचकाला एक आनंदाची पर्वणी झाली असती.त्याच्या साहित्य व बीभत्सतेच्या अभ्यासाबाबतही हेच म्हणता येईल.या संदर्भात सुद्धा फ्लोबेरची कादंबरी ही निश्चितच एक मैलाचा दगड आहे.दुसऱ्या भागात राष्ट्रीय साहित्य,साचेबंद राष्ट्रीय प्रतिमा आणि युरोप या विषयांवरचे तीन निबंध आहेत.हे निबंध जरी मुख्यत्वे ऐतिहासिक आढावा या स्वरूपाचे असले तरी समकालीन युरोप आणि स्पेनमध्ये जी राजकीय,सामाजिक आणि सांस्कृतिक खळबळ चालू आहे. तिच्यावरच गिलेनचं चिंतन-मनन इथे दिसून येते.मी याआधी म्हटल्याप्रमाणे एक सांस्कृतिक आणि राजकीय अस्तित्व असलेला स्वतंत्र समाज म्हणून स्पेन सध्या आपली पूर्वापार चालत आलेली ओळख पुनः पुनः तपासतो आहे आणि तिची फेरमांडणी करतो आहे.यात कॅटॅलोनियन,बास्क आणि गॅलिशियन ही राष्ट्रके एका बाजूला काही मागण्या करताहेत.तर नव्या प्रादेशिक चळवळी त्यावर त्याच प्रकारची प्रतिक्रिया देताहेत.ह्या कलहाचा स्पेनचे राष्ट्रीय साहित्य यासारख्या सुनिश्चित आणि प्रदीर्घ काळ चालत आलेल्या संकल्पनांवर परिणाम होतो आहे हे सांगायला नको.समाजाच्या काठावरील समूहांमध्ये राष्ट्रवादी जाणिवांची वाढ ही एका परीने आवश्यक आहे.त्यांचा नि:सारक परिणाम होईल आणि जुने साचे नष्ट होतील.

नव्या,खुल्या विचाराने साहित्याची नवी मानांकन यादी (Canon) तयार होऊ शकेल.मात्र इथे गिलेनने ज्या धोक्याची जाणीव करून दिली आहे,तो प्रांतीय संकुचित जाणिवांचा (Provincial rava ings) धोकाही लक्षात घेतला जावा.राजकारणी आणि काही बुद्धिजीवीसुद्धा खोट्या इतिहासावर आधारित नवे साचे तयार करून नव्या संकुचित राष्ट्रीय जाणिवा निर्माण करतील.( संगम तुलनात्मक साहित्य आणि सांस्कृतिक अभ्यास, जगातील निवडक निबंधाचे अनुवाद,संपादक,प्रा.डॉ.मनीषा आनंद पाटील,आनंद ग्रंथ सागर प्रकाशन,कोल्हापूर ) "बहुभाषिक समाज हा सुरुवातीला कमी बंदिस्त आणि कमी प्रांतिकतावादी असतो." या गिलेनच्या विधानावर (३२०) दुर्देवाने कृतकपवित्र राष्ट्र संकल्पना निर्माण करणाऱ्यांकडून शंका घेतली जात आहे.एड्गर मॉरीनचे "Penser I Europe" हे विधान स्मरून - जसं गिलेन नेहमी करतो तसं - मी म्हणेन की स्पेन पुनःश्च स्पॅनिश (पद्धतीने) विचार करत आहे.गिलेनचे पुस्तक आणि विचार सकारात्मक परिणाम घडवून आणतील अशी अशा आहे.या पुस्तकाच्या वाचनाने ज्याला चालना मिळेल अशा अनेक गोष्टी आहेत. Multiples Moradar प्रकाशित होणं ही मोठ्या महत्त्वाच्या सांस्कृतिक घटनांपैकी एक आहे असं मला प्रामाणिकपणे वाटतं.त्याच्याच Enter to uno y lo diverso.

Introduccion a la literatura comparada या पुस्तकाच्या बरोबरीने हे आंतरराष्ट्रीय परिणाम असलेलं अत्यावश्यक प्रकाशन आहे.तुलनात्मक साहित्याभ्यासात स्पेनमध्ये होऊ घातलेल्या शुभलक्षणी बदलांसाठी हा एक मजबूत आधार होईल.


(Romero, Vega and Carbonell, and Guillén Pablo Zambrano, University of Huelva, CLCWeb: Comparative Literature and Culture 1.2 (1999): <https://doi.org/10.7771 / 1481-4374.1039)


अनु : शर्मिष्ठा खेर