* विजय गायकवाड | Vijay Gaikawad

live

नमस्कार आपले स्वागत आहे. 'सगळे जण तुम्हाला शोधत येतील.आनंदाने तुडुंब भरलेली माणसे सर्वांनाच आवडतात! पण ते तुम्हाला दुःखी,उदास अशा अवस्थेत पाहू शकत नाहीत! तेव्हा आनंदी-हसतमुख रहा आणि मित्रांचा सहवास वाढवा! जर तुम्ही दुःखी राहिलात तर मात्र सगळे जण तुम्हाला सोडून जातील. जीवनातील आनंद-प्रसन्नता भरभरून वाटा! पण एकटे दुःखी रहाल, तर त्या दुःखातच बुडून जाल !' सॉलिट्यूड, ईला व्हीलर विलकॉक्स जगण्याच्या तयारीसाठी नव्हे तर,जगण्यासाठी माणूस जन्माला आला आहे,असं 'बोरिक पास्तरनाक' यांनी म्हटलेलं आहे.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! वाचन हे आहाराहून जास्त महत्त्वाचे असते.जिम र्‍होम यांनी अँथोनी रॉबीन्स यांना शिकवले होते की 'एक वेळ रोजचे जेवण चुकव,पण वाचन अजिबात चुकवू नको.' याप्रमाणे मी अखंडपणे वाचत आहे. माणसांपासून माणसांपर्यंत जाण्याचा,प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाण्याचा जीवनाचा राजमार्ग पुस्तकातून जातो. कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात. पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये. म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,कवी सचिन शिंदे,संतोष शेळके,अनिल फारणे,सहित प्रकाशन,डॉ.रवींद्र श्रावस्ती,डॉ.सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,संजय बापट,मनोहर सुर्वे,विनायक पाटील,संतोष पाटील,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, मेनन पिस्टन रिंग मधील सहकारी मित्र शेखर सुर्यवंशी..। पुस्तकातील घटना प्रसंग हे मी लिखित स्वरूपात सध्या व्हाट्सअप वरती टाकत असतो.हे सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी,पुस्तके देणारी लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत. ... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ. मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. विजय कृष्णात गायकवाड

१९/१/२४

आठवणीतील ‘दीप’स्तंभ.. The 'deep' pillar of memory..


" इतिहास ही असामान्य गोष्ट असते.पण जर तो खरा असेल तर ! - लिओ टॉलस्टॉय अशाच एका खऱ्या इतिहासाची गोष्ट…


मला अजून आठवतय मी हायस्कूलमध्ये शिकत असताना घरामध्ये आम्ही सर्वजण "शब्दांच्या भेंड्या "खेळत होतो, पासून दीपक माझी ताई म्हणाली,सरते शेवटी मी पप्पांना सहज म्हटलं माझं,नाव दीपक का ठेवलं पप्पा शिक्षक ते म्हणाले,


केलै वै मौर कार्य कहे संध्या रवी

सुनिया जगत रहे निरुत्तर

 माटीर प्रदवीप छिले छे कहिल स्वामी 

आमार हे टकू करिब ता अभि

गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांची बंगाली भाषेतील ही अतिशय सुंदर कविता या कवितेत गुरुदेव म्हणतात अस्ताला जाणारा सूर्य आपली जागा कोण घेणार हा प्रश्न विचारतो तेव्हा विनम्रपणे छोटीशी पणती म्हणते आपल्या परिने मी उजेड पसरवण्याचे काम करेन.


तो "दीप" तू बनाव म्हणून तुझे नाव "दीपक " ...

प्राथमिक शिक्षिका असलेल्या माझ्या आईने (श्रीमती रजनी शेटे) गणिताची आवड बालपणापासूनच लावली आणि तेव्हापासूनची मित्रांनो ....गणित विषय मला आवडू लागला.आईला मिळत असलेला गावातील मानसन्मान आणि वडिलांची प्रगल्भ विचारधारा,मला नेहमीच शिक्षक बनवण्यास प्रवृत करत होती.त्यातचं आजोबा,आई,वडील,भाऊ,मावशी, काका,बहिण,भाऊजी हे सर्वजण शिक्षक आमच्या सर्वांच्या रक्तातच शिक्षकी पेशा भिनलेला आहे.वंशावळच म्हणा हवं तर . 

चला तर मग शिक्षक बनवूया ...

आईसारखं आणि प्रगल्ब विचार ठेवू या  वडिलांसारखे आणि बनलो शिक्षक ...नव्या उमेदीने नव्या जोमाने गणित विषयाचा शिक्षक झालो खरा ...


पण गणिताची भीती वाटणारे विद्यार्थी .. नावडीचा विषय म्हणणारे विद्यार्थी ... 

मला जमत नाही आणि कळत नाही म्हणणारे विद्यार्थी ... काय आणि कसं करावं ..


"खरा गणिती हा उत्साह मुर्ती असला पाहिजे,

उत्साहाशिवाय गणित नाही."- नोव्हॅलिस 


मग नाविन्याचा शोध घेत विविध उपक्रम,वाचन,कृती,

प्रात्यक्षिक,कथा,गोष्टी,घटना, प्रशिक्षणे,क्लुप्त्याचा शोध इत्यादीची कास हाती घेतली आणि विद्यार्थ्यांना गणित विषय आवडीचा बनावा यासाठी प्रयत्न सुरू केले .

अकॅडमी महोत्सव,बेंचना लेखक कवी शास्त्रज्ञांची नावे,

भूमिती आकृत्यांना आपली नावे,गणित कोश,गणित शुद्धलेखन स्पर्धा,कौन बनेगा गणित चॅम्पियन,गणित प्रश्नमंजुषा इत्यादी उपक्रमांची निर्मिती झाली.शालेय स्तरावर विविध उपक्रम राबवण्यासाठी संस्था अध्यक्ष डी.एस . घुगरे सचिव एम ए .परीट यांचे प्रोत्साहन मिळाले.गणित विषयात जास्तीत जास्त उपक्रम राबवल्याबद्दल 'महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्ड ' मध्ये माझी नोंदही झाली.या सर्वांचे फलित म्हणून आज अखेर २३ वर्ष गणित विषयाचा शालांत परीक्षेचा शाळेचा निकाल शंभर टक्के आहे.गणिताचे अध्ययन आणि अध्यापन करत असताना गणित विषय विद्यार्थ्यांना आवडावा यासाठी  विविध क्लुप्त्यांचा वापर  करत होतो.

एक माजी विद्यार्थी अचानक मला भेटला काय करतोस म्हणल्यावर स्पर्धा परीक्षेची तयारी करतोय असं तो म्हणाला,सर तुम्ही शाळेमध्ये शिकवताना वापरलेल्या क्लुप्त्याचा मला फार उपयोग होतो असं तो सहज म्हणून गेला.कॉलेज संपल्यावर मुले विविध स्पर्धा परीक्षा करिता जादाचे तास लावतात.आपल्या शालेय मुलांना आपण विविध स्पर्धेतील विविध गणितीय क्लुप्त्या समजावल्या तर त्यांचं भविष्य उज्वल होईल या भावनेतून वैदिक गणितावर आधारित 'अंकवेल' या पहिल्या पुस्तकाचा जन्म झाला.महाराष्ट्र राज्य गणित महामंडळाच्या गोंदिया येथील अधिवेशनात त्यावेळचे केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांच्या शुभहस्ते प्रकाशन झाले व उत्कृष्ट पुस्तकाबद्दल माझा लेखक म्हणून सन्मान केला व माझ्या लेखनाला एक वेगळीच उभारी मिळाली.गणित नियम व सूत्रे,मॅथेमॅटिक्स रूल्स अँड फॉर्मुलास,गणित कोश,गणित शुद्धलेखन इत्यादी पुस्तकांचे लेखन माझ्याकडून झाले.मुलांचे मोबाईल वेड जाणून घेऊन  'क्यू आर ' कोडच्या मदतीने दहावीची पुस्तक एका पानात ... केले तर सुमारे अडीच हजार तासांचे व्हिडिओ असणारे एलईडी पुस्तकाची निर्मिती ही माझ्या हातून झाली.देशात हा बहुदा पहिलाच प्रयोग असावा.राष्ट्रीय गणित दिनानिमित्त एका पत्रकाराने मला प्रश्न विचारला ,

उद्या आहे गणिताचा पेपर पोटात माझ्याकडे येऊन देखील कार्य ढोपर . ..

 सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल का 

अशी विद्यार्थ्यांची आणि माझी ही स्थिती आजअखेर आहे आपण काय वेगळं करणार आहात?माझ्या तोडून सहजच गेलं."प्रात्यक्षिकावर भर देणारे गणित"

आणि जन्म झाला ॥ गणितायन ॥ 

डीएम लॅब चा ...मापनातून गणिताचा जन्म झाला खरा पण मापनाचा इतिहास मुलांना माहिती आहे का तो समजला तर गणिताचे मूळ समजेल....

पायली,अडीशेर,मापटे,कोळवे,नेळवे इत्यादी मापे लहानपणी पाहिली होती.आज कुठे आहेत ? चला तर शोध घेऊया ... आणि संग्रह करूया …


सुमारे १४ वर्षे शाळेच्या (दीपावली व उन्हाळी सुट्टी ) सुट्टीच्या कालावधीमध्ये कोणतीही रजा न घेता देशातील कन्याकुमारी,राजस्थान,मध्य प्रदेश,महाराष्ट्र,कर्नाटक,

दिल्ली,उत्तर प्रदेश इत्यादी ठिकाणी जाऊन वेगवेगळ्या मापनाचा संग्रह आज अखेर करत आहे.


[ प्रसंग -  उद्या दिवाळी पाडवा आहे तरी तुम्ही जुने मापनाचे साहित्य शोधण्यासाठी मुंबईला  चाललात ... माझ्या पत्नीच्या डोळ्यातील पाणी आजही मला या लेखाच्या निमित्ताने समोर दिसत आहेत.]


स्वखर्चाची सुमारे तब्बल ३५ लाख रुपयाची स्व:घरी तयार केलेली गणित लॅब आज महाराष्ट्राचे वेगळेपण ठरत आहे.साडेतीनशे वर्षांपूर्वीची विविध मापे, ब्रिटिशकालीन विविध राजाची वजने व मापे, विविध देशांच्या मोजमापनातील पट्ट्या, (scales [जर्मनी,अमेरिका,

इंग्लंड,भारत,डेनमार्क इ .] ,वाळूचे घड्याळ,सावलीचे घड्याळ (अमेरीका),तसेच विविध कंपन्यांची विविध देशाची सुमारे ३०० घड्याळे,१०० वर्षांचे पितळी कॅलेंडर,मोजमापनाचे रंगीत २७५ तक्ते,विविध देशातील पाउंड व किलोचे तराजू,एका विशिष्ट व आवडत्या अंकांच्या नोटांचा संग्रह,विविध देशातील नोटा,दुर्मिळ नाण्यांचा संग्रह,विविध देशातील पेन्सिल्स व पेन,दगडी पाटी,१८९८ चे गणित पुस्तकासह अत्यंत गणित दुर्मिळ पुस्तकांचा संग्रह,याचबरोबर महात्मा गांधी व विविध देशातील पोस्ट तिकिटे व फर्स्ट डे कव्हर्स (६५००),दोन किलोमीटरच्या अक्षर दिसणारे दुर्मिळ दुर्बीण व विविध आकाराच्या वेगवेगळ्या देशांच्यातील दुर्बिनस व इतर विविध दुर्मिळ साहित्याचा संग्रह आहे.


गुंजा पासून २०० तोळ्यापर्यंतची मापे,पायली पासून छटाक पर्यंतची मापे,विविध घड्याळे,नाणी नोटांचा संग्रह,विविध देशातील पोस्ट तिकिटे,एक आण्यापासून पाच हजार रुपये पर्यंतचे स्टॅम्प,विविध तराजू, विविध देशातील पट्ट्या,यांच्या विषयीचा इतिहास ऐकताना व प्रत्यक्ष अनुभव घेताना तब्बल पाच तास कधी गेले कळलंच नाही. - माननीय श्री .डी एस पवार (अध्यक्ष,एस.एस.सी बोर्ड कोल्हापूर ) 


न पाहिलेली मापे ..त्यांचा प्रत्यक्ष अनुभव विद्यार्थी व शिक्षक  घेतलेले पहाताना ...भटकंती केलेल्या चे सार्थक झाल्याचे वाटते.


 ३५ लाखात सुमारे ७० तोळे सोने घालून मिरवता आलं असतं पण माझी सहचरणी सौ. सुजाता शेटे हिने माझ्या वेडेपणातच धन्यता मानली हेही माझ्यासाठी नवलच आहे.तिचा हा त्याग माझ्या एवढाच मोलाचा आहे ही मी प्रांजळपणे मान्य करतो.


गणितायन ही ओळख फक्त कोल्हापूर पर्यंत न राहता राज्यभर होत आहे याचा सार्थ अभिमान मला वाटत आहे.सुमारे १५००० संशोधक, प्राध्यापक,गणित अभ्यासक,अधिकारी,पालक, विद्यार्थीनी आज अखेर त्याचा लाभ घेतल्याचा मला आनंद होत आहे.ही सेवा विनामूल्य आहे ती फक्त गणित प्रेमापोटी ...


विविध व्याख्याने प्रशिक्षणे,समीक्षण,मार्गदर्शन या कालावधीमध्ये मी घेतली व दिली.स्टार अकॅडमी ची स्थापना करून शिक्षणातील तारे शोधण्याचा अथक प्रयत्न करत विविध पुरस्काराने त्यांना सन्मानित करीत आहे.माजी चेअरमन,विद्यमान संचालक - करवीर आणि हातकणंगले तालुका शिक्षक सेवक सहकारी पतसंस्था,

जिल्हा कार्याध्यक्ष - शिक्षक सेना, जिल्हाध्यक्ष -अंधश्रद्धा निर्मूलन  व वैज्ञानिक दृष्टिकोन समिती,कोल्हापुर,उपाध्यक्ष - मनीष शिक्षण प्रसारक मंडळ इत्यादी पदावर काम करताना त्यांनाही न्याय देण्याचे काम माझ्यातून होत आहे

एम.एस.सी,बी.एड या शिक्षणावर  शिक्षक असणारा मी पीएचडी,एम ए (एज्युकेशन) डीसीपी,डीएसएम,

पत्रकारिता इत्यादी कोर्सही या कालावधीत पूर्ण केले.


राष्ट्रीय १३६ इतर पुरस्काराने सामाजिक संस्थांनी केलेला सन्मान,टीव्ही चॅनलवरील बातम्या व मुलाखती,

रेडिओवरील मुलाखती व वेळोवेळी वर्तमानपत्रातून आलेल्या बातम्या माझ्या कार्याची प्रतिबिंब दर्शवत

आहेत.


कोण सूर्य बनतं

कोण मशाल बनतं

मी फक्त

वडिलांच्या आशेची पणती बनूनी नकळत प्रकाश देत आहे ... 

"दीप" तेवत ठेवण्याचा प्रयत्न करीत आहे.


डॉ दिपक मधुकर शेटे.

महाराष्ट्र शासन राज्य गौरव पुरस्कार २०२२

सहाय्यक शिक्षक आदर्श विद्यानिकेतन अँड ज्युनिअर कॉलेज मिणचे.


इतिहास शोधायला निघालो की इतिहास जवळच सापडतो...!

१७/१/२४

दगड गिळणारे समुद्री वाघ Stone-swallowing sea tigers

दक्षिण अमेरिकेत समुद्री वाघांची एक विशिष्ट जात आहे.हे वाघ जंगलांमध्ये राहतात.या वाघांचे वैशिष्ट्य असं असतं,की पाणबुड्यांप्रमाणे समुद्राच्या तळाशी जाऊन ते माशांची शिकार करतात आणि ते खातात!या विशिष्ट जातीच्या जंगलात राहणाऱ्या वाघांच्या पोटामध्ये साधारणपणे प्रवाळासारख्या काही दगडगोट्यांचा साठा असतो! समुद्रतळाशी जाणारा पाणबुड्या पाण्याखाली विनासायास जाता यावं म्हणून आपल्या पाठीवर ज्याप्रमाणे एक खास प्रकारची वजनपेटी बांधतो,

त्याप्रमाणे या समुद्री वाघांच्या पोटातले दगडगोटे त्यांना समुद्राच्या पाण्यात तळाशी डुब्या मारण्याच्या दृष्टीने उपयोगी पडतात.समुद्रतळाशी सहजतेनं जाता यावं म्हणून हे समुद्री वाघ मुद्दामच प्रवाळाचे दगडगोटे गिळतात;आणि आपल्या पोटामध्ये त्याचा साठा करून ठेवतात.जंगलात राहणाऱ्या समुद्री वाघांनी गिळलेले दगडगोटे त्यांना अपायकारक ठरत नाहीत;परंतु प्राणिसंग्रहालयात बंदिस्त केलेल्या समुद्री वाघांसाठी ही सवय घातक ठरते.


एका इंग्लिश सफारी पार्कमध्ये ओटो नावाचा एक समुद्री वाघ होता.एकदा त्याची भूकच एकदम खूप कमी झाली.एकदोन मासळ्या खाल्ल्या,की त्याचं पोट भरू लागलं;पण थोड्याच वेळानंतर त्याची भूक अशी काही उफाळून यायची,की जणूकाही त्यानं 'चायनीज डिनर' घेतलेलं असावं! त्या वाघाची निगा राखणाऱ्यांनी त्याला भूक न लागण्याबद्दल फारशी काळजी केली नाही.कारण त्या वाघाचं वजन चांगलं वाढत होतं ! पण पुढे एक दिवस ओटो अचानक मरण पावला.!


ओटो अचानक कशामुळं मरण पावला,हे शोधून काढण्यासाठी त्याची शवपरीक्षा करण्याकरता मला बोलावण्यात आलं.त्याच्या पोटाचं विच्छेदन करणं जरूरी आहे,असं मला दिसून आलं. कारण त्याच्या पोटाचा भाग फुगीर दिसत होता. म्हणून मग मी त्याच्या पोटावर शवविच्छेदनाच्या तीक्ष्ण सुरीनं आडवा छेद घेतला.त्याच्या पोटाची बाह्य त्वचा मी उघडली आणि आत पाहिलं.मात्र मी आश्चर्यानं चाटच पडलो !


समुद्री वाघाचं पोट सामान्यतः माणसाच्या पोटाएवढंच असतं;परंतु ओटोच्या पोटाचा विस्तार एका बाजूला त्याच्या हृदयापर्यंत तर दुसऱ्या टोकाला थेट गुद्द्वारापर्यंतच्या आतड्यापर्यंत इतका विलक्षण पसरलेला,होता! वरच्या त्वचेखालच्या त्याच्या अंतरत्वचेचं आवरण ताणल्यासारखं दिसत होतं.अंतरत्वचेचं पोटाचं हे आवरण इतकं विलक्षण ताणलं गेलं होतं,की ते जवळजवळ एखाद्या पातळ कागदासारखंच दिसत होतं!त्या अंतरत्वचेचा मी जेव्हा छेद घेतला तेव्हा मला आश्चर्याचा दुसरा धक्का बसला.त्याच्या पोटामधून प्रवाळाचे शेकडो लहान-मोठे दगड निघाले! त्या दगडांनी त्याच्या पोटाची सगळी पोकळी पूर्णपणे व्यापून टाकली होती.त्याच्या पोटातले ते दगड-खड़े मी बाहेर काढले,तेव्हा त्याची रास झाली.किती दगड त्याच्या पोटातून निघाले असतील?चार लिटर मापाच्या तीन बादल्या भरतील एवढे दगड त्याच्या पोटातून निघाले! त्या दगडांचं वजन जवळजवळ पंधरा किलो भरलं!


ज्या हौदात ओटोला ठेवलेलं होतं,त्या हौदाच्या तळाशी समुद्रतळासारखं वातावरण निर्माण व्हावं म्हणून प्रवाळाच्या खड्यांचं आच्छादन घातलेलं होतं.ओटोनं आपल्या नैसर्गिक प्रवृत्तीनुसार ते दगड-खडे गिळले होते;पण ते प्रमाणाबाहेर त्याच्या पोटात गेले होत;आणि म्हणूनच पोटामधल्या कोमल त्वचेवर आणि आतड्यांमध्ये प्रचंड ताण निर्माण झाल्यामुळे ओटोचा मृत्यू ओढवला होता.त्या पार्कमधल्या इतर समुद्री वाघांकडे मी आपलं लक्ष वळवलं.ते सगळे तसे तंदुरुस्त दिसत होते,तरीपण त्यांची निगा राखणाऱ्या प्रशिक्षकाला मी विचारलं,'इतर समुद्री वाघांच्या तब्येतीमध्ये तर काही गडबड नाहीयना?'


'नाहीतर !' भुवया अकुंचित करत तो मला म्हणाला,'फक्त एक मिमी नावाची मादी सोडली, तर इतर वाघांच्या तब्येतीमध्ये काही गडबड नाहीये.मात्र मिमीची अवस्थाही अलीकडे ओटोसारखीच झालीय बघा! हल्ली तिची भूक मंदावलीय!' मी त्याला मिमीला बोलवण्यास सांगितलं.

तलावाच्या प्रदर्शनमंचावर मिमी इतर समुद्री वाघांबरोबर बसली होती.प्रशिक्षकाने तिला हाक मारताच ती मंचावरून हळूहळू उतरून खाली आली.प्रथम ती एका बाजूला ठेवलेल्या माशांच्या बादलीकडे गेली.ती जेव्हा आमच्या जवळून बादलीकडे गेली,तेव्हा वाळूचे, प्रवाळाचे खडे असेल्या समुद्रकिनाऱ्यावर लाट येऊन आदळते तेव्हा जसा आवाज होतो,तसा आवाज तिच्या पोटातून मला स्पष्ट ऐकू आला. माशांच्या बादलीकडे जाऊन बादलीतले मासे मिमीने फक्त ढंगले आणि ती वळली.तेव्हा मग प्रशिक्षकानं तिला जवळ बोलावलं.सुस्त नि हलके-हलके पावलं टाकत ती आमच्याजवळ आली.प्रशिक्षकाच्या मदतीनं मी प्रथम मिमीशी दोस्ती जुळवली.तिच्या डोक्यावरून,अंगावरून प्रेमानं हात फिरवला,तिला थोपटलं.तशी अगदी गरीब वाघीण होती.मग मी अगदी हळूच तिच्या पोटावरून हात फिरवण्यास नि ते हलकेहलके चाचपण्यास सुरुवात केली.मी तसं केलं तेव्हा काचेच्या गोट्या असलेल्या पिशवीमध्ये हात घातल्यावर त्या गोट्यांचा जसा आवाज येतो, तसा काहीसा आवाज ऐकू आला.मिमीच्या पोटातही प्रवाळाचे खडे भरलेले होते,हे उघडच होतं! मी ताबडतोब मिमीच्या पोटावर ऑपरेशन करण्याचा निर्णय घेतला.


त्याप्रमाणे मिमीला बेशुद्ध करून मी तिच्या पोटावर शस्त्रक्रिया केली आणि एकएक करून तिच्या पोटामधून मी एकशे चोवीस दगड काढले! त्या सगळ्या दगडांचं मिळून एकूण वजन सात किलोपेक्षाही थोडं जास्त भरलं! तिच्या पोटामधले सगळे दगड काढून टाकल्यानंतर पोटातल्या जखमेवर टाके घालून मी ती शिवून टाकली.

इतर समुद्री वाघांच्या बाबतीतही अशी दुर्घटना घडू नये म्हणून त्यांच्या हौदांच्या तळाशी असलेले प्रवाळाचे खडे-दगड यांचा थर काढून टाकण्याच्या सूचना मी तिथल्या व्यवस्थापकांना दिल्या.माझ्या सूचना त्यांनी ताबडतोब अमलात आणल्या.ऑपरेशननंतर काही दिवसांतच मिनी पूर्णपणे तंदुरुस्त झाली. तिला पहिल्याप्रमाणेच भूक लागू लागली;आणि ती पूर्ववत उत्साहानं वावरू लागली.


कित्येकदा दुसरे काही प्राणीसुद्धा अवाच्या सव्वा खाणं खातात.खातात कसले चक्क हादडतातच! काही काही वेळा काही प्राणी काही विचित्र वस्तू गिळून टाकतात.

त्यामुळे कधी अनवस्था प्रसंग ओढवतो,तर कधी आश्चर्यकारक रीतीनं त्या प्राण्याला काहीच होत नाही! तुमचा विश्वास बसणार नाही,परंतु बेलव्हयूमधल्या एका हत्तीनं एकदा चक्क एक छत्रीच गिळून टाकली होती! पण ती छत्री यथावकाश नैसर्गिक वाटेनं बाहेर पडली आणि त्या हत्तीला काहीही इजा झाली नाही! याउलट क्लीथॉर्पस् इथल्या एका मोठ्या आणि वृद्ध सील माशानं एकदा चुकून एक लोकरी जाकीट गिळलं होतं,पण ते त्याच्या घशातच अडकलं आणि त्यामुळं गुदमरून,श्वास अडून त्याला मृत्यू आला.आता आधुनिक विज्ञानानं एवढी आघाडी मारली आहे की,प्राण्यांनी गिळलेल्या वस्तू त्यांच्या पोटातून बाहेर काढण्याकरता ऑपरेशन करण्याची जरूर पडत नाही.या कामाकरता हल्ली आम्ही जास्त करून गॅस्ट्रोस्कोप नावाचं एक विलक्षण यंत्र उपयोगात आणतो.या यंत्राची नळी प्राण्यांच्या तोंडामधून घशातून थेट त्याच्या पोटापर्यंत पोचवता येते;आणि मग त्याद्वारे आश्चर्यजनक उपचार करून त्या प्राण्यानं गिळलेली वस्तू या उपकरणाच्या साहाय्यानं बाहेर काढता येते! या उपकरणाच्या नळीच्या अग्रभागी एक छोटासा दिवा असतो.त्यामुळे त्याची लवचिक नळी प्राण्याच्या घशामधून पोटापर्यंत सरकवल्यानंतर उपकरणाच्या बाह्य भागात असलेल्या एका दुर्बिणीच्या लेन्समधून प्राण्याच्या पोटातला अंतर्भागही पाहता येतो. उपकरणाच्या अग्रभागी असलेला दिवा प्रकाश फेकतो व त्यामुळे प्राण्याच्या शरीरातला कोणताही अंतर्गत भाग स्पष्टपणे दिसू शकतो. या उपकरणाच्या नळीमधून प्राण्याच्या पोटामध्ये पाण्याचे हलके फवारे मारता येतात आणि जरूर तो भाग धुऊन काढता येतो.त्याचबरोबर या उपकरणाच्या नळीच्या अग्रभागी एक 'फुगा नलिका' असते.उपकरणाचा अग्रभाग प्राण्याच्या शरीरात पोचवल्यानंतर उपकरणाच्या बाहेर असलेल्या एका नॉझलमधून हवा फुंकून या 'फुगा नलिकेचा' फुगा फुगवता येतो आणि त्याद्वारे प्राण्याच्या शरीरांतर्गत असलेले भाग 'चाचपून' पाहता येतात,विविध अवयवांची तपासणी करता येते.या उपकरणाच्या बाह्य भागावर असलेल्या 'नेत्रक- लेन्स'मुळं प्राण्याच्या शरीराचा कोणताही भाग मोठा होऊन सुस्पष्टपणे दिसू शकतो.

थोडक्यात या यंत्रामुळं प्राण्याच्या शरीरामध्ये 'डोकावता' येतं.इतकंच नव्हे तर या यंत्राच्या उपयोगानं प्राण्याच्या पोटात कोणत्याही ठिकाणी होणारा रक्तस्राव थांबवता येऊ शकतो.बायोप्सी (जीवोती परीक्षा) साठी दूषित भागातल्या पेशी काढून बाहेर आणता येतात;आणि आत अडकलेल्या कोणत्याच्या वस्तूवर पकड जमवून ती बाहेर काढता येते! या यंत्राचे इतके विविध उपयोग आहेत.


अगदी सुरुवातीसुरुवातीला आम्ही ज्या प्राण्यांवर या अजब उपकरणाचा उपयोग केला त्यामध्ये ब्रांडी नावाच्या एका डॉल्फिन माशाचा समावेश होता! या माशाची केस जरा अवघड नि विचित्रच होती.पाल्मानोवा, माजोर्कामधल्या मरीनलँड इथल्या डॉल्फिनेरियममधल्या मत्स्यक्रीडापटूं मधला ब्रांडी हा डॉल्फिन मासा तर सुपरस्टारच होता. पाण्यात व्हॉलीबॉल खेळणं,रबरी रिंगा फेकीचा खेळ खेळणं,मोठ्या रबरी कड्यांमधून आरपार उड्या मारणं असे विविध खेळ हा मासा फार चित्ताकर्षक पद्धतीनं सादर करत असे. सामान्यतः डॉल्फिन मासा हा जात्याच अतिशय बुद्धिमान असतो.त्याच्या जोडीलाच खेळकरपणाचा गुणही निसर्गानं त्याला बहाल केलेला असल्यानं तो शिकवलेली कोणतीही गोष्ट चटकन शिकतो;पण ब्रांडी डॉल्फिन माशाची बुद्धिमत्ता फार असामान्य होती.साहजिकच इतर सर्व माशांमध्ये तो अधिक क्रीडानिपुण ठरला होता;पण खेळताखेळता या माशानं एकदा पंधरा सेंटीमीटर व्यासाचं प्लॅस्टिकचं खेळाचं एक कडं चुकून गिळलं! या कड्यानं तो एक विशिष्ट खेळ दाखवत असे,तर हे कडं त्याच्या पोटात गेलं.सुरुवातीसुरुवातीला तर ब्रांडी नेहमीप्रमाणे खात- पीत राहिला आणि आपलं क्रीडानैपुण्य सादर करत राहिला.त्याच्या पोटात गेलेलं ते कडं,नरम,मुलायम प्लॅस्टिकचं होतं;परंतु हळूहळू ब्रांडीच्या पोटातल्या तीव्र आम्लपाचक रसामुळे हे मऊ नरम कडं कडक बनत गेलं.ते कडक बनल्यावर त्याच्या आतड्यात एका ठिकाणी रुतून बसलं. साहजिकच ते त्याला खुपू लागलं.त्याचं पोट दुखू लागलं.त्याला भूक लागेनाशी झाली;आणि त्याच्या क्रीडानैपुण्यात अनियमितता आली. नेहमी उत्साहानं खेळणारा ब्रांडी आता सुस्तपणे तलावामध्ये पडून राहू लागला.या माशाचं काहीतरी बिघडलंय हे त्याच्या ट्रेनरच्या ध्यानात आलं आणि त्यानं लगेच आम्हाला बोलावणं पाठवलं.अँड्र्यू ग्रीनवूड आणि डेव्हिड वाईल्ड हे दोघं मरीनलॅण्डमधल्या डॉल्फिनेरियममध्ये पोहोचल्यानंतर ब्रांडीला ताबडतोब तलावातून बाहेर काढण्यात आलं.अँड्र्यूनं ब्रांडीचा जबडा उघडला;आणि जेलीनं गुळगुळीत केलेली गॅस्ट्रोस्कोपची नळी त्याच्या घशातून आत सरकवली.यंत्राची नळी हळूहळू आत सरकत त्याच्या पोटापर्यंत पोहोचली.तेव्हा डेव्हिड वाईल्डनं नेत्रकभिंगाला डोळा लावला.त्याला ब्रांडीच्या पोटाचा अंतर्भाग दिसू लागला;पण त्याच्या पोटातल्या पाचकरसामुळे नळीच्या तोंडाला असलेलं भिंग धूसर बनलं,तेव्हा पाण्याचा स्प्रे सोडून वाईल्डनं ते स्वच्छ करून घेतलं.गॅस्ट्रोस्कोपमुळे त्याला ब्रांडीच्या पोटातला सगळा भाग स्पष्ट दिसू लागला.सूज आल्यामुळे त्याच्या पोटातल्या अंतरत्वचेचा भाग गॅस्ट्रोस्कोपच्या नळीच्या अगदी निकट आला होता.लवकरच पोटाच्या एका आतल्या भिंतीमध्ये त्या कड्यामुळे झालेली पहिली जखम वाईल्डला दिसली.त्याने नळी आणखी थोडी पुढे सरकवली आणि तिचा अग्रभाग पुन्हा चारी बाजूला फिरवला.तेव्हा एका ठिकाणी त्याला काळ्या रक्ताच्या गुठळ्या दिसल्या.त्यातलं बरचसं रक्त ब्रांडीनं पचवलं होतं.त्या (प्राणिमित्रांच्या जगात,विजय देवधर)

गुठळ्यांमध्ये वाईल्डला ब्रांडीच्या पोटात गेलेलं प्लॅस्टिकचं ते कडं दिसलं.चयापचय क्रियेमुळे ते कडं पोटाच्या अंतरत्वचेमध्ये घासलं जात होतं; आणि त्यामुळे तिथे जखमा होऊन रक्तस्राव होत होता.ते कडं नेमकं कुठं आहे हे कळल्यानंतर वाईल्डनं ग्रॅस्ट्रोस्कोपची नळी बाहेर काढून घेतली.नंतर मग त्या नळीच्या टोकाला तारेचा एक विशिष्ट हुक लावून ती नळी त्यानं पुन्हा ब्रांडीच्या पोटात सारली.

नेत्रकभिंगाला लावून नळीला लावलेला तारेचा हुक त्यानं मोठ्या कौशल्यानं त्या कड्यापाशी पोहोचवला आणि तो त्या कड्यात अचूक अडकवला कडं हुकामध्ये पक्कं अडकल्यानंतर मग त्यानं गॅस्ट्रोस्कोपची लवचिक नळी हळूहळू बाहेर ओढून घेण्यास सुरुवात केली.प्लॅस्टिकचं ते कडं घशापर्यंत येताच ब्रैडीनं ते नैसर्गिक प्रेरणेनं बाहेर ओकून टाकलं.ते कडं बाहेर पडताच ब्रांडीला एकदम बरं वाटू लागलं.ब्रांडीच्या पोटामधल्या आम्लामुळे ते कडं चांगलंच कडक झालं होतं.त्याचा परीघ धारधार बनला होता आणि त्यामुळेच ब्रांडीच्या पोटात जखमा झाल्या होत्या.औषधांमुळे आणि विशेषतः पचनाच्या त्या गोळ्यांमुळे ब्रांडीच्या पोटातल्या जखमा बऱ्या झाल्या आणि लवकरच तो खडखडीत बरा होऊन पूर्ववत् आपलं क्रीडानैपुण्य दाखवू लागला. त्याच्यामध्ये परत पूर्वीचा उत्साह आला आणि तो अगदी तंदुरुस्त बनला.आता जेव्हा केव्हाही एखाद्या प्राण्याची भूक कमी झाल्याची बातमी आम्हाला मिळते, तेव्हा आम्ही गॅस्ट्रोस्कोप हे उपकरण आमच्याबरोबर नेहमी नेतो.कारण प्राण्यांनी गिळलेल्या काही वस्तूंमुळेच त्यांची सामान्यतः अशा प्रकारची तक्रार सुरू झालेली असते.


१५/१/२४

बिबट्यांच्या पिल्लांचं पुनर्मिलन Reunion of Leopard Cubs

▶ एके दिवशी अचानक पुण्याचे उपवनसंरक्षक सत्यजित गुजर यांचा फोन आला."वाघोली गावाजवळ बिबट्याची दोन पिल्लं आईपासून दुरावली आहेत आणि त्यांना आपल्या मदतीची गरज आहे.लवकरात लवकर ऑफिसला ये." तसाच तडक गणेश खिंडीतल्या वन विभागाच्या कार्यालयात गेलो.सहाय्यक वनसंरक्षक मधुकर तेलंग माझीच वाट पाहत होते.सत्यजितने माझ्यासाठी छानसा लेमन टी मागवला.तो स्वादिष्ट चहा पिऊन मी आणि तेलंगसाहेब त्यांच्या शासकीय सुमोने मोहिमेवर निघालो. पुणे-नगर रोडवर नेहमीप्रमाणेच प्रचंड ट्रॅफिक होतं.त्यामुळे वाघोलीला पोचायला आम्हाला खूप वेळ लागला.तिथून केसनंद फाट्यावर उजवीकडे वळून न्हावी सांडस नावाच्या छोट्या गावात पोहोचलो.

जागोजागी प्रचंड प्रमाणात उसाची शेती दिसत होती.

गेल्या अनेक वर्षांमध्ये इथल्या शेतकऱ्यांनी ज्वारी-बाजरीची पारंपरिक शेती सोडून पैशांच्या आशेने उसाची लागवड केली होती.उसाचं उत्पन्नही चांगलं येत होतं.पण अलीकडच्या काळात जुन्नर आणि भीमाशंकरच्या जंगलांतल्या बिबट्यांनी इथल्या उसाच्या शेतांमध्ये बस्तान बसवायला सुरुवात केली होती.त्यामुळे तिथल्या शेतकऱ्यांना नवाच घोर लागला होता.दुपारच्या सुमारास आम्ही घटनास्थळी पोहोचलो.झालं असं होतं,की ऊसतोडणी कामगारांनी पन्नासएक फूट रुंदीचा लांबलचक पट्टा कापून टाकला होता.ज्या लाइनवरून त्यांनी पट्टा कापायला घेतला तिथून तीन-चार फुटांतच दाट उसामध्ये बिबट्याची मादी दोन पिल्लांसह विश्रांती घेत होती. कोयत्याने ऊस छाटतानाचे सपासप आवाज, कामगारांचा गलका आणि ट्रॅक्टरच्या घरघराटामुळे तिला पिल्लांसहित पळून जाता आलं नाही.त्यामुळे पिल्लं तिथेच सोडून ती पसार झाली.सूर्य थोडा वर आल्यावर मात्र तिच्या पिल्लांना भूक लागली आणि आईची आठवण आली. त्यांनी आपल्या आईला आवाज द्यायला सुरुवात केल्यावर लोकांना त्यांचं अस्तित्व लक्षात आलं आणि त्यांनी ताबडतोब वनविभागाला कळवलं.


वास्तविक काही शेतकऱ्यांनी या मादीला काही दिवसांपूर्वीच पाहिलं होतं.आदल्या दिवशी तिथे बिबट्याला पकडायचा पिंजराही आणून ठेवला होता;पण त्यात ती सापडली नव्हती.आईपासून दुरावलेल्या या पिल्लांना वन विभागाच्या लोकांनी पिंजऱ्याजवळ आणून ठेवलं होतं.ही पिल्लं सावलीसाठी पिंजऱ्याच्या खाली असलेल्या जागेमध्ये जाऊन बसली होती. त्यामुळे कुणालाच सहजी दिसत नव्हती,मात्र अधूनमधून त्यांच्या आईला ती हाक मात्र देत होती.हलकेच पिंजऱ्याखाली हात घालून एकेकाला बाहेर काढलं आणि मांडीवर घेतलं. दोन्ही पिल्लं छान गुबगुबीत होती.त्यांचे घारोळे डोळे उघडलेले होते.साधारण अर्धा किलो वजनाची ती पिल्लं दोन आठवड्यांची दिवसांची असावीत.असं मला वाटलं.

मायेचा हात मिळाल्याने ती काहीशी आश्वस्त झाली.

तिथेच मला दोन वाट्या दिसल्या आणि मला हसू आवरेना.पुण्याहून निघताना इथल्या कर्मचाऱ्यांना दूध आणि कोमट पाणी समप्रमाणात घेऊन पिल्लांना पाजावं,असा निरोप द्यायला मी सत्यजितला सांगितलं होतं. पण माझी ही सूचना त्यांच्यापर्यंत पोहोचताना काही तरी गडबड झाली असावी.तिथल्या कर्मचाऱ्यांनी पिल्लांसमोर एका वाटीत दूध आणि दुसऱ्या वाटीत कोमट पाणी ठेवलेलं दिसत होतं.ते एकत्र केलेलं नव्हतं.शिवाय या तान्ह्या पिल्लांना वाटीतून पाणी पिणं कसं कळावं? त्यामुळे आम्ही पोहोचलो तेव्हा ती चांगलीच भुकेजलेली होती.सुदैवाने जवळच्या एका घरात बाळाची दूध पिण्याची बाटली मिळाली.एका शेळीचं दूध काढलं आणि त्यात पाणी टाकून बाटलीत भरलं.बाटली त्यांच्या तोंडासमोर धरली;पण प्रतिसाद शून्य ! त्यांना भूक तर प्रचंड लागलेली दिसत होती.कारण एव्हाना त्यांच्या ओरडण्याचा व्हॉल्युम वाढलेला होता.मग मी माझी जुनी आयडिया वापरली. सॅकमधला टर्किश नॅपकिन कोमट पाण्यात भिजवून पिळून काढला.


एका पिल्लाला मांडीवर घेतलं.त्याच्या तोंडात बाटलीचं बूच सारलं आणि ओलसर खरखरीत नॅपकिन त्याच्या डोक्यावरून हलकेच फिरवला.

माझ्या मांडीला आईची कूस आणि टर्किशच्या स्पर्शाला जीभ मानून त्याने पचक पचक करत बाटलीतलं दूध प्यायला सुरुवात केली. 


दहा मिनिटांत दोघांचीही पोटं भरली आणि ती पुन्हा शहाण्यासारखी पिंजऱ्याखालच्या सावलीत जाऊन झोपली.दुपारचे दोन वाजले होते. आम्हीही जवळच्या टपरीवजा हॉटेलमध्ये भेळ खाऊन पेटपूजा आटोपली आणि पुढच्या कामाला लागलो.परतल्यावर आम्ही परिसराची पाहणी केली.उसासाठी पाणी धरलेल्या शेतात ओलसर जमिनीवर बाळांच्या आईच्या पाऊलखुणा आम्हाला काही ठिकाणी दिसून आल्या;परंतु त्यांच्या तुटक अस्तित्वामुळे तिच्या चालण्याची दिशा समजणं अवघड होते.संपूर्ण क्षेत्राचा सर्व्हे करून आम्ही परत आलो.एव्हाना पिल्लांना पुन्हा भूक लागली होती.त्यामुळे ती मोठमोठ्याने माँव माँव करू लागली होती. आम्ही लगोलग त्यांचं दुसरं फीडिंग उरकून घेतलं.आता आम्ही त्या कामात तरबेज झालो होतो.दूध पिऊन झाल्यावर पिल्लं पुन्हा पिंजऱ्याखाली जाऊन झोपली.त्यानंतर आम्ही स्थानिकांशी चर्चा केली.संध्याकाळी कुणीही एकट्या- दुकट्याने फिरू नये,शक्यतो घरीच थांबावं,असं फर्मान तिथल्या तरुण सरपंचाने काढलं.त्यानुसार सगळे इमानदारीने आपापल्या घरात टीव्ही बघत बसले.काही जवान मंडळी मात्र बिडीकाडी ओढत,तंबाखू चघळत गावाच्या वेशीवर गप्पाटप्पा करत बसली.


संध्याकाळचे सहा वाजले होते.ऊसतोडणीचं कामही थांबलं होतं.पिल्लांना शेवटचं फीडिंग करावं म्हणून मी एका पिल्लाला मांडीवर घेतलं. पिंजऱ्यापाशी मी,

तेलंगसाहेब आणि वन विभागाच्या सेवेत रुजू झालेल्या दोन तरुण मुली होत्या.आमची सुमो साधारण १०० मीटरवर उभी होती.तिथे काही कर्मचारी आणि गावातली पुढारी मंडळी थांबली होती.अख्खा परिसर निर्मनुष्य होता.मी एका पिल्लाचं फीडिंग संपवून दुसऱ्याला मांडीवर घेतलं.तेवढ्यात सुमोपाशी थांबलेल्या लोकांना आमच्या दिशेने हातवारे करायला सुरुवात केली.ते आम्हाला मागे वळून बघायला सांगत होते.आम्ही मागे वळून पाहिलं, तर पिल्लांची आई स्वतःच त्यांना न्यायला आली होती.तिच्या बाळांना आम्ही नक्की काय करतोय हे ती पाहत होती. 


आमच्यापासून ती फक्त पन्नास मीटरवर असेल. बिबटीण एवढ्या जवळ आलेल्या पाहून दोन तरुण मुली घाबरल्या.

परिस्थिती अवघड झाली होती.या मुलींनी पळापळ केली असती तर त्या मादीने त्यांना मुळीच सोडलं नसतं.आणि माझ्या हातात तर तिची पिल्लं होती.तो क्षण आम्हा सर्वांच्याच जीवनमरणाचा होता.पण वन विभागात २५-३० वर्ष काम केलेल्या अनुभवी आणि धाडसी तेलंगसाहेबांनी ही सिच्युएशन अतिशय जबाबदारीने हाताळली.तिथेच पडलेला लांबलचक ऊस त्यांनी मुलींच्या हाती सोपवला आणि त्यांना सुमोच्या दिशेने जायला सांगितलं.उसाचं दांडकं स्वतःच्या शरीराभोवती गरागरा फिरवत त्या दोघी शांतपणे सुमोपर्यंत सोयरे वनचरे,अनिल खैरे,समकालीन प्रकाशन,

पुणे..पोहोचल्या.आता मी,तेलंगसाहेब आणि बिबट्यांचे दोन बछडे एवढेच तिथे उरलो. स्थानिकांकडून पैदा केलेल्या एका बास्केटमध्ये त्या दोन्ही पिल्लांना व्यवस्थित ठेवलं आणि आम्हीही सुमो गाठली.सर्वांना सावकाश तिथून रफा दफा होण्याचा संदेश दिला.कारण आम्ही तिथेच थांबलो असतो तर कदाचित ती बिबटीण पिल्लांना न घेताच निघून जाण्याची शक्यता होती.त्यामुळे बिलकूल आवाज न करता आम्ही तिथून निघालो.सर्व लोक आपापल्या घरी परतले.आम्हीही पुण्याला परत आलो.



दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजता फोन आला.

बिबट्याच्या पिल्लांची आई पिल्लांना सुखरुप घेऊन गेल्याचा निरोप मिळाला.या निरोपामुळे आम्हाला खूपच आनंद झाला. यापूर्वी आईपासून दुरावलेल्या दहा-बारा बिबट्यांच्या पिल्लांना जगवण्याचं अवघड काम आम्ही कात्रजच्या वन्यजीव अनाथालयाला मोठ्या हिकमतीने केलं होतं.पण पिल्लांचं बालपण आईशिवाय जाणं चुकीचंच.त्यामुळे मातेपासून बिछडलेल्या बछड्यांचं पुनर्मिलन झाल्याचा आनंद और होता!

१३/१/२४

शिकाऱ्यांच्या शिकारीवर.. On the hunt for hunters..|

सकाळचा चहा घेऊन येणाऱ्या नोकरासाठी इबॉटसन दरवाजा उघडतच होता,तेवढ्यात मी तिथे आलो.ती बातमी कळल्यावर त्याने पौरीला जायचा बेत पुढे ढकलला आणि जीनच्या पलंगावर मधोमध नकाशा ठेवून आम्ही पुढच्या योजना आखू लागलो.हेडक्वार्टर्समधलं इबॉटसनचं काम खूप तातडीचं होतं त्यामुळे तो जास्तीत जास्त दोन दिवस व दोन रात्री इथे राहू शकत होता.मी कालच नैनितालला टेलिग्राम केला होता की मी पौरी-कोटद्वारा मार्गे निघत आहे.ती तार रद्द करायची व रेल्वेने जाण्याऐवजी आल्या मार्गाने परतायचं असं मी ठरवलं.हे सर्व मार्गी लागल्यावर आम्ही त्या दुर्दैवी बाईचं गाव नकाशात शोधून काढलं आणि मी तंबूत परतलो. योजनेत बदल झाल्याचं मी माझ्या माणसांना सांगितलं आणि सर्व सामानाची बांधाबांध करून खबर द्यायला आलेल्या माणसांबरोबर आमच्या पाठीमागे यावं अशी सूचना दिली.

जीन रुद्रप्रयागमध्येच राहणार होती.इबॉटसनकडे एक गल्फ अरब जातीचा घोडा आणि इंग्लिश घोडी होती.ब्रेकफास्टनंतर आम्ही ह्या उत्कृष्ट जातीच्या घोड्यांवर स्वार होऊन चटवापिपलच्या दिशेने दौडत निघालो.आम्ही आमच्या सोबत रायफल्स,निळ्या ज्योतीचा स्टोव्ह,पेट्रोल लँप व इतर सटरफटर सामान घेतलं होतं.इबॉटसनचा एक नोकर घोड्यांसाठी चारा वैरण घेऊन,एक उसन्या घेतलेल्या घोड्यावरून आमच्या बरोबर निघाला.चटवापिपल पुलावरच आम्ही घोडे सोडले.कालच्या त्या जल्लोषाच्या भरात रात्री हा पूल बंद केला गेला नव्हता. 


त्यामुळे त्या बिबळ्याने रात्रीच नदी ओलांडली होती व लागणाऱ्या पहिल्याच गावात बळी मिळवला होता.

गावातला एक माणूस आमच्यासाठी पुलावर थांबला होता.तो आम्हाला पलीकडचा डोंगर चढून व गवताळ उताराच्या कडेने जात परत दरीत उतरून एका खोल आणि दाट जंगल माजलेल्या घळीत घेऊन गेला.त्या घळीतून एक छोटा झरा वाहत होता.इकडेच आम्हाला पटवारी आणि इतर वीस जण मृतदेहापाशी थांबलेले आढळले.यावेळचा बळी म्हणजे एक १८-२० वर्षाची तरूण मुलगी होती.दोन्ही बाजूला हात ठेवलेल्या अवस्थेत ती पालथी पडलेली होती.अंगावर एकही कपडा नव्हता आणि तळपायापासून ते मानेपर्यंत तिचं संपूर्ण शरीर चाटलं गेलं होतं.गळ्यावर व मानेवर चार मोठाले दाताचे व्रण होते.तिच्या धडावरचं आणि खालच्या भागातलं थोडं थोडं मास बिबळ्याने खाल्लेलं होतं.आम्ही डोंगर चढत असताना जे ढोलाचे आवाज ऐकले होते ते या पहारा देणाऱ्या लोकांनीच वाजवले होते.आता दुपारचे फक्त दोन वाजलेले असल्याने आणि आसपास कुठेही बिबळ्या असण्याची शक्यता नसल्याने आम्ही चहा पिण्यासाठी गावात गेलो.आमच्याबरोबर पटवारी व एक माणूस होता.

चहा पिऊन झाल्यावर आम्ही त्या मुलीला जिथे मारण्यात आलं होतं त्या घरात गेलो.हे एक शेताच्या मधोमध बांधलेलं दगडी घर होतं.या घरात ती मुलगी,तिचा नवरा व त्यांचं सहा महिन्यांचं मूल एवढे जण रहात होते.दोन दिवसांपूर्वीच जमीनीबाबतच्या एका कज्जामध्ये साक्ष देण्यासाठी तिचा नवरा पौरीला गेला होता आणि घराची जबाबदारी त्याने त्याच्या बापावर सोपवली होती.त्या रात्रीची जेवणं होऊन झोपायची वेळ झाली.मुलाला दूध पाजून झाल्यावर त्या मुलीने त्याला सासऱ्याच्या हातात दिलं,दरवाजा उघडला,बाहेर पाऊल टाकलं अन् उकीडवी बसली.(मी अगोदरच सांगितलंय की आमच्या पहाडी भागातल्या घरात संडास बाथरुम नसतात.) छोटं मूल आईकडून सासऱ्याकडे दिलं जात असताना रडायला लागलं त्यामुळे जरी बाहेरून काही आवाज आलाच असेल पण तसा काहीही आवाज आला नसेल याबद्दल माझी खात्री आहे तरी त्याला तो ऐकू आला नसणार.ही अंधारी रात्र होती.काही वेळ वाट पाहिल्यावर म्हाताऱ्याने हाक मारली पण उत्तर न मिळाल्याने अजून एकदा हाक मारली.त्यानंतर मात्र त्याने उठून घाईघाईने दरवाजा बंद करून घेतला.संध्याकाळी थोडासा पाऊस पडला होता. त्यामुळे आसपास नीट निरीक्षण केलं तर घटना संगतवार लावता येणं शक्य होतं.पाऊस थांबल्यानंतर थोड्याच वेळात गावाच्या दिशेकडून बिबळ्या तिथं आला होता व शेतातल्याच एका शिळेमागे दबून बसला.ही शिळा दरवाजाच्या डावीकडे तीस यार्डावर होती. तिच्याआड तो काहीवेळ बसला... बहुतेक



त्यांच्या बोलण्याचा आवाज ऐकत ! दरवाजा उघडून बाहेर आल्यावर ती मुलगी दरवाजाच्या उजव्या बाजूला म्हणजेच बिबळ्याकडे थोडीशी पाठ करून उकीडवी बसली.बिबळ्याने शिळेला वळसा घालून घर व शिळा यामधलं तीस यार्ड अंतर पोट जमीनीला टेकवून सरपटत पार केलं आणि भिंतीच्या अगदी कडेकडेने जाऊन त्या मुलीला मागून पकडलं.त्यानंतर तिला शिळेपर्यंत ओढत घेऊन आला.इकडेच... ती मुलगी ठार झाल्यावर किंवा


 त्या माणसाने मारलेल्या हाकेचा आवाज आल्यावर त्याने तिला तोंडात धरून उचललं व नांगरलेल्या जमीनीवरून फरफटल्याच्या खुणा राहू नयेत अशा पद्धतीने तोंडातच पण जरा उंच पकडून एक शेत ओलांडलं.पुढे तीन फुटी बांधावरून खालच्या शेतात उडी मारली.हे शेत एका बारा फूट खोल बांधावर संपत होतं व त्याच्या खाली नीट मळलेली पायवाट होती.ही बारा फूट उडी त्याने तिला तोंडात घेऊनच मारली.त्या मुलीचं वजन जवळजवळ साठ किलो होतं.तरीही वाटेवर पाय टेकवल्यानंतरसुद्धा तिच्या शरीराचा एकही भाग जमीनीला टेकला नव्हता यावरून तुम्हाला त्या बिबळ्याच्या ताकदीची कल्पना येईल.पायवाट ओलांडून डोंगर उतारावरून तो खाली अर्धा मैल गेला होता व तिथे तिला टाकून तिचे सर्व कपडे ओरबाडून काढले होते.थोडंसं खाऊन झाल्यावर त्याने तिला वेलीचं छप्पर असलेल्या एका झाडाखाली, पाचूसारख्या हिरव्याकंच गवतावर टाकून दिलं होतं.


संध्याकाळी चार वाजता सोबत पेट्रोल लॅम्प व शूटींग लाईट घेऊन आम्ही मृतदेहाजवळ बसण्यासाठी निघालो.

मृतदेह शोधताना व नंतर पहारा करताना त्या माणसांनी केलेला गोंगाट बिबळ्याने ऐकलाच असणार असा अंदाज करायला हरकत नव्हती.आता जरी तो भक्ष्याजवळ आला तरी पूर्ण सावधगिरी बाळगूनच येणार हे निश्चित होतं म्हणून आम्ही भक्ष्याच्या अगदी जवळ न बसण्याचं ठरवलं. भक्ष्यापासून साठ यार्ड दूर एक झाड होतं व तिथून हिरवळीवरचं भक्ष्य व्यवस्थित दिसत होतं. त्यामुळे आम्ही हेच झाड निवडलं.


हे वाढ खुंटलेलं ओकचं झाड डोंगरावर उताराशी जवळजवळ काटकोन करून उभं होतं.आम्ही आमचा पेट्रोल लॅम्प एका छोट्या झाडाखालच्या खळ्यात लपवून पाईनच्या पानांनी झाकला. इबॉटसनने झाडाच्या फांद्या जिथे फुटल्या होत्या तिथे जागा घेतली तर मी टेकडीकडे तोंड करून झाडाशी पाठ देऊन बसलो.यावेळी इबॉटसन शॉर्ट घेणार होता व मी आमच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पहारा देणार होतो.बॅटरी गेल्यामुळे शूटींग लाईट चालू होत नव्हता.त्यामुळे इबॉटसनला नीट दिसेल तोपर्यंतच आम्ही बसणार होतो व नंतर पेट्रोल लॅम्पच्या साहाय्याने गावात परतणार होतो.तिथे रुद्रप्रयागवरून आलेली आमची माणसं वाट पाहत थांबणार होती.


आसपासच्या जमीनीचं नीट निरीक्षण करण्यासाठी आम्हाला वेळ उरला नव्हता,पण गावकऱ्यांनी आम्हाला सांगितलं होतं की भक्ष्य पडलेल्या जागेच्या पूर्वेकडे दाट जंगल आहे आणि त्याच जंगलात बिबळ्या गेला असण्याची जास्त शक्यता आहे.जर खरंच त्याच दिशेकडून बिबळ्या भक्ष्याकडे आला तर तो तिथे पोचण्याच्या बरंच अगोदर इबॉटसनला दिसणार होता कारण त्याच्या रायफलला टेलिस्कोपिक साईट बसवली होती.या साईटमुळे फक्त अचूक नेम लागतो असं नाही तर वरचा अर्धा तासही आम्हाला हाताशी मिळणार होता,काही टेस्ट्स घेऊन आम्ही ते पडताळूनही पाहिलं होतं. प्रकाशाचं एखादं मिनिट तेव्हा यश-अपयश ठरवायला कारणीभूत होणार असेल तेव्हा हा वेळेचा खरं म्हणजे प्रकाशाचा- घटक निर्णायक ठरतो.पश्चिमेकडच्या पहाडामागे सूर्य अस्ताला जायला लागला आणि काही मिनिटं आम्ही सावलीत आलो तेवढ्यात एक भेकर त्याचा अलार्म कॉल देत डोंगरावरून खाली भुंकत पळत आलं,डोंगराच्या कडेला ते जरा थांबलं व त्याच ठिकाणी थोडावेळ थांबून भुंकल्यावर पलीकडच्या बाजूला गेलं.त्याचा आवाज हळूहळू अस्पष्ट होत गेला.हे भेकर बिबळ्याला पाहून भुंकलं होतं हे निश्चित आणि जरी त्या भागात एका पेक्षा अधिक बिबळे असण्याची शक्यता होती तरी माझ्या आशा उंचावल्या.मी वळून पाहिलं तर इबॉटसनसुद्धा सावध झाला होता व त्याचे दोन्ही हात रायफलवर होते.


प्रकाश कमी होत होता तरीही अजून टेलिस्कोपिक साईटच्या मदतीशिवाय शूटींग करता येईल इतपत दिसू शकत होतं इतक्यात डोंगराच्या दिशेकडे असणाऱ्या झुडुपांच्या मागून एक पाईन कोन घरंगळत आला आणि माझ्या पायाशीच झाडाजवळ पडला.बिबळ्या आला होता आणि काहीतरी धोका जाणवल्यामुळे त्याने अशी दिशा पकडली होती की जिथून भक्ष्याच्या आसपासची सर्व परिस्थिती निरखून बघता येईल.दुर्दैव असं की असं करताना तो आणि भक्ष्य यांच्या सरळ रेषेतच आमचं झाडं आलं होतं.माझी फक्त बाह्याकृतीच दिसण्याची शक्यता होती.पण इबॉटसन झाडाच्या फांद्यांवर असल्याने तो मात्र बिबळ्याच्या नजरेतून सुटणार नव्हता.जेव्हा मी नेम धरू शकेन आणि इबॉटसनच्या टेलिस्कोपिक साईट्सचा उपयोग होईल इतकासुद्धा प्रकाश राहिला नाही तेव्हा बिबळ्या दबकत दबकत उतरून आमच्या दिशेला येताना मी ऐकलं.आता मात्र जे काही करायचं ते अगदी ताबडतोब करायला पाहिजे होतं.त्यामुळे मी पटकन इबॉटसनला माझी जागा घ्यायला सांगितलं आणि पेट्रोल लॅम्प हस्तगत केला.हा लॅम्प जर्मन मेकचा होता आणि त्याला 'पेट्रोमॅक्स' असं नाव होतं.त्याचा प्रकाश चांगला पडायचा पण त्याचं लांबुळकं धूड आणि लांबलचक हँडल यामुळे तो जंगलात वापरण्याच्या उपयोगाचाच नव्हता.


मी इबॉटसनपेक्षा थोडा उंच आहे त्यामुळे मीच लॅम्प हातात घेईन असं मी इबॉटसनला सुचवलं. पण इबॉटसन म्हणाला की,तो लॅम्प व्यवस्थित हाताळू शकेल.त्याच्या रायफलापेक्षा माझ्यावर अवलंबून राहाणं त्याला योग्य वाटलं असावं म्हणून इबॉटसन पुढे तर,रायफलवर दोन्ही हात ठेवून मी मागे असे आम्ही गावाच्या रस्त्याला लागलो.

शेतापासून पन्नास यार्डावर एका कातळावर चढताना इबॉटसनचा पाय घसरला, लॅम्पचा तळ खडकावर आपटला व मँटल धुळीत पडलं.पेट्रोल टाकीवर दिसणारी छोटी निळी ज्योत सुद्धा बऱ्यापैकी प्रकाश देत होती पण प्रश्न हा होता की एवढासा उजेड तरी किती वेळ टिकणार! इबॉटसनच्या म्हणण्याप्रमाणे तीन मिनिटं ही ज्योत राहील.तीन मिनिटं... जिथे दर सेकंदाला दगडधोंडे,

काटेकुटे चुकवण्यासाठी दिशा बदलून पावलं टाकावी लागणार होती आणि नरभक्षक पाठलागावर असण्याची शक्यता होती अशी ही डोंगराची वाट चढून जाणे हे एक भयानक आव्हानच होतं. (नंतर आम्हाला कळलं की खरोखर आमचा पाठलाग होत होता)


कधी कधी आयुष्यात असे प्रसंग येतात की नंतर कितीही वर्ष निघून गेली तरी तुमच्या आठवणीत तसेच कोरलेलेच राहतात.त्या दिवशी अंधारात ती चढण चढणे हा माझ्या बाबतीत असाच प्रसंग होता.

चढण चढून पायवाटेवर आल्यानंतरही नष्टचर्य संपलं नव्हतंच.कारण या वाटेवर म्हशींच्या असंख्य लोळणी होत्या आणि आमची माणसं कुठे आहेत ते आम्हाला माहीत नव्हतं.


कधी चिखलातून पाय घसरत तर कधी दगडगोट्यांवर ठेचा खात शेवटी आम्हाला काही दगडी पायऱ्या लागल्या.

या पायऱ्या उजवीकडे चढत गेल्या होत्या आणि त्या चढून वर आल्यावर आम्हाला एक अंगण लागलं.पलीकडे दरवाजा होता.पायऱ्या चढतानाच आम्ही हुक्क्याचा आवाज ऐकला होता.म्हणून मी दरवाजावर लाथ मारून ओरडून उघडायला सांगितला.जेव्हा उत्तर आलं नाही तेव्हा मी काड्यापेटी काढली आणि तिचा हलवून आवाज करत जोरात ओरडलो की जर एका मिनिटात दरवाजा उघडला नाही तर मी झोपडीला आग लावीन. मिनिटभरातच प्रथम आतला व नंतर बाहेरचा दरवाजा उघडला गेला.मी व इबॉटसन दोन ढांगात आत घुसलो तसा ताबडतोब दरवाजा बंद केला गेला.


या एवढ्याशा खोलीत निरनिराळ्या वयाची पुरुष,

बायका व मुलं अक्षरशः ठासून भरली होती.आमच्या अशा अनौपचारिक प्रवेशानंतर जेव्हा सर्वजण सावरले तेव्हा त्यांनी दरवाजा उघडायला उशीर केल्याबद्दल माफी मागितली आणि सांगितलं की इतकी वर्ष दहशतीखाली काढल्याने आम्हाला रात्री येणाऱ्या प्रत्येक आवाजाचा संशय येतो व त्यामुळे दार उघडण्याचं धाडस झालं नाही.आम्हाला त्यांचं म्हणणं न पटण्याची शक्यता नव्हतीच.कारण इबॉटसन घसरून पडल्यावर जेव्हा मँटल धुळीत पडलं व कंदील फुटू नये म्हणून तो विझवायला लागला त्या क्षणापासून आतापर्यंत आमची मनोमन खात्री पटली होती की आमच्यातला एक किंवा कदाचित दोघंही जिवंतपणे गावात पोचू शकणार नाही.आम्हाला सांगितलं गेलं की आमची माणसं संध्याकाळीच गावात पोचली होती.ती असंच पुढे डोंगराच्या कडेला असलेल्या एका घरात थांबली आहेत.दोन धडधाकट माणसांनी आमच्याबरोबर रस्ता दाखवायला येण्याची तयारीही दर्शवली, पण परत येताना त्यांना एकटं यावं लागणार होतं आणि ती हत्याच ठरली असती.त्यामुळे आम्ही त्यांना विचारलं की आम्हाला एखादा तरी दिवा किंवा कंदील मिळेल का? खोलीचे कोपरे धुंडाळल्यावर त्यांना एक फुटक्या काचेचा कंदील मिळाला व जोरजोरात हलवल्यावर त्यात थोडं तेलही आहे हे समजलं.पटकन कंदील पेटवला गेला व खोलीतल्या सर्वांच्या शुभेच्छा घेऊन आम्ही बाहेर पडलो.ताबडतोब आमच्या मागे दरवाजे घट्ट लावून कड्याही घातल्या गेल्या. पुन्हा एकदा त्या म्हशींच्या लोळणी,गवतात लपलेले दगडगोटे व काटे... पण मदतीला मंद का होईना प्रकाशाचं साधन असल्याने आम्ही झपाटा मारला आणि आम्हाला ज्या दुसऱ्यांदा लागणाऱ्या पायऱ्या चढायला सांगितल्या होत्या त्या शेवटी आल्या आणि आम्ही एका एकमजली इमारतीच्या अंगणात आलो.त्याच्या उजव्या डाव्या बाजूला दरवाजे होते ते सगळे घट्ट बंद होते;कुठेही थोडासुद्धा प्रकाश दिसत नव्हता.मी हाका मारल्यावर एक दरवाजा उघडला गेला. चार-पाच दगडी पायऱ्या चढल्यावर आम्ही वरच्या मजल्याच्या व्हरांड्यात आलो.तिथे आमच्या माणसांसाठी आणि आमच्यासाठी राखून ठेवलेल्या खोल्या होत्या.

आमची माणसं रायफली व कंदील आमच्या हातातून घेऊन आम्हाला मोकळं करत असताना एक कुत्रा कुठूनतरी तिथे आला.हा आपला साधासुधा गावठी कुत्रा होता व आमचे पाय हुंगल्यावर शेपटी हलवत तो आताच आम्ही चढून आलेल्या पायऱ्यापर्यंत गेला... आणि दुसऱ्याच क्षणी भीतीने दचकल्यासारखा आवाज काढून नंतर अंगात आल्यासारखा भुंकत मागे सरकला... त्याच्या अंगावरचे सर्व केस ताठ उभे राहिले होते! आमचा कंदील तर विझून गेला होता.पण आमच्या माणसांनी दुसरा कंदील पैदा केला.इबॉटसनने तो वर धरून सर्व कोनांतून फिरवला,मी चटकन रायफल लोड केली तरीही पायऱ्यांच्या खाली असणाऱ्या अंगणात उजेड पडलाच नाही.


त्या कुत्र्याकडे पाहूनच बिबळ्याच्या सर्व हालचालींचा अंदाज येत होता.तो अंगण ओलांडून पुढच्या पायऱ्या उतरून खालच्या पायवाटेला लागला तेव्हा शेवटी तो कुत्रा भुंकायचा थांबला व त्या दिशेकडे बघून मध्ये मध्ये गुरगुरत शेवटी खाली बसला.या दोन्ही खोल्यांना खिडक्या नव्हत्या.फक्त दरवाजा बंद करूनच आम्ही सुरक्षितपणे खोलीत झोपू शकलो असतो.पण त्यामुळे गुदमरायला झालं असतं.म्हणून आम्ही व्हरांड्यावरच रात्र घालवायचं ठरवलं.हा कुत्रा त्या खोलीच्या मालकाचाच असावा आणि त्याला व्हरांड्यात झोपायची सवयही असावी.

आळीपाळीने झोपत आम्ही ती रात्र घालवली पण पायाशीच झोपलेल्या कुत्र्यामुळे आम्हाला सुरक्षिततेची जाणीव मात्र होत राहिली.


२४.१२.२३ या लेखमालेतील पुढील भाग..


११/१/२४

वाईटाला ही चांगले म्हणा.. Call bad good..

'एखादा चांगला कर्मचारी कामात निष्काळजीपणा दाखवू लागला किंवा वाईट काम करू लागला तर तुम्ही काय कराल? तुम्ही त्याला नोकरीतून काढू शकता,पण त्यामुळे समस्या सुटू शकणार नाही.तुम्ही त्याच्यावर टीका करू शकता पण त्यामुळे त्याचं मन खट्टू होईल. हेन्री हॅक लॉवेल,इंडियानामध्ये एका मोठ्या ट्रक डीलरशीपचा सर्व्हिस मॅनेजर होता.तो आपल्या एका मेकॅनिक-बिल

पासून त्रस्त होता,ज्याचं काम सध्या समाधानकारक नव्हतं.मिस्टर हँकने त्याला आपल्या ऑफिसमध्ये बोलवलं आणि त्याच्याशी मनमोकळी चर्चा केली.।


"बिल,तू एक चांगला मेकॅनिक आहेस.तू अनेक वर्षांपासून इथे काम करतो आहेस. ग्राहकांची अनेक वाहनं तू चांगल्या प्रकारे दुरुस्त केली आहेत.तुझं काम इतकं उत्तम आहे की अनेक ग्राहक तुझी स्तुती करतात.पण मागील काही दिवसांत तुझ्या कामात तू दिरंगाई करतो आहेस. तुझं काम आधीसारखं उत्तम राहिलेलं नाही. चांगला मेकॅनिक असल्याने मला तुला हे सांगावंस वाटतं की मी या स्थितीत खूश नाहीये. पण आपण दोघे मिळून या परिस्थितीवर तोडगा काढू शकतो."


बिलने उत्तर दिले की,'मला हे उमजलंच नाही की मी आधीइतकं चांगलं काम करत नाहीए.' त्याने आपल्या बॉसला आश्वासन दिलं की मी अजूनही तितकंच उत्तम काम करू शकतो. यापुढे सुधारण्याचा प्रयत्न करीन.


तर मग त्याने तसे केले का? तुम्हाला कळलेच असेल की त्याने तसेच केले असणार.तो पुन्हा एकदा उत्तम व कुशल मेकॅनिक झाला.मिस्टर हँकने भूतकाळाच्या त्याच्या कामाची त्याच्यासमोर जी प्रतिमा बनवली होती त्या प्रतिमेला बिल जागला.


'बाल्डविन लोकोमोटिव्ह वर्क्स'चे अध्यक्ष सॅम्युअल वॉक्लेनने म्हटलं होतं,"साधारण माणसाला सहजपणे प्रेरित केलं जाऊ शकतं,जर तो तुमचा आदर करत असेल तर; आणि जर तुम्ही त्याला हे सांगितलंत की तुम्ही त्याच्या एखाद्या विशेष योग्यतेसाठी त्याचा आदर करता."


थोडक्यात,जर तुम्हाला एखाद्या व्यक्तीची एखादी गोष्ट सुधारायची असेल तर असं दाखवा की तो त्या व्यक्तीचा सर्वश्रेष्ठ गुण आहे.


शेक्सपियरनं म्हटलं होतं,"जर तुमच्यात कुठलाच गुण नसेल तर,असा व्यवहार करा की जणू काही तो गुण तुमच्यात आधीपासूनच आहे." 


आणि लोकांना पण स्पष्टपणे सांगून द्या की तुम्ही समोरच्या व्यक्तीमध्ये जो गुण पाहू इच्छिता तो त्याच्यात आधीपासूनच आहे.त्यांची चांगली प्रतिमा बनवा.


जॉर्जेट लेब्लांकनं आपलं पुस्तक 'सॉव्हेनियर्स, माय लाइफ विथ मॅटरलिंक'मध्ये सांगितलंय.की त्यांनी कशा त-हेनं एका बेल्जियन सिंड्रेलाचा अद्भूत कायापालट केला.


"शेजारच्या हॉटेलमधून एक नोकराणी माझं जेवण आणायची,"त्या लिहितात,"तिला 'मेरी द डिशवॉशर' म्हटलं जायचं. कारण तिनं आपली कारकीर्द भांडी घासणाऱ्या मोलकरणीच्या मदतनीसच्या रुपात सुरू केली होती.ती कुरुप दिसायची,तिचे डोळे थोडे तिरळे होते आणि पाय सळयांसारखे बारकुळे होते.तिची अंगकाठी किडकिडीत होती. तिच्यात आत्मविश्वासाचा अभाव होता.


"एक दिवस जेव्हा आपल्या लाल हातात मेरी मॅकरोनीची प्लेट घेऊन उभी होती,तेव्हा मी तिला सरळपणे म्हटलं,

'मेरी,तुला कल्पना नाही की तुझ्यात किती गुण लपलेले आहेत.मेरीला आपल्या भावना लपवून ठेवण्याची सवय होती. ती काही क्षण थबकली.तिनं संकटाच्या विचाराने काहीच प्रतिक्रिया दाखवली नाही.तिने प्लेट टेबलवर ठेवली आणि मग भोळेपणाने म्हणाली, "माझा यावर विश्वास बसत नाही." तिला याबाबतीत काही शंका नव्हती,

त्यामुळे तिने मला एकही प्रश्न विचारला नाही.ती किचनपर्यंत गेली आणि तिनं मी म्हटलेलं तिनं पुन्हा म्हटलं.तिच्या आस्थेमध्ये इतकी शक्ती होती की कुणीच तिची टर उडवली नाही.त्या दिवसानंतर लोक तिच्याशी चांगला व्यवहार करू लागले.पण सर्वांत अजब बदल मेरीत आला होता.तिला आता विश्वास वाटू लागला होता की तिच्यात अनेक सुप्त गुण होते. ती स्वतःचा चेहरा व शरीराकडे विशेष लक्ष देऊ लागली.त्यामुळे निद्रिस्त तारुण्य जागृत झालं आणि तिची कुरुपता नाहीशी झाली.


"दोन महिन्यांनी तिनं घोषणा केली की ती खानसाम्याच्या भाच्याशी लग्न करणार आहे.'मी एक लेडी बनणार आहे,' तिनं मला सांगितलं आणि मला धन्यवाद दिले.एका छोट्याशा वाक्यांनं तिचं पूर्ण जीवनच बदलून गेलं होत."


जॉर्जेट लेब्लांकने 'मेरी द डिशवॉशर'ला एका प्रतिमेत बसवलं होतं,जिच्या हिशोबाने ती व्यवहार करू शकेल आणि त्या प्रतिमेने तिचा कायापालट झाला होता.बिल पार्कर डेटोना बीच, फ्लोरिडामध्ये एका फूड कंपनीचे सेल्स रिप्रेझेंटेटिव्ह होते.ते आपल्या कंपनीद्वारा निघणाऱ्या नवीन उत्पादनांमुळे खूप उत्साहित होते.त्यांना हे जेव्हा समजलं की एका मोठ्या फूड मार्केटच्या मॅनेजरने या उत्पादकांना आपल्या दुकानात ठेवण्यापासून मज्जाव केला, तेव्हा ते खूप दुःखी झाले.बिल पूर्ण दिवसभर यावर विचार करीत राहिले आणि त्या संध्याकाळी घरी जाण्याआधी त्याने पुन्हा एकदा दुकानात जाऊन प्रयत्न करण्याचा निर्णय घेतला.


"जॅक," तो म्हणाला, "जेव्हा मी सकाळी आले होतो तेव्हा मला असं जाणवलं की तेव्हा मी आमच्या उत्पादनांबद्दल तुम्हाला पूर्ण माहिती दिली नव्हती.मी आता तुमचा थोडा वेळ घेईन, म्हणजे मी ती माहिती तुम्हाला नीट सांगू शकेन,जी मी आधी दिली नव्हती.मला नेहमीच या गोष्टीचा आदर वाटलेला आहे की तुम्ही नेहमी ऐकण्यासाठी इच्छुक असता व जर ते तुम्हाला मान्य झालं तर तुम्ही आपला निर्णय बदलण्यासाठी तयार राहता."


जॅक यानंतरसुध्दा ऐकायला नकार देऊ शकला असता का? अजिबात नाही,कारण त्याला आपल्या प्रतिमेला जागायचं होतं.


एका सकाळची गोष्ट आहे.डब्लिन,आयर्लंडचे एक दंत चिकित्सक डॉ.मार्टिन फिट्जह्यू अवाक झाले होते.

त्यांच्या एका रुग्णाने सांगितले की ज्या धातुच्या कपाने तो आपलं तोंड स्वच्छ करत होता,तो कप ठेवण्याचा होल्डर अस्वच्छ होता.खरं तर तो रुग्ण कागदी कपाने गुळण्या करत असे.परंतु व्यावसायिकदृष्ट्या हे योग्य नव्हतं की कप ठेवण्यासाठी अस्वच्छ होल्डरचा उपयोग केला जावा.

जेव्हा रुग्ण निघून गेला तेव्हा डॉक्टरांनी आपल्या खाजगी ऑफिसात जाऊन सफाई करणाऱ्या महिला कामगार ब्रिजिटला एक चिठ्ठी लिहिली.ब्रिजिट त्यांच्या ऑफिसची स्वच्छता करायला आठवड्यातून दोनदा येत असे.त्यांनी लिहिलं-


प्रिय ब्रिजिट,


मी तुला फार कमी वेळ भेटू शकतो.मी असा विचार केला की तुझ्या स्वच्छतेच्या इतक्या चांगल्या कामासाठी मी तुला धन्यवाद द्यायला वेळ काढायला हवा.तसं पाहिलं तर मला वाटतं की आठवड्यात दोनच दिवस,दोन तासाचा वेळ स्वच्छतेसाठी खूपच कमी असतो.जर तुला पण असे वाटत असेल की तुला 'कधीतरी' स्वच्छ करण्याच्या वस्तू,जसे की कपहोल्डर इत्यादींना साफ करायला जास्त वेळेची आवश्यकता आहे तर तू कृपया अर्धा तास जास्त काम करण्याची तसदी घे.उघडच आहे की मी या अतिरिक्त कामाचे जास्त पैसे देईन.


डॉ.फिट्जह्यू सांगतात, "दुसऱ्या दिवशी जेव्हा मी ऑफिसमध्ये आलो तेव्हा माझे टेबल आरशाप्रमाणे चमकत होते आणि माझी खूर्चीसुद्धा इतकी गुळगुळीत झाली होती की मी त्यावरून जवळजवळ घसरून खालीच पडलो. मी आत्तापर्यंत जितके कप होल्डर्स बघितले होते त्यात सर्वांत चमकणारा होल्डर हा होता.मी स्वच्छता करणाऱ्या व्यक्तीसमोर तिची एक प्रतिमा बनवली होती आणि या छोट्याशा प्रयत्नानंतर तिने आपले सर्वश्रेष्ठ काम केले.तिने या जास्तीच्या कामात किती जास्त वेळ लावला? बरोबर आहे तुमचं - अजिबातच नाही!"


एक जुनी म्हण आहे,"जर एखाद्या कुत्र्याला वाईट नाव दिलंत तर तो इतका वाईट वागेल की तुम्ही त्याचे प्राणच घेऊ पाहाल." पण जर तुम्ही त्याचे लाड केलेत,तर तुमच्यासाठी काय काय करतो ते पाहा!


श्रीमती रुथ हॉपकिन्स ब्रुकलीन न्यू यॉर्कमध्ये चौथीची शिक्षिका होती.शाळेत पहिल्या दिवशी तिने आपल्या वर्गाच्या उपस्थिती रजिस्टरला पाहिलं आणि नवीन सत्र सुरू करण्याच्या तिच्या उत्साहावर पाणी पडलं.यंदा तिच्या वर्गात टॉमी टी.आला होता,जो शाळेतला सर्वांत कुप्रसिध्द 'खोडकर मुलगा' होता.तिसरीची वर्गशिक्षिका नेहमी आपल्या सहकाऱ्यांकडे,प्रिन्सिपलकडे त्याची तक्रार करीत असे.तो केवळ वांडच नव्हता,तर वर्गात गंभीर समस्यासुद्धा निर्माण करीत असे.तो सगळ्या मुलांशी भांडत असे,मुलींना छेडत असे आणि शिक्षकांना तर बेजार करत असे,वयाप्रमाणे त्याच्या या खोड्या वाढतच चालल्या होत्या.

त्याच्यात एकच गोष्ट चांगली होती आणि ती म्हणजे तो वेगाने शिकत असे व अभ्यासात हुशार होता.


श्रीमती हॉपकिन्सने तत्काळ टॉमीच्या समस्येचे निराकरण करायचं ठरवलं.जेव्हा ती आपल्या नवीन विद्यार्थ्यांचं स्वागत करीत होती,तेव्हा तिने प्रत्येकाशी या त-हेने गप्पा केल्या,"रोझ,तुझा पोशाख खूप सुंदर आहे." "एलिलिया,मी ऐकलंय की तू खूप छान चित्र काढतेस."जेव्हा ती टॉमीजवळ आली तेव्हा त्याच्या डोळ्यात बघत तिने म्हटले


'टॉमी,मला वाटतं की तू स्वाभाविकच लीडर आहेस,

नेता आहेस.मला असं वाटतं की तू या वर्गाचा मॉनिटर व्हावंस. मुलांना सांभाळायला तू माझी मदत कर म्हणजे यंदा चौथीचा आपला वर्ग शाळेतला सर्वोत्कृष्ट वर्ग होईल." सुरुवातीच्या दिवसांत शिक्षिकेने टॉमीच्या प्रत्येक गोष्टीची वारंवार स्तुती केली आणि तो किती चांगला विद्यार्थी आहे हे त्याला सांगितलं.अशी स्वतःची प्रतिमा उंचावल्यावर तर नऊ वर्षांचा हा मुलगा,आपल्या उंचावलेल्या प्रतिमेला कायम राखण्यासाठी विवश झाला आणि त्याने आपल्या शिक्षिकेच्या नजरेतली प्रतिमा बदलू दिली नाही.जर तुम्हाला दुसऱ्यांच्या व्यवहाराला किंवा वागणुकीला बदलण्याच्या कठीण नेतृत्व-

आव्हानात निपुण व्हायचं असेल तर समोरच्या व्यक्तीला इतकी प्रतिष्ठा द्या किती योग्य कार्य करण्यासाठी सिद्ध होईल.


२६.१२.२३ या लेखातील पुढील भाग..